कोरोना लस - तीन विचारप्रवाह
कोरोना लस - तीन विचारप्रवाह - योगिनी लेले
(मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. लशीविषयी काही रोचक माहिती देणारी एक लेखमाला त्या 'ऐसी अक्षरे'साठी लिहीत आहेत. त्यातील हा पहिला भाग.)
कोव्हिड-१९मुळे जगात काय हलकल्लोळ माजलाय ते मी पुन्हा आणि नव्याने सांगायला नकोच. त्यातच भर म्हणून कोव्हीडच्या लशीबद्दल चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा. लस येणार म्हणता म्हणता कालपासून ही लस उपलब्ध झाली आणि पहिल्यांदा एका ब्रिटीश नागरिकाला ही लस देण्यात आली.
हे कोणते वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि ते असण्यामागची कारणमीमांसा काय असू शकेल याचा जर परामर्श घ्यायचे ठरवले तर असे दिसून येते की जगामध्ये सध्या तज्ज्ञांमध्ये कोव्हीड-१९बद्दल तीन वेगवेगळी मते अस्तित्वात आहेत.
- पहिल्या मताच्या विचारांप्रमाणे कोव्हीड-१९साठी lockdownची अत्यंत आवश्यकता होती आणि आहे. तसेच कोव्हीडसाठी लस उपलब्ध होणे ह्याचीही नितांत गरज आहे. लोकांना लस दिली गेल्यानंतरच लॉकडाऊनची बंधने उठवली गेली पाहिजेत आणि जोपर्यंत लस उपलब्ध नाही तोपर्यंत लॉकडाऊन हाच सर्वात प्रभावी उपाय आहे.
हा विचारप्रवाह असण्याची कोणकोणती कारणे असू शकतील ह्याचा जर विचार केला, तर पुढील काही कारणे डोळ्यासमोर येतात.
- हा विषाणू नवीन आहे. तो नैसर्गिकरीत्या कुठल्यातरी दुसऱ्या प्राण्यात अस्तित्वात होता आणि आता माणसांना बाधा करतो आहे असे आहे का? (जसा स्वाईन फ्लू - डुकरांमधील Influenza विषाणू माणसाला बाधा करू लागला.)
- किंवा हा विषाणू नैसर्गिक नसून, मानवाकडून मुद्दाम जैवदशहतवाद यासाठी तयार केला गेला आहे का? तसे असल्यास त्यात कोणकोणती रोगकारक शक्ती असू शकतील, mutation हे अपेक्षित आहे / होते का, तो mutate झाला तर किती जास्त / कमी जहाल होईल, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. जसजसे दिवस जात राहिले तसतशी प्रत्यक्ष रुग्णांकडून माहिती उपलब्ध होत गेली.
- हा विषाणू नवीन असल्यामुळे पुढील प्रश्न सोडवायला काही काळ जावा लागला अ) – किती संसर्गजन्य आहे, ब) मृत्यूचे प्रमाण किती आहे क) संसर्ग झाल्यानंतर कोणकोणत्या अवयवांना आणि कोणत्या प्रमाणात बाधा करतो, ड) कोणत्या वयोगटातील माणसांना जास्त बाधा होते; एकदा रोग झाल्यानंतर परत रोग होऊ शकतो का, इ) रोग होऊनही कोणतीही लक्षणे न दिसणे अशा रोग्यांचे प्रमाण किती आहे फ) लक्षणे नसणारे रोगी ह्या रोगाचा प्रसार करतात का? इत्यादि.
- ज्या देशामधून हा विषाणू पसरला त्या देशातील परिस्थिती किंवा त्या देशात त्यांनी काय उपाय योजना केली / करणार आहेत / किंवा काय प्रयत्न चालू आहेत याबद्दल काहीही विशेष माहिती उपलब्ध होत नव्हती म्हणून संशयाला, अस्थिरतेला जास्त वाव मिळाला.
- विषाणू असल्यामुळे त्यावर कोणतेच औषध, antibiotics वगैरे लागू पडत नाही. फक्त लक्षणावरच उपाय / मदत करता येतो. विषाणूसाठी एकच मार्ग उपाय म्हणून वापरता येतो आणि तो म्हणजे प्रतिबंधक लस. आणि म्हणून लस तयार करण्यासाठी सगळे देश आणि विविध कंपन्या ह्यांनी आपले प्रयत्न पणाला लावले.
- दुसरा प्रवाह म्हणजे कोव्हीडसाठी लॉकडाऊनची काहीही गरज नव्हती आणि नाही. हा फ्लूसारखा विषाणू आहे, आणि फ्लूची जशी साथ येते तशीच ही साथ आहे आणि त्या वेळी जशी आणि जेवढी काळजी घेतो तशीच आणि तेवढीच काळजी घेणे पुरेसे आहे. फ्लूसाठी जशी लस आहे तशी लस कोव्हीडसाठी उपलब्ध झाली तर चांगलेच आहे, पण त्यापेक्षा जास्त घाबरायचे किंवा काळजी करण्याचे कारण नाही.
- तिसरा प्रवाह म्हणजे कोव्हीडसाठी लॉकडाऊनची तर गरज नाहीच पण लशीचीही गरज नाही. ह्या विचारसरणीच्या लोकांची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे आहे.
- १००% जनतेला ह्या विषाणूपासून धोका आहे हे गृहीत धरणे चुकीचे आहे.
- लोकांमधे ह्या विषाणूविरुद्ध कोणतीही प्रतिकारशक्ती नसेल हे हीचुकीचे गृहीत आहे.
- कोव्हीड-१९ हा करोना विषाणू आहे. सर्दीसारखे आजार निर्माण करणारे इतर ४ करोना विषाणू हे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत आणि ते सर्दीसारख्या आजाराला कारणीभूत असतात. त्यांच्यापासून ज्यांना सर्दी वगैरे झाली असेल त्यांच्यामध्ये त्या करोना विषाणूविरुद्ध अतिशय चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. हीच प्रतिकारशक्ती कोव्हीड-१९साठीही काही प्रमाणात उपयोगी पडू शकेल. त्यामुळे आणि ह्या लोकांनासुद्धा कोव्हीड-१९चा संसर्ग होईल हा ग्रह अनाठायी आहे.
- प्रतिकारशक्ती असलेले लोक, संसर्गाचा फारसा धोका नाही अशा वयोगटातील लोक, सशक्त व सक्षम लोक आणि आत्तापर्यंत तयार झालेली सामुहिक प्रतिकारशक्ती (herd immunity) हे सर्व लक्षात घेता लॉकडाऊनची तर गरज नाहीच पण लशीचीही गरज भासत नाही.
- पूर्णपणे संशोधन झालेले नसताना सरसकट सर्व लोकांना अशी लस देणे हे योग्य वाटत नाही.
तीन वेगळे विचारप्रवाह आणि त्यामागची कारणे याचा तपशील मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. लस इतक्या लवकर कशी तयार झाली किंवा होते आहे हे पुढच्या भागात आपण पाहू.
...
(( या संसर्गजन्य जनुकीय रोगावर जनुकीय लसच हवी हा आग्रह कशाला? इतर काही सामान्य औषध का नसावे? -- हा माझा विचार))
आहे ना! एक अत्यंत साधा, घरगुती उपाय आहे.
एक क्वार्ट ब्रँडी नरड्यात ओतावी. (त्याने रोगावर ढिम्म परिणाम होणार नाही. मात्र, जंतूंचा वेळ चांगला जाईल. तेवढीच समाजसेवा! शिवाय, जंतूंबरोबर तुमचाही वेळ छान जाईल, हाही वाढीव फायदा आहेच!)
(शिवाय, आमच्या ट्रम्पकाकाने सुचविलेले गावठी उपाय आहेतच. ब्लीच नाहीतर लायसॉलची इंजेक्शने घ्यावीत, वगैरे. जगलात, तर तुमचा फायदा; मेलात, तर आमचे काही नुकसान नाही. एकंदरीत विन-विन सिच्युएशन!)
?
पुन्हा विषाणू?/जिवाणू? गोंधळ आहेच.
मला काही या विषयातले कळत नाही. (किंबहुना, तुमच्यापेक्षाही कमी कळत असल्याचे आढळल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही.) परंतु तरीही, एक अंदाज.
प्रस्तुत जंतूला कोरोनाव्हायरस म्हणतात. (कोरोनाबॅक्टीरियम नव्हे.) यावरून, तो विषाणू असावा (जीवाणू नव्हे), अशी एक शंका निदान माझ्या तरी मनास चाटून जाते ब्वॉ.
असो चालायचेच.
(अतिअवांतर: 'पेशींच्या पातळीवर जनुकीय' म्हणजे नक्की काय?)
कोव्हिड
मला ह्या शास्त्रातलं अजिबात काही समजत नाही. समजलं ते असं की कोव्हिड आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची 'वाट लावतो'; त्यातही चिकार गुंतागुंत असते, ती मांडण्याची माझी क्षमता नाही. मात्र कोव्हिड आणि अलर्जी ह्यांतही बराच फरक असावा, दोन्ही जरी रोगप्रतिकाराशी संबंधित असले तरीही, एवढंच मला समजलं आहे.
व्हायरस - विषाणू
बॅक्टेरियम (अनेकवचन - बॅक्टेरिया) - जीवाणू
सार्स-कोव्ह-२ हे ह्या, सध्याच्या करोनाविषाणूचं नाव. त्याच्या संसर्गामुळे रोग होतो, तो कोव्हिड-१९. (जसा HIVमुळे एड्स होतो.)
विचारप्रवाह - सहमत.
जबरी लेख आणि तोही सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या लेखिकेकडून हे पटले.
मेडिकल क्षेत्राबाहेरील सामान्य लोक केवळ निरीक्षण करून मतं देतात आणि त्यांंचे संकलन लेखिका योगिनी लेले यांनी विचारात घेतले हे आवडले.
(( या संसर्गजन्य जनुकीय रोगावर जनुकीय लसच हवी हा आग्रह कशाला? इतर काही सामान्य औषध का नसावे? -- हा माझा विचार))
लेखिकेकडून हा लेख मिळवला याबद्दल ऐसीअक्षरे (ऐसी अक्षरे) मंडळाचे आभार.