भावना
छाती भरून आल्यासारखी आणि हातातून वारे गेल्यासारखी विचित्र संवेदना हे लिहिताना होत आहे.
http://www.asianage.com/hyderabad/truck-mows-down-two-448.
दररोज वाचतो त्या बातम्या प्रत्यक्षात किती धक्कादायक असतात!
काल माझ्या मुलाची 'किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना' (केव्हीपीवाय) ही परीक्षा होती. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी हे परीक्षेचे सेंटर होते.
त्याला परीक्षेसाठी घेऊन गेलो होतो. परीक्षेहून परतत असताना दुपारी एकच्या सुमारास एका आठपदरी महामार्गावर (किमान १०० मिटर रुंद)मोठा ट्रॅफिक जॅम होता.
रविवार दुपार - आठपदरी महामार्ग - फ्लायओव्हरची सुरुवात. वेळ आणि ठिकाण बघता सहसा अशक्य.
म्हणजेच काही अपघात झाला असावा. डिव्हायडरच्या पलिकडून उलट दिशेने एक अँब्युलन्स गेली म्हणजे तर नक्कीच!
हळूहळू पुढे सरकत जिथे अपघात झाला होता तिथे पोचलो. तिथले दृष्य... असे दृष्य कोणीही पाहू नये.
(माझ्या मुलाने तर मुळीच पाहू नये असे वाटले.)
रस्त्यावर टायरच्या खुणा होत्या आणि पुढे नुकतीच माती पसरवलेली होती. मातीतूनही चिकट लालसरपणा जाणवत होता. त्याच्या फूटभर पुढे एक पांढरट गुंडाळी.
.....अभद्र.
आज सकाळी पेपरमधली बातमी वाचून तर गोठूनच गेलो. माझा मुलगा ज्या परीक्षेला बसला होता त्याच परीक्षेला बसलेली मुलगी आणि तिचे वडील मोटरसायकलवरून परतत होते.
किती भयानक आहे हे.. एका अवघड परीक्षेला बसलेल्या मुलीने किती परिश्रम केले असतील? तीन तास सतत विचार करून प्रश्नांची उत्तरे लिहिली असतील. तिच्या वडिलांनी तिच्या भावी जीवनाबद्दल किती विचार केला असेल? किती खस्ता खाल्ल्या असतील?
'मेंदूला ताण देणे' हा वाक्प्रचार वापरताना यापुढे माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच ते दृष्य उभे राहील. 'माती असशी..' वगैरे वचने आपण किती सहजतेने वापरतो. माती?
***
मागे एका कवितेत या ओळी लिहिल्या होत्या :
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ
पण तसे होत नाही. फार त्रास होत राहतो. आयुष्यभर.
असा अपघात मी यापूर्वीही पाहिला आहे. कॉलेजात असताना - वीसेक वर्षांपूर्वी. तो प्रसंगही असाच! (लिहावे की लिहू नये?)
माणसाचा जीव म्हणजे असतो तरी काय? आता समोर जिवंत दिसणारा, हात हालवणारा माणूस खरेतर जिवंत नाहीच! त्याचे डोळे उघडे आहेत, हालत आहेत पण काहीही बघत नाहीत, त्याला कमरेखाली... शरीरच नाही - तशाही अवस्थेत त्याचे हात मात्र मदतीची याचना करत आहेत.
माणसाचा जीव म्हणजे असतो तरी काय?
***
कशाला पाहिजेत भावना? त्रास होतो फार.. फार..
प्रतिक्रिया
असहायता
मृत्यू बघणे म्हणजे माणसाला असहाय करणारी - वाटायला लावणारी स्थिती!
बाकी, या प्रसंगांवर काय लिहिणार.. होते असे.. "माझ्या मना बन दगड" हेच योग्य वाटायला लावणारे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुमच्या भावना समजू
तुमच्या भावना समजू शकते.
रस्त्यांवरचे अपघात हे, अपापली जबाबदारी सगळ्यांनीच ओळखली तर झाले नसते, असे वाटून मनाला चुटपुट लागून राहाते.
ऋता +१
इतकेच म्हणतो..
केस इन पॉइन्ट : स्व. जसपाल भट्टी...
...
मरणकल्पनेशी थांबे तर्क...
मृत्यु हे अटळ सत्य वगैरे
मृत्यु हे अटळ सत्य वगैरे सगळ्या गप्पा पुस्तकी वाटतात हे असं काही ऐकलं, वाचलं की!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हतबल
सुन्न करुन टाकणारा अनुभव. माझ्या आणि माझ्या मुलाच्या मित्रांबाबत अशाच अनुभवातून गेलो आहे. माझ्याबाबतीत तर...
नका लिहू, विसुनाना. फार त्रास होतो.
'समजत नाही, समजत नाही' हेच खरे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
भयानक
सुन्न व्हायला होत. त्याजागी आपण आहोत अशी कल्पना केली तर फारच सुन्न होत. गेला तो दिवस आपला. विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन यावर अनिश्चितता पचवण किती कठीण आहे नाही?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
...
...
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
भावना पोचल्या
आजच्या मटातील लेख - बेफिकिरीचे बळी.
वाहतुकीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करणार्या पाश्चिमात्य देशांतही अपघात होतात, नाही असे नाही. पण त्यांचे प्रमाण कमी आणि शिवाय अपघात झाल्यानंतर त्वरीत मिळणारी मदत, हीदेखिल अत्यंत महत्त्वाची बाब.
परवाने देताना होणारी अक्षम्य बेपर्वाई, "राईट ऑफ वे"ची संकल्पना सुस्पष्ट नसल्यामुळे कुणालाही दोषी ठरविण्यात घडणारी चूक, अपघातस्थळी जमलेल्या बघ्यांची कायदा हातात घेण्याची वृत्ती आणि म्हणून जखमींना इस्पितळात वगैरे नेण्याऐवजी तेथून जीव वाचवून पळून जाण्याची संबंधीत चालकांची कृती, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी संभाव्य "बकरे" शोधणारे वाहतूक पोलीस, रस्त्यांची दयनीय अवस्था, नीटश्या देखभाल न केलेल्या बस आणि ट्रक्स! एक ना दोन, अनेक कारणे आहेत.
काही वर्षांपूर्वी एक परिचित असेच गेले! काही काळ सुन्न व्हायचं आणि मग आपल्या मार्गाला लागायचं!