ढासळती कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था
अमेरिकेत शाळेत गोळीबार, दिल्लीत अधम बलात्कार कृत्य, दोन्ही देशाची संस्कृती जरी वेगळी असली तरी कुठेतरी कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था अयशस्वी झाल्याचे लक्षण मानावे का? दिल्लीतल्या कृत्याने तर झोप उडविली. अशा घटना अचानक घडतात असे वाटत नाही, एकूणच मानसिक जडणघडण होत असताना आणि कौटुंबिक दुर्लक्ष (दुर्लक्ष म्हणावे का? का अति काळजी, जपणूक अशा मानसिकतेला काही प्रमाणात कारणीभूत ठरते?) अशा घटनांचे प्रमाण वाढवतात का?
माझ्य ऑफिस जवळ आज एक अशा प्रकारची प्रातिनिधिक आणि प्राथमिक घसरणीची वाटावी अशी घटना घडली. कोल्हापुरात विवेकानंदांचे नाव लावून बहुतांश महाविद्यालयीन अविवेकी घटना घडणारे कॉलेज ताराबाई पार्क नामक प्रतिष्ठित भागात आहे. माझ्याकडे रागाने का बघतोस या भांडणाचे पर्यावसान सार्वजनिक ठिकाणी गोळीबारात झाले. दोन्ही मुले अत्यंत ‘तथाकथित’ प्रतिष्ठित घरातील, वयाने १८ आणि १९ वर्षाची, सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून १२ वी कॉमर्स मध्ये शिकणारा मुलगा गायब झाला, त्याने दुसऱ्या मुलाच्या चार चाकी गाडीवर दोन फैऱ्या झाडल्या होत्या. जीवितहानी नाही.
पोलीस आले त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गोळीबारासाठी आर्मरी अॅक्टन्वये गुन्हा नोंद केला, प्रतिष्ठित घरातील मुले असल्याने स्थानिक केबल बातम्यांचे कॅमेरे पोहोचले. पोलीस स्टेशनच्या बाहेर दोघा पोरांच्या बापानी अत्यंत निलाजरेपणे आमची कौटुंबिक बाब आहे असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कृत्याबद्दल कसलाही खेद ही व्यक्त न करता आपापल्या पोरांची पाठराखण केली.
तरुणाई च्या उंबरठ्या वरच्या या मुलांची नको इतकी पाठराखणीचे प्रातिनिधिक हे उदाहरण सामाजिक व्यवस्थेचे कसलेही भान नाही असेच दर्शविते.
शिक्षण खरेच सुसंस्कृत बनवत आहे का? प्रतिष्ठित लोकांनी असे पायंडे पाडून समाज व्यवस्था कमकुवत केल्याचेच हे उदाहरण नाही का?
प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत तरीही वरील केसचे काय होणार आहे ते उघड आहे. देशातल्या कायदा व्यवस्थेला बटिक बनवून असे वर्तन करणारे ह्या मुलांचे राजकारणी पालकही तेवढेच गुन्हेगार नाहीत का?
ह्या व्यवस्था सुधारायच्या कशा?
थोडेसे स्पर्शून अवांतर
थोडेसे स्पर्शून अवांतर :
(वरील लेखात "दारू" हा उल्लेख नाही. तरी.)
दारूच्या नशेत "कोणीतरी माझ्याकडे रागावून बघतो" हा भ्रम झाल्याबाबत भारतात खूपदा ऐकले आहे. अशा भ्रमातून झालेले भांडणही एकदा बघितलेले आहे.
मात्र अन्य देशांत (यू.एस. बाबत प्रत्यक्ष अनुभव, आणि अन्य देशांतील वाङ्मयातला अनुभव) या भ्रमाचा उल्लेखही ऐकलेला नाही. भ्रमसुद्धा समाजातून शिकलेल्या अस्फुट अपेक्षांप्रमाणे होतात काय? दारू पिणे अजूनही भारतातल्या समाजाच्या दृष्टीने थोडेसे "बिघडलेले" आहे. त्यामुळे दारू पिताना आपण दुष्कृत्य करत आहोत, किंवा कोणी आपल्याकडे दुष्कृत्य केल्यासारखे बघत आहे, असा भास होत असेल काय?
- - -
"अशा घटनांचे प्रमाण वाढलेले आहे" याबाबत साशंक आहे. त्यामुळे शीर्षकातील चर्चेपासून सूट घेतो.
दारू चा उल्लेख नसला तरी
दारू चा उल्लेख नसला तरी कोल्हापुराचा आहे. 'तथाकथित' प्रतिष्ठेच्या कल्पना वेगळ्या आहेत तिथे. दोन्ही बाजूंनी.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
दारू अाणि अपेक्षा
भ्रम (निदान काही प्रमाणात) समाजातल्या अस्फुट अपेक्षांप्रमाणे होतात याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अमेरिकेत मी अनेक वर्षं राहिलेलो अाहे, अाणि माझाही तसा प्रत्यक्ष अनुभव नाही. पण तिथेही 'सिंगल्स बार' मध्ये 'अ' ने 'ब' ला खुन्नस दिल्यामुळे किंवा 'ब'च्या (तात्कालिक) गर्लफ्रेंडकडे जरा जास्त लघळपणे पाहिल्यामुळे मारामाऱ्या होणं असले प्रकार शेकड्यांनी घडतात.
दारू अनेक प्रकारे पिता येते. तुम्ही स्टॅनफर्ड कँपसवर व्हाईट वाईनचा ग्लास घेऊन मिशेल फूकोच्या पुस्तकात डोकं खुपसू शकता, किंवा स्पोर्टस् बारमध्ये केंटकी बर्बनमधली प्लास्टिकची काडी चावत अाजूबाजूच्या बायका न्याहाळू शकता. दोन्ही ठिकाणचे समाज वेगळे अाणि त्यामुळे वातावरणातल्या अस्फुट अपेक्षा वेगळ्या. अर्थात मारामारी होण्याची शक्यताही दोन्ही ठिकाणी वेगवेगळी असते.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
ढासळती?
'ढळती' हा शब्द बोचतो. 'ढासळती' अधिक समर्पक वाटतो.
कनेक्टिकट, दिल्ली आणि कोल्हापूर या तीन (संपूर्ण वेगळी सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या) ठिकाणांच्या घटनांवरुन एकदम व्यवस्था ढासळते आहे असे म्हणणे धाडसाचे वाटते. प्रत्येक पिढीला पुढची पिढी अधिक बिघडलेली वाटते. 'आमच्या वेळी हे असं नव्हतं..' हे म्हातारपणाचे लक्षण असणारे वाक्य सदाहरित आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
मान्य. नावात बदल केला आहे.
मान्य. नावात बदल केला आहे.
चुकीचा प्रश्न
अशी एकही घटना घडू नये ही इच्छा 'सर्वेत्र सुखिनः सन्तु' प्रमाणे केव्हाही सर्वमान्य व्हावी अशी आदर्श आहे. पण वरील लेखनात समाज बिघडत चालला आहे असा सूर दिसतो. म्हणजे कोणे एके काळी बलात्कार, खून या गोष्टी कमी होत्या आणि आता काहीतरी बिनसल्यामुळे त्या वाढलेल्या आहेत. हे साफ चूक आहे. कुठचीही आकडेवारी तपासून बघितली तरी समाजातली हिंसा कमी कमी होत चालली आहे असंच चित्र दिसतं. असं असताना 'समाज का बिघडतोय?' असा प्रश्न विचारणं न्याय्य नाही. उलट समाज नक्की कुठच्या कारणांमुळे सुधारतो आहे व त्या कारणांचा पाठपुरावा करून अधिक वेगाने आपण 'सर्वेत्र सुखिनः सन्तु' च्या जवळ कसे पोचू असा प्रश्न विचारायला हवा.
लेखात उल्लेख केलेल्या घटना
लेखात उल्लेख केलेल्या घटना खरोखरच खेदजनक आहेत.
सामाजिक वातावरणात अनैतिकता अन दहशत यांचे प्रमाण वाढले आहे, हे मान्य करावेच लागेल.
हिंसा कमी होत आहे असे मत असणार्यांचे आश्चर्य वाटते.
सुदैवाने हिंसा कमी होते आहे
हो, अनेकांना वाटतं खरं. पण सुदैवाने ते खरं आहे. http://ncrb.nic.in/CII%202009/cii-2009/1953-2009.pdf इथे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने केलेलं वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचं संकलन आहे. १९९१ पासूनची आकडेवारी विशेष लक्षणीय आहे. खून, खुनाचे प्रयत्न, डाकुगिरी, चोऱ्या, घरफोडी, फुटकळ चोऱ्या, आणि दंगली या सगळ्यांचे आकडे कमी होताना दिसत आहेत. ९१ सालापासून लोकसंख्या सुमारे ३५% नी वाढली आहे हे लक्षात घेतलं तर गुन्ह्यांचं/हिंसेचं प्रमाण गेल्या वीस वर्षांत प्रचंड कमी झालेलं आहे.
हे प्रमाण वाढलेलं नसून, ते वाढल्याचं परसेप्शन अधिक पक्कं होत आहे.
परसेप्शनचे कारण
>>हे प्रमाण वाढलेलं नसून, ते वाढल्याचं परसेप्शन अधिक पक्कं होत आहे.
जुन्या काळात (बाहेरच्या जगात शक्यतोवर पाऊलच न टाकल्यामुळे) सुरक्षित भासणार्या समाजघटकांना (आज तिथे पाऊल टाकल्याने) या असुरक्षिततेला सामोरे जावे लागत असल्यामुळे हे परसेप्शन होत असेल का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रख्यात इतिहासकार
प्रख्यात इतिहासकार शेजवलकरांच्या एका लेखात वाक्य आहे-
"नीतिमत्ता ही बरोबरच्या (आपल्या वैग्रे वैग्रे) लोकांतच पाळावयाची असते असा समज जुन्या काळी सर्व जगात रूढ होता."
त्यामुळे जुन्या काळी हे पर्सेप्शन बर्यापैकी बोथटच होते असे म्हणायला हरकत नसावी. सध्याच्या काळात "आपल्यां" ची व्याख्या कमीतकमी "डी ज्यूर" तरी का होईना, उत्तरोत्तर व्यापक होत चालली आहे. त्यामुळे पर्सेप्शन तीव्र होतेय असे मला वाटते. शिवाय यात तुम्ही म्हणता तसे नॉस्टॅल्जियाचा भागदेखील असावा-आमच्या वेळी असं नव्हतं, वगैरे. म्हणजे एकटी बाई कदाचित बलात्कारित होत नसेल फारशी, पण घराघरांतले डोमेस्टिक अत्याचार सोयीस्करपणे डोळेआड करून केलेले प्राचीन काळाचे सरसकट उदात्तीकरणदेखील याला आपापल्या परीने हातभार लावत असावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपण दिलेल्या दुव्याचा तपशील
आपण दिलेल्या दुव्याचा तपशील पाहिला असता दिसुन आले की एकूण गुन्हयांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी ती खोटे बोलणे, विश्वासघात, फसवणूक अशा गुन्ह्यांची आहे. खून, हिंसा, मुली पळवणे, sexual harrasment , पतीकडून छळ अशा गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढच झाल्याचे दिसते.
९१ सालापासून
९१ सालापासूनची म्हणजे सुमारे गेल्या २० वर्षांची आकडेवारी बघा. खुनांची संख्या कमी झालेली आहे. आणि हे इतर देशांतही झालेलं आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे. तेव्हा दर लाखांमागे होणारी खुनांची संख्या आणखीनच कमी झालेली आहे.
स्त्रियांसंबंधीचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणावर ट्रॅक करायला गेल्या काही वर्षांत सुरूवात झालेली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. माझा विश्वास असा आहे की बलात्कार मोठ्या प्रमाणात वाढलेले नसून त्यांचं रिपोर्टिंग वाढलेलं आहे.
हे प्रमाण वाढलेलं नसून, ते
या आणि आधीच्या प्रतिसादाशी सहमत आहे. घटना कमी होत असाव्यात. (सर्व प्रकारचे गुन्हे कमी असं नसेल, पण पूर्वीच्या कमी संघटित, कमी कंट्रोल्ड काळातले गुन्हे कमी आले असावेत. काही गुन्हे सिव्हिलायझेशनमधून / तंत्रज्ञानामधून नव्याने उगम पावले असतील ते वाढलेही असतील) पण खून, युद्ध, हत्या हे एकुणात कमी झालं असू शकेल असंच वाटतं. फक्त माध्यमांच्या प्रचंड वाढलेल्या रीचमुळे ते जास्त लोकांसमोर जास्त वेळा येतं आहे म्हणून पर्सिव्ड गुन्हे जास्त प्रमाणात वाढले अशा रितीने दिसत असावेत.
शिवाय गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढणं हाही अधिकचा फॅक्टर असू शकेल..
बलात्काराच्या सध्याच्या घटनेनंतर जणू बलात्काराच्या घटनांचं पेव फुटलं आहे असं वाटतंय, पण मला अशी दाट शंका आहे की आता मीडिया अगदी गल्लीगल्लीतल्या पोलीस स्टेशनांतून आवर्जून विनयभंग, बलात्कार अशा केसेस शोधून शोधून पुढे आणताहेत..(हे म्हटलं तर चांगलंच आहे..) तीच गोष्ट पिस्तुल हल्ला किंवा अन्य तात्कालिक गुन्ह्यांची.
नीतीमत्ता
नीतीमत्तेच्या संदर्भातले 'संधी व धाडस यांच्या अभावामुळे महाराष्ट्रात चारित्र्यवान (पक्षी नीतीमान) पुरुषांचे प्रमाण खूप आहे' हे (ग.वा.बेहर्यांचे?) वाक्य आठवते.
बाकी जगभरात नास्तिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे असेही वाचले. नास्तिकांचे वाढते प्रमाण आणि कमी होणारी गुन्हेगारी याचा काही (बादरायण) संबंध लावता येईल काय?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
छुपे रुस्तुम
जुन्या, तथाकथित अधिक नीतिमान काळातहि, छुपे रुस्तुम बरेच असावेत असे वाटते, जरी त्याचा गवगवा होत नसावा.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील कृष्णशास्त्री हे वेश्यागमन करत असत आणि त्याबद्दल त्यांना चौकशीअंती नोकरीतून सहा महिन्यांसाठी निलंबित केले गेले होते असा लेखी पुरावा मला नुकताच एका ठिकाणी,मी अन्य काही माहिती गोळा करीत असतांना मिळाला. माझ्या एका आगामी लेखनात हे सविस्तर येईलच.
जर कृष्णशास्त्री हे करत होते तर अन्य किती जणांनी अशी अंगवस्त्रे ठेवली असावीत?
तपशील तपासा आणि मग निष्कर्ष काढा
हया बातमीचं तुम्ही केलेलं वर्णन आणि वृत्तपत्रात आलेले तपशील यांत काही कळीचे फरक आहेत. तुम्ही म्हणता -
तर 'लोकसत्ता'त आलेली बातमी काय सांगते?
हा तपशील पाहता हे लक्षात यावं की ढासळती कुटुंबव्यवस्था किंवा शिक्षणामुळे सुसंस्कृत होणं न होणं अशा गोष्टींशी ह्या घटनेचा संबंध लावण्यात हशील नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा तपशील पाहता हे लक्षात यावं
हा तपशील पाहता हे लक्षात यावं की ढासळती कुटुंबव्यवस्था किंवा शिक्षणामुळे सुसंस्कृत होणं न होणं अशा गोष्टींशी ह्या घटनेचा संबंध लावण्यात हशील नाही.
तपशीलात काय फरक आहे? लेखाच्या शेवटी “देशातल्या कायदा व्यवस्थेला बटिक बनवून असे वर्तन करणारे ह्या मुलांचे राजकारणी पालकही तेवढेच गुन्हेगार नाहीत का?” असेही मी लिहिले आहे.
अधिक चांगल्या तपशीलासाठी ही लिंक पहा
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=328769&boxid=11326546&pgno=1&u...
कोल्हापूरात अशा प्रकारची सर्व्र्जानिक ठिकाणच्या गोळीबाराची घटना पहिलीच असली तरी शेवटची तर नाहीये ना?
आणि काहीही करा राजकारणी लोकांचे पाठबळ असले की आपण सुटतो असं संदेश गेला तर अशा घटना वारंवार नाही का घडणार?
तपशीलात मी काय वेगळे लिहिले आहे ते काही कळले नाही.
घटना राजकीय की कौटुंबिक?
राजकीय वर्चस्वासाठीचे झगडे, त्यातून आलेली वैरभावना आणि त्यातून घडलेल्या गुन्हेगारी कृत्याविषयीच्या बातमीचं शीर्षक मात्र ढासळत्या कुटुंबव्यवस्थेविषयी असल्यामुळे वाचकाचा गोंधळ किंवा बुद्धिभेद होतो असं वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पहिल्या घटनेवरच कायद्याने
पहिल्या घटनेवरच कायद्याने योग्य ती कारवाई नाही झाली, प्रकरण दाबून टाकले (आणि ते होण्याचीच शक्यता जास्त आहे) ह्यामुळे समाजात चुकीचा संदेश नाही का जाणार? आणि हा प्रकार एक कौटुंबिक गैरसमज आहे असाच दाखवण्याकडे दोन्ही मुलांच्या पालकांचा कल होता. व्हिडीओ बातमी/प्रतिक्रिया स्थानिक केबल न्यूज चॅनेलवर होती म्हणून लिंक देता येत नाही. जर कौटुंबिक गैरसमज असे चित्र दाखवले असेल तर ढासळती कुटुंबव्यवस्था असे म्हटले त्यात चूक काय?
तसेच निरपेक्ष निष्कर्ष काढणारे वृत्तपत्र सापडणे कठीण काम असल्याने फक्त मी लेखात सांगितलेल्या तपशीलासाठी पुढारीची लिंक दिली होती त्यांचा निष्कर्ष आणि इतर वृत्तपत्रातल्या बातमीचे मथळे वेगळे जर पाहिले तर प्रत्येकाचे निष्कर्ष वेगळे होते. पण पुढे या केसचे काय होणार याचा अंदाज मात्र सर्व वृत्तपत्रात समान वाटत होता.
पाठीशी घालणारी व्यवस्था
कुटुंबव्यवस्थेचे अनेक फायदे आहेत हे मला मान्य आहे हे आधी नमूद करते.
आपल्या कुटुंबव्यवस्थेत (भारतातल्या सर्वसाधारण कुटुंबव्यवस्थेत) व्यक्तीला परावलंबी आणि बेजबाबदार केलं जातं किंवा नकळत ते तसं होत जातं असं मला वाटतं. आपल्याकडे सज्ञान तरूणांमध्ये आपल्या कृतीची जबाबदारी ही आपली (वैयक्तिक पातळीवर) आहे ही जाणीव नसते. आपले आईवडील, हितचिंतक आपण काहीही केलं तरी पाठीशी घालतील ही एक भावना असते. एक सोपं उदाहरण म्हणजे खुद्द आपल्या लग्नाचीही जबाबदारी नाकारताना पुरुष पहाण्यात आहेत (तशा स्त्रियाही आहेत यात शंका नाही).
नवरा-बायकोत पटत नसेल आणि पुढे जाऊन जर ते घरात्/जवळच्या मित्रांमध्ये डिस्कस झालं तर, सरळ माझ्या आईवडिलांमुळे हे लग्न केलं, आता जे होतय त्याला मी जबाबदार नाही असा पवित्रा घेतात. अशा परिस्थिती उद्द्भवणं म्हणजे आईवडील्/कुटुंब हे त्या मुलाला/मुलीला मोठं करण्यात चुकले आहेत आणि मुले/मुली देखील आपापली जबबदारी समजून घेण्यात कमी पडले आहेत.
हे एक उदाहरण मी माझा मुद्दा मांडण्यासाठी दिलं. पण अशी अनेक उदाहरणं मिळतील ज्यात व्य्क्ती आपली जबाबदारी कुटुंबाकडे बोट दाखवून झटकून टाकतात.
त्यामुळे मला कुटुंबव्यवस्था म्हणजे काहीही केलं तरी पाठीशी घालणारी व्यवस्था आहे असं वाटायला लागलं आहे...त्यापेक्षा ती आहे त्यापेक्षा कमी सक्षम झाली तर बरं होईल कदाचित.
आत्महत्या आणि अपघाती
आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढत असलं तरी खूनवगैरेंचं प्रमाण कमी होतंय असं दिसतंय खरं.
खूनांमध्ये मात्र घरातल्याच व्यक्तीने पैशांसाठी वगैरे खून करणे इत्यादींचे प्रमाण वाढतेय की कमी होतेय याबद्दल कल्पना नाही.
माझ्या लहानपणी इतकी संपर्क माध्यमे नव्हती आणि पेपरमध्येही खून-बलात्काराच्या बातम्या रंगवून सांगितल्या जात नव्हत्या असे वाटते.
निठारी, तंदूरकांड सारख्या घटना त्या काळी घडल्या असल्या तरी कळाल्या नसतील बहुतेक.
रिपोर्टिंग फार वाढलंय हे खरं. काही रिपोर्टर तर रिपोर्ट करण्यासाठी बळंच छोटेमोठे गुन्हे घडवून आणतात असंही दिसतंय.
+१
>>खूनांमध्ये मात्र घरातल्याच व्यक्तीने पैशांसाठी वगैरे खून करणे इत्यादींचे प्रमाण वाढतेय की कमी होतेय याबद्दल कल्पना नाही.
याविषयी निश्चित काही म्हणता येणे कठीणच आहे. राजाला राजपुत्रांपासून धोका असतो असं चाणक्य सांगून गेला आहे आणि सम्राट अशोक आणि औरंगजेब यांनी त्यावर अंमल केल्याचे ऐकले आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अवांतर....
काही गुन्हे अधिक सफाइदारपणे करणेही भलतेच सुलभ झाले आहे. उदा:- ......
नको.
"क्रिमिनल माइंड" म्हणून आमच्यावरच शिक्का बसायचा.
इतकच सांगू शकतो की खून करण्यासाठी दरवेळी पिस्तूल्/चाकू असं काही लागतच असं नाही. प्रत्यक्ष हल्ला न करता, अत्यंत साळसूदपणे राहूनही इतरांचा "गेम" केलेली माणसं पब्लिकला माहित असतीलच.
असो.
बादवे, असे लेख वाचयचा कंटाळा आलाय.
विषयांतर म्हणून वाय एस राजशेखर रेड्डी, राजेश पायलट ,माधवराव शिंदे आणि अरुणाचलाचे माजी सी एम दोरजी खंडू, आनंद दिघे ह्या दिग्गज विभूतींच्या जीवनचरित्राबद्दल वाचायला आवडेल. ऐसीवर कुणी ती मालिका लिहायला घेइल का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars