सरंजामशाही संपली आहे का?
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं.
शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो. व्यवहारासाठी उदयन राजेंचे NOC लागते. राजेंचे कार्यकर्ते ते मिळवुन देण्यासाठी कमिशन घेतात. ह्याविरुद्ध श्रमजीवी रयत संघटना अनेक वर्षांपासुन लढा देतेय, पण सरकार मौन बाळगुन आहे. मुळात ह्या गोष्टींसाठी जनतेला आंदोलन करावं लागणं हेच शिवरांयाच्या घराण्याला शोभनीय नाही. शिवाजी महाराज खुद्द असते, तर त्यांनी काय केले असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. पण आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते.
एकीकडे समाजवादाला नावं ठेऊन भांडवलशाहीकडे वाट करत असलेल्या आपल्या देशात नोकरशहा, भांडवलदार, राज्यकर्ते, माफ़िया ही चांडाळ-चौकडी मोकाट सुटलेली दिसते. हा नवसरंजामवर्ग उदयास आलेलाच आहे, पण जुना सरंजाम वर्ग तरी कुठे संपलाय? जुने सरंजाम राजकारणातुन कधीही ह्द्दपार झाले नाहीत, पण त्याचे कारण म्हणजे आपण समाजवादी धोरणं नीटशी राबवलीच नाही हेच आहे. समाजवादाच्या नावाखाली कायदे तर अनेक केले, पण त्यांचा उपयोग लोकांना त्रास द्यायला आणि संरजामी वर्गाचं उपद्रवमुल्य कायम ठेवण्यासाठीच झाला.
आपण जाती-धर्म-भाषा-प्रांत ह्या सगळ्या विषयांवरुन तावातावाने वाद घालतो, चर्चा करतो. त्यावरुनच आपले राजकिय मत बनते. पण आपण मनातुन सरंजामशाही स्विकारलेलीच आहे. आपण त्याबद्दल अजिबात बोलत नाही. अब्दुल कलाम रांगेत उभे राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटते. पण ते असंच असायला नको का? मनमोहन सिंगांच्या सेक्युरिटीमुळे ट्रॅफ़िक अडवुन ठेवली जाते, त्यामुळे दवाखान्याला जात असणारे रुग्ण दगावतात तरी आपल्याला फ़ारसे काही वाटत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते. संधी मिळत नाही एव्हढेच.
आपल्या प्रत्येकाच्या मनात
यावरून प्रेमचंद यांची "नशा" नावाची कथा आठवली. वर उल्लेख केलेल्या सिंड्रोमचा चांगला अविष्कार आहे त्या कथेत.
बाकी या पार्श्वभूमीवर "I dont support slavary, so I refuse to be Master" असे विचार नक्कीच उठून दिसतात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मध्यंतरी श्री. तरूण तेजपाल
मध्यंतरी श्री. तरूण तेजपाल यांची त्यांच्याच सहकारी महिलेने घेतलेली मुलाखत पाहण्या/ऐकण्याचा योग आला होता. त्यांच्या "The Story of My Assassins" या पुस्तकाबद्दल बोलताना भारतातल्या सामाजिक परिस्थितीचा विषय निघाला. तेव्हा नेहरूंच्या काळातले (नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर) निस्पृहपणे काम करणारे उच्चपदस्थ, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय लोक व त्यांची मूल्ये आता उरली नाहीत आणि आजची भारतातली परिस्थिती ही उच्चभ्रूंचे अपयश (Failure of Elites) आहे असे ते म्हणाले.
ते ऐकून उपस्थित (NRI) प्रेक्षकांमध्ये चुळबूळ झाली. मुलाखतीच्या शेवटी खुल्या प्रश्नोत्तरांच्या वेळी एका महिलेने त्यांच्या त्या मुद्द्याला आक्षेप घेतला आणि आम्ही (म्हणजे उच्चभ्रू लोक) पुष्कळ दानधर्म करतो असा मुद्दा मांडला व सभात्याग केला.
एकही छदाम न देता पिढ्या न पिढ्या संपत्तीचे हस्तांतरण व संचय करणे, वडिलोपार्जित संपत्तीतून मिळणार्या विशेष सोयी हा आपला नैसर्गिक हक्क समजणे, त्या विशेष सोयींचा वापर करून स्वतःसाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आणखी संपत्ती भल्या-बुर्या मार्गाने कमावणे आणि त्यातला अगदी क्षुल्लक भाग दानधर्म म्हणून गरीबांमध्ये वाटण्यातच इतिकर्तव्यता मानणे या गोष्टी ज्या समाजात सर्वमान्य आहेत त्या समाजातली सरंजामशाही संपण्याची काही शक्यता तरी आहे काय?
समाजवादी लोकशाही ?
"आजच्या घडीला आपण समाजवादी लोकशाही पद्धती स्विकारलेली असल्याने एखाद्या व्यक्तीकडे इतक्या लोकांना वेठीला धरायची शक्ती कशी काय असु शकते ह्याचं आश्चर्य वाटते."
समाजवादी लोकशाही ? कधीपासुन ???? लोकशाहीमध्ये समाजवादी लोकशाही, डावी लोकशाही, उजवी लोकशाही, भांडवलदार लोकशाही असे प्रकारही आहेत ? आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे असे शिकल्याचे स्मरते पण समाजवादी लोकशाही असा उल्लेख आठवत नाही ..
बाकी एका व्यक्तीकडे अनेक लोकांना वेठीला धरायची शक्ती असणे हे सक्षम लोकशाहीचे लक्षण नाही का (पहा : समाजवादी नेते, ममता, जयललिता, करुणानिधी,)
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
सरंजामशाही संपण्याची कुठलीच
सरंजामशाही संपण्याची कुठलीच चिह्ने नजीकच्या भविष्यकालात तरी दिसत नाहीत. खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले तर कदाचित काही घडू शकेल. शहरी धनदांडगे आणि ग्रामीण वतनदार यात एक फरक आहे .शहरी धनदांडगे व्यवस्थेला आपल्याकडे वळवून जनतेला लुटतात तर ग्रामीण वतनदार हे स्वतःच व्यवस्था असतात. कज्जेखटले,धरणे,कालवे,वीज,हे सर्व फॉर,ऑफ आणि बाय हे वतनदारच असतात. जातिव्यवस्थेचे नियम, धर्मनियम( गावकी,भावकी) हेही हेच लोक आखून देतात. शहरांमध्ये पैशाचा माज असतो. या वतनदारांमध्ये पैशाबरोबर वर्णश्रेष्ठत्वाचाही माज असतो. समाजकार्याशी संबंध असलेल्या एका तरुण,उमद्या मुलाने मला एकदा सहजपणे सांगितले होते की राज्य करणे हे केवळ क्षत्रियांनाच जमते. त्यांच्यात ते जीन्स आहेत. म्हणून नेहरू आणि त्यांच्या वंशजांकडून देशाची वाट लागली. त्याने अर्थात पेशव्यांचेही नाव घेतले होते. तो अगदी मॅटर ऑव्ह फॅक्ट बोलत होता अहंकार किंवा कुजकट आगखाऊपणाने नव्हे. आपण राज्यकर्ते हे या सरंजामदारांच्या मनात खोलवर भिनले आहे. ग्रामीण भागात जनता हा प्रकार नसतो, तिथे रयत किंवा प्रजा असते आणि तिने राजाच्या मर्जीवर जगायचे असते.
समाजकार्याशी संबंध असलेल्या
+१०१००.
तथाकथित क्षत्रिय वर्णात मोडणार्या जमातींना स्वतःबद्दल अहंगंड आहे असे मानले तरी अन्य जातीतल्यांनाही तसलाच न्यूनगंड आहे. याची उदाहरणे मीही अशीच ऐकली आहेत- तीही क्षत्रियेतर जातींच्या लोकांकडून. उदा. पेशवे ब्राह्मण, सबब राज्य करणे त्यांना नीट जमले नाही, ब्राह्मण हे ब्यूरोक्रसीत शोभून दिसतात पण राज्य चालवायला जमत नै, इ.इ.इ. ब्राह्मणांबद्दलच असे मत तर अन्य जातींबद्दल कल्पनाच करा काय मत असेल ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>> ब्राह्मण हे ब्यूरोक्रसीत
>> ब्राह्मण हे ब्यूरोक्रसीत शोभून दिसतात पण राज्य चालवायला जमत नै, इ.इ.इ.
इंजिनिअरिंग करावं ते शूद्रांनीच (ब्राह्मणांनी त्यात पडू नये) असं मत मात्र कुठे आढळून आलं नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत आहे. किमान काही ठिकाणी
सहमत आहे. किमान काही ठिकाणी तरी हा पूर्वग्रह नाहीये ते चांगलेच आहे- नॉटविथस्टँडिंग द शिक्षण व्हर्सेस मटण महागाई
पण माझ्या मते राज्य करण्याबद्दलच्या मतांचा संदर्भ आहे. त्यासंदर्भात अन्य जातीयांबद्दल टिपिकल तुच्छतादर्शक मते तर आहेतच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तांत्रिक कामे
गेल्या तीनचार दिवसांतल्या मटा किंवा लोकसत्तामध्ये मराठी वर्तमानपत्रउद्योगाविषयीएक लेख आला आहे. त्यात असे म्हटले आहे की या उद्योगात दोन विभाग असत. एक संपादकीय विभाग. यामध्ये बहुतेक सर्व ब्राह्मण असत. दुसरा छपाईकाम करणारा विभाग. यामध्ये (जुन्या काळी)टाइप सेट करणारे खिळारी- जुळारी,मशीन सांभाळणारे, कागद रोल इ. व्यवस्था बघणारे, फोटोग्राफेर्स वगैरे सर्व लोक हे ब्राह्मणेतर असत. हेच नाटक आणि चित्रपटाला सुद्धा लागू आहे. इथले सर्व बॅक्-स्टेज कलाकार-कर्मचारी हे अधिकतर ब्राह्मणेतर असत.नेपथ्यकारांमध्ये एक पु.श्री. काळे सोडले (आणि मला वाटते द.ग.गोडसे?)तर सर्व अब्राह्मणच असत. ही मला वाटते शारीरिक काम आणि बौद्धिक काम अशी विभागणी असावी. किंवा तांत्रिक कसबे ही परंपरेनेच बहुजनांकडे अधिक असावीत. आता तर हे सर्व उद्योग ब्राह्मणेतरांच्याच हातांत आहेत, जे अर्थात चांगलेच आहे. ह्याला (जुन्या पार्ट्स मधून सर्व तंत्र शिकून घेऊन स्वतःचे उत्पादन बनवण्याला) एक प्रकारे रिवर्स एंजिनीअरिंग म्हणता येईल का?
रोचक.
माझा प्रतिसाद थोडा अवांतर आहे पण वरील विचार अतिशय रोचक आहे. गेली अनेक वर्षे परदेशात तांत्रिक क्षेत्रात काम केल्यावर मला फार तीव्रतेने असे जाणवले आहे की भारतात अभियंता म्हणून मिळालेले प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात फील्डवर होणारे काम यात खूप मोठे अंतर असते. उच्चवर्गीय मुलामुलींमधे त्यातील गणिती भाग समजून घेण्याची आणि त्या पातळीवर रचना करायची कुवत अभ्यासक्रमांतून मिळत असली तरी व्यावहारीक पातळीवर त्यांची दृष्टी अतिशय कमकुवत असते. यात अभ्यासक्रमाचा भाग असला तरी उच्चवर्गिय समाजात जन्मल्याने केवळ 'ही' आपली कामे आणि 'ती' इतरांची (ब्लू कॉलर) कामे अशी सरळसरळ मानसिकता झालेली असते आणि कोठेतरी हे 'ब्लू कॉलर' काम खालच्या दर्जाचे आहे असे वाटत असते(हे फार सरसकटीकरण आहे पण हा अनुभव सार्वत्रिक असल्याचे मी माझ्या अवतीभोवती अनुभवले आहे).त्यामुळे जी व्यावहारीक कौशल्ये आपल्या व्यवसायाचा भाग आहेत किंवा जी व्यावहारीक कौशल्ये आपल्याकडे असली तर आपल्या नेहेमीच्या आयुष्यात त्यांचा उपयोग झाला असता (उदाहरणार्थ घरगुती बागकाम, सुतारकाम, स्थापत्य.. इत्यादी) त्याबद्दल उच्चवर्गीय अभियंत्यात प्रचंड उदासीनता असते. कालपरत्वे या कामांत रस निर्माण झाला आणि ही कौशल्ये शिकावे असे वाटले तरी ज्या प्रकारची मानसिक आणि शारीरीक घडवणूक उच्चवर्गीय भारतीय म्हणून झालेली असते त्यातून बाहेर पडणे फार कठीण असते. म्हणजे जसे स्पेशलायझेशनच्या जमान्यात आपल्या अधिकाराच्या अतिशय संकुचित क्षेत्राबाहेरचे पण तरी आपल्याच व्यवसायाशी संबंधित गोष्टींचे बर्याच उच्चशिक्षितांना भान नसते तसेच काहीतरी पूर्वापार चालत आलेल्या वर्णव्यवस्थेतून झाले आहे असे वाटते.
हे सगळीकडेच!
प्रत्येक जातीला एक स्वभाव वैशिष्ट्य चिकट(व)ले गेले आहे.
आणि मग त्या त्या वैशिष्ट्यावरून त्या जातीच्या व्यक्तींना शक्य अन् अशक्य गोष्टींचा वृथा पुर्वग्रह बाळगला जातो हे दुर्दैवी आहे पण खरेच आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सरंजामशाही
आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच सरंजाम बनायची सुप्त इच्छा असते.
सरंजामशाही उपभोगणार्या व्यक्तीला 'सरंजाम' असे म्हणतात हे प्रथमच कळले. आता कोणीतरी 'सरंजाम' चा शब्दशः अर्थ सांगावा. 'सर अन्जाम' तर नव्हे ?
उत्सुकता म्हणून शब्दकोश
उत्सुकता म्हणून शब्दकोश बघितला:
मोल्सवर्थः-
तेव्हा सरंजाम म्हणजे व्यक्ती नसून त्या व्यक्तीकडिल किमती वस्तु असावा. मात्र असा सरंजाम बाळगणार्या व्यक्तीस काय म्हणतात बरे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सरंजामशहा
सरंजामशहा
सरंजामदार?
सरंजामदार?
सरंजाम
सरंजामशाही,अहंगंड आपल्या सर्वांच्या रक्तातच भिनला आहे असे हे म्हणतात. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायची पद्धत महाराष्ट्रातच आहे हो. स्वतःच दोलकी पिटून स्वत्;ची पाठ थोपटण्याचे प्रकार नविन नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या का़ळापासून आहे ते.
सरंजामशाही कशी संपणार?
सरंजामशाही कशी संपणार हा प्रश्न विचारतांनादेखील आपण सरंजामशाहीच्या खुणा टिकवून धरत असतो.
'उदयनराजे भोसले' (किंवा अभयसिंहराजे, कल्पनाराजे इ.) असाच ह्या कुटुंबातील लोकांचा उल्लेख त्यांचे टीकाकार आणि विरोधक करत असतात. साहजिकच आपण 'राजे' असल्याची हवा त्यांच्या डोक्यात भरते आणि ते लहरी राजांप्रमाणे वर्तन करू लागतात. प्रस्तुत धागाकर्त्याने 'उदयनराजे भोसले' असाच उल्लेख केला आहे. पण असा उल्लेख वस्तुस्थितिनिदर्शक आहे का?
गोपाळअष्टीच्या लढाईत मराठी सैन्याचा पराभव झाल्यानंतर छत्रपति इंग्रजांकडे आश्रयार्थी म्हणून गेले. (किंबहुना, पेशव्यांच्या ताब्यातून सोडवून इंग्रजांनी त्यांच्या छत्राखाली आपल्याला घ्यावे ह्यासाठी छत्रपति आधीपासूनच इंग्रजांशी संधान बाळगून होते. शत्रूशी अन्तस्थ संधान बांधणे - कोणत्याहि कारणासाठी - ह्याला आजच्या काळात फितुरी मानले जाते. अशी 'फितुरी' स्वतः छत्रपतींनीच केली होती!) असा पराभव का झाला, त्याला जबाबदार कोण हा एक वेगळा इतिहास आहे. तो काहीहि असला तरी त्यातून छत्रपतींचे image सुधारावे असे त्यात काहीच नव्हते आणि तो विजय मिळविण्यामागे छत्रपतींची काही भागीदारीहि नव्हती. लढाईनंतर छत्रपति इंग्रजांचे आश्रित झाले. इंग्रजांनीच पुढे घालून त्यांना पुनः सिंहासनस्थ केले आणि वारणा ते नीरा असा भाग राज्य म्हणून तोडून दिला. इंग्रज ज्याचा बाप होता असे हे राज्य moth-eaten होते कारण ते सातारास्थित इंग्रज रेसिंडेंटाच्या सक्त देखरेखीखाली चालवायचे होते. ह्या तथाकथित 'राज्याचा' शिवाजीच्या 'विक्रमार्जित' राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. छत्रपति प्रतापसिंह जेव्हा इंग्रजांना गैरसोयीचे वाटू लागले तेव्हा त्यांना जागेवरून काढून टाकून बनारसला पेन्शनीत पाठविण्यात आले. अगतिक आणि पदावरून फेकले गेलेले छत्रपति इंग्रजांना शिव्याशाप देत तिकडे चालते झाले आणि नंतर आमरण तेथेच राहिले. आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे असा टाहो फोडत लंडनपर्यंत आपला आवाज उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला पण तो निष्फळ ठरला.
त्यांच्याजागी बसविलेले आप्पासाहेब हे निपुत्रिक होते हे कारण दाखवून डलहौसीच्या Doctrine of Lapse धोरणानुसार आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर हे moth-eaten राज्यहि इंग्रजांनी १८४९ मध्ये बरखास्त केले आणि त्यांच्या वारसदारांकडे केवळ काही खेडयांच्या पाटिलकीची वतने काय ती शिल्लक उरली. ह्या सगळ्या केविलवाण्या इतिहासाचा आणि राज्याचा शिवाजीशी संबंध काय? अपमान झाला असे वाटून बादसहासमोर खिलत नाकारणार्या पूर्वजाचे हे कसले लाचार वारसदार?
तरीपण हे पाटीलबुवा स्वतःला 'छत्रपति','राजे' अशी बेगडी बिरुदे लावून मिरवतात आणि त्यांचे स्तुतिपाठक आणि अज्ञ सर्वसामान्य जन त्यांची तळी उचलतात.त्यांचे विरोधकहि त्यांना 'श्री. उदयन भोसले' असे न म्हणता' छ. उदयनराजे भोसले' असे संबोधतात. बाबासाहेब पुरंदरे सातार्याचा गादीपुढे हाताला रुमाल बांधून सद्गदित होत्साते मुजरे करतात. अशा स्थितीत सरंजामशाही संपणार कशी?
ह्याच संदर्भात इंग्रजांनी १८४३मध्ये नेमलेल्या 'इनाम कमिशन'चा उल्लेख करावासा वाटतो. चाणाक्ष इंग्रज सत्ताधार्यांच्या असे लवकरच लक्षात आले की शिवकालापासून ते पेशवाईअखेरपर्यंत अनेक 'इनामदार' निर्माण केले गेले होते आणि सरकारच्या उत्पन्नाला ही एक मोठीच गळती लागलेली होती कारण ही इनामे म्हणजे Perpetual Assignment of Revenue for a specified task or service अशा स्वरूपाची होती. उत्पन्नाला असे कायमचे भगदाड असणे इंग्रजांना नको होते म्हणून कोणती इनामे खरी आणि कोणती बनावट, कोठे इनामदाराचा वंश खंडित झाल्यामुळे इनाम नष्ट झाले होते असा शोध घेऊन इनामांचे हे वाढलेले तण मुळातूनच उपटून टाकणे हा त्यांचा हेतु होता. हा हेतु समाजवादी विचारांतून निर्माण झालेला नव्हता कारण ही संकल्पना तेव्हा निर्माणहि झाली नव्हती. राज्याचे उत्पन्न वाढविणे हाच त्याचा हेतु होता. कमिशनला त्या काळात इनामदारांकडून खूप विरोध झाला. सार्वजनिक सभेने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील आणि लंडनमधील काही इंग्रजहि इनामदारांचे पक्षपाती होते.
इंग्रजांचा हेतु काहीहि असो, कमिशनमुळे शेकडो इनामदार आपल्या इनामांना मुकले आणि सर्वसामान्य नागरिक झाले. ह्याचा झाला असला तर लाभच महाराष्ट्राला आणि देशाला झाला. अशी ही इनामांची बांडगुळे १९४७ पर्यंत टिकून राहिली असती तर स्वातन्त्र्योत्तर काळात ती किती मोठी डोकेदुखी झाली असती? १९५७ च्या कूळकायद्याने केले तसेच काम ह्या इनाम कमिशनने त्यापूर्वी १०० वर्षे आधी करून टाकलेले होते असे म्हणता येते.
प्रतिसाद आवडला
यावरून आठवले. १२-१५ वर्षांपुर्वी मी पुण्यात शिकत असतांना पश्चिम महाराष्ट्रातील निंबाळकर, भोसले, पवार वगैरे आडनावे असलेले पण कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेले विद्यार्थी दुसर्या-तिसर्या वर्षापासून आपल्या नावासमोर राजे लावून घेत असत. उदा. मेघराज निंबाळकर नावाचा मुलगा स्वतःचे नाव जिकडे-तिकडे मेघराजराजे असे सांगत/लिहीत असे.
सहमत
पण जुने सरंजामदार अजून पुरते गेले नाहीत तर नवीन सरंजामदार निर्माण होत आहेत. मध्यंतरी एका सरकारी अधिकार्याने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माननीय पाटीलसाहेब असे न म्हणता केवळ मिस्टर पाटील असे संबोधल्याने पाटलांच्या पित्त्यांचा मार खाल्ला अशी बातमी वाचली होती.
>>गोपाळअष्टीच्या लढाईत मराठी
>>गोपाळअष्टीच्या लढाईत मराठी सैन्याचा पराभव झाल्यानंतर छत्रपति इंग्रजांकडे आश्रयार्थी म्हणून गेले. (किंबहुना, पेशव्यांच्या ताब्यातून सोडवून इंग्रजांनी त्यांच्या छत्राखाली आपल्याला घ्यावे ह्यासाठी छत्रपति आधीपासूनच इंग्रजांशी संधान बाळगून होते. शत्रूशी अन्तस्थ संधान बांधणे - कोणत्याहि कारणासाठी - ह्याला आजच्या काळात फितुरी मानले जाते. अशी 'फितुरी' स्वतः छत्रपतींनीच केली होती!)
ओव्हरऑल प्रतिसाद पटला (सरंजामशाही कशी टिकून आहे याविषयी) पण वरील 'फितुरी' मीमांसा पटली नाही. टेक्निकली का होईना छत्रपती हेच राजे होते आणि पेशवे हे नोकर (एम्प्लॉयी) होते. त्यामुळे छत्रपतींनी इंग्रजांशी संधान बांधणे ही टेक्निकली फितुरी होत नाही. राज्य पेशव्यांचे असते आणि भोसल्यांनी इंग्रजांशी संधान बांधले असते तर त्याला फितुरी म्हणता आली असती.
"पेशवे नोकर" यावरून आणखी एक अवांतर प्रश्न पडला. आपण इतिहासाच्या पुस्तकात शिंदे आणि होळकर हे पेशव्यांचे सरदार (पक्षी- सबऑर्डिनेट) असे शेवटपर्यंत शिकतो. प्रत्यक्षात पानिपत युद्धाच्या वेळी सुद्धा होळकर स्वतंत्र होते असे वाटते. त्यांचे पेशव्यांशी नाते Allies सारखे होते. नेमक्या कोणत्या काळात हे सरदार नाते बदलून अलाइजचे झाले?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पहिल्या बाजीरावाचे निधन झाले
पहिल्या बाजीरावाचे निधन झाले इ.स. १७४० मध्ये. त्यानंतर हळूहळू हे लोक स्वतंत्र झाले असे म्हणायला हरकत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिवाजी महाराजांनी वतनदारीची
शिवाजी महाराजांनी वतनदारीची पद्धत बंद केली होती ना? ती कोणाच्या काळात सुरु झाली पुन्हा? राजारामाच्या?
येस्स. औरंगजेब दक्षिणेत आला
येस्स. औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा मुघल-मराठा हा फायनल काउंटडाउन सुररू झाला, आणि "द मराठाज वन बाय सिंप्लि नॉट लूजिंग". पण या भानगडीत वरिजिनल राज्य मरतझुरत कसेतरी शिल्लक रा।इले होते. छत्रपतीची अॅथॉरिटी लै कमकुवत झाली होती आणि मोगलांकडे जाऊ पाहणार्या वतनदारांना कह्यात ठेवणेही गरजेचे होते. तेव्हा अनिर्वाहपक्ष म्हणून ती पद्धत सुरू झाली. पुढे पहिला बाजीराव चांगला पेशवा निघाला, पण नंतरच्या पेशव्यांना बाकीच्या सरदारांना पूर्ण कह्यात ठेवणे कधी जमले नाही. हेन्स द रिझल्ट. १८ व्या शतकातील मराठी राज्याला एंपायर म्हण्ण्याऐवजी "कॉन्फेडरसी" म्हण्णे अधिक सयुक्तिक होईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पूरक माहिती
वरील सर्व प्रतिसादांना पूरक माहिती
http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/03/blog-post.html
http://mr.upakram.org/node/3318
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'फितुरी' वगैरे...
मग बहादुरशहा ज़फ़रचे इंग्रजांनी काय नि नेमक्या कोणत्या आधारावर केले?
Bahadur Shah was tried on four counts, two of aiding rebels, one of treason, and being party to the murder of 49 people,[14] and after a forty day trial found guilty on all charges. (दुवा)
बहादुरशहा ज़फ़र तांत्रिकदृष्ट्या का होईना, पण बादशहा नव्हता काय?
=================
बाकी, तांत्रिकदृष्ट्या का होईना, पण छत्रपती हेच राजे होते आणि पेशवे हे केवळ नोकर होते, हे जरी गृहीत धरले (तत्त्वतः ते योग्यच आहे.), तरी मग त्या न्यायाने, इंग्रजांचे युद्ध हे (पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे चालवलेल्या) छत्रपतींच्या राज्याशी होते, खुद्द पेशव्यांशी नव्हे. म्हणजेच, इंग्रज हे छत्रपतींच्या राज्याचे शत्रू होते. (पेशव्यांचे नव्हे. किंवा, फॉर द्याट म्याटर, व्यक्तिशः छत्रपती-अॅज़-अ-पर्सनचेही नव्हेच नव्हे.) अशा परिस्थितीत छत्रपतींनी स्वतःच्याच राज्याच्या शत्रूशी (स्वतःच्या वैयक्तिक शत्रूशी नव्हे, माइंड यू.) हातमिळवणी करणे - आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या ताब्यात सत्ता यावी म्हणून; राज्याच्या कल्याणाकरिता वगैरे नव्हे - ही फितुरी नव्हे काय?
ठीक आहे, सर्वप्रथम जेव्हा संधान साधले, तेव्हा इंग्रजांशी युद्ध वगैरे नव्हते, सबब इंग्रज हे त्या क्षणी तांत्रिकदृष्ट्या 'शत्रू' नव्हते, हेही मानू. तरीही, पेशवे हे छत्रपतींचे - खरे तर छत्रपतींच्या राज्याचे - नोकर होते, हे लक्षात घेता, तत्त्वतः का होईना, परंतु पेशव्यांना पदच्युत करणे, किंवा पेशवाई बरखास्त करणे, ही छत्रपतींच्या अखत्यारीतील गोष्ट असावी. (प्रत्यक्षात पेशवे हे राजकीयदृष्ट्या वरचढ ठरल्यामुळे म्हणा किंवा छत्रपती दुबळे पडल्यामुळे म्हणा, हे अमलात आणणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसावे, हा भाग अलाहिदा.) म्हणजेच, छत्रपतींचे पेशव्यांशी संबंध किंवा व्यवहार हा राज्याचा अंतर्गत मामला होता. त्यात ढवळाढवळ करण्याकरिता (आणि तेही आश्रयाच्या, आपल्या छत्राखाली घेण्याच्या बोलीवर) बाह्य शक्तीस पाचारण करणे (तेही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता), ही राज्याशी (पेशव्यांशी किंवा व्यक्तिशः स्वतःशी नव्हे, माइंड यू.) फितुरी नव्हे काय? (छत्रपती केवळ व्यक्तिशः स्वतःस इंग्रजांचे अंकित करत नव्हते, तर आपल्या सार्वभौम राज्यास - व्यक्तिशः ज्याचे ते प्रतीकमात्र होते - आश्रित करू पाहत होते, ही येथे लक्षात घेण्याजोगी बाब आहे.)
समांतर काल्पनिक उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, समजा, उद्या भारताच्या राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांचा/पंतप्रधानांच्या सरकारचा कारभार पसंत पडला नाही. आता, तत्त्वतः जरी पंतप्रधानांस मंत्रिमंडळासह पदच्युत करणे हे राष्ट्रपतींच्या अखत्यारीत असले, तरी सरकारास जोपर्यंत संसदेतील बहुमताचा आधार आहे, तोपर्यंत राष्ट्रपतींनी असे करणे हे संकेतास - आणि बहुधा घटनात्मक तरतुदींससुद्धा (चूभूद्याघ्या.) - धरून नाही. आता समजा, सरकारची बाजू तेथेही भक्कम आहे; सरकारास संसदेत चांगले दणकट बहुमत आहे. म्हणजेच, राष्ट्रपतींचे हात येथे बांधलेले आहेत.
अशा परिस्थितीत, राष्ट्रपतींनी समजा एखाद्या 'शेजारी राष्ट्रा'ची - किंवा, फॉर द्याट म्याटर, कोणत्याही परराष्ट्राची - मदत घेतली, आणि सरकारास पदच्युत करविले, तर ती फितुरी ठरणार नाही काय?
(उलटपक्षी, राष्ट्रपतींनी समजा भारतीय सैन्याची मदत घेऊन - कू-ष्टाइलीत - सरकार उलथवले, तर, तत्त्वतः राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च सेनापती असतात, ही बाब अलाहिदा, बहुधा ते घटनेचे उल्लंघन करणारे आणि म्हणूनच संसदेकडून राष्ट्रपतींवर महाभियोगाच्या [तरतुदी] कारवाईस पात्र असे कृत्य ठरेलही, परंतु - या प्रकारात बाह्यशक्तीशी संगनमताचा भाग नसल्याकारणाने - त्यास 'फितुरी' असे संबोधता येईलसे वाटत नाही. चूभूद्याघ्या.)
==========
अवांतर:
'शेजारी राष्ट्रा'वरून आठवले. जनरल मुशर्रफ़ यांनी जेव्हा पाकिस्तानातील सत्ता ताब्यात घेतली, तेव्हाचा घटनाक्रम पाहू. मुशर्रफ़महोदय तेव्हा श्रीलंकेच्या दौर्यावरून प्रवासी विमानाने परत येत होते. पंतप्रधान शरीफ़महोदयांस ते डोईजड होऊ लागले होते, सबब शरीफ़महोदयांनी त्यांचा पत्ता कट करण्याप्रीत्यर्थ (१) ते उड्डाणात असतानाच त्यांना बडतर्फ केले, आणि (२) ते येत असलेल्या विमानास एक एक करून पाकिस्तानातील कोणत्याही विमानतळावर उतरण्यास काहीबाही कारणांस्तव परवानगी नाकारली, एवढेच नव्हे, तर (३) विमानातील इंधनसाठा हळूहळू संपुष्टात येत आहे, हे लक्षात घेऊन (ऑफ़ ऑल द प्लेसेस) भारतातील एखाद्या जवळपासच्या विमानतळाकडे विमान वळवण्याची 'सूचना' करविली. मुशर्रफ़महोदयांनी अर्थातच ती धुडकावून लावून ('ओवर माय डेड बॉडी!') (१) लष्कराच्या साह्याने कराची विमानतळ ताब्यात घेतला, (२) विमान कराची विमानतळावर उतरविण्यास भाग पाडले, (३) उतरल्यावर शरीफ़महोदयांचे सरकार लष्कराच्या साह्याने उलथवून सत्ता ताब्यात घेतली, आणि (४) नंतर उलट शरीफ़महोदयांवरच विमानअपहरणाचे, विमानातील प्रवाशांचे जीव धोक्यात आणण्याचे नि इतर कसलेकसले आरोप लावले.
मुशर्रफ़महोदयांच्या सत्ता बळकावण्याचे अर्थातच समर्थन नाही. परंतु या घटनाक्रमाकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पहावयाचे, याबद्दल प्रश्न निर्माण होतात.
(१) विमानाचे अपहरण नेमके कोणी केले?
- सरकारी आदेशांचे नि सूचनांचे पालन करत असलेल्या विमानास ताब्यात घेऊन सरकारी आदेशांस धुडकावून त्यांच्या विरोधांत, कोणत्याही अधिकाराअभावी, विमान आपल्याला हवे तेथे सक्तीने वळवणार्या मुशर्रफ़महोदयांनी? की,
- आपले नियोजित मार्गक्रमण करत असलेल्या विमानास काहीही वैध कारण नसताना (किंवा काहीबाही कारणे निर्माण करून) आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्या मार्गापासून इतरत्र वळवू पाहणार्या शरीफ़महोदयांनी?
(२) फितुरी नेमकी कोणी केली?
- लोकनियुक्त सरकार उलथवून सत्ता ताब्यात घेण्याचे दुष्कृत्य जरी मुशर्रफ़महोदयांनी केले असले, तरी त्यात त्यांच्या बाजू़ने कोणत्याही परराष्ट्राशी संधानाचा भाग नव्हता. सबब, यास 'फितुरी' म्हणता येईलसे वाटत नाही.
- उलटपक्षी, शरीफ़महोदयांनी जरी कोणत्याही परकीय शक्तीशी संगनमत केल्याबद्दल कोणतीही विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसली (आणि म्हणूनच ती शक्यता नाकारण्यायोग्य असली), तरीही, कारगिल प्रकरणावरून भारताची मुशर्रफ़महोदयांशी पुरानी दुश्मनी अथवा खुन्नस असण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांचे विमान भारतात उतरवण्यास भाग पाडून परस्पर भारताकरवी त्यांचा काटा निघाला, तर पाहणे, या शक्यतेस 'फितुरी' मानता यावी काय?
नवी बाजू (जर इंग्रज हे
नवी बाजू (जर इंग्रज हे बाह्यशक्ती होते असे गृहीतक असेल तर) पटते. पण ते तितकेसे करेक्ट नाही. पक्षी इंग्रजांना तेव्हा एक प्लेअरच समजले जात होते. [पोर्तुगीजांचे राज्य १५०५ भारतात मुघलांच्या आधी १५२६ एस्टॅब्लिश झाले होते ही वस्तुस्थिती रोचक ठरावी. पोर्तुगीजही बाहेरचे, मुघलही बाहेरचेच].
असेच दुसरे उदाहरण डोईजड झालेल्या टिपूला नामोहरम करण्यासाठी आणि आपल्याला राजा म्हणून पुन्हा एस्टॅब्लिश करावे यासाठी मैसूरच्या वोडियारांनी इंग्रजांशी संधान बांधले होते.
छत्रपती किंवा वोडियार दोघांनाही इंग्रज राज्य गिळंकृत करतील अशी व्हिजन नसावी.
राघोबाने (पेशव्याविरोधात) इंग्रजांशी संधान बांधणे ही फितुरी. कारण राघोबा टेक्निकली कोणीच नव्हता. तर छत्रपती सार्वभौम राजे होते.
राष्ट्रपती - पंतप्रधान नात्यात पंतप्रधानाच्याच सल्ल्याने कारभार करायचा आहे (नो अदर ऑप्शन) हे मूळचेच अंडरस्टॅण्डिंग असते. राष्ट्रपती होण्यापूर्वीपासून राष्ट्रपतींना ते ठाऊक असते. छत्रपतींनी पेशव्यांना नेमलेले होते तेव्हा पेशवे म्हणतील तेच करायचे असे छत्रपतींवर बंधन असल्याचे अंडरस्टॅण्डिंग नव्हते.
इथे पुन्हा एक अवांतर प्रश्न पडला.... शिवाजी पासूनचे छत्रपती किंवा बाजीरावांपासूनचे पेशवे हे आपण जनतेला कल्याणकारी राज्य द्यायचे आहे अशी व्हिजन ठेवून राज्य करत होते का? (स्वामी किंवा श्रीमान योगी मध्ये काही का लिहिले असो).
------
बहादूरशहा जफरला खतम करण्यासाठी इंग्रजांनी ठेवलेला तो आरोप आहे. तो काहीही असू शकतो. (तो "तू नाही तर तुझ्या आज्याने पाणी उष्टे केले होते" या इसापनीतीतील लांडगा/कोकरू गोष्टीप्रमाणे घ्यायला हरकत नाही).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तर
इंग्रज हे छत्रपतींच्या राज्याच्या बाहेरील शक्ती होते. हिंदुस्थानच्या (व्हॉटेवर बी द डेफिनिशन ऑफ द टर्म) बाहेरील शक्ती होते किंवा नाही, ही बाब गौण आहे. इंग्रजांऐवजी एखाद्या तथाकथित 'एतद्देशीय' (पक्षी: 'इण्डियन ओरिजिन' + 'हिंदू') शक्तीशी संधान बांधले असते, तरीही तोच मुद्दा लागू होता.
त्याउपर, पेशव्यांचे सरकार हे छत्रपतींच्या राज्याचे (छत्रपतींच्याच नियुक्तीने) अधिकृतरीत्या प्रस्थापित असे राज्य होते, नाही का? त्या परिस्थितीत, छत्रपतींनी ते स्वतःच्या अधिकारात नि स्वबळावर स्वतःच बरखास्त केले असते, छत्रपती तसे करू शकले असते, तर बाब वेगळी असती. परंतु राज्याच्या अधिकृत सरकारास उलथून पाडण्यासाठी बाह्यशक्तीस (राज्यबाह्य; 'हिंदुस्थान'बाह्य नव्हे) आणणे ही फितुरी नव्हती काय?
मान्य. परंतु हा मुद्दा येथे गौण आहे.
तो मुद्दा नाही. राष्ट्रपतींनी स्वतःच्या अधिकारात (घटनात्मकदृष्ट्या तसे शक्य असेल तर) लोकनियुक्त सरकार बरखास्त केले, तर काहीही म्हणणे नाही. प्रश्न हा आहे, की समजा (काल्पनिक उदाहरण), भारतीय राष्ट्रपतींनी पाकिस्तानी लष्कराध्यक्षांशी संधान बांधून भारतावर पाकिस्तानी लष्कराकरवी हल्ला करविला, आणि त्यामार्गे भारतीय सरकार उलथवले, तर त्यास फितुरी म्हणणार की नाही?
चांगला प्रश्न आहे. कल्पना नाही.
हे मान्यच आहे. फक्त, 'असाही आरोप करता येऊ शकतो, केला जाऊ शकतो' एवढेच दाखवून द्यायचे होते.
असो.
लोकप्रभा - हे वाचा
लोकप्रभेमधला काही वर्षांपूर्वीचा हा लेख वाचा आणि ठरवा सरंजामशाहीपुढे लोटांगणे घालण्याची सवय केव्हा जाईल!
उदयनराजे भोसले' (किंवा
असंच अजून एक उदाहरण राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया. या लोकांची कागदोपत्री नावं काय असतात; उदयन, अभयसिंह अशी असतात का उदयनराजे, अभयसिंहराजे अशी असतात?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वसुंधरा राणी का नाही?
वसुंधराराजे ऐवजी वसुंधराराणी का नाही
आणि शिंदे आडनाव असताना सिंधिया नाव लावण्याबद्दल कोणीच कसे बोलत नाही?
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
पारंपरिक भूमिका आणि उदारमतवाद
वसुंधराराजे हे त्यांचं कागदोपत्री नाव नाही असं समजून, राणी नाही राजे आहे यामागे पारंपरिक भूमिका असावी. राजा राज्य करतो आणि राणी काहीही करत नाही. पण वसुंधराराजे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. राणी बनून अंतःपुरात असण्यापेक्षा त्यांना राज्य करायचं आहे असं असू शकतं. (झाशीची राणी हा अनेक दृष्टीने अपवादच होता.)
बाकी त्यांचं आडनाव त्यांना काय लावायचं ते त्या लावतील. आपण कोण त्याबद्दल आक्षेप घेणारे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विजयाराजे शिंदे देखील राजेच
विजयाराजे शिंदे देखील राजेच लावायच्या.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
राजे असं आडनाव
आणि वसुंधराराजे सिंधियांवर आक्षेप घेतला तर एकवाक्यतेखातर राजे असं आडनाव असणार्या स्त्रियांवरही आक्षेप घ्यावा लागेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंका
'राजे' आडनाव असलेल्या स्त्रियांनी ते बदलून त्याऐवजी आडनाव काय लावायचे?
'राण्या'??????
राणे चालेल का? राणी हे तर
राणे चालेल का? राणी हे तर स्त्रीचं नाव असतं, आडनाव म्हटलं तर गोंधळ वाढेल. 'राण्या' म्हटलं तरीही अनेकवचनामुळे घोळ. पण मग त्यातून स्लाव वंशात काही आडनावांमधे स्त्रीलिंगी-पुलिंगी आडनावं वेगळी असतात तसं करावं लागेल. मारात साफिनची बहिण दिनारा सफिना.
असो. आपल्याला काय? लोकांनी आपल्याला हवी ती नावं, आडनावं घ्यावीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(स्व)आदरार्थी बहुवचन?
'राजे' हेदेखील अनेकवचनच आहे, हे नमूद करावेसे वाटते. (हे स्वादरार्थी बहुवचन - काहीसे Royal Weच्या धर्तीवर - असावे काय? अन्यथा, खास करून एखाद्या स्त्रीच्या नावासमोर 'राजे' असे अनेकवचन लावल्याने काही भलभलते अर्थ लक्षात येतात.)
(अवांतर: 'हिमालयाची सावली' या नाटकाची या निमित्ताने आठवण झाली. त्यातील कथानायकाची पत्नी, तत्कालीन पद्धतीस अनुसरून पतीस आदरार्थी बहुवचनाने संबोधायचे, म्हणून (पतीच्या पाठीमागे) त्याच्या नावाने खडे फोडताना द्यायच्या शिव्यासुद्धा अनेकवचनात ('मेल्यांनो', 'रांडेच्यांनो' वगैरे) देते, ती गंमत आठवली. असो.)
जुनाच वाद
<शिंदे आडनाव असताना सिंधिया नाव लावण्याबद्दल कोणीच कसे बोलत नाही?>
मला वाटते 'शिंदे'चे 'Scindh(d)ia','गायकवाड'चे 'Gaekwar/d', 'पुणे'चे 'Poona', ;ठाणे'चे 'Thana'अथवा 'Tannah, 'कल्याण'चे 'Calian','कुलाबा'चे 'Colaba', 'सातारा'चे Sattara/h, 'पेशवा'चे 'Peishwa' - एक ना दोन, 'अँग्लो-इंडियन' भाषेत रूढ झालेले असे शेकडो उच्चार आणि ते लिहिण्याची पद्धति ह्या इंग्रजांच्या वापरात अधिक असत. त्याचीहि तीन प्रमुख कारणे सुचतात. एकतर देशी भाषा आणि देशी लिपि ह्यांचे अज्ञान असल्याने त्यांच्या कानावर ते शब्द जसे पडत तसे ते लिहिले जात. नकळतच हे 'ऐकणे' त्यांच्या सवयीचा इंग्रजी उच्चारांच्या गाळणीमधून त्यांच्या कानात शिरे. 'सातारा'चे 'Sattara/h' का व्हावे? इंग्रजी भाषेच्या उच्चारांच्या धाटणीनुसार एकतर बहुतेक शब्दांमध्ये एकच आघात (accent) आणि तो शब्दात एकाहून अधिक syllables (मराठीत प्रतिशब्द?) असली तर बहुशः शेवटून दुसर्या syllable वर पडतो. तीनहि syllablesवर सारखाच आघात असलेला 'सातारा' हा शब्द बोलत्या इंग्रजीच्या ओघात बसत नाही आणि त्याचे आपोआपच 'सत्तारा - शेवटचा 'रा'कमी वजनाचा - होते. दुसरे म्हणजे 'ए'कारान्त नामवाचक शब्दहि इंग्रजीच्या ओघात नीट बसत नाहीत. तिसरे म्हणजे 'ण','ड' असे काही वर्ण त्यांना उच्चारताच येत नाहीत. साहजिकच 'पुणे' 'Poona' होऊन बसते.
अशा कारणांनी 'अँग्लो-इंडियन'वापरात हे शब्द असेच (आपल्या दृष्टीने भ्रष्ट) स्वरूपात उच्चारले जात आणि इंग्रजीचा वापर करू शकणार्या नेटिवांनीहि ते तसेच उचलले होते.
गावांच्या नावांबाबत स्वातन्त्र्योत्तर काळात मागण्या होऊन त्यांचे मूळ रूप कित्येक ठिकाणी पुनःस्थापित झाले आहे. उदा. आता पुणे, वाराणसी हीच नावे अधिक रूढ झाली आहेत, त्यांची 'अँग्लो-इंडियन' रूपे 'पूना', 'बनारस' अनैसर्गिक वाटतात. हे गावांची नावे आणि सार्वजनिक वापरात असलेल्या शब्दांबाद्दल होऊ शकले. पण 'सिंदिया', सिंधिया'चे काय? ही वैयक्तिक नावे असल्याने ती कशी लिहायची हे ठरविण्याचे स्वातन्त्र्य ती नावे वापरंणार्यांचे आहे. त्यांनाच 'शिंदे'ऐवजी 'सिंदिया' अधिक अंगवळणी पडले असले तर आपण काय करणार? आपले 'शिंदे' मूळ त्यांनी जतन केले केले पाहिजे असा आग्रह धरणारे आपण कोण?
तसेहि पाहता बहुतेक सर्वच संस्थानिक इंग्रजांच्या कलाने चालणारे असत आणि वेगवेगळ्या मार्गाने आपली राजनिष्ठा व्यक्त करीत असत. विजयाराजेंचे पति जिवाजीराव ह्यांचे बारशाचे पूर्ण नाव 'जॉर्ज जिवाजीराव'असे ठेवून त्यांचे पिताजी माधवराव ह्यांनी आपली जॉर्जनिष्ठा दाखवली होतीच. तेव्हा इंग्रजांनी ठरविलेले 'सिंदिया' हे आडनाव तरी त्यांनी का सोडावे?
वा!
दोन्ही प्रतिसाद फार आवडले. चर्चाही आवडली.
@थत्तेचाचा,
पेशवे 'नोकर' असूनही त्यांचा छत्रपतींवर 'चाप' होता असा एक सूर मी ऐकल्याचे आठवते. पेशव्यांकडून छत्रपतींकडे जाणार्या मालमत्तेवरूनही (करवसूली का काय ते अचूक आठवत नाही) तेव्हा तणाव निर्माण झाल्याचे वाचले होते असे आठवते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. यामुळे फितुरी शब्द इथे सुसंदर्भ आहे असे वाटते. उदा. समजा दोन राजे एकत्र येऊन तिसर्याविरुद्ध लढत आहेत पण त्यातल्या एकाने शत्रूशी संगनमत केले तर "शत्रूने त्याला फितवला" म्हणले जाते. थोडक्यात फितूर म्हणजे फक्त बंडखोरच असे नसावे. मोल्सवर्थवरील फितवणे शब्दाचा अर्थही याला दुजोरा देताना दिसतो.
अवांतरः बाकी हे 'उदयन' काय शिंचं नाव आहे? उदय ला नुस्ता न लावलाय का काही ऐतिहासिक पारंपारिक संदर्भ आहे?
-Nile
उदयन कोण?
उदयन हा अवन्तीचा आणि वत्स देशाचा राजा आणि भासाच्या 'स्वप्नवासवदत्तम्' ह्या नाटकाचा नायक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तो नक्की केव्हा होऊन गेला वगैरे कोणालाच माहीत नाही पण कालिदासानेहि मेघदूतामध्ये 'प्राप्यावन्तीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धान् पूर्वोद्दिष्टामुपसर पुरीं श्रीविशालां विशालाम्' (उदयनाच्या कथा सांगणारे गावातले वृद्ध जेथे आहेत असा अवन्ती नगरीस पोहोचल्यावर, हे मेघा, आधीच तुला सांगितलेल्या समृद्ध अशा उज्जयिनी पुरीकडे तू नीघ)अशा शब्दात उदयनाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. थोडे पुढे, उज्जयिनीवर्णनात 'प्रद्योतस्य प्रियदुहितरं वत्सराजोऽत्र जह्रे' (वत्सराजाने प्रद्योताचा प्रिय कन्येचे हरण येथे केले) असाहि उल्लेख आहे. म्हणजे कालिदासालाहि तो माहीत होता असे दिसते.
'स्वप्नवासवदत्तम्'च्या कथानकानुसार तरी हा राजा अगदीच लल्लूपंजू असला पाहिजे कारण एकतर शत्रूने त्याचा पराभव केल्याने त्याला राज्य सोडून जावे लागले आणि दुसरे म्हणजे त्याच्या दोन्ही राण्या, पद्मावती आणि वासवदत्ता आणि त्याचे गेलेले राज्य हे सर्व त्याला त्याचा कर्तबगार मंत्री यौगन्धरायण ह्याच्या खटपटीतून मिळाले! मात्र तो वीणावादनात फार वाकबगार होता असा उल्लेख आहे. वीणावादनकौशल्यातूनच त्याचा आणि वासवदत्तेचा संपर्क साधला गेला. त्याला वाजिदअली शाहचा पूर्वज म्हणायला हरकत नाही!
धन्यवाद
रोचक माहिती आहे, धन्यवाद.
syllabus ला अभ्यासक्रम शब्द वापरतात असे वाटते. चुभूदेघे.
-Nile
उदयन
सोळा महाजनपदांच्या काळात गौतम -अम्हावीर ह्यांच्या असपास, मगधाच्या अजातशत्रू ह्या राजाला उदयन हा समकालीन होता असे इतिहासात वाचल्याचे स्मरते. बाकी गोष्टी तशाच.(पराक्रमी नाही, पण बराच कलासक्त वगैरे वगैरे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ळ, ण
इंग्लिश भाषेमध्ये ळ आणि ण हे उच्चार नाहीत. देशी भाषांतल्या शब्दांमधले हे उच्चार दर्शवण्यासाठी त्यांनी पुष्कळ ठिकाणी डबल एल आणि डबल एन ची योजना केलेली दिसते. जसे Tannah -ठाणा, Nalla sopara-नाळा सोपारा, Mann Khurd-माण-खुर्द वगैरे. Tannah तल्या t उच्चार थोडासा ठ सारखा होत असल्याने त्यांना ठ साठी वेगळा वर्ण वापरायची गरज पडली नसावी. ठाणातला शेवटचा आकार आपण लांबवतो. तो तसा दीर्घ दाखवण्यासाठी h ची योजना केली गेली असावी. आपल्याकडे संपूर्ण कोंकण पट्ट्यामध्ये आगरी, बाणकोटी, मालवणी, कुडाळी या बोलीत नपुंसकलिंगी 'एं'कारान्त शब्द 'यां' किंवा 'आं'कारान्त होतात. जसे पोरगें-पोरग्यां,लाटणें-लाटणां,आपटें-आपटां,रोहें-रोहा,आचरें-आचरा,मसुरें-मसुरा इत्यादि.(कारलें, लोणावळें, खंडाळें इ. सुद्धा) गेल्या पन्नाससाठ वर्षांत मराठीतले अनुच्चारित अनुस्वार उडून गेले.(खरे तर कोंकणामध्ये अनुनासिक उच्चार प्रचलित होते, स्पष्टोच्चारित होते, पण इतरत्र कदाचित तसे नव्हते. कदाचित बहुसंख्यानुकूलतेचा न्याय लावला गेला असावा). त्यामुळे आता आपल्याला ही नावे आकारान्त वाटतात. गोव्याच्या कोंकणीमध्ये मात्र हे उच्चार अगदी स्पष्ट असल्याने पोर्तुगीझ स्पेलिंग्ज मध्ये ते शेवटी एम जोडून तसेच राखलेले आहेत.उदा. मयें-mayem, पेडणें-Pernem वगैरे.
चव्हाण चौहान
चौहान ह्यंचा वारसा सांगणारे चौहान आहेत.
तसेच शिंदे - सिंधिया चालत असावे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars