निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स

रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा येतात आणि त्यांच्या बरोबर आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये सारखे बदल होत असतात. निसर्गामधील प्रत्येक पदार्थाला विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते सुध्दा परिस्थितीनुसार बदलत असतात. पण हे सारे बदल निसर्गाच्या ज्या नियमांमुळे होत असतात ते नियम मात्र शाश्वत आहेत. त्यात बदल होत नाहीत. प्राणीमात्रांचे गुणधर्म आणि स्वभावधर्म देखील निसर्गाने ठरवून ठेवले आहेत. वाघासारखा शक्तीशाली आणि हिंस्र प्राणी हरणासारख्या निरपराध, दुर्बल आणि गरीब प्राण्याला मारून खातो हे क्रौर्य वाटले तरी नैसर्गिक आहे. "बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी." हा निसर्गाचा नियम दिसतो. तरीसुध्दा जगातले बहुतेक सगळे प्राणी कळप करून राहतात. त्या कळपात बलिष्ठापासून दुर्बलापर्यंत असमान शक्ती असलेल्यांची उतरंड असते. त्यातला प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो. पण सर्वांनाच कळपात रहायचे असल्यामुळे या बाबतीत त्यांच्यात तडजोडही होत असते. बलवान प्राणीसुध्दा काही गोष्टी दुर्बलांना घेऊ देतात. प्राण्यांची नवजात पिल्ले स्वतः अत्यंत अशक्त आणि असमर्थ असतात, पण त्यांची सशक्त माता त्या पिल्लांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी तिची सगळी शक्ती पणाला लावते. कळपातले इतर बलिष्ठ प्राणीसुध्दा सर्वार्थाने त्यांच्याहून दुबळ्या असलेल्या लहान पिलांशी मायेने वागतात. निसर्गाचे हे नियम वर दिलेल्या नियमाशी विसंगत वाटतात, पण ते तसे आहेत.

स्वतःचा जीव वाचवणे, अन्न गोळा करणे आणि पुनरुत्पादन एवढेच सगळ्या प्राण्यांचे जीवन मुख्यत्वाने असते. त्यांच्या या तीन मुख्य क्रियांशी संबंधित सगळ्या बाबींसाठी निसर्गाचे वरील नियम लागू पडतांना दिसतात. मुंग्या, माशा, डास यांसारखे कीटक किंवा डोळ्यांनाही न दिसणारे रोगजंतूंसारखे सूक्ष्म जीव पहायला गेल्यास कोठल्याही प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्बल दिसत असले तरी त्यांचा लहान आकार आणि चपळपणा यामुळे ते स्वतःचा बचाव करून घेतात, त्यांची अन्नाची गरज अतीशय कमी असते आणि प्रजननाची क्षमता अचाट असते. हीच त्यांची बलस्थाने असतात आणि त्यांच्यामुळे ते तग धरून राहतात. वनस्पतींवर कोणी हल्ला केला तर त्या कोणाशी लढूही शकत नाहीत किंवा पळूनही जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होण्याची आणि नवी झाडे निर्माण करण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे त्या शिल्लक राहतात. 'बलिष्ठ' या शब्दाचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर हे निसर्गाच्या नियमानुसारच आहे.

मनुष्य हासुध्दा एक 'प्राणी' आहे आणि निसर्गाचे हे नियम त्यालाही लागू पडतात. माणसेसुध्दा अशीच वागतात याची असंख्य उदाहरणे रोज डोळ्यासमोर येत असतात. 'बळी तो कान पिळी' आणि 'माइट ईज राइट' अशा अर्थाच्या म्हणी सर्व भाषांमध्ये प्रचलित आहेत. 'जिसकी लाठी उसकी भैंस' या हिंदी म्हणीचा अर्थसुध्दा तशाच प्रकारचा आहे. यातला लाठीधारी इसम इतरांपेक्षा आणि म्हशीपेक्षाही जास्त बलवान असल्याने म्हशीवर त्याचा हक्क सांगू आणि गाजवू शकतो. माणसाला इतर प्राण्यांच्या मानाने खूप जास्त बुध्दी मिळालेली असल्यामुळे त्याने बुध्दीच्या जोरावर अनेक प्रकारची आयुधे, अवजारे, उपकरणे आणि यंत्रे तयार केली आणि त्यांच्या जोरावर आपले सामर्थ्य अनंत पटीने वाढवून त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले. शेती, कारखानदारी आणि उद्योगव्यवसायांमधून तो उत्पन्न घेऊ लागला, घरे, बंगले, इमारती बांधून त्यात राहू लागला, अनेक मार्गाने ज्ञान संपादन करू लागला, कला, क्रीडा, करमणूक वगैरे क्षेत्रांमध्ये भाग घेऊ लागला, वगैरे वगैरे. पण हे करत असतांना त्याने जी असंख्य निरनिराळी क्षेत्रे तयार केली त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची शक्तीस्थाने तयार झाली. बुध्दी, ज्ञान, अनुभव. कौशल्य, चलाखी, कष्टाळूपणा वगैरेंच्या आधाराने त्यातसुध्दा तुलनेने पाहता कोणी बलवान आणि कोणी दुर्बल हे भेद तयार झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यात तडजोड आणि सहकार्य यांचीही आवश्यकता पडत गेली. त्यांनाही वेगळ्या अर्थाने निसर्गनियम लागत गेले. 'बळी तो कान पिळी' हे तत्व सगळीकडे दिसते, ते बळ मात्र कधी एकाद्याचे स्वतःचे असते तर कधी कोणाला ते पाठबळामधून मिळते.

इतिहासपूर्व काळात कळपांमध्ये रानावनात हिंडणारा माणूस गावे, नगरे वसवून एका जागी रहायला लागल्यानंतरसुध्दा तो समूहातच रहात आला. एक राजा, म्होरक्या किंवा मुखिया त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या माणसांचे नेतृत्व करत असे आणि इतर सगळे त्याला मान देत असत किंवा त्याच्यापुढे आपली मान तुकवीत असत आणि त्याने केलेल्या आज्ञा निमूटपणे पाळत असत. हे सगळे होत असतांना सर्व माणसांच्या आचरणासाठी अनेक प्रकारचे नियम बनत गेले. त्यातले काही नियम हुषार, विद्वान, अनुभवी वगैरे लोकांनी बनवून त्याप्रमाणे आचरण करायला इतरांना सांगितले. त्यातले जे नियम लोकांना पटले ते त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले आणि इतरांना सांगितले, पहिल्या पिढीने पुढच्या पिढीला दिले अशा प्रकारे अनेक प्रथा, रूढी, परंपरा वगैरे तयार होत गेल्या. संत, महंत, विचारवंत लोकांनी आपल्या ग्रंथांमधून चांगल्या आचरणाचा उपदेश केला, देवदेवतांच्या कथांमधून अनेक उदाहरणे मांडली गेली. चांगल्या आचरणाला सगळ्याच धर्मांनी त्यांच्या विचारसरणीमध्ये महत्वाचे स्थान दिले. "चांगले वागणा-यांना मरणानंतरसुध्दा स्वर्ग, मोक्ष वगैरेंची प्राप्ती होईल" असे आमिष आणि "दुराचरण करणार्‍या माणसांना देव शिक्षा करेल." असा धाक दाखवला गेला. अशा निरनिराळ्या मार्गांनी आचरणासंबंधीचे निरनिराळे नियम प्रचारात आले. हे मानवनिर्मित नियम अर्थातच स्थलकाळसापेक्ष असतात. निरनिराळ्या ठिकाणची माणसे त्यांच्या गरजेप्रमाणे आणि सोयीनुसार वेगवेगळे नियम करत आले आणि कालांतराने त्यात बदलही होत गेले. हे नियम धर्म, पंथ वगैरे नावांशी जोडले गेले. या नियमांचे पालन होते की नाही यावर समाजाचे लक्ष असे आणि एकादा माणूस एकादा नियम तोडतांना आढळला तर त्याला काय शिक्षा करायची हे समाजाचे नेते, धर्मगुरू किंवा राज्यकर्ते ठरवत असत. ते लोक अर्थातच इतरेजनांपेक्षा जास्त शक्तीशाली असल्यामुळेच हे काम करू शकत. नियमांचा भंग करणार्‍याचे काय करायचे हे बहुधा परंपरेनुसार किंवा ते ठरवणार्‍या बलिष्ठाच्या लहरीनुसार ठरत असे. म्हणजे अप्रत्यक्षपणे पुन्हा त्यात निसर्गाच्या नियमांचेच पालन होत असे.

लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी घरात त्यांचे पालक आणि शाळेतले शिक्षक काही नियम करतात आणि वाटल्यास त्यात बदलही करतात. कारखाने, बाजार, ऑफिसे वगैरे जिथे जिथे माणसे एकत्र येतात तिथे औपचारिक किंवा अनौपचारिक अशा आचारसंहिता असतात आणि एकमेकांना पाहून त्या पाळल्या जातात. देशामधील सर्व नागरिकांना पाळावे लागणारे नियम राज्यकर्ते 'सरकार' करते तेंव्हा त्याला 'कायदा' असे संबोधले जाते. कायद्यांचे पालन करायला लावणारी आणि ते न करणार्‍यांना शिक्षा करणारी पोलिस, न्यायाधीश, तुरुंग वगैरेंनी युक्त अशी व्यवस्था निर्माण होत गेली. इंग्रजांनी भारतात चालवलेल्या राज्यव्यवस्थेबरोबर त्यांच्या देशातली न्यायव्यवस्थाही इकडे आणली. त्यातून 'कायदा' या शब्दाला आज प्रचलित असलेला विशिष्ट अर्थ मिळाला. मुद्रणाचा प्रसार झाल्यानंतर सरकारने केलेले कायदे छापील रूपात उपलब्ध होऊ लागले. त्यापूर्वी समाजासाठी असलेले बरेचसे नीतीनियम अलिखित आणि संदिग्ध स्वरूपात असत आणि लोकांमध्ये असलेल्या आपापल्या समजुतीनुसार त्यांचे पालन होत असे. त्यात वाद किंवा दुमत झाले तर शास्त्री, पंडित, काझी, धर्मगुरू वगैरे लोक आपापल्या पोथ्या पुराणांमधून दाखले देऊन त्यावर निर्णय देत असत. धार्मिक विवादांमध्ये हे अजूनही चालते. सरकारचे कायदे करण्याचे काम देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या तत्वानुसार जनतेच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देशाच्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली. कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजांनी उभारलेली शासकीय यंत्रणाच स्वीकारली गेली आणि काम करत राहिली.

मानवांच्या समाजाने एकत्र रहावे, त्यांच्या जीवनात स्थैर्य असावे, एकमेकांशी सहकार्य करून सर्वांनी उन्नती साधावी हा मुख्य उद्देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या या सर्व डोलार्‍याच्या मुळाशी असतो. माणसामाणसांमध्ये किंवा त्यांच्या गटांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे स्पर्धा आणि संघर्ष होणार आणि त्य़ात प्रबलांची सरशी होणार हे निसर्गनियमानुसार असते, पण त्यामुळे अनागोंदी माजू नये, समाज पूर्णपणे विस्कटून जाऊ नये, त्यात स्थैर्य रहावे यासाठी समाजातल्या आततायी, स्वार्थी, दुष्ट किंवा विघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने कायदे केले जातात. समाजातल्या एका व्यक्तीने बळाच्या जोरावर फसवणूक, चोरी, खून, मारामारी यासारखे कृत्य केले तर त्यापासून इतरांना उपद्रव भोगावा लागतो, ते अगदीच स्वस्थ बसून राहणार नाहीत, आपल्या कुवतीनुसार प्रतिकार करतील. त्या पहिल्या व्यक्तीला आवरले नाही तर तशा प्रकारची कृत्ये तो करतच राहील आणि इतर काही लोकांना त्याचे अनुकरण करावेसे वाटेल. अशामुळे समाजामधील अधिकाधिक लोकांना त्रास होत राहील, ते अस्वस्थ होतील आणि त्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन समाजाचे विघटन होईल. याला शक्य तेवढा आळा घालण्यासाठी समाजामधील प्रत्येकाला बंधनकारक असे कायदे केले जातात. त्यांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो त्यासाठी शिक्षा होऊ शकते. सरकारची ताकत व्यक्तीहून जास्त असल्यामुळे हे काम सरकारी यंत्रणा करू शकते. शिक्षा होण्याच्या भीतीमुळे गुन्हे करण्यापासून बहुतेक लोक परावृत्त होण्याची शक्यता असते. या उद्देशाने अनेक कायदे केले जातात. पण देशामधले हजारो कायदे आणि त्यातली लक्षावधी कलमे सामान्य जनतेला माहीत असू शकत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांची भाषा अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ स्पष्टपणे कळत नाही. वर्तमानपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांवरून जेवढे समजेल तेवढेच आणि तेसुध्दा फक्त सुशिक्षितांना ठाऊक असते. त्यामुळे इतिहासकाळातले परंपरागत नियम असोत किंवा आताचे जाडजूड पिनल कोड असोत सामान्य जनतेला त्या निमयांची किंवा कायद्यांची माहिती असण्याच्या बाबतीत फार मोठा फरक पडलेला नाही, त्यामुळे त्यांच्या पालनालाही मर्यादा पडतात. याशिवाय हे कायदे राबवणारी सरकारची यंत्रणा किती कार्यक्षम आणि प्रामाणिक असते त्याचाही परिणाम त्यांच्या पालनावर पडत असतो.

परकीय सत्ता, राजेशाही, सरंजामशाही किंवा हुकूमशाही यासारख्या राज्यव्यवस्थेत बलिष्ठ सत्ताधीशांकडूनच दुबळ्या जनतेवर दडपशाही केली जाऊ शकते. अशा वेळी नीतीनियम आणि कायदे केलेले असले तरी ते गुंडाळून ठेवले जातात. न्याय अन्याय या शब्दांना फारसा अर्थ उरत नाही. असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. "पावसाने झोडपले किंवा राजाने मारले तर कुणाकडे दाद मागायची?" अशी एक म्हण आहे. अशा बहुतेक सर्व प्रसंगी गरीब बिचारी सामान्य जनता अगतिक असते. क्वचित काही ठिकाणी पीडित जनतेला संघटित करून त्या दडपशाहीचा प्रतिकार केला जातो आणि जुलमी राजवट उलथून पाडली जाते अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्या दुर्मिळ असतात. जेंव्हा सरकारचा कारभार अंतर्गत बेबनावामुळे ढिसाळ झालेला असतो तेंव्हा बंडखोर लोक सरकारच्या सामर्थ्यापेक्षाही अधिक बलवान होऊ शकतात आणि सत्ताधीशाला खाली खेचून त्याची जागा घेतात. पण या राज्यक्रांतीमध्ये न्यायव्यवस्था विस्कटली जाते आणि कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी पुष्कळ परिश्रम आणि वेळ लागतो. अलीकडील काळात बहुतेक सर्व पुढारलेल्या देशांमध्ये चालत असलेल्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी वर्गाकडे अमर्याद सत्ता जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी अनेक तरतुदी केल्या जातात. जनतेमधून निवडून आलेले तिचे प्रतिनिधी फक्त ठराविक कालावधीपुरतेच असतात, त्यानंतर निवडणुका होतात आणि आपले प्रतिनिधी बदलण्याची संधी जनतेकडे असते. सत्तेवर असतांनासुध्दा सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा आदि जागी विरोधकांना तोंड द्यावे लागते. न्यायालये आणि शासनयंत्रणा यांना स्वतंत्र स्थान असते. शासनाने अन्याय केल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. वृत्तपत्रे, टेलिव्हिजन यासारखी माध्यमे जनतेची गार्‍हाणी प्रभावीपणे मांडू शकतात.

या सगळ्यामुळे समाजात सगळे काही अगदी अलबेल झाले आहे असे म्हणता येणार नाही आणि तसे कधीही होण्याची शक्यता नाही, कारण हे सगळे मानवी प्रयत्न आहेत. निसर्गाचे नियम यापेक्षा जास्त बलवान आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या निसर्गाने दिलेल्या भावनांच्या प्रभावाखाली माणसे चुका किंवा गुन्हे करतात आणि करत राहणार. शिक्षेच्या भीतीपोटी त्यावर अंशतः नियंत्रण येईल, पण गुन्हेगाराला पकडणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे, त्याचा न्यायनिवाडा करणे आणि त्याला शिक्षा देणे, तसेच ती अंमलात आणणे ही सगळी कामे माणसांनीच करावयाची असल्यामुळे त्यात मानवी चुका आणि निसर्गनियमामुळे काही बाधा येतात आणि त्या येत राहणार. युगानुयुगांपासून आणि जगाच्या पाठीवरील सगळ्या समाजांमध्ये हे कमी अधिक प्रमाणात चालत आलेले आहे.

"बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी. प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो." हा निसर्गाचा नियम दिसतो. असे मी वर लिहिले आहे. आपण ज्याला न्याय- अन्याय, नीती- अनीती, कायदेशीर- बेकायदेशीर वगैरे म्हणतो त्याची निसर्गसुध्दा कधीच पर्वा करतांना दिसत नाही. वादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप, सुनामी वगैरे निसर्गाचे प्रकोप होतात तेंव्हा त्याच्या चपाट्यात जे कोणी सापडतील त्यांचा विनाश किंवा नुकसान होते. ते लोक धर्मनिष्ठ, परोपकारी, पुण्यवान, निरपराधी असोत किंवा अधर्मी, दुष्ट, दुर्जन, पातकी, अपराधी असोत, निसर्गाच्या विघातक शक्ती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्याच्या शाश्वत नियमांनुसार जे काही व्हायचे ते होते. कुणालाही चांगले फळ देतांनाही निसर्ग त्यात भेदभाव करत नाही. ज्या माणसाने झाड लावले, त्याची निगा राखली, त्याला पाणी दिले तो माळीसुध्दा त्याला लागलेल्या फळांचा मालक नसतो, ती फळे त्या झाडाच्या मालकाची असतात असे माणसांनी केलेला कायदा ठरवतो. पण कोणीही ती फळे काढू लागला तर ते झाड त्याला ती काढू देते. त्या माणसाला ते कृत्य करण्यापासून थांबवण्याची शक्ती निसर्गाने झाडांना दिलेली नाही. माणसांनी केलेल्या कायद्यांना इतर पशू, पक्षी मुळीसुध्दा जुमानत नाहीत. संधी मिळाली की ते येतात आणि त्यांना पाहिजे ते घेऊन जातात. माणसे घर बांधतात, पण किडे, मुंग्या, झुरळे, पाली इत्यादि असंख्य जीव त्यात येऊन आपलेच घर समजून राहतात. उंदीर, मांजर, माकडे या सारखे प्राणी आणि चिमण्या, कावळे, कबूतरे वगैरे पक्षी संधी मिळाली की दरवाजा किंवा खिडकीमधून घरात प्रवेश करतात आणि त्यांना मिळेल त्या अन्नपदार्थावर डल्ला मारतात. निसर्गाच्या शाश्वत अशा नियमांनुसार हे घडत असते. "कोणालाही संधी मिळाली तर त्याने तिचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही." असाही निसर्गाचा नियम असावा.

पण एक माणूस दुस-याच्या घरात शिरून तिथे असलेली वस्तू उचलून घेऊन गेला तर मात्र कायद्यानुसार ती 'चोरी' ठरते आणि त्या 'गुन्ह्या'साठी त्या चोराला 'शिक्षा' होऊ शकते. पण त्याला ती शिक्षा लगेच होत नाही. गुन्हा आणि शिक्षा यांच्या दरम्यान इतर अनेक स्टेप्स असतात. मी कायद्यांचा अभ्यास केलेला नाही, पण सामान्यज्ञान आणि कॉमनसेन्सच्या आधारे मला असे वाटते की त्या अशा असतात.
१. ज्याच्या वस्तू घरामधून नाहीशा झाल्या तो माणूस पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार करतो.
२. पोलिस अधिकार्‍याला पटल्यास त्या तक्रारीची नोंद करण्यात येते.
३. त्यावर तपास आणि संशयित अपराध्यांची चौकशी केली जाते.
४. पोलिसांना मुद्देमालासह चोर सापडला तर त्याला अटक करून त्याच्यावर खटला भरला जातो.
५. साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तीवाद कोर्टासमोर मांडले जातात.
६. आरोपीने गुन्हा केला आहे असे त्यावरून सिध्द होत आहे असे न्यायाधीशाला वाटले तर तो त्याला शिक्षा सुनावतो.
७. त्या गुन्हेगाराला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते.
८. त्या गुन्हेगाराने त्यावर वरच्या कोर्टात दाद मागितली तर वरील काही स्टेप्सची पुनरावृत्ती होते.
चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून पोलिस स्टेशनवर आणले तरीसुध्दा तो माणूस आधी 'संशयित', मग 'आरोपी' आणि अखेर 'गुन्हेगार' या अवस्थांमधून गेल्यानंतरच त्याला शिक्षा होते. गैरसमज किंवा आकस यामधून कोणाही निरपराध माणसाला नाहक शिक्षा भोगावी लागू नये या विचाराने कायद्याच्या अंमलबजावणीमधल्या या सगळ्या पाय-या निर्माण केल्या गेल्या आहेत.

एकाद्या उपाशी भुरट्या चोराने कोणाच्या घराच्या खिडकीतून हात घालून फक्त दोन केळी चोरली, तर तो सुध्दा कायद्याच्या चौकटीमध्ये 'दंडनीय अपराध' असतो. पण तो गुन्हा वर दिलेल्या सगळ्या पायर्‍यांमधून बहुधा कधीच जात नाही. केळ्यांचा मालक तेवढ्यासाठी पोलिस स्टेशनवर जायचे कष्ट सहसा घेत नाही, त्याने केलेली तक्रार नोंदवली जाण्याची शक्यता कमी असते, त्या चोराचा तपास लागण्याची शक्यता त्याहून कमी आणि त्याने केलेला अपराध साक्षीपुराव्यानिशी सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य असते. यामुळे असे कित्येक गुन्हे कायदेशीर अंमलबजावणीपर्यंत पोचतच नाहीत. चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून घरमालकाकडे आणले तरीसुध्दा बहुधा तो त्याला पोलिस स्टेशनवर घेऊन जाणार नाही, कारण पुढील सगळ्या कारवाईमध्ये त्याला आपला वेळ घालवण्याची इच्छा नसते. पण म्हणून त्या चोराला माफही केले जात नाही. त्या ठिकाणी जमलेले सगळे लोक त्या चोराला दोन चार थपडा मारून घेतात. अशा प्रकारे त्याच्या अपराधाची त्याला तडकाफडकी शिक्षा मिळते. खरे तर समाजाने केलेले हे कृत्य कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्या चोराने त्याला बदडणार्‍या लोकांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली तर त्या अपराधासाठी त्या लोकांना शिक्षा होऊ शकते, पण सहसा तसे कधी होत नाही, कारण हे कृत्य 'बेकायदेशीर' आहे हेच अनेक लोकांना माहीत नसते आणि कायदा काहीही असला तरी 'रंगेहाथ' हातात सापडलेल्या चोराला तडकाफडकी शिक्षा देण्याची पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेली ही पध्दत कोणाच्याही कॉमनसेन्सला समर्थनीय वाटते. क्वचित या प्रकारात तो चोर प्राणाला मुकला तर मात्र त्याची गंभीरपणे दखल घेतली जाते, कारण ती शिक्षा त्याच्या अपराधाच्या प्रमाणाने फारच जास्त कठोर असते. .

प्रत्यक्ष कायदेशीर व्यवहारात दोन केळ्यांच्या चोरीची दखल सहसा घेतली जात नाही हे पाहिले. केवढ्या मोठ्या चोरीचा गुन्हा कायद्याच्या वरील सात पाय-यांमधून जायला हवा? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या मते वेगवेगळे निघेल. चोरीला गेलेल्या वस्तूच्या मूल्याशिवाय त्याच्या मालकाची सांपत्तिक परिस्थिती, त्याने मुळात ती वस्तू कशा प्रकारे संपादन केली, त्याच्याजवळ त्या वस्तूच्या मालकीचा कोणता पुरावा उपलब्ध आहे, ती विवक्षित वस्तू ओळखणे कितपत शक्य आहे, कायदेशीर कारवाईसाठी वारंवार पोलिस स्टेशन आणि कोर्टांमध्ये जाण्याची त्या वस्तूच्या मालकाची किती तयारी आहे, त्याला ते शक्य आहे का वगैरे वगैरे अनंत मुद्दे त्यात उपस्थित होतात. त्यामुळे कायदे झालेले असले तरी त्यांची अंमलबजावणी प्रत्येक बाबतीत होतेच असे नाही.

जेंव्हा जेंव्हा कोठेही मोठे दरोडे पडल्याची बातमी येते, तेंव्हा त्याबरोबरच सगळ्या जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि "सरकार काय झोपा काढत आहे का? नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? असले मोठे गुन्हे घडतातच कसे?" वगैरे प्रश्न विचारले जातात. प्रत्यक्षात कायदे असे आहेत की गुन्हा घडून गेल्यानंतर आणि गुन्हेगार सापडल्यानंतरसुध्दा ती गोष्ट न्यायालयामध्ये निर्विवादपणे सिध्द करून अपराध्यांना शासन करण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असतात. मग गुन्हे घडायच्या आधीच पोलिस कोणाला आणि कशासाठी पकडणार आणि कायद्यानुसार कोणत्या पुराव्याच्या आधारे त्याला किती काळ डांबून ठेवणार? असा प्रश्न मनात येतो. पोलिसांनी सर्वसाधारण गस्त घालावी, कुठेही काही अनुचित दिसले, एकादा माणूस संशयास्पद वाटला तर त्याला हटकावे, त्याची चौकशी करावी असे प्रतिबंधक उपाय काही प्रमाणात यशस्वी ठरतात, पण संघटितपणे आणि योजनापूर्वक गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार या सगळ्याचा अभ्यास आणि विचार करून आपला कार्यभाग साधत असतील तर त्यांना आधीच अडवणे कठीण असते. चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी दुसर्‍याच्या घरात घुसला आणि त्याला प्रत्यक्षात चोरी करणे शक्य झाले नाही तरीही तो एक गुन्हा असतो, पण ते सिध्द कसे करणार? मग 'दुसर्‍याच्या हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणे' यावर कायदा करण्यात आला. दरोडा घातला गेल्यानंतर त्यामुळे मोठे नुकसान होते आणि लोकांना गंभीर इजा पोचते, प्रसंगी प्राणहानीसुध्दा होते. पण हे टाळायचे असल्यास दरोडा पडण्याच्या आधीच काही तरी करायला हवे. हत्यारबंद दरोडेखोरांनी कुठेतरी दरोडा घालण्याच्या उद्देशाने हल्ला करायचे ठरवले आहे हे आधीपासून कसे समजणार? पोलिसांच्या यंत्रणेमध्ये यासाठी गुप्तहेरांची व्यवस्था असते, त्यामधून काही वेळा त्याची खबर पोलिसांना लागते. त्यामुळे त्या वेळी ठरलेला दरोडा कदाचित टाळता येईल. पण त्या संभाव्य दरोडेखोरांना पकडले तरी त्यांच्या मनातला उद्देश न्यायालयात सिध्द कसा करणार? अशा वेळी दरोडा घालण्याचा गुन्हा त्यांच्या हातून घडला नसला तरीही त्यांना शिक्षा करता यावी यासाठी 'घातक शस्त्रे जवळ बाळगणे' हाच गुन्हा ठरवला गेला आणि त्यासाठी शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली.

कुठले शस्त्र 'घातक' समजावे याबद्दल एकमत होणार नाही. स्वयंपाकघरातल्या वरवंट्यापासून अंगणातले गवत कापायच्या कोयत्यापर्यंत अनेक अवजारांनीसुध्दा प्राणघातक हल्ला करता येतो, पण त्या घरातल्या आवश्यक वस्तू आहेत. त्या घरात ठेवायला प्रतिबंध करता येणार नाही. यामुळे यासंबंधी कायदा करतांना कशाला 'शस्त्र' म्हणावे, कुठले शस्त्र किती प्रमाणात 'घातक' आहे वगैरे ठरवून ते बाळगणा-याला कोणती शिक्षा करावी याचा सविस्तर विचार केला गेला. काही निरपराध आणि सज्जन लोकांना 'स्वसंरक्षणा'साठी हत्यार जवळ बाळगण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे काही अटींवर त्यासाठी सरकारकडून परवाना मिळण्याची व्यवस्थाही केली गेली. हे सगळे सर्वसामान्य माणसांना तपशीलवार माहीत नसल्यामुळे याबद्दल त्याच्या मनात संदिग्धता असते. एकाद्या माणसाने दसर्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारले किंवा जखमी केले या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होणे कॉमनसेन्सला पटते, किंबहुना असे व्हायलाच हवे, असे झाले तरच गुन्हेगारांना जरब बसण्याची शक्यता आहे याबद्दल त्याच्या मनात शंका नसते, पण एकाद्याच्या घरात फक्त एक विना परवाना शस्त्र सापडले किंवा त्याच्या घरात असे शस्त्र ठेवलेले होते याचा पुरावा मिळाला, एवढ्या कारणावरून त्याला जबर शिक्षा होणे याबद्दल कॉमनसेन्सला तसे ठामपणे वाटत नाही. त्यातून तो माणूस सराईत गुन्हेगार असला, त्याने यापूर्वी शस्त्र चालवले असले, अशा गुन्ह्यासाठी त्याला आधी शिक्षा मिळाली असली किंवा त्याने इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा त्याच्यावर आरोप असला पण पुराव्याअभावी त्याला संशयाचा फायदा मिळून तो त्यातून सुटला असला तर अशा माणसाला घातक शस्त्रे जवळ बाळगण्याचा काही अधिकार नाही, त्याला शिक्षा व्हायलाच हवी असे कोणीही म्हणेल, पण तसे स्पष्ट चित्र दिसत नसेल तर सर्वसामान्य माणूस त्यावर वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी उदाहरणादाखल फक्त चोरीसंबंधी लिहिले आहे. हीच गोष्ट इतर असंख्य बाबतीत लागू पडते. निरनिराळ्या बाबतीतले कायदे नेमके काय आहेत? त्यात कोणत्या तरतुदी आहेत? कोणत्या पळवाटा आहेत? यावर विरुध्द पक्षाचे वकीलच परस्परविरोधी विधाने करतांना दिसतात. याचा अर्थ इतकी मेहनत घेऊन केलेल्या कायद्यांचे वेगळे अर्थ निघणे शक्य असते. सर्वसामान्य माणसाला ते त्याच्या आवाक्याबाहेर वाटते. पण प्रत्येक माणसाला जो कॉमनसेन्स असतो त्यावरून कुठल्याही बाबतीत ते 'चांगले की वाईट?', 'खरे की खोटे?', 'बरोबर की चूक?' याबद्दल त्याला आतून काहीतरी वाटत असते. त्याची ही मते अनेक बाबतीत ठाम नसतात, ती बदलत असतात. असे अस तरी आपण वेळोवेळी कसे वागायचे हे तो त्यानुसारच ठरवू शकतो.

अगदी प्राथमिक पातळीवर म्हणजे घनदाट अरण्यात टारझनसारखा राहणारा कोणी मानव अजून शिल्लक असला, तर इतर प्राण्यांप्रमाणेच तो माणूसही निसर्गाच्या नियमांनुसार वागू पाहतो, नैसर्गिक रीत्या त्याच्या मनात काही इच्छा निर्माण होत असतात, पण बहुतेक लोक सामाजिक परिस्थिती, संस्कृती आणि संस्कार यांच्या प्रभावामुळे कृती करण्यापूर्वी नैतिकता, रूढी, परंपरा आणि कायदा यांचा थोडा विचार करतात, पण त्यांचे पूर्ण किंवा सखोल ज्ञान त्यांना असत नाही. मनातल्या इच्छा पूर्ण करण्यात त्या सर्वांनुसार त्यांना काही गैर वाटत नसेल तर उत्तम, पण ते चुकीचे किंवा धोकादायक वाटले तर मनावर संयम पाळणे आवश्यक असते. ते करत असतांना त्यांचा कॉन्शन्स आणि कॉमनसेन्स यांचाच आधार त्यांना घ्यावा लागतो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

अत्यंत ओघवत्या आणि सहज शैलीत कठीण विषयाचे पदर उलगडलेले आहेत. आनंद घारेंकडून अर्थातच ही अपेक्षा असते, आणि नेहमीच पूर्ण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छिद्रान्वेश टाळून एकूणात प्रकट चिंतन आवडले असे म्हणतो Smile

माणसे घर बांधतात, पण किडे, मुंग्या, झुरळे, पाली इत्यादि असंख्य जीव त्यात येऊन आपलेच घर समजून राहतात.

वगैरे वाचताना अगदी दासबोध आठवत होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रकटन आवडले.
(छिद्रान्वेषणाकरिता हात शिवशिवत होते, पण ते काबूत राखले आहेत.)
ढोबळमानाने विचारप्रवाह पटण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्क्रांतीपासून सामाजिक वर्तन असा प्रवास आवडला. सोप्या शब्दांमुळे किंचित जास्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.