कवितास्पर्धेचा निकाल
गेल्या महिन्यात मी इथे जो एक कवितास्पर्धेचा प्रस्ताव मांडला होता, त्याचा हा निकाल. हा पूर्वीच जाहीर करायला हवा होता, पण कार्यबाहुल्यामुळे उशीर झाला याबद्दल क्षमस्व. स्पर्धेचे नियम थोडक्यात असे होते की नेमून दिलेल्या आठपैकी कोणतेतरी चार(च) शब्द कवितेत यायला हवेत, आणि कविता निकृष्ट असायला हवी.
एकूण आठ स्पर्धकांनी नऊ कविता पाठवल्या, त्यातल्या एकीमध्ये तसे चार शब्द आलेले नाहीत. बाकीच्या आठ कवितांत मिळून आलेल्या बत्तीस शब्दांची वाटणी अशी आहे:
अनामिक आणि पाऊलखुणा (प्रत्येकी ३ वेळा), हलकेच आणि कवडसे (प्रत्येकी २ वेळा)
'हुरहूर' बऱ्याचदा आल्याचं मला विशेष आश्चर्य वाटलं नाही, पण 'एकाकी' ची इतकी ओढ वाटावी हे माझ्या मते आपल्या सामुदायिक इंटरनेटीय अस्तित्वावर विदारक भाष्य आहे. 'ऐअ' च्या सदस्यांनी अंतर्मुख व्हावं असं मी त्यांना इथे नम्रपणे आवाहन करतो.
शीर्षक : कातरवेळी पाऊलखुणा
अलगद पसरे गाढ धुके -
धुक्यामध्ये झालो एकाकी
किती अनामिक आठवणींचे
तरी उसासे उरले बाकी
कुंद हवेच्या दुलईमध्ये
मनात भरली आशा भोळी
पुसटपुसट पाऊलखुणाही
दिसत राहिल्या कातरवेळी
प्रयत्न छानच आहे, पण धुकं दोनदा येणं हा लहानसा दोष राहून गेलेला आहे. कमीतकमी सायनाईड वापरून खून पाडता यायला हवा, तशीच कमीतकमी धुकं वापरून कविता निकृष्ट करता यायला हवी.
कधी वाटतं..
कातरवेळी रडून पहावं
हुरहूर लागून काळीज फुटावं
कधी वाटतं..
झाशीची राणी बनावं
देशद्रोह्यांना ठेचून काढावं
कधी वाटतं..
झाडाखाली कवडसे मोजावे
हरवलेले बालपण परत मिळवावे
कधी वाटतं..
एकाकी जीवन तसंच रहावं
ध्यान लावून जग विसरावं
नाहीच जर काही जमलं
तर लेखणीच हाती घ्यावी
गुंडापुंडांवर चालवून
माघारी फिरावं.
'कधी वाटतं…' या गिळगिळीत झालेल्या पालुपदामुळे कवितेला फार छान निकृष्टपणा आला आहे. एक छोटासा दोष असा की शेवटचं कडवं वाचकाला विचार करायला लावतं. (लेखणी चालवून माघारी फिरावं ते का? ती चालवण्यातली व्यर्थता उमगल्यामुळे की स्वत:ची कातडी बचावण्यासाठी?) या काहीशा ओरिजिनल थॉटमुळे निकृष्टतेत घट होऊन कवितेचा नंबर खाली गेलेला आहे.
शीर्षक : वसंताचं चांदणं
वसंताचं चांदणं आभाळात पसरलंय
इवल्या-इवल्या कवडशांपरी आहे ते भरपूर
वेड्या मनाला हलकेच साद ते घालतंय
त्याच्या धुंद गंधाने वाढली आहे हुरहूर
विलक्षण निकृष्ट! कविता वाचल्याक्षणीच पुन्हा ती कधीही वाचू नये अशी मानसिक नव्हे तर ऐंद्रिय भावना होते. फळ्यावर नख ओढल्याचा श्राव्य परिणाम कवीने अगदी हुबेहूब पकडला आहे.
स्पर्धेसाठी ज्या कविता आल्या त्या, to use a much maligned phrase, साडेतीन टक्क्यांच्या अभिरुचीने बुजबुजलेल्या होत्या. तेंव्हा स्पर्धेचेच नियम पाळून काहीशा वेगळ्या पद्धतीच्या निकृष्ट कविता करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुढच्या दोन कवितांत मिळून प्रत्येक ओळीत एक या हिशेबाने आठही शब्द मी वापरून टाकलेले आहेत.
चांडाळांनो, वधस्तंभाकडे जाणाऱ्या माझ्या पाऊलखुणा पुसू नका!
आणि हलकेच आवळा माझ्या गळ्याभोवती फाशीचा दोर तो क्रूर
माझ्या एकाकी मरणा! मनमुराद पिटून घे तू आज भारतमातेचा डंका
या आसेतुहिमाचल भूमीला सोडून जायचं, हीच आता वाटते ग बाई मला हुरहूर
जवा डोंगराआड जात्यात बामनी आर्घ्य पिऊन माजलेल्या सुरव्याचे कवडसे
तवा मेलेल्या ढोराच्या कातडीवानी पसरते कातरवेळ म्हारवाड्यावर
हातभट्टीच्या धुंदीत हाताळतो माह्या बाप इस्कोटल्या जीवनाचे फासे
आन खोपटातल्या मायला अनावर होतो अनामिक दु:खाचा गहिवर
❄ ❄
प्रतिक्रिया
निकृष्ट असल्याने कळल्या
बादवे उत्तेजनार्थ वाली निकृष्ट वाटली नाही...
शब्दांचा फोरियर अनालिसिस रोचक
शब्दांचा फोरियर अनालिसिस रोचक आहे; पण नऊ कवितांमधून फार विदा मिळत नाही. तसंही हे शब्द मुळात दिले गेलेले होते. त्यामुळे यातून मिळालेले निष्कर्ष घेऊन किती अंतर्मुख व्हावं याचा थोडा विचारच करावा लागेल.
तरयकल-सारखे निकृष्ट मराठी साहित्यात वारंवार येणारे शब्द शोधता येतील काय?
धनंजयची एक कविता माझ्या कवितेपेक्षा अधिक निकृष्ट आणि एक कमी निकृष्ट निघाल्यामुळे धनंजय (आणि जयदीप) यांच्यावर डूख धरावा का नाही याचा थोडं अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. पण तरीही दुसरा क्रमांक मिळण्याचं श्रेय माझं नसून मूळ कवीचंच आहे. ही प्रेरणा. शेवटच्या कडव्यापर्यंत बहुदा थोडा जास्त वेळ गेला आणि घिसडघाई आणि पर्यायाने निकृष्टता कमी झाली असावी. घिसडघाईची टिप देण्याबद्दल धनंजयचे आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरारारारा
अरारारारा
![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
लैच खंग्री आहे
![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमची पहिली कविता तशी ठीक
तुमची पहिली कविता तशी ठीक आहे. साधारण तशाच प्रकारातली, (उद्वेग, शिव्यांचा वापर इ.) ही एक कविता पहा. तुमच्या कवितेत चांडाळ असा जातीवाचक उल्लेख आलेला आहे. तशीही ही जात उतरंडीत खालचीच मानली गेलेली आहे. उलट या कवितेत उच्च मूल्य मानल्या गेलेल्या लोकशाहीला शिव्या घातलेल्या आहेत. सबब, तुमची पहिली कविता फार काही आवडली नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान! बाकिच्या कविताही
छान!![ROFL](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
बाकिच्या कविताही वाचायला मिळाव्यात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काही टिप्पणी
यात मला तरी काही आश्चर्य वाटलेलं नाही. हुरहूर आणि एकाकीपणा चौपाटीवरच्या नारळांच्या झाडाखाली बसणाऱ्या प्रेमी जिवांप्रमाणे हातात हात किंवा मिठीत मिठी घालून एकत्रच दिसतात. 'जीवनाच्या गर्दीत राहूनही मी एकटाच आहे' असं त्याच गर्दीला पांगापांग व्हायच्या आधी बोंबलून सांगणारे कवी काहीही म्हणोत, पण एकटेपण हा आजच्या पोस्टमॉडर्नी आधुनिकोत्तर जीवनात फारच थोड्या वेळा दिसून येतो. बायकापोरांच्या गोतावळ्यात रमून जाणारा मध्यमवर्गीय तो गोतावळा आसपास असताना हुरहुरीचा कधी शिकार होत नाही. ऑफिसातल्या सख्यासोबत्यांना कितीही शिव्या दिल्या, कामाच्या ओझ्याबद्दल कितीही 'आत्माविष्काराच्या आड येणारं कर्तव्याचं जू' वगैरे नावं ठेवली किंवा जगड्व्याळ यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेच्या यंत्रणेतला एक कॉग होऊन तेच तेच स्क्रूज घट्ट करणारा सिटीलाइटी चार्ली चॅप्लिन ते काम करत असताना कधी हुरहुरीने ग्रासला जात नाही. किंवा भांडवलदारी मूल्यांचा उद्रेक करत सर्वच आनंदांचं वस्तुकरण करणाऱ्या बाजारपेठेत पिशवी घेऊन गेलेला नवरा, ते बाजारकाम चालू असताना अचानक हुरहुरीचा अॅटॅक येऊन पडला आहे अशीही परिस्थिती आपल्याला कधी दिसत नाही. या सगळ्या जीवनावश्यक त्रासातून मुक्ती मिळाली, टीव्हीवरची आयपीएलची मॅच बघून झाली की मग जेव्हा मनुष्य एकटा असतो तेव्हाच कळपापासून दूर पडलेल्या एखाद्या हरणाच्या कोवळ्या बछड्यावर लांडग्याने झडप घालावी तशी हुरहूर मनावर झेप घेते आणि शांतपणे लचके तोडायला सुरूवात करते. हीच गोष्ट सामुदायिक इंटरनेटिय अस्तित्वाबद्दल - माणूस कॉंप्युटर स्क्रीनसमोर जितका एकटा असतो तितका कदाचित संडासातदेखील नसेल. व्हर्च्युअल सोबतीइतका एकांतवास मनुष्याला कुठेच मिळत नाही. मग हुरहुरी भरली तर नवल ते काय?
.....
धनंजयच्या कवितेत मूळ चार शब्दांपलिकडे निकृष्ट कवितेचे आधारस्तंभ असलेले चांदणं, कवडसे, इवले-इवले, वेडं मन, साद असे शब्दही ठासून भरलेले असल्याने पहिल्या क्रमांकासाठी ती निवड योग्यच ठरते.
.....
साडेतीन टक्क्यांची अभिरुची ही निकृष्टतेबरोबर का निगडित आहे? या प्रश्नाच्या विचारातून निश्चितच काहीतरी सामाजिक सत्य गवसू शकेल. कदाचित असं असेल की साडेतीनटक्की शब्द हे इतक्या वर्षांच्या वापरामुळे घिसेपिटे झालेले आहेत - आणि धातू काढून घेण्यासाठी कडा घासलेल्या आणि हाताळून गुळगुळीत होऊन मूळ किंमत दिसेनाशी झाल्यामुळे नाणं हलकं व कमी मूल्याचं होतं तसं काहीसं असेल. किंवा कदाचित असं असेल की बहुतेक कवितांत साडेतीनटक्की शब्द असतात आणि बहुतेक कविता निकृष्ट असतात म्हणून साडेतीनटक्की शब्द असतात म्हणून ती सांगड घातली गेली असेल. ('बहुतेक सॉक्रेटिस मानव असतात आणि बहुतेक मानव मर्त्य असतात तेव्हा सॉक्रेटिस मर्त्य असावा बहुतेक' या सर्व लॉजिकच्या पुस्तकांमधल्या पहिल्या धड्यातल्या पहिल्या पानावर दिलेल्या सुप्रसिद्ध उदाहरणानुसार)
< मॅच बघून झाली की मग जेव्हा
< मॅच बघून झाली की मग जेव्हा मनुष्य एकटा असतो तेव्हाच कळपापासून दूर पडलेल्या एखाद्या हरणाच्या कोवळ्या बछड्यावर लांडग्याने झडप घालावी तशी हुरहूर मनावर झेप घेते आणि शांतपणे लचके तोडायला सुरूवात करते. >
इतर एंट्रीज
स्पर्धेतल्या इतर एंट्रीज पुढे दिल्या आहेत. प्रत्येकच कवितेला शीर्षक आहे असं नाही, पण असेल तर नमूद केलेलं आहे.
त्या तिथे पर्वतरांगांपलिकडे,
तुझ्या ओठी बहरलेले ताटवे
अन् तुझ्या डोळ्यांत कोवळ्या उन्हाचे कवडसे.
फुलपाखरांमागे धावणारी मुले,
फांद्यांवरून ओथंबणारी फुले
अन् तुझ्या कानी त्यांचे गोड आवाज.
बस्स्..प्रिये विसर त्या वसंताच्या पाऊलखुणा
अन् ओलांड त्या पर्वतरांगा,
सांडू देत तुझ्या अंगाखांद्यांवरून हे ओलसर हिमकण,
गोठवू देत तुझ्या नसानसांना शिशिराचा थंड वारा.
मग गुंफू आपले थिजलेले हात,
एकमेकांच्या कोरड्या हातात..
अन् ऊपसून काढू तो समोरचा अतिभव्य हिमनग.
तेंव्हाच रुजव तुझी वसंताची दिवास्वप्ने,
माझ्या बर्फाच्या शेतात!
(टीप: कविता इंटरेस्टिंग आहेच, पण आठातले चार शब्द आलेले नाहीत. - ज. चि.)
❊
२. कवी : नगरीनिरंजन
काल रात्री पाऊस पडला
आणि सगळं ओलं ओलं झालं पुन्हा
रात्रीचा धुंद आसमंत आठवत सकाळी
मी कुंदपणे बसून राहिलो बिछान्यात
दिवसभर धावत्या वार्याने फुंकर घालून
हलकेच फडकवली चादरीसारखी झाडे
सूर्याच्या कर्तव्यकठोर नजरेने
वाळवून टाकली सगळी ओलेती पालवी
सूर्य आता बुडलाय मावळतीला
आणि वारा दमल्यासारखा वाहतोय
काजळणार्या या कातरवेळी
तुझ्या आठवणींची दाटलीय हूरहूर
आज रात्री पुन्हा पाऊस पडणार
आणि सगळं ओलं ओलं होणार
❊
३. कवी: पुष्कर जोशी
तू होतीस धुंद,
कातरवेळ होती कुंद,
एकाकी असताना काय करायचे ?
तुझ्या पाऊलखुणा हुंगत हुंगत,
श्वासात फुलला जणु केवडा.
एवढे यश आम्हाला रग्गड !
❊
४. कवी: तिरशिंगराव
नदीतीरावर कातरवेळी
एक अनामिक लागे हुरहूर
त्यांतच टिटवी जागे करते
आठवणींचे भग्न खंडहर|
दुरून दिसते ओली हिरवळ
असते शेवाळ्याचे मृगजळ
एकाकी या त्रस्त जीवाला
मनीं सारखी एकच तळमळ |
नदी कधीची खुणवत होती
जलमय होण्या विनवत होती
भयकंपित मी, हरता तो क्षण
उदास जगतो, उगाच ते पण||
❊
५. कवी: ऋषिकेश
धुंद आम्ही दोघे
कुंद ही हवा
छंद हा असा
वेड लावे जीवा
एकाकी नसताना
दुचाकी वरती
तीचीच प्रीती
बिलगायची पाठी
पाऊलखूणा त्या उमटता
मनावरती चरा
उमटतो जरा
आठवांचा
हुरहुर ती उरते
कुंद हवेतील दुचाकी वरती खोल खोल चरा देत!
❊
६. कवी: खद्योत शाकल्य
शीर्षक: समांतर-तत्त्व!!
छंद: उन्मुक्त
धुंद अशा पहाटवेळी साखरझोप मोडणारी ही सु-सु,
बाहेर पडायच्या वेळी सुरु होणारा पाऊस किंवा स्नो-च्या फ्लरीज्!
केबिन लॉक करताना कॉपीरायटरला येणारं अर्जंट जाहिरातीचं ब्रीफ..
आवडत्या मुलीची आणि आपली जुळून येणारी सगोत्रता..!
यांच्यात दिसून येतं एक तत्त्व, समांतरत्व..!!
पावसाला जायची घाई असलेली चेरापुंजी आणि
पोटाच्या हलक्या स्वप्नांचे एकमात्र लक्ष्य असलेले डेस्टीनेशन अर्थात् संडास!
लग्नाळू मुलाला एकामागून एक मुली बघायला लावणारं लग्न
आणि साडे-पाच वाजता घाईत धावत पकडायचा, ठरलेला लोकलचा डबा!
यांच्यातही दिसून येते तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व..!!
अनामिक हुरहुरीने अस्वस्थ होणारं मन आणि
विदाउट तिकीटवाल्यांना टीसी दिसल्यावर येणारी अस्वस्थता!
गर्दीत ढूसकुली सोडणारे आपणच आहोत हे कुणाला कळू म्हणून भांबावून जाणारं मन,
आपल्या फेसबुक-पोस्टला 'तिचा' लाईक येईपर्यंत नव्या फेसबुकीला येणारं फिलिंग!
यातही असतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!!
म्हणून आयुष्य हे कायमच समांतर जात असतं..डोक्यावरून जाणाऱ्या एका नवकवितेसारखं..!
आणि आपल्याला ते झक मारत जगावं लागतं एकाकीss !
शून्य सेनेचा सेनापती असलेल्या अश्वत्थाम्यासारखं.
इन-मिन् तीन टाळक्यांनी येऊन वाहव्वा केलेल्या नव्या रंगभूमीच्या genreसारखं
अथवा कुणीही भाव न देणाऱ्या नवकवितेच्या जनकासारखं
कारण अश्वत्थामा असो किंवा तो नवकवितेचा जनक असो..
त्यांच्यातही दिसून येतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
उत्तजेनार्थ कवितेचे विश्लेषण
उत्तेजनार्थ नोंद झालेल्या "कातरवेळी पाऊलखुणा" कवितेचे काही विश्लेषण करण्यालायक आहे.
अस्मिता म्हणतात :
> बादवे उत्तेजनार्थ वाली निकृष्ट वाटली नाही.
त्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. मी खुद्द ही कविता दुसर्यांदा वाचली, तेव्हा "बरी आहे, कदाचित काही नवे सांगतसुद्धा असेल" असे मलाच वाटले.. पुन्हा नीट वाच्ली, तेव्हा तिचे भकास कल्पनादारिद्र्य पुन्हा लक्षात आले. भराभर वाचनात "कविता बरी असेल" असे का बरे जाणवावे? याचे एक कारण खचितच वृत्तबद्धता होय. कवितेमध्ये गेयता/तालबद्धता असली, तर अर्थ बाजूला ठेवूनही काहीतरी छान असल्याचे जाणवते. या चांगल्या अनुभूतीचे थोडेतरी श्रेय आपण शब्दार्थाला देऊ लागतो. एकतर आपल्याला जाणवते, की कवीने वृत्त जमवण्यापुरते तरी शब्दांकडे लक्ष दिले असावे. म्हणून आपण मुद्दामून खोल अर्थ शोधू लागतो. उदाहरणार्थ दुसर्यांदा मी कविता वाचली, तर "पुसटपुसट पाऊलखुणाही \ दिसत राहिल्या कातरवेळी" या ओळींमध्ये कदाचित काहीतरी नाविन्यपूर्ण अन्वय असल्याचा भास झाला. म्हणजे "विसरू घातलेले कातरवेळी पुन्हा स्मरणे" - हे तर वर्ड्सवर्थच्या "emotion recollected in tranquility" कल्पनेचे नवीन आणि कल्पक रूप आहे काय?
अर्थात तिसर्या वाचनात रूपकांचा गुळगुळीतपणा, भावनांमध्ये काहीही नवीन नसून केवळ नक्कल, "भोळी आशा" येथे विशेषण गहिरे नसून अप्रस्तुत असल्याचे जाणवणे... हे सगळे होते.
मी अनेकदा लोकांना सांगितलेले आहे - सुमार आणि सामान्य सौंदर्यदृष्टीच्या कवीने वृत्तबद्ध कविता लिहिणेच श्रेयस्कर. रसिक स्वतःहून त्या कवितेत थोडे जोडेल.
(असेच एक बुंदीपाडू संस्कृत स्तोत्र लिहिण्याबाबत माझा हा लेख : "झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)")
पहिल्या कवितेत निकृष्टतेमध्ये येणारी खोट जाणवली, तेव्हा मी दुसरी कविता बनवली. पण मुक्तछंदाचा भास व्हायला नको. म्हणून वृत्त असल्याचे वाटावे असे काहीतरी "वसंताचं चांदणं" कवितेमध्ये आहे. पण ते जे काय आहे, ते वेडेवाकडे आहे, त्याची लक्तरे त्रासदायक आहेत. ओळींच्या अंती यमके आहेत. पण ती भिकार आहेत. वगैरे.
मी अनेकदा लोकांना सांगितलेले
काही अंशी सहमत आहे. वृत्तबद्ध कविता असेल, तर फॉर्मकडे लक्ष जाऊन आशयाकडे दुर्लक्ष होण्याचा संभव जास्त, सबब स्किन-सेव्हिंगला मदत होते. पण मग दुर्बोध प्रतीके वापरून जाणूनबुजून ऑबफस्केट करणेही त्याच कॅटॅगिरीत मोडते असे मला वाटते. आशयाकडे दुर्लक्ष होण्याचा चान्स तशा रचनेतही असेलच, नाही का?
बाकी वृत्तबद्ध लिहिण्यात टेक्निकल मास्टरीही लागते. जुन्या कवींची कविता वाचून त्या त्या वृत्तात बसणारी व्होकॅब कशी असते/असावी याचा एक अंदाज येऊ लागतो आणि श्लोक पाडणे सोपे जाते. पण पुढचा टप्पा फार फार कठीण आहे हेच खरं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विलक्षण निकृष्ट! कविता
विलक्षण निकृष्ट! कविता वाचल्याक्षणीच पुन्हा ती कधीही वाचू नये अशी मानसिक नव्हे तर ऐंद्रिय भावना होते. फळ्यावर नख ओढल्याचा श्राव्य परिणाम कवीने अगदी हुबेहूब पकडला आहे.
परखड रसग्रहणाचा कडेलोट झालेला आहे . :O
बाकी कविता उत्कृष्ट असो की निकृष्ट ते वाचण्याचे कष्ट कोण करेल प्रभो ???
विजेत्यांचे अभिनंदन करावे की नाही?
निकालावर काही भाष्य करत नाही. आम्हाला उत्कृष्ट कविता करता येत नाहीत हे माहित होते पण निकृष्टही जमत नाहीत हे कळल्याने दु:खाचा कडेलोट झाला आहे.
वृत्तच काय यमकही कसोशीने न पाळता, कल्पनेत नाविन्य नको म्हणून दुसर्या एका संस्थळावरच्या एका लाडक्या कवीची रात्रीच्या पावसाची कल्पना ढापून कविता लिहीली तरी आम्ही सर्वनिकृष्ट न ठरल्याने शेवटी आम्ही "मिड्योकर मध्यमवर्गीय" ठरलो आणि तेच सगळ्यात निकृष्ट अशी स्वतःची समजूत घालून समाधान करून घेतले आहे.
हेच म्हणतो.
आपण कल्पना ढापलीत.
आम्ही तर निकृष्टशिरोमणी ठरण्यासाठी एक ओळ फेमस कवितेतून ढापली पण होती.पण असो.
+२ हेच कळत नाहिये. हमारी
+२ हेच कळत नाहिये.
हमारी कविता उनके कवितासे कम निकृष्ट कैसे? असा सवाल पडला.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सोप्पंय!!
ढापाढापी करून फिल्मफेअर मिळत असताना, ढापाढापी करून निकृष्ट होण्याच्या 'नाईव्ह' पण 'इन्ट्रीन्सीकली' उत्कृष्ट हेतूला निकृष्ट जर ठरवले असते तर परिक्षकांच्या उत्कृष्ट स्वभाला निकृष्टतेचे बोल लागले नसते का?
-Nile
व्यनी करताना धमकी दिली होतीत
व्यनी करताना धमकी दिली होतीत का? पुढच्या वेळेस ते करून पहा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गणित शिकवणार्या लोकांसमोर
गणित शिकवणार्या लोकांसमोर आयुष्यात कधी आमची तोंड उघडायची टाप नाही झाली; धमकी कुठुन देणार?
:ड
आमचा एक वाघमारे आडनावाचा मित्र आहे. आपले सतीश वाघमारे नाहीत. हा मित्र बराच सिनीयर आहे. मी शाळेत असताना आम्ही सूर्यग्रहण बघायला ज्या गटाबरोबर गेलो होतो, त्याचा म्होरक्या हा रवी वाघमारे होता. साधारण दीडशे-दोनशे मेंढरं हाकण्याचं काम तेव्हा त्याच्याकडे दिलं होतं.
आम्ही ट्रेनने मुंबईहून आग्र्याला गेलो. रस्त्यात कुठेतरी ट्रेन मधेच उभी राहिली. नेहेमीप्रमाणे बरेच लोक थोड्यावेळात उतरून खाली येऊन बघायला लागले. रवीदादा सगळ्या मेंढरांना आत हाकलत होता. तेव्हा आमच्यापैकी एक मेंढरू म्हणालं, "अरे तो रवी भले वाघ मारत असेल, पण आपण थोडीच वाघ आहोत!"
तात्पर्य: भले गणित शिकवत असतील हो हे होऊ पहाणारे गुर्जी, पण शाम, आपल्याला गणित शिकायचंच नाही तोपर्यंत आपण कशाला घाबरायचं!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ठीं
सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा किस्सा रोचक वाटला. (रवी/सूर्य, तत्सम म्हणी इ.)
>>> पण शाम, आपल्याला गणित शिकायचंच नाही तोपर्यंत आपण कशाला घाबरायचं!![Wink](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif)
शामला पूर्ण पाठींबा
पहिल्या पावसाने उलून आलेली
पहिल्या पावसाने उलून आलेली एकतरी कविता या धाग्यात असावी म्हणून फक्त डॉक्यूमेंटेशनखातरः
पहिल्या पावसात पाऊस नसतो
असं मी कुठेशिक ऐकलं
बहुदा आंतरजालावर...
अथवा कोणा उलून आलेल्या
हृदयात...
पण ऐकले खरे...
एवढा तरी विश्वासजालीय कवी माझ्यावर ठेवेल?
एवढा काडीघालूपणा आहे माझ्यात!
पावसात पाऊसच नसणे
हे जमेल कधी कोणा ढगाला?
पण जमले खरे वळवाला
जालावर कविताच आहेत कि साक्षीला!
तेंव्हा कवींनो...
रहा सज्ज भिजायला
'पडेल' पाऊस
ज्यात पाऊसच नाही...!
पाऊस होता जिथे
त्या भिंती
ते अपडेट्स ते धागे
त्या समस्या विरघळुन गेल्या कधीच
उरले शब्द उथळ
अशा हृदयासारखे
जे उलले नव्हतेच कधी खरे!
पहिल्या पावसात पाऊस नाही
असणार कसा
जेव्हा काव्यात असते
उललेल्या
हृदयाची साद...
(शुद्धलेखनाच्या चुका मूळ कवीच्या नावावर खपवते आहे. मूळ कविता, कवीच्या नावासकट मागणीनुसार उपलब्ध करून दिली जाईल.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
का?
का?
ही कविता मला आधी कशी सुचली नाही, हाय.
तेव्हाच स्पर्धेत टाकली असती. :-
थबथबून येता भावना
सायंकाळी दाटे प्रीत हृदया
अळणी अळणी पाणी
साठले डोळ्यात अशी ही प्रेमकरणी
मज आठवे नमप्रसवा
जाई जुईचा वारा
तो रम्य ढग किनारी वसता
प्रसन्न वाटे शरीरा
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars