धाव्वीची परिक्षा
त्याकाळी उदगीरला किमान मध्यमवर्गीयांमधे धाव्वीच्या परिक्षेचे महत्त्व लग्न, मुंज, मूल होणे आणि निर्वाण यांच्यापेक्षा जास्त नसले तरी कमी तरी नव्हते. मुल दहावीला असणे आणि नसणे यामुळे गृहजीवनावर फार व्यापक परिणाम पडे. मनोरंजनाचे स्रोत आणि कर्मे, इतर कुटुंबीयांची देखिल, पूर्णतः बाजूला ठेवली जायची. सातवीच्या मुलाने टीव्ही पाहायचा नाही, कारण दहावीतला मुलगा डिस्टर्ब होईल. तेव्हा माझी नववीची परीक्षा झाली होती आणि त्या महत्त्वाच्या दिव्यासाठी मनाची तयारी करत होतो. तसा प्राथमिक निरीक्षणानंतर मी कोणालाही गैरादी मुलगा वाटायचो, पण वर्गातच काय, शाळेतही सतत पहिला असल्याने दहावीत माझ्याकडून शाळेच्या अपेक्षा फार असणार होत्या. शेतात जाणे हा माझा अगदी आवडता कार्यक्रम. शाळांच्या दिवशी मी दिवसाआड शेतात जाई नि सुट्टीच्या प्रत्येक दिवशी जाई हे वेगळे सांगायला नको. आमचं सगळं शेजार शेतकरी होतं. माझी अनुपस्थिती शाळा चालवून घेत असे, नाही घेतली तर मी शाळाच बंद पाडत असे. शाळेचं नि माझं तुझं माझं जमंना, तुझ्यावाचून करमेना असं काहीसं नातं होतं. नववीच्या परिक्षांतर लगेच मुलांनी शिकवण्या लावल्या, मी मात्र ठाम नकार दिला. अशात आमचे जीवशास्त्राचे शिक्षक निरकले सर, त्यांचा गोरागोमटा मुलगा, माझ्याच वर्गातला अशोक माझ्या घरी आला नि म्हणाला कि संध्याकाळी वडिलांनी तुला बोलावलं आहे. निरकले सरांचं माझ्यावर फार प्रेम होतं आणि त्यांच्या मुलाने चांगले मार्क मिळवण्याचा माझा आदर्श पाळावा अशी त्यांची मनोमन इच्छा असे.
सोमनाथपूरच्या मंदीराच्या बाजूला, मुख्य गावापासून १-२ किमी अंतरावर त्यांचं टुमदार घर होतं. निरकले सर दारू पीत. माणसाचं प्रत्येक वयात एक फॅड असतं. तसं अतिवाचन केल्यामुळे माझी त्या काळात चिकार फॅड्स होती. त्यापैकी सर्वात मोठं होतं नैतिकतेचं. दारू पिणे अनैतिक आहे तेव्हा त्यांनी ती पिऊ नये, किंवा माझ्यासमोर पिऊ नये, किंवा पिली तर थोडीसं शल्य, अपराधीपणा बाळगून प्यावी असं मी त्यांना आग्रहाने सांगे. मी पोहोचलो तेव्हा त्यांनी बागेत, उंच उंच झाडांखाली, तळीव चकण्याच्या वासात आमच्याच अजून एक शिक्षकासोबत मैफिल टाकली होती. सात-आठ वाजले असावेत.
"सर, तुम्ही मला बोलावलंत?"
"हो. तुझ्याकडे एक काम होतं."
काम सांगेपर्यंत त्यांनी जो मोकळा श्वास घेतला तेव्हढ्या वेळात मी ती मैफिल पोलिसी नजरेने बघून घेतली.
"तुला ह्व्या तितक्या अपराधीपणापेक्षा थोडा जास्तच बाळगून मी हे करत आहे." स्पष्टपणे माझे नैतिकतेचे लेक्चर त्यांना टाळायचे होते.
"अगं, अरुण आलाय, जरा जेवण घेऊन ये."
अशोक आणि मी एकाच ताटाच जेवायचो. आमच्या मैत्रीचं आम्हाला कोण कौतुक तेव्हा! त्यात कौतुकाचा भाग हा मैत्री तर आहेच पण त्यात लिंगायत-ब्राह्मण हा भेद जो गावातल्या भल्याभल्यांना हाताळायला यायचा नाही त्याचं आम्हाला काही सोयरसुतक नव्हतं. आमचं जेवण संपलं.
"उद्यापासून दहावीची परीक्षा चालू होत आहे."
"?"
"आमच्याकडे एक खूप गरजू विद्यार्थी आहे. दलित आहे. कॉर्पोरेशनमधे नाल्या साफ करायच्या कामाला आहे."
हे लोक नालीत कचरा काढून रस्त्यावर तसाच दिवसेंदिवस ठेऊन देत आणि घाण वास पसरे. त्यांच्या हलगर्जीपणावर, तद्रूपी अनैतिकतेवर भाष्य येण्यापूर्वी सरांनी मला प्यायला ताक दिले.
"तो रात्रशाळेत असतो. त्याला दहावीची परीक्षा पास करून पदोन्नती घ्यायची आहे."
"एका रात्रीत पास करण्यासारखे मार्गदर्शन मी करू शकतो का याबद्दल साशंक आहे. पण प्रयत्न करून पाहीन."
"अगोदर पूर्ण गोष्ट तरी ऐकून घे."
"कालच त्याचा अंगठा कापला. म्हणून तो आज लिहूच शकत नाहीय."
"अरेरे. खूप वाईट. किती अंगठा कापला? किमान पुढच्या वर्षी तो परीक्षा देऊ शकेल?"
"अरे हलकासाच कापलाय. डॉक्टरांनी तसं प्रमाणपत्र दिलंय. पण एक वर्ष थांबायची गरज नाही. असं झालं तर परीक्षार्थी एक सहायक घेऊ शकतात."
"आणि तो मी असावा?"
"हो."
"त्याचे नववीचे मार्क जितके होते तितकेच मार्क असणारा सहायक जास्त योग्य ठरेल."
"ते का?"
"माझं व्याकरण, अक्षरं आणि शुद्धलेखन चांगलं असण्याचा त्याला फुकटचा फायदा होईल."
"अरे, तो रात्रशाळेचा दलित मुलगा आहे. विचार करून पहा. नैतिकता महत्त्वाची कि कल्याण?"
"कल्याण. कारण नैतिकता कल्याणाचं साधन आहे."
"हे जर तुला कळत असेल, आणि त्याचं कल्याण झाल्याने कोणाचं वाईट होत नसेल तर त्यात गैर काय आहे? शिवाय त्याच्या घरची परिस्थिती ..."
ट्यांनी एक स्ट्राँग केस बनवली.
"ठीक आहे. मला मान्य आहे. उद्या मी शाळेत जाईन आणि त्याच्या सहायक लेखक बनेन."
"शाळेत नको जाऊ. समोरच्या टपरीत बस. काही शिक्षक येतील तुला शोधायला. असं विशिष्ट मुलगा मागवणं बेकायदेशीर आहे."
"कायदा खरोखरच गाढव असतो. मी बसेन चहाच्या टपरीत."
"आणि हो तुला प्रत्येक पेपरला ५० रु अशी लेखन फी पण मिळेल."
"एकूण ३५० रु? ही माझ्या आयुष्यातली पहिली कमाई असेल ..."
मी सरांच्या घरीच झोपी गेलो. त्या अतिप्रचंड कमाईचं काय करायचं त्या स्वप्नांच्या नादात रात्रभर झोप लागली नाही.
ठरल्याप्रमाणे एक शिक्षक मला त्या मुलाजवळ घेऊन गेले. त्याने माझ्याकडे पाहून हे काय ध्यान आहे, दुसरा कुणी मिळाला नाही का असा चेहरा केला. सहसा हुशार, मध्यमवर्गीय मुलांचा दिसायचा एक पॅटर्न असतो. माझे लुक्स त्याच्या आसपासही नव्हते, म्हणून तो नर्वस झाला. त्याचेही लुक्स त्या सफाईवाल्यांशी जुळत नव्हते. गोरा, मजबूत, उंच बांधा होता त्याचा. त्याने सांगीतले कि त्याने पूर्वी ८-१० दा परीक्षा दिली होती. प्रत्येकदा थोडक्यात हुकलं. हॉलमधे २०० ते ४०० परीक्षार्थी असावेत. त्याचं नाव, नंबर वैगेरे विचारून सगळं लिहिलं. उत्तरे लिहिण्याचा ठोका पडला. दोन मिनिटे शांततेत गेली.
"लिहा."
"सांगा."
वयाने लहान असो वा मोठा, उदगीरमधे लखनौप्रमाणे आदररार्थी बोलायची प्रथा आहे.
"लिहा ना तुम्ही."
"सांगा ना तुम्ही."
"मी काय लिहू? पेपर तुमचा आहे. तुम्ही सांगा मी लिहितो. आणि फक्त तुमचा अंगठा खराब आहे, डोळे, तोंड जाग्यावर आहेत, तेव्हा प्रश्न वाचा आणि उत्तर सांगा."
" मला काय लिहायचं ते काही माहित नाही."
"तीन निबंध आहेत, संत तुकाराम, मी जेलर झालो तर, मराठी भाषा. तुम्हाला कोणता सोपा वाटतो, त्याचं उत्तर सांगा. मी लिहिन."
"मी कोणताच निबंध पाठ केला नाही यावेळी."
"अहो, निबंध पाठ करायचे नसतात. असेच लिहायचे असतात. उलट तुमचा फायदा आहे माझ्यामुळे, माझं व्याकरण खूप चांगलं आहे."
"मी निबंध सांगू शकणार नाही."
"जाऊ द्या, दुसरं जे काय येतंय ते सांगा"
"मला काहीच येत नाही. तुम्ही लिहा."
"मी?"
"हो. तुम्ही."
"तुम्हाला काहीच येत नाही आणि सगळं मीच लिहायचं?"
"हो."
"मी असं अजिबात करणार नाही."
"म्हणजे तुम्ही उत्तरं लिहिणार नाही?"
"नाही."
मी नाही म्हणताक्षणी त्याने भर हॉल मधे जोरात गळा काढला. अर्धा तास गेलेला. बाकीचे परिक्षार्थी अगोदरच आमच्या कुजबुजीने चिडले होते. त्यांचे निषेधार्थक कटाक्ष आमच्याकडे पडत होते. आता त्याच्या रडण्यामूळे एक वेगळंच सुंदोपसुंदीचं वातावरण तिथे निर्माण झालं. पर्यवेक्षक तिथे आले. त्यांनी त्याला रडणे थांबवायला सांगीतले पण त्याचा हेल वाढूच लागला. मग मला व त्याला त्यांनी शिक्षकांच्या खोलीत नेऊन बसवले. तो रडतरडत म्हणाला,
"निरकले सरांनी तुम्हाला लिहायला नाही सांगीतलं का?"
"हो सांगीतलं ना."
"मग का नाही लिहित?"
"तुम्ही जे उत्तर सांगाल ते लिहायचं असं सांगीतलं. किमान तसं अभिप्रेत आहे. व्याकरण माझ्याकडून फुकट."
बराच वेळ शांततेत गेला.
"अहो, माझं प्रमोशन थांबलंय."
"मग? मी काय करू? नाहीतरी तुमच्यासारख्या एका अयोग्य माणसाला प्रमोशन दिले तर सरकारी काम बिघडेल."
"तसं काही होणार नाही हो. आमच्याकडं तेच काम असतं, फक्त पगार जास्त असतो."
"अच्छा? ठीक आहे. तुमचं काही भलं होणार असेल तर मी लिहायला तयार आहे."
त्याचं रडणं थांबलं.
"लिहा मग."
मला काहीतरी आठवलं.
"तुम्ही लोक नालीतून काढलेला कचरा त्याच दिवशी का नाही हलवत?"
"इथून पुढे पक्का हलवतो. आता लिहा."
"ठीक. पण माझा अजून एक प्रोब्लेम आहे."
"काय?"
"मी जर असेल लिहिल तर ते बेकायदेशीर नसेल असे मला माझ्या ओळखीच्या शिक्षकाने सांगावे लागेल."
सरनाईक सर समोरूनच जात होते. विशालची, माझी त्यांच्याशी नजरानजर झाली. त्यांना मी बोलवून परिस्थिती सांगीतली. पुढे म्हणालो-
"माझे मन म्हणत आहे कि याने कोणावर तरी अन्याय होइल. तुम्ही सांगा काय करू."
दोन बामनांच्या कचाट्यात सापडलो असा तीव्र भाव विशालच्या चेहर्यावर उमटला.
"अरुण, स्वार्थत्यागाशिवाय क्रांती नाही हा वि स खांडेंकरांचा धडा आपल्याला काय सांगतो?"
"सर, मला वाटतं तो संदर्भ नाही. इथे दुसर्या दलितावर अन्याय झाला तर?
"अरे निसर्गात रँडम सिलेक्शन होते हे तू पाहिले नाही का?"
"..."
"..."
"..."
आमचे टुमणे वाढते आहे पाहून विशालने इतका मोठा गळा काढला कि हॉलमधले सारे शिक्षक पळत तिथे आले. त्याच्याकडचे कोणते शस्त्र चोखपणे काम करे ते त्याला नीट ठाऊक झाले. एक तास गेला होता. तो रडत असल्यामुळे सगळे मलाच उपदेश करायला लागले. तो शो मॅने़ज करणे माझ्या क्षमतेच्या बाहेर गेले होते. सगळ्यांनी मला गरीबास मदत करणे नैतिकतेच्या कितीतरी पट महत्त्वाचे असे तत्काळ पटवून दिले आणि मी पेपर लिहायला लागलो. शिवाय आता ही माझ्या पास होण्याच्या क्षमतेची चाचणी आहे, आव्हान आहे हेही मला जाणवायला लागले. मी लिहायला चालू केलं. निबंध, पत्र, उतारा वाचून उत्तरे, कविता वाचून उत्तरे, भाषांतरे, इ सिलॅबसशी संबंध नसलेली सगळी उत्तरे काढली. तेच ५०% च्या वर होतं. मग मोर्चा वळविला पाठ्यपुस्तकातल्या प्रश्नांवर. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' असे कविने का म्हटले आहे असा एक प्रश्न होता. ही भा रा तांब्यांची कविता आहे हे मला माहित नव्हते पण बाकी सारा संदर्भ माहित होता. ते उत्तर सर्वप्रथम लिहिले. मग 'सोम्याने गोम्याला ५००० रु कर्ज का मागितले असा प्रश्न दिसला तर त्यात ५००० रु ने जे काही शक्य आहे ते सगळे लिहून काढू लागलो. १०० मार्कांचा पेपर मी अक्षरक्षः ठोकला.
पेपर संपला. गरडखेलकर सर आले.
"हा मला नको. दुसरा लेखनिस द्या."
"का?"
"हा फार ताप देतो. शिवाय याला काही येत असावं असं वाटत नाही."
"त्याची तू चिंता करू नको, तुला जर कोणी पास करू शकत असेल तर हाच."
त्याचा नाईलाज झाला. दिवसभर मी त्याच्यासोबतच होतो. त्याची कहाणी ऐकत होतो. संध्याकाळी मी त्याला बाकी विषयांची पुस्तके लागतील म्हणालो.
"तू स्वतः घेतली नाहीस का अजून स्वतःसाठी?"
"नाही. मी वर्गमित्रांचीच पुस्तके वापरतो."
"ठिक."
पण परीक्षा ती परीक्षा. नववीच्या (उपांत्य कि मुख्य?) परीक्षेच्या थकव्याने मी हिंदी व इंग्रजीचा पेपर होईपर्यंत कोणतेही पुस्तक उघडले नाही. शेवटी विज्ञानाचे आणि गणिताचे पेपर आले तेव्हा मी ३-४ तास ती पुस्तके चाळली. इतिहास, भूगोलात भयंकर ठोकंपट्टी केली. दुसर्या महायुद्धात तत्कालीन ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोक मेले. इंग्लंडच्या बजेटच्या १२ पट खर्च झाला. हे देश आले, ते फुटले. भारत स्वतंत्र झाला. इ इ. भूगोलातही तेच. प्रश्नातल्या कोणत्याही शब्दाबद्दल जी काही भौगोलिक माहिती आहे ती लिहून काढायची, उत्तराशी संबंध असो वा नसो.आम्ही त्याच शिक्षकांच्या खोलीत बसून असू. त्याने मला कॉपी करण्यासाठी नवनीतच्या गाइडचे कागद आणण्याची ऑफर दिली. मी ती धूडकाउन लावली. कॉपी करणे अनैतिक तर आहेच शिवाय माझ्या इगोसाठी अनअॅक्सेप्टेबल आहे हे त्याला ठासून सांगीतले. शेवटी पास नापास तो होणार आहे, मी नाही हे ही मी मनात बाळगून होतो. मी लिहित असताना पूजा करणार्या ब्राह्मणाशेजारी त्याचा अजाणता असिस्टंट बसतो तसा बसून असे. पेपर संपले. हेडमास्तरांनी मला बोलावून विशालतर्फे ३५० रु पावतीचे आणि तितकेच एक्स ग्रॅशिया दिले. मला आभाळ ठेंगणे झाले. यथावकाश आमची धाव्वी सुरु झाली. पूर्वीच्या वर्षीच्या दहावीचे निकाल आले. निरकले सर रोज आम्हला शिकवत, मी त्यांच्या घरी जातही असे, पण त्यांनी कधी तो विषय काढला नाही. मी समजायचे ते समजून चुकलो. अनुभव म्हणून परीक्षेचा फायदा व्हायचा तो तोटाच झाला.
दोन चार महिन्यांनी असेच एकदा मी एका अरुंद गल्लीतून चाललो होतो. विशाल आणि त्याचे सहकारी नाल्यांतला गाळ काढून रस्त्यावर टाकत होते. मी त्याची नजर टाळायचा प्रयत्न करत रस्ता ओलांडणार होतो. आमच्यातले अंतर कमी झाले तसे त्याची नजर माझ्यावर गेली.
तो किंचाळला,
"पकडा रे त्या हरामखोराला."
मी पळून जायचा प्रयत्न केला पण अखेर राजे गनिमासमोर सादर करण्यात आले. दोघाचौघांनी माझे हात पाय चांगलेच गच्च पकडले होते आणि भिंतीवर पाठ टेकवून मला उभे केले होते. तो जवळ आला नि त्याने शब्द न बोलता अगोदर माझ्या कानफाडात मारली.
"जिंदगी बर्बाद केलीस माझी तू."
"मी मुद्दाम नाही केलं हो. माझ्यापरिने मी जास्तीत जास्त प्रयत्न केला."
"तू नको म्हणून मी पहिल्यांदाच सांगीतलं होतं. आहेसच साला अपेशी."
"वाटलं तर मी तुमचे पैसे मला नोकरी लागल्यावर परत देईल, पण आता मला सोडा. मी पुन्हा सांगतो, माझ्यापरीने मी होईल ते केलं."
त्याला माझा प्रचंड राग आला होता. अगदी खदखदत होता रागानं. सोडून दिलं नाही तर काय करील कोण जाणे म्हणून मी घाबरून गेलो होतो. काकूळतीला येत मी पुन्हा म्हणालो,
"तुमच्यासाठी मी रोज अभ्यास केला. पण तुम्ही मला ऐन परीक्षेत सांगीतलंत. एका दिवसात असं पास होणं अवघड आहे. म्हणून तुम्हाला कमी मार्क पडले असतील. तरीही तुम्ही २-३ विषयांत पास झालेच असणार. बाकीचे नंतर काढा. आता मला जाऊ द्या ना."
उदगीरमधे एकाच गालावर आवाज काढणे गालवाल्यासाठी अशुभ मानतात. त्याने दुसर्या गालावर जाळ काढला आणि अतिशय क्रुद्ध आवाजात म्हणाला,
"काय म्हणालास? कमी मार्क पडले असतील? कमी मार्क्स पडले असतील? अरे बामनाच्या, अरे साडेसाती आहेस तू. नीघ आता आणि नंतर तोंड नको दाखवू."
त्यांनी मला हळूहळू सोडलं. पण त्याचं अजूनही समाधान झालं नव्हतं. सुदैवानं त्याचा पादप्रक्षेप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. संध्याकाळी मी सरळ निरकले सरांकडे आलो. त्यांची नेहमीप्रमाणेच मैफिल चालू होती, पण आज मी आलो असतानादेखिल त्यांच्या चेहर्यावर कोणता अपराधीपणाचा भाव येताना दिसला नाही. मी आपली कहाणी सांगीतली.
"त्याने मला असं मारायला नाही पाहिजे होतं. मला काय त्याचं मुद्दाम वाईट करायचं होतं का? शिवाय मी आपल्या नैतिकतेच्या तत्त्वांना मुरड घातली ती वेगळीच. अन माझा एक अभ्यासाबद्दलचा आत्मविश्वास गेला ते वेगळंच."
"तू लहान आहेस, नाहीतर तुलाच ऑफर केली असती."
"काय?"
"काही नाही."
"त्याने मला का मारलं? तुम्ही पकडून त्याला माझी माफी मागायला सांगा."
"त्याची ती प्रतिक्रिया साहजिक होती."
"का?"
निरकले सर घोटाघोटाने सांगू लागले.
"त्याला प्रमोशनसाठी हे सगळं पाहिजे होतं. त्याचा एक सिनिअर सहकारी त्याच्याच जातीचा होता आणि त्याची कन्या हुशार होती.जातीच्या मानाने ते (सहकारी कुटुंबीय) मालामाल लोक होते. शिवाय ६०-६५% मिळाले होते तिला दहावीत! पण ती बर्यापैकी काळी सावळी होती आणि जातीतल्या शिक्षितांमधे खपायची नाही. हा तरणा, गोरा, उंच, कमावता होता. धाव्वी पास नव्हता म्हणून ती याला नकार देत होती. वरीष्ठांनीही धाव्वीनंतर प्रमोशनचे वचन दिले होते म्हणून सगळा आटापिटा चालू होता. याला ३५% पडले असते लग्न आणि प्रमोशन बिनबोभाट झालं असतं. सगळ्या शाळेचा त्याला पाठिंबा होता कारण त्याचे वडिल शाळेचे लाडके चपराशी होते."
"इतके दिवस शेजारी असून त्यानं मला काहीच सांगीतलं नाही! बरं झालं तो नापास झाला ते.कस्लं मारलं मला त्याने. त्याच लायकीचा होता तो."
"झालं ते तसं नव्हतं. तू पेपर दिलेस तेव्हा त्याला ८४% मार्क पडले. असलं काही होईल याची कोणाला अपेक्षाच नव्हती. ती मुलगी हुशार हुशार म्हणून जातीत मिरवायची. हा चक्क handsome and intelligent निघाला. तिला विचारेनासा झाला. दुसरीकडे अजून काही अजून चांगलं मिळतंय का ते पाहू लागला. मग तिच्या बापाने विशालची ऑफिसात तक्रार केली, परीक्षेत कॉपी केली आणि याची शैक्षणिक क्षमता शून्य आहे म्हणून. त्याला वरीष्ठांकडून दुजोरा मिळाला, कारण हे मार्क त्या वरीष्ठांच्या हुशार सुपुत्राच्या मार्कांपेक्षाही कितीतरी जास्त निघाले. त्याच्या बेईमान चालीमुळे जातीत बदनामी झाली. प्रमोशन कायमचं रद्द झालं आणि पोरीबद्दल उपरती झाली पण गब्बर सासर मिळणार होतं ते कायमचं गेलं."
इतक्या मोठ्या राजकारणात आपण एक मोहरा/प्यादे होतो हे आपल्या कसे लक्षात आले नाही याचा विचार करू लागलो. मग लक्षात आले, जेव्हा मी नोटा मोजत होतो, अगदी त्याच वेळी विशाल अंगठ्याचे बँडेज काढत होता आणि त्याने ते निव्वळ पांढरं पूर्ण भेंडोळं कचर्यात टाकलं तेव्हा आपलं तिकडे लक्षही नव्हतं.
(सत्यकथा)
प्रतिक्रिया
अगदी रोचक अन तितकाच थरारक
अगदी रोचक अन तितकाच थरारक अण्भव असे म्हणतो. डिट्टेलवारी प्रतिसाद नंतर!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
डिट्टेलवारी प्रतिसाद
एतत्सम आपले अनेक प्रतिसाद पूर्वी वाचले आहेत. आपण फार तरुण असल्यामुळे, आणि तारुण्यात अनेक हिशेब मनात असतात हे स्वानुभवाने माहित असल्याने, मी जास्त फॉलो अप करत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कल्पनेहून सत्य अद्भूत! छान
कल्पनेहून सत्य अद्भूत!
छान प्रकटन - कथा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्याचं काय आहे, कल्पना
त्याचं काय आहे, कल्पना करण्यासाठी प्रतिभा लागते. ती नसल्यामुळे आम्हाला सत्यच मांडावे लागते.
हे सत्य आहे बरे!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आयला! एकदम मिरासदारांच्या
आयला! एकदम मिरासदारांच्या गोष्टींची आठवण यावी असा अनुभव आहे, भारीच!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अगदी अगदी. विशेषतः शेवट तर
अगदी अगदी.
विशेषतः शेवट तर मिरासदार शैलीतलाच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक्झॅक्टली. विनोदाची
एक्झॅक्टली. विनोदाची जातकुळीही तीच आहे.
अवांतर - ही सत्यकथा आहे हे सांगितलं नसतं तर कथेच्या अनुभवात काय फरक पडला असता? हे खरोखर घडलं असं सांगणाऱ्या लेखकावर विश्वास असल्याने आपल्या डोक्यातलं चित्र घट्ट झालं. पण त्यामुळे रंजकता कमी झाली का?
हा अवांतर मधला प्रश्न मला आहे
हा अवांतर मधला प्रश्न मला आहे का? असेल तर इतर शब्दांत सांगाल का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ही सत्यकथा आहे हे सांगितलं
ही सत्यकथा आहे हे सांगितलं नसतं तर कथेच्या अनुभवात काय फरक पडला असता?
- विश्वास बसला नसता
हे खरोखर घडलं असं सांगणाऱ्या लेखकावर विश्वास असल्याने आपल्या डोक्यातलं चित्र घट्ट झालं. पण त्यामुळे रंजकता कमी झाली का?
- रंजकता कमी झाली नाही.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कहानी मे ट्विस्ट है :)
अफलातुन अनुभव . बर झाल मेरिट लिश्टित नाही आलात .
माझ्या गैरादी स्वभावामुळे
माझ्या गैरादी स्वभावामुळे माझ्या स्वतःच्या दहावीत मला अजून ५% आणि १ मार्क जास्त मिळाला. कल्पना करा मी दहावीतही किती ऐश केली असेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अनुभव आवडला. थरारकच आहे.
अनुभव आवडला. थरारकच आहे.
ज ब र द स्त. माझा एक ओळखीचा
ज ब र द स्त.
माझा एक ओळखीचा मुलगा होता. गरिब आणि हुशार होता.. तो सुद्धा बरेच वर्ष पैसे घेऊन 'डमी' बसायचा आणि पोरांना पास करायचा. चांगला तेजीत होता त्याचा धंदा.. पुण्यातून लांब-लांब गावी जायचा तो डमी बसायला. आजकाल तो 'जागेचे व्यवहार' करतो. फुल्ल सोनं घालून फिरताना दिसतो मला. असो..
_/\_
__मनस्वी राजन ( Rajendra Zagade )
हा हा भारीच की! कभी हा कभी ना
हा हा भारीच की!
कभी हा कभी ना आठवला
मुन्नाभाई एम बी बी एस पण
मुन्नाभाई एम बी बी एस पण आठवायला हरकत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
कभी हा कभी ना ? शाहरुख - सुचित्रा कृष्णमूर्ती आणि दीपक तिजोरी वाला च चित्रपट ना?
त्यातला कोणता प्रसंग आठवला म्हणे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सतत नापास होणार्या शारुख ला
सतत नापास होणार्या शारुख ला तो डॉन ९०+ मार्क असलेली नकली मार्कलिस्ट बनवून देतो. मग शारुखचे बाबा मोठ्ठी पार्टी अरेँज करतात वगैरे
हां हां...
राइट. आठवलं. ऐ काश के हम.... हे तिथूनच सुरु होतं.
नाहीतर मला तसंही त्यात्ली गाणी आणि त्या बँडवाल्या ग्रुपचा अवखळपणा,ताजेपणा तेवडहच काय तो लक्षात राहिला.
मुदलातली गोष्टच विसरलो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शंका
माझी अनुपस्थिती शाळा चालवून घेत असे, नाही घेतली तर मी शाळाच बंद पाडत असे.
.......... म्हणजे शाळा बंद पाडण्यासाठी नक्की काय करावे लागे तुम्हांला ?
बाकी मुलांना शाळेत जाऊ नका
बाकी मुलांना शाळेत जाऊ नका म्हणून सांगत असे. आमची युनियन होती समजा. शाळेत मीच सर्वात जास्त मार्क घेणारा आणि मीच सर्वात वात्र्य असल्याने शिक्षकांची गोची होई. पण व्यक्तिशः त्यांचे माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे ते माझी हजेरी टाकत आणि किमान आवश्यक हजेरीपर्यंत आणत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मस्त
रोचक अनुभव! शैलीही आवडली.
मला तुमचे प्रतिसाद बऱ्याचदा कळत नाहीत. ह्या आणि मागच्या अनुभवपर ललिताबद्दल असे वाटले नाही.
माझा भाषेचे दौर्बल्य नावाचा
माझा भाषेचे दौर्बल्य नावाचा धागा अथपासून इतिपर्यंत वाचा असा सल्ला देऊ धजणार नाही.
तरीही थोडक्यात असे म्हणेन कि माणूस एकाच शब्दाशी अनंत संकल्पना, विचार, माणसे, प्रश्न असोसिएट करून असतो. लेखकाला अपेक्षित असलेले विश्व आणि वाचकाला अपेक्षित असलेले विश्व भिन्न निघाले कि असे होते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ग्रे एरिया (अवांतर)
उपरोद्धृत वाक्य "तुमचे प्रतिसाद बर्याचदा निरर्थक असतात. ह्या आणि मागच्या अनुभवपर ललिताबद्दल असे वाटले नाही." असे वाचावे काय?
उत्तम
कथेची वस्तु आणि शैली दोन्ही उत्तमच.
'भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?' 'सभ्यता आणि सम्यकता' स्टाइल लिखाणाहून हे अधिक आवडले.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सभ्यता आणि सम्यकता हे पुस्तकी
सभ्यता आणि सम्यकता हे पुस्तकी विषय आहेत. एक धाग्यात ते मावणार नाहीत. अतिसंपृक्तिकरण होईल. नाण्याची दुसरी बाजू मांडतात प्रचंड विदा देणे, सीमा सांगणे, मुद्दा सांगणे, नक्की काय अभिप्रेत आहे हे सांगणे मोठं कौशल्याचं काम आहे. मला ते नीट जमत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खल्लास!
जबरदस्त
भन्नाट
भन्नाट
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एक नंबर... मजा आली वाचून.
एक नंबर... मजा आली वाचून.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक नंबर... मजा आली वाचून
एक नंबर... मजा आली वाचून +१.
तुमची शैली अफलातुन आहे :).
सत्यकथा आवडली. तुमची भाषाशैली
सत्यकथा आवडली. तुमची भाषाशैली वेगळी आहे. विशेषतः तुमच्याकडून सहज येणारे नवीन शब्द. ( उदा. या लेखातले गैरादी, तळीव, तद्रूपी, ठोकंपट्टी)
तुमची भाषाशैली वेगळी
धन्यवाद. पण वर तिघांनी म्हटलं आहे कि ही शैली मिरासदारांची आहे. असावी कदाचित. मला शाळेत त्यांची वाचनालयात अडकल्याची एक गोष्ट धडा म्हणून होती. तिच्यात ते खालून जाणार्या लठ्ठ माणसाला (इतका लठ्ठ कि आमच्या गावच्या नदीचे पाणी वाढले असते, इ) मदत करायला सांगतात आणि तो खालूनच म्हणतो - "बैस, बैस. वरच बैस. आम्ही खाली आहोतच कि आमचा काय उपयोग आहे?" असे वाक्य होते. आम्ही सारे भाऊ अजूनही या वाक्यावर जाम हसतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.