हर्षयुक्त उमापती
आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे. शंकर हा स्मशानात
राहणारा, भस्माची उटी अंगाला फासणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे.
काय आहे याचे रहस्य ?
आपल्या पुराणांत ब्रम्हा हा सृष्टीचा निर्माता, विष्णु हा सृष्टीचे
पोषण करणारा तर शिव हा सृष्टीचा विनाश करणारा देव अशी
त्रयी मानलेली आहे. अर्थात शिवाचे कार्यक्षेत्र मृत्यूशी संबंधीत
असल्याने त्याचे वास्तव्य स्मशानात असते आणि तो चिताभस्म
अंगाला फासतो. शिव या आपल्या कृतीतून आम्हाला काय संदेश
देतो?
मृत्यू हे मनुष्य जीवनाचे सर्वात प्रखर आणि सर्वात स्पष्ट असे
वास्तव आहे. परंतू कित्येकवेळा आपण कसे वागतो ?
महाभारतात यक्षाने धर्मराज युधिष्ठीराला जे प्रश्न विचारले त्या
सुप्रसिद्ध प्रश्नातील एक प्रश्न असा आहे -
"जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती ?"
धर्मराजाचे उत्तर मोठे मार्मिक आहे. धर्मराजा म्हणतो, "जगात
पदोपदी मृत्युचे दर्शन होत असतानाही मनुष्य आपण जणू अमर
आहोत अशा थाटातच वावरत असतो, हेच सर्वात मोठे आश्चर्य
होय."
आपण आज ना उद्या स्मशानातच जाणार आहोत. तीच आपली
शेवटाची नक्की जागा आहे. एक ना एक दिवस आपलेही भस्म
होणार आहे. या सर्वाची आठवण शिव आपल्याला करुन देत आहे.
आपण जर सदैव मृत्युची आठवण ठेवली, प्रत्येकाचा मृत्यू अटळ
आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही याचे स्मरण
ठेवले तर आपण कोणतेही वाईट कर्म, दुष्कर्म करणार नाही.
पाप कर्मापासून आपण दूर राहू.
एकनाथ महाराज दररोज गोदेत स्नान करावयास जात. वाटेत एक
माणूस नाथांना दररोज शिव्या देत असे. नाथांच्या पत्नी गिरीजाबाईंना
हे सहन होईना. एकदा त्यांनी नाथांकडे या विषयी तक्रार केली.
नाथांनी हा प्रकार बंद करावयाचे आश्वासन गिरीजाबाईंना दिले.
दुसऱ्या दिवशी नाथ स्नानाला जाताना थेट त्या गॄहस्थाच्या घरी
गेले. नाथांना थेट आपल्या घरी आल्याचे पाहून तो गडबाडला.
नाथ त्याला म्हणाले, "तुम्हाला सावध करायला आलो. आज
सूर्यास्ताबरोबर तुमचा मृत्यू होणार आहे." असे सांगून नाथ स्नानाला
निघून गेले. या गृहस्थाची आता पाचावर धारण बसली. तो खूप
घाबरला. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने भजनी मंडळ बोलावले.
भजन करु लागला. तोंडातून शिव्या येणे बंद झाले आणि देवाचे
नाम येवू लागले. संध्याकाळी नाथ त्याच्या घरी गेले. त्याने नाथांच्या
पायावर लोळण घेतली. अपराधाबद्दल क्षमा मागितली. येवढ्यात
सूर्यास्थ झाला. नाथ त्याला म्हणाले, "आपण अजून जिवंत कसे ?
हाच प्रश्न तुला पडला असेल. अरे तो दूर्वर्तनी शिव्या घालणारा
गृहस्थ आता मेला. आता तू मृत्यूची कायम आठवण ठेव म्हणजे
शिव्या घालयला तुला वेळच मिळणार नाही."
शिवाच्या गळ्यात रुंडमाळा आहे. मस्तक हे जीवाचे प्रतिक आहे.
जो आपला जीव देवाला अर्पण करतो, त्याला देव आपला म्हणतो.
तुकाराम महाराज म्हणतात - "जीव दिला पायातळी ।"
याचा अर्थ महाराजांनी देवाच्या पायावर डोके फोडून जीव दिला,
असा नव्हे. ’जीव दिला’ याचा अर्थ सारा अहंकार, सर्वस्व त्या देवाला
अर्पण केले. आता त्या भक्ताच्या मस्तकात तोच परमात्मा भरलेला
आहे. अशा भक्तांच्या मस्तकांची माळ करून मोठ़्या प्रेमाने शिव
आपल्या कंठी धारण करतो.
शिवाच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळाची तीन पाती सत्व, रज व तम
या त्रिगुणाची प्रतीक आहेत. या त्रिगुणांवर शिवाची सत्ता चालते.
शिवाच्या नेत्रात ज्वाळा आहेत. शिवाला त्रिनेत्र असेही म्हणतात.
या तिसऱ्या डोळ्यात ज्ञानाग्नी आहे. जेव्हा हा ज्ञानाग्नी जागृत होतो
तेव्हा तो सर्व विकारांचा नाश करतो. ही दृष्टी शिव देतो. म्हणून
या ज्ञानाग्नीच्या ज्वाळांनी शिवाने कामदेवाला जाळून टाकले अशी
कथा आहे.
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
शिवाने गजचर्म आणि व्याघ्रांबर धारण केले आहे. हत्ती हा कामाचे
तर वाघ हा क्रोधाचे प्रतिक मानतात. यांची साल काढून त्यांच्यावर
शिवाने विजय प्राप्त केला आहे. कंठामध्ये शिवाने वीषयुक्त वासुकी
सर्पाचा हार धारण केला आहे. सर्प वीषयुक्त आहे पण शितल आहे.
तो थंड रक्ताचा प्राणी आहे. समुद्र मंथनाच्या प्रसंगी शिव हलाहल
वीष प्याला आणि ते वीष आपल्या कंठी धारण केले. त्यामुळे होणारी
आग शांत करण्य़ासाठी सर्प गळ्यात धारण केला. वीषावर वीषच
औषध म्हणून उपयोगी ठरते. जो विषम परिस्थितीत न डगमगता
वीष पचवतो, तोच खरा नेता होवू शकतो. तोच महादेव होतो.
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
शिवाचे गण भुते, वेताळ नाचताहेत. स्वामी विविकानंदांच्या सुप्रसिद्ध
शिष्या भगिनी निवेदिता म्हणतात, "भुते, पिशाच्च ही सर्वात खालच्या
योनीचे प्रतिक आहे. म्हणूनच शिव समाजातील सर्वात खालच्या
स्तरावरील लोकांचा लाडका देव आहे. तो सर्वांना आश्रय देतो."
हा उमापती शिव हसतो आहे. शिव एकटा आहे की दुकटा ?
शिव आणि त्याची शक्ती उमा भिन्न नाहीतच मूळी. शिव या शब्दातील
इकार म्हणजे शक्ती होय. हा इकार दूर केला तर शव उरेल.
शिव हा अर्धनारी नटेश्वर नटराज आहे. तो या त्रिगुणात्मक विश्वाच्या
उत्पत्ती, स्थिती, लयाचे नृत्य अखंड करतो आहे. नृत्य जसे नर्तकापासून
भिन्न करता येत नाही तसे विश्व शिवापासून भिन्न करता येत नाही.
पण नृत्य संपले तरी नर्तक शिल्लक राहतो हे लक्षात ठेवायला हवे.
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
असा हा शिव सर्व सुखाचे आगर आहे असे नरहरी सोनार महाराज
अभंगाच्या शेवटी म्हणतात. ही ओळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाची
आठवण करून देते.
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥
वारकरी सांप्रदायाप्रमाणे हरी आणि हरात भेद नाही. तो विठ्ठल आणि
शंकर एकच आहेत. त्या परमेश्वराच्य़ा चरणीच सर्व सुख आहे, याविषयी
सर्व संतांचे एकमत आहे. म्हणून सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी त्या शिवाला
शरण जाऊ या.
- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१
प्रतिक्रिया
मस्तच वाचायला खूपचं छान वाटल.
मस्तच
वाचायला खूपचं छान वाटल.
मला शिवी हा शब्द शिव या
मला शिवी हा शब्द शिव या शब्दापासून व्युत्पत्त झाला असावा असे वाटते. अर्थात याला काही आधार नाही. पण शंकर हा क्रोधासाधी प्रसिद्ध आहे. शिवी देताना मनात राग साचलेला असतो. तो मुखातुन व्यक्त होतो. म्हणुन शिवोत्पन्न अशी ती शिवी.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
सुंदर लेख. शंकर स्मशानात रहातात
सुंदर लेख.
शंकर स्मशानात रहातात त्याची अजून एक उकल अशी ऐकलेली की ते जिथे जातात तिथे संहार करतात व स्मशान बनवतात. कारण शंकर हे सर्वहर्ता-संहारक शक्ती ना. म्हणून ते स्मशानात रहातात अर्थात जातील तेथे स्मशान करतात.
माझे आवडते होळीचे गाणे - http://radiovani.blogspot.com/2009/03/khele-masane-me-holi-digambar.html येथे ऐकता येईल.
खेलैं मसाने में होरी दिगंबर खेले मसाने में होरी ।
भूत पिसाच बटोरी, दिगंबर खेले मसाने में होरी ।।
लखि सुंदर फागुनी छटा के, मन से रंग-गुलाल हटा के
चिता-भस्म भर झोरी, दिगंबर खेले मसाने में होरी ।।
गोपन-गोपी श्याम न राधा, ना कोई रोक ना कौनऊ बाधा
ना साजन ना गोरी, दिगंबर खेले मसाने में होरी ।।
नाचत गावत डमरूधारी, छोड़ै सर्प-गरल पिचकारी
पीतैं प्रेत-धकोरी दिगंबर खेले मसाने में होरी ।।
भूतनाथ की मंगल-होरी, देखि सिहाएं बिरिज कै गोरी
धन-धन नाथ अघोरी दिगंबर खेलैं मसाने में होरी ।।
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
+१
तुम्ही दिलेला दुवा काही मी पाहिला/ऐकला नाही. पण बनारसचे पं. छन्नुलाल मिश्र यांची ही होरी मी ऐकलेली आहे एका कार्यक्रमात. फारच भारी.
अरे वा ! लकी यु. खरच सुंदर
अरे वा ! लकी यु. खरच सुंदर चाल आहे या होरीची व वातावरणनीर्मीती तर क्या केहेने.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
(No subject)
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
बिचार्या दुसर्या पोराला
बिचार्या दुसर्या पोराला नेहमी फोटोतून दूर का ठेवतात ? ठीक आहे, नसेल तो याच्यासारखा बाळसेदार..पण म्हणून कटाप ?
की तोच नेहमी काढतो फोटो. अरे कधीतरी टाईमर वापरुन त्यालाही घ्या की बिचार्याला एका मांडीवर.
घावला.. amazon.com वर.
घावला.. amazon.com वर.
amazon.com अमेरिकन धर्मात हे
अमेरिकन धर्मात हे देखील देव असतात का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कायकी.. पण माझा मुद्दा इतकाच
कायकी..
पण माझा मुद्दा इतकाच मर्यादित होता की आख्खा लाडका बैलपण फोटोत घ्यायला जागा आहे आणि दुसर्या लेकराला मात्र घेतलं नाही असं का बुवा? म्हणून.
आणि फक्त बैलच घेतलाय,
आणि फक्त बैलच घेतलाय, उंदीरमामांना हाकलून दिलंय
==
दुसर्या फोटोत कार्तिकेयाच्या डोक्यावर ते काय मोरपीस आहे! कृष्णाचे पेटंट ना ते?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खास गविंच्या आग्रहास्तव हा
खास गविंच्या आग्रहास्तव हा घ्या लेकुरवाळा शंकर :)-
अन हादेखील. यात ही कार्तिकस्वामी व गणपती, दोन्ही मुले आहेत -
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
आय देखणी चित्रकला आहे...
मस्त.
actions not reactions..!...!
प्रभाकर या प्रसिद्ध
प्रभाकर या प्रसिद्ध लावणीकारांची एक लावणी आहे. लक्ष्मीपार्वतीसंवाद- त्यात दोघी एकमेकींच्या नवर्यांची फुल उणीदुणी काढतात. मस्तच आहे. कुठे मिळाल्यास डकवेन. नवनीतात होती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इर्शाद!!! कल्पना भारी एकदम
इर्शाद!!! कल्पना भारी एकदम भारी वाटते आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
शिवजीकी पूरी फॅमिली...
धन्यवाद बॅटमन. प्रभाकराची ती रचना अशी आहे:
शंकराची - आणि अन्य देवांचीहि - नर्मचेष्टा करणारे अनेक श्लोक उपलब्ध आहेत. वानगीदाखल खालील दोन पहा:
केकामेकां कुरु पशुपतिनैव दृश्ये विषाणे।
स्थाणुर्मुग्धे न वदति तरुर्जीवितेश: शिवाया -
गच्छाटव्यामिति हतवचा: पातु वश्चन्द्रचूड:॥
पार्वती आणि शंकर ह्यांच्यामधील प्रश्नोत्तरे) 'तू कोण?' 'मी शूली (शूलधारी, पक्षी पोटशूळ उठलेला)'. 'मग वैद्य शोध'. 'प्रिये, मी नीलकंठ आहे'. 'तर मग केका ऐकव (केका - मोराचा आवाज). 'अगं मी पशुपति'. 'तर मग शिंगे का दिसत नाहीत?'. 'मुग्ध स्त्रिये, मी स्थाणु आहे'. 'तरु बोलत नाही' (स्थाणु म्हणजे न हलणारा, पक्षी वृक्ष). 'मी शिवेचे (पर्यायी पार्वती) जीवनसर्वस्व आहे'. 'तर मग अरण्यात जा ('शिवा' ह्याचा 'कोल्ही' असाहि अर्थ आहे.). अशा रीतीने निरुत्तर केला गेलेला चन्द्रचूड तुमचे रक्षण करो.
हा पुढील श्लोक मुद्राराक्षस नाटकाचा नान्दीश्लोक आहे. नाटकाचा विषय - चाणक्याचा कावेबाजपणा - ह्यातून ध्वनित होतो असे टीकाकार मानतात.
नामैवास्यास्तदेतत्परिचितमपि ते विस्मृतं कस्य हेतो:।
नारी पृच्छामि नेन्दुं कथयतु विजया न प्रमाणं यदीन्दु -
र्देव्या निह्नोतुमिच्छोरिति सुरसरितं शाठयमव्याद्विभोर्व:॥
अशीच पार्वती आणि शंकर ह्यांची प्रश्नोत्तरे: 'तुझ्या माथ्यावरची ही भाग्यवती कोण आहे?' 'शशिकला.' 'हिचे नाव काय?' 'नावच तर आहे हे. तुझ्या चांगले परिचयाचे आहे. कशाने विसरलीस?' 'ही बाई कोण आहे असे मी विचारते आहे. चन्द्राला उद्देशून नाही.' 'हा चन्द्रच आहे ह्यावर विश्वास नसेल तर तुझी सखी विजया हिला विचारून पहा.' अशा रीतीने सुरसरिता गंगा हिला पार्वतीपासून वाचवायची इच्छा करणार्या ईश्वराचे (विभु) कपट तुमचे रक्षण करो.
वेदकालातील कोपिष्ट आणि काहीशा माथेफिरू आणि भीतिदायक अशा रुद्रदेवतेचे भोळ्या, कुटुंबवत्सल, मुलेबाळे असलेल्या देवामध्ये परिवर्तन झाले. ते कसे झाले ते येथीलच 'रुद्राध्याय एक मनन' ह्या लेखामध्ये पाहता येईल. (३/४ लेखानंतर पहा.)
ह्या प्रतिसादाला दिलेल्या 'शिवजीकी पूरी फॅमिली' ह्या शीर्षकमागे गणपतीने दूध प्यायल्याची जी हूल २०-२५ वर्षामागे उठली होती ती आहे. ही हूल उठल्यावर भलेभले चक्रावले आणि असे खरोखर आहे काय असा शोध घेऊ लागले. तत्कालीन मुख्यमन्त्री मनोहर जोशी ही बातमी ऐकताच मन्त्रिमंडळाची चालू असलेली बैठक तहकूब करून हा चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी घरी गेले असे वाचल्याचे आठवते. गणपतीनंतर उंदीर, नंदी, पार्वती,शंकर सगळेच दूध पीत आहेत अशा बातम्या ऐकू येऊ लागल्या. त्याला उद्देशून मुंबईच्या लोकलगाडीच्या गर्दीमध्ये कोण्या भोळ्या भक्ताने काढलेले हे उद्गार आठवले.
आजचा दिवस सार्थकी लागला.
आजचा दिवस सार्थकी लागला. त्रिवार लागला
अतिशय सुंदर!!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
वाह!!!! बहुत धन्यवाद कोल्हटकर
वाह!!!! बहुत धन्यवाद कोल्हटकर सर. कैक वर्षांनी पुन्हा वाचली ही लावणी. मस्त मजा आली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक फार सुंदर श्लोक वाचला होता
एक फार सुंदर श्लोक वाचला होता आता आठवत नाही. शंकरांनी पार्वतीशी बोलताना चुकून गंगेचे नाव घेतले अन म्हणून रागाने पार्वतीने लत्ताप्रहार केला. अशा काहीशा अर्थाचे आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
हे घ्या
तो श्लोक असा आहे:
नमितशिरसो गङ्गालोके तया चरणाहताववतु भवतस्त्र्यक्षस्यैतद्विलक्षमवस्थितम्॥
प्रणयकुपित पार्वतीला पाहून संभ्रमात पडलेला तिन्ही जगांचा स्वामी भीतीमुळे तिच्यासमोर मस्तक झुकवता झाला. त्यावेळी त्याच्या मस्तकावरील (आपली सपत्नी) गंगा हिला पाहून पार्वतीने लत्ताप्रहार केला असता त्रिनेत्रधारकाची ही जी अवस्था झाली ती आमचे रक्षण करो.
धन्यवाद फारच अप्रतिम
धन्यवाद फारच अप्रतिम
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
गणपतीला नहायला घालताना
गणपतीला नहायला घालताना शिव-पार्वती
गोड!!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
शिवप्रिया
खूप लहानपणी किंवा कुमारवयीन काळात "शिवप्रिया" ही शुभांगी भडभडे यांची कादंबरी वाचली होती. अतोनात अतोनात आवडली होती. मिळवून परत वाचायची आहे. त्याच्या प्रस्तावनेत लेखिकेने लिहीले होते - तिला पार्वतीचे आकर्षण का वाटले. कारण लक्ष्मी ही सदैव पाय चेपताना असते. याउलट पार्वतीचे शंकराशी नाते फार "equality" चे आहे. दोघे गप्पा मारतात, त्यातून शंकर तिला विविध स्तोत्रे व विद्या प्रदान करतात तर कधी ती त्यांना. म्हणजे आदि फेमिनिस्ट ही पार्वती आहे. तिचा प्रेमविवाह सुद्धा आहे म्हणण्यास हरकत नाही
_____
तर पुस्तकात पुढे शंकर-पार्वतीच्या विवाहा चे व मीलनाचे अनुपम वर्णन येते. त्यात एक प्रसंग रंगविला आहे. विवाहोपरान्त पार्वती नववधू असल्याने, सलज्ज, अन तणावात होती टेन्स होती अन ती काही केल्या फुलत नव्हती, खुलत नव्हती. मग शंकरांच्या आज्ञेवरुन, एक एक गण काही काही क्रीडा, विदूषकी चाळे करुन दाखवू लागले, कोणी नृत्य तर कोणी गंमतजंमत अन सलज्ज, अधोमुख पार्वती हळूहळू कशी रिलॅक्स झाली, मोकळेपणाने हसू लागली.
ओह माय गॉड!!! ते वर्णन इतकं आवडायचं, मी ते पान परत परत वाचत असे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
शंकरपार्वती शृंगार
उपलब्ध कुमारसम्भव काव्य अपूर्ण आहे. त्याचे पहिले आठ सर्ग कालिदासाचे स्वतःचे आहेत. नवव्यापासून पुढे दिसणारे सर्ग अन्तर्गत तुलनेवरून काव्यगुणांमध्ये निश्चित डावे आहेत आणि कोणीतरी नंतर घुसविले आहेत, ते कालिदासाचे नाहीत असे बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे. सातव्या सर्गामध्ये शंकरपार्वती विवाह संपन्न होतो आणि आठव्यामध्ये त्यांच्या शृंगाराचे अतिशय उत्तान आणि मोकळे असे वर्णन आहे. हे वर्णन मातापित्यांच्या शृंगारवर्णनासारखे अनौचित्यदर्शक आहे असे असे जुन्या आलंकारिकांचे मत आहे.
कालिदास आठ सर्गांपुढे का गेला नाही ह्याची अनेक संभाव्य कारणे सुचविली जातात, यद्यपि कालिदासाबाबत चरित्रविषयक माहिती जवळजवळ नसल्यामुळे ह्यातले अमुक कारण योग्य आणि तमुक नाही असे काहीच सांगता येत नाही. आठव्या सर्गातील उघड वर्णनामुळे कालिदासावर त्याच्या सहकार्यांनी टीका केली, कालिदासाला स्वतःलाच असे वर्णन केल्याचा पश्चात्ताप झाला, येथपासून आठ सर्गांनंतर तो मृत्युवश झाला असावा अशी अनेक कारणे दिली जातात.
तुम्ही म्हणता ते पार्वतीला खुलविण्याचे वर्णन सातव्या सर्गाच्या शेवटच्या श्लोकात आहे मात्र ते शुभांगी भडभडेनिर्मित फुलोर्यापासून मुक्त आहे. कालिदास लिहितो:
अपि शयनसखीभ्यो दत्तवाचं कथंचित् प्रमथमुखविकारैर्हासयामास गूढम्॥
शंकराने गौरीचे मुख आपल्याकडे वळवतांना नवपरिणयाच्या लज्जेमुळे गौरी ते चोरून घेऊ लागली आणि आपल्या सख्यांना तिने कसेबसे काहीतरी सांगितले. तेव्हा शंकराने प्रमथ इत्यादि गणांच्या तोंडे वेडीवाकडी करण्याच्या युक्तीने तिला हसविले.
विद्यार्थ्यांसाठी महाकाव्यांच्या सटीक आवृत्त्या काढणारे एम.आर.काळे ह्यांनी तर पहिले सातच सर्ग छापले आहे. आठवा सर्ग त्यांना फारच 'अब्रह्मण्यम्' वाटला असावा.
शंकराने गौरीचे मुख आपल्याकडे
आई ग!!! किती मधुर!!! किती सुंदर!!
____
हा श्लोक आजपासून प्रार्थनेत ठेवणार (अंतर्भाव करणार). अतिशय गोड अन प्रासादिक आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...