Skip to main content

आले!

एनाराय चर्चा http://www.aisiakshare.com/node/3879 चाललीये, म्हणून माझी कविता शेअर करावीशी वाटली:

भारतात, घरी,
चार मोठ्या-लहान माणसांत,
जाऊन आले.
घरांचे उडत, उडत जाणारे रंग
पाहून आले.

आई-बाबांचं नुस्तं असणं
त्यांचे फुटकळसे राग-लोभ
लटक्या कंटाळ्याने हलके झेलित
मजेमजेने सोसून आले.

जुन्याच रस्त्यांवर नव्याने हरवले,
मग नव्याच ओसाड जागा शोधून,
तिथेच तात्पुरते तंबू ठोकून,
वस्ती करून आले.

प्रवाहातल्या दगडापरी
पाण्यातही अडखळले
बर्फाचं मन पाण्यात
चिंब भिजवून आले.

माझ्याच रंग-रूप आकाराची
एक कागदी बाहुली म्हणून
कधीकाळी "जमलेली" भूमिका
कशीबशी वठवून, आले.

होतं नव्हतं तेवढं बोलणं
मनातून संपून गेलं
नीरव रितेपणाचा आहेर
मनात भरून घेऊन आले.

आठवणींचे वर्ख उडायला लागले
आजचे वास्तव भिनायला लागले
हृदयाचे ठोके वाजायला लागले
तशी घाबरून, पळून का आले?

स्वत:च्या गेले
दूर?
कि जवळ?
उत्तरांना प्रश्न
शोधून आले.

विवेक पटाईत Mon, 30/03/2015 - 17:17

आठवणींचे वर्ख उडायला लागले
आजचे वास्तव भिनायला लागले
हृदयाचे ठोके वाजायला लागले
तशी घाबरून, पळून का आले?

हे आवडलं

शुचि. Mon, 30/03/2015 - 19:00

ह्म्म्म खरे आहे. पण भारतात गेल्यावर एक कळतं की त्या लोकांनाही आपली काहीही चिंता नाही, की काही पडलेले नाही. तेव्हा विशेष रुखरुख लागत नाही.

राजन बापट Mon, 30/03/2015 - 21:13

कविता आवडली. ती एनाराय संदर्भ सोडून वाचली त्यावेळी त्यातलं एकारलेपण सरलं आणि त्यावेळी अधिक आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 31/03/2015 - 00:47

In reply to by राजन बापट

मुसुमामांशी सहमत.

जुन्याच रस्त्यांवर नव्याने हरवले,
मग नव्याच ओसाड जागा शोधून,
तिथेच तात्पुरते तंबू ठोकून,
वस्ती करून आले.

जुन्या नात्यांमध्ये नवीन ओळखी शोधण्यापेक्षा नवीन नात्यांमधून स्वतःला शोधताना अशी भावना आली नाही. पण तुझे विचार पोहोचले.