त्या दोघी.
त्या घरात दोघी बाया रहातात.
एकीच्या पाठीवर पंख आहेत,
तर दुसरीच्या पायात पैजण.
दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात,
ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात.
पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर,
तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर.
दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात,
एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात.
घर बिचारं दमून जातं,
पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा,
पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं.
दिवस मावळत येतो.
पंख दमतात, पैंजण थकतात,
दोघीजणी एकमेकींना सामोर्या येतात.
पंखवालीला वाटतं,
आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा;
तर पैंजणवालीला वाटतो
तिच्या पंखांचा हेवा.
दोघींच गळ्यात गळे घालतात,
एकमेकींना मौनातून समजावून घेतात.
पंखांशेजारी पैंजण मान टाकतात,
तेव्हा दोघींचे डोळे भरून येतात.
त्यांचं घर भिजत रहातं,
त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.
प्रतिक्रिया
ओढ
पंखांना ओढ पैंजणांची.
कवितेचा आशय आवडला.
आपल्याच मनातल्या दोन
आपल्याच मनातल्या दोन प्रवृत्तींचा - संघर्ष नाही म्हणता येत, पण सहजीवनात येणारा सहसंबंध चांगला मांडला आहे.
(No subject)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान
कविता आवडली
ओहोहो!
अंतरा तू माझी मैत्रिण असल्याने मला ही कविता कळलेली आहे. अतिशय अतिशय सुंदर, विलोभनिय अविष्कार केला आहेस. फारच आवडली. पैंजणाची रुणझुण पंखांना नाही आणि पंखांची झेप पैंजणांना नाही. सुवर्णमध्य साधावा कसा दोघींनी नृत्य करावे कोठे - आकाशात की धरतीवर?
पण अशीही जागा आहे जिथे जमीन आणि आकाश एकमेकांच्या ओढीने भेटतात - क्षितीज. त्या क्षितीजावरती दोघी मुक्त विहार करु शकतात - म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह न रहाता.
या क्षितीजाची प्रत्येकालाच ओढ असते हेही हवं तेही हवं
___
पेहीली ओ़ळ - "त्या घरात दोघी बाया रहातात." काढलीस तरी चालेल, धावेल.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद .
@तिरशिंगराव, ओढ वैगेरे नाही. एकाच बाईच्या मनात दोन स्वभाव वसलेले असतात. तिला घरट्याची उबही जपायची असते आणि कधीकधी घरट्याची सयही न राहू देणार्^या आभाळात फिरायचे असते.
@ शुचि, मी तुझी मैत्रिण नसते तरी तुला कळलीच असती कविता. पहिली ओळ नाही काढता येणार. कारण ते एकाच स्त्रीच्या मनातलं द्वंद्व आहे. 'स्त्री' च्या हे अधोरेखित कारण कितीही संवेदनाशील, घरगुती असला तरी सहसा ( हो, कारण अपवाद पाहिले आहेत) पुरुष बाहेर पडला की घर विसरू शकतो. "बाया" हे ही. कारण कदचित माझ्या आधीच्या पिढीचा 'कुटुंबासाठी नोकरी' हा विचार पक्का होता. माझ्या पुढच्या पीढीचा 'मी आणि मीच' हा विचार पक्का आहे. आपल्याच पिढीतल्या स्त्रिया कुटुंब, मी आणि करियर या त्रितालावर नाच करत असते.
क्षितीजरेषा काल्पनिक असते आणि तिला भेटायला जावं तो तो पुढेच सरकते.;) म्हणजे जिथे दोन्ही विचारांना समाधान लाभेल असं काहिही नाही.;)
क्षितीजरेषा काल्पनिक असते आणि
हेच्च! काही गोष्टी कल्पनेतच मिळतात.
सुंदर
आशयपूर्ण कविता ... आवडली.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||