गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी
मी बरेचदा बरेच ठिकाणी सायन्स फिक्शन, साय-फाय ह्या प्रकाराबद्दल बोलतो. बहुतांशी संवाद ठराविक वळणावर जातात.
ते - काय वाचतोस/बघतोस तू?
मी - सायन्स फिक्शन.
ते - अरे वा! स्टार वॉर्स की स्टार ट्रेक?
मी - मला .. दोन्ही फारसे नाही आवडत. ॲक्चुअली मी ..
ते - हॅ हॅ हॅ .. अच्छा! म्हणून कलटी मारतात.
फ्रेंड्स न आवडणारा माणूस असूच शकत नाही असा जो एक लोकप्रिय समज आहे त्याचंच हे एक जुळं भावंड. सायन्सफिक्शन आवडतं आणि स्टार वॉर्स नाही?
हॅट.
ह्यात मला नवं काही नाही. पण परवा एकदा एकाने अशीच सुरूवात केली आणि मग अचानक म्हणाला - "खरंय. मला ह्यापेक्षा ॲसिमोव जास्त आवडतो. किंवा खरं तर क्लार्कसुद्धा. तुला?"
माझ्या हृदयात थोडंसं डचमळलं. पुस्तकातल्या काही उताऱ्यांची देवाणघेवाण केल्यावर मग आम्हाला दोघांना आनंद झाला.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे सध्या वाचून संपवलेली पुस्तकमाला- "the remembrance of earth’s past" अर्थात गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी.
पुस्तक काय आहे आणि त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध वगैरे सांगतोच, पण त्या आधी थोडी पार्श्वभूमी.
=======================================
सायन्स फिक्शन म्हटल्यावर बरेचदा आपल्यापुढे एक ठराविक प्रतिमा येते - काही अवाढव्य यंत्रमानव, अवकाशयानं, उडत्या तबकड्या, कालयंत्रातून भूतकाळात किंवा भविष्यकाळात गेलेले लोक इ. इ. आणि जवळपास सगळे सिनेमे आणि मालिका (इंग्रजी सिरीज.) हेदेखील त्याच पठडीतलं मनोरंजन आपल्यपुढे सादर करीत असतात.
आताशा काही अतिशय उल्लेखनीय अपवाद ह्यासगळ्यापलीकडे जाऊन नवीन काही सादर करत आहेत पण ते तुरळक.
बहुतांश वेळा सायन्स फिक्शन हे सासबहू ह्या प्रकाराइतकंच घिसंपिटं झालं आहे. घिसंपिटं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे - फार रटाळ.
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी" हे पुस्तक ह्या सगळ्या प्रकाराला एक सणसणीत चमाट मारतं.
उदा. इसवी सन ४५०६ मधे पृथ्वीवर कोण रहात असेल, ते काय करत अस्तील ह्या सगळ्यावर लिहिताना लेखक फार फार तर आकाशात उडणाऱ्या गाड्या, तत्काळप्रवास(टेलिपोर्टेशन), रोगराईचा नाश अशा ठरलेल्या गोष्टीच पुन्हा पुन्हा चितारतात. शस्त्रांबद्दल लिहिताना रंगीत लेसर किरणांचा (ह्याला भालबा केळकरांनी कुठल्याश्या पुस्तकात लासर किरणं म्हणून माझं बालपण उजळून टाकलं होतं) मारा करणारी पिस्तुलं दाखवतात. अतिशय पुढारलेली शस्त्रं दाखवायला भली थोरली मिसाईल्स किंवा अतिसंहारक असे अणुबाँब असतात.
कुठेतरी एखादं वर्महोल (कीटकविवर! भालबा, थँक्स) असतंच. त्यातून ही यानं चट मंगनी पट ब्याह करून येजा करतात.
अत्यंत सहजतेने पृथ्वी ते गुरू हे अंतर पार करतात. त्या यानातले कॅप्ट्न्स गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बसून सगळे हुकूम देत असतात आणि खिडक्यातून आजूबाजूचं "अवकाश" बघतात.
हॅकर्स तर काय चड्डी काढावी तितक्या सहजतेने कुठल्याही बँकेच्या सिस्टीम्स हॅक करतात आणि मग बसकट आवाजात म्हणतात "आय ॲम इन".
सुक्काळीच्या, इतकं सोप्पं असतं का रे?
असो. तो एक शेप्रेट विषय आहे.
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी"तला भविष्यकाळ अशा बाळबोध आणि थिल्लर कल्पनांना फाटा मारून थोड्या मोठया माणसांचा भविष्यकाळ आपल्याला दाखवतं.
मुख्य म्हणजे अंतराळ प्रवास, यानं आणि एकंदरीतच विश्वाच्या स्वरूपाबद्दल जरा प्रगल्भतेने विचार करतं. भविष्यकाळ वाटतो तितका साधासोपा नाही आणि त्याला अनेक पैलू असतील हे आपल्याला उलगडून दाखवतं.
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी." वाचताना कित्येकदा थांबून रेफरन्सेस वाचले जातात, लेखकाच्या चुकाही दिसतात. पण मांडायला गेलेलं दृश्य इतकं भव्य आणि मेंदू दिपवणारं आहे की माझ्यातर्फे असल्या कितीही चुका लेखकाला माफ.
सलाम आहे आपला.
===================================
नमनाला घडाभर तेल घातल्यानंतर पुस्तकावर येतो. कथा वगैरे सांगायचा प्रश्नच येत नाही. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर "गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी" हेच ह्या पुस्तकाचं कथानक आहे.
मला पुस्तकातल्या स्पॉयलर्स टाळायच्या आहेत आणि पुस्तकाबद्दल बरंच बोलायचंही आहे. तेव्हा मी इतर पुस्तकांमधल मजकूर आणि त्याचं "गतकाळा..."शी साम्य ह्याबद्दल लिहीन .
१. स्पेस किंवा अवकाश हा विषय चावून चोथा झालेला आहे. त्यात नाविन्य आणणं कठीण काम. हार्ड सायन्स फिक्शन हा तसा कठीण प्रकार. ह्यात माणसांना कमी महत्त्व असतं. जे काही महत्त्व आहे ते इथे विद्न्यानालाच. उदा. "rendezvous with rama" ही क्लार्कची कथा. ह्यात माणसांमाणसांमधले संबंध, व्यक्तीचित्रं हा प्रकार दुय्यम आहे. असं बघायला गेलं तर ही खरं तर लेखकाची कमजोरी. जर माणसं चितारता आली नाहीत तर मग लेखनाच्या मुख्य उद्देशालाच हादरा बसायला हवा, पण तसं होत नाही.
कारण ही माणसं "rendezvous with rama" मधे जे काही जग अनुभवतात, ते इतकं वेगळं आणि इतकं अनाकलनीय आहे की त्याला चितारून वाचकांपुढे ठेवायला प्रचंड ताकदीचा लेखक हवा.
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी"मधे अशा अनेक संकल्पना चितारल्या आहेत ज्यांची कल्पना करणं आपल्याला कठीण आहे. त्या "फँटसी" किंवा "परीकथा" नाहीत. त्यांना सणसणीत शास्त्रीय आधार आहे. ह्या शास्त्रीय आधारांवर बेतलेल्या अनेक कथा गुंफून लेखकाने एक सलग पट निर्माण केलाय.
२. बाकी कुठल्याही पुस्तकांत नसलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे - पट. स्केल. विषयाचा अवाका.
अवकाश, अंतराळ ह्या कल्पनेची भव्यता समजणं अतिश्य कठीण आहे. सूर्यापासून ३० प्रकाशवर्ष दूर म्हणजे काय आणि किती लांब? हे सांगणं अशक्य आहे.
आपण भले म्हणू की हे अंतर कापायला सध्याच्या सर्वाधिक वेगवान यानाला २०००००३०४३०४२३४२३४२३४२३४ वगैरे वर्षं लागतील- पण ते तितकं साधं नाही.
असे काही तारे - त्यांच्या दीर्घिका- त्यांचे समूह- त्या समूहांचे समूह. बरेचदा सायन्स फिक्शन अशा अंतरांना सोप्पं करून टाकतं किंवा अवाक्यात तरी आणतं.
पण परिस्थिती त्याहून गंभीर असेल तर? समजा ही अंतरं पार करताच आली नाहीत तर? विश्वात असे बंद कोपरे असतील जिथे जाताच येत नसेल तर?
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी" मांडताना वारंवार जाणवतं की कथेची खरी ताकद आहे ती ह्या विस्तृत पटात. अवकाशाचा विचार करताना लेखकाची ह्या पटावर विचार करायची ताकद हवी. पृथ्वीवरच्याच अंतरांचा विचार करून लिहिलेली अवकाशकथा म्हणजे मग मराठी चित्रपटात बंगल्यात बसून शिक्रणाचा ब्रेकफास्ट केल्यागत प्रकार आहे.
३. शस्त्रं. भविष्यकाळातला माणूस किंवा अतिशय प्रगत परग्रहवासी - काय आणि कशी शस्त्रं वापरतील? चित्रपटात अगदी बाळबोध पद्धतीने हे दाखवलं जातं.
उदा. स्टार वॉर्समधल्या लेसर तलवारी. किंवा मग पृथ्वीचा विनाश करू शकतील इतका मोठा बाँब. बस. कल्पनेच्या भराऱ्या इथवरच संपतात.
पण हजार वर्ष पुढारलेली संस्कृती काय करू शकते ह्याची चुणूक आपल्याला ह्या पुस्तकात बघता येते. इतकी पुढारलेली संस्कृती किती उर्जा वापरेल आणि त्या उर्जेचा वापर कशाप्रकारे करू शकेल हे शास्त्रीय माहितीवर आधारित असेल तर त्या आधारावर किती वेगळं सायन्सफिक्शन चितारता येतं ते कळतं.
हार्ड सायन्स फिक्शन ह्या प्रकारात हे पुस्तक मोलाची भर घालतं.
======================
असो. जे कुणी सायन्स फिक्शनचे फ्यान असतील त्यांनी नक्कीच वाचावं.
शिवाय मराठीत ह्या पुस्तकाबद्दल कुठे काही लिहिलेलं दिसलं नाही म्हणून ही एक छोटेखानी भर.
पुढे काही सुचलं तर आगाऊपणे हाच लेख पुन्हा वाढवून लिहीन.
पुस्तकाचे तपशील -
https://en.wikipedia.org/wiki/Remembrance_of_Earth%27s_Past
समीक्षेचा विषय निवडा
कोकण आणि अमेरिकेचे नातेही तसे
कोकण आणि अमेरिकेचे नातेही तसे पुरातनच- ओक रिज, ओकलँड, इत्यादी नावे पाहता कोकणातील ओक घराण्याचा तिथला दबदबा लक्षात येतो. त्यांनी लावलेल्या महाप्रचंड वृक्षांना ओक वृक्ष असे युरोप व अमेरिका या दोन्ही ठिकाणी संबोधले जाते आजही.
अहो, बाकी सोडा- खुद्द अमेरिका हे नावच कोकण्यांमुळे आले आहे. कोकणच्या परसदारात, कातळकड्यांवर उगवलेले अतिमधुर आम्र घेऊन कोकणचे खलाशी जगभर विकीत- ज्या ठिकाणी त्यांना सर्वांत जास्त फायदा झाला त्या भागाचे नावच पुढे "आम्र-विका" अर्थात बोबड्या यवनांमुळे अमेरिका असे झाले.
शुचि,
शुचि,
"कधीच" जाता येणार नाही असे भाग विश्वात असले तर?
समजा आपल्या सूर्यमालेच्या बाहेरच जर आपल्याला जाता आलं नाही तर?
आणि ही तांत्रिक मर्यादा नसून जर भौतिकशास्त्रातली एखादी मूलभूत मर्यादा असेल तर?
डोस्तोएव्स्कीच्या बहुख्यात उदाहरणाचा१ आधार घ्यायचा झाला तर - आपण विश्वाला नेहेमीच अनंत अथांग अशा विशेषणांनी संबोधत आलो आहे.
जर विश्व तसं नसून एखादा भौतिकशास्त्राच्या चमत्कृतींनी बनवलेला पिंजरा आहे हे समजलं तर माणसाची काय अवस्था होईल?
आणि इतर काही परग्रहवासियांसाठी ही वस्तुस्थिती नसेलही- मग आपला जळफळाट नाही होणार?
मुद्दा भरकटलेला वाटेल पण अधिक तपशीलाने काही डकवतो.
-----------------
१- हे इथे.
विश्वरुपदर्शन
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी"तला भविष्यकाळ अशा बाळबोध आणि थिल्लर कल्पनांना फाटा मारून थोड्या मोठया माणसांचा भविष्यकाळ आपल्याला दाखवतं. मुख्य म्हणजे अंतराळ प्रवास, यानं आणि एकंदरीतच विश्वाच्या स्वरूपाबद्दल जरा प्रगल्भतेने विचार करतं. भविष्यकाळ वाटतो तितका साधासोपा नाही आणि त्याला अनेक पैलू असतील हे आपल्याला उलगडून दाखवतं. "गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी." वाचताना कित्येकदा थांबून रेफरन्सेस वाचले जातात, लेखकाच्या चुकाही दिसतात. पण मांडायला गेलेलं दृश्य इतकं भव्य आणि मेंदू दिपवणारं आहे की माझ्यातर्फे असल्या कितीही चुका लेखकाला माफ.
तंतोतंत!
जगड्व्याळ हा एकच शब्द ह्या पुस्तकमालिकेच्या पटासाठी योग्य आहे. (त्या दृष्टीने ह्या मालिकेचं प्रूस्टियन शीर्षकही चपखल). विस्ताराने (आणि वाटल्यास स्पॉयलर्स पांढऱ्या शाईत घालून) याबद्दल लिहिलंत तर वाचायला आवडेल.
पृथ्वीवरच्याच अंतरांचा विचार करून लिहिलेली अवकाशकथा म्हणजे मग मराठी चित्रपटात बंगल्यात बसून शिक्रणाचा ब्रेकफास्ट केल्यागत प्रकार आहे.
खी: खी: खी: ;)
अवांतर:
१. कल्चरल रिव्हॉल्युशनसारखे वैज्ञानिक तपशीलांच्या पलीकडले धागे पुढे संख्येने काहीसे रोडावत जातात आणि कादंबरीमालिकेचा आंतरराष्ट्रीयपणा बराचसा चीन आणि युरोप/अमेरिका यांच्यातच घुटमळतो ह्या बारक्या तक्रारी - पण अर्थात, ही वैगुण्ये नव्हेत.
२. ह्या संदर्भात हा दुवाही वाचनीय:
How Chinese novelists are reimagining science fiction
(दुवाश्रेय: बॅटमॅन)
आचरटबाबा,
आचरटबाबा,
उत्तम प्रश्न :)
सध्या तरी केमिकल लोचे वापरून किंवा मग अणुभट्टी (काय शब्द आहे!) वापरून.
व्हॉयेजर १ आणि २ मधे अणुभट्ट्या आहेत- त्यांना कुठेही थांबायचं नसल्याने ते चालून जातं. कॅसिनीसदृश यानांना पुन्हा त्वरण कमी करण्यासाठी रॉकेट्स लागत असावीत ज्यायोगे ती ग्रहप्रदक्षिणा करू शकतील.
भविष्यातल्या यानांकरिता पुष्कळ पर्याय आहेत. प्रोजेक्ट डिडॅलस. प्रोजेक्ट ओरायन, रॅमजेट ही काही नावं आठवत आहेत. अर्थात हे सगळे सध्या कल्पनावस्थेतच.*
----
*आता अदिती ह्यातल्या चुका सुधारून शास्त्रीय माहिती देऊ शकेल.
नाय हो...
उगाच माझ्याबद्दल मोठ्या कल्पना आहेत तुझ्या, झालं. अवकाशयानं वगैरे गोष्टी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत कधीही नव्हत्या. मग अत्यंत मर्यादित प्रमाणात रेडिओ खगोलशास्त्र माहीत होतं. (भूतकाळ - आता ते किती आठवेल याबद्दल शंका आहेतच, शिवाय सध्या काय सुरू आहे याचं गॉसिपही माझ्याकडे नसतं.)
विज्ञानकथांबद्दल मला फारसं प्रेम कधीच नव्हतं. मला ते सगळंच अचाट, अतर्क्य आणि त्यामुळे कंटाळवाणं वाटत असे. अजूनही वाटतं. 'स्टार ट्रेक - व्हॉयेजर' तेवढं मी बघितलं. तेही विज्ञानकथा म्हणून बघण्यापेक्षा मुख्य पात्र स्त्री असल्यामुळे बघितलं. त्यातही 'सबस्पेस फोल्डिंग', 'फोटॉन टॉर्पिडो' वगैरे तपशील जोरदार सुरू झाले की मला हसायला येतं.
'ब्लॅक मिरर'ला विज्ञानकथा म्हणायचं का नाही, माहीत नाही. तीच गोष्ट 'एक्स मशीना' किंवा 'हर'ची. या गोष्टी शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात. त्यामुळे त्यातून जी कॉमेंटरी केली आहे, तिकडे लक्ष जातं आणि ते महत्त्वाचं वाटतं, आवडतं.
हा हा हा...
मी अगदीच टाकाऊ नाहीये.
नैतिकतेच्या कल्पनाच निराळ्या असल्या किंवा व्यक्ती म्हणून आपली शारीरिक-मानसिक क्षमताच निराळी असेल तर निराळे प्रश्न उद्भवतात; ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठली नैतिकता योग्य वगैरे प्रश्न मला आवडतात.
विमानाला थोडे टर्ब्युलन्स लागले किंवा वळणावर गाडीचा वेग जरा जास्त झाला की टरकणारी मी! प्रकाशाच्या दहापट आणि १०० पट वेग किंवा १०० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा वगैरे गोष्टींचं मला काय कौतुक वाटणार!!
उत्खनन...
आजच हा लेख वाचून या लेखमालिकेची आठवण झाली:
https://www.newyorker.com/magazine/2019/06/24/liu-cixins-war-of-the-wor…
हा लेख वाचल्यापासून मनात
हा लेख वाचल्यापासून मनात ठरवलेलं की हे पुस्तक वाचायचं. आज उद्या करत करत शेवटी नोव्हेंबर मध्ये पहिला भाग मागवला. आरंभशूर आहे हे माहीत असल्यामुळे आधी पहिला भाग वाचून झाल्यावरच दुसरा मागवायचा असं ठरवलं. पण लेखात म्हटल्या प्रमाणे पुस्तकच इतकं जबरी लिहिलंय की पहिला भाग कधी संपला कळलं पण नाही. दुसरा मात्र सुरुवातीला थोडा रेंगाळल्यासारखा वाटल्यामुळे वाचन लांबलं. पण lockdown सुरू झाला आणि मग दुसरा आणि तिसरा पण संपवला. आज संपल्या संपल्या ही कॉमेंट टाकतोय.
या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अस्वल यांचे आभार. म्हणजे हे औपचारिक नाही. खरच मनापासून आभार. या पुस्तकाने डोक्याला खाद्य तर दिलंच पण त्याचबरोबर सध्याच्या काळात काही वेळ का होईना एक anaesthesia म्हणून काम केलं.
काही भौतिकशास्त्रीय गोष्टी डोक्यावरून गेल्या, नाही असं नाही. पण त्या कमालीच्या तांत्रिक असल्यामुळे असावं. काही गोष्टीत असं झालं की ज्यादा कुछ समझा नही पर अच्छा लगा.
वाचताना आणि वाचून झाल्यावर अनेक प्रश्न पडले. काही कल्पना पाहून हां असं काही आपल्याही डोक्यात आलेलं हे पाहून थोडं समाधानही वाटल. मनात गाडले गेलेले विश्वाविषयीचे अनेक तर्क वितर्क पुन्हा उफाळून आले आणि छळायला लागले. पण या छळात पण मजा आहे.
पुस्तकात सगळ्यात विशेष वाटलेली बाब म्हणजे भौतिकशास्त्रातील गोष्टी जरी थोड्या अवजड वाटल्या तरी तत्विकदृष्ट्या पण पुस्तक तितकंच प्रभावशाली आहे. म्हणजे एक कथाकार म्हणून त्रुटी झाकण्यासाठी उगाच ढीगभर तांत्रिक आणि भौतिकशास्त्रीय क्षेपणास्त्रांचा मारा करून केवळ रिकाम्या जागा भरण्याचं काम लेखकाने केलेलं नाही. म्हणजे थोडक्यात वाचकाला शोधनिबंध वाचतोय असं वाटू नये याची पुरेपूर दक्षता घेतली आहे.
अजुन एक म्हणजे पात्रांचं महत्त्व एका ठराविक मर्यादेपेक्षा वाढवण्याचा मोह लेखकाने हुशारीने टाळलाय. म्हणजे सहसा अनेकदा लेखक आपल्या पात्रांच्या इतक्या प्रेमात पडतात की मग एक तर पात्रांना सुरुवातीपासून शेवटर्यंत रेटत नेतात नाही तर मग अवेळी मृत्यू देऊन अजरामर करण्याचा प्रयत्न करतात. हे लेखकाने पद्धतशीरपणे टाळलंय.
म्हणजे एका भागात अतिशय महत्वाची असलेली पात्र दुसऱ्या भागात इतरांच्या गर्दीत बेमालूमपणे मिसळून जातात. त्यांना भयानक मृत्यू देऊन लोकांना धक्का देण्याच्या वगैरे भानगडीत लेखक पडत नाही आणि हे त्याने बरोबर साधलय. कहाणीचा गाभाच इतका गहन आहे की लोकांना पात्रांच्या प्रेमात लेखक पडूच देत नाही. जणू काय कधी ही लोकं आधी अस्तित्वातच नव्हती असं वाटतं आणि कहाणी पुढं सरकत राहते.
धन्यवाद अस्वल भाऊ
अस्वला, भारी लिहितोस.
अस्वला, भारी लिहितोस.
"लासर किरणं " - कोकणीत 'लासप' = जळणे हे क्रियापद आहे.