डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 3)
कायद्याचा प्रश्न
डिजिटल तंत्रज्ञानाच्या बेसुमार (आणि गैरव्यवहारासाठी होत असलेला त्याचा) वापर देशातील कुठल्या कुठल्या कायद्यांचे उल्लंघन करत आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. एक मात्र खरे की अमुक अमुक कायद्याचे उल्लंघन होत आहे असे समजल्यावर बहुमताच्या जोरावर कायदाच बदलून टाकणे हा काही निकोप लोकशाहीला हितकारक ठरणार नाही. हे नियंत्रक तंत्रज्ञान आपले निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेणार हे मात्र नक्की. रिमोट कंट्रोल वापरून जनसामान्यांच्या वर्तनात बदल करून शिस्त लावण्याचा प्रयत्न होत असल्यास हा समाज डिजिटल गुलामगिरीकडे वाटचाल करत आहे असे म्हणावे लागेल. कारण संपूर्ण समाज नियंत्रण करणाऱ्याच्या हातातील बाहुली ठरणार आहे. मात्र नियंत्रक तंत्रज्ञान काही प्रमाणातच प्रभावी ठरू शकते. तरीसुद्धा जनसामान्यांचे स्वातंत्र्य हळू हळू कमी होत जाणार आहे. आणि असे काही तरी घडत आहे याची कल्पनासुद्धा येणार नाही. आणि यासंबंधात विरोध करण्याइतपत कुवतही जनसामान्यात राहणार नाही.
या संदर्भात इमॅन्युएल काँट यांचे एक वाक्य उचित ठरेल. जेव्हा एखादे स्टेट प्रजेच्या हितासाठी आपणहून प्रयत्न करू लागते तेव्हा स्टेट एकाधीकारशाहीच्या आधीन असते. मुळात वैयक्तिक विकासाचे अधिकारच प्रत्येकाच्या जीवनाचे नियंत्रण करू शकतात. इतर कुणीही नाही. यासाठी स्वयंनिर्धाराची गरज भासते. आणि या गोष्टी लोकशाही राष्ट्रात घटनादत्त असतात. घटनेच्या चौकटीत राहूनच वैयक्तिक विकास करून घेणे यात अपेक्षित असते. त्याचबरोबर इतरांच्या हक्काचे सन्मान करत नसल्यास ती लोकशाहीच नव्हे. आणि या हक्कांचेच नियंत्रण करण्याचा घाट घालत असल्यास राज्यघटना, समाज व स्टेट यांची गळचेपी केल्यासारखे होईल.
जाहिरातीचा भडिमार करून वस्तु खपविल्याप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानसुद्धा मानसिक दबाव तंत्र वापरू शकते, मानसिकतेचे नियंत्रण करू शकते. जाहिरातीत दिशाभूल करणाऱ्या गोष्टी असल्यास तो गुन्हा ठरतो. मुळात ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणे व काही डाव वापरून मानसिकता बदलणे वा अजाणतेपणाने त्याच्यावर छाप पाडणे हेसुद्धा कायद्याने निषिद्ध ठरते. एखाद्या सॉफ्ट पेयाची जाहिरात फक्त काही क्षण दाखवून दुसरे काही दाखवत असल्यास त्या काही क्षणाची जाहिरातच प्रेक्षकांवर अजाणतेपणाने परिणाम करू शकते. व्यक्तीच्या संबंधातील डिजिटल माहितीवर कुठलीही प्रक्रिया करणे हे सुद्धा बेकायदेशीर आहे.
कुठल्यातरी दगाबाजाच्या हाती ही वैयक्तिक माहिती पडल्यास त्याचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री देता येणार नाही. खुल्या बाजारव्यवस्थेतील जीवघेण्या स्पर्धामध्ये अगोदरच समानतेला कुठलाही वाव नाही. वाढत्या भेदभावामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. उत्पादनाची किंमत ठरवताना पारदर्शकता नाही, कायद्याचा वचक नाही, गुणवत्तेवर नियंत्रण नाही. अशा स्थितीत व्यापारी कंपन्या आपले उत्पादन खपवण्यसाठी काहीही करण्याच्या पावित्र्यात असतात. जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आपला माल बाहेर जाण्यास अत्यंत उत्सुक असतात. व बाहेरच्या देशातला माल स्वतःच्या देशात आणण्यास मात्र विरोध करत असतात.
या गोष्टीकडे सरकार मात्र डोळे झाकून बाजार व्यवस्था काय ठरवेल ते स्वीकारण्याच्या मूडमध्ये असते. संक्रमण काळातील समस्या म्हणून दुर्लक्ष करते. आणि ही स्थिती भविष्यकाळात बदलेल अशी खोटी आश्वासनं देत वेळ मारून नेते. कुठल्याही गोष्टींची पहिल्यांदा प्रायोगिक स्वरूपात ओळख करून देताना मानवी नीतीमूल्यांचे उल्लंघन तर होत नाही ना याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे, हा एक अलिखित संकेत नेहमीच पाळला जात असतो. लाखो रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या औषधाची चाचणी घेत असताना हजारोंना मारण्याचा परवाना दिलेला नसतो. शंभर लोकांना मारून हजारोंचा जीव वाचवण्याचे लंगडे समर्थन येथे चालत नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुणाच्याही जिवाला धोका पोचणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे डिजिटल युगात भविष्यात केव्हा तरी सगळे सुरळित होईल म्हणून आता काहींचा बळी दिला तरी चालेल हा हिशोब करता येत नाही. फेसबुक-सारखी समाजमाध्यमांची पहिल्यांदा प्रस्तुत करण्यापूर्वी त्याचे समाजावर काय परिणाम होऊ शकतात याची चाचणीच घेतली नाही. त्यांच्या नियमनाचे कुठलेही कायदे अस्तित्वात नव्हते व आताही नाहीत. समाजात फार आरडा ओरडा झाल्यानंतर कंपन्याच काही तरी जुजबी उपाय सुचवतात व त्यावरच सरकारही संतुष्ट होत हात बांधून बसते. व नंतर केव्हातरी सरकारचे नियंत्रण येईपर्यंत कंपन्या भरपूर कमाई करून घेतात. आपल्या येथील मोबाइल कंपन्यांचा अनुभव हे अशा प्रकारच्या घिसाडघाईचे एक उत्तम उदाहरण असू शकेल.
सुपर इंटेलिजेंट संगणक
पुढील काळात या सगळ्या दुष्परिणामावर मात करणारे सुपर इंटेलिजेंट संगणकांचा (व त्याचजोडीने चॅटजीपीटीसारख्या अल्गॉरिदमचा) शोध लागल्यास व त्यात प्रचंड प्रमाणात ज्ञानाचा साठा असल्यास आपण त्याच्या सूचना व सल्ल्याप्रमाणे वागणार का असाही प्रश्न या संदर्भात विचारला जाऊ शकतो. आपण आपली विचारबुद्धी हरवून गुलामी पत्करावी का हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ही गुलामी यंत्राची का माणसाची हा मुद्दा गौण ठरतो. एक मात्र लक्षात ठेवायला हवे की सुपरइंटेलिजेंट मशीनचीसुद्धा कुणीही कितीही छातीठोकपणे चुकणार नाही असे सांगत असले तरी मशीन चुकू शकते हे मात्र विसरता येणार नाही. व ही चूक महागात पडू शकते. अशा चूक करण्याची संभाव्यता असलेल्या मशीनने दिलेल्या सूचनाप्रमाणे माणसं वागू लागल्यास त्या समाजाचे काय होईल याचा अंदाजही करता येणार नाही. वैयक्तिक माहितीतून फिल्टर फुग्यांचे आपल्या भोवती जाळे विणून आपली विचारशक्ती कुंठीत करण्याचा कुटील डाव यात असू शकतो. आपले विचार या डिजिटल तुरुंगात बंदिस्त होऊ शकतात. आऊट ऑफ दि बॉक्स विचार करणे व/वा सर्जनशीलतेला वाव असणे या गोष्टी इतिहासकालीन होऊ शकतात. शेवटी सुपरइंटेलिजेंट मशीन्सना केंद्रबिंदू मानून तंत्रज्ञानाचा वापर करत समाजाचे नियंत्रण करणे ही एका प्रकारे हुकुमशाही ठरू शकेल.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत गुलाबी वेष्टनातील हा फॅसिजम वरून लादला जाणार आहे व उदारमतवादी मुखवटा असलेल्या हुकुमशहाशी समाजाला सामना करावा लागणारा आहे. दबावतंत्र वापरून नागरिकांच्या आशा-आकांक्षात, निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करणाऱ्या यंत्रणेचा वेळीच धोका ओळखता येत नसल्यास इतके दिवस जतन करून ठेवलेल्या संस्कृतीचा, नागरिकतेचा, मानवी मूल्यांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. दबाव तंत्राचा वापर करून बहुतांश नागरिकांना एकाच साच्यात बसवणे कदाचित शक्य होईल. त्यांचे भवितव्य व निर्णयक्षमता यावर नियंत्रण करणेही शक्य होईल. परंतु हे सर्व जाहिरातबाजीतून करावे लागेल. या जाहिरातींना बळी पडून व्यक्तींचे व्यक्तिमत्व क्षीण करून त्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे शक्यही होईल. परंतु याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हा मुळात समाजसंस्कृतीवरील हा हल्ला असेल. कितीही जागतिक स्पर्धा असली तरी लोकशाही समाज व्यवस्था आपापल्या संस्कृतीना सुखासुखी त्याज्य करणार नाही. जागतिक व्यवस्थेत कुणाला आवडो न आवडो, बहुविध संस्कृतीला पर्याय नाही, हे मान्य करावे लागेल. अल्पसंख्यांकाचे व/वा विस्थापितांचेही काही हक्क असू शकतात याची जाणीवही होत आहे. पुढील काळात जगभरातील भांडवली व्यवस्था या बहुविध संस्कृतीचा वापर नफा कमावण्यासाठीसुद्धा कदाचित करू शकेल. आजच्या शतकाला आव्हान देत असलेल्या पर्यावरण संरक्षणासाठी सर्व राष्ट्रे एका छत्राखाली येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
क्रमशः
डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 1)
डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 2)
प्रतिक्रिया
गोड गोड असे काही घडणार नाही
माणूस एककल कोंडा होत आहे. भासमय डिजिटल तंत्र मध्ये तो रम मान आहे.
माहिती च महापूर पण खरी माहिती कोणती आणि खोटी कोणती हे कळत नाही
समाज म्हणून एकसंघ पना आता नाही.
लोकशाही साठी समाज एकसंघ लागतो..
समाज जिवंत लागतो.
तो जिवंत पना आता समाजात नाही.
लोकशाही डिजिटल युगात अजून जास्त धोक्यात येईल असे मला वाटत
डिजीटल युगामुळे भौगोलीक सीमा
डिजीटल युगामुळे भौगोलीक सीमा या निरर्थक होतात.
एखादा विचार त्या राजकीय भूभागात नसलेल्या व्यक्तीने मांडला तरीही त्याचे परीणाम त्या भूभागातील समाजावर घडू शकतात.
अशा वेळेस राजकीय आणि सामाजिक कौशल्य पणाला लागेल.
सुशिक्शीत् आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक असलेला समाज ही यासाठी मुख्य गरज असते. दुर्दैवाने असा समाज राजकीय घडामोडीमधे निष्क्रीय रहातो.
लोकांनी लोकांसाठी ;;;;;;;
पुढे लिहायची पण इच्छा झाली नाही.
जी लोकशाही ची व्याख्या आहे तशी लोकशाही जगात कुठेच अस्तित्वात नाही.
हुकुमशाही, मनगट शाही, भांडवल शाही, ह्या सर्व व्यवस्था जगात अस्तित्वात आहेत
लोकशाही जगात एका पण देशात अस्तित्वात नाही.
भारतात तर आपण मत ह्या व्यक्ती ल का देत आहे .
हेच ८०% वर शिक्षित,अशिक्षित लोकांना सांगता येणार नाही.
ही लोकशाही ची अवस्था आहे
लोकशाही
लोकशाही हे नाव घेतले तरी हसायला येते.
आपण रिअल स्थिती कडे दुर्लक्ष करून स्वप्नात का जगतो.
राज्यकर्ते लोक निवडून देतात म्हणजे लोकशाही असते का?
निवडणुका कशा होतात.
त्या बर कोणते घटक जास्त प्रभाव टाकतात.
लोकांची योग्य व्यक्ती निवडण्याची कुवत असते का.
एक नाही अनेक प्रश्न आहेत.
आणि हे सर्व मतदान चे नाटक करून जे सरकार येते सत्तेत.
ते सरकार त्यांची धोरणे फक्त आणि फक्त निवडणुकीत कोणी किती फंड दिला तो परत करण्यास काय धोरण असावीत .
तशीच धोरणे आखली जातात.
लोकांचा विचार करून लोकशाही मध्ये पण सरकारी धोरण ठरत नाहीत.
इतके कायदे आहेत की .
जो त्रासदायक ठरेल त्याचे सर्व मानवी हक्क सहज नाकारता येतात.
त्या साठी हुकूमशाही च गरज नसते
अल्पसंख्यांकाचे व/वा
बहुसंख्यांकांचे व/वा स्थानिकांचेही काही हक्क असू शकतात याची जाणीवही प्राधान्याने व्हायला हवी.
श्रेणी (अवांतर)
वरील प्रतिसादास कोणीतरी ‘पकाऊ’ अशी श्रेणी दिलेली आहे, असे निदर्शनास आले.
श्रेणीदात्याच्या भावना समजू शकतो. (कदाचित (बहुधा!), त्यांच्याशी सहमतही असू शकतो.) मात्र:
- (‘पकाऊ’ अशी, किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणतीही) श्रेणी दिल्याने प्रतिसाददात्यास पोच मिळते, व त्यातून (अप्रत्यक्षपणे) प्रोत्साहनही मिळते, हे श्रेणीदात्याच्या लक्षात येऊ नये काय?
(आमचेच उदाहरण घ्या. आम्हाला ‘पकाऊ’ श्रेणी मिळाल्यास आम्ही त्या अत्यंत positively घेतो – the more the merrier –आणि त्यातून केवळ प्रोत्साहनच नव्हे, तर अधिक उत्तेजन मिळून आम्ही अधिकाधिक पकाऊ प्रतिसाद प्रसवू लागतो, ही बाब येथील चाणाक्ष निरीक्षकांस आतापावेतो लक्षात आलेली नसल्यास… Shame on you! मग कसले तुम्ही चाणाक्ष निरीक्षक?)
(अवांतर: It takes one to know one.)
- त्यापेक्षा, अशा प्रतिसादांस श्रेणी, उपप्रतिसाद आदि कोणत्याही साधनांनी पोच न देता, त्यांना साफ दुर्लक्षाने मारले, तर? त्याने काही फरक पडणार नाहीसुद्धा कदाचित, परंतु, निदान आपल्या परीने उत्तेजन तरी मिळणार नाही.
(काही चाणाक्ष वाचक आजकाल आमच्या प्रतिसादांवर हा प्रयोग करू लागले असावेत, अशी शंका आम्हांस अलिकडे येऊ लागली आहे. If that is indeed the case… Bravo! At least, you learned something, finally!)
- कदाचित, ‘पकाऊ’ अशी श्रेणी ही प्रतिसाददात्याप्रति नसून, वाचकसदस्यांची व्यवस्थापनाप्रति इशारा देण्याची यंत्रणा असू शकते, की बाबांनो, हे झेपण्यासारखे (वाटत) नाही; याबाबत काही करा! म्हणून. तसे असल्यास, तोही प्रयत्न फोल आहे, असे सुचवावेसे वाटते. फार कशाला, व्यवस्थापनातील सदस्यांच्या नावाने (‘निव्वळ योगायोगा’च्या अंजीरपानामागून) आत्यंतिक गर्हणीय असे व्यक्तिगत प्रतिसाद जरी लिहिले, तरीसुद्धा (त्याबद्दल व्यक्तिगत निषेध नोंदविण्यापलीकडे) व्यवस्थापन त्यांवर कोणतीही कारवाई करीत नाही – किंबहुना, संबंधित गर्हणीय प्रतिसादसुद्धा जसेच्या तसे राहू देते – असा आजवरचा प्रघात लक्षात आलेला आहे. (ते अर्थात व्यवस्थापनाचे prerogative आहे; त्याबद्दल काहीही म्हणणे नाही.) मग, अशा परिस्थितीत, आपली श्रेणी व्यर्थ का दवडा, नि उलट प्रतिसाददात्यास विनाकारण प्रोत्साहन का द्या?
(एका प्रसिद्ध म्हणीच्या शब्दयोजनेत थोडा बदल करून म्हणावेसे वाटते, की, डुकराला ‘पकाऊ’ श्रेणी देऊ नका; व्यवस्थापन त्याबद्दल काहीही करीत नाही, डुकराला मात्र त्यातून फुकट प्रोत्साहन मिळते.) (डिस्क्लेमर: ‘डुक्कर’ हे येथे निव्वळ प्रतीकात्मक आहे; कोठल्याही (जिवंत वा मृत) डुकराशी काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. प्रस्तुत प्रतीकयोजनेतून डुकरांच्या भावना दुखावल्या असल्यास मी त्यांची मनापासून जाहीर माफी मागतो.)
(तसेही, श्रेणिप्रदानव्यवस्था ही व्यवस्थापनास signaling mechanism म्हणून अस्तित्वात वा अमलात आली असावी, याबद्दल साशंक आहे. (चूभूद्याघ्या.) (किंबहुना, मूठभरांची घटकाभर करमणूक, यापलीकडे काही गंभीर प्रयोजन त्यामागे असल्याचे आढळल्यास (निदान मला तरी) आश्चर्य वाटेल.) इत्यलम्।)
प्रतिसाद पावला.
एवढ्या demented मनुष्याला मानसिक आरोग्यासाठी मदतीची गरज आहे, हे त्या प्रतिसादातून स्पष्ट दिसतं. ती मदत करणं शक्य नाही म्हणून बाजूला बसावं असं माझं मत आहे.
Banality of evil मात्र दुर्लक्षणीय नसते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
> अल्पसंख्यांकाचे व/वा विस्थापितांचेही काही हक्क असू शकतात याची जाणीवही होत आहे.
‘व/वा’ याचा अर्थ नक्की काय होतो? ‘व व वा’ की ‘व वा वा’?
----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
चांगला प्रश्न!
(हे and/orचे सरळसरळ भाषांतर आहे, हे उघड आहे. परंतु त्यापुढे…)
मला वाटते, / हे चिन्ह ‘वा’ असा अर्थ सूचित करीत असावे. (थोडक्यात, ‘व वा वा’.)
मात्र, त्याउपर, Inclusive ORमध्ये, माझ्या कल्पनेप्रमाणे, AND ही शक्यताही अंतर्भूत असावी. (Exclusive ORमध्ये अर्थात ती येणार नाही.)
त्याहीपुढे, unless specified otherwise, OR हा सामान्यतः Inclusive OR मानण्यात यावा, असे वाटते. त्यामुळे, ‘व वा वा’मध्ये ‘व व वा’ हेदेखील (एक शक्यता म्हणून – परंतु एकमेव शक्यता म्हणून नव्हे.) अंतर्भूत व्हावे.
इथवर ठीक. परंतु, मुद्दा तो नव्हे.
‘वा’ हे unless specified otherwise जर Inclusive OR मानायचे असेल, तर मुळात ‘व/वा’ असे लिहिण्याची गरज काय? ‘वा’मध्ये ‘व’ हीसुद्धा शक्यता जर अंतर्भूत असेल, तर मग नुसते ‘वा’ लिहून पुरायचे नाही काय?
तर यामागचे कारण बहुधा layman’s misinterpretationला जागा राहू नये, हे असावे, असे मला वाटते. (चूभूद्याघ्या.)
——————————
(अवांतर: यावरून एक जुना, पाचकळ विनोद आठवला. एकदा एक मुलगा एका वकिलाच्या मुलीला घेऊन डेटवर जातो. काय कुठे इकडेतिकडे हातबीत लावत असेल, त्यावर तिचा प्रतिसाद: ‘Stop, and/or I will slap you!’)
(अतिअवांतर: ‘Damned if you do, damned if you don’t’ असे नेमक्या याच परिस्थितीला म्हणत असावेत काय?)
——————————
(परंतु, कदाचित आपल्या प्रश्नाचा रोख काही वेगळा असावा. चूभूद्याघ्या.)
> कदाचित आपल्या प्रश्नाचा रोख
> कदाचित आपल्या प्रश्नाचा रोख काही वेगळा असावा.
नाही, रोख हाच होता. परंतु, दुर्दैवाने, ‘व व वा व व वा वा’ की ‘व व वा वा व वा वा’ असा एक नवा प्रश्न तुमच्या प्रतिसादातून उभा राहतो. इथून पुढे जनरेटिव्ह ग्रामरची गिरणी लावली तर हा धागा असाच पुढे शून्यमंडळापर्यंत वाढवत नेता येईल.
पण तसं न करणंच इष्ट. एकतर आमचं उपनाम अमराठी असल्यामुळे आम्ही पडलो उपरे व/वा व्हल्नरेबल. तेव्हा उगीच एंटायटलमेंटचे वगैरे आरोप व्हायचे. त्यापेक्षा ‘व/वा’ न वापरणे हा ‘मूले कुठार:’ छाप उपाय जास्त बरा वाटतो.
-------
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
ज चि यांच्या प्रतिसादात
‘व व वा व व वा वा’ *की* ‘व व वा वा व वा वा’ या ऐवजी ‘व व वा व व वा वा’ *वा* ‘व व वा वा व वा वा’ असे वाचायला आवडले असते.