आपण कुठे अन ते कुठे - मराठी कविता
नमस्कार.
'आपण कुठे आणि ते कुठे' अशा शीर्षकाचा चर्चाविषय मांडताना धाकधूक आहे कारण तितकेसे शास्त्रीय अथवा अभ्यासक्रमात असते त्याप्रमाणे ज्ञान मिळवलेले नसल्याने ही मते केवळ एक 'फीलिंग' ठरेल आणि वास्तव वेगळेच असल्याचे निदर्शनास येईल आणि त्यातून आपले हसे होऊ शकेल असे वाटत आहे.
तरीही, विस्ताराचे भय असूनही हे लिहावेसे वाटत आहे की उर्दू काव्य, मराठी काव्य व हिंदी चित्रपट गीतांचा प्रवास याची काही प्रमाणात जमेल तशी ओळख करून घेतल्यानंतर हा विषय मांडत आहे.
===========================
चर्चा विषय मांडण्यापूर्वी माझी काही गृहीतके लिहीत आहे. (यावरही चर्चा व्हावी असा उद्देशही आहे आणि इच्छाही)
१. गेल्या साधारण एक हजार वर्षात मराठी भाषेत 'टिकाऊ व प्रभावी' काव्य हे प्रामुख्याने संतांकडून निर्माण झाले. नुकत्याच संपलेल्या एक दोन शतकांमध्ये मराठी कविता ही व्यावहारीक भावभावनांवर भाष्य करू लागली असे दिसते. (तुकाराम व रामदास यांचे काव्यही व्यावहारीक जगाशी निगडीत आहे पण ते रचण्यामागचा दृष्टिकोन तात्वज्ञानिक अथवा अध्यात्मिक असावा, तसे या अलीकडच्या काव्याबाबत वाटत नाही. त्यात दृष्टिकोनही व्यावहारीकच वाटतो). याशिवाय लावणी हा प्रकार मराठी भाषेत नुसताच जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आला असे नसून तो प्रकार जनसामान्यांनी डोक्यावरही घेतला. लावणी ही काहीशी उत्तान शब्दरचना व भावना अधिक प्रमाणात जपणारी झाल्यासारखे / झाल्याचे वाटते.
२. याच कालावधीत, विशेषतः उत्तर भारतात (अनेक दशके मुस्लिम सत्ता असलेल्या प्रदेशात) जे काव्य निर्माण झाले त्यात व्यावहारीक जीवनाचे प्रतिबिंब अधिक ठळकपणे आहे व तरीही सूफी / अध्यात्मिक स्वरुपाचे काव्यही प्रभावीपणे झालेले आहे. व्यावहारीक जीवनाचे प्रतिबिंब दाखवणार्या काव्यात गझल, नझ्म, रुबाया आणि इतर काही प्रकार झाले. हे प्रकार वाचल्यानंतर असे जाणवते की मिश्कीलता, पारंपारीक तत्वांवरील मिश्कील टीका, मनुष्याला जे करावेसे वाटते पण करता येत नाही ते लिहून त्याला आनंद देणे यांना त्या काव्यात अधिक स्थान मिळाले. त्याचवेळी स्वातंत्र्य, धर्मवाद, परकीयांचे हल्ले, फाळणी, सामाजिकता यांचा जबरदस्त प्रभावी आढावाही त्या काव्यात आला. कितीतरी 'टक्के' काव्य हे मानवी मनाशी निगडीत असलेल्या सूक्ष्म भावनांवर व अनुभुतींवर झाले व ते सर्वसामान्याला आपलेसे वाटेल अशा रीतीने अभिव्यक्त झालेले होते. एकाचवेळी बहुप्रतलीय काव्य त्या दशकांमध्ये / शतकांमध्ये निर्माण होत राहिले. (आजच्या काळातील दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा व मध्यप्रदेश ही राज्ये प्रामुख्याने अभिप्रेत आहेत).
३. मराठी आधुनिक ( इ. स. १९०० व नंतर - असे मला अभिप्रेत, वास्तवात आधुनिक कोणत्या कालखंडाला म्हंटले जाते हे माहीत नाही) कवितेतील शब्दरचना या अनेकदा क्लिष्ट, कृत्रिम प्रभावी व बुद्धीची झलक दाखवणार्या होत्या असे वाटते. 'आम कविता' होण्याऐवजी 'खास कविता' व्हावी असा खास उद्देश असल्याप्रमाणे काव्य रचल्यासारखे मला वाटते. (माझी अभिरुची हलकी किंवा वेगळी असणे हेही शक्य आहे याची जाणीव आहे). विंदा, मर्ढेकर, चित्रे आणि आजच्या ढेरे यांची कविता वाचल्यावर 'मी हे कशाला वाचले' असे माझ्यातरी मनात येते. कुसुमाग्रज यांच्या विशाखापुढे जाता येत नाही. मुक्तिबोध, ना घ हे निदान मला तरी कंटाळवाणे वाटतात तर पाडगावकर विनोदी वाटतात. ही सर्व वैयक्तीक मते आहेत. मी गझल शिकत असल्याने सुरेश भट अर्थातच माझ्यासाठी आदरणीय व आयडॉल आहेत हे वेगळे. या सर्व कवितांमध्ये निसर्ग, इम्प्रेसिव्ह करण्याचा उद्देश, स्त्री व एकंदर समाजाचे जुनाट चित्रण आणि जाणीवपूर्वक अनाकलनीयता अशा गोष्टी येताना दिसतात. कविता समकालीनच नाही तर सार्वकालीन ठरावी असा कोणताही खास हेतू आढळत नाही. एखाद्या फुटपाथवर चांभार, न्हावी आणि वाटेवरून जाणारा एखादा नवकवी यांची मैफील जमेल असे हे काव्य नाही. (असे असावे की नाही हा विषय वेगळाच). पण हिंदी, उर्दूतील अगदी चित्रपट गीते आणि साध्यासुध्या थिल्लर गझलाही भाव खाऊन जाताना दिसतात आणि त्यांची मैफिल जमू शकते (हा स्वानुभव - अगदी रस्त्यातही).
४. याचे मला वाटणारे कारण / वाटणारी कारणे यात कवी व काव्यरसिकांमध्ये असलेल्या नात्यावर अनेक गोष्टींचा पडणारा प्रभाव आहे. मराठी भाषेचे 'टेक्श्चर' वेगळे असावे. त्यात अधिक स्पष्टता आणि निर्भीडता मांडणे जितके सोपे तितके हळुवार आणि मनस्थिती पालटवेल असे काव्य रचणे अवघड असावे. हे एक कारण झाले. याशिवाय मराठी माणसाचा मुळातच इगो अधिक असतो असे वाटते. यामागे शिवाजी महाराजांचा वारसा, अनेक संतांचा वारसा यांचा प्रभाव असावा असे वाटते. तिसरे कारण म्हणजे ओव्या, भजने, लावण्या, भावगीते आणि वीररसयुक्त कविता या सर्वांनी मराठी माणसाची अभिरुची मर्यादीत ठेवल्यासारखी वाटते. मराठी काव्यात 'कोणत्यातरी घटकाला सर्वोच्च मानून' मग भावना चितारल्या जातात असे दिसते. जसे भजनात विठ्ठलाला आणि लावणीत स्त्री किंवा पुरुषाला. इतर भाषेतील काव्यांमध्ये 'कशालाच महत्व नाही' अशा धुंदीत प्रत्यक्ष आयुष्य जगणार्या कवीने रचलेल्या ओळी दिसून येतात ज्या प्रत्यक्षात वास्तवाचे चटके सहन करून जगणार्याला सुखावताना आढळतात. 'आयडेंटिफाय' होतात. चौथे व माझ्यामते शेवटचे कारण म्हणजे मराठी माणसाचा एकूणच मत्सरी स्वभाव. 'ह्याला दाद देऊन हा पुढे गेला तर हा जास्त शहाणा होऊन बसेल' असा विचार अगदी रसिकही करताना दिसतात, समकालीन इतर कवींचे राहूचदेत. मध्यप्रदेश, यू पी, बिहार, हरियाणा (आणि अर्थातच दिल्ली) येथे असे होताना अजिबात दिसत नाही. तेथे प्रत्येकाला (काही वेळा योग्यतेहूनही अधिक अशी) मनसोक्त दाद मिळते. तो कवीही मग इतर कवींना (ते नवीन असले तरीही) मनसोक्त दाद देताना आढळतो. नागपूरचा रसिक जितका दिलदार असतो तितका पुण्याचा नसतो आणि पुण्यातील रसिकाला जे आवडते ते का आवडावे हे मुंबईकराला समजतच नाही अशी आपल्याकडे असलेली अवस्था दिसते. हा प्रदेशातील अंतर्प्रादेशिक प्रभाव म्हणावा लागेल. 'मी पुरेसा मोठा ठरल्याशिवाय' दुसर्या कोणालाही मी 'थोडाही मोठा' म्हणणार नाही ही वृत्ती मराठी भाषिकांमध्ये इतर भाषिकांपेक्षा / प्रांतीयांपेक्षा अधिक आढळते.
५. वरील गृहीतक हे मुळात माझे गृहीतकच आहे पण त्याचेही कारण नोंदवावेसे वाटते. मराठी माणूस असा का असावा यामागे इतिहासाचा प्रभाव असावा असे वाटते. दिल्ली आणि एकंदर उत्तर भारतात झालेल्या हिंसा, लुटी आणि बेचिराख होण्याची वारंवारता या सर्वांचा पगडा त्या त्या संस्कृतीवर पडून माणसांच्या मनात खाली गुणांचा विकास त्यामुळे झालेला असावा असे वाटते:
अ - आज जे आपले आहे ते उद्या अचानक लुटले जाऊन आपण कफल्लक होऊ शकतो
ब - जे समोर आहे त्यात अधिकाधिक आनंद मानायला हवा
क - सगळे आपलेच आहेत, जो कलावंत आहे तो कला सादर करून उदरनिर्वाह करत आहे, त्याला मानमरातब हा मिळायलाच हवा.
ड - कलाक्षेत्रातील मैफील हा आयुष्यातील एक महत्वाचा आनंद असून त्यातून आपली अभिरुची उत्तम असल्याचे दिसून येते
इ - कलाकार माणूस म्हणून कसाही असो, कलाकार म्हणून श्रेष्ठ असतो
महाराष्ट्रात झालेल्या लढाया आणि त्या जिंकण्यामागील 'गनिमी कावा' हा प्रमुख घटक यातून मराठी माणूस मुळातच लपून वार करणारा असावा असा एक पगडा निर्माण झाल्यासारखा वाटतो. तसेच, 'आपल्यासमोर जो मोठा होत असेल' त्याला त्याची जागा दाखवून देण्याची अहमाहमिका आपल्या भागात आपल्या 'फारश्या न दुखावल्या गेलेल्या' इगोमुळे होत असावी असे वाटते.
वरील सर्व गृहीतके लिहून झाल्यानंतर चर्चेचे मुद्दे मांडण्याचे साहस करत आहे.
१. मराठी काव्यातील भजन, लावणी, भावगीते व ओव्या या जरी जनसामान्यांच्या झाल्या असल्या तरीही बरेचसे पुस्तकी मराठी काव्य हे काहीसे दुर्बोध, काहीसे ठसठशीत (आणि त्यामुळे हळुवार नसलेले), अनेकदा लय / वृत्त नसलेले (जो उर्दू व बर्याच हिंदी काव्याचा एक महत्वाचा गुण आहे) आणि बुद्धीवादी असल्याची पोझ घेणारे झालेले आहे
२. भजने, लावण्या व भावगीते यांची निर्मीती फारच कमी झालेली आहे. (आयटेम सॉन्ग्ज म्हणजे लावणी नाही हे सर्व जाणतातच)
३. शाहिरी कमी झालेली आहे. (ज्यात सामाजिकता फार मोठ्या प्रमाणावर असायची)
४. रसिकता व अभिरुची बदललेली आहे. (यात केवळ पाश्चात्यांच्या संगीताचा वा आयटेम सॉन्ग्जचाच प्रभाव असे म्हणायचे नसून मुळातच मराठी माणसाला इतर भाषिकांप्रमाणे लिहायची व ऐकायची इच्छाच कमी होत आहे असे म्हणायचे आहे).
५. मराठी भाषिकाची रसिकता आणि काव्य हे अनुक्रमे मत्सरी व काहीसे दुराभिमानी ठरत असून ते जनसामान्यांपासून फटकून वागत आहे.
=======================
वरील सर्व मते वैयक्तीक आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच उद्देश नाही. संकेतस्थळाच्या नियमावलीत न बसणारे एखादे विधान असल्यास ते अवश्य नष्ट करावे अशी विनंती. कृपया आपली मते मांडावीत अशी विनंती
======================
-'बेफिकीर'!
(या धाग्यासाठी सामाजिक या व्यतिरिक्त कोणताच सुयोग्य पर्याय उपलब्ध नसल्याने तसे म्हंटलेले आहे)
विचारप्रवर्तक
विचार करायला लावणारा लेख. जमल्यास पुन्हा वाचेन.
विचार करायला लावणारा लेख
विचार करायला लावणारा लेख आहेच.
काही अपवाद सोडल्यास मराठी कवींची आढ्यतेखोरी (दुसर्या शब्दाचा विचार करत होतो पण हाच योग्य वाटला) अनेकदा अधोरेखीत होते हे खरे आहे.
<यापुढला प्रतिसाद टंकून परत स्वतःच काढला आहे. पुढील भर जरा विचार करून, काही तथ्यांची/कल्पनांची/अंदाजंची उजळणी/पडताळणी/खातरजमा करून घालायचा प्रयत्न करेन)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अनेक मुद्दे नीटसे समजले नाहीत
अनेक मुद्दे नीटसे समजले नाहीत. उदाहरणार्थ :
हे फार सरसकटीकरण वाटतं. आरती प्रभू यांची 'मृत्यूत कोणी हासे, मृत्यूत कोणी हसतो' किंवा 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' अशासारख्या कविता रचण्यामागचा दृष्टिकोन फक्त व्यावहारिक जगाशी निगडित आहे असं म्हणता येईल का?
तुम्ही विंदांचं नाव घेतलंत म्हणून उदाहरणादाखल 'सब घोडे बारा टक्के' ही विंदांची एक कविता घ्या. यात क्लिष्ट किंवा 'खास कविता' होण्यासाठीचा दुराग्रह आहे का? उलट कुणालाही कळेल अशा साध्यासोप्या शब्दांत खेळकर रीतीनं जे म्हणायचं ते म्हटलं आहे असं वाटतं.
इथे पुन्हा एकदा आरती प्रभूंच्या 'कुणाच्या खांद्यावर...' सारख्या कवितेचं उदाहरण घेता येईल. वास्तवाचे चटके सहन करून जगणार्याला ज्याच्याशी 'आयडेंटिफाय' करता येईल अशी ही कविता नाही का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा एक रोचक लेख. सरसकटीकरण
हा एक रोचक लेख. सरसकटीकरण कुठे कुठे वाटतंय पण अशी चिकित्सा करू गेल्यास ते काही प्रमाणात अनिवार्यही आहेच. विशेषतः गझल वैग्रे सोशली कूल का आणि मराठी काव्य का नाही, हा प्रश्न विशेष रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झिरपेल...
तुमची व्यक्त होण्याची धडपड सुरु असेल तर तोही प्रकार झिरपत झिरपत उमटेलच तुमच्या भाषेत. ती थांबली तर आशाच संपली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाक्य तर बरोबर आहे पण संदर्भ
वाक्य तर बरोबर आहे पण संदर्भ नीट लक्षात आला नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मराठी काव्य
मराठी काव्यही सोशली कूल होउ शकते. हिंदीचा गुण का वाण काय म्हणतात तो लागून. लोकांच्या जगण्याशी जोडलं जाइल असं इथे लिहिण्याचा एक प्रवाह सुरु होउ शकतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मराठी काव्यही सोशली कूल होऊ
मराठी काव्यही सोशली कूल होऊ शकते/व्हायला हवे याशी सहमत आहे. पण
याचा आणि सोशली कूल असण्याचा विशेष संबंध नाही. कारण लोकांच्या जगण्याशी निगडित असे कवितालेखन इथे बर्याच लोकांनी केलेले आहे. दलित कवींची उदाहरणे बरीच देता येतील. (बाकीच्यांनी काही असे लिहिलेच नाही असे म्हणावयाचा उद्देश नाही, पण ही बरीच "सेफ" उदाहरणे आहेत सध्याच्या संदर्भात. असो.)
माझ्या मते, सोशली कूल होण्यासाठी काव्य हे दैनंदिन जीवनाशी संबंधित पाहिजे हा एक निकष झालाच - पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हंजे काव्य सजवण्यासाठी जो "मसाला" वापरला जातो त्यातले अभिजाततेचे वाटण अंमळ युनिव्हर्सल पाहिजे. एक तर पंडिती-वरणभातवालं-भक्तीछाप नैतर एकदम दलित-विद्रोही ही एक्स्ट्रीम वर्गवारी झाली, जी नेहमी बघायला मिळते. वरणभातवाले आणि विद्रोहीवाले दोघेही प्रतिमासृष्टी आणि अभिव्यक्तीच्या पद्धतींमध्ये गंडलेले आहेत. वरणभातवाल्यांची पूर्वपरंपरा तशी लै खतरनाक-थेट संस्कृताशी नाते सांगणारी-पण संस्कृतातला बोल्डनेस बर्यापैकी फिल्टर करून सजवलेली कविता आहे ती-काही अपवाद वगळता, शिवाय सध्या त्यांचे दिवस नै राहिले. विद्रोहीवाले शिव्यांपुढे गेल्याची उत्तमोत्तम उदाहरणे आहेत, नाही असे नाही. पण त्यांचे ज्ञानेश्वर अजून उदयाला आलेले नाहीत. त्यामुळे किमानपक्षी मराठीतल्या दलित काव्यामध्ये पुरेशी स्थलातीतता जाणवत नाही-जी थोडीफार दिसते तिचे युरोपियन मूळ स्पष्टपणे दिसते.
त्यामुळे मध्यममार्ग हा गझलछाप कवितांचा म्हटल्यास हरकत नाही. सुरेश भटांनी हा उत्तम हाताळलाय असे त्यांच्या गझला थोड्याफार वाचूनही कळते. पुन्हा इथे गझल हे वृत्त तादृश महत्वाचे नाही. पण उत्तम, जोरकस आशयगर्भ आणि छंदोबद्ध कविता करता येते असे सध्याच्या काळातील कवींसमोरचे उत्तम उदाहरण म्हंजे गझल ठरावे. थोडक्यात, मराठी काव्य सोशली कूल होण्यासाठी माझ्या मते:
१. भावनांचा जण्रल जोरकसपणा आणि कॅनॉनिकल ठिकाणी दिसणारा हळुवारपणा.
२. काहीशी एकसमान पद्धतीची अभिजातता-सांस्कृतिक विधिनिषेधांचा बाऊ जाणवू न देणारी.
३. गेयता.
या तीन गोष्टींची पूर्तता केली आणि ऑफ कोर्स मार्केटिंग उत्तम केले तर उद्देश नक्की साध्य होईल. अभिव्यक्तीचे-प्रतिमासृष्टीचे अंमळ "निर्ब्राह्मणीकरण" करूनही अभिजातता आणणे/टिकविणे, रिअॅक्शनरी कडवटपणाचे अतिक्रमण मर्यादेत ठेवणे हे खरे आव्हान आहे- ते पेलल्यास औघड कैच नै.
माझ्या मर्यादित वाचनाच्या आधारे ही कारणमीमांसा अशी आहे. यात सरसकटीकरण कुठे दिसल्यास तो माझ्या अज्ञानाचा परिणाम समजावा आणि कृपया तसे कच्चे धागे जमल्यास उघड करावेत ही विनंती. इतर कुणापेक्षाही त्याचा मलाच फायदा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्तर भारत...
नेहमीची प्रस्थापित नावं : गदिमांपासून, वसंत बापटांपर्यंत ; दोन मिनिटांसाठी पूर्ण वगळतो आहे. लेखकाच्या मूळ लेखातच त्याच्या क्याटेगरीचा उल्लेख आलेलाय.
.
उत्तर भारतातल्या मराठीवर जीवनवादाचा प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं का?
देवासच्या कोठीत उच्चारल्या गेलेल्या ह्या ओळी पहा:-
सांगसी निष्काम कर्म कृष्णा अरे वेदांत तू
समजला कि काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू
मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?
होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू?
.
खळखळणारे चषक, सामान्यांची सामान्य दु:खे व सामान्य आनंद ह्यातून दिसतं असं काकाजींचे पंखे म्हणतात.
तुम्ही जे कवी आणि इतरेजन जमून फड रंगवण्याच्या कल्पना सांगितल्यात; हे त्याच्या जवळ जाइल असं मला वाटलं.
पाटणकर ह्या क्याटेगरीबद्दल तुमचं मत काय?
.
झालच तर "लोकशाहीर" परंपरेत जे म्हणून काही येतं; ते मोजलं तर?
राम जोशी ,अनंतफंदी हे संतपरंपरेत मोजता येतीलसे वाटत नाही. ते केशवसुत वगैरेंच्या नंतरच्या काळातील तुम्ही दिलेल्या यादीतीलही नाहित. त्यांच्याबद्दल तुमचं मत काय?
.
अभंग वगैरे जीवनाशी निगडित वगैरे कमी; नि परमार्थाशी अधिक; असे म्हणताय; पण मग भारुड, गौळण ह्या क्याटेगरित जे काही येतं त्याचं काय? त्यात जनसामान्यांच्या साध्या अपेक्षा, अपेक्षाभंग मांडलेले नाहित का? तो प्रकार काही उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांपुरता मर्यादित नाही.
.
अधिक व्यासंग वगैरे असणारी मंडळी संदिप खरेला थिल्लर समजण्याचा धोका आहे.(तो अजून पुरेसा म्हातारा झाला नाहिये ना.)
पण त्याच्याही व्यक्त होण्यात ईश्वर कमी, आणि माणूस जास्त.
अर्थात तो "कवी" नाहिच; निव्वळ "गाणी" लिहितो आणि बॉलीवूडच्या समीर वगैरे lyrics मंडळीम्चा मराठी अवतार आहे हे मत परवाच एकानं ऐकवलं होतं. तुम्हालाही तसच वाटत का? "तुमच्याइतकं प्रगाढ ज्ञान कुणाला नसेल; तर कुणी व्यक्तच व्हायचं नाही का?"असं मी त्यावेळी त्याला विचारलं.
.
"मी माझा" हा चंद्रशेखर गोखले ह्यांचा एक दोन दशकांपूर्वीचा चारोळ्यांचा सुप्परहिट प्रयोग तुम्हाला आठवत असेलच.तो कॉलेजतरुणात लोकप्रियही झाला होता.
त्याबद्दल काय म्हणणं आहे?
.
मला स्वतःला कवितेतील झाट काही समजत नाही. (खरं तर पोटापाण्यासाठी कराव्या लागणार्अय कामाशिवाय इतर बहुतांश गोष्टीतही समजत नाहीच; पण तो भाग वेगळा.) माझ्या मराठी जालावरील चार्-पाच वर्षाच्या वावरात कुठल्याच संस्थळात मी कधीच आवर्जून काव्य वगैरे प्रकारात डोकावलोय असे झाले नाही.
तर, "जालावर कुठल्याच चांगल्या/अस्सल जीवनाशी नाळ जोडणर्या रचना जाणकारांना दिसल्याच नाहित का?" असे विचारु इच्छितो. मी वाचत नाही; जे वाचतात; त्यांनी साम्गावे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दिलेल्या उदाहरणांशी असहमत
दिलेल्या उदाहरणांशी असहमत व्हायचे काही कारण दिसत नाही.
पण माझ्या मते लेखकाचा प्रश्न हा काव्याच्या सध्याच्या काळातल्या अपीलबद्दल आहे. गझल-शेरोशायरी वैग्रे तरुण पिढीत कूल मानले जाते. आपण मराठी लोकांनी त्याला कूल मानणे हा अनुकरणाचा भाग असे मानले तरी उत्तर भारतीय तरुणाईत ते अपील आहेच. मराठीत चारोळ्या वगैरे ठीकच आहे, पण त्यांचेही अपील नेट वैग्रे सोडता इतके दिसत नाही. सर्वसामान्य मराठी तरुणाईत ते इतके लोकप्रिय आहे का? मला तरी गझलेच्या उत्तर भारतीयांमधील अपीलपेक्षा मराठी लोकांमधील चारोळीचे अपील कमी वातते. उत्तम काव्य लिहिणारे कवी दोन्हीकडे किती आहेत हा प्रश्न अलाहिदा, पण अपीलबद्दल बोलायचे झाले तर मला तरी असेच वाटते. बाकी संदीप खरे वैग्रे पुणे-मुंबैच्या (आणि इतरच्या) बहुतांश ब्राह्मण मध्यमवर्गीयांत आणि त्या विशिष्ट रसिकतेच्या प्रभावाखाली असलेल्या अन्यजातीयांत (ज्यांची संख्या माझ्या मते तुलनेने अल्प आहे) जास्त लोकप्रिय आहे. संदीप खरेची कविता उत्तम असते यात शंका नाही, पण त्याचे अपील कितपत आहे हेही जरा पाहिले पाहिजे.
गझलेला काही प्रमाणात स्थलातीतता लाभल्यामुळेही असे असेल असे वाट्टे. जंतू, रोचना किंवा अन्य जाणकारांनी प्रकाश पाडावा अशी विनंती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेख समजला नाही
मराठीतील काही कवींच्या कविता उत्तर भारतातील काही कवींच्या तुलनेत सपक आहेत असे लेखकाला म्हणायचे आहे इतपतच अर्थ समजला. मराठी माणूस मत्सरी आहे, दुराभिमानी आहे, अरसिक आहे वगैरे मुद्द्यांना काही अर्थ नाही असे वाटते.
.
कविता या विषयातलं आपल्याला कै कळत नै पण मी पण थोडी ब्याटिंग करतो.
१. चारू गुप्ता नामक विदुषीचे एक पुस्तक माझ्यापाशी आहे. (Sexuality, Obscenity and Community- Women, Muslims and the Hindu Public in colonial India). त्यात म्हटल्याप्रमाणे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटास आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एकूण सार्वजनिक अभिव्यक्तीच्या माध्यमांचे Sanitization करण्यात आले. विवाहप्रसंगातली गाणी, नाटके, नौटंकी, (किस्से हा उत्तर भारतीय प्रकार) वगैरेंमध्ये वापरल्या जाणार्या भाषेतले काहीसे अश्लील संदर्भ काढले गेले. हे सगळे घडले ते हिंदू शमाजात प्रामुख्याने घडले. संख्यात्मकरीत्या दक्षिणेत (महाराष्ट्रात) सार्वजनिक भाषाव्यवहारात हिंदूंची संख्या मुसलमानांच्या मानाने खूपच जास्त होती. उत्तरेत (यूपी/बिहार/पंजाब/दिल्ली) अशी मुसलमानांची संख्या बर्यापैकी जास्त असल्याने त्या Sanitization च्या वार्यापासून काही प्रमाणात मोकळीक मिळाली असावी.
२. श्री ज जोशी यांच्या स्फुट लेखांचे एक संकलित पुस्तक 'पुणेरी' हेही माझ्याजवळ आहे. त्यात १९२०-३५ दरम्यानच्या पुण्यातल्या जीवनाचे बर्यापैकी सखोल वर्णन आहे. त्यात त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी कदाचित या बाबतीत फिट बसतील
अ. स्वराज्य नसताना मजा करणे म्हणजे काहीतरी पाप अशी एक सुप्त भावना समाजधुरीणांमध्ये होती.
ब. तेव्हाच्या विचित्र कल्पना अशा होत्या की ना सी फडक्यांच्या कादंबर्या चोरून वाचायला लागत. उलट 'ब्रह्मचर्य हेच जीवन-वीर्यनाश हाच मृत्यू' हे पुस्तक उघडपणे वाचता येई. ते पुस्तक दिवाणखान्यात तिपाई (टीपॉयवर) ठेवले जाऊ शके.
जाणकारांच्या अधिक मतांच्या प्रतीक्षेत...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नेमके अन अचूक.
वाह!! सॅनिटायझेशनबद्दल अतिशय सहमत आहे.ब्रह्मचर्य छाप पुस्तकाचे तत्कालीन वाङ्मयात अनेक उल्लेख दिसतात. प्रतिसादातला सर्वात नेमका बलीवर्दनेत्रभञ्जक भाग म्हंजे
हा होय. कृत्रिम सोवळेपणामुळे काव्य हे दूर गेले अशी मीमांसा नक्कीच पटण्यासारखी आहे. मान गये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत आहे..
मी आपल्या बहुतांश मुद्द्यांशी सहमत आहे...
आपली कविता / लेख इतरांपेक्षा "वेगळे" (तसे नसले तरीही...) दाखवण्याच्या नादात क्लिष्ट शब्दांचा बढीमार बऱ्याचदा दिसून येतो...
"असे जितके शब्द जास्त, तितकी ती कविता चांगली" असा बहुधा काही जणांचा (गैर)समज असावा...
आणि असे करीत असतांना "त्या कवितेचा भावार्थ वाचकापासून दूर जातोय किंवा ह्या लिखाणाशी वाचक स्वतःला जोडू शकत नाहीये, आपलंसं करू शकत नाहीये" याची दखल आजकाल हवीतशी घेतली जात नाहीये असं माझं मत आहे...
याउलट, मी म्हणेन की रचना साधी असू देत, पण वाचकाला "एकरूप" करणारी, त्याला जवळ करणारी असावी...
सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर - "मला देखील हेच वाटतंय, माझ्या मनातलं लिहिलंय याने..." असं जर का वाचकाला वाटत असेल, तर तुमचं लिखाण धन्य झालं असं मानावं...
मराठी कवितांमध्ये, मला सध्या "संदीप खरे" यांच्या कवितांबद्दल "असंच" वाटतं... खूप जबरदस्त लिखाण आहे यांचं...
कवितेतली एकेक ओळ काळजात शिरावी असं लिहितो हा माणूस... अप्रतिम...
उदाहरणार्थ : "प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने, मला एकटेसे आता वाटताहे..."
हिंदी अथवा उर्दू मध्ये "गुलजार" आणि "जावेद अख्तर" यांना नक्कीच मानावं लागेल...
दोघांचही लिखाण, शब्द रचना अप्रतिम आहे...
पण दोघांच्या लिखाणात मला थोडासा फरक जाणवतो...
"गुलजार" यांच्या लिखाणात मला दैनंदिन जीवनातल्या "सूक्ष्म आणि दुर्लक्षित, पण तरीही मार्मिक" गोष्टींकडे लक्ष वेधून घेण्याचे कौशल्य आढळते...
त्यांचं "मासूम" चित्रपटातलं "तुझसे नाराज नही जिंदगी, हेरान हू में..." हे गाणं मला खूप आवडतं...
खास करून हे एक कडवं -
"जिने के लिये सोचा ही नही, दर्द संभालणे होंगे...
मुस्कुराये तो मुस्कुराने के, कर्ज उतारने होंगे..."
"जावेद अख्तर" यांच्या लिखाणाबाबत बोलायचं झालं तर मी म्हणेन की, लिखाणात साधेपणा असला तरीही कुठेही त्याच्या भावार्थाला तडा गेलेला नसतो, "वाचक एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही" याची हमी असते...
उदाहरणार्थ : "जिंदगी ना मिलेगी दूबारा..." यातल्या त्यांच्या साऱ्याच्या-साऱ्या कविता...
खास करून "दिल आखिर तू क्युं रोता है, दुनिया मे युंही होता है..."
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."