प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले
पानिपत स. १७६१ विषयी उपलब्ध मराठी संदर्भ साधनांच्या आधारे मी ' पानिपत असे घडले ' या ग्रंथाचे / पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२ रोजी ठाणे शहरात करण्याचे ठरले आहे. तर ज्यांना या समारंभास येणे शक्य होईल त्यांनी येण्याची कृपा करावी हि विनंती. तसेच, या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक श्री. संजय सोनवणी यांची प्रस्तावना असून ती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_17.html
प्रतिक्रिया
मनःपूर्वक अभिनंदन
प्रिय मित्र संजय,
तुझे संशोधन पुस्तक रुपाने आकारास येऊन प्रकाशित होत आहे याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.
पानिपत युद्धावर संशोधन ग्रंथच मुळात खूप कमी आहेत, शेजवलकरांच्या पुस्तकानंतर पुढचे संशोधन प्रकाशित व्हायला जवळपास ५० वर्षांचा कालावधी गेला. अशा पार्श्वभूमीवर तुझे अभ्यासपूर्ण संशोधन म्हणजे वाचकांना आणि इतिहासकारांनाही तुझे पुस्तक एक मेजवानी ठरेल यात शंकाच नाही. पुस्तकाच्या प्रकाशनाची वाट पहात आहे.
आणि खूप खूप अभिनंदन.
शुभेच्छा
पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा. हे पुस्तक e-book च्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची काही योजना आहे काय?
अगदी अलीकडे ह्याच विषयावरचे डॉ. उदय कुलकर्णीलिखित 'Solstice at Panipat - 14 January 1761' हे २०११मध्ये प्रकाशित झालेले पुस्तकहि पाहण्यात आले. (लेखक हे औषधे देणारे डॉक्टर आहेत आणि खूप मेहनत घेऊन ह्या त्यांच्या व्यवसायाबाहेरच्या विषयावर त्यांनी हे लेखन केले आहे.) भरपूर संदर्भ, नकाशे आणि चित्रांनी सजलेले हे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे असे वाटते आणि इतिहासाचा व्यावसायिक नसलेल्या पण तरीहि जिज्ञासू वाचकाला ते वाचनीय वाटेल.
(थोडे अवान्तर - पुस्तक इंग्रजी भाषेत आहे. सहसाकरून असा अनुभव आहे की सन्मान्य अपवाद वगळता १०-१५ वाक्यांतच मराठी लेखकाचे इंग्रजी 'वरणभाता'वर पोसलेले आहे हे ध्यानात येते. ह्या पुस्तकाचे तसे वाटत नाही. सफाईदार आणि चांगल्या इंग्रजी भाषेमुळे लेखनाबद्दल प्रथमदर्शनीच चांगला ग्रह होतो.)
थोडी माहिती
अरविंदजी,
मला असलेल्या माहितीनुसार, ई-पुस्तकाची सुविधा प्रकाशकाच्या विचाराधीन आहे. पण अजून त्यावर निर्णय व्हायचा आहे.
तुमच्यामुळे पानिपतावरच्या एका नव्या पुस्तकाची माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. फ्लिपकार्टवर Solstice at Panipat हे ३०४ पानांचे पुस्तक उपलब्ध आहे.
मला थोडी माहिती असल्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की संजय क्षीरसागर यांच्या पानिपतावरील या पुस्तकाचा आवाका बराच मोठा आहे. जवळपास ५०० ते ६०० पृष्ठांचा हा ग्रंथ असू शकेल. या पुस्तकाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे, तेव्हा प्रत्यक्ष मुद्रण झाल्यावरच पुस्तक नेमके केवढे आहे ते स्पष्ट होईल. पण पानिपतावरचा हा ग्रंथ नक्कीच महत्त्वपूर्ण आहे हे खात्रीने सांगू शकतो.
खुलासा: लेखक माझा मित्र असल्यामुळेच केवळ ही माहिती मला आहे. काही मुद्द्यांच्या अनुषंगाने मी थोडी माहिती त्याला पुरवली आहे एवढीच माझी भूमिका सिमित आहे.
पुस्तकासाठी
पुस्तकासाठी शुभेच्छा.
प्रस्तावना वाचली. त्यातून मला अपेक्षित अशी सर्व माहिती आणि विश्लेषणही मिळाले नाही (थोडी माहिती मिळाली). उदा: आत्तापर्यंत पानिपतासंदर्भात (निदान मराठीत) कोणती पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत, त्यापेक्षा या पुस्तकात काय वेगळं आहे, या पुस्तकासाठी काय संदर्भ वापरले गेले अशा प्रकारची लेखनसंदर्भात माहिती मिळेल अशी अपेक्षा होती.
धाग्यातून अधिक माहितीची अपेक्षा होती, उदा: प्रकाशक कोण, पुस्तकाची किंमत काय, प्रकाशनपूर्व सवलत मिळेल काय, इ.
(कोल्हटकरांचा वरणभात इंग्लिशचा मुद्दा मलाही पटला. महाराष्ट्रात घडणारी कादंबरी वरणभात इंग्लिशमधे वाचताना काही वावगं वाटणार नाही, पण माहितीपूर्ण पुस्तकांसाठी भारदस्त इंग्लिश आवडतं. भारतात घडणार्या कादंबर्या भारतीय इंग्लिशमधे वाचायला आवडतं, तिथे इंग्लिश अथवा अमेरिकन बोलीभाषा विचित्र वाटते.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किंमत, सवलत इत्यादी बाबी अजून ठरायच्या आहेत
उदा: आत्तापर्यंत पानिपतासंदर्भात (निदान मराठीत) कोणती पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत, त्यापेक्षा या पुस्तकात काय वेगळं आहे, या पुस्तकासाठी काय संदर्भ वापरले गेले अशा प्रकारची लेखनसंदर्भात माहिती मिळेल अशी अपेक्षा होती.
आदिती, प्रस्तावनेत संदर्भ सविस्तरपणे आजपर्यंत कोणी दिल्याचे मला स्मरत नाही. पण हरकत नाही. उत्तर मला माहिती आहे.
पानिपतावर आत्तापर्यंत जेवढे संशोधन उपलब्ध आहे तेवढ्या सर्व संशोधनग्रंथांचा परामर्श लेखकाने या पुस्तकात घेतला आहे
भाऊसाहेबांच्या बखरी पासून ते शेजवलकरांचे संशोधन ते पानिपतवरचे इतरही लेखन लेखकाने स्वतः अभ्यासले आहे.
संदर्भग्रंथांची यादी पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहेच. पण प्रत्येक संशोधकांची मते काय आहेत, वस्तुस्थिती काय होती? आणि प्रस्तुत लेखकाने त्यातून निष्कर्ष काढून दिलेले आहेत अशी साधारण पुस्तकाची मांडणी आहे. असंख्य संदर्भ, तत्कालीन प्रत्यक्ष पत्रव्यवहार, देशी विदेशी नोंदी, तत्कालीन भौगोलिक परिस्थिती अशा सर्व अंगांनी लेखकाने संशोधन केले आहे व सविस्तर मांडणी केली आहे.
प्रकाशक कोण, पुस्तकाची किंमत काय, प्रकाशनपूर्व सवलत मिळेल काय, इ.
या सर्व बाबी अजून ठरायच्या आहेत, पुस्तकाची अक्षरजुळणी आताशी झाली आहे. लवकरच ते मुद्रणासाठी जाईल. पुढील १५-२० दिवसांत, प्रकाशनाअगोदर सर्व गोष्टी स्पष्ट व्हाव्यात. झाल्यात की त्याची माहिती लेखक स्वतः 'संजय क्षीरसागर' किंवा मी येथे नक्की देऊ.
पानिपत संशोधन
श्री.संजय क्षीरसागर यांच्या नियोजित "पानिपत असे घडले..." बाबत कोल्हापूर भेटीप्रसंगी प्रस्तावनाकार श्री.संजय सोनवणी यांच्याशी थोडीफार चर्चा झाली होती. दुर्दैवाने वेळेच्या कमतरतेमुळे तिला व्यापक रूप प्राप्त झाले नाही (ते ज्या व्याख्यानासाठी इथे आले होते, त्याची वेळ झाल्याने चर्चा अर्धवट सोडावी लागली); पण आता या धाग्याच्या निमित्ताने ती प्रस्तावना वाचली आणि त्यावरून श्री.क्षीरसागर यांच्या विषयसंदर्भीय संशोधन लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्री.शेजवलकर यांच्या "पानिपत १७६१" वर श्री.सोनवणी यांचे जे आक्षेप आहेत [विशेषतः शेजवलकरांचा चित्पावनांवर असलेला रोष] ते त्यानी कधीच अमान्य केलेले नाहीत. पानिपतच काय पण एकूणच मराठ्यांच्या इतिहासाबाबत निश्चित मत उघडपणे सांगण्यात ब्राह्मण इतिहासकारांकडून अक्षम्य टाळाटाळच झाली आहे असे श्री.शेजवलकर स्पष्टपणे म्हणत. "पानिपत १७६१" पूर्वीच शेजवलकरांनी या संदर्भातील आपली रोखठोक मते रियासतकार सरदेसाई यांच्या 'नानासाहेब पेशवे' चरित्र ग्रंथाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत सुस्पष्टपणे मांडली असल्याने [व ती अगदी राजवाड्यांनीही कधी खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही] फक्त पानिपतापुरताच त्यांचा रोष होता असे मानू नये. [अर्थात माझ्यापेक्षा श्री.संजय सोनवणी यांचे या विषयातील वाचन प्रचंड असल्याने त्याना ह्या बाबी माहीत असणे साहजिकच आहे.]
इंग्रजीत 'इतिहास' विषयावर मोजणे अशक्य इतके ग्रंथ उपलब्ध असतात; पण ज्या घटनेने महाराष्ट्राचा नकाशाच बदलून गेला त्या एका क्लेशदायक पराभवावर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पुस्तके असावीत ही आपली इतिहासाकडे पाहाण्याची अनास्था दर्शविते. पानिपतावर जरूर 'बखर लिखाण' आहे पण इतिहासाचार्य वि.का.राजवाडेच बखरींना इतिहासाचे साधनग्रंथ म्हणून मान्यता देत नव्हते त्यामुळे बखरीकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही त्या काळात एक 'स्पॉट रीपोर्टिंग' इतपतच राहिला. वास्तविक बखरींनाही महत्व कमालीचे आहे, जे फक्त विषयातील संशोधकांनाच समजू शकेल.
बाकी श्री.विश्वास पाटील यांच्या याच विषयावरील कादंबरीचा त्यानी (श्री.सोनवणी) यानी योग्य तो समाचार प्रस्तावनेत घेतलेला आहेच. शेवटी कादंबरी लेखन म्हणजे इतिहास लेखन नव्हे इतपत सत्य जाणू इच्छिणार्या वाचकाने लक्षात ठेवले की कादंबरीतील कल्पना विलास मग त्याला दुय्यम वाटू लागतो. श्री.क्षीरसागर यांच्या संशोधनाने आजपर्यंत या ना त्या कारणाने अंधारात राहिलेली 'पानिपताच्या इतिहासा'ची पाने पुढे येतील ही आशा.
प्रकाशन समारंभास हार्दिक शुभेच्छा.
अशोक पाटील
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा!
एक प्रश्नः पुस्तकात काही मुलगामी सांशोधन आहे की आधीच झालेल्या संशोधनांचे संकलन व लेखकाने केलेली चिकित्सा आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दोन्ही आहे
होय ऋ,
या पुस्तकात मूलगामी संशोधनही आहे आणि आधीच्या संशोधनाची चिकित्सा देखील आहे.
(अवांतर)
वस्तुतः, 'संजय'लिखित ग्रंथाचे नाव 'महाभारत कसे घडले' असे असावयास हवे, नाही काय?
(अर्थात, पानिपत तेथून फार दूर नाही म्हणा!)