दिवाळी अंक २०१५ : अंक पहिला : मौज
मोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे – बातम्यांचीही वासलात, तिथे पुरवण्यांमधल्या लेखनाबद्दल काय बोलावं? सोशल मिडियावर हमरीतुमरी हाच एकुलता एक सूर आहे. वेळ घेऊन काही लिहिणं-वाचणं-संवादणं जवळपास दुर्मीळ म्हणावं असं आहे.
अशात दिवाळी अंक तेवढे आहेत. ‘गौरवशाली’ किंवा’ ‘आगळीवेगळी’ असली घिसीपिटी विशेषणं त्या परंपरेला लावा. दर वेळी शंभर वर्षांच्या दिवाळी अंकाच्या इतिहासाचे दाखले देत छाती फुगवा. दर्जाच्या नावानं कुरकुरत त्यांतल्या जाहिरातींना नावं ठेवा... तरीही दिवाळी अंक आहेतच. परंपरा चालू ठेवायची म्हणून काही रडतखडत, काही नव्याची बंडखोर भर घालत, काही खरोखरच गौरवशाली परंपरा चालवत. कथा, संशोधन आणि संदर्भ यांसह केलेलं निराळ्या वाटेवरचं सखोल लेखन, फेसबुकासारख्या माध्यमांना पचवत राहिलेल्या कविता... अशा सगळ्याला एक अवकाश पुरवत.
वर्तमानपत्रात म्हटलं जातं त्यापेक्षा जास्त काहीतरी त्याच्याबद्दल म्हटलं गेलं पाहिजे, असा एक माझाच मला चावलेला जबाबदार किडा. म्हणून ही मालिका.
माझ्या पिढीतल्या अनेकांप्रमाणे माझंही वाचन खंडित स्वरूपाचं होऊन बसलेलं आहे. अनेक नव्या-जुन्या लेखकांशी वा कवींशी मी असायला हवं तितकी नि तशी परिचित उरलेली नाही. प्रयत्न करूनही एक अंक सलग समग्र वाचला जात नाही, इथून तिथे उड्या मारल्या जातात, काही गोष्टी वाचायच्या सुटून जातात हे आहेच. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडींचा एक घडत गेलेला पोत आहे. तो काही पूर्णत: आधुनिक (की आधुनिकोत्तर?!) आहे असं म्हणता येणार नाही. या सगळ्या मर्यादा या र्हस्वलेखनाला असतील, याची वाचणार्यानं जाणीव बाळगावी. मतभेद असतील तिथे खंडन करावं, आपलं मत मांडावं.
आपण जवळजवळ अर्धं वर्ष रक्त आटवून जे दिवाळी अंक काढतो-सजवतो, ते कोण वाचतं, त्याबद्दल काय विचार करतं हे जाणून घेणं दिवाळी अंक काढणार्यांच्या दृष्टीनं मोलाचं आहे; हे आता दुसर्या बाजूला पाय ठेवल्यानंतर मला पक्कं ठाऊक आहे.
‘मौजे’च्या अंकातला सगळ्यांत लक्षणीय विभाग आहे शहरांबद्दलचा. इंट्रेष्टिंग लेख आणि दिवाळी अंकात सहसा न दिसणारी नावं.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनचे वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) असलेले आनंद पंडित – त्यांनी या विभागात लिहिलं आहे. राजकीय आणि प्रशासनिक हस्तक्षेपामुळे वास्तुरचनाकाराचे हात कसे बांधले जातात ते त्यांच्या लेखात दिसतं.
यान गेलच्या पुस्तकाचं भाषांतर करणार्या सुलक्षणा महाजन या विभागात दिसल्या नसत्या, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. मुंबई शहराच्या जिवंत, दिवसेंदिवस गढूळ होत चाललेल्या आणि तरीही बदलाच्या आशेवर जीव धरून असलेल्या रूपाबद्दल त्यांनी लिहिलं आहे. पण त्यांच्या भाषांतरित पुस्तकामुळे असेल – माझ्या त्यांच्या लेखाकडून असलेल्या अपेक्षा थोड्या जास्त होत्या. त्या अपेक्षांच्या मानानं मला त्या स्मरणरंजनातच रमलेल्या वाटल्या. माझ्या अपेक्षाही अतिरेकी असतील कदाचित.
प्रियदर्शिनी कर्वेंचा लेख सुरू होतानाच फार वेळ लागतो. कितीतरी वेळ त्या उत्क्रांती आणि नागरीकरणाचे टप्पे सांगण्यातच दवडतात. माहितीय हो, मुद्द्यावर या... असं होऊन जातं. पण चिकाटी बाळगली, तर पुढे मात्र तो इंट्रेष्टिंग आहे. शहररचनाकारांचा आणि विकासकांचा (आणि पर्यायानं लोकांचा नि लोकप्रतिनिधींचा) दृष्टीकोन कसा असायला हवा नि तो वास्तवात कसा आहे – याकडे त्यांचा लेख लक्ष वेधतो. पैसा, पैशाचं उत्पादकतेशी असलेलं न-नातं आणि शहरीकरणाच्या मिषानं अधिकाधिक ओरबाडशील होत गेलेली आपली पैसाकेंद्रित संस्कृती, यांचा ऊहापोह त्यात आहे.
सचिन कुंडलकरांचा लेख त्यांच्या सध्याच्या लेखनाच्या सुराला धरून आहे. मला शहरं आवडतात, मला बाजाराने दिलेले पर्याय आवडतात, मला तंत्रज्ञान आवडतं, मला वेगवान बदल आणि शहरांनी दिलेला व्यक्तिगत अवकाश आवडतो... अशी प्रामाणिक आणि रोखठोक विधानं त्यांच्याकडून अपेक्षितच. एका प्रकारे ‘खेड्याकडे चला-शहरांना गिल्ट द्या’ या पारंपरिक आचरटपणाचा धिक्कार करणं हा एकमात्र कार्यक्रम त्यात असल्यासारखा भासतो. हेच काही वर्षांपूर्वी मला कमालीचं भारी वाटलं असतं – किंबहुना तेव्हा त्यात तो ताजेपणा, प्रामाणिक बंड होतं असं अजूनही वाटतं. पण आता त्यात तोचतोचपणा जाणवतो. चंगळवादाची-बाजाराची दुसरी, कमालीची अन्यायकारक-हिंस्र बाजू या माणसाला जाणवत नसेल का, असा प्रश्न पडतो. ‘राजवाडे ऍण्ड सन्स’ या त्यांच्या ताज्या-रंगारंग-ब्रॅंडपुरस्कारी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर तर फारच.
सगळं जगच शहरी होईल, अशी भविष्यवाणी वर्तवणारा साधूंचा लेखही या विभागात आहे.
पण मला सर्वांत जास्त आवडली, ती अमोल दिघे या संशोधकाची सुलक्षणा महाजन यांनी घेतलेली मुलाखत. विद्यापीठं आणि विज्ञानाधारित संशोधन संस्था शहरांमध्ये का वाढताना दिसतात, त्यांचे त्या त्या शहरांशी संबंध कसे असतात, त्यांच्यात कोणत्या प्रकारची देवाणघेवाण होते, परदेशांत हे नातं कोणत्या प्रकारचं आहे (विद्यापीठांभोवती जन्मणारी नि त्यांच्याधारे जगणारी मध्यम शहरं), देशात याबाबत कोणता ट्रेंड दिसतो (मध्यम शहरांची गती आणि पैस विद्यापीठांना मानवणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाकडे अशाच प्रकारच्या मध्यम शहरांतून विद्यार्थी येणं)... अशी वेगळीच चर्चा त्यात आहे.
बाकी नावं (आणि लेखनही) अपेक्षित म्हणावीत अशीच आहेत. प्रभाकर कोलते, भारत सासणे, अनिल अवचट, मोनिका गजेंद्रगडकर, सुबोध जावडेकर, निळू दामले, विजय कुवळेकर, गोविंद तळवलकर, विजय पाडळकर.... वगैरे वगैरे. विनया जंगले (जंगली प्राणी) आणि अश्विन पुंडलिक (भूगर्भशास्त्र) ही गेल्या दोनेक वर्षांतली ताजी भर. ‘तेंडुलकरांना भेटताना...’ प्रकारातला (आणखी एक) लेख (श्रीनिवास कुलकर्णी) या अंकात आहे. आता तेंडुलकर जाऊनही काही काळ लोटल्यावर या प्रकारच्या स्मरणरंजक लेखनाची कास ‘मौजे’नं धरलेली दिसावी, हा तपशील बोलका आहे. सतीश तांब्यांची कथा ‘मौजे’त दिसणं हा मात्र थोडा आश्चर्याचा भाग! आता तांबे प्रस्थापित (आणि अपेक्षित – प्रेडिक्टेबल अशा अर्थी) कथाकार झालेत की काय, असा एक खवचट विचार मनात येऊन गेला.
‘मौजे’चा कविता विभाग दणदणीत असतो. पण त्याबद्दल काही म्हणायला वेळ लागेल. कविता सावकाशीनं पोचत राहतात.
तीव्रतेनं जाणवलेली आणि एक गोष्ट म्हणजे बर्याच दिवाळी अंकांनी चर्चिलेली असहिष्णुता, पुरस्कारवापसी, देशातलं वातावरण यांबद्दल ‘मौज’ मौन बाळगून आहे. प्रस्तावनेत केलेले निसटते उल्लेख सोडले, तर या असंतोषाबद्दल काहीही विधान नाही. मोदींच्या स्मार्ट शहरांविषयीच्या घोषणेचा उल्लेख मात्र आहे - शहरांविषयीच्या विभागाची प्रस्तावना करताना.
सगळ्यांत धक्कादायक, दु:खद भाग म्हणजे ‘मौजे’त चक्क प्रमाणलेखनाच्या सरसकट चुका आहेत. (‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका??? ‘मौजे’त प्रमाणलेखनाच्या चुका!!!!... असे वाचावे.) ‘र’चे र्हस्वदीर्घ उकार उलटेपालटे असणं, ‘उ’हापोह, ‘दि’ड असल्या चुका, ‘सुद्धा’सारखी शब्दयोगी अव्ययं सुटी लिहिलेली असणं... ही अगदी सहज, वरवर पाहता दिसलेली उदाहरणं. प्रमाणलेखनाला एका मर्यादेपलीकडे फार महत्त्व न देणार्या, क्वचित भूमिका म्हणून त्याची मोडतोडही करणार्या ‘अक्षर’मध्ये हे फार खटकलं नसतं. पण ‘मौजे’त... असो. असो.
तळटीप : अजूनही काही गोष्टी वाचायच्या शिल्लक आहेत. काही वाचूनही त्यावर म्हणायसारखं काही नाही. हा आढावा समग्र नाही-नसेल, त्यात गरज लागेल तसतशी भर पडत राहील, हे ध्यानी असू द्या.
ये बात. त्या कथांबद्दल आणखी
ये बात.
त्या कथांबद्दल आणखी लिही ना. एकाच ओळीत आवरणं म्हणजे जरा...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
'मौजे'तल्या कथा मला अगदीच
'मौजे'तल्या कथा मला अगदीच साचेबद्ध वाटल्या. निदान गजेंद्रगडकर बाईंची तरी फारच. तेच ते आर्त सूर आणि शास्त्रीय संगीतातली जार्गन. अपत्यमृत्यूच्या दु:खात बुडत चाललेली व्यक्ती. गाण्याचा आधार किंवा उलट. आशा बगे यांच्या एका जुन्या कथेची फार वेळा आठवण झाली आणि शेवटही अगदी अपेक्षेबरहुकूमच झाला. पण बाकी काही अंकांमधल्या काही कथा फॅसिनेटिंग. मी समोर ठेवलेले ८-१० अंक झाले, की सगळ्यामधल्या कथांचा एक आढावा घ्यावा असं डोक्यात आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हां ये बात!
हां ये बात!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
उत्तम ओळख. आता या मालिकेत
उत्तम ओळख. आता या मालिकेत पुढे काय काय येईल त्याच्या कल्पनेनेच मस्त वाटतंय... लिही पटापट.
बिपिन कार्यकर्ते
ह्याचे ई-बुक का नाही?
ह्या आणि अन्य बर्याच दर्जेदार अंकांची ई-पुस्तके दिसत नाहीत. जगभरच्या वाचकांना आपले पुस्तक सहजपणे उपलब्ध करून देण्याची - आणि त्यायोगे आपलाहि खप वाढवायची - ह्या प्रकाशकांना इच्छा नसावी. आत्त्ताच मी पाहिल्याप्रमाणे बुकगंगामधून छापील पुस्तक घेऊन येथे कॅनडामध्ये पोहोचविण्याचे सुमारे CAD २३ मागत आहेत. अंकाची किंमत केवळ CAD २.३१. पुस्तक पोहोचण्याची अदमासे तारीख १५ ते २० दिवसांनी.
हा अंक केव्हातरी कोणीतरी कृपावंत digitize करून उपलब्ध करून देईल ह्या आशेशिवाय हा अंक आम्हांस मिळणे दुरापास्तच दिसते!
सहमत आहे. अॅमेझॉनच्या
सहमत आहे.
अॅमेझॉनच्या नादाला लागून किंडल बुक बनवायचं नसेल तर ते समजण्यासारखं आहे. पण ईपब, मोबी किंवा गेलाबाजार पीडीएफ बनवायला तरी हरकत नाही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अंकाची ओळख तर आवडलीच. शिवाय
अंकाची ओळख तर आवडलीच. शिवाय अशा ओळखींची मालिका येणार आहे हेही बरं वाटलं. पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.
वा! मुखपृष्ठावरील चित्र बघूनच
वा! मुखपृष्ठावरील चित्र बघूनच सुखावलो.
हुसेनांबद्दल काही आहे का अंकात?
बाकी छापील अंक विकत घेणे गेल्यावर्षीच बंद केले आहे. (खूप जाड नी जड असतात - नी त्यात संग्राह्य असे काही मोजकेच लेख असतात, बाकी ह्ही एवढी रद्दी!). उधारीवर/ढापून/लायब्ररीतून वाचायला ना नाही.
तेव्हा या परिचयांची अधिक उत्सुकतेने वाट पाहतो आहे. न जाणो एखादा अंक फारच भारी नी इंटरेस्टिंग वाटला तर घेईनही!
अवांतरः पूर्वप्रकाशितपेक्षा चौकस यांनी वापरलेला सहप्रकाशित हा शब्द अधिक आवडला.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हुसेनांबद्दल काही आहे का
प्रभाकर कोलत्यांचा लेख आहे मुपृबद्दल.
अवांतराची नोंद घेतली आहे. तरीही पूर्वप्रकाशितच.
बाकी अंक विकत घेण्याबद्दल सहमती. जागा, पैसे, दीर्घकालीन उपयुक्तता... सगळ्याच दृष्टींनी. पण तूर्तास लायब्रीत जाण्याचा वेळ काढणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणून... असो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नक्कल
'मौज' आता 'ऑल्सो रॅन' झाला आहे किंवा 'अनुकरणीय'पेक्षा इतरांचं अनुकरण करणारा झाला आहे ह्याचं आणखी एक चिन्ह. अनेक वर्षांपूर्वी, बहुधा मेघना पेठे संपादक असताना 'मुक्त शब्द'नं हा ट्रेंड चालू केला. तिथेही कोलते मुखपृष्ठावरचं चित्र निवडत असत आणि मग त्याविषयी एक छोटं टिपण लिहीत असत. त्याच त्याच ललनांच्या नाही तर 'मुळीक'छाप जुनाट चित्रांमधून दिवाळी अंकांना बाहेर आणणारं ते पाऊल होतं. स्वातंत्र्योत्तर काळातले हुसेन, तय्यब मेहता, गायतोंडे वगैरे चित्रकार त्यामुळे मराठी दिवाळी अंकांवर दिसू लागले. गेली काही वर्षं 'मुक्त शब्द'नं 'मौजे'ची पूर्वीची बिनीची जागा व्यापली आहे आणि 'मौज' कोणतंही खास वैशिष्ट्य किंवा वेगळा विचार न मिरवता त्यातल्या त्यात कसाबसा टिकून आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अगदी अगदी. अनेक प्रकारे हे
अगदी अगदी. अनेक प्रकारे हे जाणवतं आहे. ढिसाळ प्रमाणलेखन, साचेबद्ध कथा आणि लेख.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मला दिवाळी अंकातले ललित कळत
परिचय खूप छान करून दिला आहे.आणखी येणार हे वाचून बरं वाटलं.मौज,ललित वाचणाय्रांना लगेच कल्पना येईलच की लेख कसा असेल ते.परदेशातील किंमत फार वाटतेय."घ्यायचे तर घ्या नाहीतर ***" छाप प्रवृत्ती बय्राचदा मराठी व्यापाय्रांत असतच अथवा एकाने धंधा सुरू करून वाढवेपर्यंत त्याचे वय होते आणि मुलांना असल्या सुट्टी नसलेल्या धंध्यात स्वारस्य रहात नाही.
मला दिवाळी अंकातले ललित कळत नाही ( ठकठक आणि किशोर सोडून )लायब्ररीतून फक्त digit,nat geo,ic chip,elec for you ,इंडिया टुडे,मराठीतील नवीन पुस्तके वाचत असे.बरीचशी तिथे चाळतानाच कळायचे की कामाचे नाहीये.ललित,मौज वाचायचो.
दिवाळी अंकातले सकाळ,कालनिर्णय मात्र बरे वाटायचे.लंपन पात्र फार आवडायचे.नंतर एकसुरी झाले. चांगले वाचनालय जवळ असणे फार भाग्याचे लक्षण असायचे.महिन्याभरात बय्राच मालावर हात मारता यायचा.नंतर इंग्रजी बेस्ट सेलर वगैरे वळलो तेव्हा मित्रांकघून 'वाचलीच पाहिजेत ' ची यादी घेऊनतीसेक पुस्तकांचा फडशा पाडला.
लंपन पात्र फार आवडायचे.नंतर
आय ऑबजेक्ट युवर ऑणर.
पुस्तकांतल्या लंपनकथा कालानुक्रमे नाहीयेत. (उदा० झुंबरमध्ये एक कथा लंपनच्या शाळेच्या पहिल्या दिवसावर आहे, आणि वनवासमध्ये प्रत्येक कथेत लंपन शाळेत रुळलेला दाखवला आहे.)
चारही पुस्तकं घेऊन एकदा कथांचा ढोबळ कालक्रम बनवला होता. त्या क्रमाने कथा वाचल्या तर लंपन "मोठा होताना", त्याची समज वाढताना जाणवते.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आयता कालक्रम मिळेल काय?
आयता कालक्रम मिळेल काय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
शोधून पाठवतो. आमच्या घरात
शोधून पाठवतो. आमच्या घरात कागद शोधणे म्हणजे ... ह्या: ह्या: ह्या:...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लंपन आणि पुस्तकांचा क्रम
फार पूर्वी नंदनरावांसोबत याबद्दल बोललो होतो. वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर असा साधारण क्रम असावा असे वाटते. कारण शारदा संगीतात उल्लेख केलेल्या लंपनच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील पेटीवादनाचे उल्लेख पंखामधील काही कथांत येतात. झुंबर नक्की शेवटचं आहे.
पुस्तकांचा क्रम असाच आहे.
पुस्तकांचा क्रम असाच आहे. त्यातल्या कथा सरळ त्याच क्रमाने नाहीत. म्हणजे लंपनच्या वयानुसार नाहीत. मला कथांचा वयानुसार क्रम हवा आहे. (आयता मिळतो आहे, म्हणून अजून हवा झाला... ;-))
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लंपन पात्र फार आवडायचे हे
लंपन पात्र फार आवडायचे हे मात्र खर्र.