आपली संस्कृती : १ (संभ्रमाच्या विवरामधून)
‘स्वदेस’ आठवतोय? त्यातल्या एका प्रसंगात गावातील एक माणूस मोहन भार्गवला भारतीय संस्कृती किती महान आहे हे सांगत असतो त्यावेळी मोहन एक वाक्य बोलून जातो,”मै नही मानता की मेरा देश महान है”. भारतीय सण, परंपरा,रिती,रिवाज याचे सतत गोडवे गाणारे टिपिकल बॉलीवूड चित्रपट पाहता हे वाक्य तसं धाडसीच. आपलीच संस्कृती सर्वश्रेष्ठ हा ताठा मिरवणाऱ्या भारतीयांना धक्का देणारं, त्यांना विचार करण्यास भाग पाडणारं. खरोखर छान होता तो प्रसंग. मस्त जमून आलेला. ‘माझा देश,संस्कृती महान नाही पण आपण तिला महान बनवू शकतो. अमेरिकेला नावं ठेवण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नाही’ हा मोहनचा विचार मला तेव्हा पचला नव्हता. अर्थात हे समजण्याइतका मी अजून मोठा नव्हतो. पण नंतर त्यातला गाभा हळूहळू समजत गेला.पटत गेला.
एखाद्या देशाची संस्कृती ही त्याचा अविभाज्य घटक असतेच. पण कालानुरूप तिच्यात बदलही अपेक्षित असतात. संस्कृतीचं मूळ स्वरूप जपण्याचा जितका अट्टाहास केला जातो तितकीच ती अजून कालबाह्य बनत जाते. आणि मग तिचा जाच वाटू लागतो. ती खुपायला लागते. आणि जेव्हा ती खुपायला लागते तेव्हा तिचा ऱ्हास होणे ही काळाची गरज होऊन बसते.
कोणतीही संस्कृती ढोबळमानाने पाच अवस्थांमधून प्रवास करते असे म्हणता येईल.
१] उगम
२] भरभराट
३] प्रगल्भावस्था
४] संभ्रमावस्था
५] ऱ्हास (आणि मग पुन्हा नव्या संस्कृतीचा उगम )
त्यातही प्रत्येक अवस्थेमध्ये अनेक टप्पे असतात.जसं की उगम हा एका झटक्यात होत नसतो. अनेक टप्पे पार पडल्यानंतर उगमावस्था येते.
सध्याचा विचार केल्यास हजारो वर्षांपूर्वी उगम पावलेली आपली संस्कृती सध्या संभ्रमावस्थेतून जात आहे. अशी अवस्था ज्यामध्ये सध्याच्या अनेक सांस्कृतिक बाबी जपताना,पाळताना हे जे करतोय ते योग्य कि अयोग्य असा प्रश्न नकळत सर्वांच्या मनात हळू हळू कमी-जास्त प्रमाणात निर्माण होत जातो. किंवा एखादी पूर्वापार चालत आलेली परंपरा निभावताना ती अजून सोप्या, सुटसुटीत पद्धतीने पार पाडता येईल का किंवा याला पर्याय म्हणून दुसरे काही (थोडक्यात जुगाड) करता येईल का याबद्दल विचार सुरु होतो(दरवर्षी श्राद्ध करण्याऐवजी तितकेच पैसे एखाद्या गरीब ब्राम्ह्णास दान म्हणून दिले तर?) त्याचप्रमाणे भक्तिभावाने पूर्वापार चालत आलेला देवधर्म करताना अमुक अमुक करण्यापेक्षा असे केले तर काय होईल असे प्रश्न घर करू लागतात(गणपतीचे विसर्जन इको-फ्रेंडली तलावात करावे का? किंवा एखाद्या पूजेत तेरा ब्राम्हण बोलवण्याऐवजी तेरा पानसुपाऱ्या ठेवूयात का?) थोडक्यात म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना एका क्षणात दूर करणे हे प्रत्येक व्यक्तीला भावनिकदृष्ट्या शक्य नसते पण त्या पूर्णपणे योग्य नाहीत किंवा वेळेअभावी शक्य नाही असेही कुठेतरी मनात वाटत असते. मग त्या सोप्या बनवण्याकडे कल राहतो. सांस्कृतिक संभ्रमाची ही एक महत्वपूर्ण अवस्था मानता येईल.
आणखी काही उदाहरणे जर द्यायची झाली तर देता येतील. उदा. साधारणपणे ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रीने आपल्या नवऱ्यासाठी वटसावित्रीचा उपवास करणे, वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारणे हा आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक होता. त्यातून तिची सुटका नव्हती,पर्याय नव्हता. पण आज कोणालाही त्याची सक्ती नाही. वडाभोवती प्रदक्षिणा तर जवळजवळ बंदच झाल्यात. उपवास मात्र अनेकजणी करतात. पण त्यातल्या काहींच्या मनात ‘आपण हा जो उपवास करतोय त्याला खरोखरीच काही अर्थ असेल का? यात कितपत तथ्य असेल?’ असा प्रश्न हळूच डोकावत असणारंच. पण मनात कुठेतरी सल राहायला नको म्हणून नाईलाजाने अनेकजणी ते करत असतील. हे संभ्रमाचेच एक उदाहरण म्हणता येईल.
एक उदाहरण एकत्र कुटुंब पद्धतीचे देता येईल. अगदी स्वातंत्र्यानंतर २०-२५ वर्षांनंतर विभक्त कुटुंबपद्धती भारतात रुजायला सुरुवात झाली. सुरुवातीला अशा वेगळ्या राहणाऱ्या जोडप्याकडे पाहून लोकांचे डोळे वटारले जायचे. नाकं मुरडली जायची. ‘ही कसली नसती थेरं,आम्ही नाही का राहिलो सर्वांसोबत!!’ असे शेरे त्यांना ऐकायला लागायचे. पण आता परिस्थिती पालटली आहे. यात काही गैर नाही, ‘प्रायवसी’ नावाची गोष्ट असते आणि ती महत्वाची असते ही बाब लोकांना कळू लागली आहे. पण आपली अजिबात काही चूक नसताना एकत्र कुटुंब सोडून वेगळे होताना अनेकांच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना दडलेली असते. आपण चूक केलं की बरोबर या संभ्रमाच्या अवस्थेतूनच ती व्यक्ती त्यावेळी जाते. पण याच संभ्रमाची एक दुसरी बाजूदेखील आहे. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आईवडीलांपासून वेगळे होऊन आपली वैयक्तिक स्पेस मिळावी म्हणून वेगळे राहू पाहणारी भारतीय तरुणाई तिकडे वयाच्या अठराव्या वर्षीच मुलांना घर सोडून आपल्या चरितार्थासाठी तजवीज करावी लागते आणि त्यानंतर ती मुलं कधीच आपल्या पालकांवर विसंबून राहत नाहीत हे सोयीस्करपणे विसरते. म्हणजे वयाच्या २५-२६ व्या वर्षांपर्यंत आई-वडिलांच्याच पैश्यावर मजा करणारी मुलं कमावती झाल्यावर, लग्नानंतर मात्र स्पेस पाहिजे म्हणू लागतात. अर्थात यामध्ये चूक बरोबर काहीच नाही. स्पेस किंवा प्रायवसी ही संज्ञा बऱ्याच अंशी आपण स्वीकारली आहे. पण त्यासाठी कमी वयात स्वावलंबी बनण्याची मानसिक तयारी आपली झालेली नाही. ती पण होईल एक दिवस. हा संक्रमणाचाच एक टप्पा आहे हे विसरता कामा नये. न जाणो पुढची पिढी स्वत:च १८व्या वर्षी मला माझ्या पद्धतीने जगायचंय असं आई-वडिलांना सांगून स्वावलंबी होण्याकरता बाहेर पडतीलही.
भारतीय संस्कृतीच्या प्रवासातील संभ्रमाचा हा टप्पा साधारणपणे समाजसुधारकांच्या काळापासून सुरुवात झाला असे म्हटले तर संथ सुरुवातीनंतर गेल्या काही दशकांपासून यातील एक एक टप्पे वेगाने पार पडत जातायत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. वरील आकृतीप्रमाणे गेलो तर याची पुढची पायरी म्हणजे ऱ्हास असेल. तोही अचानक नाही. अनेक वर्षांच्या गुंतागुंतींनी भरलेल्या संक्रमणातून गेल्यानंतर होणारा. पण हा ऱ्हास एका नव्या प्रगत संस्कृतीच्या जन्मास कारणीभूत ठरेल नक्कीच.
कोणतीही संस्कृती शाश्वत ठेवण्याचा जितका घाट घालू तितकी तिला बुरशी लागत जाते. तिच्यात बदल होत गेलेच पाहिजेत. याचा अर्थ तिचे जाणूनबुजून जबरदस्तीने पतन केले जावे असा मुळीच नव्हे. पण जतन करतानाही अट्टाहास केला जाऊ नये. जे बदल घडतायत ते सहजपणे घडू द्यावेत. संस्कृतीतला ताजेपणा टिकून राहण्याचा हाच एक उत्तम उपाय आहे असे वाटते.
अर्ध्याहून अधिक जग अजूनही रानटी टोळ्या म्हणून जगत असताना एक प्रगत,प्रगल्भ आणि विचारशील संस्कृती विकसित केलेल्या माझ्या देशाने सध्याची जळमटे झाडून टाकून भविष्यात इतरांपेक्षाही वेगळी, एकमेव , प्रगत, अत्याधुनिक संस्कृती निर्माण करावी ही अपेक्षा पूर्ण होईल की नाही याचे उत्तर काळच देऊ शकतो.
...........................................................................................................................................................
हे ढोबळमानाने केलेले विश्लेषण आहे. यात अभ्यासापेक्षा समाजात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या निरीक्षणांचा आधार घेतला गेलाय. कल्चर शॉक हे पुस्तकं वाचल्यानंतर मला हे लिहावेसे वाटले. हे सर्व मुद्दे सरसकट सर्वांना लागू होतील असे नाही. पण निदान महाराष्ट्रात तरी बऱ्याच अंशी लागू होतात असे माझे मत आहे. आणखी काही मुद्दे असल्यास सर्वांचे स्वागत. चूकभूल देणे-घेणे.
............................................................................................................................................................
पुढील भागात सध्याच्या भारतीय संस्कृतीतल्या काही अशा बाबींबद्दल लिहीन ज्यातल्या काही मला कालबाह्य आणि निरर्थक वाटतात तर काही इतक्या अमुल्य वाटतात की त्या नष्ट होण्याची कल्पनादेखील करवत नाही.
इंट्रेष्टिंग. सावध आणि संशयी
इंट्रेष्टिंग. सावध आणि संशयी आणि उत्सुक नजरेने वाचत आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मोठा आवाका
मोठा आवाका असलेल्या विषयाला धागालेखकाने हात घातला आहे. पुढील भागांमधून काय येईल ते जाणण्याची उत्सुकता आहे.
लेखनातील शिस्त प्रशंसनीय आहे,
उदाहरणांमध्ये तरी!
उदाहरणांमध्ये तरी मराठी (वटसावित्री इ.) , हिंदू (गणपती/श्राद्ध/१३ ब्राह्मण भोजन इ.), बर्यापैकी सधन्/मध्यमवर्गीय (२४-२५ होईपर्यंत आईबाबांनी मुलाला पोसणे, एकत्र कुटुंब्)इत्यादी संस्कृतीबद्दल भारतीय संस्कृती असे वाचायला मिळणार असे वाटते.
पण आत्ताच काही गृहीतक मांडणे कठिण.
मी पण सावध, संशयी आणि उत्सुक!
वर कोल्हटकरकाकांनी लेखनातल्या
वर कोल्हटकरकाकांनी लेखनातल्या शिस्तीचा उल्लेख केला आहे. मला पटलं नाही.
मानता येईल, करता येईल, देता येईल, असे म्हटले असं लेखात अनेक ठिकाणी आलं आहे. अशा पॅसिव वाक्यरचना विकीपीडियावर लिहिल्या, तर त्याला 'वीझल वर्डस' असा ट्याग येईल. लिंग्विस्टिक हेजिंग अशी पारिभाषिक संज्ञा आहे.
या प्रत्येक उदाहरणात "कोण?" हा प्रश्न एक अंगुळ मागे उभा आहे. (कोण मानतो, कोण करतो, कोणी म्हटले वगैरे.) हे धागालेखकाचं मत आहे की या विषयावर आधी झालेल्या संशोधनाचा सारांश हे कळत नाही.
खरंच गंभीरपणे या विषयावर लिहायचं असेल तर हे लिंग्विस्टिक हेजेस टाळावेत असं वाटतं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आधीच म्हटलंय. ढोबळमानाने आणि
आधीच म्हटलंय. ढोबळमानाने आणि वैयक्तिक निरीक्षणांच्या आधारे लिहिलंय. असो. हा एक लेख आहे त्यामुळे शक्यतांचा उल्लेख जास्ती आहे. जर एखादा शोधनिबंध असता तर गोष्ट वेगळी. आणि अर्थात हे वैयक्तिक मत आहे.
हो, ते वाचलं. पण तुम्ही
हो, ते वाचलं. पण तुम्ही महत्त्वाच्या विषयावर, अभिनिवेशरहित (अजूनतरी) आणि निगुतीने लिहीत आहात. त्यात संशोधनाची साटीपता असेल तर मोल आणखीच वाढलं असतं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो नक्कीच.
हो नक्कीच.
वर कोल्हटकरकाकांनी लेखनातल्या
डु प्र का टा आ
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
म्हणजे ?
म्हणजे ?
डु प्र का टा आ
डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे.
मीपण
> सावध आणि संशयी आणि उत्सुक नजरेने वाचत आहे.
मीपण.
> पाश्चात्त्य देशांप्रमाणे …. तिकडे वयाच्या अठराव्या वर्षीच मुलांना घर सोडून आपल्या चरितार्थासाठी तजवीज करावी लागते आणि त्यानंतर ती मुलं कधीच आपल्या पालकांवर विसंबून राहत नाहीत हे सोयीस्करपणे विसरते.
हे तितकंसं खरं नाही. अठराव्या वर्षी इंग्लंड-अमेरिकेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबांतली अनेक मुलं हायस्कूल संपवून युनिव्हर्सिटीत जाण्याच्या बेतात असतात. युनिव्हर्सिटी गावातच असेल तर ती पुष्कळदा घरी राहतात, नाहीतर डॉर्मिटरीत वगैरे राहतात. पण यानंतरची चारपाच वर्षं तरी ती पैशाने बव्हंशी स्वावलंबी नसतात. यातले काहीजण शिक्षणासाठी आईवडिलांवर अवलंबून असतात, काहीजण कर्ज घेतात, तर काही दोन्ही थोडंथोडं करतात. त्यानंतरही नोकरी मिळाली नाही किंवा असलेली गेली तर आईवडिलांकडे परत येऊन बेसमेंटमध्ये राहणं वगैरे होतच असतं. थोडक्यात काय तर पंचविशीच्या आसपास आर्थिकदृष्ट्या त्यांनी स्वावलंबी व्हावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असली तरी ती पूर्ण न झाल्यास मुलांना वाऱ्यावर सोडतात असं नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
हो ते तर आहेच. शेवटी आईबापच
हो ते तर आहेच. शेवटी आईबापच ते. पण मुलांचीच धडपड सुरु असते स्वावलंबी होण्याची १८ व्या वर्षापासून असं वाचनात, पाहण्यात ऐकण्यात आलंय. अनुभवलं नाही कारण परदेशी जाण्याचा कधी योग आला नाही. असो ही एक नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.
संस्कृती म्हणजे काय तर समाजात
संस्कृती म्हणजे काय तर समाजात राहतो त्यातील बहुसंख्य लोकांनी अथवा कमी मोजक्या परंतू शक्तिमान लोकांनी मान्य केलेल्या चालीरीती.
जर तुम्ही त्याला टक्कर देऊन तुमचे नियम पाळू शकाल तर तीच संस्कृती.तसं करता येत नसेल तर ज्याचे स्टंप्स ,बॅट बॅाल त्याचे नियम हेच नियम.त्याने आउट म्हटले की तुम्ही आउट त्याला कंटाळा आला तरच आउट.लो लाइट -खेळ थांबवा तर थांबतो.
कुटुंबातही छोट्या प्रमाणात तेच असते.
जर तुम्हाला कोणाकडे तोंड वेंगाडायला लागत नसेल तर संस्कृती अस्तित्ातच नसते.
र्हास?
संस्कृतीचा र्हास अॅज सच होतो का? मी तर इतके दिवस समजत होतो की संस्कृती हे काहीतरी सतत बदलणारं असतं. र्हास वगैरे फारच 'रोचक' सिद्धांत/मत वगैरे आहे. कारण आजपर्यंत हडप्पा 'संस्कृतीं'चे वगैरे र्हास नैसर्गिक आपत्तीनेच झाल्याचे वाचले आहे. अशा ऑर्गॅनिक पद्धतीने संस्कृतीचा र्हास होऊ शकतो हे नव्यानेच समजते आहे.
+१ संस्कृतीचा र्हास असा कधी
+१
संस्कृतीचा र्हास असा कधी होत नसेल. सतत बदल होत असतील. फक्त काही काळानंतर हीच ती संस्कृती आहे का असा प्रश्न जरूर निर्माण होईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
संस्कृतीचा र्हास अॅज सच
संस्कृतीचा र्हास अॅज सच होतो का?
मला वाटतं ते ऱ्हासाची आपली व्याख्या काय यावर अवलंबून आहे. ऱ्हास म्हणजे पूर्ण संस्कृती ही बदलतच जाते. आपली पण बदलतेच आहे. त्याच बदलांच्या टप्प्यावर आपण आहोत. अर्थात हा बदल हळू हळू होतोय. पण बदललेली संस्कृती ही प्रचलित संस्कृतीच्या ऱ्हासातूनच जन्माला आलेली असते. मुळात संस्कृती कधी एकांगी असते असं मला वाटत नाही. अनेक पैलू आहेत तिला.
माझ्या मते संस्कृती ही तिथल्या धार्मिक, पारंपारिक बाबींपेक्षा लोकांच्या मानसिकतेशी संबंधित बाबींशी जास्त निगडीत असते.त्या कोणत्या हे पुढच्या भागात लिहीन.
तरीपण एक उदाहरण म्हणजे वेगवेगळे धर्म जात पाळणारे, भाषा बोलणारे विविध प्रांतातील भारतीय लोक एकमेकांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये भले अलग असतील पण जेव्हा 'जुगाड' नामक संकल्पना येते तेव्हा सगळे तसेच असतात. जेव्हा खाद्यप्रेमाची, मैत्रीची बाब येते तेव्हा सगळे समान असतात. कारण ते आपल्या सर्व भारतीयांच्या मानसिकतेत आहे. ऱ्हास म्हणण्यामागे माझा रोख हा मानसिकतेकडे नाही. तो धार्मिक, काही अंशी सामाजिक आणि पारंपारिक बाबींकडे आहे.
संस्कृतीचा सामाजिक ऱ्हास नाही होऊ शकत का? मी उदाहरण दिलय एकत्र कुटुंबपद्धतीचं. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही पद्धत समाजात रूढ होती आणि आता संपत चालली आहे. माझ्या मते ही चांगलीच गोष्ट आहे. उद्या लिव-इन पद्धतीलाही लोक स्वीकारतील. ही सध्याच्या प्रस्थापित लग्नसंस्थेच्या ऱ्हासाची सुरुवात नसेल का? माझ्या मते तो अॅज सच ऱ्हास म्हणजे हाच. तुमचं मत कदाचित वेगळं असू शकेल.
कारण आजपर्यंत हडप्पा 'संस्कृतीं'चे वगैरे र्हास नैसर्गिक आपत्तीनेच झाल्याचे वाचले आहे.
हा अंदाज आहे. एक नैसर्गिक आपत्ती आली आणि अचानक संस्कृती ऱ्हास पावली का? माझ्या मते त्याला नाश म्हणतात. आणि हडप्पा संस्कृतीचा नाश नक्कीच झाला नाहीये. तिचा ऱ्हास झालाय पण अचानक नाही.कसा झाला का झाला यावर अजूनही संशोधन सुरु आहे. साधारणपणे एक हजार वर्षांच्या कालखंडात झालाय तिचा ऱ्हास. का? याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. सततचे पूर किंवा दुष्काळ यासम नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतरे वाढून ऱ्हास झाला असावा असा मुख्य अंदाज आहे. अने बाबींवर अजूनही प्रकाश पडत नाही कारण तत्कालीन गूढ अगम्य लिपी. तिचा बोध अजूनही कुणाला होत नाहीये. जेव्हा तो होईल तेव्हा हडप्पा संस्कृतीशी निगडीत अनेक गोष्टींवर प्रकाश पडेल.
ऑर्गॅनिक पद्धतीने संस्कृतीचा र्हास होऊ शकतो हे नव्यानेच समजते आहे.
यालाच खोचक ऐसे नाव का ?
संस्कृती ही कायम चालणारी
संस्कृती ही कायम चालणारी गोष्ट आहे असे वाटते.
ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या हजारो वर्षे तशा आहेत असे आपल्याला वाटत असते त्या खरे तर दोनतीनशे वर्षांहून जास्त जुन्या नसतात.
एकत्र कुटुंब पद्धत ही आर्थिक मजबूरी असते. ती सुद्धा दोनशे वर्षांपेक्षा जुनी नसावी. ती ब्रिटिशांच्या धोरणाने शहरातून बेकार झालेल्या कारागीरांच्या घरवापसीमुळे सुरू झाली असावी अन्यथा एका कुटुंबातले भाऊ परवडत असेल तर एकत्र रहात नसतील.
पहिला भाग आवडला आहे. पुढचे भाग 'लवकर टाका' असे म्हणत नाही. तुमचा विचार होईल त्याप्रमाणे टाका.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एकत्र कुटुंब पद्धत ही आर्थिक
काय सांगताय काय थत्ते चाचा, म्हणजे पेशवाईत लग्न झाले की मुलगा नविन घर थाटायचा की काय?
असो....
असो....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
संस्कृती-थोडे संकीर्तन
इरावतीबाईंनी म्हटले आहे की संस्कृती सरळ रेषेत प्रवास करीत नसते. तिचा प्रवास नागमोडी असतो, पण साधारण ती कोणती तरी एक दिशा पकडून जात असते. नागमोडी लाटांचे मध्यबिंदू सरळ रेषेत असतात तसे. आणि संस्कृती मध्ये कृती महत्त्वाची. कृती बदलली की संस्कृती बदललीच. अर्थात बोलणे, वावरणे, नेसणे, खाणे, दैनंदिन व्यवहार, उपासनापद्धती वगैरे बदलले की संस्कृती बदलली असे म्हणता येते. सिविलाय्ज़ेशन आणि कल्चर हे समानार्थी नाहीत. अतिस्थूल मानाने असे म्हणता येईल की सिविलाय्ज़ेशन ही साधारणपणे ऐहिक गोष्टींशी निगडित संज्ञा असते तर कल्चर थोडेसे तत्त्वज्ञानाशी. आपल्याकडे काही ठिकाणी सिविलाय्ज़ेशनला सभ्यता हा शब्द वापरतात पण तो दोन्हींना वापरलेलाही पाहिला आहे. संस्कृतीचा धर्माशी संबंध असतो आणि नसतोही. योरपमध्ये क्रिस्टिअन धर्म काही ठिकाणी गेली दोन हजार वर्षे आहे पण संस्कृती तीच राहिलेली नाही. बहुसंख्येने धर्म बदलला तर त्या प्रदेशाची संस्कृती बदलूही शकते. समाज (प्र)गतिशील राहाण्यासाठी असलेले यमनियम आपले उद्दिष्ट गाठायला अपुरे पडू लागले की काही काळापुरती गती मंदावते, प्रगतीला खीळ बसते. मग हळूहळू नवे नियम, रूढी, चालीरीती अस्तित्वात येतात, जुन्याविषयी जिव्हाळा वाटेनासा होतो तेव्हा संस्कृती बदलली असे म्हणता येते. बदल हा सृष्टीचा नियम आहे.(सृष्टी असे काही नियमबियम घालीत नसते, म्हणून गुणधर्म म्हणू.)
जे त्या त्या काळात सोयीचे असेल ते टिकते, त्यानुसार आचारविचार बदलतात. या बदलांमागे 'सोय' हेच मुख्य कारण असते. जुन्यानव्यातली ओढाताण आणि संघर्ष सदैव चालूच असतो. रस्सीखेचीतल्यासारखा ज्या दिशेने जोर जास्त त्या दिशेने रस्सी खेचली जाते. हे नेहमी आपोआप घडते असे नाही. एखादा ऐहिक, मानसिक, शारीरिक बलाने युक्त, धट्टाकट्टा माणूस समोरच्या पाच-पंचविसांना आपल्या बाजूला ओढून आणूही शकतो. त्याला महामानव, महात्मा, पुरुषोत्तम असे गौरविले जाते.
कीर्तन संपले.
अभिजीत अष्टेकर हा माझा डु आय डी आहे
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
अभिजीत अष्टेकर हा माझा डु आय डी आहे.
अधूनमधून डु आय डी असल्याचं नाकारुन मी थोडासा गोंधळ अजून वाढवणार आहे.
>>अभिजीत अष्टेकर हा माझा डु
>>अभिजीत अष्टेकर हा माझा डु आय डी आहे.
शक्य अह्नी
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शक्य अह्नी बहुधा आह्नी असे
बहुधा आह्नी असे होईलसे वआटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुसरे मन?
मनस् हा मूळ शब्द. तेव्हा संधिनियमांनुसार मनोमनी असाही आय्डी घेता येईल.तो मन&मनी असा उलगडू शकेल किंवा मन्मनी असाही.
आणि बावरा मन वगैरे आहेच.
असे मनोवैविध्य बरे असते कधी कधी(च).
या मांडणीत संस्कृती नावाची
या मांडणीत संस्कृती नावाची एकच एक मोनोलिथिक गोष्ट असते असं काहीसं गृहितक आहे. ते कितपत खरं आहे हे मला माहीत नाही. आता लेखातल्या उदाहरणांबद्दलच बोलू - एकत्र कुटुंबपद्धती - ही किती जणांची होती? म्हणजे ग्रामीण संस्कृतीत बऱ्याच लोकांची ती असेल, पण भटक्या जमाती, आदिवासी यांची तीच पद्धत होती का? मग एकाच वेळी नागर, ग्रामीण, आदिवासी आणि भटके अशा चार वेगवेगळ्या संस्कृती वावरतात असं म्हणता येईल का? नागर संस्कृतीतही पांढरपेशे आणि कष्टकरी यांच्या जीवनपद्धती, मुलांवरचे संस्कार, मूल्यं अशा अनेक गोष्टींत विविधता दिसते. मग पुन्हा या दोन उपसंस्कृतींबद्दल बोलायचं का? त्यांच्यातही पुन्हा धर्माप्रमाणे वागणुक बदलते. असे व्हेन डायाग्रामचे तुकडे तुकडे झाले की मग नक्की कुठच्या सबसेटला कुठच्या युनियन सेटला हे चक्र लागू पडतं? या सगळ्यामुळे मला संस्कृती हा शब्दच गोंधळाचा वाटतो.
हा लेख, विशेषतः उगम - भरभराट
हा लेख, विशेषतः उगम - भरभराट - ऱ्हास चक्र वाचून, आणि घासकडवींचा प्रतिसाद वाचून रेमंड विल्यम्सची आठवण झाली. हा बुवा म्हणतो:
कुठल्याही काळात, कुठल्याही समाजात, संस्कृतीत काही रूढी आणि मूल्यं प्रबळ, प्रभावशाली ठरतात. ती मुख्य धारेतली असतात. पण त्याचबरोबर या प्रबळ मूल्यांच्या विरोधी/ समांतर अशीही काही मूल्यं, रूढी, परंपरा, चाली वगैरे असतात. मागच्या काळात प्रबळ असणार्या काही चालीरीती आज प्रबळ नसल्या तरी थोड्या प्रमाणात समाजात उरलेल्या असतात. काही चालीरीती आज प्रबळ नसतात, पण त्या 'उगवत्या' असतात (पुढच्या काळात प्रबळ ठरणार असतात).
एक समाज पुढच्या पिढीला 'संस्कृती' संक्रमित करतो, ती संक्रमणाची प्रक्रिया ही एक प्रकारे निवडीची प्रक्रियाही असते. पुढच्या पिढीला वारसा सोपवण्याच्या या प्रक्रियेत काही विशिष्ट रूढी/परंपरा/समज यांच्यावर जास्त भर दिला जातो, तर काहींकडे दुर्लक्ष होतं. काही परंपरांचा नव्याने अर्थ लावला जातो, काहींचा अर्थ पातळ होतो.
संस्कृती म्हणजे जुन्या-नव्याची, उगवत्या-मावळत्याची, प्रभावशाली-विरोधी घटकांची सतत कुस्ती चालू असते.
छान प्रतिसाद! व्याख्या
छान प्रतिसाद! व्याख्या आवडली.
माझ्यासाठी "मी संस्कृती आहे" हे पुरेसं आहे. त्या बराच काळ चालत आलेल्या सवयी, मान्यता, विचार, आचार, रुढी इत्यादींच्या प्रवाहाचा मी एक भाग आहे. माझ्यापुढे त्यातील ज्या गोष्टी आवडतील, योग्य वाटतील त्या पुढे चालवायचा पर्याय आहे तसंच त्या गोष्टी मोडून/सोडून/वाकवून/वळवून/फेकून/जपून वेगळेच काही करायचाही पर्याय आहे. मी हे दोन्ही पर्याय वापरतो. मी बदललो की संस्कृतीत फार लहान बदल होत असतो. असे अनेक मी बदलले की संस्कृती बदलते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वर अनेकांनी मांडली आहे, तीच
वर अनेकांनी मांडली आहे, तीच शंका मलाही आहे. संस्कृती हे एकजिनसी प्रकरण नसावं. एकतर एकाच वेळी निरनिराळ्या समूहांच्या रीतींचं वेगळेपण. त्यात काही रीती लेखक म्हणतो तशा र्हास पावत असलेल्या, तर काही नव्यानं जन्माला येणार्या. काही बाबी उगम, काही संभ्रम, काही बहर अशा टप्प्यांवर असणं अगदीच नेहमीचं असणार. अमुक एक शेवट आणि अमुक एक सुरुवात असा बिंदू दाखवणंच अशक्य. लेखक या अडचणींकडे कसं पाहतो आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एकंदरीत प्रतिक्रिया पाहता आणि
एकंदरीत प्रतिक्रिया पाहता आणि त्यावर थोडा विचार करता मला काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात :
राजेश घासकडवी यांच्या मताशी मीदेखील सहमत आहे. संस्कृती मोनोलीथिक ,एकजिनसी किंवा एकांगी असते असं म्हणायचं नाही मला. मी जेंव्हा संस्कृती म्हणतो म्हणजे माझा निर्देश नेमका कुठे असतो हे मी आधीच स्पष्ट करायला हवं होतं . एकाच संस्कृतीत अनेक उप-संस्कृती असू शकतात आणि त्यातपणे अनेक खाचाखोचा असू शकतात. संस्कृती म्हटलं की समोर प्रचंड आवाका आहे याची जाणीव असतेच. अनेक बाजू असतात, अनेक व्याख्या असतात. सगळ्या एकाच वेळी मांडण्याचा घाट घालण्याचा माझा अट्टाहास नाहि. किंवा अभ्यास नाही म्हणा हवं तर.
माझा निर्देश आहे सध्याच्या मुख्य प्रवाही संस्कृतीबद्दल. जी साधारणपणे जगभरात आणि भारतातील सामान्य जनतेत 'भारतीय संस्कृती' म्हणून प्रसिद्ध आहे. यातही अनेक व्याख्या , संज्ञा आहेत नाही असे नाही. त्यात प्रकारही आलेच. देव, धर्म,मंदिरे ही खरी संस्कृती की स्वभाव, खाण्यापिण्याच्या,बोलण्याच्या ,राहण्याच्या सवयी , नितीमुल्ये समाजमुल्ये हीच संस्कृती हा वाद आला. मत-मतांतरे अनेक होतील.
माझी याबाबतची मते पुढच्या भागात लिहीन. पण संस्कृती या विषयातला माझा इलाका मी जाहीर केलाय अशी आशा करतो.