हे अशक्य नाही!
साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.
‘एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे’ असे ते चित्र होते. कदाचित अजुनहि असेल. कारण परिस्थितीत चांगला स्वागतार्ह काहीही बदल झालाच नाही आहे उलटपक्षी ती हाताबहेरच गेली आहे की काय अशी शंका यावी. मधूनच जाग आल्यावर काही कडक नियम लागू केल्याचा फक्त आव आणला जातो. जणू मी ओरडल्यासारखे करतो तू घाबरल्याचे दाखव. बस्स! मोजके काही दिवस हे नियम वरवर पाळले जातात परत ये रे माझ्या मागल्या!
दोन वर्षांपूर्वी माझी लेक साताऱ्याला कास पठारला गेली होती. सातारा म्हंटले म्हणजे कंदी पेढे आणणे ओघाने आलेच. तेव्हा पेढ्यांसाठी तिला साताऱ्याला चक्क कापडी पिशवी दिली गेली होती. मी हाताळलेली ती पहिली वहिली कापडी पिशवी. छोटूली, सुबक, लाल रंगाची पिशवी आणि तिने साताऱ्यात जन्म घ्यावा? मला हेवा वाटला त्यांचा. खरच!
एक वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला जाताना वाटेत जेवणासाठी नेमके साताऱ्याला थांबलो. त्या प्रशस्त हॉटेल मध्ये Mapro ची उत्पादने विकायला ठेवली होती. माझ्यासारखा मासा अशा गळाला लगेच फसतो. मग काय? मी नवऱ्याच्या नापसंती दर्शक अविर्भावाकडे पूर्ण दुर्लक्ष करत काही घेतली विकत. मी त्या दुकानदाराला माझ्या कडची पिशवी देणार इतक्यात त्यानेच मला कापडी पिशवीत माझी खरेदी घालून मला ती दिली. पुन्हा धन्य तो सातारकर असे म्हणावेसे वाटले.
आमची मुंबई इतकी सुधारलेली राजधानी! तरीही आम्ही मात्र अजूनही त्या निकृष्ट दर्जाच्या टाकाऊ प्रतीच्या पिशव्याच वपरतो आहोत. हे काम दोन स्तरांवर होणे आवश्यक आहे. एक ग्राहक तर एक विक्रेता. दोघांनी हातमिळवणी केल्याशिवाय हे होणे नाही. ग्राहकांनी आपली पिशवी सोबत ठेवली तर हा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु कधीतरी चुकून त्याच्याकडे नसली तर त्याला मिळणारी पिशवी ही पण कापडीच असावी ह्याकडे विक्रेत्यांनी लक्ष द्यायला हवे.
मागे मी ह्या संदर्भात माझ्या फेसबुक पेज वर लिहिले तेव्हा एक प्रतिक्रिया आली की आपण आपली पिशवी घेऊन जावी. इतरांना आपण सांगू अथवा सुधरवू शकत नाही. असे आपण आपल्याच पुरते बघत बसलो तर कशी सुधारणा होणार? आणि तसे बघितले तर ह्याचा फायदा आपल्याया आणि आपल्या पुढील पिढीला होणार आहेच.
माझा नेहमीचा फळ विक्रेता अगदी खुल्या मनाने मी माझीच पिशवी वापरते म्हणून कौतुक करतो. मी त्याला म्हंटले की “तू ह्या पिशव्या का देतोस? इतक्या पातळ पिशव्या हानिकारक असतात.” तर तो म्हणाला की “मी पिशवी दिली नाही तर ग्राहक परत जातात. दुसरा विक्रेता शोधतात. महाग पिशव्या मला परवडत नाहीत. कधी कधी काही ग्राहक दोन दोन पिशव्या मागतात. विकत आणलेला माल वेळेत नाही खपला तर खराब होऊन तोटा होणार म्हणून ग्राहक हा राजा समजून मी देतो त्यांना पिशव्या. काय करू? म्हणूनच तुमचे कौतुक वाटते ना?”
आता अशा वेळी नागरिकांनीच पुढाकार नको का घ्यायला? गरीब विक्रेत्यांना भुर्दंड भरायला लावून वर पर्यावरणाची हानी करायची. कहॉं का इन्साफ है? चांगल्या दुकानात, जिथे आपल्या कडून पिशवीचे पैसे आकारतात तिथेही प्लास्टिकच्याच पिशव्या मिळतात. मागच्या वर्षी ‘शब्द’ पुस्तक मेळाव्याला गेले होते. तिथे ५ रुपयांना मोठी कापडी पिशवी देत होते. ‘सहकारी भांडार’ या दुकानात पण कापडीच पिशव्या मिळतात. असे सगळ्या दुकानांमध्ये होणे गरजेचे आहे. एकत्रित येउन हा निर्णय घेणे गरजेचे आहे.
सरकारने निकृष्ट पिशव्यांची निर्मिती थांबवून त्या ऐवजी कापडी पिशवीच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे होणे निकडीचे आहे.
हे अशक्य नाही!
-उल्का कडले
जिव्हाळ्याचा विषय
हा माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्या बाबतीत मी (नको तेवढी) ऑर्गनाईज्ड आहे का काय, असा संशय मला येतो. भारतात मी सुद्धा फार वेळा प्लास्टिकची पिशवी वापरत नसे.
(आमच्या) ऑस्टिनात (राज्य - टेक्सास, देश - यू.एस.) गेली दोनेक वर्षं प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी आहे. अर्थातच यालाही अपवाद आहेत आणि दर आठवड्याला पिशव्यांचा गठ्ठा घरात जमतो. भाजी, मांस, वृत्तपत्र ह्या गोष्टींना हा नियम लागू नाही. पण ह्या पिशव्या दुकानातच डंप करायची सोय आहे. दुकानांमध्ये कापडी पिशव्या विकायलाही असतात. अधूनमधून या पिशव्यांवरही सेल लागतो. सुरुवातीला लोकांनी ह्या नियमाबद्दल कुरकूर केल्याच्या बातम्या येत होत्या; आजूबाजूलाही तक्रार ऐकू येत असे. आता सगळ्यांना सवय झाली असं वाटतं. दुकानांत जागोजागी 'तुमच्या कापडी पिशव्या विसरू नका' असे फलक लावलेले असतात. रिसायकल करून वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्याच, मजबूत, कापडसम पिशव्या बनवतात असं कुठेतरी वाचलं होतं.
तर अशा रीतीने आम्ही, दोन किमी.वर असणाऱ्या दुकानात कारने जातो. कारमध्येच पिशव्या असतात, प्लास्टिक आणि कापडी. प्लास्टिक दुकानात डंप करतो, कापडी पिशव्यांमध्ये भाज्या, फळं, पाव वगैरे भरून घरी आणतो. मला ह्या कापडी पिशव्या आवडतात. बरंच जास्त सामान त्यात ठेवता येतं, पिशव्या खांद्याला अडकवता येतात आणि पुन्हा हात मोकळे!
आम्ही सध्या ज्या वाण्याकडे जातो, ते दुकान दोन शहरांच्या सीमेवर आहे. ह्याचा फायदा घेऊन ते बराच काळ प्लास्टिकच्या पातळ पिशव्या देत होते. आता ते बंद होणार असं दिसतंय. कारण सध्या स्वस्तात टिकाऊ पिशव्यांचा जोरदार सेल सुरू आहे.
पण भारत काय आणि अमेरिका काय, ह्या पिशव्या अगदी बंडल रंगांच्या असतात. जरा आकर्षक बनवल्या पाहिजेत ह्या पिशव्या!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा विषय जेव्हा सर्वांच्या
हा विषय जेव्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा होईल तेव्हाच खरे परिवर्तन घडेल.
सविस्तर प्रतिसाद प्रियदर्शिनी कर्वे यांना दिला आहे.
उल्का
मी स्वतः शक्य तितका कागद,
मी स्वतः शक्य तितका कागद, प्लॅस्टिक, काच आणि अल्युमिनमचे कॅन रिसायकल करतो. कारण अल्युमिनम, कागद, काच रिसायकल करण्यात काहीतरी अर्थ असतो - एकतर त्यांचं वजन प्रचंड असतं. विशेषतः काच, रद्दीचे कागद यांचं. अल्युमिनमचंही समजू शकतो कारण तो प्यूअर धातू बऱ्यापैकी महाग असतो. जर माझ्या कचऱ्यातलं रिसायकल मटेरियल वेगळं करून वेगळ्या डब्यात भरण्याने समाजाचे पैसे आणि श्रम मोठ्या प्रमाणावर वाचत असतील तर तेवढं करायल मला हरकत नाही.
पण इतक्या हलक्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पर्यावरणाला धोका कसा येतो? समुद्रात अस्ताव्यस्त टाकून दिल्यामुळे जर काही जलचरांना त्रास होत असेल तर तो मुद्दा मी समजू शकतो. पण चुकीच्या ठिकाणी कचरा टाकणं हे चूक आहे. त्यात प्लॅस्टिकचा काही दोष नाही. या प्लास्टिकच्या पिशव्यांचे नीट गठ्ठे करून जमिनीत भर म्हणून घातले किंवा कुठेतरी एका कोपऱ्यात रचून ठेवले तर पर्यावरणाचं नक्की काय बिघडतं?
दुसरा एक हिशोब. या स्वस्त पातळ बॅगची किंमत साधारण १ सेंट पडते. मजबूत कापडी बॅग घ्यायची झाली तर तिची किंमत किमान २ डॉलर पडेल. आता २ डॉलरची पिशवी ही सतत बाळगावी लागते, योग्य ठिकाणी ठेवावी लागते, अधूनमधून धुवावी लागते. त्यासाठी पाणी लागतं, साबण लागतो. मुळात ती पिशवी तयार करण्यासाठी यंत्रं, खतं, पाणी, जमीन आणि मेहेनत लागते. जर या कटकटी नसणारी बॅग मिळाली तर तिची किंमत २ डॉलरपेक्षा कितीतरी जास्त असेल. आणि तिचं आयुष्यही मर्यादितच असतं. त्यामुळे दर वापरासाठी १ सेंट खर्च करणं अगदीच स्वस्तातलं काम आहे.
त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांना नक्की काय हरकत आहे?
जर या कटकटी नसणारी बॅग मिळाली
आपली तर जुनीच थियरी आहे की जे स्वस्त असते ते पर्यावरणाला कमी हानीकारक असते***. प्लॅस्टीक च्या पिशव्या हा प्रॉब्लेम आहे का त्या कुठेही आणि कश्याही टाकुन देणे हा प्रॉब्लेम आहे?
*** : कुठलीही वस्तु बनताना निसर्गातल्याच रीसोर्सस चा उपयोग होतो. त्या रीसोर्स्ची काहीतरी कॉस्ट कींवा प्राईस असते.
जर किंम्मत जास्त असेल आणि त्याच्या उत्पादना च्या किमती मधे उगाचचे खर्च ( जसे डीझाईनिंग वगैरे ) मिळवले नसतील तर ते उत्पादन निसर्गातले जास्त रीसोर्स वापरते आहे असे समजायला हरकत नाही. मग असे जास्त रीसोर्स वापरणारी उत्पादने पर्यावरणाला जास्त हानीकारक असणार ना.
त्या कुठेही आणि कश्याही टाकुन
कुठेही आणि कश्याही टाकून देणे हाच प्रॉब्लेम आहे आणि तो पिशव्याच नव्हे तर कोणत्याही पदार्थाबाबत लागू ठरतो. त्यातल्यात्यात बरीचशी प्लॅस्टिक्स सूक्ष्मजीवांद्वारे आपोआप विघटित होत नसल्याने ती अयोग्य ठिकाणी साठून प्रॉब्लेम्स होतात.
जिथे अशी शिस्त प्रत्येकामध्ये बाणवणं अशक्यप्राय आहे तिथे मूळ पदार्थ तसा इटसेल्फ निर्दोष असूनही त्यावरच निर्बंध आणायला लागू शकतात.
आजार एका मूळ कारणाने असला तरी मूळ कारणावर थेट उपाय जिथे अत्यंत कठीण असतो तिथे अन्य घटकांना टार्गेट करुन निदान लक्षणं कंट्रोल करावी लागतात.
किंवा आणखी उदा. दारुत इटसेल्फ दोष नाही. मर्यादेत घेतल्यास ती उपद्रवी नाही पण जर शंभरातले नव्व्याण्णव लोक अतिरिक्त बेफाम पिऊन लिव्हर खराब होईपर्यंत तेच करत राहिले तर दारुवरच बंदी आणायचा विचार करावा लागणार.. किमान "कमी प्या" अशा शिक्षणाचा काहीसा परिणाम सिद्ध होईपर्यंत.
मुद्दा असा होता की कापडी
मुद्दा असा होता की कापडी पिशव्याच पर्यावरणाला जास्त घातक नसतील का?
खरेतर अफाट लोकसंख्या हाच एक पर्यावरणाला एकमेव घातक प्रॉब्लेम आहे. पण त्याबद्दल बोलणे पॉलिटीकली इन-करेक्ट असल्यामुळे उगाचच वेगळे उपाय सुचवले जातात.
किंमत = f(रिसोर्सेस)
>>जर किंम्मत जास्त असेल आणि त्याच्या उत्पादना च्या किमती मधे उगाचचे खर्च ( जसे डीझाईनिंग वगैरे ) मिळवले नसतील तर ते उत्पादन निसर्गातले जास्त रीसोर्स वापरते आहे असे समजायला हरकत नाही.
किंमत जास्त असते कारणा त्यासाठी अधिक रिसोर्सेस (किंवा लेबर) वापरलेले असते ही बहुधा मार्क्सची चुकीची थिअरी आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्ते चाचा, माझ्या
थत्ते चाचा, माझ्या प्रतिसादाला मार्क्स ची झालर लावून तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे?
मार्क्सची थिअरी तुमच्याकडून
मार्क्सची थिअरी तुमच्याकडून आली म्हणून
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जर या कटकटी नसणारी बॅग मिळाली
..
तुम्ही सेंट आणि डॉलर
तुम्ही सेंट आणि डॉलर म्हणताहात म्हणजे भारताबाहेर राहता म्हणून मुंबईची भयानक परिस्थिती तुम्हाला माहित नसावी.
निकृष्ट दर्जाच्या पिशव्या पुरून पुरून किती आणि कुठे पुरणार? असे किती खड्डे बनवणार? मुंबईत ज्या संख्येने पिशव्या वापरतात त्या पाहता हे शक्यच नाही. आणि त्याने मातीचा ऱ्हास नाही का होणार?
मी सविस्तर प्रतिसाद प्रियदर्शिनी कर्वे यांना दिला आहे. तोही वाचावा.
उल्का
उल्का तै - हे गणित बघा
उल्का तै - हे गणित बघा
एका बॅग चा साधारण साइझ पकडा ५० सेमी बाय ५० सेमी, जाडी पकडा ५० मायक्रोन
म्हणजे एका बॅगेचा व्हॉल्युम झाला = ०.००००२५ मि क्यु.
बॉम्बे मधे रोज १० लाख बॅगा लागल्या असे धरले तर, दिवसाचा प्लॅस्टीक बॅगेचा व्हॉल्युम झाला २५ मि क्युब. हे फारच छोटे आहे
वर्षाचा व्हॉल्युम झाला ९००० मिटर क्युब. म्हणजे फक्त २१ मिटरचा क्युब.
म्हणजे बॉम्बे मधे वर्षाला वापरल्या जाणार्या प्लॅस्टीक बॅगा फक्त २१ मि च्या क्युब मधे दाबुन जामिनीत गाडता येतील. हे काहीच नाही हो.
गवि - बरोबर आहे का ?
हो, फक्त हा २१ मि चा क्युब
हो, फक्त हा २१ मि चा क्युब बनवायला सगळ्या पिशव्या निगुतीने एकत्र कराव्या लागतील. नाल्याच्या कडेला, कल्वर्टच्या कोपर्यात, उकिरड्याच्या परीघावर टाकून चालणार नाही.
बर्याचदा प्रश्न रिसोर्सेसचा नसतो. डिस्ट्रिब्यूशन चॅनलचा असतो. (इथेही डिस्ट्रिब्यूशन चॅनलच आहे. उलट अर्थाने - प्रोक्युअरमेंट चॅनल म्हणा...)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बर्याचदा प्रश्न रिसोर्सेसचा
ऑ ?
काही चुकलं का? डिस्ट्रिब्यूशन
काही चुकलं का?
डिस्ट्रिब्यूशन चॅनलः एका ठिकाणापासून (उदा० गोडाऊन) अनेकांपर्यंत (पक्षी: अनेक ग्राहकांपर्यंत) पोचवणे.
प्रोक्युअरमेंट चॅनल: अनेक ठिकाणांपासून (पक्षी: जिथे जिथे प्लॅस्टिक पिशवी फेकली गेली आहे तिथपासून) ते प्लॅस्टिकचे क्यूब करणार्या एका जागेपर्यंत पोचवणे. ∴ रिव्हर्स डिस्ट्रिब्यूशन चॅनल
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तुमचा मुद्दा एकदम मस्त आहे.
तुमचा मुद्दा एकदम मस्त आहे. विशेषतः हा - रिव्हर्स डिस्ट्रिब्यूशन चॅनल.
पण डिस्ट्रिब्यूशन चॅनल असो वा प्रोक्युअरमेंट चॅनल - दोन्ही मधे रिसोर्सेस लागतातच की. (
बर्याचदा प्रश्न रिसोर्सेसचा नसतो.)सध्या जे प्रोक्युअरमेंट चॅनल आहे (की ज्यात व्यक्ती तीन डब्यात कचरा वर्गीकरण करून टाकते) ते बरेचसे क्राऊडासोर्सिंग च्या जवळ जाणारे आहे.
.
>>सध्या जे प्रोक्युअरमेंट चॅनल आहे (की ज्यात व्यक्ती तीन डब्यात कचरा वर्गीकरण करून टाकते) ते बरेचसे क्राऊडासोर्सिंग च्या जवळ जाणारे आहे.
क्राउडसोर्सिंगमधले घटक आपले काम योग्य दर्जाचे करत नाहीत. वर्गीकरण ऑलमोस्ट करतच नाहीत. उदा. दुधाच्या पिशव्या, ओल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या (उदा. हॉटेलातून आणलेल्या भाजीची पिशवी न धुता (किंवा त्या पिशवीत उरलेला पदार्थ तसाच ठेवून- म्हणजे तो काढून ओला कचरा म्हणून वर्गीकरण केलेल्या कचर्यात न टाकता) कचरापेटीत टाकतात. मग प्रोक्युरमेंट चॅनेलमध्ये त्या पिशव्यांना वास येतो. म्हणून त्या तिथून काढून टाकल्या जातात.
पातळ कॅरीबॅग प्रोक्युरमेंट चॅनेलमध्ये जातच नाहीत कारण बहुधा त्या रिसायकल करून परतावा ऑलमोस्ट मिळत नाही. त्याच मुख्यत्वे इतस्ततः पडलेल्या सापडतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
क्राउडसोर्सिंगमधले घटक आपले
त्यांनी ते योग्य दर्जाचे करण्यामधे त्यांचा व्यक्तीगत फायदा शून्य असतो.
येस. त्यांनी व्यवस्थित वर्गीकरण केले तर त्यांचा फायदा आहेच.
त्यांनी व्यवस्थित वर्गीकरण केले तर ओव्हरऑल पब्लिक ला जो बेनिफिट मिळणार आहे तेवढाच त्यांना मिळतो. पण केवळ त्याच्या जोरावर काम होत असते तर मूळ प्रश्न निर्माण झाला असता का ?
Plastic-Munching Bacteria Can
Plastic-Munching Bacteria Can Make Trash Biodegradable.
शास्त्रज्ञांनी एक असा बॅक्टेरिया शोधून काढलाय की जो प्लॅस्टिक चे विघटन करू शकतो.
हे खरंखोटं रजनीकांतच जाणे.
म्हणजे आबा तुम्हाला प्लॅस्टीक
म्हणजे आबा तुम्हाला प्लॅस्टीक पिशव्या वापरणे कापडी पिशव्यांच्या ऐवजी हे रूट कॉज नाहीये हे मान्य आहे तर.
शंभर टक्के मान्य आहे.
शंभर टक्के मान्य आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
काहीसं अवांतर आहे.
पुनर्वापर करताना वजनाचा विचार का करता? काच पुनर्वापरात आणण्याच्या व्यवसायात फार नफा नाही, पैसे देऊन हे करवून घ्यावं लागतं अशा अर्थाच्या बातम्या अमेरिकन माध्यमांमध्ये असतात. म्हणून हा प्रश्न. बाकी रद्दी कागद, वेष्टनांचा पुठ्ठा, अॅल्युमिनियम आणि इतर धातू यांबद्दल प्रश्न नाही.
हे अगदी जुन्या जमान्यातलं बोलताय तुम्ही! माझ्याकडे १० डॉलर खर्चून चार वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या पाच पिशव्या आहेत. फारतर वर्षातून एकदा धुतल्या असतील; त्याही यंत्रातून धुतल्या. सगळे कपडे धुवायला टाकते, त्यात एका पिशवीसाठी जास्तीचा साबण घातला नाही; पाणी किती वापरायचं हे यंत्र ठरवतं, चार घनफूट आकारमानाचे कपडे धुणाऱ्या मशीनभर कपड्यांमध्ये एका पिशवीसाठी किती जास्त पाणी लागलं असेल? माझ्या लेखी हा खर्च शून्य आहे, एक सेंटसुद्धा नाही. (पिशव्यांच्या किंमती जर डॉलर आणि सेंटमध्ये मोजायच्या असतील तर अमेरिकेत पाणी आणि साबण किती स्वस्त असतात आणि किती सहजतेने उपलब्ध होतात आणि 'दुनिये'कडे वॉशिंग मशीन असतं याबद्दल बोला. खरेदीला जाण्यासाठी गाड्या असतात आणि गाडीत एक काय, चारशे पिशव्या सहज ठेवता येतात याबद्दल बोला.)
ही पिशवी वापरलेल्या प्लास्टीकची बनवलेली आहे. जो कचरा जमिनीत पुरण्याची कल्पना तुम्ही खालच्या प्रतिसादात मांडली आहेत, तोच कचरा पुनर्वापर होऊन माझ्या पिशवीत येतोय.
मला आठवड्याच्या खरेदीसाठी या पाचही पिशव्या लागतात. प्लास्टिकच्या पातळ पिशवीचा आठवडी खर्च ५ सेंट. वर्षाला ५२ आठवडे, म्हणजे वर्षाचा खर्च अडीच डॉलर. चार वर्षांचा खर्च १० डॉलर. माझ्याकडे असलेल्या पिशव्यांचा रंग आता थोडा उडला आहे, पण अजूनही ह्या पिशव्या मजबूत आहेत. आता मी प्रत्येक वेळेस पिशवी वापरली की पैसे वाचवत आहे.
पण हे पैसे एवढे कमी आहेत की त्यामुळे मला किंवा कोणत्याही मध्यमवर्गीयाला फरक पडू नये. प्रश्न मानसिकतेचा आहे (आणि आकलनाच्या अभावाचाही)!
मारे पाश्चात्य देश फार प्रगत म्हणून म्हणायची पद्धत आहे; पण गेली दोन वर्ष ऑस्टीनात 'बॅग बॅन' आल्यापासून रस्त्यावर दिसणारा पिशव्यांचा कचरा बराच कमी झालेला आहे असं वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पाहण्यांमध्ये दिसून येतं. (म्हणून स्थानिक बातम्या रोज ऐकाव्यात.) भारतातल्या प्रचंड घनतेच्या शहरांमध्ये, सार्वजनिक शिस्तीचा अभाव असलेल्या समाजात, जिथे कचऱ्याचे डबेही धड उपलब्ध नसतात; आणि जिथे चार महिन्यांत वर्षभराचा पाऊस पडतो, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी यंत्रणा नाही तिथे जागरूक नागरिकांनी 'घरांत पावसाचं पाणी घुसू नये म्हणून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या वापरायचं सोडा' हे म्हटलं त्यात काय चूक आहे? कचरा दिसतो हा त्रास अमेरिकेत आहे; भारतात लोकांची घरं आणि मालमत्ता घाण पाण्यात बुडतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुनर्वापर करताना वजनाचा विचार
बिगर बॅंग फॉर माय रिसायकलिंग एफर्ट बक. शेकडो पिशव्या रिसायकल करून जेवढं रिसायकलिंग पुण्य मिळतं तितकंच एक जाडजूड वर्तमानपत्र रिसायकल करून मिळतं.
तुम्ही जी गणितं केली आहेत ती सर्वांनीच केली पाहिजेत. या खर्चात फक्त धुण्याच्या मटेरियलचा विचार केला आहे. त्या पिशव्या बाळगण्यासाठी, योग्य तिथे ठेवण्यासाठी जे कष्ट असतात ते गृहित धरलेले नाहीत. दर वापरामागे या पाच पिशव्या योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी १ मिनिट लागत असावं. वर्षाला तुमच्या बावन्न मिनिटांची किंमत किती? किंमत सोडा, काहींना ही गोष्ट नैसर्गिक वाटते, काहींना या पाच पिशव्या सांभाळायला प्रचंड त्रास होतो. त्यांना तो अतिरिक्त खर्च असतो. आणि तो पिशव्यांच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त असू शकतो.
हम्म्म... या युक्तिवादावरून एका स्फोटक विषयावरच्या युक्तिवादाची आठवण झाली, पण इथे ते अवांतर होईल. खरडफळ्यावर बोलू.
असो.
प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा स्वतःच्याच घरात होऊ नये म्हणून कष्ट न घेणारे लोक माझ्या पाहण्यात नाहीत. अमेरिकेत घराची कचराकुंडी करणाऱ्या लोकांबद्दलही रिआलिटी शोज असतात; पण असे लोक विरळा म्हणून. जिथे टिकाऊ पाच पिशव्यांत काम भागतं तिथे प्लास्टिकच्या किमान १० पिशव्या लागतील. (या हिशोबात वरचं गणित चुकलंय; माझा पिशव्यांचा खर्च दोन वर्षांतच भरून निघालाय.) या दहा पिशव्यांचे बोळे करून कुठेतरी ठोसून ठेवण्यासाठीही कष्ट करावे लागतात. ते बोळे ठोसून ठेवण्यासाठी काही मटेरियल वापरून, कष्ट करून सोय करावी लागते. पण ते कष्ट आणि खर्च तुम्हाला मोजायचे आहेत असं दिसत नाही.
'मी कचरा करणार आणि तेच योग्य/छान/सोयीचं आहे', असंच म्हणायचं असेल तर 'मी कचरा पुनर्वापरात आणणार' म्हणणारी उदारमतवादी व्यक्ती काय करू शकते? त्यामुळे असो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रत्येकासाठी वेगवेगळ्या
प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा खर्च वेगवेगळा असतो. मला पाच पिशव्यांचा पसारा सांभाळणं, त्या हरवल्या की शोधत बसणं, आयत्या वेळी त्या गाडीत नसणं या गोष्टींचं ओझं प्रचंड वाटतं. त्याऐवजी मला व्यवस्था अशी हवी की मी दुकानात गेलो की मला आयत्या पिशव्या मिळतील, घरी आल्यावर त्या रिसायकलच्या डब्यात टाकेन, आणि मग कचरा-व्यवस्थापनाने त्याची घाऊक प्रमाणावर योग्य विल्हेवाट लावावी. यात उदारमतवाद वगैरे काही नाही, प्रॅक्टिकल प्रश्नांना प्रॅक्टिकल उत्तरं आहेत. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या म्हणून उत्तरं वेगळी.
जाओ पहले उस आदमी का सिग्नेचर ले आओ ....
मी पाच पिशव्यांत भागवू शकते; ज्यांना त्या पिशव्या वेळेत गाडीत ठेवायचं आठवत नाही त्यांच्या गाडीत पाच काय, तीनशे चौदा पिशव्या सहज मावतात. (उगाच नाही अमेरिकेत कार-पूल लेन वेगळ्या बनवत!)
व्यवस्था बदलणं मला शक्य नाही म्हणून मी माझ्याकडून जे शक्य असेल ते करतेच.* व्यवस्था बदलण्याचे कष्ट घ्यायचे नाहीत; आहेत त्या सोयींमधून आपल्या आणि इतरांच्या भल्याचा विचार करायचा नाही आणि फक्त व्यवस्था बदलण्याची वाट बघायची; नव्हे जे लोक आहे त्यातून काही वाट काढू बघत आहेत, त्यांना 'तुमचं पहा कसं चुकतंय' असं म्हणणं हा प्रश्न मानसिकतेचाच आहे. (ज्यांना जेव्हा कप वापरणं शक्य नाही,) जे कधी पिशव्या दुकानात न्यायला विसरतात त्यांना अपराधगंड देऊ नये हे योग्यच. ऑस्टीनातल्या दुकानांत आजही जाडसर प्लास्टिकच्या, पुन्हा वापरता येतील अशा पिशव्या २५ सेंटांना विकतात. पण '(कप आणि) टिकाऊ पिशव्या वापरणारे कसे खुळचट' असा एक स्वर अनेक प्रतिसादांतून जाणवतो, त्याचं काय करायचं?
*खरडफळ्यावर जे विधान आहे त्याबद्दल - मुली, स्त्रिया घरातून बाहेर पडताना, 'चला, आज तोकडे कपडे घालून, उशीरापर्यंत मुद्दाम वेळकाढूपणा करत बलात्कार ओढवून घेऊ' असा विचार करत नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वच्छ भारत
जिथे प्लॅस्टिकच्या (किंवा कुठल्याच प्रकारच्या) कचर्याच्या विल्हेवाटीसाठी स्टँडर्ड अशी व्यवस्था नाही, आणि आपण स्वतःहून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये अशी शिस्तही लोकांमध्ये नाही अशा भारतासारख्या देशांत या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा भरपूर त्रास होतो. एकदा पुण्यात मुळा-मुठेला पूर येऊन गेल्यावर पुलांची अवस्था बघा, कठडे प्लॅस्टीकच्या पिशव्यांनी बनवल्यासारखे वाटतात.
बाकी ठीक पण मुळामुठेला पूर?
बाकी ठीक पण मुळामुठेला पूर? हे म्हणजे नारळाल श्रीफळ आणि शालीला महावस्त्र पैकी झालं.=))
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खडकवासल्यातला विसर्ग हजार
खडकवासल्यातला विसर्ग हजार क्युसेक्सच्या पुढे वाढला की मुळामुठेला पूर आला असं समजण्याची पुण्यात प्रथा आहे.
अगदी अगदी. बाकी विशेषतः
अगदी अगदी. बाकी विशेषतः मुठेची अवस्था पाहता एक ओव्हरग्रोन गटारच वाटते. मुळाही काही फार वेगळी नाही पण त्यातल्यात्यात बरी इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्या, तू पुण्यात कधी
बॅट्या, तू पुण्यात कधी आलास?
गेले काही वर्षात नाही, पण पूर्वी वर्षात एकदा तरी बर्यापैकी पूर यायचा मुठेला. मी कमीत कमी २ वेळेला मनपाच्या बसस्टँड च्या रस्त्यापर्यंत नदीचे पाणी आलेले बघितले आहे.
ती ३ धरणे खरीतर पुणेकरांसाठी बांधली होती, पण गेल्या काही वर्षात बाहेरची लोक येऊन वर्ष भर धरणांमधले पाणी संपवतात, मग पाउस पडला तरी धरणे भरत नाहीत.
२००५ नंतर तरी बघितले नाही
२००५ नंतर तरी बघितले नाही कधी. नाही म्हणायला २००६ च्या पावसाळ्यात मुळेला पाणी आले होते जरा तेवढेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅट्या, पुण्यात असते ती
बॅट्या, पुण्यात असते ती 'मुठा"
मुळा जिथुन वाहते त्याला पुण्याचा भाग समजला जात नाही.
मुळा जिथुन वाहते त्याला
कोथरूडला पुण्याचा भाग समजणे हा त्याहीपेक्षा मोठा विनोद आहे. लकडीपुलापलीकडे पुणे संपते. विषय कट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी सीओईपीला असताना मुठेला
मी सीओईपीला असताना मुठेला नॉर्मली आठ - दहा फूट रुंदीचा प्रवाह असे. आता अगदीच फूटभर रुंदीचा प्रवाह असतो.
जेव्हा तथाकथित पूर येत असे तेव्हा मनपा बसस्टॅण्डच्या रस्त्यावर सहा आठ इंच खोलीचे पाणी असे. त्या दिवशी भांबुर्ड्यात राहणार्या नातेवाईकांच्या तळघरात पाण्याचे झरे येत असत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मुठा आता अगदी बांधलेल्या
मुठा आता अगदी बांधलेल्या गटारासारखीच दिसते. मुळा तुलनेने अजून अनगड वगैरे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
.
सीओईपीत पवनचक्कीपर्यंत पाणी असे. बंडगार्डनचा बांध तोडल्यामुळे आता तिथेही पाणी कमीच असते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पवनचक्की कुठली बोटक्लबवरची
पवनचक्की कुठली बोटक्लबवरची मिनिचक्की तीच का? तिथवर अगदी नसले तरी बोटक्लबचा मधला जो उतार आहे तो बर्यापैकी भरला होता २००६ च्या सुमारास. पण ते एकदाच. त्यानंतर कधी नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंग्रजांनी बांधलेला बंड फोडला
इंग्रजांनी बांधलेला बंड फोडला रे बॅट्या चोरांनी, नाहीतर बोटक्लब ला सॉलिड पाणी असायचे अगदी उन्हाळ्यापर्यत.
आता रीगाटा कसा करतात कोणास ठाऊक?
आजदेखील पाणी असते.
आजदेखील पाणी असते. रेगाटाकरिता लागेल इतके तरी आरामात असते. काही झाले तरी मुळा कोरडी पडत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आता देखील पूर येतो कंदी मंदी.
आता देखील पूर येतो कंदी मंदी. पण पूर = नदीपात्रातला रस्ता पाण्यात जाणे. त्या बाहेर पाणी कित्येक वर्षात पाहिलेलं नाही. २०१४ मध्ये २ दिवस रस्ता पाण्यात होता. ( लोक त्या साठलेल्या पाण्यात रिक्षा/गाड्या धूत होते!)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
( लोक त्या साठलेल्या पाण्यात
!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आता अशा वेळी नागरिकांनीच
लेखात म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी असा अवेअरनेस दिसतो आणि कापडी पिशव्यांची सुरुवात झालेली दिसते हा आनंदाचाच भाग आहे पण या निमित्ताने नेहमी पडणारा मूलभूत आणि कदाचित निरर्थक प्रश्न विचारतो:
दीर्घकालीन "हिता"साठी तात्पुरता / तात्कालिक त्रास आणि तोशीष सोसण्याबाबत शंभरातला नव्व्याण्णव टक्के मानवप्राणी उदासीन असतो असं फारफार काळापासून दिसतं. किमान भारतात तरी अशा उपायांची केवळ छोटीछोटी बेटं उगवून मावळताना दिसतात. एकूण सिनारिओ (कचरा, गलिच्छता, त्याबद्दलची बेफिकिरी याविषयीचा) पाहून फारफारतर दंडात्मक किंवा तत्सम कायदे करता येतील पण प्रत्यक्ष मनुष्य स्वतःमधे बदल करणं हे अशा किरकोळ टक्क्यांपुरतंच नेहमी मर्यादित दिसतं. पूर्वीही होतं आणि आत्ताही आहे.
हेच सर्व स्थूलमानाने आहारपद्धती-ओबेसिटी-मधुमेह-वाढतं प्रमाण, वाहनसंख्या-प्रदूषण-वाढतं प्रमाण, शहराकडे गर्दी-बेकायदा वस्त्या-इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम्स-(पाणी,कचरा,वाहतूक समस्या) अशा असंख्य बाबतीत म्हणता येईल. अमुक एक "सर्वांनी" पाळलं तर किती छान होईल असं एक स्यूडोआदर्श वाक्य या सर्वच बाबतीत असतं. पण तसं बल्कमधे प्रत्यक्ष होत नाही आणि होण्याची शक्यता कमी आहे. अवेअरनेसचे प्रयत्न कधी होत नव्हते असं नाही. पण आज जी सातारा किंवा तत्सम चांगली उदाहरणं दिली आहेत त्याच्या उलट त्याहून प्रचंड अधिक प्रमाणात वाढलेली उग्र बेफिकिरीने कचरा फेकून बीचेस, बागा घाण करण्याची नवीन उदाहरणं देता येतील.
तर प्रश्न असा की दीर्घकालीन फायद्यांच्या बदल्यात तूर्तास काही तुलनेत लहान आकाराची अडचण, इन्कन्व्हिनियन्स सोसणं हा गुण बहुतांश मनुष्यविशेषांमधे नसणं यामागे एकूणच सृष्टीच्य अधिकच दीर्घकालीन हिताची "योजना" असेल की काय ? गंमत बाजूला ठेवू, पण असं का असावं? सध्याच्या क्षणाच्या कन्व्हिनियन्सला (बसच्या खिडकीतून वेफर्सचा रॅपर बाहेर फेकणं) दीर्घकालीन फायद्यापेक्षा जास्त महत्व का दिलं जातं? ही इन्स्टिंक्ट बहुतांशांमधे इतकी तीव्र का असते?
मुळातला प्रश्न आहे, कोणी
मुळातला प्रश्न आहे, कोणी अभ्यास केला आहे का?
कापडाच्या पिशव्या ज्या हल्ली बर्याच ठीकाणी दिसतात, त्या रंगीत असतात आणि कित्येकांवर जहीरातींची छपाई पण असते.
अशी पिशवी बनवायला लागणारे रॉ मटेरीयल्, काही शे लिटर पाणी, डाईंग ला लागणारी विषारी केमिकल्स ( ज्यात काही प्रेट्रोकेमीकल्स असतील )
ह्याची तुलना ५० मायक्रॉन च्या प्लॅस्टीक च्या पिशवी शी केली तर कसे चित्र दिसेल?
या मुद्द्याशी कधीचाच सहमत.
या मुद्द्याशी कधीचाच सहमत. रोगापेक्षा उपाय (छुप्या रितीने) भयंकर असं नकोच. कापडी पिशवी अनेकदा वापरता येते या एका मुद्द्यामुळे बहुधा ती जिंकत असावी.
कापडी पिशवी अनेकदा वापरता
हा पुन्हा पुन्हा चा वापर गृहीत धरुन सुद्धा गणित जमुन येणे कठीण वाटते.
रादर आज जिथे जिथे प्लॅस्टीक वापरतो तिथे पर्याय वापरला असता तर पर्यावरणाची भिषण अवस्था झाली असती कदाचित.
+१ कापडी पिशवी रेग्युलर
+१
कापडी पिशवी रेग्युलर वापरली तर ती दर आठवड्याला धुवावी लागेल. इन दॅट केस त्याला लागणारे पाणी, डिटर्जंट, कापडी पिशवीचा रंग पाण्यात उतरणे वगैरे......
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अशाच प्रकारे आणखी एक वाचण्यात
अशाच प्रकारे आणखी एक वाचण्यात आलं की वृक्षतोड टाळण्यासाठी लाकडी फर्निचरऐवजी लोखंडी / धातूचं फर्निचर. इथे मला वाटतं धातू बनवण्यासाठी होणारी पर्यावरणीय हानी कदाचित तेवढ्या व्हॉल्यूमचं झाड तोडण्याच्या हानीपेक्षा जास्त असू शकेल.
गणपतीची मूर्ती
हेच शाडूमातीऐवजी धातूची गणेशमूर्ती वापरा यासाठी. धातूसाठी टनावारी ओअर उखणून गाळावे लागते तेव्हा कुठे काही किलो धातू मिळतो. म्हणजे शाडूच्या गणेशमूर्ती अगदी शंभरवेळा (माणसाच्या जास्तीतजास्त आयुष्याची कल्पित वर्षे) आणायच्या म्हटले तरी एकदाच कायमस्वरूपी आणलेल्या धातुमूर्तीमुळे झालेले नुकसान अधिकच असेल. (एका शाडूमूर्तीपेक्षा तर निर्विवाद अधिक असेल.)
प्लॅस्टीक पिशव्या
बंद होणे, जवळपास अशक्य अाहे. त्याचे कारण त्यांच्या निर्मितीत अाहे. कशापासून बनतात या पिशव्या? तर इथिलीन या पेट्रोलियम पदार्थंाचे ते उप-उत्पादन अाहे. अाता जर पेट्रोल, डिझेल इ. गोष्टी जोपर्यंत राहणार, तोपर्यंत हे उत्पादनही राहणारच. तसेच भारतासारख्या ठिकाणी त्यांचे उत्पादन कोण करते? तर तेल शुध्दीकरण कंपन्या भारत पेट्रोलियम, रिलायन्स इ. त्यामुळे किती अोरडा झाला, तरी प्लॅस्टीक व कॅरिबॅग्ज या राहतीलच, त्यापासून पर्यावरणाची हानीही होत राहील, फक्त पहायचे हे, की त्यावर मार्ग काही निघतो का. सध्या तरी हे पर्यावरणीय प्रदूषण व संकटच अाहे.
अशा प्रकारे
सर्वच प्रजेने, आपापली प्रेते न जाळता पुरावीत, त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होईलच शिवाय भविष्यासाठी क्रूड ऑईलची बेगमीही होईल.
दुर्दैवाने आता जमिनीत गाडल्या
दुर्दैवाने आता जमिनीत गाडल्या गेलेल्या सेंद्रीय पदार्थांपासून पेट्रोलियम तयार होऊ शकत नाही.
जेव्हा ही प्रक्रिया घडली त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन फार कमी होता. त्यामुळे सेंद्रीय पदार्थ न कुजता लक्षावधी वर्षे तसेच रहात होते. याच कारणामुळे मृत वनस्पती आणि प्राण्यांची कलेवरे नुसतीच एकावर एक पडून रहायची, यातला काही भाग भूकंप किंवा इतर भूस्तरीय उलथापालथींमध्ये जमिनीत गाडला जायचा. तिथे उच्च दाब आणि उच्च तापमान यांमुळे कालांतराने त्याची रासायनिक रचना बदलून पेट्रोलियम तयार होत होते. ही अतिशय हऴू चालणारी प्रक्रिया (लक्षावधी वर्षांचा कालावधी लागणारी) होती. पण आता गाडलेल्या किंवा मृत अवस्थेत टाकून दिलेल्या कोणत्याही कलेवराला पेट्रोलियममध्ये रूपांतरित होण्याएवढा अवसर मिळत नाही, तर ते कलेवर त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने कुजून जाते.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
धन्यावाद
शास्त्रीय माहितीबद्दल धन्यवाद.
ऑक्सिजन
हे वाचुन नवल वाटले. त्या काळात बिना ऑक्सिकाळाथे हे प्राणी जगायचे कसे?
Anaerobic respiration
Anaerobic respiration. आपल्या पेशींनी असं ऑक्सिजनरहित श्वसन केलं की शरीरात लॅक्टिक आम्ल तयार होतं; स्नायू दमतात. यीस्टमुळे फुगणारा पाव, फुगणारं इडली-डोश्याचं पीठ ही Anaerobic respiration ची काही उदाहरणं.
त्यांनी तेव्हा ऑक्सिजन वापरून कार्बन जाळला नाही म्हणून तो आता आपल्याला जाळता येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कचरा ही समस्या नसून लक्षण आहे.
नियंत्रणाच्या पलिकडे गेलेला कचरा हे केवळ शहरी जीवनशैलीच्या हावरेपणाचे एक लक्षण आहे. पण लक्षणालाच रोग समजून उपाययोजना केल्या जात आहेत, कारण मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधणे गैरसोयीचे आहे.
आपण दुकानातून सामान घरी आणण्यासाठी कापडी पिशवी वापरली, पण त्या पिशवीतून जे सामान आणले त्याच्या पॅकिंगमधून किती कचरा निघाला याचा विचार केला का? विविध उत्पादनांसाठी वापरले जाणारे अनावश्यक पॅकिंग हे प्लॅस्टिक कचरा निर्मितीला किती तरी जास्त हातभार लावत असते, पण त्यावर बंदी आणण्याबाबत कोणी काही बोलत नाही.
मुळात कोणतीही वस्तू आपण वापरतो, तेव्हा ती बनवण्यासाठी कोणती ना कोणती नैसर्गिक संसाधने खर्ची पडलेली असतातच, आणि वापर संपल्यावर त्या वस्तूचा कचराच होणार असतो. त्यापैकी काही वस्तूंचा कचरा पुनर्वापर करता येण्यासारखा असू शकतो, पण त्यासाठी तो कचरा वेगळा ठेवला जावून योग्य त्या ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था असणे आवश्यक असते. भारतात बहुतेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगळा ठेवण्याची स्वयंशिस्त अभावानेच दिसते. जरी असा कचरा वेगळा ठेवला, तरी तो वेगळा गोळा करून योग्य ठिकाणी पोहचवण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही, हा दुसरा अडसर आहे. या दोन बाबींवर उत्तर शोधणे बाजूलाच रहाते, आणि याला बंदी घाला, त्याच्या वापरावर निर्बंध घाला, असले उपाय पुढे येत रहातात.
पेट्रोलियमचा जेव्हा शोध लागला, तेव्हा तो जर लागला नसता, तर देवमाशांची प्रजाती तेव्हाच नष्ट झाली असती. कारण देवमाशाच्या चरबीपासून बनवलेले तेल आणि त्यांच्या कलेवरातील इतरही काही पदार्थ वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जात होते. हस्तिदंती कंगवे, बिलियर्डचे चेंडू, इ. च्या वापरामुळे हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत होती, ती बेकेलाइट या पहिल्या वहिल्या प्लास्टिकच्या शोधामुळे कमी झाली. तेव्हा पेट्रोलिअम आणि प्लास्टिकने एकेकाळी निसर्गाच्या संरक्षणात महत्वाचे योगदान दिलेले आहे. आजही आपल्या वहानांचे बरेच भाग प्लॅस्टिकचे बनलेले असतात, त्यामुळे वहानाचे एकूण वजन कमी होऊन, इंधनवापराची कार्यक्षमता वाढते.
प्लास्टिकची पिशवी लवकर विघटन होत नाही, त्यामुळे तिचा कचरा योग्य प्रकारे हाताळणे गरजेचे आहे, पण लवकर विघटन न होण्याच्या या गुणधर्माचा वापरही केला जाऊ शकतो. जशा कापडी पिशव्या पुन्हा पुन्हा वापरता येतात, तशाच प्लॅस्टिकच्या पिशव्याही पुन्हा पुन्हा वापरल्या जाऊ शकतातच की!
वापरून टाकून दिलेल्या पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून चरख्यावर धागा काढता येतो, आणि हातमागावर विणकाम करून विविध पिशव्या, पर्सेस, इ. आकर्षक आणि टिकाऊ उत्पादने बनवली जातात. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास माझ्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधावा.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
उत्तम प्रतिसाद. तो कचरा वेगळा
उत्तम प्रतिसाद.
कचर्याचं वर्गीकरण वगैरे हे तर फार पुढचं झालं. रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी हातातला कचरा प्रामाणिकपणे आणि शिस्तीत कचराकुंडीत टाकायला मुळात कचराकुंड्याच नसतात. सगळा कचरा सदोदित खिशात, बॅगांत साठवून पुढे कधीतरी कचरापेटी दिसेल तिथपर्यंत किंवा मूळ मुक्कामी घरापर्यंत आणणं शक्य असतंच असं नव्हे. कचराकुंड्या ठेवल्या तर त्याही चोरल्या जातात. चोरीला गेल्या नाहीत तरी शंभरातले नव्वद लोक तिथपर्यंत चार पावलं एक्स्ट्रा चालण्याची तसदी न घेता बसल्याजागीच कचरा पसरुन तिथून चालते होतात. स्वयंशिस्त वगैरे मोठ्ठे करुण जोक्स आहेत. शहरात, बीचेसवर आणि अन्य अनेक ठिकाणी हेच आहे. त्यातले सर्व अशिक्षित नसतात. कचरा टाकू नये, घाण करु नये वगैरे स्टेटमेंटरुपात त्यांना माहीत असतं. पण तरीही किमान भारतातल्या लोकांच्या मनातून स्वच्छतेबाबत बदल होण्याची शक्यता केवळ तात्विक आहे. असं वाटतं की "वी आर लाईक दॅट ओन्ली" हेच काहीतरी विचित्र अंतिम सत्य आहे.
+१
>> स्वयंशिस्त वगैरे मोठ्ठे करुण जोक्स आहेत. शहरात, बीचेसवर आणि अन्य अनेक ठिकाणी हेच आहे. त्यातले सर्व अशिक्षित नसतात. कचरा टाकू नये, घाण करु नये वगैरे स्टेटमेंटरुपात त्यांना माहीत असतं. पण तरीही किमान भारतातल्या लोकांच्या मनातून स्वच्छतेबाबत बदल होण्याची शक्यता केवळ तात्विक आहे.
मोदींच्या सांगण्यावरून सुद्धा ३१ टक्के लोक स्वच्छता पाळू लागलेले दिसत नाहीत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सर्वप्रथम तुमचा प्रतिसाद
सर्वप्रथम तुमचा प्रतिसाद माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकासाठी माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आहे.
मी सहमत आहे की वाण्याकडून पूर्वी जे कागदी तपकिरी रंगाच्या पिशव्यातून सामान यायचे ते आता प्लास्टिक पिशव्यातून येते. पण जसे तुम्हीच म्हणत आहात तसे काही ठिकाणी बंधन शिथिल करून जरूर प्लास्टिक वापरावे. परंतु मी ज्या पिशव्या म्हणते आहे त्या अतिशय पातळ असतात आणि त्या तुम्हाला फुकट मिळत असल्याने त्याची किमत नसते. त्याची अवास्तव मागणी केली जाते.
मी मुंबईतील एका उपनगरात राहते आणि तेथील कचऱ्याचे विघटन हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. खरे तर विघटन करण्यासाठी जागोजागी कचरा पडलेला असतो तो उचलला तर गेला पाहिजे. कोटीच्या संख्येने लोकवस्ती असलेल्या भारतातील एक लाख लोकांनी जरी अविचाराने पिशव्या वापरल्या तरी तुम्ही विचार करा त्या किती होत असतील? आणि मी एक लाख खूप कमी घेतले आहेत हे तुम्हालाही माहीतच असेल. इथे प्रश्न सुशिक्षित समजाचा नसून सजग आणि सुजाण समाजाचा आहे. दुर्दैवाने ती संख्या खूपच कमी आहे.
ओला, सुका व रासायनिक कचरा वेगवेगळा गोळाही केला जात नाही. त्याविषयी तर खूपच सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. मुळात कोणतीच गोष्ट जोपर्यंत स्वता:वर सरळपणे शेकत नाही तोपर्यंत गांभीर्याने घ्यायाचीच नाही का?
लहानपणी आठवते आहे गोष्ट वाचलेली जिचे तात्पर्य काहीसे असे होते - एक आजोबा छोटे रोप लावत असतात आणि त्यानाही माहित असते की त्याचा फायदा त्यांना मिळणार नाही पण पुढच्या पिढीला नक्की मिळणार. मग आपण अशा जागोजागी पिशव्या पेरून पुढच्या पिढीला कसा फायदा होणार?
मी हा लेख एकाचवेळी तीन ठिकाणी पोस्ट केला कारण मला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून प्रतिक्रिया आणि विचार जाणून घ्यायचे होते.
ऐसी आणि मिपा वर उदंड आणि विचारात्मक (सकारात्मक सुद्धा) प्रतिसाद मिळाला. त्यात एक बाब कळली ती अशी की मी जी कापडी पिशवी म्हणते आहे ती नक्की कापडी आहे का? की जसे इतरांनी लिहिल्याप्रमाणे ती वेगळ्या घातक घटकापासून (spun Polypropylene) बनवलेली असते? जर तसे असेल तर हे आणखी भयावह आहे.
माझा प्लास्टिकला पूर्णत: विरोध अजिबात नाही पण तरीही माझा मूळ मुद्दा मी जरूर अधोरेखित करीन की निकृष्ट दर्जाच्या पिशव्यांची निर्मिती ही थांबायला हवीच. त्याला पर्याय म्हणून चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक आणि विनाघातक कापडी पिशव्या जास्त वापरल्या जाव्यात.
फुकट मिळाल्याने जो गैरवापर होतो तो थांबायलाच हवा हे नक्की!
उल्का
फुकट मिळाल्याने जो गैरवापर
हा एकमेव आणि सर्वात महत्वाचा महत्वाचा मुद्दा. प्रत्येक गोष्टीची पर्यावरणीय (किंवा अॅबसोल्यूट) किंमत ठरणं आणि गंभीरपणे व्यवहारात इंट्रोड्यूस होणं हे स्वयंशिस्तीतून होण्याची शक्यता नाहीच. ते कदाचित काही कायद्यांनी किंवा अन्य सक्तीच्या मार्गांनी चार "शहाण्या" (!) लोकांनी इतरांवर लादायलाच लागेल असं वाटतं.
म्हणजे सध्या एकच सोपं उदाहरण बघू. प्लॅस्टिकची (पातळ ऑर अदरवाईज) मोफत पिशवी आणि कापडी (कृत्रिम ऑर महाग ऑर खर्चिक ऑर अदरवाईज) या दोन्ही ऑप्शन्सखेरीज अन्यही ऑप्शन्स पाहून "पदार्थांची ने आण करणे" याचं माध्यम ठरवलं गेलं पाहिजे. या पद्धतीत कदाचित प्लॅस्टिकची पिशवी स्वस्त आहे हेच मुळात चूक ठरेल. किंबहुना पदार्थांचं पॅकिंग आणि ने आण करणं यावर फार खर्च होताच कामा नये कारण ते फारसं महत्वाचं नाही हेच चुकीचं अध्याहृत धरलेलं आहे हे सिद्ध होईल. कितीही महाग पडली तरी ने आण करणे या कृतीसाठी चाळीस रुपये प्रतिमहिना(उदा. "सुती पिशवी" या वस्तूमुळे) खर्च करणं हे आवश्यक आहे आणि ती गोष्ट फुकटात किंवा दहा पैशात उपलब्ध होणं हे रास्त नाही.. अशी गृहीतकं आणि नियम पर्यावरणीय किंमतीच्या बेसिसवर बनवावे लागतील आणि बळाने इंप्लीमेंट करावे लागतील. त्या यंत्रणेवर आणखी रिसोर्सेस डिप्लॉय करावे लागतील. त्या नियमांनुसार मग प्लॅस्टिक पिशवीच्याही आधी घरोघरी कार बंद करावी लागेल. पेट्रोलची किंमत लाखो आणि कारची किंमत कोटी रुपये होईल. दुधाचा लीटर एक हजाराला पडेल.
करु शकणार आहोत का सगळं ?
प्रत्येकाने हे जाणावं आणि मग जमेल तितकं करु वगैरे हे सर्व बाष्कळ निरर्थक उत्तर ठरेल.
मागचं उपसून आणि ते कमी पडतं तिथे त्याहून जास्त प्रमाणात पुढच्या पिढ्यांच्या "उद्या"कडून उधारी उसनवारी करुन बेनिफिट्स रिप करतच आजचं स्वस्त आणि किफायतशीर आणि सोयीस्कर दिसणारं सर्व चाललं आहे. कुठेकुठे ठिगळ लावणार ?
इट्स द एंड ऑफ द वर्ल्ड अॅज वी नो इट, अँड आय फील फाईन..!!
कचऱ्याचं विघटनपेक्षा
कचऱ्याचं विघटनपेक्षा व्यवस्थापन हा शब्द जास्त योग्य वाटतो. व्यवस्थापन योग्य झालं पाहिजे याला कोणाचीच हरकत नाही.
एखाद्या चांगल्या गोष्टीचा गैरवापर होतो म्हणून तिचं उत्पादन थांबवावं हा दृष्टिकोन पटत नाही. काही वेळा प्रबोधनासाठी काही काळ द्यावा लागतो.
मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की जर या पिशव्यांचा कचरा योग्य व्यवस्थापन होऊन जमिनीत पुरला गेला तरीही त्यांच्या उत्पादनाला आणि वापराला आक्षेप असण्याची इतर कारणं आहेत का?
केवळ गैरवापर नाही तर दर्जा
केवळ गैरवापर नाही तर दर्जा अतिशय निकृष्ट, हलका आहे म्हणुनसुद्धा!
भारताबहेरील स्वस्त पिशवी आणि भारतात 'फ्री' मिळणारी पिशवी यात बराच फरक आहे. निदान मी तरी बघितलेल्या पिशव्यांमध्ये आहे.
माझा मूळ मुद्दा ह्याचा वापर होऊ नये हा आहे. मग त्यासाठी निर्मिती थांबवा किंवा ते शक्य नसेल तर फुकट देणे तरी थांबवाच थांबवा. कारण मग कोणीही ती पिशवी स्वत:च्या खर्चाने नक्कीच घेणार नाही कारण इतकी ती तकलादू असते.
त्याचा वापर थांबणे महत्वाचे!
कृपया ते वापरून कशी विल्हेवाट लावता येईल हे तुम्ही तिथून सांगून फायदा नाही कारण मुंबईत परिस्थिती खरोखरच खराब आहे. मी हा लेख मुंबई डोळ्यासमोर ठेवून आणि रोज रोज होणारा गैर-अतीवापर पाहून खूप त्रास होत असल्यामुळे लिहिला आहे.
आता तरी माझे म्हणणे समजून घ्याल अशी आशा करते. धन्यवाद!
उल्का
कृपया ते वापरून कशी विल्हेवाट
माझा मुद्दा 'योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर या पिशव्या वापरणं फायदेशीर ठरेल' असा आहे. मी अमेरिकेत आहे की मुंबईत याने त्याची सत्यासत्यता बदलत नाही. हे शक्य आहे असं शीर्षक असलेल्या धाग्यात 'मुंबईत त्याचं व्यवस्थापन होणं अशक्य आहे' असं गृहितक
निकृष्ट दर्जाच्या म्हणजे नक्की काय? घरी न्यायच्या आत फाटतात का? तसं असेल तर त्याचं कारण 'प्लास्टिक कमी वापरा' असं सांगितलं गेल्यामुळे त्या पातळ पातळ होत गेलेल्या आहेत, हे आहे.
असो. तुम्ही आणि मी आपापलं म्हणणं पुरेशा विस्ताराने मांडलेलं आहे. तेव्हा इथेच चर्चा थांबवायला माझी हरकत नाही.
जर प्रश्न सोडवायचाच नसेल तर…
अहो, जर प्लॅस्टीक अाणि त्या पासून तयार होणारी असंख्य पिशव्यांसारखी उत्पादने करण्याचे थांबवणे शक्यच वाटत नाही. काही कारणे वर दिली अाहेत.
तर, मग तंत्रज्ञान कशाला अाहे? अाधी तंत्रज्ञानावर श्रध्दा ठेवा, मग हा प्रश्न अाहे, असे वाटणेच बंद होईल. तंत्राज्ञान कधीच चांगले किंवा वाईट नसते, योग्य व्यवस्थापन केले पाहिजे वगैरे मुद्दे अाहेतच पुन्हा…
पातळ प्लास्टिकच्या
पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांच्या कचऱ्याची समस्या मुंबईप्रमाणेच पुण्यालाही भेडसावते आहेच (मी पुण्यात रहाते), पण यासाठी दोन गोष्टी घडल्या तर ही समस्या रहाणार नाही.
१. गरज नसताना अशा पिशव्यांचा वापर टाळणे
२. गरज संपल्यानंतर या पिशव्या निष्काळजीपणे कोठेही टाकून न देता, योग्य त्या रिसायकलिंग यंत्रणेकडे पोहोचतील याची दक्षता घेणे
या दोन्ही गोष्टी नागरिकांच्या प्रगल्भतेवर अवलंबून आहेत, आणि आज या बाबत अजिबात आशादायी चित्र नाही, ही वस्तुस्थिती मला पूर्णतः मान्य आहे. अशा आदर्शवादी उपायापेक्षा अशा पिशव्यांवर बंदीच घालणे हा उपाय सहाजिकच अधिक परिणामकारक व व्यवहार्य वाटू शकतो. पण तुम्ही ही समस्या मुंबईची (किंवा भारताची) म्हणून मांडता आहात, म्हणूनच मी या उपायाला सरसकट पाठिंबा द्यायला कचरते आहे. कारण बंदी घातल्याने प्रश्न संपल्याचे जाहीर करता येते, प्रत्यक्ष कोणताच प्रश्न संपत नाही, हा भारतीय नागरिकांचा आजवरचा दुर्दैवी अनुभव आहे. त्यामुळे बंदीची अंमलबजावणी परिणामकारक होणेही शेवटी नागरिकांच्या प्रगल्भतेवरच अवलंबून असणार आहे. बंदी घालून सरकार मात्र हात झटकून मोकळे होईल, आणि तरीही होतच रहाणारा अशा पिशव्यांचा कचरा हा बेकायदेशीर असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही टाळेल, शिवाय बंदीमुळे पोलिसांना फिरते विक्रेते, भाजीवाले, इ.कडून पैसे उकळण्याचे आणखी एक कारण मिळेल, अशी मला भीती वाटते.
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
वेगळा दृष्टिकोण
अगदी वेगळा आणि मुळाकडे नेणारा प्रतिसाद आहे.
पॅकिंगबाबत म्हणायचे तर वस्तु बापडी जवापाडी, पॅकिंग पर्वताएवढे अशी स्थिती असते. पॅकिंग भले मोठे ठेवून आत छोटीशीच वस्तू भरणे ही एक प्रकारे ग्राहकाची दिशाभूल करण्याची क्लृप्ती आहे.
बर्याच स्नॅकच्या
बर्याच स्नॅकच्या पॅकेट्समध्ये नायट्रोजन भरलेला असतो. त्याचा उद्देश दुहेरी असतो. (दिशाभूल हा इन्सिडेन्टल फायदा आहे).
१. ऑक्सिजन नसल्याने पदार्थ अधिक काळ चांगला राहतो.
२. फुगवलेल्या पॅकिंगमुळे आतला पदार्थ न मोडता राहतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लास्टिकची पिशवी लवकर विघटन
शॉल्लेट.
एकदम आवडले.
----
वाह. हे नवीन आहे. लई आवडले.
----
कचरा हा जीवनशैलीचा हावरेपणा ? आपण ज्या ज्या वस्तू विकत घेतो त्यांच्या एकूण आकाराच्या १०% ते ३०% पॅकिंग असते असं गृहित धरा. हे गृहितक तुम्ही नंतर चॅलेंज करू शकता.
जर पॅकिंग हा हावरेपणा असेल तर मग उरलेला ७०% ते ९०% भाग (जो अॅक्च्युअल प्रॉडक्ट आहे) हा त्या पॅकिंग/कचर्याच्या तिप्पट असतो - हा उरलेला ७०% ते ९०% भाग हे आपले मुख्य कंन्झम्शन असते - तो केवढा हावरेपणा होईल ? तिप्पट ? हावरेपणा हा खाल्लेल्या जेवणाबद्दल (कन्झम्प्शन) असतो, टाकलेल्या जेवणाबद्दल नसतो.
पॅकिंग हे अनावश्यक असते हे सुद्धा ओव्हरस्टेटमेंट आहे. जेवढे जास्त पॅकिंग तेवढा (अ)पॅकिंग चा खर्च जास्त व (ब)पॅक्ड वस्तू ची किंमत जास्त. (अ)आणि(ब) हे दोन्ही विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी खर्चिक व म्हणून (अ)आणि(ब) हे जेवढे कमीतकमी तेवढे विक्रेता व ग्राहक या दोघांच्या दृष्टीने इष्ट. मग अनावश्यक पॅकिंग का होईल ? कोणता विक्रेता एक पै सुद्धा एक्स्ट्रा खर्च करेल पॅकिंग वर ? का करेल ?
मला नेमकं काय म्हणायचंय - नियंत्रणाच्या पलिकडे गेलेला कचरा हे महापालिकेचे 'कचरा व्यवस्थापन' ढिसाळ असण्याचे लक्षण आहे. बस्स. बाकी काही नाही.
पेट्रोलियमचा जेव्हा शोध
सिरियसली?? पेट्रोलियमचा शोध लागल्यापासून देवमाशांची संख्या किमान स्थिर राहायला पाहिजे होती या लॉजिकनुसार (विदा गुगलून सहज मिळेल). पेट्रोलियमच्या शोधापूर्वी बोटींचा वेग देवमाशांचा पाठलाग करून वेचून-वेचून मारण्याएवढा होता का हा संशोधनाचा मुद्दा बाजूला ठेवू.
बाकी प्लॅस्टिकच्या समर्थनार्थ आलेले प्रतिसाद वाचून सद्गदित का कायसेसे झाल्याने सध्या इतकेच. नंतरही इतकेच कारण की फर्क पैंदा?
रिसायकलिंगच्या व समुद्रातून प्लॅस्टिक गोळा करण्याच्या पौगंडी प्रयोगांना आमच्या हार्दिक शुभेच्छा!
पदार्थविज्ञानाखेरीज इतर
पदार्थविज्ञानाखेरीज इतर कोणत्याही क्षेत्रात कोणतीही क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा इतका सरळसोट संबंध असत नाही!
देवमाशांची शिकार केवळ तेलासाठीच होत होती असे नाही, पण 19व्या शतकाच्या मध्याला स्पर्मासेटी तेलाची मागणी वाढत चालली होती आणि त्यामुळे देवमाशांच्या शिकाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्याचवेळी स्पर्मासेटी तेलाच्या दर्जाची ऊर्जासेवा देणारे पण अधिक स्वस्त केरोसिन बाजारात आले, आणि देवमाशांच्या चरबीपासून बनवलेल्या तेलाची मागणी घटली. अर्थात देवमासे वाचावेत, आणि पर्यायी तेलाचे स्रोत मिळावेत, वगैरे असा कोणाचा उद्देश होता असे मला अजिबात म्हणायचे नाही, पण केरोसिनच्या शोधाचा एक परिणाम म्हणून देवमाशांची एका प्रकारच्या शिकारीतून निश्चित सुटका झाली.
http://www.sjvgeology.org/history/whales.html
प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ
प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाही
प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाही आणि त्यातले घटक पुन्हा पर्यावरणाच्या साखळीत सामावले जाऊ शकत नाहीत अशी तक्रारही ऐकू येते. मात्र एक लक्षात घ्यायला पाहिजे की जमिनीत खोलवर असलेलं पेट्रोलियम, ज्यापासून प्लास्टिक बनवलं जातं, तेही बायोडिग्रेडेबल नव्हतंच. पर्यावरणाच्या साखळीच्या बाहेरच होतं. ते आपण खणून बाहेर काढतो, त्याच्या पिशव्या बनवतो. त्या पिशव्या वापरून झाल्यावर पुन्हा खड्डा खणून त्यात टाकून दिल्या तर पर्यावरणाच्या साखळीत व्यत्यय कसा येतो?
प्लास्टिक हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. उदाहरण सांगतो. आमच्याकडे काही मोल्डेड प्लास्टिकच्या स्वस्त खुर्च्या आहेत. त्याऐवजी जर लाकडाच्या किंवा लोखंडाच्या खुर्च्या आणायच्या झाल्या असत्या तर त्या महाग पडल्या असत्या इतकंच नाही, तर त्यासाठी खूप जास्त वजनाचं निसर्गातलंच इतर मटेरियल वापरावं लागलं असतं. दुसरं उदाहरण बाटल्यांच. जिथे प्लॅस्टिकची बाटली वापरता येते तिथे पूर्वी काचेची बाटली वापरावी लागायची. काचेच्या बाटल्या फुटून ज्या जखमा होतात, झालेला पसारा आवरण्यासाठी जो वेळ खर्च होतो, आणि आतला पदार्थ फुकट जाऊन नुकसान होतं - ते टळलेलं आपल्या लक्षात येत नाही. वैद्यकीय सेवांमध्ये जागोजागी प्लॅस्टिक दिसतं - त्याऐवजी पर्यायी पदार्थ वापरायचे झाले तर वैद्यकीय सेवा प्रचंड महाग होतील.
माझा मुद्दा असा आहे की प्लास्टिकचा कचरा होऊ नये हे मान्यच, पण प्लास्टिक वापरल्याने एकंदरीत पर्यावरणाचा फायदाच झालेला आहे हेही लक्षात घ्यावं.
जॉर्ज कार्लिन
बाकी चर्चा आवडली. मी शक्यतो कापडी पिशव्यांचा वापर करतो. पर्यावरणाच्या काळजीपेक्षा या पिशव्या वापरायला सोयीस्कर वाटतात. आणि जिथे ग्रोसरी शॉपिंग करतो तिथे फुकट पिशव्या मिळत नाहीत. गेल्या वर्षभरात या पिशव्या एकदाच धुवाव्या लागल्या आहेत. (कापडी पिशव्या दर आठवड्याला धुवाव्या लागतात हे चुकीचे वाटते. आम्ही आमच्या जीन्सपण महिन्यातून एकदाच धुतो.)
काही मुद्दे
मूळ लेख व प्रतिसाद हा सगळा भार विक्रेते व वापरकर्त्यांवर टाकतो असे वाटते. प्लॅस्टीक पिशव्यांमुळे होणारी व्यक्तीगत सोय इतकी मोठी अाहे, की त्यापुढे ‘इतर सर्वांना, भविष्यकाळात’ होणारा त्रास सामान्य माणसाला दिसूच शकत नाही. पण याची जबाबदारी केवळ वापरकर्ते व विक्रेते यांच्यावर टाकणे योग्य नाही. या पिशव्यांच्य उत्पादनांवर बंदी घालणे सरकारला त्या मानाने सोपे अाहे. जसे घातक ठरलेल्या अाौषधांच्या निर्मितीवर सरकार वेळोवेळी घालते. अशी बंदी घातल्याशिवाय हा वापर थांबवणे अशक्य अाहे. तिथे पाहता सरकारच्या स्वत:च्याच प्रचंड फायदा मिळवून देणार्या किंवा रिलायन्स सारख्या कंपन्या अाहेत. त्यांच्या विरोधात हे कितपत होऊ शकेल?
दुसरा मुद्दा रिसायकलिंगचा. रिसायकलिंग हे जिथे सुरू अाहे, तिथे ते अाकडेवारीनुसार होताना दाखवताही येत असेल, पण खरेच त्याचा नेट इंपॅक्ट किती अाहे हा मोठा प्रश्नच अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिशव्या रिसायकलिंग करता ‘गोळा करण्यासाठी व वाहून नेण्यासाठी प्रथम बर्यापैकी उर्जा लागते. अगदी पातळ पिशव्या ‘उचलणे’ हे कचरा वेचकांनाही RoI पाहता परवडत नाही. नंतर त्यापासून काहीतरी बनवायला उर्जा लागते. अाणि ते उत्पादन पुन्हा विकायला कुठेतरी वाहून न्यायचे हा सगळा उर्जेच्या बाबतीत अातबट्याचा व्यवहार अाहे.
अगदी.
भारतात कचरा वेचणाऱ्यांच्या उर्जेचाच प्रश्न आहे असं नाही; त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. ह्या लोकांना ज्या परिस्थितीत काम करावं लागतं तीही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत
पण कसे अाहे ना, की अापल्याला ‘हे’ करायचंच अाहे, असं जर ठरलं असेल, तर मग काय कशावरही ‘उपाय’ काढता येतात. मग काय? त्यांना फार तर हातमोजे, सगळी सुरक्षा साधने इ देऊ पण पिशव्यांचा वापर, उत्पादन सुरूच ठेवणार, असा पवित्रा येणारच. त्याचे वेगळे प्रश्न पुन्हा निर्माण होतील, अन पुन्हा technological solutions अाहेतच की!
थोडी गंमत
या पाटीचा संदर्भ रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचाच आहे. ज्या रस्त्यांवर बऱ्याच पिशव्या दिसतात तिथे काही दिवसांत ही पाटी उगवते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.