फोडा दत्तनाम टाहो : बाजारू देवभक्तीचं अचूक चित्रण
काल एका मैत्रिणीला कम्युनिकेटरवर 'राम राम' म्हटल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे 'सीता सीता' म्हणण्याऐवजी ती 'दत्त दत्त' म्हणाली, तेव्हा पुढचा संवाद अपेक्षित पध्दतीनेच संपला. म्हणजे मी म्हणावं,'दत्ताची गाय', त्यावर तिचं उत्तर,'गायीचं दूध'. असं करत करत 'घण् घण् घण्'पर्यंत आल्यावर 'देऊळ' चित्रपटातल्या 'फोडा दत्तनाम टाहो' गाण्याचा विषय निघाला. ते गाणं चित्रपटात पाहताक्षणीच मला आवडलं होतं. तिच्यापाशी होतं म्हणून 'निळे दात' वापरून माझ्याकडे घेतलं आणि कालपासून वेड लागल्यागत ऐकतो आहे.
चित्रपट सुंदर आहे. एका सर्वस्वी वेगळ्या विषयाला तोंड फोडणारा आहे, यात शंकाच नाही. पण या गाण्याने पूर्ण चित्रपटाचा परिणाम अवघ्या काही मिनिटांत साधला आहे. स्वानंद किरकिरे सरांच्या गाण्यांनी तर आधीच वेड लावलं होतं. 'पियु बोले' या गाण्यात तर शंतनू मोइत्रा यांचं संगीत, स्वानंद किरकिरे यांचे शब्द, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचा आवाज, विद्या बालन आणि सैफ अली खानची अप्रतिम अदाकारी असा सर्व योग जुळून आला होता. त्यानंतर त्यांच्या 'बावरा मन'ने फुलाच्या पाकळ्यांइतक्या तरलतेने प्रेमभावनेचं चित्रण तरुण मनावर
गोंदवलं. 'ऑल इज वेल' म्हणत सगळ्या चिंता विसरायला शिकवलं. त्यानंतर काल पुन्हा नीट ऐक्लेल्या या
गाण्याच्या प्रत्येक शब्दाने पागल करून टाकलंय.
'दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट दया हो'या ओळींमुळे गाण्याला एक लयबध्दता मिळाली आहे. पण 'नयनी दत्त, शयनी दत्त, भवनी दत्त, भजनी दत्त' अशा शब्दांत सुरू होणारं हे गाणं शेवटाकडे जाताना अकल्पित धक्के देऊन जातं.
नॅनोत दत्त, आवडीत दत्त,
टेम्पोत दत्त, गाडीत दत्त,
कामात दत्त, सवडीत दत्त,
लोकांत दत्त, झोकात दत्त,
सुखात दत्त, शोकात दत्त,
मूव्हिंग दत्त, स्थावर दत्त,
आणि मध्ये येणार्या दुसर्या कडव्यात,
वायरलेस दत्त, वाय फाय दत्त,
हाय किती हाय फाय दत्त,
अल्टिमेट पावर दत्त दत्त
रिंगटोन दत्त, स्क्रीनसेव्हर दत्त,
बुकात दत्त, बुककव्हर दत्त,
डाऊनलोड दत्त, सर्व्हर दत्त,
मायक्रो दत्त, मॅक्रो दत्त,
सिनर्जी दत्त, एनर्जी दत्त,
ज्याची त्याची मर्जी दत्त
अशा शब्दांत सरांनी देवाला आपण किती कॉमन करून टाकलं आहे ते अत्यंत परखड शब्दांत सांगितलं आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या बाहेर मांडलेली दुकानं आणि भक्तीचा बाजार पाहिला की हे शब्द मनाला सहज भिडतात.
भक्ताच्या देवानं देवाच्या भक्तीनं
भक्ताच्या देवानं देवाच्या भक्तीनं
सॉलिड चेंज आणलाय की हो
या एका ओळीत सगळ्या बाजारीकरणाचा सारांश अधोरेखित केला आहे. 'सॉलिड चेंज' ही चमत्कारिक शब्दरचना कानाला लई ग्वाड वाटते.
एक हम्मा, चार डॉगी
डोक्यामागे वर्तुळ फॉगी
अंध पंगू महारोगी
ऑल टकाटक जागच्याजागी
थ्री वे फेसिंग दिव्य मूर्ती
सिंगल सोडा ट्रिपल स्फूर्ती
असं श्रीदत्ताच्या मूर्तीचं वर्णनही इंग्रजीत का करावंसं वाटलं असेल असा प्रश्न पडतो. पण आजकालच्या पालकांचा आपल्या लहान मुलांना शाळेत घालताना इंग्रजी माध्यमाकडे ओढा दिसतो. अशा पालकांना मुलांनी 'गॉड कसा दिसतो?' असं विचारलं तर कदाचित असंच काहीसं उत्तर येण्याची शक्यता जास्त...!!!
ऑफिसची पोझिशन दत्त दत्त
मुलाची अॅडमिशन दत्त दत्त
टीव्हीची ऑडिशन दत्त दत्त
बिल्डिंगची परमिशन दत्त दत्त
या समर्पक ओळींतून देवाकडून आपण काय काय मागत असतो आणि सगळा कारभार देवावर सोपवून कार्यशून्य होण्याकडे आपला कल कसा वाढत चालला आहे हे सहज स्पष्ट होते. साधना करायला आपल्याला वेळ आहेच कुठे? म्हणून मग देवाचाच बाजारभाव कमी करून आपण त्याला अतिशय चीप पातळीवर आणून ठेवलंय. हेच सांगायचंय कदाचित पुढील ओळींतून...
मागेल त्याला मिळेल दत्त
रिटेलमध्ये होलसेल दत्त
करा तुम्ही सोसेल दत्त
पापं सगळी ढोसेल दत्त
त्रिलोकाला पोसेल दत्त
झोपा तुम्ही जागेल दत्त
पदोपदी लागेल दत्त
सगळी भूक भागेल दत्त
यानंतर येणार्या ओळी आहेत...
एव्हरीबडी दत्त दत्त
से इट लाऊड दत्त दत्त
या ओळींनी भक्तीसंगीताला आपण कसं रॉकबॅण्डच्या पातळीवर आणून ठेवलंय ते दिसतं. गाण्याचा समारोप करताना येणार्या ओळी
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे ऋण फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
तिथं नाय हितंच पाहिजे मग्रुरीचा दत्तच पाहिजे
या देवाच्या बाबतीतही आता कसा आडमुठेपणा चालला आहे त्याबाबत आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्या आहेत. चित्रपट पाहताना काही दॄश्यांत याचा प्रत्यय येतो.
एकूण गाण्याचा परिणाम खूपच चांगला आहे. गाण्याचं गाणं होण्याआधी ती एक चांगली कविताही असावी लागते. याबाबत स्वानंद किरकिरे सरांच्या प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. गाण्याच्या संगीतानेही शेवटीशेवटी गोंगाटाचे रूप घेत आपली आजची भक्ती कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव करून दिली आहे. मराठी चित्रपटाला किती बरे दिवस आले आहेत ते माहित नाही, पण असं अर्थपूर्ण आणि भिडणारं मराठी गाणं मात्र 'जोगवा'मधल्या 'जीव दंगला गुंगला'नंतर बर्याच दिवसांनी ऐकायला मिळतं आहे...
प्रतिक्रिया
गाणं
प्रथम ऐकलं तेव्हा गाणं आवडून गेलं होतं. अगदी सुरुवातीच्या नाना पाटेकरच्या प्रसंगापासून, चाल, शब्द इ. सगळच आवडलं होतं. देऊळ सिनेमा पहायला हवा.
ओळखीबद्दल (पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल) धन्यवाद. तुम्हाला (आणि आम्हालाही) अशा मैत्रिणी (अन मित्रही हो!) मिळत राहोत अशा शुभेच्छा!
-Nile
या ओळींनी भक्तीसंगीताला आपण
यात रॉकबँडवर काही आक्षेप असावा असं जाणवतं, पण आक्षेप काय ते नीटसं समजलं नाही.
रॉक संगीत (अगदी रोजच्या रोज नाही तरी) मला आवडतं. 'भूलभुलैय्या' चित्रपटातलं याच नावाचं गाणं (युट्यूब्चा दुवा) ज्यात 'हरे राम, हरे राम, हरे कृष्णा, हरे राम' असा कोरस वापरला आहे, मला आवडतं. अशा प्रकारे (भक्तीरसपूर्ण काव्य+पाश्चात्य ढंग मिसळलेलं संगीत) गाणी बनवण्याची परंपरा आपल्याकडे नसली तरीही किशोरकुमारच्या आवाजातलं "ॐ शांती ॐ" हे गाणं कोणे एकेकाळापासून प्रसिद्ध आहे.
हे गाणं न बघता ऐकलं तर फारसं आवडलं नाही. स्वानंद किरकिरेचा आवाज आवडतो, देवाचा बाजार वगैरे सगळं पटलं तरीही. हिंदी गाण्यात इंग्लिश शब्द बेमालूम वापरण्याची सुरूवात गुलजारने केली असावी. तशा काही प्रकारे बोलीभाषा गाण्यात वापरणं आवडलं. पण हे गाणं मुद्दाम होऊन मी ऐकेन असं वाटत नाही.
'जीव दंगला'मधली "काळीज माझं तू" ही ओळ अगदीच कृत्रिम वाटते. शिवाय अनेक ठिकाणी शहरी-प्रमाण आणि बोलीभाषेची फारच सरमिसळ त्यात दिसते. त्यापेक्षा 'खेळ मांडला' अधिक अर्थपूर्ण वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या गाण्याने चित्रपटात धमाल
या गाण्याने चित्रपटात धमाल उडवली आहे. चित्रपटचा संदेश योग्य तिथे पोचेल याची हे गाणं खबरदारी घेतं.
एक गाणं म्हणून मला ते ठिक वाटतं. मात्र त्याचा चित्रपटातील उपयोग अधिक भावतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भारी
गाणं आवडलं. सिनेमा बघायला हवा.
"मास/मॉब हिस्टेरीया"
"मास/मॉब हिस्टेरीया" प्रतिध्वनित करण्यात गाण्याचा ताल/लय/सूर/ठेका १००% यशस्वी ठरला आहे. "असा" मूड प्रतिध्वनित करणारं हे पहीलच गाणं मी ऐकलेलं.
माझ्या मते या गाण्यात 'उपहास'
माझ्या मते या गाण्यात 'उपहास' आहे हे जर माहित नसेल (किंवा तो कळलाच नाही) तर पूर्ण गैरसमज होण्याचा धोका आहे.
देवळाचा बाजार न होता ते (भव्यपणे बांधलेलं पण) शांत देवस्थान राहिलं असतं तर योग्य होतं का? लोक देव-देव करत राहिले (बाजारू काय किंवा कसेही) आणि खरया प्रगतीला मुकले हा संदेश देऊळ चित्रपटातून मिळायला हवा होता असं मला वाटतं. चित्रपटात हॉस्पिटल झालं नाही त्यामुळे काय तोटा झाला हे चित्रपटात फारसं ठसवलं नाहीये.
देवळाचा बाजार झाला-बर्याच लोकांना रोजगार मिळाला-काय वाईट झालं? फक्त देवाचं देवपण हरवलं...म्ह्ण्जे देवपण टिकलं तर कितीही देवळं चालणार आहेत का? देवळं बांधा पण देवपण जाऊ देऊ नका हा चित्रपटाचा संदेश आहे असं मला वाट्लं आणि त्यामुळे त्याबद्दल विशेष चांगलं मत नाही.
'देऊळ' चित्रपट 'प्राण जाये पर
'देऊळ' चित्रपट 'प्राण जाये पर शान न जाये'चं मराठी आणि थोडं सोफिस्टीकेटेड रूप आहे का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एवढा इचार नगं क्रुस! एकदा
एवढा इचार नगं क्रुस! एकदा बघुनच टाक. २ तासाचा तर है! चांग्ला हय!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सिनेमा पाहिला
कालच सिनेमा पाहिला आणि फार आवडला. खेड्यातील भाषा आणि स्वभाव चांगले घेतले आहेत, आजच्या अनेक सिनेमांसारखे कृत्रिम वाटले नाहीत. सिनेमातली पात्रंही चांगली निवडली आहेत. भाबडा केशा चांगला उभा केला आहे. बेरकी भाऊही नाना पाटेकरने निभावला आहे (आश्चर्य नको), दिलिप प्रभावळकरांनी अण्णांच्या भुमिकेला न्याय दिला आहे, पण अण्णांच पात्र मात्र अजून फुलवायला हवं होतं असं वाटतं.
मला तरी असं वाटलं नाही. चित्रपटात उलट देवपण गेल्यापेक्षा लोकांची घसरलेली नितीमत्ता दाखवली आहे. पुर्वीची घाबरट सरपंच आता एका सही करता पाचशे रुपये घेते, तीच नारळं पुन्हा पुन्हा विकली जात आहेत. मुख्य पात्राचा अन त्याच्या आईचे "शेवटी देवळात केव्हा गेली होतीस" यावरचा संवाद इत्यादींवरून देवपणावर खरंतर केशा सोडला तर कोणीच विचार करत नाही असाच संदेश दिलेला दिसतो.
केवळ भाबडा केशा खरोखर देवभोळा आहे. त्याचे देवा बरोबरचे संवाद, चाललेल्या प्रकारामुळे झालेला त्रास, (त्याच पार्श्वभुमीवर हे गाणं). म्हणून मग त्याने देवाची मुर्तीच चोरणे हे चांगलं दाखवलं आहे. मुर्ती चोरील्या गेल्यानंतर देवाशी दोन तीन दिवस संवाद साधणारा आणि पुढे नदीत मुर्ती सोडून देणारा केशा आणि दुसरीकडे दत्ताची दुसरी मुर्ती तातडीने बसवून देऊळ पुन्हा सुरु करणारे गावकरी हा विरोधाभासही प्रभावितपणे चित्रीत केला आहे असं मला वाटलं.
देव किंवा देऊळ नको हा चित्रपटाचा विषयच नाही. देवळाचं कसं बाजारीकरण झालं आहे, प्रत्येकजण आपली कशी पोळी लाटतोय, लोकांची दिखाव्याची श्रद्धा त्यातील विरोधाभास (देऊळ व्हायच्या आधी आणि नंतर) वगैरे लेखकाचा उद्देश असावा असं वाटतं. पण देवपण जपा असा संदेश मात्र दिसत नाही. उलट अण्णांच्या पात्रातून देऊळ नकोच हे सांगितले गेले आहेच.
चित्रपटाच्या शेवटी दरोडेखोर नसरुद्दीन शहा म्हणतो, काही झालं तरी देवळावर दरोडा टाकणार नाही. दरोडेखोर म्हणजे तर समाजातील वाईट प्रवृत्ती पण तीही काही गोष्टींत आपल्या नितीमित्तीला धरून आहे. तर समोर समस्त गाव देवळाच्या नावाखाली इतरांना लुटतोय असा विरोधाभास चित्रपटात दाखवला आहे. मला वाटतं हाच देऊळ या सिनेमाचा विषय होता.
-Nile
"पण अण्णांच पात्र मात्र अजून
"पण अण्णांच पात्र मात्र अजून फुलवायला हवं होतं असं वाटतं."
हेच म्हणायचं होतं. अण्णांसोबतच मूळ मुद्द्याचा कडेलोट झाला आहे. हॉस्पिट्ल नसल्यामुळे होत असलेली
गैरसोय चित्रपटात थोडी का होइना दाखवायला हवी होती.
"..देवपणावर खरंतर केशा सोडला तर कोणीच विचार करत नाही असाच संदेश दिलेला दिसतो"
पण तोच तर हीरो आहे..त्यामुळे त्याचेच भाबडे विचार बरोबर अशी प्रेक्षकाची समजूत होते.
"पण देवपण जपा असा संदेश मात्र दिसत नाही."
केशातून हा संदेश वारंवार मिळतो.
ग्रामीण पार्श्वभूमीवरचे 'बनगरवाडी' आणि 'निशाणी डावा अंगठा' हे देऊळपेक्षा जास्त प्रभावी वाटले.
अवांतर चर्चेबद्द्ल क्षमस्व.
मूळ धाग्याचा विषय गाण्याबद्द्ल होता...गाण्याचं चित्रिकरण आणि संकलन चांगलं जमलं आहे याच्याशी सहमत आहे.
एकदम परफेक्ट गाणं आहे...
एकदम परफेक्ट गाणं आहे... बाजारावरचं..!
''मी तंबाखु खाणारच''