पाणीवाली बाई!
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं.
गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा. सामंत, कमल देसाई, आशाताई गवाणकर (ज्यांना आख्खी दुनिया प्रेमाताई म्हणून ओळखत असे) असे एकाहून एक अग्रणी गोरेगावातलेच किंवा मग गोरेगावात सक्रिय. आमची शाळा ज्या संस्थेची ती पण याच मंडळींनी चालवलेली. शाळेतला पहिला धडा गिरवून घेतला तो प्रेमाताईंनी. एखाद्या ध्येयासाठी झोकून देऊन आयुष्य पणाला लावणारी ही व्रतस्थ मंडळी.
एक तर गाव लहान आणि मुख्य म्हणजे साधी राहणी यामुळे ही सगळी व्यक्तिमत्व अगदी जाता येता रस्त्यात नजरेस पडत. ज्यांच्याशी आमच्या वडिलधार्यांच्या ओळखी होत्या त्यांच्याशी तर रस्त्यात उभे राहून गप्पाही होत. ही माणसं इतकी मोठी आहेत हे कसं कळणार मग? कळलंही नाहीच म्हणा आम्हाला. आणि, थोडं फार कळेपर्यंत एक तर हे सगळे वृद्धत्वाकडे झुकले होते किंवा प्रचंड बदललेल्या जीवनमूल्यांच्या रेट्यामुळे बाजूला फेकले गेले होते. अर्थात, त्यामुळे त्यांचे मोठेपण, वेगळेपण यत्किंचितही बाधित होत नाही हे आहेच.
याच वातावरणात एक नाव सातत्याने आणि खूप जिव्हाळ्याने घेतलेलं कानावर यायचं... मृणाल गोरे.
गोरेगावात 'महिला मंडळ' नावाची एक संस्था आहे. खूपच जुनी आहे ती. इ. स. १९५० साली स्थापन झालेली आहे ती संस्था. तिची स्वतःची एक टुमदार वास्तूही आहे. आसपासच्या भागातील सांस्कृतिक जीवनावर या वास्तूचे प्रचंड उपकार आहेत. नाव जरी महिला मंडळ असले तरी तिथे सगळ्यांचाच राबता असे. या महिला मंडळापासून मृणालताईंचे गोरेगावातील कार्य सुरू झाले असे म्हणता येईल. या महिला मंडळात समाजातील सर्वच स्तरातील स्त्रियांचा सहभाग होता हे अजून एक वैशिष्ट्य.
गोरेगावात तेव्हा ग्रामपंचायत होती. त्यात मृणालताईंचा सक्रिय सहभाग असे. पुढे, १९६०च्या सुमारास ही ग्रामपंचायत, मुंबई महानगरपालिकेत सामाविष्ट झाली आणि मग मृणालताईंचे कार्यक्षेत्रही विस्तारले. त्या नगरसेविकाही झाल्या. मुंबईतील आणि बाहेरीलही प्रत्येक लढ्यात त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या. त्यांचा खूप गाजलेला लढा म्हणजे पाणीप्रश्नावरील आंदोलन. त्यानंतर त्या 'पाणीवाली बाई' म्हणूनच संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाल्या. लाटणे, हंडे अशा, सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यात रोज साथ देणार्या वस्तू घेऊन पाण्यासाठी, महागाईविरोधासाठी मोर्चे, आंदोलनं करणे ही अभिनव कल्पना अंमलात आणली आणि मंत्रालयावर जोरदार धडका देत त्यांनी सरकारला अक्षरशः पळता भुई थोडी केली. वसंतराव नाईकांसारख्या महाराष्ट्राच्या अतिशय शक्तिमान मुख्यमंत्र्याला घेराव घालून स्त्रीशक्तीची चुणूक दाखवली.
यातील बर्याचशा गोष्टी या माझ्या जन्माआधीच्या किंवा मी अगदीच न कळत्या वयातला असतानाच्या आहेत. मात्र, मी चांगला कळता झाल्यावर आलेलं 'आणिबाणी' नावाचं वादळ मात्र मी व्यक्तिशः कधीच विसरू शकणार नाही. त्या लहान वयातही आलेल्या प्रसंगाचं गांभिर्य आणि त्यावेळी होणारा भूमिगत लढा नीटच जाणवत होता. माझ्या सख्ख्या नात्यातले लोक तुरूंगात गेले होते. त्यामुळे आणिबाणी घरात आली होतीच. पण गोरेगावातील समाजवादी मंडळींनी उडवलेला भूमिगत लढ्याचा दणका अगदी जाणवण्याइतपत होता. ते दिवसच भारलेले होते. त्या दिवसात तर मृणाल गोरे हे नाव घेणंही संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं. पुढे त्या सापडल्या आणि त्यांना तुरूंगात टाकलं गेलं. मात्र लढा चालूच राहिला. 'पानीवाली बाई दिल्लीमे, दिल्लीवाली बाई पानीमे' ही घोषणा 'वंदे मातरम'च्या लेव्हलला पोचली होती.
याच संदर्भातली आमरण लक्षात राहिल अशी घटना म्हणजे, आणिबाणी उठवल्यानंतरच्या निवडणुका. प्रचाराचा धुरळा. ते नांगर खांद्यावर घेतलेल्या शेतकर्याचं चिह्न. गोरेगावात झालेल्या प्रच्च्च्चंड प्रचारसभा. अटलबिहारी वाजपेयी, एसेम जोशी, मोहन धारिया, जॉर्ज फर्नांडिस ही नावं माझ्या आयुष्यात तेव्हाच प्रवेश करती झाली. पण या प्रच्च्च्चंड सभांवरही मात करेल अशी गर्दी झाली होती ती निकालाच्या दिवशी. त्यावेळी मृणालताई रहायच्या त्या टोपीवाला बंगल्यापाशी जमलेली गर्दी हा एक महासागर होता. तिथे एक खूप मोठा काळा लाकडी फळा उभारला होता आणि त्यावर निवडणुकीचे निकाल लिहिले जात होते. जसजसे निकाल जनता पार्टीच्या बाजूने लागायला लागले तस तसा हा महासागर ढवळून निघत होता. आणि त्यानंतर झालेली अभूतपूर्व विजयसभा. ज्याने ते क्षण भोगले तो भाग्यवान...
... या सगळ्यात मृणालताईंचे योगदान खूपच महत्वाचे.
पुढे जनता पक्ष फुटला. दुर्दैवाने या घटनेतही त्यांचे योगदान महत्वाचेच राहिले. पण आयुष्यभर फक्त तत्वालाच सर्वोच्च स्थानी ठेवलेल्यांना या पक्षफुटीचे फारसे काही वाटले नाही. पुढच्या निवडणुकीत त्या हरल्या. अर्थात, राजकारण हे समाजकारणाचे एक हत्यार म्हणून त्याकडे बघत असल्याने, त्या नाऊमेद झाल्या नाहीत. त्यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर काम सुरूच ठेवले. हुंडाविरोध, हुंडाबळी, बलात्कार इत्यादी विषयांवर काम करण्यासाठी 'स्वाधार' या संस्थेची स्थापना करून त्यायोगे त्यांनी खूप मोठे काम उभे केले. नोकरीपेशा आणि श्रमजीवी स्त्रियांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी श्रमजीवी महिला संघाची स्थापना केली.
१९८५च्या निवडणुकीत मात्र त्या पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेल्या... त्यावेळी इंदिराहत्येनंतर काँग्रेसला सगळीकडेच सहानुभूती मिळाली होती आणि राजीव गांधीच्या रूपात तरूण रक्त मुद्दा जोरात होता, तरीही त्या सहजपणे जिंकल्या. त्यावेळी त्यांना विरोधीपक्षनेतेपदही मिळाले.
आज(ही) ऐरणीवर असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येवर पहिल्यांदा आवाज उठवणार्या मृणालताईच होत्या. याबाबतीतले विधेयक त्यांनीच सर्वप्रथम विधानसभेत मांडले. पुढे सरकारनेही ते उचलून धरले आणि लिंगनिदानबंदी कायदा १९८६ साली अस्तित्वात आला.
ज्या काळात स्त्रिया नुकत्याच कुठे घराबाहेर पडू लागल्या होत्या त्याच काळात केवळ राजकारणात प्रवेशच नाही तर अगदी सर्वोच्च वर्तुळापर्यंत त्या गेल्या. आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला स्पर्श करणार्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी जागरूक राहून सरकारला सतत धारेवर ठेवले. असा विरोधीपक्षनेता क्वचितच लाभला असेल विधानसभेला. आणि हे सगळं करताना, त्यांनी कधी पातळी सोडली नाही की संबंध कलुषित केले नाहीत. एकीकडे मोर्च्यांमधे रौद्ररूप धारण करत असतानाच, कार्यकर्त्यांच्या नवीन पिढीला पोटाशी धरण्याचे अमूल्य कार्यही त्यांनी केले. रणरागिणी आणि प्रेमळ आई या दोन्ही भूमिका त्यांनी सारख्याच ताकदीने निभावल्या.
मात्र, ऐंशीचे दशक संपेतो त्यांच्या तब्येतीचे प्रश्न उभे राहू लागले, हळूहळू बळावायला लागले आणि त्यांनी सार्वजनिक जीवनातून हळूहळू अंग काढून घ्यायला सुरूवात केली. मात्र, त्या संपूर्णपणे निवृत्त कधीच झाल्या नाहीत. एन्रॉन प्रकल्पविरोधी आंदोलन असो किंवा नर्मदेतील सरदार सरोवर विरोधी आंदोलन असो, त्यांचा सक्रिय पाठिंबा होताच. अगदी, २१व्या शतकाच्या पहिल्या दशकातही नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गरिबांना घरे मिळवून दिली.
अशी ही पाणीवाली बाई कालच पंचत्वात विलीन झाली. मोठे लोक गेले की, एक युग संपले वगैरे म्हणण्याची पद्धत आहे. मात्र, काही लोक गेले की त्याबद्दल बोलायला हे असले शब्दही लटके पडतात. आज मृणालताई आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेलं काम आणि दाखवून दिलेली कार्यपद्धती नक्कीच अभ्यासण्याजोगे आहे. अंगी बाणवण्याजोगे आहे.
मृणालताईंना माझा सलाम!
प्रतिक्रिया
अरेरे!
अरेरे!
लहान असताना एकदा दहिसरल्या आल्या होत्या इतकंच पुसटसं आठवतंय
एकूणच समजवादी विचारसरणीसोबत हे खंदे समाजसेवकही काळाच्या पडड्याआड जात गेलेत.. आता सारा भांडवलशाहीचा रूक्ष - भावनानिरपेक्ष कारभार आणि त्याच विचारसरणीची मंडळी उरणार, असा विचार मनात येतो आणि (उगाच?) कुठेतरी खोलवर चर्र होते!
पाणीवाल्या गोरेबाईंना मनःपूर्वक श्रद्धांजली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खरं सांगायचं तर
खरं सांगायचं तर मृणालताईंसारखे लोक गेल्यावर काय "म्हणायचं" हेच कळत नाही. त्यांच्या जीवनकाळातच आपण त्यांना विसरलो अशी एक रुखरुख वाटत राहते कधीकधी.
***
अब्द शब्द
अगदी!
अगदी!
बिपिन कार्यकर्ते
माहितीपूर्ण
माहितीपूर्ण व्यक्त झाला आहेस.
माहितीपुर्ण लेख
माहितीपुर्ण लेख! तत्वनिष्ठ समाजवादी हरपत चाललेत!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
उत्तम लेख
लेख खास जमून आला आहे, कारण अशा वेळी शब्द अपुरे पडतात. अमुक गेल्यामुळे पोकळी झाली आहे वगैरे म्हणणं पोकळ वाटतं. त्यापेक्षा आपल्या मनाला भिडलेलं, त्या व्यक्तीचं स्थान अस्सल आणि प्रामाणिक शब्दांत हा लेख मांडतो.
सत्तरीच्या दशकात आणि विशेषतः आणीबाणीच्या अलिकडे पलिकडे घराघरात पसरलेल्या आंदोलनांची तीव्रता माझ्यासारख्या लहान मुलालाही जाणवलेली होती. मृणाल गोरेंच्या मोर्चांत माझी काकू घरचा एक जाड मोठा थाळा घेऊन गेली होती. बडवून बडवून त्याला पोचे आले होते आणि तो सपाट थाळा गोलसर झाला होता. महागाई आणि पाणीतुटवडा यांच्याविरुद्ध सामान्य जनतेने उठवलेल्या आवाजाचे ते पडसाद अजून इतक्या वर्षांनी स्पष्ट आठवत आहेत.
मी वृत्तपत्र वाचायला लागले
मी वृत्तपत्र वाचायला लागले त्या काळापर्यंत मृणालताईंचं नाव रोजच्या बातम्यांमधून नाहीसं होत होतं. त्यांच्या कामाचं महत्त्व त्या वयात समजलं नाही तरी आता निश्चितच समजतं. मृणालताईंना श्रद्धांजली.
लेखाबद्दल आभार. त्यांच्याबद्दल अधिक माहिती एक प्रकारे त्यांचं काम जवळून पाहिलेल्या लोकांकडून मिळणं अन्यथा सोपं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+
मृणाल गोरे यांच्या राजकीय जीवनाची सुरेख ओळख करून देणारा लेख.
आणीबाणीच्या आधी राजकारणातलं काही कळत नव्हतं. आणीबाणी नंतरच्या निवडणुका झाल्या तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा प्रथमच राजकारणाशी तोंडओळख झाली. तेव्हा ठाऊक झालेल्या पहिल्या राजकीय 'हिरो' नेत्यांपैकी त्या एक. त्या निवडणुकीत एकूणच वातावरण प्रचंड भारावलेले होते. एक तर आणीबाणीच्या कालखंडानंतर निवडणुका होतील असे वाटत नसताना निवडणुका झाल्या आणि त्यात अजिंक्य वाटणार्या काँग्रेसचा आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. त्यावेळी मृणाल गोरे, एस एम जोशी, ना ग गोरे हे सगळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पाणीवाली दिल्ली में, दिल्लीवाली पानी में अशी तेव्हाची घोषणा होती.
राजकारणाचा विचार करताना सत्तेत सहभागी न होऊन या मंडळींनी चूक केली की काय असे वाटते. ही मंडळी सत्तेत न गेल्यामुळे नको ती मंडळी वरचढ झाली. शिवाय सत्तेत सहभागी झाली असती तर त्यांना जे साधता आले त्याहून अधिक साधता आले असते असेही वाटते.
माझी पिढी जोपर्यंत राजकारणाबाबत आशावादी होती त्या आशावादात मृणाल गोरेंसारख्या नेत्यांचा मोठाच प्रभाव होता.
रथयात्रेपासून सुरू झालेल्या राजकारणाच्या धुमाळीत मृणाल गोरे यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सुरेख!
सुरेख!
बिपिन कार्यकर्ते
दादा कोंडके
<<पाणीवाली दिल्ली में, दिल्लीवाली पानी में अशी तेव्हाची घोषणा होती.>>
दादा कोंडके यांनी १९७८ च्या सुमारास प्रकाशित झालेल्या एका चित्रपटात ही घोषणा घातलेली होती. नाव विसरलो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
साधी रहाणी अन उच्च विचारसरणी!
छान लेख. आम्हांला कॉलेजात जाता-येताना चर्नी रोड स्टेशनवर बर्याचदा दिसायच्या. साधी रहाणी अन उच्च विचारसरणी! खरा-खुरा आदर्श....
त्या शिक्षणाने एमबीबीएस
त्या शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर होत्या असे वाटते. (चूभूदेघे)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मेडिकलला होत्या त्या. शिक्षण
मेडिकलला होत्या त्या. शिक्षण अर्धवट सोडून समाजकारणात उतरल्या.
बिपिन कार्यकर्ते
आणीबाणीनंतर जन्माला आलेल्या
आणीबाणीनंतर जन्माला आलेल्या माझ्यासारख्या लोकांसाठी आणिबाणी 'ऑप्शन'ला असते. या लेखावरचे दोन्ही ठिकाणचे प्रतिसाद वाचून असं अचानक जाणवलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१ अगदी खरंय.. इतकी
+१ अगदी खरंय..
इतकी महत्त्वाची घटना पण मला त्याच्या संबंधी कानावर आलं असलं तरी त्यावर ठोस वाचन करायला जवळजवळ कॉलेजच्या शेवटाची वर्षे उजाडली..
खरंतर अशा घटनांची साद्यंत माहिती पाठ्यपुस्तकांत आली पाहिजे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!