चतुर्मुखी - शरश्चंद्र टोंगो (कादंबरी)
अन्यत्र प्रकाशीत
माझा ब्लॉग
अलीकडेच शरश्चंद्र टोंगो ह्यांची चतुर्मुखी ही कादंबरी परत वाचली. नेहेमीसारखीच अनेकदा वाचूनसुद्धा ती टवटवीत वाटली. तसं पाहिलं तर ह्या लेखकाच्या दोनच कादंबर्या मी वाचल्यात. त्यांनी पुढे लिहीलंय का नाही हे सुद्धा मला ठाऊक नाही.त्यांची मी वाचलेली पहिली कादंबरी म्हणजे "उचल्या". पूर्वी जेंव्हा बालपणीचा काळ सुखाचा असायचा, तेंव्हा ऊन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मॅजेस्टीक प्रकाशनातर्फे किशोर आणि कुमारांसाठी पंचरंगी मेवा प्रसिद्ध व्हायचा.ह्यातच अनेक अप्रतिम पुस्तकं वाचली. बालपणावर अगणित उपकार असणारे भा.रा.भागवत ह्यांच्या अनेक कादंबर्या तेंव्हाच वाचल्या.सौ.लीलावती भागवतांची चल ऊडूनी पाखरा ही कादंबरीही तेंव्हाच वाचली.साधरणतः मनोरंजक आणि उपदेशपर असं ढोबळ वर्गीकरण करता येऊ शकेल.अशा वेळी वास्तववादी कादंबर्यांनी भोवतालच्या वास्तवाची जाणीव करून संवेदनाक्षमही बनवलं.सुधाकर प्रभु ह्यांची सातववाडीचा लहान्या, आम्ही सागराची बाळे तर शरश्चंद्र टोंगोंची "उचल्या". उचल्या ही एक चोख टीन एज नॉव्हेल म्हणता येईल. कारण किशो-कुमारांच्या तुलनेने गंभीर वळण घेणारं कथानक होतं तिच. त्या एका कादंबरीने टोंगो मनात घर करून बसले आणि उत्सुकतेने त्यांचं इतर साहित्य शोधता हाती लागली ती फक्त ही "चतुर्मुखी".
कादंबरी खूप मोठी नाही. १४२ पानं फक्त. आकारही आटोपशीर आहे.जेमतेम वीतभर. हे सांगतो अश्यासाठी की ह्या कादंबरीत १९४२-४३ ते १९७७-७८ एव्हढा मोठा कालखंड आला आहे. कादंबरीचं वैशिष्ट्य तिच्या रचनेत आहे. चार जणांनी सांगितलेली ही गोष्ट म्हणून चतुर्मुखी.तर कथा सांगणारे आहेत, अनुक्रमे बाबा, सनी, अजीत आणि प्रतिमा. दोन १९४२-४३ मधले तरूण आणि दोन १९७७-७८ मधले तरूण.बाबा आणि सनी हे दोन भिन्न कौटुंबिक पार्श्वभुमी असलेले मित्र. यवतमाळमध्ये रहाणारे. बाबा गरीब तर सनीचे वडील गावात एक्स्ट्रॉ असिस्टंट कमिशनर आहेत.बाबाच्या कथनाची सुरूवातच सनीच्या नाहीश्या होण्याने होते. हळूहळू सनी, त्याच्या घरचे, शाळेतले शिक्षक, काही प्रसंग, काही घडामोडी ह्याचा थोडा थोडा, पण पुरेसा तपशील देत देत सनीशी जुळणार्या एका व्यक्तीचं प्रेत सापडतं आणि त्याच वेळी सनीच्या वडलांची बस्तरच्या राजधानीला बदली होते. इथे बाबाचं कथन संपते आणि सनीचं सुरू होतं. बाबाच्या कथनातलेच धागे दोरे घेत घेत सनी त्याची कथा पूर्ण करतो.इथून दुसरा टप्पा सुरू होतो १९७७ साल. अजीत त्याची कथा सुरू करतो. त्याच्या कथनात ३० वर्षांपूर्वीचे अजून काही धागे-दोरे परत मिळतात आणि कादंबरी संपेस्तोवर कळतं की बाबा आणि सनीची पुढची पिढी उरलेलं कथानक सांगत्येय.अल्पावधीत चांगले मित्र झालेल्या दोघांनी ही कथा सुरू केली. सुरूवात त्यांच्या दुरावण्याने होते, पण शेवटी त्यांची पुढची पिढी, जी एकमेकांच्या अस्तित्वाविषयी/नात्याविषयी अनभिज्ञ आहे, त्यांची भेट होणार हे स्पष्ट होतं.
मला सगळ्यात भावलेली गोष्टं म्हणजे कादंबरीची रचना. तसा बराच मोठा कालखंड ह्या कादंबरीने व्यापला आणि हा कालखंड ४ भागात वाटून, २ जुन्या आणि २ नवीम पिढीतील पात्रांनीच कथा सांगयची हा प्रयोग चांगलाच जमला आहे. पुस्तक छोटं असलं तरीही यवतमाळ, नागपूर, मुंबई, पुष्कर, अजमेर इ.इ.खूप ठीकाणं येऊन जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारची माणसंही येतात. मोजक्या शब्दात व्यक्तीरेखा उभं करण्याचं कसब लेखकाकडे आहे. तसंच वेगवेगळे प्रसंग सुद्धा कसलाही फापटपसारा न लावता योग्य तपशीलासह उभे केले आहेत.कथेचे चार भाग केले असले तरी प्रत्येक भागात न जुळणार्या/अर्धवट राहिल्या अश्या वाटणार्या गोष्टी पुढे नीट जोडल्या आहेत.ह्या काळात विचारसरणीत झालेले बदल, मानसिकता इ. गोष्टी सुरेख टीपल्या आहेत.बाबा आणि सनीच्या कथनाचा भाग हा तत्कालीन रोमँटीसिझम शैलीचा वाटतो तर अजीत आणि प्रतिमा ह्या पिढीचं कथन जास्त गडद आहे...त्या काळाचं प्रतिबिंब...जेंव्हा बेकारी हा युगधर्म झालाय की काय असं वाटत होतं, वशिलेबाजीशिवाय सिनेमाचा डोअरकीपरपण होणं अवघड होतं असा तो काळ.
ह्या छोटेखानी कादंबरीत अनेक व्यक्तीरेखा आल्यात. श्यामली आणि कविता ह्या दोघी तर लक्षात रहाण्यार्या आहेत. त्याशिवाय काका, बडेबाबू, केदार गुरूजी, कादर, बल्लूवस्ताद अशी खास पात्र आहेत.टोंगो छोट्या छोट्या वाक्यात व्यक्तीरेखा उभ्या करून वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांची काही वाक्यंही खास आहेत. उदा:- हरणाची पाठ काळी पाडेल असं उन होत. कादंबरी सतत गतीमान रहाते. अनावश्यक संथ ही होत नाही की फारच जलदही जात नाही. आपल्याच एका मस्त धीम्या लयीत ती पुढे जात रहाते.
तर तुम्हीसुद्धा वाचा आणि जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं ते.
चतुर्मुखी - लेखक - शरश्चंद्र टोंगो - सरस साहित्य पुणे ९, प्रथमावॄत्ती १९७८ (एकच निघाली).
प्रतिक्रिया
आभार
रोचक लेखनशैली वाटते. सदर पुस्तक कुठे उपलब्ध आहे?
बाकी शरश्चंद्र टोंगो हे टोपणनाव आहे का प्रत्यक्ष नाव? मला तर आधी बंगाली नाव वाटले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हृषिकेश
पुस्तक उपलब्ध आहे असे वाटत नाही. मी स्वतःच ते पुस्तक १९९० च्या सुमारास आयडीयल(दादर्)च्या क्लिअरन्स सेल मध्ये १२ रू.ला(मूळ किंमत) घेतले होते. आता असेल का कुठे माहित नाही.
हे लेखकाचं खरं नाव असावं. कारण सर्व हक्क सौ.टोंगो ह्यांच्य नावे आहेत
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
रोचक
कंस हा समीक्षेचाच भाग म्हणून वाचला.
(No subject)
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
प्रतिक्रियेबद्दल दोघांचेही आभार
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
धन्यवाद
हे लेखक/पुस्तक ऐकलेच नव्हते. तुमच्या लिखाणामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
उत्तम ओळख. नेमक्या शब्दात
उत्तम ओळख. नेमक्या शब्दात कथेचा आराखडा आणि कादंबरीचे तुम्हाला भावलेले गुण मांडलेले आहेत.
आभार
श्री.अमुक आणि श्री.राजेश ह्यांचे आभार.
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....