कौतुक? चुकून कधीतरी !
गेल्या अर्धशतकात शहरीकरण अफाट वाढले. महानगरांचा तर चेहराच हरवून गेला. तिथल्या गतिमान जीवनात माणसे पिचून निघाली. पैशापाठी धावता धावता आयुंष्यात भावनांना फारसे स्थान उरले नाही. निस्वार्थी विचारपूस तर दुर्मिळच झाली. ‘’मी माझा’’ हा माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. माणसे अनेक शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रस्त झाली. याच्या जोडीला काही ‘सामाजिक रोग’ ही आपल्याला चिकटले आणि त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला. त्यापैकी एक रोग म्हणजे ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’. या रोगाचा विचार आपण या लेखात करूयात.
तसा हा रोग पूर्वापार चालत आला आहे पण, सध्याच्या जमान्यात तो अगदी उठून दिसण्याएवढा फोफावला आहे. तो समाजातील सर्व वयोगटात आढळतो. किंबहुना त्याची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते.
आता हा एक किस्सा बघा परदेशस्थ भारतीयांचा. शरद हे एक ज्येष्ठ संशोधक नोकरीसाठी परदेशात गेलेले व तेथे बरीच वर्षे स्थायिक झालेले. त्यांच्या आसपास काही मोजकी भारतीय कुटुंबे राहतात. त्यापैकी सुजय व सुजाता हे एक जोडपे. त्या दोघाना तिथे दोनच वर्षे झालेली. दोघेही उच्चशिक्षित व एका कंपनीत व्यवस्थापक. या कुटुंबाचा शरद यांच्याशी चांगला घरोबा जमलेला. शरद हे एक लेखकसुद्धा आहेत व त्यांची ललितलेखनाची एकदोन पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. ते वर्षातून एकदा सुटीसाठी भारतात येतात व परत जाताना बरीच साहित्यिक पुस्तके खरेदी करुन नेतात. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह आता भरपूर आहे. सुजातालाही वाचनाची खूप आवड परंतु पुस्तके स्वतः विकत घेण्याबाबत मात्र कमालीचा कंजूषपणा! शरदांकडची पुस्तके हक्काने वाचायला नेणे हा तिचा नेहेमीचा उद्योग. गेल्या दोन वर्षात तिने त्यांच्याकडची बहुतेक पुस्तके वाचून संपवलेली.
एकदा शरद मोठ्या सुटीसाठी भारतात जायला निघाले होते.तेव्हा सुजाता त्यांची पुस्तके घेउन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे धडकली. पण, आता तिच्या लक्षात आले की त्यांच्या संग्रहातली आहेत बहुतेक पुस्तके तिची वाचून झाली आहेत. शरद हे तसे प्रसिद्धीपासून दूर राहणारे असल्याने अद्याप त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांबद्दल तिला बोलले नव्हते. पण आता तिने काहीतरी पुस्तके देण्याची गळ घातल्याने त्यांनी स्वतःची पुस्तके तिला दिली. घाईत तिने ती पुस्तके उचलली व त्यांचा निरोप घेतला. यथावकाश शरद सुटी संपवून तिथे परतले. दुसऱ्या दिवशी सुजाता त्यांची पुस्तके घेवून तिथे दाखल झाली. बराच वेळ तिने हवापाण्याच्या फालतू गप्पा मारल्या व अगदी निघताना त्याना ‘’सर, ही घ्या तुमची पुस्तके, झाली वाचून’’ असे म्हणून काढता पाय घेतला.
आता काय म्हणावे तिच्या या वागण्याला? त्या पुस्तकावरील कुठल्याही प्रतिक्रियेविना ते परत करणे ही हद्द झाली होती. ‘’सर, चांगले आहे तुमचे लिखाण’’ किंवा निदान ‘’आवडले हो’’ एवढीही औपचारिक प्रतिक्रिया नाही. आणि तेही स्वतः फुकटे वाचक असताना! हीच ती मोठेपणी घट्ट मुरलेली रोगट मनोवृत्ती, नाही का?
अशा या कौतुक न करण्याच्या रोगाने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते!
मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते.
परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव संबंधितांकडून अपेक्षित असतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते.
भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते.
दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. मात्र, एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो!
थोडक्यात काय, तर दुसऱ्याचे दोष उगाळणे हा मानवी स्वभाव आहे खरा आणि बऱ्याच जणांचा तो लाडका उद्योग आहे. त्यामुळेच समाजात निंदा करणारी तोंडे उदंड दिसतात पण, शाबासकीचा सूर मात्र शोधावा लागतो.
**************************************************************
अचूक निरीक्षण.
अचूक निरीक्षण.
मला बरोब्बर उलटं वाटतं. मी
मला बरोब्बर उलटं वाटतं. मी काय लय भारी (**त खारी) आहे असं नाही, पण माझं कौतुक स्वस्त नाही. मनात नसताना / उगा....च कौतुक करण्याने माणसाचं महागुरूकरण होतं असं आपलं माझं मत.
समजा, मी उपरोक्त सुजाताच्या जागी असतो, तर शरदरावांचं पुस्तक खरोखर आवडलं असतं तरच "आवडलं" असं सांगितलं असतं. लेखक ओळखीचा आहे म्हणून कोणतीही सवलत द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. शरदरावांची पुस्तकं फुकटात वाचतो याचा मोबदला म्हणून कौतुकाचे शब्द मोजणं हा 'सिग्नलिंग प्रॉब्लेम' आहे. (गब्बरदिशानिर्देश)
अर्थात - एक सभ्यपणा म्हणून उगाच अपमान / खच्चीकरण करू नये याबाबत मात्र सहमत आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बहुतांश सहमत
'महागुरूकरण' हा शब्द आवडला.
सभ्यपणा म्हणून उगाच अपमान / खच्चीकरण करू नये, यापेक्षा गरज असेल तेव्हा अपमान करण्याचीही किंमत राहावी म्हणून येता-जाता नावं ठेवू नयेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'महागुरूकरण' हा शब्द
हेच म्हणणार होतो..
कौतुक स्वस्त होता नये.. किंवा कौतुकाचा कोटा ( द्या इतकी अॅवॉर्डस या क्वार्टरला टाइप) असता नये.. मनोमन वाटेल तेव्हामात्र समोर कोण आहे हे न बघता कौतुक करता यावं..
फेसबुक व्हिडिओ
हे वर्ष सरत आल्यावर फेसबुकने मी फेसबुकवर २०१६ या वर्षात काय दिवे लावले याचा व्हिडिओ मला दाखवला. मी ८०००+ गोष्टी 'लाईक' केल्या हे दिसल्यावर मला अंमळ धक्का बसला. 'कौतुक जरा जास्तच स्वस्त होतंय', असं वाटलं. अधूनमधून 'थँक्यू' किंवा 'दखल घेतली' एवढंच पोहोचवण्यासाठीही मी 'लाईक' करते; अशी स्वतःची समजूत काढली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला बरोब्बर उलटं वाटतं. मी
भले शाब्बास. लगता है ... मैने आपको पहले भी कही देखा है.
कौतुकाची समस्या ही आहे की कौतुक करताना कुठे थांबायचे ते ठरवणे हे अशक्य काम आहे. Laffer Curve सारखे असावे.
पण भारतीयांची एक समस्या आहे - They do not know how to handle influence. व त्याच धर्तीवर बोलायचे तर .... भारतीयांना त्यांचे कौतुक झाल्यानंतर त्याचे रिसेप्शन कसे करायचे ते समजत नाही. अनेक भारतीय लोक ... कौतुक केल्यावर उगीचच खोटी नम्रता दाखवतात. पण काही भारतीय लोक कौतुक केल्यावर असा काही रिस्पॉन्स देतात की कौतुक करणार्याला आपल्या कोणीतरी कानफाटात मारली आहे असे वाटते.
एक सभ्यपणा म्हणून उगाच अपमान / खच्चीकरण करू नये याबाबत मात्र सहमत आहे.
भारतीयांना त्यांचे कौतुक
हे सत्य आहे.
वाह !
छान लेख !!! !या.लेखासाठी तुमचे जितके कौतुक करावे तितके कमीच !!! हे मी मनापासुन सांगतोय ( सालं हे ही सांगाव लागतं की मै इमानदारी से बोल रहा हु नोबंचाप )
जुने म्हातारे मुलांनी कितीही चांगलं काम केलं तरी चेहरे कायम चुर्ण खाल्यासारखे ठेवायचे. एका शब्दानेही कुठुन चुकुन कौतुकाचा शब्द तर बाहेर पडणार नाही ना याची भिती बाळगायचे. कायत पोरं बिघडतील म्हणुन, आणि बाप गेल्यानंतर पोरांना कधीतरी कळायच की आपल्या बापाला आपला आपल्या यशाचा अभिमान वाटायचा वगैरे.
तोपर्यंततर कडवटपणा च राहायचाना मात्र. नंतर पोराला प्रेमाचा उमाळा आला तरी काय उपेग मी म्हन्तो ? अरे जिन्दा होता तेव्हा त्याला कधी जवळ घेतला नाही, त्याच्या यशावर डोक्यावरुन कौतुकाचा हात फिरवला नाही नुसता मनात ठेऊन एखाद दुसर्याच्या कानात सांगुन खपुन गेला.
अर्थात वर धर्मराज व खाली आदुबाळ म्हणतात तसा अस्थानी अयोग्य अपात्र कौतुकही नकोच नको त्यापेक्षा योग्य पात्र टीका कितीही खरमरीत जहरी असली तरी परवडली.
म्हणजे पुण्यात जशी सवाईत चारच जाणकारांकडुन दाद मिळाली तरी बेहतर, बाकी चाळीस नको तिथे टाळ्या वाजवणारे नकोच. एलकुंवचवार म्हणायचे पुण्याचे प्रेक्षक विचक्षण तस.
पण तुम्ही ज्या बाजुने आर्ग्युमेंट करताय ते अगदी तंतोतंत बरोबरच आहे. मनमोकळं कौतुक करायला माणुस मुळात आतुन बाहेरुन मोकळा असावा लागतो. स्वतःच्या पलीकडे जाण्याची कॅपॅसीटी लागते. नाहीतर स्वतःच्याच कौतुकाच्या खाईत पडलेले कितीतरी जण आजुबाजुला दिसतात. काहीत चक्क खाईतच घर बांधुन राहतात. कधीतरी दुरवर खालुन त्यांना एखाद बसचा लाल ठिपका दिसला त दिसतो. बाजीचा-ए-अत्फाल टाईपचे लोक. फार पुर्वी एक ओळखीचा पांडे नावाचा इसम होता इन्श्युरन्स एजंट होता त्याची स्टाईल अशी असे " मै वो कमिशनर के पास गया था उसने बोला देखो पांडेजी आप ऐसा किजीए " म्हणजे कोणीही मोठ्या माणसाचे नाव टाकायचा अगोदर मग तो बोलतांना मला म्हणाला "पांडेजी" लय प्रेमात पडलेले असतात काही लोक स्वतःच्याच.
असो लेख छान जमलाय.
चांगला लेख !
लेख आवडला.
मात्र कॉर्पोरेट जगतात कलीग / बॉस पादला तरी त्याचे कौतुक करणारी आणि नको तेवढे गोग्गोड बोलणारी मंडळी शेकड्याने पाहिल्यामुळे "कौतुक नको पण तोंड आवर" अशी अवस्था झाली माझी. उलट लोकांनी दुर्लक्ष केले की मला आनंदच होतो. (अपवाद म्हणून समजा.)
बॅकस्टेज आवडणारा माणूस
लेख आवडला. आपण स्वतः जेव्हा
लेख आवडला. आपण स्वतः जेव्हा आपल्याच असुरक्षित भावनेमुळे Threaten होतो तेव्हाच कौतुक तेव्हा तोंडावर येत नाही. तेव्हा आपली पात्रता असूनही कौतुक न करता कोणी मत्सर जिरवत असेल तर आपणही मनात टाळ्याच पिटाव्या
@ मारवा, धर्मराज व शुचि :
@ मारवा, धर्मराज व शुचि : मनापासून आभारी आहे.
सर्व प्रतिसादकांचे आभार. आपण सर्वांनी समर्पक प्रतिसाद दिले आहेत.
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
मारवा, तुमचे विवेचन
मारवा, तुमचे विवेचन आवडले.
असे वाचण्यात आले होते की सचिन तें चे गुरू आचरेकर त्याने शतक काढल्यावर् सुद्धा त्याचे कौतुक करीत नसत.लगेच पुढच्या वेळेस काय सुधारणा करायच्या याची चर्चा सुरू करीत.अर्थात, ते मनातल्या मनात त्याचे कौतुक नक्की करत असणार !
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
पण तिला पुस्तक आवडलं असेल
पण तिला पुस्तक आवडलं असेल कशावरून?
मी जो काही प्रामाणिक प्रतिसाद आहे तो दिला असता. केवळ पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे त्या क्षेत्रात काही यश कमावले किंवा ते चांगल्या लेखकाचे लक्षण आहे असे मला वाटत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अगदी!
लहानपणी केस कापायला गेलो, आणि आपला नंबर यायला वेळ असला, तर न्हाव्याच्या दुकानी केवळ न्हाव्याच्याच दुकानात ठेवण्याच्या लायकीची जी नियतकालिके असत, ती मी अथपासून इतिपर्यंत वाचून काढत असे. परंतु याचा अर्थ (१) ती मला आवडत, आणि/किंवा (२) ती उत्तम नियतकालिके असल्याचे ते लक्षण होते, असा मुळीच नव्हे. केवळ नाइलाज हा राष्ट्रपिता.
असो.
कौतुक भरभरून करावे, पण टीका
कौतुक भरभरून करावे, पण टीका मात्रं हातचे राखून करावी असे म्हणतात ते योग्यच आहे.
पण कौतुक करताना, उगीच "देखल्या देवा दंडवत" असेही करू नये. म्हणजे तोंडदेखले कौतुक करायचे आणि पाठीमागे वाईट-साईट बोलायचे. मनात कौतुक असेल तर जरूर दर्शवावे. ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची निराळी पद्धत असू शकेल. अक्षेप असतील, आणि सांगणे शक्य असेल तर संबधित व्यक्तीला अपमान न वाटेल अशा पद्धतीने सांगावेत. नपेक्षा गप्प रहावे.
टीका नेहमीच वाईट नसते. पण ती दिशादर्शक असावी. एखाद्या व्यक्तीचा मनोभंग होऊन त्याची कार्यशक्ती क्षीण करणारी नसावी. तसेच सारखे, सतत कौतुक करत राहणे पण ठीक नाही. कारण नेहमी कौतुक करून घेण्याची सवय असणार्याला, एखादा बारीकसा विरोधाचा शब्द देखिल सहन करण्याची सवय रहात नाही. हे फारच घातक आहे.
स्तुती आणि लांगुलचालन यात देखिल फरक असतोच. पण अर्थात कुणी काय करावे हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
माझ्या मते ह्या प्रसंगात
माझ्या मते ह्या प्रसंगात खर्याखुर्या कौतुका पेक्षा बेसिक सौजन्य दाखवणे अपेक्षीत आहे.
जर कोणीतरी आपल्याला आपली गरज म्हणुन पुस्तक दिले आहे तर "सौजन्य" म्हणुन , कृतज्ञता म्हणुन खोटे का होइना, २ चांगले शब्द बोलणे गरजेचे आहे.
जसे कोणाच्या घरी जेवायला गेल्यावर, जेवण चांगले झाले होते असे खोटे सांगतो तसे.
बेसिक सौजन्य दाखवणे अपेक्षीत
मस्त शब्द वापरलास!!
तोंडदेखले सौजन्य काही कामाचे
तोंडदेखले सौजन्य काही कामाचे नसते हो. नुसते कचकड्याचे. कधी तुटेल याचा नेम नाही.
अवांतर : श्री राजा गोसावी, श्री अविनाश खर्शीकर, इ. अभिनीत "सौजन्याची ऐशी-तैशी" नाटक फारच मस्तं आहे. खूप पूर्वी पाहिलेले-- आत्ता आठवले.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
सौजन्याची...
नवीन संचात सद्ध्या पुन्हा चालू आहे म्हणे...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बापट/जोगळेकर/काणे यांच्याकडचे
बापट/जोगळेकर/काणे यांच्याकडचे जेवण आवडले का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेचाचा, ते काणे होते.
थत्तेचाचा,
ते काणे होते. हॉटेल लगेच सापडले. जेवणे "बरे+" होते. जोरदार कौतुक करावे असे नव्हते.
पोळ्या मात्र चांगल्या होत्या.
बरोबरच्या लोकांना हे हॉटेल थत्तेचाचांनी रेकमेंड केले आहे हे स्पेसिफिकली सांगीतले. त्यातल्या जवळजवळ सर्वांना तुम्ही कोण हे माहीती नसल्यामुळे, त्यांचे कुतुहल जागृत झाले. त्यामुळे तुमचे गुणवर्णन केले.
माझ्या मते ह्या प्रसंगात
माझ्या मते ह्या प्रसंगात खर्याखुर्या कौतुका पेक्षा बेसिक सौजन्य दाखवणे >>> एकदम सहमत. व्यवहारात खूपदा कौतुकापेक्षा सौजन्याचीच जास्त गरज असते.
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
एक विचारू का? तुम्ही जर कौतुक
एक विचारू का? तुम्ही जर कौतुक करावं असं म्हणत असाल तर लेखाच्या सुरुवातीलाच आजच्या पिढीवर आणि आजच्या समाजावर दुगाण्या का झाडलेल्या आहेत? सुजाताविषयी लिहितानाही 'तिला आवड आहे खरं आहे, पण ती फुकटी आहे' असं म्हटलेलं आहे. माझ्या घरचा संग्रह जर कोणी वाचून काढला तर मी त्यांच्या वाचनाच्या क्षमतेबद्दल थक्क होईन.
मुळात हा विषय तसा धोक्याचा आहे - कारण कौतुक न करण्याच्या किंवा टीकाच फक्त करण्याच्या सवयीवर टीका करणं हे त्याच सवयीचं टोक थोडं पुढे नेण्यासारखं आहे. मात्र योग्य पद्धतीने लिहिलं, चांगलं काय आहे हे जाणून घेऊन, समजावून सांगून लेख लिहिला तर तो धोका टाळता येईल. या लेखात दुर्दैवाने तो धोका टाळण्यात लेखक अयशस्वी झालेला आहे असंच म्हणावं लागतं.
या वाक्यात जबरदस्त संतुलन साधले गेलेले आहे.
दोन्ही बाजु बरोब्बर
आमचे अनेकांतले एक आध्यात्मिक गुरु आहेत श्री नरेंद्र महाराज त्यांचा एक संदेश आहे
तुम्ही जगा व दुसर्याला जगवा
यात बॅलन्स आहे संतुलन आहे.
तुम्ही खा दुसर्याला खिलवा
यातही बघा तुम्ही व दुसरा दोन्ही कुशलतेने कव्हर केलेले आहेत.
याच प्रमाणे आमचे नविन अनाध्यात्मिक गुरुजी राजेश घासकडवी यांनी या वाक्यात आदर्श कौतुकाचे संतुलन साधलेले आहे.
मंडळी लक्षपुर्वक वाचा एकेक शब्द विचार करण्यासारखा आहे.
माझ्या घरचा संग्रह जर कोणी वाचून काढला तर मी त्यांच्या वाचनाच्या क्षमतेबद्दल थक्क होईन.
याची तीन टप्प्यात फोड करावी
क्र.१- माझ्या घरचा संग्रह
अध्यात्मात माझ्या आणि संग्रह याला महत्व आहे. माऊली बघा किती कुशलतेने अंगुली निर्देश करत आहेत
क्र.२-जर कोणी वाचून काढला तर
माउली बघा आव्हानात्मक लहेजा आहे जर कोणी वाचुन काढला तर
क्र.३-मी त्यांच्या वाचनाच्या क्षमतेबद्दल थक्क होईन.
गुरुजी त्यांच्या पर्यायाने कोणाच्या ? क्षमतेने थक्क होतील ?
म्हणून आमच्या घासकडवी माऊलींचा संदेश मननीय आहे.
स्वतःचे कौतुक करा दुसर्याचेही कौतुक करा
याला म्हणतात साम्यवाद याला म्हणतात समरसता
लालबावटा ही आमचा लाठी ही आमची.
आता पळतो रे बाबा ......
कारण हे हलक्यात घेतल जाण्यासारख नाही दिसत.
म्हणून भाग मारवा भाग...
राघा, अभिप्रायाबद्दल आभारी
राघा, अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!
थोडं अवांतर -
शरद नामक, अमेरिकास्थित, मराठी लेखकांच्या एका पुस्तकाचं परीक्षण एका संस्थळावर वाचलं होतं. परीक्षण, खरं तर पुस्तकाचं वर्णन, आणि तिथे आलेल्या प्रतिक्रिया वाचून 'मुक्तपीठ का चालत असावं हे समजलं', अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली. ते मी तसंच्या तसं तिथे लिहिलं नाही, 'पुस्तकाच्या शीर्षकामुळे अपेक्षा बऱ्याच होत्या, पण तसं काही आत नसावं असं वाटतंय', अशी गुळमुळीत प्रतिक्रिया लिहिली.
---
आमच्या ठाण्याच्या इमारतीत एक लेखक राहात असत. ते खूप बोलायचे, "तुम्ही मुलं काही वाचत नाही; आजकालची पिढी फार आळशी झाल्ये. माझ्याकडे एक हजार पुस्तकं आहेत. तुम्ही ती वाचायला पाहिजेत. तुम्ही मैदानात जाऊन खेळायला पाहिजे. तुझी आई मला कॉफी पाजायची," अशी असंबद्ध आणि माहितीपूर्ण वाक्यं एकामागे एक यायची. आपण उत्तर द्यायला गेलो की कानाला हात लावत, "मशीन नाही आणलं" म्हणायचे.
आमचं घर तळमजल्यावर. माझी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाची प्रिलीम का कायशीशी परीक्षा सुरू होती. मी खिडकीतच अभ्यासाला बसले होते. लेखक आले, खिडकीतूनच सुरुवात झाली, "तुझी आई फार चांगली होती. तिने मला एकदा कॉफी पाजली होती..." मी त्यांच्याकडे एकदा बघितलं आणि पुस्तकात पुन्हा डोकं खुपसलं. ते निघून गेले.
यथावकाश, माझी तक्रार शेजारच्या काकांकडे झाली. मी काकांना म्हटलं, "मला तेव्हा म्हणायचं होतं, 'माझी आई चांगली होती. पण मी म्हणजे माझी आई नाही. मी दुष्ट आहे.' पण त्यांनी मशीन आणलं नसणारच, मग माझं बोलणं फुकट जाणार आणि ते पुन्हा बोलत बसणार. मी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं का यांच्या लेक्चरबाजीकडे? पण आता ते मला पीडत नाहीत."
काकू हसून म्हणाली, "मला म्हणत होते, "वहिनी, तुमचा नवरा आळशी आहे. तो काही पुस्तकं वाचत नाही. त्याला माझ्याकडे पाठवा.""
मी म्हटलं, "काकू, तुझं आणि काकांचं भांडण झालं की काकांवर लेखक सोड."
मग काकासुद्धा हसले आणि म्हणाले, "त्यांचं म्हणणं होतं, "मी एवढं सगळ्यांना वाचायला सांगतो, त्यांच्या भल्याचं सांगतो, माझं कोणी ऐकत नाहीत.""
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शंका
त्यातली दोन, बायेनीचॅन्स, डेल कार्नेगीची अनुक्रमे 'हौटु विन फ्रेंड्ज़ अँड इन्फ्लुएन्स पीपल' आणि 'हौटु ष्टॉप वरीइंग अँड ष्टार्ट लिव्हिंग' होती काय हो?
त्या पिढीतल्या साक्षर (खास करून इंग्रजीसाक्षर) पकाऊंची सहसा फेवरिट असत. त्या पिढीतले कार्नेगी गळ्यात टाकणारे आणि या पिढीतले अॅम्वेवाले यांच्यात अधिक पकाऊ कोण, यावर अजून ठाम मत (माझे) होऊ शकलेले नाही. (अॅम्वेवाले निदान पैशासाठी - किंवा गेलाबाजार पैशाच्या भ्रामक आशेपोटी - करतात असे म्हणायला जागा आहे.)
रेंज
या लेखकांच्या लेखनाची स्वयंघोषित रेंज 'गामा पैलवान ते सावरकर' अशी होती. गामा हे पैलवानाचं नाव असतं हे मला आधी समजलं. ग्रीक मुळाक्षर नंतर आयुष्यात आलं.
त्यांच्याकडे असलेल्या हजार पुस्तकांमध्ये कोण-कोण होते, कोण जाणे! ते नेहरूंचे चाहते असावेत, असं एक अमूर्त (=विनाकारण) सार्वजनिक मत मला आठवतं. मी त्या घरात कधीही गेले नव्हते. गच्चीत जाताना एक-दोनदाच दरवाजा उघडा होता तेव्हा दरवाजासमोर भिंतभर पुस्तकं बघून मी दीपून गेले होते; पण लहानपणापासूनच त्यांची (कानाला) "यंत्र नाही"मुळे दहशत होती. माझ्या आयुष्यातले आद्य 'दहशत'वादी म्हणून बहुदा मी लेखकांचं नाव घेईन. त्यामुळे त्यांच्या तावडीत सापडेस्तोवर तिथे वाट बघत बसले नाही.
का कोण जाणे, त्यांचा संग्रह अगदीच बोगस नसावा असं वाटतं. इमारतीत जे कोणी थोडेबहुत इंटुक-छापाचे लोक होते ते त्यांच्या पुस्तकसंग्रहाबद्दल वाईट बोलत नसत. एक-दोनदा आमचे परमपूज्य लेखकांच्या गुहेत आपण होऊन गेले होते, पण पुस्तकसंग्रहाबद्दल आणि कशाबद्दलच काहीही कॉमेंट आली नव्हती. परमपूज्य कॉलेजात शिक्षक होते म्हणून त्यांच्याशी गप्पा मारण्याची लेखकांना फार इच्छा असे. मातोश्री शाळेत दोन भाषा शिकवत असल्या तरीही त्यांच्याबद्दल बोलताना 'तुझ्या आईने मला कॉफी पाजली होती', या पारंपरिक कॉमेंटपलीकडे काही आलं नाही.
चांगलं काही वाचून किंवा बघून आपल्यालाही काही लिहिण्या-चितारण्याची हुक्की येते, पण त्यांतलं सगळंच प्रकाशनयोग्य नसतं. मी त्यांची पुस्तकं वाचलेली नाहीत, त्यामुळे त्याबद्दलही मत नाही. पण आपण कोणी तिस्मारखां आहोत, बाकीच्या लोकांना आपण दाखवल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही आणि या लोकांना त्याची कदर नाही, अशा आशयाची तक्रार इमारतीतल्या सोशिक स्त्रियांसमोर ते करत. मूळ लेखातले शरद तक्रार करतात तसा किंवा तत्सम फुकटेपणा लेखकांशी करायची बहुतेकांची तयारी नव्हती.
मी आणि इमारतीतला आणखी एक मुलगा एक-दोन वर्षांच्या अंतराने पीएचडी झालो. मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या दृष्टीने हात अस्मानालाच टेकले. पण तोवर लेखक फारच म्हातारे झाले होते; त्यामुळे त्यांच्यापेक्षा अधिक शिकलेल्या तरुण आणि आगाऊ मुलांबद्दल मतप्रदर्शनाची संधी त्यांना मिळाली नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेखनात पिचलेले लोक आजुबाजूला
लेखनात पिचलेले लोक आजुबाजूला असणे एक अनुभवच असणार.