बिन जातीचे व्हा!
काळ बदलला की ताळ (ताल) बदलतो. काँग्रेसच्या बाबतीत ही म्हण उत्तर प्रदेशात खरी ठरू पाहत आहे. जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा खरा चेहरा आहे. हा चेहरा एकेकाळी काँग्रेसची खरी शक्ती होती (आजही आहे.). उत्तर प्रदेशात मात्र जातीनिरपेक्षा चेहरा काँग्रेसला जाचक ठरू लागला आहे, असे दिसते. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशापयशाचा आढावा घेण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी अर्थात ‘आरजी' यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी एकच मुद्दा मांडला, की काँग्रेसला जातीय चेहरा नसल्यामुळे उत्तर प्रदेशात हार पत्करावी लागली! त्यावर राहुल गांधी म्हणाले की, चेहरा नाही कसा? मी ब्राह्मण आहे आणि काँग्रेचा जनरल सेक्रेटरी आहे. आरजी यांचे मूळ वाक्य असे : I am a Brahmin and general secretary of the party.
जाती-धर्म पणाला लावण्याचे पाप कोणाचे?
आरजी यांचे हे वक्तव्य अधिकृत नाही. झिरपत आलेल्या माहितीवरून प्रसार माध्यमांनी ते प्रसिद्ध केले आहे. आरजींचे हे वक्तव्य खरे मानायचे की खोटे हा प्रश्न आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बैठकीत आरजी काय बोलले या पेक्षा काँग्रेसला कोणता संदेश बाहेर पाठवायचा, हे महत्वाचे ठरते. काँग्रेसकडून अधिकृतरित्या या कथित वक्तव्याचा इन्कार आलेला नाही. याचा सोपा अर्थ असा आहे की, प्रसारमाध्यमांत ज्या बातम्या आल्या त्याला काँग्रेसचा आक्षेप नाही. काँग्रेसला अपेक्षित असाच संदेश बाहेर आला आहे. आरजी यांच्या वक्तव्यावर भाजपाने अपेक्षेप्रमाणे आकांडतांडव केले. भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसला दुषणे दिली. (जावडेकर यांची मूळ टीका अशी : Now this is crossing all limits that Rahul Gandhi has started informing what his caste is...That he is a Brahmin. Congress has lost all patience after losing the mandate in Uttar Pradesh elections.) वस्तुत: भारतीय राजकारणात जाती आणि धर्म पणाला लावण्याचे मूळ पाप भाजपाचेच आहे. राजकारणात गैरसोयीच्या गोष्टी विसरायच्या असतात. जावडेकर भाजपाचे पाप विसरले! हिंदुत्ववाद आणि राममंदिराचे आंदोलन पेटवून भाजपाने एकेकाळी उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता उपभोगली आहे. भाजपाने पेरलेल्या विकृतीचा विकास उत्तर प्रदेशात आता दिसू लागला आहे. भाजपाच्या पे-याची ही विकसित आवृत्ती आता खुद्द भाजपाच्या हातूनही निसटली आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपालाही उत्तर प्रदेशात दारुण पराभव पाहावा लागला आहे.
काँग्रेसच्या मागे यायला जातीच नाहीत!
काँग्रेसच नव्हे, तर इतर सर्व पक्ष आणि प्रसार माध्यमे २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण जातींच्या चौकटीतच करीत आहेत. मायावती दलित आहेत म्हणून दलित समाज त्यांच्या सोबत आहे. सतीशचंद्र मिश्रा हे ब्राह्मणांचे नेते मायावतींसोबत आहेत म्हणून ब्राह्मण समाज मायावतींसोबत आहे. मुलायमसिंग हे जातीने यादव आहेत म्हणून यादव समाज त्यांच्यासोबत आहे. आजमखान यांच्यासारखे मान्यताप्राप्त मुस्लिम नेते सपासोबत आहेत म्हणून मुस्लिम समाज सपासोबत आहे. अजित सिंग जाट आहेत म्हणून जाट समाज त्यांच्या सोबत आहे. इ. स्वरूपाची अत्यंत साधी-सोपी समीकरणे मांडली जात आहेत. दुर्दैवाने ती सत्य आहेत. सत्य हे नेहमीच पवित्र असते असे नव्हते. सत्य हे अपवित्र आणि विषारीही असू शकते. उत्तर प्रदेशात ते दिसले. काँग्रेसच्या नेत्यांनी आरजी यांच्या बैठकीत ते सांगितले. सगळ्या जाती आपापल्या जातीच्या नेत्यांच्या मागे गेल्या आहेत. काँग्रेसच्या मागे यायला जातीच उरलेल्या नाही!
जाती लाभ देतात अन् मर्यादाही
अपवित्र असले, विषारी असले, म्हणून सत्य नाकारता येत नाही. भारतीय राजकारणच नव्हे तर समाजकारण आणि धर्मकारण अशा सर्वच व्यवस्था प्राचीन काळापासून जातींभोवती फिरत राहिल्या आहेत. जातींचे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. मोठी सन्ख्या असलेल्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांना चटकन अनुयायी मिळतात. झटपट यश मिळते. तथापि, असे नेतृत्व जातीची आणि प्रदेशाची चौकट मोडू शकत नाही. मुलायम सिंग, लालूप्रसाद, नितिशकुमार, शरद यादव, शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, करुणानिधी, फारुख अब्दुल्ला, अजित सिंग, पी. ए. संगमा, एच. डी. देवेगौडा हे नेते याचे उत्तम उदाहरण आहेत. ही माणसे खरोखरच वजनदार आहेत. या नेत्यांनी आपापल्या प्रदेशात राजकीय घराणी जन्माला घातली आहेत. तथापि, हे नेते आणि त्यांची घराणी प्रदेश आणि जातीच्या भिंती तोडून "अखिल भारतीय" होऊ शकलेली नाहीत. होऊ शकणार नाहीत. अखिल भारतीय होण्याची ताकद असलेले एकच घराणे या देशात आहे. ते म्हणजे "गांधी-नेहरू" घराणे. या घराण्याला ही ताकद त्यांच्या बिनजातीच्या आणि बिनधर्माच्या चेह-याने दिली आहे. या घराण्याला कोणतीच जात राहिलेली नाही. नेहरू हे या घराण्याचे मूळ पुरूष. ते काश्मिरी ब्राह्मण होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी पारशी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. इंदिरा गांधींचे थोरले पुत्र राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी इटालीच्या, कॅथालिक ख्रिश्चन आहेत. धाकटे पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी या शीख समाजातील आहेत. राजीव गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांचा विवाह भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मीय रॉबर्ट वधेरा यांच्याशी झाला आहे. अशा परिस्थितीत गांधी-नेहरू घराण्याची कोणती जात गृहीत धरायची? कुठल्याही जातीचा आणि धर्माचा आणि वंशाचा चेहरा नसल्यामुळे नेहरू-गांधी घराणे सर्व जाती-धर्मांसाठी स्वीकारार्ह ठरले. त्यांचा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला. मात्र, ज्या बिनजातीच्या चेह-याने काँग्रेसला अखिल भारतीय ओळख दिली, तो चेहरा आता काँग्रेसला उत्तर प्रदेशात अडचणीचा वाटू लागला आहे! १९४७ ते २०१२ या ६५ वर्षांच्या काळात आपल्या समाज व्यवस्थेने केलेली ही प्रगती समजायची का?
आपली समाज रचना खरोखरच अद्भूत आहे. गुंतागुंतीची आहे. ती दोन पातळ्यांवर काम करते. एका पातळीवर ती जाती आणि धर्मांच्या बंदिस्त भिंतीत वावरते. जातींचे लाभ व्यक्तींना देते. त्याचवेळी दुस-या बाजून ती या भिंती तोडूही पाहते. त्यासाठी अधिक मोठे लाभ देते."मोठा आवाका प्राप्त करण्यासाठी बिनजातीचे व्हा", असा संदेश आपली समाज व्यवस्था देते. गुरुत्वाकर्षणासारखे हे आहे. गतीमुळे गृहगोलांच्या गाभ्यात गुरुत्वाकर्षण तयार होते. ते गृहाला आत खेचू पाहते. हीच गती गृहागोलाच्या बाह्य परिघाला बाहेर फेकू पाहते.
थोडक्या लाभासाठी काँग्रेसला आपला अखिल भारतीय चेहरा गमावणे परवडणार नाही, हे या पक्ष्याच्या नेत्यान्नी समजून घेतले पाहिजे.
...................................................................................
आरजी यांच्या वक्तव्या विषयीची मूळ लिन्क :
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=759654
-सूर्यकांत पळसकर
प्रतिक्रिया
जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा
जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा खरा चेहरा आहे. हा चेहरा एकेकाळी काँग्रेसची खरी शक्ती होती (आजही आहे.).
मी तर आजपर्यंत (तथाकथित) अल्पसंख्यांक मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसबद्दल ऐकले होते. काँग्रेसची खरी शक्ती खेड्यापाड्यातले मतदार असेही ऐकून होतो.
...अल्पसंख्यांक मतांचे राजकारण...
श्री. प्रसाद,
तुम्ही जे ऐकले आहे, ते खरे आहे. मीसुद्धा लेखात हेच मांडले आहे. काँग्रेसला जातीचा चेहरा नसल्यामुळे बहुतांश अल्पसंख्याकादी सर्व जातींचा पाठिम्बा मिळत आला आहे.
पुरे
पुरे कर रे ते काँग्रेसपुराण सूर्यकांता! अगदी नेहरूंच्या काळापासून बघत आलेय. जातीचे विषारी राजकारण ह्या लोकांनीच केले. निवडणूकीचे तिकिट वाटप करताना जात कोण बघायचे? इंदिरा तर ह्यात हुश्शार होती. म्हणून मग मुस्लिम मतदार संघातून नेहमी मुस्लिम उमेदवार उभा करायचा.कराड मतदार संघ म्हणजे चव्हाण(मुख्यमंत्र्यांचे आई-वडिल) ठरलेले. जाती नष्ट करायच्या होत्या तर हे धंदे कशाला केले? का नाही भेंडीबाजारातून ब्राम्हण उमेदवार उभा करत? का नाही ब्राम्हण बहुसंख्या मतदार संघातून मुस्लिम उमेदवार उभा करत? हे असे जातीचे राजकारण जिल्हा परिषदांपासून दिल्लीपर्यंत खेळायचे, माणसे पैसे टाकून कोंबड्यांसारखी झुंजवायची, होयबा लोकांची फौज जमवून वर्षानुवर्षे सत्तेवर रहायचे. ईतरही पक्ष त्यातलेच आहेत म्हणा.
उद्विग्न रमाबाई
?
हे असे मुद्दाम करण्याने जाती नष्ट होतील, की फक्त जातिभेद अधोरेखित होतील?
नि केवळ "राष्ट्रीय एकात्मते"च्या नावाखाली पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघातून अरुणाचल प्रदेशातून आलेला एखादा उमेदवार, झालेच तर जम्मू आणि कश्मीरमध्ये एखादा तमिळ उमेदवार नि तमिळनाडूमध्ये एखादा गुजराती उमेदवार उभा केल्याने तो जेथून उभा करायचा, त्या मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधित्व तरी धड करू शकेल काय, मुळात लोकांना तो "आपल्यातला" वाटल्याखेरीज? तुम्हाला चालेल काय, एखादा छत्तीसगढ़ी उमेदवार तुमच्या मतदारसंघातून उभा राहिलेला, कितीही लायक असला तरी? तुम्हाला तो "आपल्यातला" आहे, "आपले" प्रश्न सोडवू - किंवा किमानपक्षी व्यवस्थित समजून ते संसदेतून प्रभावीपणे मांडू - शकेल याची खात्री वाटल्याखेरीज तुम्ही त्यास मत द्याल काय? प्रातिनिधिक लोकशाहीत प्रतिनिधी हा ज्यांचे प्रतिनिधित्व करायचे त्यांच्यातला, किमानपक्षी आपले प्रतिनिधित्व प्रभावीपणे करू शकेल असे त्यांना वाटण्यासारखा नको काय?
नि भेंडीबाजारात उभे करायला ब्राह्मण उमेदवार नि ब्राह्मणबहुसंख्य मतदारसंघात उभा करायला मुसलमान उमेदवार आणायचा कुठून? नि कशासाठी?
लेखाचं शीर्षक आणि त्यातला
लेखाचं शीर्षक आणि त्यातला संदेश यांत तफावत आहे. थोडक्यात जातीनिरपेक्षता राजकारणात फायद्याची ठरत नाही असं कॉंग्रेसला जाणवल्याचं लेखात प्रतिपादन आहे. उत्तर प्रदेशाबाबत हे आत्ता कारण म्हणून देणं कदाचित लागू असेलही (त्याबद्दलही प्रश्न आहेच). पण अखिल भारतीय पातळीवर किती लागू आहे याबद्दल साशंक आहे. जात्याधिष्ठित राजकारण स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष करतात.
गेल्या काही दशकांत निवडणुकांवरचा जातींचा पगडा कमी झालेला नाही का? विशेषतः ज्या वेगाने भारताचं शहरीकरण होतं आहे ते पहाता अशी अपेक्षा ठेवणं रास्त वाटतं. याबद्दल कोणाकडे काही विदा आहे का?
शीर्षक आणि संदेश यांत तफावत...
राजेश घासकवडी,लेखात कुठलाही संदेश नाही. केवळ निरीक्षणाची नोंद आहे.
रमाबाई कुरसुंदीकर
रमाबाई कुरसुंदीकर, माझा लेख स्थानिक पातळीवरील राजकारणावर नाही. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील चेह-याची चर्चा करणारा आहे. त्यामुळे तुम्ही दिलेली उदाहरणे गैरलागू ठरतात.
ऐसी अक्षरेवर स्वागत! एका
ऐसी अक्षरेवर स्वागत!
हे निरिक्षण मोठे मार्मिक आहे.
सद्य स्थितीत रोटी व्यवहारात जात फारशी आड येताना दिसत नाही, मात्र बेटीव्यवहारात जात चिवटपणे टिकून आहे हे (काहिसे दुर्दैवी) सत्य नाकारता येणार नाही. बाकी, महाराष्ट्रातील दैनंदिन शहरी जीवनात तरी जाती-सापेक्ष वर्तन कमी आढळाते. ग्रामिण भागातली कल्पना नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फायदा
जाती लाभ देतात अन् मर्यादाही - सहमत.
नेहेरू-गांधी घराण्याशी निगडीत
नेहेरू-गांधी घराण्याशी निगडीत लोकांना आता जात सांगता येणार नाही हे खरं असलं तरीही काँग्रेसबद्दल असं म्हणवत नाही. काँग्रेसचं राजकारण जातीय अस्मितांच्या बाहेर महाराष्ट्राततरी दिसत नाही. बंगालमधे कदाचित जातीपातींचा फार प्रादुर्भाव नसावा पण तिथे काँग्रेसही तृणमूलनंतर फारशी शिल्लक राहिलेली नाही.
लोकसभा किंवा विधानसभेत निवडून येणार्या प्रमुख राजकारण्यांबद्दल, ते प्रादेशिक अस्मितांपुरते मर्यादित नाहीत असं म्हणता येईल का? लालू, ममता, शरद पवार, शरद यादव, मुलायम, मायावती, जयललिता, करूणानिधी सगळेच. मनमोहन सिंग यांच्यावर बाकी कितीही (काहीच्याकाहीसुद्धा) आरोप होत असले तरीही त्यांच्यावर प्रादेशिक मर्यादा किंवा जातीयतावाद असे आरोप झालेले दिसत नाहीत. (आरोप झालेले नाहीत ही नव्हे, त्याचा संदर्भ) ही गोष्ट थोडी चिंता करण्यासारखी वाटते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.