हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा गटाविषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.
असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे अनेकदा मानले जातात आणि म्हणून ते जाहीर सांगण्यावर निर्बंध असतात. बहुतेक प्रसारमाध्यमांच्या आणि आंतरजालावरच्या संकेतस्थळांच्या धोरणांतच असा उल्लेख केलेला असतो. आणि तरीही असे विनोद अस्तित्वात रहातातच. इमेल, एस.एम.एस., मौखिक प्रसार अशा विविध स्वरुपात ते जिवंत रहातात. ते जनसंस्कृतीचा (पॉप्युलर कल्चर) एक सच्चा (आणि इरसाल) अविष्कार असतात. म्हणूनच त्यांचं अस्तित्व मुळापासून नष्ट करणं अशक्यप्राय असतं. आणि तरीही, (अगदी इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारेसुद्धा) अनेक लोक अशा विनोदांच्या अभिव्यक्तीत अडथळे आणताना दिसतात. विनोदाचं लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती किंवा समूहांवर विनोदांतून एक प्रकारे हल्लाच केला जातो असं मानणारे हे लोक असतात.
पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक किंवा राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात.
पण म्हणजे विनोद हे अगदी बिनमहत्त्वाचे असतात का? तर अगदी तसंही म्हणता येणार नाही. तो लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांविषयी बनवलेला असा म्हणजेच एक निर्मम लोकशाहीवादी अविष्कार असतो. शब्दांशी आणि संकल्पनांशी खेळण्याचं लोकांना उपलब्ध असं ते एक साधंसोपं खेळणं आहे. आपल्याकडे गोष्टी सांगण्याची एक फार मोठी मौखिक परंपरा पूर्वीपासून होती. आजच्या डेली सोपच्या गदारोळात ती जवळपास नष्ट झालेली आहे. पण तरीही ही विनोद पसरवण्याची परंपरा मात्र अजूनही चांगलीच जिवंत आहे. किंबहुना आधुनिक तंत्रज्ञान तिला पोषकच ठरलेलं आहे. जगाच्या एका कोपऱ्यात (उदा : इजिप्त किंवा पुणे) चाललेल्या राजकीय घडामोडींबद्दलचा एखादा विनोद जगाच्या दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यात (उदा : सिंगापूर) बसलेला कुणीतरी जगाच्या तिसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या (उदा : डीसी) कुणालातरी पाठवतो, आणि मग फेसबुक, इमेल वगैरेंद्वारे तो असाच पुढे पसरत जातो. विनोदांमधून मिळणाऱ्या आनंदामुळे हे सर्व होऊ शकतं. थोडक्यात, विनोद तितकाही बिनमहत्त्वाचा नसतो.
पण तरीही, शब्दांचा वापर करणाऱ्या साधनांचा विचार केला असता खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो. हजरजबाबीपणा किंवा विनोद हे त्या मानानं शस्त्र म्हणून कमी प्रभावी आहेत.
पण मग विनोदांमुळे लोक इतके का चिडतात? आणि त्यांना सेन्सॉर करण्यात इतकी उर्जा आणि वेळ का घालवतात? हुकुमशाही राजवटींत किंवा दमनशाही राजवटींत कुजबुजलेला एखादा विनोदसुद्धा तुमच्या छळाचं कारण का ठरू शकतो?
ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांच्या आणि पर्यायानं लोकांच्या अभिव्यक्तीच्या दोऱ्या असतात, अशांना अर्थात विनोदाचे बळी व्हावं लागतं, कारण ज्या सामाजिक वातावरणात विनोद फोफावतो असं वातावरण बनू देणं न देणं त्यांच्याच हातात असतं. उदा. शीतयुद्धाच्या काळातला हा विनोद पाहा :
स्टालिन, क्रुश्चेव आणि ब्रेझ्नेव एकदा आगगाडीनं जात असतात. गाडी अचानक थांबते. स्टालिन म्हणतो, “मी गाडीची हालहवाल बघतो.” तो खाली उतरतो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला गोळी घालायचा आदेश देऊन आलोय.” पण काहीच होत नाही. मग क्रुश्चेव जातो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला रि-हॅबिलीटेट करून आलोय.” तरीही काहीच होत नाही. मग ब्रेझ्नेव उभा राहतो. खिडक्यांवरचे काळे पडदे तो ओढून घेतो. डबा पूर्ण अंधारात जातो. “पाहा,” तो म्हणतो, “गाडी चालू झाली आहे.”
(टीप : या तीन नेत्यांच्या कम्युनिस्ट राजवटी ज्यांनी भोगल्या किंवा दुरून पाहिल्या आहेत त्यांना या विनोदाची धार लक्षात येईल. बाकीच्यांना त्या काळाची किमान माहिती असावी लागेल (उदा : http://en.wikipedia.org/wiki/Rehabilitation_%28Soviet%29 हे पहा). नाहीतर, हेटाळणी करायला लायक वाटणाऱ्या आपापल्या फेवरिट संवादस्थळांवरच्या वेगवेगळ्या व्हिलनना इथं कल्पून, आणि गोळ्या घालण्याऐवजी प्रतिसाद उडवणं, सदस्याची हकालपट्टी करणं वगैरे कल्पना करून थोडी मजा घेता येईल.)
किंवा हे पाहा :
कम्युनिस्ट पार्टी मुख्यालयातून फोन येतो: “काय? या वर्षी पीकपाणी कसं काय आहे?”
शेतकरी: “उत्तम आहे साहेब. बटाटे इतके आले आहेत की त्यांची एकच रास रचली तर ती पार देवाच्या पायांपाशी पोहोचेल.”
पार्टी मुख्यालय: “पण देव तर अस्तित्वातच नाही.”
शेतकरी: “मग बटाटे तरी कुठे आहेत, साहेब?”
हे विनोद सार्वजानिक ठिकाणी सांगतासुद्धा येत नसत. मग ते छापील साहित्यात सापडणं तर अशक्यच होतं. आणि तरीही ते सगळ्यांना माहीत असायचे आणि हिरीरीनं एकमेकांना सांगितले जायचे. अगदी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हे माहीत असूनही.
आणि तरीही प्रत्यक्षात सोव्हिएत साम्राज्य कोसळून पाडण्यात या विनोदांचा हातभार शून्य होता. साम्राज्य कोसळण्याच्या पहिल्या दहा कारणांमध्ये कुणीही या विनोदांचा समावेश करणार नाही. विनोद सांगणं हा काही विद्रोह नव्हता. साम्राज्यात सर्वत्र पसरलेल्या परात्मभावाचा (एलिअनेशन) मात्र ते आरसा होते. ते सांगण्यात मजा होती. ते प्रतिबंधित होते यामुळे ती मजा अधिक होती. बाकीच्या कंटाळवाण्या वातावरणात सामान्य माणसाचा तो एक विरंगुळा होता. प्रचंड सत्ता थोड्याच लोकांच्या हातात असण्याच्या परिस्थितीत जनसामान्यांसाठीची ती एक मौज होती. मौजमजेच्या इतर साधनांप्रमाणेच यातही असलेला धोका हा त्या मौजेत भर घालत असे.
लोकांचे विचार किंवा भावना यांवर जेव्हा पोलिसी कारवाईचा बडगा असतो, तेव्हा विनोद सांगणाऱ्यांना अधिक चेव येतो. किंवा अगदी बौद्धिक, सांस्कृतिक उच्चभ्रूपणाच्या बेगडी वातावरणातही जो दंभ असतो, तो देखील अशा चेव येण्यासाठीचं पुरेसं कारण असू शकतो. उदा: कम्युनिस्ट राजवटीत आस्तिकांच्या मूर्खपणाविषयी विनोद करायला परवानगी असे आणि हा एक उच्चभ्रूपणा आहे असा त्यात अंतर्भूत दंभ असे.
ज्या भावना किंवा विचार अधिकृत (state sponsored) असत ते तुमच्यावर सतत आदळत असत. त्यांच्या या कर्णकर्कश साखळदंडांपासून तात्पुरती सुटका मिळवण्याचा विनोद हा एक मार्ग होता.
पण अगदी प्रगल्भ लोकशाहीसुद्धा अशा दमनप्रक्रियेतून मुक्त असेलच असं नाही. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन विद्यापीठात घडलेली गोष्ट आहे. ‘गे प्राईड’ दरम्यान एका विद्यार्थ्यानं गंमत म्हणून एक भित्तिचित्र विद्यापीठात डकवलं. त्यावर ‘पशुगमन प्राईड आठवडा’ ('Bestiality Pride Week') असं लिहिलं होतं. समलिंगी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्या मुलाची विद्यापीठातून हकालपट्टी झाली. आता गंमत म्हणजे ‘गे प्राईड’ दरम्यान निघणाऱ्या परेडमध्ये पुष्कळ विनोदी गोष्टी घडत असतात. उदा: ननच्या पोशाखातले पुरुष स्वत:ला ‘Sisters of Perpetual Indulgence’ म्हणवून घेत परेडमध्ये सहभागी होतात. किंवा S&Mची आवड असणाऱ्या लेस्बिअन्स ‘काळं-निळं सुंदर असतं’ अशा घोषवाक्यासहित त्यात सहभागी होतात. ('ब्लॅक इज ब्यूटिफुल' या वंशभेदविरोधी घोषवाक्यावरची ही कोटी आहे.) आता ज्या संस्कृतीत या गोष्टींची चेष्टा होते तीत या विद्यार्थ्याला होमोफोबिक म्हणून हाकलून देणं ही एक प्रकारची गळचेपी आहे. थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते.
ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांचं नियंत्रण असतं ते नेहमीच विनोदांच्या तथाकथित ताकदीबद्दल नको तितके गैरसमज बाळगून असतात आणि समाजाच्या नैतिकतेचे आपणच तारणहार असल्याचा उगाचच गैरसमज करून असतात. उदा : १९४८मध्ये बी.बी.सी. मध्ये खालील विषयांवरच्या विनोदांना बंदी होती: मुताऱ्या, स्त्रैण पुरुष, अंजीर-पानं (Fig-leaves), स्त्रियांची अंतर्वस्त्रं...
तर १९४९मध्ये या यादीत समाविष्ट झालेले विषय पाहा: रंगांचा संदर्भ (पिवळा, निगर, काळा), भारतीय योगी (पण फकीराबद्दलचे विनोद चालतील!)
इतकंच काय, काही काळ ‘काळा बाजार’ या विषयावरसुद्धा विनोद करता येत नसे (काय करता, रंग पडला नं!). दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्शल गोअरिंगच्या लठ्ठपणावर विनोद केलेला चालेल का, यावर बी.बी.सी. मध्ये गरमागरम चर्चा झाल्या होत्या!
एकंदरीत, ज्यांच्यापाशी अभिव्यक्ती सेन्सॉर करण्याची सत्ता असते ते आपली नैतिकता हीच समाजाची नैतिकता आहे असा दिखावा करत ती इतरांवर लादतात, तर त्या निर्बंधांना न जुमानणारे किंवा अधिकृत नैतिकतेहून वेगळी नैतिकता असणारे आपल्याला उपलब्ध फटींतून त्या लादलेल्या नैतिकतेवर विनोद करत राहतात, आणि अर्थात संपादित होण्याचा धोका (किंवा जुलमी राजवटींत जिवाचाही धोका) पत्करतात. ज्यांच्यापाशी सत्ता असते त्यांचे विनोद जर इतरांना दुखावत असतील तर त्याची फिकीर सत्ताधारी कधीच करत नाहीत. उलट त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात. आपण प्रच्छन्न सत्ता उपभोगतो आहोत हे या सत्ताधाऱ्यांना कधीच मान्य होत नाही. अनिर्बंध हुकुमशाहीचं ते एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. मग कधीतरी याचा कडेलोट होतो आणि लोक म्हणतात, ‘आता बास! आम्हाला जे विनोद करायचे आहेत ते आम्ही करणारच. मग ते तुम्हाला आवडोत न आवडोत, आम्हाला त्याची पर्वा नाही. आमचे मार्ग आम्ही शोधून काढू! गर्जा जयजयकार विनोदाचा आणि विनोद करायच्या हक्काचा!!!’
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
<< हुकूमशहांना विनोदाचं वावडं
<< हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं? >>
माझ्या मते ज्यांना विनोदाचं वावडं असतं ते हुकूमशहा होण्याची जास्त शक्यता असते इतकंच!
हुकूमशहा होण्यासाठी ते अत्यंत गरजेचं असतं कारण विनोद कळला तर स्वतःच्या मनमानीतला अंतर्विरोध आणि असंवेदनशीलताही कळेलच की. त्यातले काहीही कळू नये म्हणून 'विनोद न कळणे' ही एक रक्षणव्यवस्था (? defense mechanism) असते.
***
अब्द शब्द
आपल्याकडे मुस्लिमांबद्दल
आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.
हे वाक्य “आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी फारसे विनोद ऐकू येत नाहीत.” असे असावे असे वाटते. आणि वरील वाक्य हिंदू आणि मुस्लीम vice versa ही चालेल.
अवांतर
परवाच चेपुवर ‘विनोद किंवा तत्सम निरोप जातात म्हणून SMS वर बंदी घातली गेली तर आम्ही भरणाऱ्या करातून बरेचसे घोटाळे होतात म्हणून काही काळासाठी आम्ही कर भरायचे सोडून देऊ का?’ अशा आशयाचा एक विरोप्या फिरत होता. असा विचार ऐकून अंमळ मजा वाटली.
सहमत/असहमत/भर
(मूळ वाक्याशी असहमतीशी सहमत, पण एकंदरीत विधानाशी असहमत / थोडी भर घालू इच्छितो.)
कान उघडे असले, तर जरूर ऐकू येतात. मात्र, त्याकरिता कान उघडे असावे लागतात / प्रयत्नपूर्वक उघडे ठेवावे लागतात.
'प्रयत्नपूर्वक' अशासाठी, की अन्यथा, बहुधा सवयीमुळे, कानावर पडलेल्या विनोदाचा मथितार्थ xxxद्वेषात्मक आहे, याची जाणीव होतेच, असे नाही.
द प्रूफ ऑफ द पुडिंग
वर आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, वरील विधानाशी असहमत आहे.
=====
एकदा एक मुसलमान मनुष्य मरतो, नि काय गडबड होते, कोण जाणे, पण चक्क थेट स्वर्गात पोहोचतो.
आपण कोठे पोहोचलो आहोत, याची जाणीव होताच त्याच्या मनात विचार येतो: अरे, आपण तर स्वर्गात पोहोचलो आहोत. येथे दुसरा मुसलमान भेटणे दुरापास्त. आता येथे आपण एकटेच मुसलमान. संगतीला समानशील, समधर्मी असा तर कोणी भेटणे नाही. एकंदरीत यापुढचे आयुष्य खूपच कंटाळवाणे होणार!
पण मग अचानक त्याला कल्पना सुचते: अरे, दुसर्या कोठल्याही मुसलमानास (अशीच आपल्यासारखी काहीतरी गडबड झाल्याखेरीज) स्वर्गात प्रवेश मिळणे शक्य नाही, हे तर खरेच आहे. पण बाकी कोणी नाही, तरी निदान आपला प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम), तो तर पुण्यवान होता, निदान तो तरी चित्रगुप्ताच्या लेखी नक्कीच स्वर्गप्रवेशास पात्र ठरला असला पाहिजे. त्यामुळे, बाकी कोणी नाही, तरी तो तरी निश्चितच स्वर्गात भेटेल. चला, त्या निमित्ताने साक्षात प्रेषिताची भेट होईल; ही तर इष्टापत्ती मानली पाहिजे!
पण आता प्रश्न असा आला, की आजूबाजूच्या इतक्या काफ़रांच्या गर्दीत प्रेषितास शोधावयाचे नेमके कोठे, आणि कसे?
मग त्यास एक युक्ती सुचते. रस्त्यात जो कोणी भेटेल, त्यास पत्ता विचारणे.
तर रस्त्यात समोरून साक्षात ब्रह्मदेव येताना दिसतात. "मला प्रेषितास भेटावयाचे आहे. कृपा करून पत्ता सांगता का?"
ब्रह्मदेवाचे उत्तरः "चहा घेणार काय?"
"नको, मला चहा नको. मला फक्त प्रेषितास भेटावयाचे आहे. हरकत नाही, तुम्हाला सांगायचे नसेल, तर नका सांगू; मी दुसर्या कोणास विचारेन. ख़ुदा हाफ़िज़!"
ब्रह्मदेवः "जशी मर्जी!"
थोड्या वेळाने रस्त्यात समोरून भगवान विष्णू येताना दिसतात. "माफ़ करा, पण मला प्रेषितास भेटावयाचे आहे. पत्ता सांगू शकलात, तर उपकार होतील."
"चहा घेणार काय?"
"हे पहा, मला फक्त प्रेषितास भेटावयाचे आहे. मला चहा घ्यायला वेळ नाही, आणि इच्छाही नाही. पत्ता सांगता येत नसेल, किंवा सांगायचा नसेल, तर सांगू नका, मी दुसर्या कोणालातरी विचारेन. पण कृपा करून फालतू विषयांतर करू नका. ख़ुदा हाफ़िज़!"
"ठीक आहे, बाबा, जशी मर्जी!"
मग पुढे रस्त्यात एकदा भगवान शंकर भेटतात, मग गणपतीबाप्पा भेटतात, फार कशाला, आपला विठोबाही भेटतो. दर वेळेस तीच कथा, तोच प्रश्न. "चहा घेणार काय?"
आतापर्यंत आपला कथानायक खूपच वैतागलेला असतो. फारच बुवा या लोकांना चहाचे वेड. पत्ता तर लेकाचे सांगत नाहीत! आता काय करावे बरे?
तेवढ्यात समोरून नारदमुनी येताना दिसतात. "नारायण, नारायण!"
पुन्हा तीच पृच्छा होते. पुन्हा तोच प्रतिप्रश्न: "चहा घेणार काय?"
"बरे बाबा, घेतो चहा! पण मला पत्ता सांगितलात, तर फार उपकार होतील!"
"चला, आधी चहा तर घेऊ या!"
जातात. "अमृततुल्य"वर जाऊन पोहोचतात, नि समोरच्या बाकड्यावर जाऊन बसतात. समोरून "अमृततुल्य"चा पोर्या, डाव्या हातात पाण्याचे पाच भरलेले ग्लास (त्याच्या नेहमीच्या पद्धतीने पाचही ग्लासांत प्रत्येकी एक अशी बोटे बुचकळून) नि उजव्या हातात शेजारच्या बाकड्यावरच्या आर्डरीच्या चहाचे तीन कप, अशा अवस्थेत येताना दिसतो, त्यास उद्देशून नारदमुनी हाक देतात:
"ए म्हमद्या! दोन चहा आण रे!"
=====
वरील किस्सा फारा वर्षांपूर्वी एकदा उपरनिर्दिष्ट वर्णनाशी मिळत्याजुळत्या एका भूतपूर्व सह-नारायणपेठीकडून ऐकला होता, हे येथे अत्यंत नम्रपणे नमूद करू इच्छितो.
एक शंका
नुकताच येथे, याच संस्थळावर*, "ह्या कन्नडी**गांना आलाय माज" या शीर्षकाखाली एका विशिष्ट गटाविरुद्ध एक मोठा विनोद*** सादर करण्यात आला. आपल्या वरील विधानाच्या प्रकाशात, प्रस्तुत विनोद हा प्रस्तुत गटाविषयी प्रस्तुत सादरकर्त्याच्या मनात असलेल्या रागाचे द्योतक असावे किंवा नसावे, याविषयी काहीच अंदाज बांधू शकलो नाही.
कृपया मार्गदर्शन व्हावे.
==========================================
* इतरही संस्थळांवर सादर करण्यात आला, असे खात्रीलायकरीत्या कळते, परंतु त्याबद्दल आपल्याला (पक्षी: आम्हांस व आपणांस) काही घेणेदेणे असण्याचे काही कारण सकृद्दर्शनी तरी दिसत नाही. तसाही येथे तो मुद्दा नाही.
** प्रकाशित मसुद्याबरहुकुम.
*** प्रस्तुत विनोद हा नीट जमलेला नाही****, *****, असा आमचा अभिप्राय या निमित्ताने येथे नमूद करू इच्छितो.
**** ज्याअर्थी प्रस्तुत विनोद हा विनोद आहे, हे आम्हांस प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले नाही, त्याअर्थी प्रस्तुत विनोद हा नीट जमलेला नसावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. नसल्यास चूभूद्याघ्या.
***** तसेही, नीट न जमलेले विनोद हे काही गुरुजनांचे राखीव कुरण आहे, असा एक मतप्रवाह खाजगीत ऐकून आहे. सबब, प्रस्तुत विनोदाचे सादरीकरण हे बहुधा 'हक्कभंग' या सदराखाली मोडणारे मर्यादांचे उल्लंघन ठरावे, या बाबीकडे निर्देश करण्याचे पातक पत्करू इच्छितो. संबंधित अधिकारी कृपया यात लक्ष घालून योग्य तो सोक्षमोक्ष लावतील काय?
==========================================
"या 'न'व्या बाजूस आलाय माज!"
अत्र्यांच्या शब्दांत...
"दावू गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे..."
(थोडक्यात, किंवा सर्वांस समजण्यासारख्या शब्दांत: "शिळ्या कढीस ऊत".)
किती प्रुफे तपासाल?
याच संदर्भात, थोडे आणखीही प्रूफरीडिंग कराच म्हणतो. (अशाच एका गोटातून ऐकलेला आणखी एक किस्सा.)
===
एकदा एक सरदारजी नदीच्या काठी उभे राहून मोठमोठ्याने ओरडत असतात. "या अल्लाह, मेरे पाँच पैसे पानी में गिर गये हैं! या अल्लाह, मेरे पाँच पैसे मुझे वापस मिलवा दो!"
येणाराजाणारांस अचंबा होतो. पण विचारावयाचे कसे?
शेवटी त्यांपैकी एक जण मनाचा हिय्या करून सरदारजींना हटकतोच. "सरदारजी, ग़ुस्सा नहीं मानोगे तो एक बात पूछूं?"
"हाँ, हाँ, पूछो!"
"सरदारजी, आप सिक्ख हैं ना?"
"हाँ, बिल्कुल!"
"तो फिर आप अल्लाह को क्यों पुकार रहे हैं?"
"तो फिर पाँच पैसों के लिए क्या वाहेगुरू को पुकारूं?"
===
आपल्या विधानाच्या खंडनार्थ इतके पुरावे पुरेसे नाहीत काय? (किती प्रुफे तपासाल?)
असाच एक विनोद
असाच विनोद ऐकला आहे फक्त तेथे पैशाऐवजी सरदारजीची पिशवी गटारीत पडते एवढा बदल होता.
असो एक मुसलमान व्यक्ती प्रार्थना करत असते
या अल्ला, बिसिमिल्ला,
बाजूने जाणारा हावरट हिंदू माणूस चकित होऊन म्हणतो.
ओके, दस तुल्ला, दस मल्ला.
न वी बाजू प्रत्येक 'न'वी वाजू
न वी बाजू प्रत्येक 'न'वी बाजू उलगडणार वाट्टे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुस्लिमांविषयी विनोद
सहमत. सरदारजींचे विनोद सांगणं हा भारतातला एक राष्ट्रीय विरंगुळा आहे असं म्हणता येतं. तद्वत महाराष्ट्राचा 'राष्ट्रीय विरंगुळा' म्हणता येतील असे विनोद कोणते असतील? पुणेकरांविषयीचे किंवा पुणेरीपणाविषयीचे विनोद त्या स्पर्धेत असतील असं वाटतं. खुद्द पुण्यात तर ते नक्कीच 'राष्ट्रीय विरंगुळा'* म्हणता येतील. आता थोडं खोदून पाहिलं तर हे लक्षात येईल की 'पुणेरी'पणाचा दावा करणारे अनेक पुणेकर असले तरीही मुळातून ती एका विशिष्ट पोटजातीची तथाकथित वैशिष्ट्यं आहेत. आणि ती पोटजात एकेकाळी पुण्यात सत्ताधारी होती. त्यामुळे राष्ट्रीय विरंगुळ्याच्या स्थानावर हे पुणेरीपणाचे विनोद का विराजमान असतील आणि मुसलमानांविषयीचे विनोद (काही प्रमाणात अस्तित्वात असून आणि मुसलमानांविषयी राग/द्वेष अस्तित्वात असून) ते स्थान का घेऊ शकले नाहीत याचा अंदाज बांधता यावा.
* - पुण्यातल्या सर्वच गोष्टी राष्ट्रीय, किंबहुना आंतरराष्ट्रीयच असतात, अशी एक खोचक विनोदी वदंता माझ्या ऐकण्यात आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
विनोद आहे ना
मुसलमान गेला *वण्यात
आणि
ब्राह्मण गेला खाण्यात
उपहास
लेख उत्तम आहे.
कुठेसं वाचलं होतं - राजकीय विनोद सामान्यांना नेत्याकडे सामान्य माणूस म्हणून बघायला शिकवतो, व त्यामुळे सामान्य माणूस नेत्यांची सामान्यपणे/वास्तविक पारख करु शकतो, हेच(सामान्यत्व) हुकूमशहांना नको असतं म्हणूनच ते सत्तेत असले की विनोदविरांच मरण ओढवतं.
राजकीय उपहास हा सामाजिक ताण कमी करतो म्हणून तो टोकाच्या भुमिका घेण्यापासून काही काळ परावृत्त करु शकतो, पण उपहास प्रत्यक्ष कृतीलाच प्रोत्साहन देतो की काय ह्या काळजीपोटी सम्राटांना ह्या उपहासाला चेचावं लागतं. उपहास हा प्रस्थापितांविरुद्ध कराव्या वाटणार्या हिंसेला पर्याय म्हणून केला जातो ही शक्यता हुकूमशहाला काळजीत टाकण्यास पुरेशी आहे असं वाटतं.
इतिहासात उपहासामुळे उलथपालथ झाल्याची उदाहरणे विरळ आहेत,एरवी राजकारणाविषयी उदास असलेल्या सामान्यांचा एक राजकीय परिप्रेक्ष्य तयार करण्यास हे विनोद मदत करतात हे त्याचं यश आहे. मायकेल मूरने जॉर्ज बुश विरोधात उपहासपुर्ण डॉक्युमेंटरी काढली, त्याच्यामुळे चिडून रिपब्लिकनस् मोठ्या प्रमाणात प्रचाराला उतरले व फायदा जॉर्ज बुशलाच झाला(असं बोललं जातं), पण ह्याच मायकेल मूरमुळे निदान अनेक सामान्य डेमोक्रॅट्स राजकीय-साक्षर झाले व मतदान करू लागले असंही सांगितलं जातं.
उपहास किती व कसा असावा ह्याबद्दल अनेक मतं असली तरी अभिव्यक्ती-स्वातंत्र्य मान्य केल्यास ते कसंही असू शकतं हेच मान्य करावं लागेल. उपहासाच्या पातळी(असिम त्रिवेदीची कार्टून्स) बद्दल मतं असू शकतील, पण पातळीची निरपेक्षता ठरवणं अवघड आहे.
पराभूतांचे वाङमय
विनोद हे पराभूतांचं वाङमय* असतं. जेव्हा कृती करणं अशक्य असतं (किंवा प्रत्यक्ष कृतीचा मार्ग खडतर असतो आणि तो अवलंबण्याची तयारी नसते) तेव्हा विनोदाचा आधार घेतला जातो. विनोदाच्या माध्यमातून पराभूत स्वतःच्या इगोवर फुंकर घालत असतात.
नास्तिकवादी श्रद्धाळूंबद्दल विनोद करताना/त्यांच्या मूर्खपणाचे किस्से सांगताना आढळतील. श्रद्धाळू नास्तिकांबद्दल विनोद सांगताना आढळणार नाहीत. जगरहाटीत नास्तिक हे नेहमीच पराभूत असतात आणि श्रद्धाळू विजयी. आपण श्रद्धेचा प्रभाव कमी करू शकत नाही असे नास्तिकांना दिसत असते; ठाऊक असते.
*पराभूतांच्या अनेक प्रकारच्या वाङमयापैकी विनोद हे एक असतं.
(अवांतर: बिरबलाच्या गोष्टी हे पराभूतांचे वाङमय असावे का?)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
निष्कर्ष
या विधानातून "जेत्यांना विनोदबुद्धी नसते"* असा निष्कर्ष तर्काने (बहुधा) काढता यावा. मात्र, तो सकृद्दर्शनी पटण्यासारखा वाटण्यासारखा कोणताही विदा चटकन नजरेत येत नाही.
===
*'क्यों कि साँस भी कभी बहू थी'सारखा काही मामला असल्याखेरीज.
जेत्यांना विनोदाचा आधार
जेत्यांना विनोदाचा आधार घ्यायची गरज नसते असं काहीसं म्हणणं आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शंका
मग जेते करमणुकीसाठी नेमके काय करतात?
पराभूतांचे विनोद करमणुकीसाठी
पराभूतांचे विनोद करमणुकीसाठी नसतात, तिरस्कार व्यक्त करायला असतात असं वाटतं.
"अंतु बर्वा" जे बोलतो ते अंतु बर्व्यासाठी विनोदी नसते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तरीही...
हा एक विदाबिंदू* झाला. पण विनोदाचा हा केवळ एकच प्रकार अस्तित्वात असतो काय? "पराभूताचा विनोद" असा? विनोद हा केवळ तिरस्कार/निषेध व्यक्त करण्यासाठीच, आणि पराभूताच्या मानसिकतेतूनच केला जाऊ शकतो अथवा जातो काय?
नाही म्हणजे, "विनोद हे पराभूतांचं वाङमय असतं" वगैरे सरसकट विधान केलेत, म्हणून विचारले.
===
* शब्द बरोबर वापरला ना?
विदाबिंदू इतके साकल्याने
विदाबिंदू इतके साकल्याने केलेले मराठीकरण पाहून नेत्रीं अश्रुबिंदू जमा जाहले ह. घ्या. हेवेसांनल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इदं न मम
शब्द वापरलेला पाहिलेला आहे. व्होगात असावा अशी शंका आहे, सबब स्वतःही वापरून पाहण्याची हुक्की आली. ('महाजनो येन गतः' वगैरे.) फक्त, बरोबर वापरला की नाही याची खात्री करून घेण्याकरिता पृच्छा केली, इतकेच.
इत्यलम्|
कोणते विनोद
हुकुमशहांना विनोदाचं वावडं असतं या 'सरसकट' विधानांतर्गत जे विनोद अभिप्रेत आहेत त्या विनोदांचं सरसकटीकरण पराभूतांचं वाङमय असं (मी) केलं आहे.
अन्यथा संताबंताच्या विनोदांचं किंवा हत्ती-मुंगीच्या विनोदांचं हुकूमशहांना वावडं नसतं (असं वाटतं).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नमोभक्त अजूनही विनोदाचा आधार
नमोभक्त अजूनही विनोदाचा आधार घेतात.
आपण जिंकलो आहोत हे समजलं नसावं किंवा अंगात मुरलं नसावं. (किंवा अंतिम ध्येय गाठलं जाईपर्यंत......)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मस्त
पुन्हा वाचला.
पुन्हा आवडला.
वाचनखूण.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
विनी द पूह
लोकसत्तातला हा अग्रलेख वाचून पुन्हा या लेखाची आठवण झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
क्यूटनेस अलर्ट ;-)
जिनपिंग आणि विनीची चित्रं इथे पाहता येतील. क्यूटनेस अलर्ट
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ताईंची आणि तुमची लिंक एकच आहे
ताईंची आणि तुमची लिंक एकच आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हुकुमशहा
हुकुमशहांना विनोदाची चांगलीच जाण असते. म्हणूनच, त्यांना ते बोचतात. फारतर, त्यांच्याकडे खिलाडुवृत्ती नसते, असे म्हणता येईल.
मागे, मी एकदा, आमच्या नातेवाईकांतल्या एका हुकुमशहाला, " सणाच्या दिवशीच तुमचा उपास का असतो ?" असे विचारल्यावर तो भडकला होता.