दुसर्या एका डायरीतले दुसरे एक पान.
आज जेवणे जरा उशीरानेच झाली. आमच्या ह्यांना पोटात जरा गॅसेस झाल्यासारखे वाटत होते. जेवणाच्या सुटीत आले तरी लवकर पाटावर बसण्याचे काही होत नव्हते. दिवाणखाण्यात त्यांना छोटीकरवी निरोप पाठवला होता लवकर पाटावर या म्हणुन. नेमके हे असे होते. दुपारच्यावेळी सासरे, दीर, तिकडची स्वारी सगळे झी न्युज पहात बसतात आणी मग असा उशीर होतच रहातो. आपण मेहनतीने भजी बनवावी आणि ती गरम गरम ताटात जातील असे पहावे तर ह्यांचे असे. कालची उसळ बाधली असावी त्यामुळेच झाले असेल किंवा मग सकाळी केलेले दडपे पोहेही असतील. पण सकाळचे दडपे पोहे बाधायचेच असतील तर संध्याकाळ तरी लागेल. त्यामुळे ही उसळच... असे मला तरी वाटते. तरी म्हटलं होत उसळीत खोबरे नका घालु म्हणुन पण ह्या घरात माझे कुणी ऐकेल तर शपथं. धाकल्या जाउबाई कोकणस्थ आहेत. येताजाता नारळ शोधीत असतात. आता आमच्याकडे नारळ असा रोज रोज कुठनं असायला? शिवाय त्याची गरज तरी काय? काहीतरी गुळमट बनवुन खाउ घालावेसे वाटतेय धाकलीला. तरी मी म्हटलं. ह्या घरच्या रीती जरा वेगळ्या गो बाई पण ऐकेल तर शपथ. त्यात एच आर की काहीश्या विषयात एमबीए केले आहे. ती म्हणते लोकांकडुन कामे कशी करुन घेतात ते शिकली आहे ती. छान छान. म्हणजे ही धाकली पण तरी आमच्याकडुन काम करुन घेणार कारण तिने शिक्षण तसे घेतले आहे. एच आर केलेय की डोक्यावर मिरे वाटण्याचा रितसर अभ्यासच करुन आलीये कुणास ठाउक बया.
हीची आई पण कुठे कामाला होती म्हणे. जॉब करायची. कुणितरी विचारले की शिक्षिका होती का म्हणुन तर म्हणे नाही कॉर्पोरेट्मध्ये होती. आता जिची आई कॉर्पोरेशनमध्ये तिच्या मुली अशाच निपजायच्या. गेल्या माघीला रांगोळी टाक म्हणुन सांगितले तर विचारते आठ बाय आठची काढु की सोळाची. सुरवातीला मला काही कळेचना. मग कळाले की ती ठिपक्यांविषयी म्हणतेय ते. इतकी मोठी होउन आजही रांगोळी काढण्यासाठी ठिपके लागतात म्हणजे कमालच म्हणायची. बर काढ बाई ठिपक्यांची तर ठिपक्यांची तर ती काढायला हिला दिड तास लागतो. जे काही काढले ते पहायला गेले तर चार मसाल्याचे डबे चार बाजुला तिरके मांडुन ठेवलेय असे काहीतरी. हे मलाच वाटत असावे असे वाटतेय तोवर तीच म्हणते की ही डब्याची रांगोळी आहे म्हणुन. कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ आणली झालं. पुन्हा कुंकु टाकायचं राह्यलं ते राह्यलचं. रांगोळीला नाही आणि स्वतःलाही नाही. टिकली मीही लावते पण तिच्यावर थोडं कुंकु लावले तर काय बिघडते. त्यालाही नको म्हणते. तिच्या टिकलीचा आकार असा की भजी तळतांना तेलात उगीच कांद्याचे पापुद्रे उरावेत असे काहीतरी.
जेवणे व्यवस्थीत झाली आणि स्वारी पुन्हा कामावर गेली. सासरे आज अर्थनितीवर चर्चा करायला म्हणुन पेठेत कुणाकडेतरी गेले. तिकडुन ते कुणाचे तरी बौद्धीक ऐकायला जाणार आहेत. आगोदर तर सांगावे ना? घाईघाईने डब्यात पोह्यांचा चिवडा आणि कागदी लिंबं भरुन दिले. आता तिथे कुणाकुणाचे डबे येणार आणि त्यात काय काय निघणार कुणास ठाउक. जातांना सासरेबुवा जरा चिंतीत दिसत होते. म्हणाले जीडीपी कमी होतो आहे. मी म्हणाले होईल हो जास्त त्यात काय एवढे मनाला लाउन घेण्यासारखे. बीपी कंट्रोलमध्ये आहे, जीडीपी पण होईल त्यावर आश्वासक हसले. मामंजीचे घरातले हक्काचे काय ते मी एकच माणुस असावे. सासुबाईंना चिडचिड होते म्हणुन नामस्मरण सांगितले आहे तर त्या सध्या त्यातच मग्न असतात. मी पुजेचं सगळं करुन देते. मागच्या अंगणात फुलझाडे लावली आहेत त्यामुळे फुलांचीही तशी काही ददात नाही पण तिथेही आमच्या कोकणस्थ राजकुमारी एक नारळ आणुन लावायचे म्हणतात. मी म्हणाले लाव लाव बाई, एक चांगला नारळ लाव तुझ्या माहेराहुन आणुन, हवे तर फणसही लाव.
फणस लावण्याहुन आठवले. फेसबुकवर कुणीतरी विचित्र माणुस आहे. तो पुरोगामी असावा असे मला वाटत होते पण जोशीबाई म्हणतात तो डावा आहे. डावखुरे लोक तसे अशुभचं म्हणावे. माझी एक मावसबहिण डावखुरी होती. चौथा गुरु आणि कुंभ लग्न. गुरुजी म्हणाले त्रासदायकच आहे. तेंव्हा एक मोठी शांती करावी लागली आणि मग दरवर्षी तिच्या वाढदिवसाच्याच तिथीला कुठलीशी पुजा. दहा एक वर्षे व्यवस्थीत चालले मग ती पुन्हा डाव्या हातानेच काम करायला लागली. काहीच घटेना तसे गुरुजींनी आता तिच्या विवाहाच्या वेळी काही संकेत सांगितले आहेत. मागच्या वाढदिवसाला तिला तिथीनुसार वाढदिवसच लक्षात नव्हता, उपासही केला नाही आणि संध्याकाळी पुजा करायला बसली तेच हाफपँट घालुन. देवही थकला असावा कोपुन कोपुन कारण आता ती पुजाही करीत नाही, प्रसादालाही डावाच हात वर करते आणि लग्नच करायचे नाही म्हणते. तिला शिकुन अंतराळवीर व्हायचे म्हणतेय. आता अंतराळात जायचे म्हणजे विजार घालणे आले, तिला विजारीची सवय जरी असली तरी आपल्या घरच्यांना काय वाटेल त्याची तर काही लाज ठेवावी ना. माझ्या थोरल्या नणंदेची मधली मुलगी डावखुरी होउ पहात होती, तिला नणंदेने हाताला चटकाच दिला. वाईट वाटण्यासारखे आहे पण ती मुलगी रितसर उजवा हात वापरायला शिकली. डावखुरे लोक चांगले नसतातच.
माझं हे असचं होत. त्या फेसबुकवरच्या डाव्या माणसाविषयी बोलायला गेले आणि ब्रह्मांड भरकटुन आले. तर हा डावा माणुस निसर्गाविषयी कधीकधी चांगलं लिहतो असे जोशीबाई सांगत होत्या. त्याच्या टाईमलाईनवर गेले तर तिथे निसर्गाचे काही दिसेना पण काही फोटो होते. चाळत राहिले तर एका फोटोत हा बुवा एवढीशीच चड्डी नेसलेला बाकी सगळा उघडा, जानवे वैगेरे काही नाही. आडनाव फसवे, नाव फसवे, एकुणच जे काही झाले ते पाहुन शिसारी आली. मी त्याच्या काही इमेजेस फोनमध्ये सेव्ह करुन घेतल्या आणि त्याला ब्लॉक करुन टाकला. ह्याचे दुसरे काही पुरोगामी मित्र आहे त्यातल्या कुणीतरी आज अपर्णा रामतिर्थकर बाईंची चेष्टा करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तसे हे भाषण मी आगोदर पाहिले होते तेंव्हा आवडले होते पण आज परत पाहिले. त्या पुरोगामी मुलाला ह्यात काय हसण्यासारखे वाटले असावे म्हणुन जरावेळ त्याच्या नजरेने पहाण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याला का हसु येते ते समजले नाही. एखादे माणुस असे विचाराने बोलते आणि हे लोक त्यांची अशी टिंगलटवाळी करतात. ह्यातच ह्यांचे आयुष्य जाणार.
लिहता लिहता उन्हे कधी कलली कळालेच नाही. आता जाते. सासुबाईंना काढा बनवुन द्यायचा आहे, झालेच तर नारळ खोउन ठेवायचा आहे. अहं. हा नारळ माझ्याच रेसीपीचा आहे. आता अर्धा तास उरलाय तर वड्या तरी बनवुन घेते.
प्रतिक्रिया
कोल्हापुरी,मालवणी,रावजि मसाले
कोल्हापुरी,मालवणी,रावजि मसाले निघाले पण पुणेरी नाहीच.
अँटीमॅटर असतं तशा या
अँटीमॅटर असतं तशा या अँटीअनुराव आहेत का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
लै भारी
कॉर्पोरेट अन् कॉर्पोरेशनचा हमळा नाही समजला. आरेसेस पेक्षा हे पान आवल्ड
भांबड आलं
...
...
वा:! मस्तं लिहिलंय. आवडलं.
हे ठीक.
तुम्ही संघिष्टांबद्दल अधिक रसाळ लिहिता; किंवा अमेरिकेत राहून मोदकांच्या पाककृतींचे व्हिडिओ बनवणाऱ्यांबद्दल. मुळात पकाव लोकांबद्दल किती विनोदी लिहिता येणार!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अशीच
अशीच काहीशी डायरी, आणीबाणी नंतर एका संघोट्याची वाचली होती. ते सकाळ संध्याकाळ, बटाट्याची भाजी खाऊन झालेले गॅसेस, उपासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीचे जेलरने केलेले लाड इत्यादि. ते वाचून जेल मधे सगळ्या महाराष्ट्रातल्या संघोट्यांनी मजाच केली आणि वर त्यागाची बतावणी केली, असे वाटत होते.
(अवांतर)
यावरून, 'संघोट्याला बटाट्याचे निमित्त' अशी एखादी नूतन मराठी म्हण पाडता यावी काय?
वायुत्याग?
('बतावणी' बोले तो? आवाजी?)
हि माहिती रोचक आहे
हि माहिती रोचक आहे तिरसिंगराव . कुठे वाचायला मिळेल हि डायरी ?
जुने
खूप वर्षे झाली. आणीबाणी उठल्यानंतरच्या एका दिवाळी अंकात वाचलं होतं. दिवाळी अंकाचे नांव लक्षांत नाही. तेंव्हाही वाचून खूप हंसलो होतो. जेलमधे शाखाही भरवायचे, असं काय काय लिहिलं होतं!
दिवाळी अंकाचे नाव सोबत असेल.
दिवाळी अंकाचे नाव सोबत असेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वायुत्याग
एक उपशंका: आवाजी वायुत्याग करताना सूर खालून वर चढवायचा की वरुन खाली, यावर सामान्य माणसाचा कंट्रोल असतो का ? नसला तर गवयाचा तरी असतो का ?
अं...
असा कंट्रोल असणाऱ्या व्यक्तीस (स्ट्रिक्टली स्पीकिंग) 'गवई' म्हणून संबोधता येईल का? साशंक आहे.
आमच्या मते, स्ट्रिक्टली स्पीकिंग ज्याला 'गवई' म्हणून संबोधता यावे, त्याचा कंट्रोल मूलतः गळ्यावर असावा. अन्यत्रसुद्धा असल्यास तो बोनस, परंतु तसा तो असणे आवश्यक नसावे.
एका सुगृहीणीचे (तुमच्या
एका सुगृहीणीचे (तुमच्या कल्पनेतील) भावविश्व चांगले रेखाटले आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
कल्पनाच
कल्पनाच करायची तर ती साठसत्तरवर्षांपूर्वीची का करावी बरें? कल्पनायां किं दरिद्रता?
बरोबर आहे तुमचं
-- पण हे डायरीचे एकच पान आहे. (ते सुद्धा दूसरे)
पूर्ण डायरी वाचली तर कदाचित कल्पनेचे ऐश्वर्य त्यातून दिसेलसे वाटते.
ही कल्पना अधुनिक आणि पारंपरिकतेचे मिश्रण दिसतेय.
कारण फेसबूक वापरते आणि सासूबाईंना काढा पण करून देते, म्हणजे कम्माल आहे. त्यामूळे नक्की कालनिश्चिन्ति करणे अवघड आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
काढा कसा करायचा त्याची रेसिपी
काढा कसा करायचा त्याची रेसिपी यू ट्युबवरून शोधते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
का बरं?
घरात सासूबाई असताना .. बाहेर कुठे शोधायची काय गरज?
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
का बरे?
सासूबाई जर आजच्या असतील तर त्यांना काढा करता येणे माहीतच असेल असे नाही. खरे तर ज्येष्ठमध वगैरे वस्तू आजकाल लगेच मिळतही नाहीत. फक्त जवसाचे मात्र पुनरागमन झालेय ओमेगा थ्रीमुळे.
एक डाव(वा)
अलीकडे 'डावा' असे म्हणत नाहीत. 'वामपंथी' म्हणतात. आणि अश्या माणसाला संबोधताना 'वामोपन्त' असे म्हणतात.
येक डाव नवी वोक्याबुलरी समजून घ्या बुवा.
साबण कमी लागावा म्हणून
साबण कमी लागावा म्हणून काटकसरी योजना होत्या साठसत्तर वर्षांपुर्वी. म्हणजे दोनदाच फिरवायचा किंवा महिना संपायअगोदर संपला तर आणायचा नाहीच, शोध वगैरे. पण हाफप्यान्ट नव्हती हो.
फेसबुकवर वाचलं होतंच आधी.
फेसबुकवर वाचलं होतंच आधी. भारी आहे हे.
रामतीर्थकर बाईंची आठवण आली हे वाचतांना. त्यांनी या गृहिणीला पैकीच्या पैकी मार्क देऊन मग अक्षर वाईट काढल्याबद्दल किंवा शुद्धलेखनाबद्दल काही काही मास्तर जसा एक मार्क कापतात तसा जाऊबाईंचा द्वेष केल्याबद्दल कापला असता.