दिवाळी अंक आणि टेलिव्हिजन सिरियल्स
'दिवाळी अंक हे मराठी उच्च मध्यमवर्गीयांच्या टेलिव्हिजन सिरियल्स आहेत' अशा आशयाचं मत नुकतंच फेसबुकावर वाचण्यात आलं. तथाकथित सुसंस्कृत-गोग्गोड-खवा अभिरुचीला जोरदार धक्का, या प्रकारच्या अभिरुचीच्या केवळ संख्याबळावर चालवलेल्या मक्तेदारीला विरोध आणि काही प्रमाणात तथ्यांश - हे सगळं जमेस धरूनसुद्धा हे विधान काहीसं मानभंगकारक वाटलं.
मी एक बर्यापैकी वाचणारी व्यक्ती आहे. मात्र माझा कल साहित्य-संस्कृती-भाषा यांकडे आहे; राजकीय-आर्थिक-सामाजिक परिस्थिती आणि त्यांतले प्रवाह यांबद्दलचं माझं वाचन वृत्तपत्रीय मथळे आणि ब्रेकिंग न्यूज ओलांडून जात नाही. परिणामी माझी त्या बाबतीतली समजही यथातथाच आहे. पण या गोष्टी समजून न घेता, त्याबद्दल काहीही भूमिका न घेता आपण एका पोकळीत साहित्य-संस्कृती-भाषा यांची भातुकली मांडून सुखनैव बसू शकतो, असंही मी मानत नाही. हे सगळं माझ्या पातळीवरून समजून घेण्याची गरज मला कळते, जाणवते.
ही गरज कोण भागवतं?
काही प्रमाणात आंतरजाल भागवतं. पण इथे माहिती आणि मतं इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत, की निवडीला बराच वेळ नि कष्ट लागतात. तरीही छापील माध्यमांशी आंतरजालाची तुलना होऊ शकत नाही. पुस्तकं भागवतात. पण एक तर मराठीत या प्रकारची पुस्तकं कमी. नि ती घडामोडींच्या वेगाशी कुठल्याच प्रकारे स्पर्धा करू शकत नाहीत. काहीसा शिळा - स्टॅटिक दृष्टिकोन पुरवतात. मराठीतली वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि वाहिन्या हा अजून एक स्रोत. वाहिन्यांचं आपण सोडूनच देऊ. इतर नियतकालिकं केवळ तथ्यात्मक (याबद्दल वेगळा वाद होऊ शकतो) माहिती देतात. तत्कालीन भावना पकडू पाहतात. पण समग्र आवाका असणारा तटस्थ दृष्टिकोन पुरवू शकत नाहीत. तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. (माझं तोकडं वाचन याला कारणीभूत असू शकेल. पण मी १ इंग्रजी, दोन मराठी वृत्तपत्रं, २ मराठी साप्ताहिकं, १-१|| मराठी वृत्तवाहिनी नेमानं चाळते, याहून जास्त वेळ काढणं कठीण आहे.)
या पार्श्वभूमीवर दिवाळी अंक बरेच मोलाचे ठरतात. साहित्य, नाटकं, चित्रपट यांच्याशी संबंधित लिखाण टाळायचा प्रयत्न केला, तरीही सहज बसल्या बसल्या मला आठवणार्या परिणामकारक लेखांची यादी खालीलप्रमाणे. (लेखकांची, लेखांची नावं, दिवाळी अंकाचं नाव, प्रकाशन वर्ष तशीच्या तशी आठवणं दुरापास्त आहे. चूकभूल देणेघेणे. शिवाय ही यादी सर्वसमावेशक नाही.)
१. शिवसेनेच्या उदयाची पार्श्वभूमी, तिची वाटचाल आणि भविष्याचा वेध घेणारा 'अक्षर'मधला राजू परूळेकर यांचा लेख
२. 'झुंडीचे मानसशास्त्र' या विषयावरच्या विश्वास पाटील यांच्या आगामी ग्रंथातला 'कदंब'मध्ये प्रकाशित केलेला काही भाग
३. 'लैंगिकता आणि सर्वसामान्य स्त्रीपुरुषांची मानसिकता' या विषयावरचा 'आजचा चार्वाक'मधला लेख
४. 'रस्ते आणि समाजाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन' यांच्यातला परस्परसंबंध शोधणारा 'साधना'मधला लेख
५. मराठी मध्यमवर्गीय मुलं ज्या शाळेत जातात तिथलं वातावरण आणि त्याचा जडणघडणीवर होणारा परिणाम यांवर स्वानुभवाधारे प्रकाश टाकणारा सचिन कुंडलकर यांचा 'लोकसत्ता'मधला लेख
६. 'इन्स्टॉलेशन' या कलाप्रकाराबद्दल आणि त्यात काम करणार्या मोनाली मेहेरबद्दल माहिती देणारी शर्मिला फडके यांनी घेतलेली 'चिन्ह'मधली मुलाखत
७. बिहार, ईशान्य भारत या ठिकाणी भटकंती करून लिहिलेली, रूढार्थानं 'लोकप्रिय प्रवासवर्णन' या सदरात न मोडणारी 'साधना'मधली राजा शिरगुप्पे यांची प्रवासवर्णनं
८. चित्रकार प्रभाकर कोलते यांची 'चिन्ह'मधली प्रदीर्घ मुलाखत
९. 'हिंसा आणि मी' हा तेंडुलकरांचा 'अक्षर'मधला लेख
१०. मटाच्या तीन निरनिराळ्या संपादकांच्या कारकिर्दीत झालेली स्थित्यंतरं दाखवणारा 'अक्षर'मधला प्रकाश अकोलकर यांचा लेख
इतक्या वेगवेगळ्या विषयांवर, इतकं(तरी) खोल काही देऊ करणारं दुसरं कुठलं माध्यम उपलब्ध नसताना, दिवाळी अंकांना उगीच का झोडावं? कदाचित वरची ती प्रतिक्रिया निव्वळ एक धक्का म्हणून व्यक्त केलेली असेल. तसं असेल तर ठीकच आहे. त्याचा योग्य त्या गटांवर योग्य तो परिणाम होवो, अशी शुभेच्छा. पण अन्यथा ती दिवाळी अंकांवर अन्याय करणारी आहे असं मला वाटतं.
जनतेचं काय मत?
रोचक विषय
रोचक चर्चाविषय. वेळ मिळताच याबद्दलचं मत सविस्तर लिहितो.
तुर्तास एक गंमत जाणवली ती नोंदवतो: की 'टेलिव्हिजन सिरियल्स' या हीन प्रतीचे मापदंड म्हणून वापरल्या जाऊ लागल्या आहेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नुस्तं रोचक चर्चाविषय
अन मत नंतर सविस्तर लिहितो, याला ३ रोचक मानांकन पाहून बूच मारायचा मोह आवरला नाही.
(सुपारी 'धरून' स्वस्थ बसलेला) आडकित्ता
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
किती महत्त्व द्यायचं
रोचक चर्चाविषय आणि विवेचन.
माझी प्रतिक्रिया : 'दिवाळी अंक हे मराठी उच्च मध्यमवर्गीयांच्या टेलिव्हिजन सिरियल्स आहेत' या आणि अशा स्वरूपाच्या मतांना ऐकून सोडून द्यावं. कारण अशी मतं काय हो, पैशाला पासरी असतात. खालची काही वाक्यं पाहू :
"आजचे वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते."
"इंटरनेटच्या जमान्यात छापील माध्यमं म्हणजे बैलगाडीच."
"ब्लॉग लिहिले आणि इंटरनेट फोरम्स वर चर्चा केली तरी शेवटी छापील माध्यमांचा दर्जा त्यात कुठून येणार."
"विकीपेडियाच्या आणि गूगलच्या जमान्यात एन्सायक्लोपेडीया निरुपयोगी आहेत."
"नुसतं गूगल करून आणि विकीपेडिया वाचून कशाचंही समग्र भान येणं अशक्य आहे".
"अॅपल प्रोडक्ट्स मी घेणार नाही कारण कितीही अॅडव्हान्स असले तरी ते "ओपन" नाहीत. ग्राहकाला ते आपल्या ब्रँडशी बांधून ठेवतात. "
" मी फक्त अॅपल प्रोडक्ट्स वापरतो. मायक्रोसॉफ्ट इज सो यस्टरडे"
"ह्या: अॅपल काय वापरायचं ! अँड्रोईडच्या तुलनेत कसले जुनाट वाटतात ते !"
वरील प्रत्येक विधानात तथ्यांश आहे आणि नाहीही. यातली बरीचशी परस्परविरोधी विधानं आहेत. आणि ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनातून ती खरी आहेत. यातल्या बर्याच विधानांना सोदाहरण आणि विवेचनाने पुष्टी देता येईल.
मुद्दा इतकाच, की असल्या मतांच्या पिंकेला मी अन्य असंख्य मतामतांच्या स्पेक्ट्रमपैकी एक मानतो. त्यामधे गमतीने क्षणैक हसून सोडून देण्यापलिकडे मला काही दिसत नाही.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
त्या निमित्ताने कोणत्या छापील
त्या निमित्ताने कोणत्या छापील दिवाळी अंकात काय वाचण्यासारखं आहे समजलं. (म्हणून मी ते वाचेन असं नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थोडक्यात मी उग्गाच नको त्या
थोडक्यात मी उग्गाच नको त्या गोष्टींचा गंभीरपणे विचार केला तर!
आदिती: हे यंदाच्या अंकातले लेख नाहीत. गेल्या दहा-एक वर्षांतले मला आठवले तसे लेख आहेत. अंकांची रद्दी विकून मोकळी झाले असल्यामुळे संदर्भ हाताशी नव्हते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अंक
रद्दी विकण्याआधी स्कॅनिंग केलं का? असं काही तरी तुम्ही करणार असल्याचं कुठं तरी वाचलं होतं... अर्थात, तो माझा भ्रम असेल तर मात्र असो.
बरोबर आहे तुमची स्मरणशक्ती.
बरोबर आहे तुमची स्मरणशक्ती. तसा विचार होता, पण अगदीच अव्यापारेषु व्यापार होत असल्याचं लक्षात आलं. असेल महत्त्वाचं, तर राहील डोक्यात म्हटलं नि टाकलं विकून!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
:-)
माझं मत
पूर्वीच्या दिवाळी अंकांचं मुख्य मूल्य माझ्या मते - उद्याचे चांगले साहित्यिक कोण असतील ह्याचा अंदाज दिवाळी अंकांतून यायचा, आणि प्रस्थापित चांगल्या साहित्यिकांचं नवं लेखन वाचायला मिळायचं. ह्या अनुषंगानं पाहायचं झालं तर 'मुक्त शब्द', 'खेळ' किंवा 'पद्मगंधा'सारखे तुरळक अपवाद सोडता माझ्या अपेक्षा फारशा पूर्ण होत नाहीत. तरीही एक वेगळा हेतू पूर्वीप्रमाणेच आजकालच्या अंकांतूनदेखील साध्य होतो : समकालीन जिव्हाळ्याचे विषय कोणते असावेत याचा त्यांद्वारे एक अंदाज येतो. उदाहरणार्थ - अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जीसारख्यांच्या नव्या भारतीय सिनेमाविषयीच्या लेखांची लक्षणीय संख्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकांत आहे. तो माझा आस्थाविषय असल्यामुळे मला हे रोचक वाटतंच, पण समकालीन समाज आज कोणत्या गोष्टींची दखल घेतो आहे हे पाहणं मला एकंदरीत रोचक वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यंदाच्या
मौज दिवाळी अंकात 'संगीताची जादू' हा जावडेकरांचा वैज्ञानिक प्रयोगांवर आधारित लेख आवडला. विनय मावळणकर यांचा 'गुजरात सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर' हा लेखही आवडला. बाकी दिवाळी अंक अजून वाचायचे आहेत.
लहानपणी जसे फटाके उडवल्याशिवाय दिवाळी झालीच नाही असे वाटायचे, तसे गेली अनेक वर्षे दिवाळी अंकांविषयी वाटते. फेसबुकावर लिहिणारे, एखादी मराठी कादंबरी वा पुस्तक, सलगपणे जाऊच द्या, संपूर्ण तरी वाचू शकतील का ?