दिवाळी
दिवाळीच्या सुट्टीत दोन दिवस गावी जाऊन आलो.सोबत तुझं गाव बघायचंय म्हणुन एक मित्र आलेला.दवाखान्यात जन्मलेला अन् फ्लँटमधे वाढलेला ईदरकल्याणी पठ्ठा. सारवलेली भुई का डनलाँप गादी याची चिकित्सा न करता बोचकं उशाला घेऊन निँवात पडणारा.गावात पोचल्यावर चुलते मालते खुष झाले. पोरगं सनासुदीला गावाला आलय. शेहरातल्या दोस्ताला घेऊन म्हणुन झडझडुन दिवाळीच्या तयारीला चुलत्या लागल्या. गावात दिवाळीचं कसलंच चिन्ह दिसत नव्हतं. उदास वाटत होतं. मित्र कंटाळला गाव बघायचं म्हटला ह्याला गावातलं जुनं शंकराचं देऊळ, आटलेली नदी अन् अजिबात इतिहास माहित नसलेला बुरुज दाखवला. दोन दिवस थांबलो. गावातली थंड दिवाळी पाहिली. आणि नातेवाईकांना भेटून परत निघालो.
आमच्या भागात बार्शी ते पांगरी किँवा जवळपासच्या कुठल्याही १५, २० किलोमिटर पर्यँतच्या प्रवासासाठी एसटी बस पेक्षा जीपा खूप धावतात.त्या जीपनी प्रवास करणं हा अद्भूत अनुभव असतो. नास्तिक माणुस झटक्यात आस्तिक झाला पाहिजे अशी जादू त्या प्रवासात असते. शिवाय जीपचे ड्रायव्हर बंधुलोक प्रवाशांच्या मनोरंजनार्थ खंग्री गाणी लावतात. ईकडे माधुरी दिक्षीत रिटायर्ड झाली तरी तिकडे अजुन ताजी ! दिदी तेरा देवर दिवाना जीप मधे दणक्यात चालतं.हिमेश रेशमीया जीपमधल्या शहरवाल्यांना आत्ता बरे घावलात म्हणुन विव्हळु विव्हळु छळतो.बाराच्या ऎवजी १९ जणांना बसवुन जीप बुंगाट पळते.
आम्ही अशाच एका जीप मधे बसलो.आजुबाजूला काही खेड्यातले काही शहरातले लोक डांबुन एकमेकांना चिटकुन बसलेले.एकमेकांच्या घामाचा, कडकडीत जांभईचा, करपट ढेकराचा, अस्सल गावठीचा, देशीचा असा सगळ्या प्रकारचा संमिश्र वास घेत गाडी चालू होण्याची वाट पाहत सगळेच बसलेलो.आमचा ड्रायव्हरबंधु अजुन आन्देव आन्देव करत होता. मित्र खवळला ओरडुन म्हाणाला अरे काय भोकावर बसवतोस का आता माण्सं ? ड्रायव्हरबंधुचे सपशेल दुर्लक्ष . आन्देव चालूच. ड्रायव्हरबंधू तिशी बत्तीशीचा काळाकुळा, दणकट हाडापेराचा, शर्टच्या दोन गुंड्या उघड्या टाकलेला. पांढर्या काळ्या केसाने भरलेली छाती. लालपिवळे दात पानतंबाखू गोव्या माव्याचे किटण चढलेले. या सर्व व्यक्तिमत्त्वाला छेद देणारा किँचीत किनरा बायकी आवाज.गाडीत गलका वाढु लागला लहान पोरं गुदमरुन रडु लागली.खेड्यातल्या बायका खेकसा खेकसी करु लागल्या. शहरी बायका हाश् हुश्य करु लागल्या सुस्कारे सोडू लागल्या .ड्रायव्हरबंधु लक्ष देत नव्हता. एव्हाना त्याला त्याचा एक ड्रायव्हर सहकारी भेटला होता. आणि त्याला ड्रायव्हरबंधु मैत्रीखात्यात अतिरिक्त प्रमाणात अचकट विचकट गलिच्छ गालीगलोच करत होता. तो सहकारी बंधुही तितक्याच प्रेमाने ड्रायव्हरबंधूला प्रतिसाद देत होता.प्रेमानेच परतफेड करत होता.गाडीतल्या बायका दोघांच्या गणतीत नव्हत्या. वातावरणात शिव्या स्वैर घुमत होत्या. खेड्यातल्या बायकांना फार काही विशेष वाटत नव्हतं. शहरी बायका मात्र गांगरल्या. म्हणुन शहरी नवरे अधिक गांगरले.आकसले. एकमेकांच्या तोँडाकडे पाहू लागले.कुणी तरी हे थांबवावं आणि पटकन गाडी चालु करावी असं मनोमन सगळ्यांना वाटू लागलं. मित्रानं पुढाकार घेतला पुन्हा खच्चुन ओरडला , आरे चल ना भौ लौकर, संध्याकाळी पोचवतो का आता? झाली कि गाडी फुल्ल. पार फुटाय आली चल लौकर.यावेळेस ड्रायव्हरबंधूने ऎकलं.पण त्याचचं ऎकलेलं ईतरांच्या लक्षात येऊ नये म्हणुन माफक वेळ अजुन खर्च केला. खिशातुन गोव्याची पुडी काढली. चवीने गुटखा खाल्ला. गाली आदानप्रदान कार्यक्रमातील सक्रीय सहकार्याला शेवटची गाली हासडून गाडी चालू केली.
ड्रायव्हरबंधूने पाच मिनिटात आमच्या मनोरंजनार्थ दोन चार सिडी चाळून एक सिडी काढली अन् चालू केली.आल्ताफ राजा आमचं मनोरंजन करू लागले. तुम तो ठैरे परदेसी आणि आवारा हवा का झोका हू संपलं. आणि यारो मैने पंगा ले लिया चालू झालं. ड्रायव्हरबंधू चेकाळले. त्यांनी बाजुला बसलेल्या आम्हाला रेमटारेमटी करत आडवं होऊन आवाज फुल्ल वाढवला. आल्ताफ राजाचा पंगा गाडीत घुमू लागला. कान बधीर करु लागला. ड्रायव्हरबंधू तालात घुमत गाडी चालवू लागले. गाणं लैच एण्जाँय करु लागले. पण अचानक थिजले. कावरेबावरे झाले .गाचकन गाडी थांबवली गेली त्यांना बाहेर काढलं गेलं. वाटेवरच आर टी ओ च्या सायबाची गाडी ! साहेब निवांत गाडीत बसुन . त्यांच्या देखरेखी खाली तोडपाणी, पावत्या, कागदपत्रं जप्ती, दंडाचे प्रकार असे अनेकविध उपक्रम, त्यांचे कनिष्ठ कर्मचारी तत्परतेने पार पाडत होते. मित्राला कुतूहल भारी. ड्रायव्हरबंधू जवळ जाऊन थांबला. त्यांची अजीजी पाहू लागला. पोलीसांच्या ड्रायव्हरबंधूला दिलेल्या शिव्या ऎकू लागला. आनंद आनंद लुटू लागला. ड्रायव्हरबंधूला दोन हजाराचा दंड बसला. दंड भरुन लैच दमाने पावलं टाकत ड्रायव्हरबंधू गाडीकडे आला गाडीत बसला. मनाशीच पुटपुटत झटक्यात गाडी चालू केली. थोडा वेळ झाल्यावर मित्र म्हटला , झालं गेलं विसरुन जा भौ. लावा आपलं मगाचं गाणं यारो मैने पंगा ले लिया लै भारी है राव. ड्रायव्हरबंधू खवळला गप्प बसा नायतं खाली उतरा म्हणला. पाच मिन्टाने पुन्हा मित्राने फर्माईश केली हं लावा राव ते गाणं लय भारी हाय. ऎकायला मजा येतेय. लावा ! असं म्हणुन गुणगुणायला लागला यारो मैने पंगा ले लिया..ले लिया. गाडी थांबवली ड्रायव्हरभौ शिव्या घालू लागला खाली उतरण्याचा जोरकस आग्रह धरू लागला. मित्र आडवा तिडवा भांडू लागला.ड्रायव्हरभौ जास्तीत जास्त चिडू लागला . मित्र जास्तीत जास्त चेकाळू लागला. एकूण प्रकरण वाचिक पातळीवरुन, आंगिक व कायिक पातळीवर येतं कि काय या दहशतीने मी दोस्ताला त्याच्या अंगकाठीची आणि नुकत्याच झालेल्या अपेँडिक्स आँपरेशनची आठवण करुन दिली अन् काढता पाय घ्यायला लावलं. आता दिड किलोमिटर चालावे लागेल गाडी भेटली तर ठिक नाहीतर चलो एक दो एक दो. चल म्हटला आणि चालू लागलो. तहान सपाटून लागली. वाटेत काही टपरी, हाँटेल दिसेना वैतागलो. एका घराजवळ जाऊन पाणी मागीतलं. पाणी पीत असताना आत पाहिले. एक पोरगा सहजा सहजी लवकर न तुटणारी चकली, करंजी आणि गर्याचा कळकट लाडू ताटात घेऊन बसला होता. पाणी पिलो आणि चालु लागलो. तिथेच बाजूला दोन कळकट कपड्यातले सहा वर्षाच्या आतले लहान बहिण भाऊ फुसका फटाका उडवायचा प्रयत्न करत होते. मित्र दंग होऊन पाहत होता. वीस रुपये त्यांना द्यायला गेला. पोरं पैसे न घेता धुम पळाले त्याला आश्चर्य वाटलं. म्हटलं साल्या ते काय भिकारी आहेत का तुझे पैसे घ्यायला ? बळीराजाचे वंशज ते फक्त देणं माहित असलेले. दोघं एकमेकांशी न बोलता चालू लागलो.
दिवाळीचा पार नक्षा उतरला होता...आणि मी सहज म्हणुन गेलो यारो मैने पंगा ले लिया...
प्रतिक्रिया
दवाखान्यात जन्मलेला अन्
अलीकडे दवाखान्यात न जन्मलेले कितीजण उरलेत, अगदी गावाकडंसुद्धा?
अशी थोडकी खुस्पटे वगळता ललित उत्तम उतरलेले आहे. "यारो मैने पङ्गा ले लिया" हे गाणं मस्तच, शीर्षक म्हणूनसुद्धा चाल्लं असतं
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बँटमँन भौ या भुतलावरच आजुन एक
बँटमँन भौ या भुतलावरच आजुन एक ग्रह आहे. ज्यावर झोपडपट्टीतले पारधी वडारी आणि शिकलगार राहतात.दवाखान्याची फुकाट सोय फुकाट संततीनियमनाची आँपरेशनं त्यांच्यापर्यँत पोहोचलेली नाहीत.मजाक न्हाई हा ?
नै, मजाक नै हे माहितीये. पण
नै, मजाक नै हे माहितीये. पण "दवाखान्यात जन्मलेला" हे अशा सुरात लिहिलंय की कैतरी नविन गोष्ट आहे असे वाटावे, म्हणून म्हटलो, इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बँटमँन , (भौ) म्हणणं टाळलंय
बँटमँन , (भौ) म्हणणं टाळलंय याची कृपया नोँद घ्यावी. ही लैच नम्र विनंती. मी स्वीकारलेल्या प्रतिसादात्मक संवादासाठीच्या शैलीमुळं तुमचा गैरसमज झाला. तुम्हाला श्यानपना शिकवायची इच्छा आणि हेतु दोन्ही मी बाळगत नाही. हे नम्रपणे आपणास सांगतो. तुम्ही धारण केलेल्या गंमतीशीर नावामुळे स्वीकारलेल्या खेळकर शैलीचा तो परिणाम होता. हे ध्यानात घ्यावे ही अतोनात कळकळीची आणि कटकटीची नम्र विनंती . तुमच्या दुसर्या प्रतिसादात्मक प्रतिसादात आलेल्या ' दवाखान्यात जन्मलेल्या ' हे कैतरी नविन गोष्ट वाटावी म्हणुन विशिष्ट सुरात लिहिलय असं तुम्हाला वाटणं आणि त्याविषयी शंका व्यक्त करणं मला पहिल्या प्रश्नापेक्षा जास्त सयुक्तिक वाटतं.
तुम्ही हाच प्रश्न मला सुरुवातीला विचारला असतात तर मी दुसर्या ग्रहाकडे कशाला वळलो असतो ? मित्राची एकूणच पार्श्वभूमी ठळक अधोरेखीत व्हावी म्हणुन तो शब्द वापरला. तो मित्र अलिकडे जन्मलेला नाही खूप आधी जन्मलेला आहे. ३० वर्षापूर्वी दवाखान्यात जन्म देणारी त्याची आई. फ्लँट संस्कृतीतील पुटं चढलेलं वातावरण त्याची जडणघडण अधिक स्पष्ट करतात म्हणुन तो विशिष्ट सुरात लिहिला गेला. असो तुमच्या प्रतिक्रियेशी निगडीत अजुन काही वेगळं नविबाजूंच्या प्रतिसादावर लिहितोय. पुनःरुक्ती होऊ नये म्हणुन ईथे टाळतो. दिलका हाल दिलवाल्यांसमोर सुनावला जातो. किँवा उत्तरे देणारे प्रस्थापित यांच्यासमोर ! आंतरजाल याला करोड टक्के अपवाद आहे. याची तीव्र आणि सखोल जाणिव मला आहे. मी फक्त इथे अनुभव शेअर करतोय. गार्हाणी गात नाही. कृपया गैरसमज नसावा. बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
पुटं
>>३० वर्षापूर्वी दवाखान्यात जन्म देणारी त्याची आई. फ्लँट संस्कृतीतील पुटं चढलेलं वातावरण त्याची जडणघडण अधिक स्पष्ट करतात म्हणुन तो विशिष्ट सुरात लिहिला गेला.
४९ वर्षांपूर्वी आम्ही दवाखान्यात जलमलो. तेव्हा फ्लॅटसंस्कृतीतला फ देखील अस्तित्वात नव्हता..... दवाखान्यात जन्मणे आणि फ्लॅट संस्कॄतीची पुटं* यांचा काही संबंध असेलसं वाटत नाही.
*फ्लॅट संस्कृतीत "पुटं" म्हणावं असंच काहीतरी मनावर चढतं हे गृहीतक कितपत योग्य आहे हेही तपासण्याची गरज आहे असंही वाटतं. कदाचित काही चांगली मूल्यंही** चढत असतील.
**त्या मूल्यांनाच पुटं म्हटले जाणेही शक्य आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्ते सर तुम्ही पुटं हा शब्द
थत्ते सर तुम्ही पुटं हा शब्द केवळ नकारात्मक अर्थाने घेतलाय असं तुमच्या प्रतिसादावरुन दिसून येतंय. मला तो केवळ नकारात्मकच अभिप्रेत नाही हे मी नमुद करतो. दवाखान्यात जन्मलेला आणि फ्लँट संस्कृतीत वाढलेला यांची परस्परात तुलना मी करत नाही. या दोन्हीँची तुलना घरी जन्मलेला आणि झोपडपट्टीत वाढलेला अशी मला अभिप्रेत आहे. तुमच्या जन्माच्या वेळी ४९ वर्षापूर्वी फ्लँटसंस्कृतीतला फ देखील अस्तित्वात नव्हता असे तुम्ही म्हणत आहात. हे फ असे एका दिवसात रुजत नसतात हे मी सांगायची गरज नाही. पण तेव्हा देखील एक अंतर राखूनच संस्कृती नांदत होत्या हे नाकारता येत नाही. आज तुलना करु पाहता फ्लँटसंस्कृतीतला फ आणि झोपडपट्टीतला झो यांच्यात भयानक तफावत आहे. दोन्हीकडे असलेल्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी गृहीत धरुनही मला अधिक कोरडी बेगडी वाटते ती फ्लँटसंस्कृती . माझे वय ३४ वर्ष आहे मी वयाच्या २७ वर्षापर्यँत झोपडपट्टीतल्या एका वस्तीत राहिलोय. आणि मागील ७ वर्षापासून फ्लँटमध्ये राहतोय. आजही दोन्हीकडे माझा सक्षम वावर आहे. त्यामुळे मी काही विधाने ठामपणे करु शकतो. असा मला विश्वास वाटतो.
पुटं हा शब्द केवळ नकारात्मक स्वीकारल्यामुळे तुम्हाला गृहितकांची योग्या/अयोग्यता तपासणे आवश्यक वाटले. तपासायला हरकत नाही. पण पुटं या शब्दात मी चांगली आणि वाईट दोन्ही मूल्य गृहित धरलेली आहेत याची नोँद घ्यावी. धन्यवाद !
मला पुटं या शब्दाचा अर्थ
मला पुटं या शब्दाचा अर्थ नकारात्मक म्हणूनच ठाऊक होता. पुटं म्हणजे एखाद्या वस्तूवर आपोआप चढलेले (नकोसे) थर असा अर्थ ठाऊक होता.
पॉझिटिव्ह अर्थ असेल तर ठीकच आहे. पण तुम्ही तो पॉझिटिव्ह अर्थाने लिहिला नव्हता हेही तितकेच खरे "मला अधिक कोरडी बेगडी वाटते ती फ्लँटसंस्कृती" या वाक्यावरून ते स्पष्टच होते.
असो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असो.
असो.
मी स्वीकारलेल्या
नाही, आजिबात नाही. मी असे कुठे म्हटलेय का?
हम्म, खरंय. मला म्हणायचं तेच होतं, पण प्रकरण अंमळ जरा गंडलं, हरकत नै. माझा कसलाही गैरसमज झाला नै, तुमचाही होऊ देऊ नका, इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नक्कीच बँटमँन माझा कुठलाच
नक्कीच बँटमँन माझा कुठलाच गैरसमज नाही. खात्रीने !
हम्म्म्...
परवा कोण बरे कौतुक करत होते, 'अपॉलोजेटिक किंवा दीनवाणे किंवा धीरगंभीर यांपैकी कुठलीही शैली न वापरता' वगैरे वगैरे म्हणून?
'अलीकडे दवाखान्यात न जन्मलेले कितीजण उरलेत, अगदी गावाकडंसुद्धा?' या (बहुधा प्रामाणिक) प्रश्नास, 'अजून बरेच उरलेत' हे थेट उत्तर समर्पक ठरू शकले असते, नाही? कदाचित त्या 'बर्याच उरलेल्यां'च्या तपशिलांसहित? (कदाचित धारावाहिकाच्या आणखी काही कड्या पत्करूनसुद्धा?)
बाकी, भारतात आणखीसुद्धा एक भारत आहे, हे सर्वमान्य असावे, त्यात नाकारण्यासारखे काही नसावे, आणि बहुधा कोणी ते नाकारीतही नसावे. मात्र, त्या दुसर्या भारताची पहिल्या भारतास (पहिलादुसरा क्रम ज्यानेत्याने आपापल्या सोयीपमाणे कसाही लावून घ्यावा.) दैनंदिन प्रथमहस्त तपशीलवार बित्तंबातमी असलीच पाहिजे, अन्यथा त्यात वैषम्यपात्र असे काही आहे, ही अपेक्षा नेमकी काय आहे? (आणि दोनच का? असंख्य भारत असतील भारतात. नव्हे आहेत, याची खात्री आहे. म्हणून काय झाले?)
'या भूतलावरच अजून एक ग्रह आहे, ज्यावर xxx, yyy आणि zzz राहतात. aaa, bbb या सोयी त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीत. मजाक नाही हं!' ही शैली (म्हणजे, त्यातील अधोरेखित भाग. अधोरेखित न केलेला भाग हे वस्तुस्थितीचे यथोचित वर्णन आहे, जे योग्यच आहे.) अपॉलॉजेटिक नाही, तर मग नेमकी काय आहे? (कन्फ्रंटेशनल???)
धारावाहिकाच्या कड्यांना विरोध नाही. (भलेही मला व्यक्तिशः त्या रटाळ वाटत असल्या, त्यांत वैयक्तिक रस वाटत नसला, तरीही. लेखकाचे स्वातंत्र्य लेखकाकडे, प्रत्येक वाचकाचे प्रत्येक वाचकाकडे, वगैरे. 'ब्रेड अँड बटर - भाग १ ते अनंत' या धारावाहिकातील प्रत्येक कडीतही प्रत्येक वाचकास रस वाटलाच पाहिजे, असा संबंधित लेखिकेचा / (आगामी) लेखकलेखिकासमुदायाचा अट्टाहास (बहुधा) नसावा. तसेच आहे हे.) हा दुसरा भारत (किंवा असंख्य भारतांपैकी 'न'वा भारत) जो काही प्रकार आहे, तो प्रथमहस्त अनुभवलेल्यांपैकी एखाद्यास (किंवा एखादीस) त्या विश्वाचा परिचय वाचकांस करून द्यावासा वाटला, आपले अनुभव सर्वांसमोर मांडावेसे वाटले (आणि समर्थपणे मांडता आले), तर त्यात वावगे काहीच नसावे, आणि त्यास विरोध असण्याचे कोणास काही कारण नसावे. प्रत्येक वाचकास त्यात रस वाटेलच, असे नाही, पण दुसर्या पक्षी, त्यात रस वाटू शकणारे अथवा वाटणारे अनेक वाचक असू शकतात, हा भाग लक्षात घेता, असे प्रत्येक लेखन हे (ते कितीही भागांत आले, तरी) स्वागतार्ह ठरावे, यात वादाचा काही मुद्दा नसावा.
मात्र, एखाद्या विश्वाचा परिचय करून देणे ही एक गोष्ट झाली. त्यातून त्या विश्वाची बाजू मांडणे, कैफियत मांडणे, हेही समजण्यासारखे, नव्हे उचितच. पण त्यापुढे, वाचकाची त्यातून बौद्धिके घेण्याच्या प्रयत्नाची - किंवा, लेखकाचा काही अजेंडा असण्याची - नुसती शंका जरी निर्माण होऊ लागली, की मग बाजी उलटू शकते, नि लेखक मग वाचकांशी संपर्क कायमस्वरूपी गमावण्याची शक्यता उत्पन्न होते, या धोक्याची जाणीव नम्रपणे करून द्यावीशी वाटते.
प्रस्तुत लेखकाच्या प्रत्यक्ष लेखनातून असे काही अद्याप तरी (निदान उघडउघड) जाणवलेले नाही. मात्र, 'या भूतलावरच अजून एक ग्रह आहे...' वगैरे मखलाशी (आणि त्याअगोदरचे ते 'बॅटमॅन भौ' वगैरे नकली जवळिकीचे संबोधन - म्हणजे, ओळख नाही, देख नाही, थेट 'बॅटमॅन भौ'?) या दृष्टिकोनातून जबरदस्त खटकते - condescending वाटते. व्यक्तिशः काही नाही, परंतु लेखकाच्या लेखनोद्दिष्टास दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे बाधक ठरू शकेल, असे सुचवावेसे वाटते. (शेवटी लेखनातून ज्यांच्याशी संपर्क साधायचा - नि राखायचा, त्यांच्याशी त्यांच्याच टर्म्सवर संभाषण केलेले कधीही हितावह, नाही का?)
थोडक्यात, लेखकाच्याच - किंवा तत्सम - भाषेत सांगायचे झाले, तर, 'दिल का हालच सुनवायचा असेल, तर सुनवा की बिनधास्त, पण पब्लिकला श्यानपना शिकवलेला आवडत नै, भौ!'
असो. पुढील लेखनास (मला त्यात व्यक्तिशः काडीमात्र रस नसला, तरीही) शुभेच्छा. (मनापासून!)
=========================================================================================================
(अवांतर)
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात श्री. म. माटे नावाच्या एका मराठी लेखकमहोदयांनी अशाच एका विश्वाचा परिचय करून देण्याचा, त्या विश्वाची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला होता. 'उपेक्षितांचे अंतरंग' हा त्यांचा संग्रह अशाच प्रकारचा आहे. बर्याच लहानपणी, शालेय वयात ते पुस्तक वाचले असल्याकारणाने आता विस्मरणात गेलेले आहे, परंतु लेखक कोठेही वाचकाचे बौद्धिक घेत असल्याचे अथवा लेखकाचा काही अजेंडा असल्याचे तेव्हा त्यातून जाणवले नव्हते, आणि (कदाचित म्हणूनच) ते लेखन प्रभावीपणे संवाद साधू शकले होते, एवढे आजही आठवते.
मुल्क राज आनंद या इंग्रजीतून लिहिणार्या भारतीय लेखकाच्या 'अनटचेबल'चाही या संदर्भात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. (तेही पुस्तक आता कालौघात विस्मरणात गेलेले आहे. परंतु वाचले, तेव्हा अत्यंत प्रभावीपणे संवाद साधू शकले होते, असे आजही आठवते.)
=========================================================================================================
(अतिअवांतर)
'यारो मैं ने (भी) पंगा ले लिया' असे आम्हीही आता गाऊ शकतो काय?
श्री. म. माटे
ह्या लेखनाच्या आधारे आता जवळजवळ विसरलेल्या श्री.म.माटे ह्यांची आठवण झाली हे उत्तम. त्यांचे 'उपेक्षितांचे अंतरंग' हे पुस्तक आता दुर्मिळ आहे पण (बहुधा) त्यातील अनेक दशकांपूर्वी वाचलेली 'बन्सीधर, तू आता कोठे रे जाशील?' ही कथा अजूनहि आठवते.
त्यांचे लिखाण आणि समाजकार्य न पटणार्या लोकांनी त्यांना 'महार माटे' ही कुत्सित उपाधि दिलेली होती.
(वैयक्तिक आठवणः माझ्या आजोबांचे ते सातार्याच्या शाळेतील सहाध्यायी. एकदा ते सातार्यास आले असता आजोबांनी त्यांना घरी बोलावले होते आणि तेव्हा आमच्याकडून त्यांना वाकून नमस्कार करविला होता इतकेच स्मरते.)
न वी बाजू... पर्फेक्ट ..
न वी बाजू... पर्फेक्ट .. बैलाचा डोळा..
आवडला प्रतिसाद.. मनातलं..
+१११११११११११. थोडक्यात,
+१११११११११११.
बलीवर्दनेत्रभञ्जक!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
प्रतिसाद आवडला.
बादवे "होम बर्थ" टक्केवारी ही शहरात वाढत आहे.
हम्म
'न'वी बाजू तुमच्या संपूर्ण प्रतिसादात्मक लेखाचा गोषवारा केवळ दोन मुद्यात आटोपला. मी बँटमँनला भौ म्हणणं आणि पब्लिकला श्यानपणा शिकवला ही तुम्हाला आलेली जबरदस्त शंका ! बस्स. याच्या पलिकडे तुम्ही फार काही महत्वाचं मुद्याचं लिहिलय हे जाणवलं नाही. तुमचे हे दोन मुद्दे आधी स्पष्ट करतो. बँटमँनचा माझ्या दुसर्या ललितवरचा एक प्रतिसाद इथे पेस्ट करतो मुद्दा अधीक स्पष्ट होण्यासाठी.
खत्तर्नाक लेखन सतीशभौ!!! (Score: 1)
बॅटमॅन
पुण्य: 2
खत्तर्नाक लेखन सतीशभौ!!! जियो.
प्रतिसाद
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी |
वाल्गुदेय हा निर्धारी | विदूषका जाण पां ||
इथे बँटमँन ने मला प्रथम सतीशभौ म्हटले आहे सुरुवातीला. त्याच धाग्याला पकडून पुढील प्रतिसादात्मक संवादात मी त्याला भौ म्हटलं. त्याने ज्या जवळिकीने ते संबोधन वापरले त्याच जवळिकीने मी ते स्वीकारुन आदरापोटी मी ही वापरले. याच्यामधे नकलीपणा मखलाशीचा जावईशोध तुम्ही लावत आहात. भौ या शब्दातील जवळिकीतुन मला बँटमँनकडून गालगुच्चे किँवा जवळिकीच्या मिठ्या अपेक्षित नाहीत. तुम्हाला लेखक आणि वाचकामधील टर्म्स या शब्दामुळे नाहीशी होतेय असं वाटणं हेच मुळी तुमच्या जहरी अडाणचोटपणाचं लक्षण आहे. हे मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ ईच्छितो.
तुमचा दुसरा मुद्दा
" पब्लिकला श्यानपना शिकवलेला आवडत नै भौ. " या वाक्याभोवती फिरणारा. मी आपणास नम्रपणे सांगू ईच्छितो कि, पब्लिक बोळ्यानं दुध पितेय या जाणिवेत मी लिहून प्रबोधन करायला बाहेर पडलेलो नाही. पब्लिकच्या श्यानपनाची मला तीव्र आणि सखोल जाणीव आहे. हे आपण लक्षात घ्यावे ही अतोनात नम्र विनंती. मी आंतरजालावर नविन आहे बर्याच गोष्टी इथे माझ्यासाठी नविन आहेत. तुमची भलतीच मजेशीर, यंग्राट, विचित्र नावं ही त्यापैकीच एक गोष्ट . ही नावं एकूणच संवादात गांभिर्य न टिकवणारी वाटतात. (हे माझं अत्यंत वैयक्तिक मत आहे ). 'न'वी बाजू ? गवि ? बँटमँन ? आडकित्ता ? तिरशिँगराव ? एकूण या नावाच्या सुरुवातीने होणारा औपचारिक संवाद मी मनात योजून पाहिला संगणकावर टंखून पाह्यला जसे कि.'न'वी बाजू साहेब , 'न'वी बाजू सर, 'न'वी बाजू' बंधू , न'वी बाजू महोदय , इ. पण हा मामला
अगदीच बेचव वाटल्यामुळे मी भौ म्हटलं आणि शैलीत बदल केला. जो तुम्हाला बौद्धिके घेण्याच्या थाटाचा वाटला. असो. आपापला श्यानपना कायम आपाल्याजवळच लखलाभ राहणार आहे या जाणिवेत या मुद्यावर थांबतो.
बँटमँनच्या प्रामाणिक प्रश्नाला माझं समर्पक उत्तर काय असावं हे तुम्ही सांगितलंत. मी बौद्धिक घेतो ही शंका तुम्हाला इथून यायला सुरुवात झाली. बँटमँनच्या प्रश्नातला प्रामाणिकपणा मी नाकारत नाही. पण प्रश्न हास्यास्पद आहे हे मान्य करावेच लागते.
' अलिकडे दवाखान्यात न जन्मलेले किती उरलेत , अगदी गावाकडेसुद्धा ?' हा प्रश्नच मला काचेतला चकचकीत इंडिया आणि रस्त्यावरचा नागडा भारत यातली दरी दाखवून देतो. म्हणुन मी गमतीने स्वीकारलेल्या शैलीच्या अंगाने, गाव जाऊ दे भौ, इथं शहरात झोपडपट्ट्यात पारधी, वडारी, शिकलगार. घरातच जन्माला येतात हे सांगायचा प्रयत्न केला. बरं बँटमँनला या दुसर्या भारताची माहिती नसण्याचं मला वैष्म्य वाटायचं काहीच कारण नाही. हे मी जाहिरपणे व्यक्त करतो. तुमचे दोन्ही मुद्दे माझ्यादृष्टीने मी उडवलेत. आता तुमचं बाकिचं फुटकळ. तुमच्या प्रतिसादात्मक लेखाची सुरुवातच मजेशीर आहे. माझा प्रतिसाद पेस्ट करुन खाली विचारणा करणारी. परवा कोण बरे कौतुक करत होते..वगैरे थाटाची. मला तुमचा अजुन एक प्रतिसाद आठवला. जो खाली पेस्ट करतोय.
शी) (Score: 2 मार्मिक)
'न'वी बाजू
पुण्य: 2
भारताची लोकसंख्या साधारणतः किती असावी? गेला बाजार महाराष्ट्राची?
(नाही म्हणजे, धारावाहिकाच्या किती कड्या अजून बाकी आहेत, याचा अंदाज लावतोय.)
प्रतिसाद
Sat, 22/12/2012 - 02:20 | हाहाहा (Score: 1)
श्रावण मोडक
पुण्य: 2
च्यायला, कायम टाचणी लावलीच पाहिजे का?
प्रतिसाद
Sat, 22/12/2012 - 02:34 | टाचणी? (Score: 3 मार्मिक)
'न'वी बाजू
पुण्य: 2
टाचणी कशाने? प्रामाणिक प्रतिक्रिया मांडली. त्यांचे चालू द्या की! (ट्र्याकर चालू रहायला तेवढेच बरे!)
का, आवाका जरा मोठा झाला का? ठीक आहे. भारतही नको, नि महाराष्ट्रही नको. मग कोणच्या गावची टेलिफोन डिरेक्टरी म्हणायची ही?
ही तुमची टिका टिप्पनी मी तुम्हाला गांभीर्यानं घ्यावं यात मोडत नाही.
तुमच्या बेँबीच्या देठाचं दुखणं नेमकं कशात ? हा यक्ष प्रश्न मला तुमच्या प्रतिसादावरील प्रतिसादातून पडला. लेखनबाह्य मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत इथेही आणि तिथे ही. तुम्हाला प्रतिसादातून प्रश्न सुचू लागलेत हे मला भलतंच मजेशीर वाटतं आहे. एक वाचक म्हणुन तुम्हाला माझ्या लिखानात रस असला काय नी नसला काय मला ते अजिबात महत्त्वाचं वाटत नाही. तुमच्या रसात मला कुठलीही भाकरी चुरुन खायची नाही. मी एक सामाजिक बांधिलकीतून लेखन करणारा प्राध्यापक कार्यकर्ता आहे. कौतुक आणि टिका याला मी फार महत्त्व देत नाही. तुमच्या प्रतिसादात्मक लेखात टिकेची प्रेरणास्त्रोत वेगळीच जाणवली म्हणुन तुम्हाला लिहिलं. असो. तुम्ही लेखनाला शुभेच्छा दिल्यात ( ज्यावरुन माझे काडीमात्र खेटर अडलेले नाही तरीही ) धन्यवाद. (मनापासून !)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
(आगावू )
( बर्याच लहानपणी, शालेय वयात ते पुस्तक वाचले असल्याकारणाने आता विस्मरणात गेलेले आहे, परंतु लेखक कोठेही वाचकाचे बौद्धिक घेत असल्याचे अथवा लेखकाचा काही अजेंडा असल्याचे तेव्हा त्यातून जाणवले नव्हते, आणि (कदाचित म्हणूनच) ते लेखन प्रभावीपणे संवाद साधू शकले होते)
वयोमानपरत्वे स्मरणशक्तीवर फार विश्वास ठेवू नये. श्री. म माटे पुन्हा एकदा वाचावेत. आणि चर्चा करावी.
-----------------------------------------------------------
(अतिआगावू )
आली अंगावर तर घेतली शिंगावर असे आम्ही देखील म्हणावे काय ?
सहमत आहे
नक्कीच असा वर्ग आहे. त्याची दाहकता ज्यांनी अनुभवली आहे वा जवळून पाहिली आहे अशा लोकांना व्यक्त होण्यासाठी अॅकॅडमिक पातळी पुरेशी वाटत नाही. बाकी सतिशभौ तुम्हाला इथे बरीच ब्यांडविड्थ खर्ची करावी लागणार असे इतर काही प्रतिसादांवरुन वाटते. असो! लेखनाला शुभेच्छा!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
दवाखान्यात जन्म!
सरकारने पैशाला भुलून तरी लोक दवाखान्यात जन्म देतील म्हणुन दवाखान्यात डिलीवरी केल्यास पैसे वाटायला सुरूवात केलीय. तरिही लोक घरी डिलीवर्या करून दवाखान्याच्या रजिस्टरावर मागाहुन एंट्र्या करून घेतात. अर्धे पैसे बापाला नी अर्धे 'आशा'
बाईला मिळतात.
खाली सतीशरावानी म्हटलंय तसं या भारतात असा अजुन एक भारत नक्कीच आहे.
च्यायला!! असो.
च्यायला!! असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्तच
मस्तच!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
घाटपांडे सर धन्यवाद !
घाटपांडे सर धन्यवाद !:-)
>> साल्या ते काय भिकारी आहेत
>> साल्या ते काय भिकारी आहेत का तुझे पैसे घ्यायला ? बळीराजाचे वंशज ते फक्त देणं माहित असलेले. दोघं एकमेकांशी न बोलता चालू लागलो.>>
शेवट फारच आवडला. सगळे लोक पैशाने विकत घेता येत नाहीत हेच खरे.
बहुसंख्य
बहुसंख्य मुलांना हेच शिकवले असते की अनोळखी लोकांशी बोलायचे नाही, त्यांच्याकडून काही घ्यायचे नाही व धोका वाटल्यास आसपास कोणी नसल्यास तिथुन पळून जायचे. पोरांना पळवून नेतात इ इ भिती पालक घालतात जेणे करुन मुले एकटी असल्यास सावध असतील.
यात पैसे-मुल्य-अर्थ इतका विचार पोरांच्या डोक्यात आला असेलच असे नाही.
असो.
ते ही खरच.
ते ही खरच.
खरे आहे, पण...
खरे आहे, पण स्पिन द्यायला काय जाते?
त्याशिवाय का ष्टोरी (/ न्यारेटिव) बनते? शिवाय, असले न्यारेटिव खपते, म्हटल्यावर... डिमांड आणि सप्लाय, अजून काय?
फार कशाला, त्या पोरांचे सोडा, त्या पैसे देणार्या मित्राच्यादेखील डोक्यात इतका विचार आला असेल, याबद्दल मी व्यक्तिशः साशंक आहे. म्हणजे, आपण एखाद्या मित्राच्या-नातलगाच्याकडेसुद्धा जेव्हा जातो, आणि त्याचेकडे (दूरगावी असल्याकारणाने म्हणा, किंवा अन्य तत्सम प्र्याक्टिकल कन्स्ट्रेण्ट्समुळे म्हणा) वारंवार जाणेयेणे होत नसेल, आणि जर का त्याचे घरी एखादे लहान मूल असेल, तर त्या लहान मुलाच्या हातावर सहज खाऊसाठी म्हणून आपण दहावीस रुपये (आमच्या जमान्यातले; किंवा हल्लीच्या इकॉनॉमीत खाऊसाठी जेवढी यूज्वल आणि कष्टमरी असेल, साधारणतः तेवढी रक्कम) ठेवतो की नाही? त्यावेळी ते मूल (अथवा त्याचे आईबाप) भिकारी आहे(त), त्यांना बहुधा आपल्या पोराला(/पोरांना) खाऊ आणणे परवडत नसेल, असा विचार आपल्या मनात तरी असतो का, आपल्या मनाला तरी शिवतो का? मग तशाच प्रकारे (सहज लहान मूल दिसले, खाऊला पैसे दिले म्हणून) त्या मित्राने ते पैसे दिले नसतील कशावरून?
आणि म्हणूनच...
'पब्लिकला श्यानपन शिकवण्या'बद्दल वर जे काही म्हणालो, ते हेच.
पण असला स्पिन खपून जातो. तेव्हा खपवणारे पैदा हे व्हायचेच. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अजून काय?
लै भारी उदाहरण नवि बाजू खरंच
लै भारी उदाहरण नवि बाजू खरंच नवी बाजू मांडली . तुम्ही मित्र किँवा नातेवाईकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या पोरांना ज्यांचे आईबाप तुम्हाला ओळखतात कदाचित ती मुलं सुध्दा ! त्यांना खाऊला पैसे देता, तिथली तुमची मानसिकता खेड्यातल्या अनोळखी मुलांना पैसे देऊ ईच्छिणार्या, तरुण मुलाबरोबर ताडून पाहताय. खाऊचे पैसे द्यायला आणि मुलांनी घ्यायला तो नातेवाईक किँवा मित्र नाही त्या मुलांच्या आईबापांचा. आणि कसले स्पिन शोधताय.छ्या ! झग्यात जन्माला येऊन लाल आवरणाच्या स्पर्शाचे दावे करणार्या नरपुंगवांना आपला साष्टांग दंडवत. धन्यवाद !
इदरकल्याणी - शब्दकथा?
सतीश वाघमारेंच्या अन्य एका लेखात (युवराज) हाच 'इदरकल्याणी' शब्द वाचला आहे आणि तेव्हाच त्याने माझे लक्ष वेधले होते.
जालावर शोधता हा शब्द अजून एक-दोन ठिकाणी वापरलेला दिसला. ह्याचा अर्थ जरी संदर्भावरून समजला तरी मला तो नवीनच आहे. मी स्वतः तो आपणहून कधीच वापरला नसता.
अधिक उत्सुकतेने त्याचा पुढे शोध घेता असे दिसले की दाते-कर्वे आणि मोल्सवर्थ कोशात तो आढळत नाही. 'ऐसी अक्षरे'च्या मुखपृष्ठावर ज्याचे सूत्र आहे तो मोल्सवर्थ कोश म्हणजे बाबा पदमनजी ह्यांनी १८६३त मुळातील कोशात थोडी काटछाट करून संपादित केलेला मोल्सवर्थ आहे. स्वतः मोल्सवर्थने १८५७ साली आपल्या विख्यात कोशाची दुसरी आवृत्ति काढली होती आणि ती बाबा पदमनजी ह्यांच्या संक्षिप्त आवृत्तीपेक्षा मोठी आहे.
मोल्सवर्थच्या १८५७ च्या कोशात हा शब्द सापडतो असे वाटते. तेथे 'इदारणे' हे 'विदारणे'चे अपभ्रंश रूप असल्याचा उल्लेख आहे आणि 'विदारणे' चा अर्थ 'to tear, rend, rip' असा दिला आहे. (हा शब्द संस्कृत विदृ - विदृणाति ह्या धातूपासून आला आहे, अर्थ तोच,) हेहि क्रियापद सध्या जवळजवळ विस्मृत आहे. 'हृदयविदारक' ह्या एकाच चालू शब्दात ते आपणास आढळते. ह्यावरून असे वाटते की 'विदरकल्याणी' (चांगल्या गोष्टी विसकटून टाकणारा) ह्या आता विसरलेल्या शब्दाचा 'इदरकल्याणी' हा बोलीभाषेत टिकून राहिलेला अपभ्रंश असावा.
पुरवणी - 'वेडेविद्रे' मध्ये हाच शब्द असावा असे वाटते.
इदरकल्याणी, इदरलक्षणी हे दोन
इदरकल्याणी, इदरलक्षणी हे दोन शब्द समानार्थी आहेत-कोल्हापूर भागात केंद्रित असलेल्या काही कथांमध्ये वाचला आहे. ग्रामीण बोलीभाषेतच कायम वापरला जातो-तोदेखील सरसकट सर्वांच्या बोलीत आढळेल असे नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान आहे लेख. अल्ताफ राजाची
छान आहे लेख.
अल्ताफ राजाची गाणी लै तुफान चालायची पुर्वी. तुम तो ठैरे, तुमसे कितना प्यार है अजुनही अधुनमधुन आठवतं. यारो मैने पंगा ले लिया थोडफार आठवतय, पण आवारा हवा का झोका अजीबात नाही आठवत.
आणि ते अच्छा सिला दिया पण मला अल्ताफ राजा च वाटायचं अताउल्ला खान नाव काही दिवसांपुर्वी कळलं.
एका छोट्याशा पण रंगीबेरंगी
एका छोट्याशा पण रंगीबेरंगी प्रसंगाचं भन्नाट वर्णन. तुमची गाडी अशीच बुंगाट चालू द्यात.
सारख्या वाक्यातून एक गमतीचा टोन मस्त साधला आहे. नरेटरचा जगाकडे बघण्याचा एक कलंदर दृष्टिकोन दिसून येतो. ड्रायव्हरच्या गमती, मित्राच्या गमती सगळ्या अशाच शैलीतून आलेल्या आहेत.
मात्र हे एक वाक्य या कथेत किंवा वर्णनशैलीत न बसणारं वाटलं. हे वाक्य उभं राहू शकेल अशी आधीच्या कथनात काहीच पायाभरणी नाही.
अनुभव
आपला अनुभव, त्यातील शहरी लोकांचे वागणे, त्यावरील आपली टीकाटिपण्णी, त्यावरील प्रतिसाद व त्यावरील प्रतिप्रतिसाद हे सर्वच आवडले. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक असल्यामुळे सर्व समाज आमच्यापेक्षा तुम्ही नक्कीच जवळून पाहिला आहे. त्यामुळे याबाबतीत ठाम विधाने करण्याचा तुम्हाला हक्कच आहे. आम्ही जुन्या जमान्यातले असलो, घरी जन्म घेतला असला, तरी एका सुरक्षित वातावरणात वाढल्यामुळे आम्हाला या देशाच्या प्रश्नांचे आकलन नाही. दुधभात आणि भेंडीची भाजी खाऊन आम्ही शेळपट झालो आहोत. त्यामुळे शिवी कानावर पडली तरी आमच शेपूट पायात जाते. खर्याला सामोरे जाण्याची आमची हिंमत नाही. म्हणूनच असली विचित्र टोपणनांवे घेऊन आम्ही दिवाभीतासारखे जगतो. तेंव्हा लिहित रहा. आम्ही वाचत राहू.
-- तिरशिंगराव माणूसघाणे
पहिली तीन वाक्ये!
पहिली तीन वा़क्ये सोडून बाकीच्या प्रतिसादाशी असहमत!
मीपण.
मीपण.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ओक्के !
ओक्के !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
वा!
अनुभवलेखन आवडले. तुमचे इतरही लेखन अतिशय आवडले. मित्राची शहरी-मध्यमवर्गीय घडण दाखवण्याकरता फ्लॅट-हॉस्पिटलापेक्षा चपखल प्रतिमा वापरल्यास काही वाचकांचा गोंधळ झाला नसता.
तुमची शैली नैसर्गिक-आशयगर्भ आहे. नाट्यमय-बोधप्रद शेवट करणे टाळल्यास त्यात कदाचित जाणवणारा कृत्रिमपणा अजिबातच निघून जाईल, असे वाटते.
+१
एकंदर जीपमधलं वातावरण, जीपवाला, पुढे होणारा पंगा हे सगळं झक्कास. अगदी शेवटच्या प्रसंगातला कॉण्ट्रास्टही.
किंवा निष्कर्ष चमच्याने भरवण्यासारखा (spoon feeding) वाटला. तो तसा करण्यापेक्षा वाचकांवर सोडून दिल्यास शैलीतला नैसर्गिकपणा, रांगडेपणा तसाच राहिल आणि परिणामकारकता वाढेल असं वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय
काय तो प्रसंग, काय ते त्याचे न्यारेटीव्ह, काय ती शैली, काय ती विषमता, काय ती त्यावरची मते, आणि काय ते त्यावरचे वाचकांचे प्रेम!
वा, वा, वा! भरून पावलो!!!