काँलेज
काँलेजचं टी वाय बी ए चं वर्ष. १९९९ साल.
पुढील वर्षापासून काँलेज बंद होणार म्हणून मधेच उदासिनतेचे झटके खूप यायचे व आम्ही तडक रविवारीही काँलेजवर हजर व्हायचो. काँलेजच्या समोरचा रोड ओलांडला कि डेक्कन काँलेजच्या आवारात प्रवेश. खूप मोठा पसरलेला कँम्पस. भरपूर झाडी जुन्या पडलेल्या हवेल्याद, परदेशी विद्यार्थी राहत असलेले जुने दगडी होस्टेलस. चिंचेच्या मोठमोठ्या झाडात दडलेलं, खंडोबाचं जुनं दगडी देऊळ.लालभडक फुलणारे बरेचसे गुलमोहर.कच्च्या खडीचे रोड. अधे मधे पडलेल्या पायवाटा. आमच्या काँलेज जीवनात या परीसराला खूप महत्त्वाचं स्थान. आमच्या तिथल्या वावराने, आमच्या कित्येकांच्या आयुष्याला वळण मिळालं. काँलेजमध्ये दोन चार तास झाले कि आम्ही डेक्कनच्या आवारात निवांत गप्पा मारत. आमचे विषय म्हणजे कथा, कविता, कादंबर्या, काँलेजचं राजकारण आणि आपापल्या बापांचे कारनामे. हे उरकून मग चालू व्हायची प्रत्येकाची लव्हस्टोरी. बर्यापैकी एकतर्फीच असायच्या आमच्या स्टोर्या. प्रत्येकाच्या मनातली त्याची , त्याची 'ती' ! या विषयावर सगळे हळवे
माझी 'ती' काँमर्स शाखेची. गोरीपान मधाळ पिंगट डोळ्यांची. काँलेजमधे कुठल्याही मुलाने प्रपोज केलं कि झटक्यात भाऊ मानणारी. सिझन कुठलाही असो नो प्राँब्लेम! ही राखी मिळवणारंच, आणि सदर प्रपोजकर्त्याला बांधनारच, हा तिचा खाक्या. समस्त ईच्छुक प्रपोजकर्ते कायम तिच्यापासुन आठ हात लांब.मी काँलेजमधला कायम हुशार विद्यार्थी त्यामुळे मला तिचं कायम स्माईल. ते स्माईल हळु हळु त्रास देऊ लागलं. झोप उडाली. कशातच मन लागेना. सारखं तिच्याशी बोलावं असं वाटु लागलं. मित्रांना चिक्कार बोअर होईपर्यँत तिचा विषय काढु लागलो. मित्रांना छळु लागलो.काँलेजची एक दिवस सुट्टी सुद्धा नको नकोशी झाली, रविवार अंगावर येऊ लागला. एक दिवस मित्राला बरोबर घेतलं.आणि क्लास शोधुन काढला. घर शोधुन काढलं.कारणाने विनाकारणाने तिथे चकरा मारु लागलो. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. तिचं स्माईल बंद झालं होतं.कुठल्याही क्षणी राखी बांधली जाऊ शकते या दहशतीत काँलेजमधे माझं वावरणं चालू झालं. मित्रांना जास्त छळणं चालु झालं. दहा बारा दिवसानंतर मित्रांनी आत्मविश्वास दिला. भौ ती पण तुझ्यावर मरतीय भिड बिन्धास. बघ, तिनं बांधलीय का आत्तापर्यँत तुला राखी ? समजुन जा यार. मलाही ते पटलं. आणि रोजचा तिच्या चिँतनात अडकुन पडण्याचा त्रास नको म्हणुन निर्णय घेतला. झटक्यात लायब्रीत गेलो खांडेकरांच अमृतवेल घेतलं. दहा बारा पानातच स्फुर्ती आली आणि पत्र लिहिलं. तिच्यापर्यँत व्यवस्थित पोहचवलं. राखीचा उत्साह ओसरे पर्यंत सुट्टी घेऊ म्हणुन आठ दिवस काँलेजमधुन फरार झालो. मित्रांच्या घरी तंगडतोड करत दैनंदिन अहवाल एकायला जाऊ लागलो. ते सांगायचे ती तुला विचारत होती. अंगभर गोड झिणझिण्या पसरायच्या. सुट्टीचे दिवस तात्काळ कमी करायची उबळ यायची. मित्र थांबवायचे. सगळं काही झाल्यात जमा आहे थोडा थांब म्हणायचे.
काँलेजला जायचा दिवस उगवला . राखी प्रसंगात मधे पडण्याचं मित्रांना भावनिक आवाहन केलं. त्यांच्या कडुन वचन घेतलं. आणि त्यांच्या गराड्यात काँलेजमधे वावरु लागलो. पोटात मध्येच कळ येत होती. लायब्रीत तिने पाह्यलं. आणि गोड स्माईल दिलं. गोड झिणझिण्यांचा मोठ्ठा करंट बसला. पाच वाजता क्लास सुटण्याच्या वेळेला तिच्या वाटेवर थांबलो. ती जवळ आल्यावर काहीच बोलता आलं नाही. छातीत खूप धडधड आणि पोटात कळ अशा स्थितीत निघुन आलो. मित्राच्या शिव्या खात खात. काँलेजला दिवाळीची सुट्टी पडली जाम चिडचिड झाली. म्हटलं बास्स आता आपण बोलणारच.रोज क्लासच्या वाटेवर थांबु लागलो.क्लास बंद होता.घराजवळ ती दिसत नव्हती. माझ्या नियमीत उद्योगात मी खंड पडू दिला नाही. आणि एक दिवस पाच नोव्हेँबरला पाच वाजता ती दिसली. मी एकटाच होतो. जवळ आल्यावर ती हसल्याचा मला भास झाला. मी म्हटलं मला बोलायचंय ती तुटकपणे म्हटली बोल. मी म्हटलं तू मला खूप आवडतेस. तीने भुवया उंचावुन विचारलं , मग ? मी जाम गोंधळलो. काय बोलावं काही सुचेना. शांतच झालो. नंतर तीच पुढे म्हणाली. तु पण मला आवडतोस. पण आपल्याला पुढे नाही जाता येणार. मला का ? असं विचारु न देता ती पुढे बोलत राह्यली. तू हुशार आहेस पण खालच्या जातीचा आहेस. शिवाय तुम्ही पत्र्याच्या घरामधे राहता. माझ्या घरचे तुझ्या घरी येणं तरी शक्य आहे का ? तु चांगलं करिअर कर सेटल हो. बेस्ट आँफ लक हे वाक्य फेकुन माझ्या कुठल्याच प्रतिक्रियेची वाट न बघता ती निघुन गेली. मी सुन्न होऊन घरी आलो. माझ्या पत्र्याच्या घरात चंद्रमाधवीचे प्रदेश वाचत बसलो. डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवत. आज्जीने जेवनाचा आग्रह केला मी जेवलोच नाही. पहाटे केव्हा तरी झोप लागली. आईच्या प्रचंड ओरडण्याने, रडण्याने जाग आली. आज्जी मरण पावली होती झोपेतच. मी खूप रडलो. पण आज्जीसाठीच का ? हा प्रश्न मला आजही छळतो.
पाच नोव्हेँबर संध्याकाळ आणि ग्रेसच्या ओळी. माझ्या दुःखावरची खपली वाढलेल्या नखाने अलगद उचकटतात. मग मी डेक्कन काँलेजच्या परीसरात जातो.मोठ्ठी चिंचेची झाडं पाहतो. मित्रांबरोबर मारलेल्या गप्पांची ठिकाणे चाचपडतो. तिच्या येण्या जाण्याची वाट तुडवुन येतो. नंतर स्मशानाकडे वळतो. आज्जीला जाळलेल्या ठिकाणी. रेँघखाळतो. सहज अवती भोवती फिरतो.घरी येतो. ग्रेस वाचनं आणि ऎकणं कटाक्षाने टाळतो. पण कानात घुमत राहतात सुर ती गेली तेँव्हा ....
प्रतिक्रिया
शेवट
शेवट वाचून कसंतरीच वाटलं. उर्वरित लेखन छान.
तुमचे सर्वच धागे आवडले. पण वेळेअभावी प्रतिसाद देणं जमलं नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
या वेळेस एवढी "मजा" आली नाही.
या वेळेस एवढी "मजा" आली नाही. तुमचं नाव पाहिलं की अधिक उच्च लिखाणाची अपेक्षा आपोआप होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत. हे सर्वसाधारण वाटले,
सहमत. हे सर्वसाधारण वाटले, आणि हे केवळ विषयामुळे नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वाईट वाटलं
वाईट वाटलं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तु पण मला आवडतोस. पण आपल्याला
अशा प्रसंगी तू पण मला आवडतोस.. पण तू खालच्या जातीचा आहेस इ इ इ असं कोणी मुलगी कशी म्हणत असेल याचं चित्र डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रसंग दु:खदायक खरा, पण अश्या विचारसरणीची मुलगी "तू पण मला आवडतोस" असं आधी म्हणेल हे जरा कठीण वाटतं. अर्थात कथा असेल तर मग ऑल्राईट..
बाकी अशा वेळी तात्कालिक निराश वाटलं तरी पुढे थोड्याच काळात आपण अशा कॅल्क्युलेटिव्ह स्त्रीच्या आयुष्यात आलो नाही तेच उत्तम झालं असं लक्षत आलं असणारच...
उदाहरणे!
अशी अनेक उदाहरणे मैत्रीणींच्या बाबत पाहिली आहेत
खालच्या/ वरच्या जातीचा धर्माचा इतकेच काय पण ९६कुळी नसण्याचा उल्लेख करून प्रपोजल धुडकावलेली (आनंदाने/दु:खाने) पाहिली आहेत.
मला तर ती मुलगी हुशार आणि प्रॅक्टिकल वाटते.
खालच्या/ वरच्या जातीचा
आई ग्ग.. पण त्या वेळी धुडकावण्यापूर्वी एकच वाक्य अलीकडे "मलाही तू आवडतोस, पण.." असं आधी म्हणून पुढे लगेच खालच्या जातीचा उल्लेख केला असेल? प्रत्यक्ष वाक्य सांगणं कठीण आहे म्हणा..
अशा कॅल्क्युलेटिव्ह
प्रत्येक माणूसच कॅलक्युलेटीव्ह नसतो का? एखादी व्यक्ती आपल्याला अनुरूप आहे का याचा विचार करणं हे सुद्धा गणितच झालं ना! (हे जातीवरून नकार देण्याचं समर्थन अजिबात नाही. या मुलीची मूल्यं आणि तुमची-माझी मूल्यं बहुदा समान नाहीतच.) पुढचा विचार करता तिने योग्य तोच निर्णय घेतला असं मलाही वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अगदी अगदी. कॅल्क्युलेटिव्ह
अगदी अगदी. कॅल्क्युलेटिव्ह असण्यात वाईट नाही, शिवाय सर्व लोक तसे असू शकतील याविषयीही दुमत नाही.
पण प्रस्तुत लेखक (म्हणजे कथेतील पात्र) नाही दिसत ना असा पक्का हिशेबी आणि कॅल्क्युलेटिव्ह.. म्हणून असा विजोड जोडा बनला नाही ते बरं असं म्हणणं होतं. पुढे आणखी कठीण झालं असतं..
शिवाय कॅल्क्युलेटिव्ह असण्यात एक चतुराई असते. तुझं घर पत्र्याचं आहे, किंवा तू खालच्या जातीतला आहेस असं आवर्जून सांगण्यातली क्रूरता नसते, तस्मात या मुलीचं पात्र निराळंच आहे असंही आता वाटतं..
ईंजिनीयर!
अहो गवि , मी सुद्धा एकाला 'मला तू आवडतोस पण तू इंजीनीयर होणार आहेस ' असं सांगून बाद केला होता.
म्हणजे इंजीनीयर काही कमी नव्हे हो. पण आय वॉज कॅल्क्युलेटिव ड्युरिंग दॅट पिरीयड.
मी सुद्धा एकाला 'मला तू
क्रौर्य.. क्रौर्य.. क्रौर्य.. पाषाणहृदयी कुठली.. केवढा आघात झाला असेल बिचार्यावर.. तोच का केळकर ??
तोच तो!
मला वाटलंच तुम्ही लग्गेच ओळखणार म्हणून.
प्रत्येक माणूसच कॅलक्युलेटीव्ह नसतो
प्रत्येक माणूसच कॅलक्युलेटीव्ह नसतो का
"प्रत्येक माणूस " मध्ये मीही येतो म्हणून पुढील स्पष्टीकरण :-
"नातेसंबंध" ह्या गोष्टींत मी अजिबात कॅल्क्युलेटिव्ह नाही. विशेषतः ज्या अर्थाने इथे चर्चा चालली आहे, त्या अर्थाने अजिबात नाही.
जी आवडली, जिच्याशी आपलं चांगलं जमतय तिच्यासाठी "हो मला आवडलीस. तुझ्यासाठी आख्ख्या जगाशी भांडण घ्यायला मी तयार आहे." असं म्हणणारी , शब्दावरून मागं न हटणारी, एकदा "आपलं माणूस" म्हटलं की त्याची जिम्मेदारी घेणारी एक धाडसी/अव्यवहारी/भावनिक्/भावनिकमूर्ख्/निस्सिम प्रेम करणारी/आपल्या आवडीशी दृढ राहणारी एक (बहुदा अल्पसंख्य) जमात आहे. त्या जमातीचा मी सदस्य आहे. आमच्या जमातीतल्या लोकांना "खाप"वाले सगोत्रीच्या नावानं काय किंवा आंतरजातीय किम्वा आंतरवर्गीय्सुद्धा कारण पुरेसे ठरवून धरुन बडवतात. जीवेसुद्धा मारतात. हे ठाउक असूनही आम्ही तसेच करतो. अर्थात मोठ्ठे डेरिंग करून दाखवणे हा आमचा उद्देश नसतो. " हे मला आवडलं. मला हेच करायचय." असा सरळ साधा हट्ट असतो. आम्ही मनस्वी आहोत. जे करतोय ते मनापासून करतो. सर्वस्वी त्यातच तल्लीन होतो. त्यात कॅल्क्युलेटिव्ह होउन "आपल्या जीवाची रिस्क आहे का " किंवा "आपल्यातलीच करुन घेतली तर अधिक चांगले टायअप्स होतील. रक्कम मिळेल." अशी व्यापारी गणितं आम्ही धुडकावून लावतो.
"हिच्याहून चांगली मिळू शकते का" असा विचार ती आमच्या सोबत असेल तर आम्हाला करताच येत नाही. कारण आमच्यासाठी ती अतुल्य असते.
पण ह्यामुळेच आम्ही कित्येकदा व्यावहारिक जगात वेडे म्हणवले जातो. परवा strategic planning करुन एक जण त्याचा त्याला कसा profit झाला हे सांगत होता. खरेतर इतरांनीही असेच करावे असे पटवून देत होता. आम्ही त्याला शरण जात नाही म्हटल्यावर शेवटचे अस्त्र त्याने बाहेर काढले व म्हणाला "(आपल्या निवडीशी प्रामाणिक राहून) नेहमी असाच(निम्नमध्यमवर्गीय ) रहायचय का. त्याऐवजी काहीतरी (आर्थिकदृष्ट्या readymade) उत्तम असे शोध. किती प्रचंड profit होइल ते बघ. "
आमचं उत्तर एकच "here i m looking at BENEFIT you are looking at PROFIT"
.
असो. अवांतर होतय.
अर्थात, अशी आपली आवड कोणती हे शोधण्यालाच कॅल्युलेटिव्ह म्हटलं असेल तर माझा वरील प्रतिसाद बाद समजावा. अन्यथा कॅल्क्युलेटिव्ह नसणारी एक जमात आहे हे ध्यानी आणावे म्हणून हा प्रतिसाद.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाहिजे जातीचे
गवि,
'पाहिजे जातीचे' हे विजय तेंडुलकरांचे नाटक बघितले आहे का ? त्यातली हिरॉईन (सुषमा तेंडुलकर), जेंव्हा महिपती बब्रुवाहन पोरपार्णेकर (विहंग नायक) याला,एका सुरात बापाने पढवलेले, हे असेच काहीतरी ऐकवते, तेंव्हा अंगावर काटा येतो.
वरील कथा वाचली तेंव्हा मला त्याचीच आठवण झाली.
छ्या !
तेच तेच आणि तेच....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
काय तेच ते ?? प्यार के साईड
काय तेच ते ?? प्यार के साईड ईफेक्ट्स??
.
नाह !
नाह !
एकाच साच्याचे आणि विचारसरणीचे लिखाण.
मी फार अभ्यासू आहे किंवा फार जग वैग्रे बघितलय अशातला भाग नाही, पण वाघमारे साहेबांचे लेखन हे साधारण कुठल्या दिशेला वळणार हे लगेच कळायला लागलेले आहे.
स्पष्ट सांगायचे तर त्याचे 'उच्च-निच्च' ह्या विषयाला सोडून (किंवा कुठल्याही अंगाने स्पर्श न करणारे) लिखाण वाचायला जास्ती आवडेल.
हान त्यांचे सर्व लिखाण एकत्र करून वाचले तर काहीसा वेगळा अनुभव नक्की येईल, पण दर चार दिवसांनी तुकड्या तुकड्याने ठरावीक वळणावरती येऊन ठेपणारे लिखाण कदाचीत मला आवडले नसावे असे देखील असेल. किंवा माझी आकलनशक्ती देखील कमी पडत असण्याचा संभव आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
हम्म
हे लिखाण साध वाटल. वरच्या अदिती आणि साती यांच्याशी सहमत. ती मुलगी स्मार्ट आहे यात प्रश्नच नाही
.
व्यावहारीक प्रेम.
काही मुली अगदी व्यावहारीकपणे प्रेम करतात याचं अगदी वेगळंच उदाहरण माहीत आहे. आमच्या छोट्या गावातली गरीब ब्राम्हणाची मुलगी, एका तथाकथित खालच्या जातीच्या आणि मुसलमान मुलाच्या (त्यावेळी माझ्यासाठी हे नवीनच होतं पण हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ़व्यवसायानुरूप जातीव्यवस्था, धर्मांप्रमाणे थोड्याच बदलतात?) प्रेमात पडली. मुलगा अतिशय हुषार, उत्तम नोकरी असलेला, उच्चशिक्षित आणि देखणा असल्याने खरंतर तिच्यापेक्षा उजवाच होता पण तरी लहान गावासाठी 'ब्राम्हणाची पोरगी, मुसलमानाचा पोरगा' वगैरे भलतंच प्रकरण होतं आणि हे प्रकरण काही कोणाला झेपणार नाही अशी खात्री होती. तिच्या आजूबाजूच्या काही 'हितचिंतकांनी' तिला 'व्यावहारीक शहाणापण' शिकवायचा प्रयत्न केला तरं तिने त्यांना शांतपणे विचारलं "त्याच्यासारखं चांगलं स्थळ मला आमच्या जातीत येईल का? समजा शिकलेला असेलच तर एवढी चांगली नोकरी असेल का? माझ्या घरच्यांना असल्या स्थळाशी लग्न करून द्यायचा खर्च परवडेल का? कुठल्यातरी कारकूनाशी लग्न लावून देतील ज्याला माझी जराही कदर नसेल."
पुढे घरच्यांना स्पष्टपणे सांगून त्याच्याबरोबर निघून गेली, लग्न केलं, त्याच्य घरून पाठिंबा होता त्यामुळे सुरवातीला काही काळ त्याच्या कुटुंबियांबरोबर, त्याच्या गावाकडच्या 'पत्र्याच्या घरात' गुण्यागोविंदाने राहिली, त्याच्या घरच्यांकडून खूप प्रेम मिळतंय म्हणाली. कालांतराने नवीन घर, स्वतंत्र संसार, मुलेबाळे सारं आलं. तिने आपला धर्म सोडला नाही, त्याने आपला लादला नाही, गावातल्या ़काही सुधारक ब्राम्हणांकडे ती 'सवाष्ण' म्हणून जेवायला गेल्याचेही ऐकीवात आहे (ह्या अजून वेगळ्याच स्त्रीवादी समस्या..जाऊ दे. )
आता तिच्या सुखवस्तू संसाराकडे पाहिलं की तिच्या व्यावहारिकपणाचं कौतुक वाटतं!
सतिष, तुम्ही छान लिहिता पण तुमचा जगाकडे पहायचा दॄष्टीकोन थोडा(च) पूर्वग्रहदूषित वाटतो, जातीचे पीळ सहजासहजी जात नाहीत हे खरंच आहे, भेदभाव करत नाही असं म्हणणारेही तो करत असतात हेही मान्य आहे पण तरीही जगाकडे आणि इथल्या सगळ्या समस्यांकडे फक्त जातीधर्मांच्या चष्म्यातूनच पहायचे असे म्हटले तर ते सरसकटीकरण वाटतं आणि काही अंशी आतापर्यंत झालेल्या बदलांकडे नकारात्मकपणे पाहिल्यासारखं वाटतं. भारताबाहेरच्या समाजात राहून तिथल्या भेदभावांच्या राजकारणाकडे जवळून लक्ष दिलं तर हे जाणवतं की तुलनेने भारतातली वर्णव्यवस्था अतिशय पुरातन असली आणि त्यामुळे जास्त प्रथापित असली तरी गेल्या साठ वर्षांत बदलेली मूल्ये अतिशय लक्षणीय आहेत आणि भारतीय समाज हा बदलांना बराच अनुकूल आहे. हे अजिबात पुरेसं नाही आणि समधानकारक नाही हे मान्यच आहे पण फक्त सरळधोपट विद्रोहापेक्षा आता ही चळवळ अधिक जबाबदार, वैचारिक रुपात जायला हवी असं वाटून जातं.
उत्तम प्रतिसाद
संयत व उत्तम प्रतिसाद. सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
वा! अतिशय मार्मिक आणि संयत
वा! अतिशय मार्मिक आणि संयत प्रतिसाद!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रुची यांचा प्रतिसाद, विशेषतः
रुची यांचा प्रतिसाद, विशेषतः शेवटचा परिच्छेद हा अप्रतिम आहे. सुंदर संयत शब्दात समजावलं आहे. अत्यंत सहमत. प्रतिसादाला उत्तम श्रेणींची मर्यादा ५ पर्यंतच का आहे? अशा वेळी वाटतं की एकाच वेळी १० मार्मिकपणाचे गुण देण्याची सोय हवी.
धन्यवाद..
hats off
hats off
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला एक कळत नाही - एका
मला एक कळत नाही - एका व्यक्तीचे विचार/पद्धत आपण स्वीकारु का शकत नाही? त्या व्यक्तीने हरहुन्नरी विविध विषयांवर लिहावे हा आग्रह का? प्रत्येकाचा त्याच्या अनुभवांनुसार, पिंडानुसार एक चष्मा असतो, त्या व्यक्तीला तसे लिहीण्याचे स्वातत्र्य आहे. अशा नाना थरातील, नाना अनुभवांतून आलेल्या लोकांनी संस्थळाचा स्वभाव बनतो. जर वाघमारे जातीयवादी लिखाण जास्त प्रकर्षाने करत असतील तर त्यात नक्की वाईट काय आहे?
माशाला झाडावर चढता येत नसेल, चढायचे नसेल तरी त्याने त्याच्या पोहण्याच्या कलेत काहीच कमतरता येत नाही. माशाने पोहावे, खारीने झाडावर चढावे, पक्षांनी उडावे. माझे म्हणणे हे आहे की तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर वाचायचे आहे म्हणून लेखकाने विविध विषयांवर लिहावे हा हट्ट का?
मला तरी असे वाटते की जात-पात आली की आपण थोडे बिचकतो. तो विषय टाळायचा प्रयत्न करतो. पण जात तर अजूनही गेलेली नाही. मग हे टाळणे केवळ शहामृगाने वाळूत तोंड खुपसण्यासारखे नाही काय? त्यांना जर त्यांचा दृष्टीकोन (एकांगी अथवा कसाही) मांडायचा असेल तर त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध आहेच. इतरांनी स्वतःची बाजू मांडावी.
मला स्वतःला तरी "हे कर/ हे करु नको" ऐकायला आवडत नाही. सहजसुंदरतेने ज्याला जसे व्यक्त व्हायचे तसे होऊ द्यावे त्यातूनच संस्थळाचा एक रम्य कॅलिडोस्कोपिक ऑरा तयार होतो.
एनी इनपुटस टू अबाव्ह थॉट आर वेलकम!
सतीश वाघमारे जातीयवादी लेखन
सतीश वाघमारे जातीयवादी लेखन करतात असं व्यक्तीशः मला वाटत नाही. (जातीयवादी हा शब्द निगेटीव्ह अर्थाने घेतला जातो.) एखाद्या घटनेचा खुलासा वेगवेगळ्या अंगांनी करता येतो, आर्थिक, सामाजिक, राजकीय, स्त्रीवादी, उत्क्रांतीवाद, इ. वाघमारे जातीय अंगाने घटनेचा अर्थ लावतात आणि त्यात सामान्यतः गैर अजिबातच नाही. पण एकाच अंगाने घटनांचं विश्लेषण करताना विश्लेषण एकांगी होण्याची भीती असते. एखाद्या घटनेला जातीय पैलू फार कमी असतात किंवा नसतात आणि अन्य पैलू अधिक, महत्त्वाचे असतात. अशा वेळेस एकांगी विश्लेषण अपुरं पडतं. हे तक्रारवजा प्रतिसाद आहेत ते अशा स्वरूपाचे आहेत.
त्याशिवाय ज्या व्यक्तीची वापरली जाते आहे त्यापेक्षा अधिक काही करण्याची क्षमता असते त्या व्यक्तीलाच "अजून थोडा वेगळा विचार करून पहा" असं सुचवलं जातं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा हा हा...
पोरगी प्रॅक्टिकल अाहे.
प्रेमभंगानंतर 'पत्र्याच्या घरात चंद्रमाधवीचे प्रदेश वाचत बसलो...' अाणि 'आज्जी मरण पावली होती झोपेतच...' चे टर्न थोडे जास्त सिरियस झाले.
पण हा भाग जर एका मोठ्या कथेचा असेल अाणि त्यात हे संदर्भ पक्के असतील तर कदाचित अतिशय परिणामकारक असु शकतात.
काही विचार
हा प्रतिसाद या कथेविषयी नाही, तर अनेक वाचकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या 'सतीश वाघमारे केवळ जातीचा ऍंगल असलेलंच लेखन करतात, त्यामुळे ते एकसुरी होतं' या आक्षेपाबद्दल आहे.
सर्वप्रथम, त्यांच्या लेखनाच्या बाजावरून, शैलीवरून हे उघड आहे की हे लेखन 'आत्मकथा' म्हणून समजलं जाण्याऐवजी 'ललित लेखन' 'कथा' या स्वरूपाचं आहे हे गृहित धरून वाचलं जावं. त्यामुळे या लेखनातून काही उपदेश शोधू नये, किंवा स्त्रियांनी व्यावहारिक असणं योग्य की अयोग्य याबद्दल चर्चा वगैरे करण्याचा प्रयत्न करू नये. समोर जे चित्र मांडलं आहे ते कलात्मकदृष्ट्या परिणामकारक आहे की नाही हा कळीचा प्रश्न.
'कळ्यांचे निःश्वास' या कथासंग्रहात किती कथा आहेत लक्षात नाही. किमान दहा तरी असाव्यात. त्या संग्रहावर 'निव्वळ स्त्रियांचीच दुःख सांगत बसल्याने एकसुरी' हा आरोप करणं योग्य ठरेल का? अर्थातच त्या सर्व कथांमध्ये ते एक समान सूत्र आहे. पण तसं समान सूत्र मारुती चितमपल्लींच्या कथासंग्रहांतही सापडेल. अरुण कोलटकरांच्या चिरीमिरीमध्येही सापडेल. एकाच विषयाचे निरनिराळे पैलू एकाहून अधिक कथांतून मांडणं हे काही नवीन नाही, आणि साहित्यानुभवासाठी पोषकच आहे असं मला वाटतं.
माझ्या मते चांगल्या लेखनाचा निकष म्हणजे प्रत्येक कथा स्वतंत्रपणे भावली पाहिजे, शैलीने भुरळ घातली पाहिजे (नेहमीच घातली पाहिजे असं नाही), आणि अशा समान सूत्राच्या लेखनातून त्या सूत्राविषयी वाचकाला काहीतरी नवीन जाणीव (किंवा जुनीच जाणीव पुन्हा नव्याने) झाली पाहिजे.
नेमके
एकूण वाघमारे यांच्या लेखनाबाबतच हे लिहितोय. घासकडवी यांच्या प्रतिसादाची प्रेरणा. त्यामुळे त्यातूनच उद्धृत देत.
माझ्या मते, प्रक्रिया उलटी असेल तर ते अधिक नेमके होईल. हे लेखन ललित स्वरूपात, कथा समजून वाचलं तर त्यातून जो त्रोटक अनुभव येतो तो मग केवळ अशा जातीविषयक मुद्यावर केंद्रित करून ठेवतो. तेच येथे होते आहे.
वाघमारे यांनीच या संस्थळावर कुठं तरी लिहिलं आहे की हे सारं त्यांच्या आत्मकथनाचा भाग आहे. ते तसं असेल तर त्या लेखनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येते. पण पुन्हा येथे कालानुक्रम, लेखनाची त्यासंदर्भातील (असलेली किंवा नसलेली) आस्वादकता यांचा मुद्दा येतोच. त्यामुळे होते काय की, त्यांचे हे सारे लेखन तुटक प्रसंगांचे न्यारेटिव्हच वाटते. आणि मग त्यात असलेला सामान्यपणा लगेच कळतो. तो कळला की मग तरीही हा माणूस हे का लिहितो आहे, असा प्रश्न येतो आणि मग त्यातील जातीविषयक (अत्यंत महत्त्वाच्या) मुद्याकडे लक्ष जातंच. हे त्या लेखनाचं अपयश ठरतंय कारण मांडणीची रीत चुकतीये. हा मुद्दा फक्त जातीपुरताच नाही, एकूणच अनुभवांच्या खोलीबद्दलचाही आहे.
याच विशिष्ट लेखातील अनुभवापुरते बोलायचे तर, तो भेदक आहेच आहे. तो अलीकडच्या काळात घडला आहे हेही कळते आहे. म्हणजे, अलीकडच्या काळातही जातीअस्मिता किती आणि कशी आहे हे दिसते, निदान एका उदाहरणापुरते तरी (वास्तव त्यापेक्षा विपरितच आहे). पण या लेखनाच्या तुटकेपणामुळे केवळ त्याच अजेंड्यासाठी वाघमारे लिहितात हे जाणवू लागले तर तो वाचकाचा (एकट्याचाच) दोष नाही. पण लेखक त्याच्या तोऱ्यात आणि वाचक त्याच्या तोऱ्यात असे घडते, आणि या लेखनाकडे साहित्य म्हणून पाहण्याचा अवकाश शिल्लक रहात नाही.
आणि म्हणूनच वाघमारे यांच्या तुटक लेखनालाही ज्या रीतीने येथे प्रतिसाद दिले जातात ते पाहिले की, भरून पावलो असेच म्हणण्याची वेळ येते.
तुटकेपणाने हे अनुभव सामान्य आहेत. आत्मकथनात त्यांचे एक स्थान आहे, पण ते आत्मकथनाच्या संपूर्ण कॅनव्हासवरच दिसू शकते. एरवी भल्यामोठ्या कॅनव्हासवरच्या एका कोपऱ्यात चितारलेले निव़डुंगाचे फुल!
>>हा प्रतिसाद या कथेविषयी
>>हा प्रतिसाद या कथेविषयी नाही, तर अनेक वाचकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या 'सतीश वाघमारे केवळ जातीचा ऍंगल असलेलंच लेखन करतात, त्यामुळे ते एकसुरी होतं' या आक्षेपाबद्दल आहे. <<<
याबद्दल घासकडवींचं विवेचन वाचलं. हा आक्षेप रद्दबातल ठरतो असं वाटलं नाही.
लिखाण जातीय अंगाने आहे कारण लिहिणार्या माणसाची पार्श्वभूमी जातीय वास्तवाचे चटके बसलेल्याची आहे. एनाराय् लोकांनी नवीन अनुभवांचे वर्णन केल्यानंतर "बसा स्वतःचं कौतुक करत" अशा स्वरूपाचे आक्षेप केले गेल्याचं आठवतं.
तस्मात् आक्षेप घेणार्यांनाचे आक्षेप कदाचित खरे असतील. पण ते कितपत महत्त्वाचे आहेत ?
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
पटले नाही.
म्हणजे आक्षेप घेणारे लेखन समजूनच घेत नाहीत असे काहीसे म्हणायचे आहे का ? ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे कुठल्याही लेखाला तुम्ही 'वाह वाह' केलेत तरच तुम्हाला लेखन समजले आहे असा निघतो.
लिखाण सार्वजनीक ठिकाणी आल्यावर त्यावर मत-मतांतरे ही होणारच. लेखकाला जसे काही अनुभव आले असतील तसेच काही अनुभव प्रतिक्रिया देणार्याला देखील आले असतीलच की. मग फक्त लेखकालाच समजून घ्यावे अशी अपेक्षा का ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
प्रतिसाद
मी माझा संपादित करायच्या आत तुमचा प्रतिसाद आला. गैरसमजाबद्दल दिलगीर आहे. मी अधिक लिहून गेलो आणि म्हणूनच संपादित करत होतो हे (होपफुली) तुमच्या ध्यानात आलं असेल.
माझं म्हणणं इतपतच आहे की लिखाण "जातीय" असल्याबद्दलचे आक्षेप खोटे नाहीत. पण ज्या माणसाला असे अनुभव आलेले आहेत त्याने त्याबद्दल लिहिलं आहे आणि तसं होणं मला नैसर्गिक वाटतं. लिखाण "जातीय" आहे म्हणून ते आक्षेपार्ह असेल तर समस्त दलित आणि विद्रोही वाङ्मयच आक्षेपार्ह ठरेल का ?
याचा अर्थ वाघमारे यांच्यासारख्यांनी लिहिलेल्या कशाबद्दलही आक्षेप घेता कामा नये किंवा ते म्हणतात ते सर्व बरोबरच आणि स्तुतीसच पात्र ठरतं असं नव्हे. उदाहरणार्थ इथल्या लोकांनी - विशेषतः त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टीकोनाच्या बाबत - अगदी मुद्देसूद आणि यथायोग्य समाचार घेतलेला आहे.
माझा वाघमारे यांना (आणि त्यांच्या सारख्या इतरांना) सांगणं असेल तर ते हे की, त्यांनी आपलं लिखाण एकमार्गी न ठेवता, आपल्या लिखाणाला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांना, आक्षेपांना, प्रश्नांना उत्तरं द्यावीत. संवाद प्रस्थापित करावा. लिखाणामागची भूमिका, त्यातल्या आक्षेपार्ह वाटणार्या भागाचं स्पष्टीकरण इत्यादि गोष्टींमुळे एकंदर देवाणघेवाण अर्थपूर्ण ठरेल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मस्त !
यू सेड इट सायर !
हे आणि फक्त हेच अपेक्षीत आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
आत्मकथन आणि ललित लेखन
माझ्या मते आत्मकथन हाही ललित लेखनाचाच एक उपसंच आहे. सत्य विश्वाच्या अधिक मर्यादा त्यावर येतात. कालक्रम, आसपासच्या जगात घडणाऱ्या घटना यांच्याशी किमान ताळेबंद जमलेला असावा लागतो. चौरस हाही आयताचाच प्रकार असतो, अधिक बंधनं असलेला - तसंच काहीसं.
आत्मकथनावर जशी बंधनं येतात, तसाच त्याचा फायदाही मिळतो. कुठल्याही लेखनात लेखक, निवेदक विश्वासार्ह बनण्यासाठी जितका खटाटोप करावा लागतो, तितका 'हे आत्मकथन आहे' असं जाहीर केल्यावर येत नाही. काल्पनिक विश्व तयार करणाऱ्या लेखकाला, वाचकाला त्या विश्वात नेण्याची कसरत करावी लागते. सत्य विश्वाच्या बंधनांची मर्यादा स्वतःवर घालून लेखकाला वाचकाच्या जगातच वावरल्यामुळे हा खटाटोप करावा लागत नाही. वाचक फार सहजपणे डिसबिलिफ सस्पेंड करायला तयार होतो. त्या लेखनामागे एक हाडामांसाचा माणूस आहे हे एकदा मान्य केलं की त्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं जग तो आपल्या डोळ्यांनी बघायला तयार होतो. त्याने सहन केलेले दुःखाचे चटके स्वतःला लावून घेतो. कोणीतरी समोर बसून आपली कर्मकहाणी सांगत असल्याप्रमाणे सहानुभूती देतो. त्याचाच परिपाक म्हणून की काय, लेखकाची जाणवणारी प्रतिमा, व्यक्तिमत्व हे चटकन भिडतं.
पण ही सहानुभूतीची सहजता दुधारी तलवार ठरू शकते. चटकन लेखकाच्या कुशीत शिरण्याला तयार झालेला वाचक तितक्याच चटकन दूरही जाऊ शकतो. जितक्या जवळिकीने लेखकाची दुःखं आपली म्हणून स्वीकारायला वाचक तयार होतो, तितक्याच तीव्रतेने लेखकाच्या सांगण्यातून जरा काहीसं बोचणारं जाणवलं, व्यक्तिमत्वातलं खटकलं तर त्याला खुपतं. कारण लेखक हा त्रयस्थ कागदापलिकडचा अज्ञात निवेदक राहिलेला नसतो.
एनारायी लिखाणावर येणारा आक्षेप हा एकसुरीपणाचा नसून 'श्रीमंतांची दुःखं' स्वरूपाचा आहे असं वाटतं. (अर्थात गेल्या पंधरा वर्षांत इतके भारतीय परदेशांत गेलेले आहेत की त्याच त्या वर्णनांतून एकसुरीपणा आलेला आहेच, पण तो मुद्दा वेगळा.)
मी जेव्हा म्हटलं की या लेखनात उपदेश शोधू नये तेव्हा मला म्हणायचं होतं की ललित लेखनाकडे, (खऱ्या अथवा खोट्या) कथेकडे बघताना लेखकाकडे व्यक्ती म्हणून बघून जज करण्याऐवजी निवेदक, कथाकार म्हणून बघून कथेत गुंगून जाण्याचा प्रयत्न करावा. गुंगून जाता आलं तर ठीक, नाही आलं तर कथा जमली नाही. पण त्या लेखनाकडे विचार म्हणून बघितलं तर ती अनुभूती फसली. कधी त्याला वाचक जबाबदार असेल, कधी लेखक. इथे नक्की काय होतंय विचार व्हावा.
उत्कृष्ट प्रतिसाद.
तुम्ही नेहमी अशा विषयांवर खूप खोल प्रतिसाद देता आणि त्यामागची थॉट प्रोसेस अतिशय चपखल असते. हे वाचल्यावर आपल्याला एकदम जाणीव होते, की अरे किती खरं आहे हे, पण आपल्याला "जाणवलं"च नव्हतं. खरं तर ते जाणवून गेलेलं असतं पण तुमच्याकडे ते कौशल्य आहे ज्यामुळे तुम्ही ते उत्तमरित्या शब्दात समोर मांडता. टीकाकार, समीक्षक हे शब्द काहीतरीच वाटतात, तुम्ही एक उत्कृष्ट रसग्रहणकार आहात हे बराच काळ जाणवलेलं या प्रतिसादाच्या निमित्ताने लिहीतो आहे.
धन्यवाद.
काही प्रश्न :-
अगदी मान्य.
पण..
पण मग एखाद्या लेखनातून 'उद्देश्य' स्पष्ट जाणवत असेल तर काय करावे ?
हे ही मान्य.
पण..
लेखक जर स्वतःची निवेदक / कथाकार प्रतिमा विसरुन एखाद्या विषायावर 'जजमेंट' देण्यासारखा प्रयत्न करू लागला तर काय करावे ?
मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
??
>>एनारायी लिखाणावर येणारा आक्षेप हा एकसुरीपणाचा नसून 'श्रीमंतांची दुःखं' स्वरूपाचा आहे असं वाटतं. (अर्थात गेल्या पंधरा वर्षांत इतके भारतीय परदेशांत गेलेले आहेत की त्याच त्या वर्णनांतून एकसुरीपणा आलेला आहेच, पण तो मुद्दा वेगळा.) <<<
दुसर्या विधानामधेच पहिल्या विधानाला खोटं ठरवलं गेलेलं आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मूळ प्रतिसादातलं
मूळ प्रतिसादातलं वाक्य
एनारायी लिखाणावर येणारा "बसा स्वतःचं कौतुक करत" हा आक्षेप हा एकसुरीपणाचा नसून 'श्रीमंतांची दुःखं' स्वरूपाचा आहे असं वाटतं.
असं असायला हवं होतं.
एकसुरीपणाचा मुद्दा वेगळा. तो आलेला आहे यात वादच नाही. पण अनेक पुस्तकं, अनेक लेख वाचून तीच तीच वर्णनं आल्याचा अनुभव आणि एका लेखकावर दहा लेख वाचून होणारी तक्रार यात फरक आहे.
असा वाचकाचा ग्रह होणं हे त्या अनुभूतीचं आदानप्रदान अयशस्वी झाल्याचं लक्षण आहे. कधी कधी ते वाचकांच्या पूर्वग्रहामुळ होऊ शकतं. मात्र हे जर बहुतांश वाचकांच्या बाबतीत होत असेल तर लेखकाने गंभीरपणे त्याचा विचार करायला हवा.
अंमळ असहमत !
कुठल्याही एनाराती कृतीवरती मग ते लेखन असो वा प्रतिसाद येणारे आक्षेप हे बहोतकरुन 'जेलसी' मुळे असतात असा आमचा दावा आहे.
'संधी न मिळालेले' जसे 'संधी मिळालेल्यांना' एकपत्नीव्रत वैग्रेची उदाहरणे देऊन आपण कसे 'सुसंस्कुत्र' (असेच लिहितात ना गं जगन्माते?) आहोत हे दाखवून हिणवण्याचा प्रयत्न करतात, त्यातलाच हा प्रकार.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
लेखाचे शीर्षक आणि मजकूर
लेखाचे शीर्षक आणि मजकूर यातल्या तफावतीवरून शैक्षणिक दर्जा का उंचावत नाही याची कल्पना येते.
जे १६-१७व्या वर्षीच मिळायला पाहिजे त्याची वाट पाहण्यात आणि त्यासाठी फिल्डींग लावण्यातच सगळा वेळ जातो.
मुलगा/मुलगी आवडला/ली की डायरेक्ट लग्न?
(तिलाही तो आवडत होता असे समजून) मुलगी अजिबात प्रॅक्टिकल वाटली नाही. लग्न म्हणजेच कोटकल्याण नाही हे मुलींच्या कधी लक्षात येणार?
की आपल्या सौंदर्याची पुरेपूर किंमत मिळण्यासाठी ते जपून वापरण्याची गरज वाटली?
की ठरवल्यासारखा नवरा, घर, संसार होणे म्हणजेच स्त्रीमुक्ती हे तिला कळले होते?
असो. एकंदरीत अनेक सामजिक प्रश्न मांडणारा अस्वस्थ लेख. लेखकाची नेहमीची शैलीदार लय थोडीशी बिघडली आहे इतकेच.
प्रतिसाद फार आवडला.
प्रतिसाद फार आवडला.
प्रत्येक मुलीने
प्रत्येक मुलीने स्त्री-मुक्तीचा विचार करावा, (किंवा प्रत्येक समलैंगिक, दलिताने आपापल्या चळवळीचा भाग असावं) अशी अपेक्षा वाजवी वाटत नाही.
असो. चांगल्या विनोदाने सुरूवात करूनही प्रतिसादाची लय थोडीशी बिघडली आहे इतकेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रत्येक मुलीने
बरोबर. प्रत्येक मुलीने काय, कोणीही मुक्तीचा विचार करावा अशी अपेक्षा अवाजवी आहे. तशी अपेक्षा मी प्रतिसादात व्यक्त केलीय असे मला वाटत नाही. लग्न म्हणजेच कोटकल्याण नाही हे, ज्यांनी मुक्तीचा विचार केला त्यांना कळलेलं सत्य, मुक्तीचा विचार न करणार्या मुलींना कधी कळणार ही काळजी* व्यक्त केलीय आणि स्वतःच्या फायद्याच्या व्यवहारी हिशेबांचे बंधन स्वीकारणे (काही बंधनं स्वीकारल्याने मुक्ती वाढते याचे हे उदाहरण नाही काय?) म्हणजेच मुक्ती आहे असे तिला भविष्याचा विचार करताना वाटले की काय असा प्रश्न पडला तो लिहिला.
बाकी प्रत्येक जण कॅल्क्युलेटीव्ह असतो हे वाक्यही वाजवी वाटत नाही. पण असो.
*कारण 'लग्न म्हणजेच कोटकल्याण नाही' हे ज्यांचं, समाजाच्या पावित्र्याबद्दलच्या रूढ विचारसरणीमुळे अथवा अन्य काही कारणामुळे, लग्न होत नाही वा होऊ शकत नाही अशा स्त्रियांनी म्हणणे त्यांच्यासाठी चांगले असले तरी त्यात एक प्रकारची अपरिहार्यता आहे. ज्यांचं सहज लग्न होईल अशांनी हे वाक्य जास्त प्रमाणात म्हटले आणि त्यावर अंमल केला तरच त्या वाक्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून ही काळजी.
एकंदरीत आवडले
लेख आणि त्यावर आलेले प्रतिसाद असे एकंदरीत 'पॅकेज' आवडले.
घासु गुर्जींनी म्हणल्याप्रमाणे त्या मुलीच्या व्यावहारिकपणावर चर्चा करण्यात अर्थ नाही (तरीही, ती चर्चा आवडली असे वर म्हणलेच आहे). पण तीला (नायिकेला) कथानायक मुळातूनच आवडत नव्हता आणि तिने एक कारण देऊन नकार दिला अशी शक्यताही आहे (कथेत नायिकेला नायक खरंच आवडला होता की नाही हे नायकालाही कळलेले नाही, असा संभ्रम लेखकाने ठेवलेला वाचकाला जाणवला असेलच). कोणाला थेट "तू मला आवडत नाहीस" असा हृदयभंग पचेल तर कोणाला "ये शादी नही हो सकती" असा पचेल...
-Nile
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार . उत्तर द्यायला बराच उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व ! महाविद्यालयात चालू असलेल्या कार्यक्रमांची जबाबदारी बोकांडी असल्याने इथे जास्त काळ येता आलं नाही. वेळ मिळेल तसं वाचन चालू होतं.
सर्वाँचे प्रतिसाद वाचले बर्यापैकी एकसुरी व माझ्यावर थेट जातियवादी लिखानाचा आरोप करणारे ! माझी दुसरी बाजू जाणून घेऊन विश्लेषण करणारे प्रतिसाद फार थोडे. अर्थात सर्व प्रतिसाद कर्त्यांचे प्रतिसाद माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे , मोलाचे आहेत. पण मी विशेष आभार मानीन ते मुक्तसुनित, राजेश घासकडवी, विक्षिप्त आदिती, रुची आणि सारीका यांचे ! लिखानाची समीक्षा करताना आवश्यक असणारा प्रचंड वैचारिक, सामाजिक समतोल मला उल्लेख केल्या वरील लोकांमधे आढळला. बाकिचे प्रतिसाद वैयक्तिक पातळीवरील जास्त होते. त्या अनुषंगाने मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझ्यावरील पहिला आरोप तो म्हणजे जातियवादी लिखानाचा. तोच मी स्पष्टपणे नाकारतो. या संस्थळावर लिहिण्याकरीता मी खास ठरवूनच हे विषय निवडले आहेत. हे खरे आहे. कारण लिहिण्या आधीच्या इथल्या वाचनात मला कुठेच माझ्या परिचयातील जगाचा मागमूस इथे जाणवला नाही. म्हणुन अधिक जाणिवपूर्वक मी हे विषय इथे निवडले. पण तरीही माझ्या लिखानातून प्रचारकी थाटाने मी काही मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही.
परिकथेतील राजकुमार यांचं मत तेच ते, तेच ते, आणि तेच ते. शिवाय त्यांना जाणवणारा मी बौद्धिके घेत असल्याचा जबरी भास ! या प्रकारचे आरोपीत रोख त्यांचे माझ्या लिखानावर आहेत. त्यांनी धारण केलेलं नाव इथे लक्षणिय वाटते. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांना जग गुडी गुडी वाटतेय परिकथेसारखे .त्यांच्या भोवतीचं सुरक्षित वातावरण भोवतालच्या विविध जातिनिहाय लोकसमुहांभोवती देखील आहे. असा एकूण त्यांचा समज दिसून येतो. तेच ते तेच ते आणि तेच ते विषयी राजकुमारांच्या मताचा पुर्ण आदर करुनही मला प्यासा मधलं गुरुदत्तचं गाणं आठवतं "हम गम जदा है लाये कहांसे खुशी के गीत , देँगे वही जो पायेँगे इस जिँदगी से हम " त्यामुळे त्यांच्या वेगळ्या चाहतकडे भोवतालच्या सामाजिक संस्कारातून पाहत त्यांचा आदर ठेवत त्यांच्या मताला अधिक गांभिर्याने न घेत पुढे जातो.
रुचिंचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा ! अत्यंत वैचारिक वेगळेपण दर्शविणारा . त्यांनी चळवळीच्या बदलत्या स्वरुपाची दिशा कशी असायला हवी याचं अत्यंत होकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.त्यांचे आभार आणि त्यांच्या मताचं मनःपूर्वक स्वागत. त्यांनी वापरलेला माझ्या बाबतीतील पूर्वग्रहदूषित दृषटीकोन हा शब्द पटला नाही. हेच विषय लिहिण्याची कारणे वर दिली आहेतंच. अजुन एक , मला स्वतःला प्राध्यापक म्हणुन घडवणार्या मँडम या ब्राह्मण समाजाच्या आहेत आजही त्यांना कुणी मुले किती हा प्रश्न विचारला तर त्या मला मोजून तीन सांगतात. त्यांच्या वैचारिक शिस्तीत माझी जडणघडण झाली आहे. त्यामुळे कुणा एका जातीचा द्वेष हा माझ्यावरचा संस्कार व मानसिक गरज दोन्ही नाही ! माझा जाणवत असलेला विरोध हा जातिनिहाय नसून प्रवृत्तीनिहाय आहे हे आपण लक्षात घ्यावे ही रुचिंना आणि इतर सर्व सदस्यांना नम्र विनंती. बाकी सारीका आणि विक्षिप्त आदिती यांचे खूप खूप आभार ! राजेश घासकडवींच्या विश्लेषणाला तोड नाही. धन्यवाद !