बहुगुणरमणीय
पावसाळ्याबद्दल सारेच लिहितात, सार्या वयाचे, सार्या पेशाचे! साहित्यिकांचा फार आवडता आहे तो; कारण तो वेगळा आहे – बहुगुणरमणीय!
पण सूक्ष्मपणानं त्याच्याकडे कोणी बघतच नाही.
जगातल्या सगळ्या द्वंद्वांप्रमाणे ‘शीतोष्ण’ हेही एक प्रसिद्ध द्वंद्व आहे. भूगोलाच्या काटेकोर नियमांमुळे सहा-सहा महिने पृथ्वीला हे द्वंद्व सहन करावं लागतं. या द्वंद्वाला धूप न घालता त्यांच्या पार जाऊन आपलं अस्तित्त्व दाखवणारा म्हणून पावसाळा वेगळा!!
गंमत अशी की उन्हाळा, हिवाळा अध्याह्रत धरले तरी पावसाळा हा ‘बनवलेला’ की ‘स्वयंभू’ असा प्रश्न पडावा. मुळातच तीन ढोबळ ऋतू मानणं ही केवळ सोय आहे. पंचेंद्रिये जागृत असणार्याला रोजचा दिवस नवा असतो; नवा ऋतू, त्याच्या छटा, त्याची हवा, रंग-ढंग निरनिराळे भासतात.
हेच बघा ना, २२ डिसेंबरला सर्वात मोठी रात्र उलटली की अधिकृतपणे दिवस मोठा व्हायला लागतो पण थंडीचा कडाका तेव्हाच जोरदारपणे जाणवतो. अशाच थंडीच्या परोक्ष हळूच उन्हाळा आपली चाहूल देतो ती तिळगूळ आणि मकरसंक्रांतीतून, पुढे येणारी होळी उघडउघड अंगावर गार पाणी ओतते – जणू पुढल्या ज्वाळांची चुणूक त्यांना आधीच लागली असावी..
वसंतातलं सदाबहार ऊन नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याच्या पहिल्यावहिल्या दिवसांसारखं असतं – सरत्या काळाबरोबर आपला तडाखा ते कधी वाढवतं, काही पत्ता लागत नाही! २१ जूनपर्यंत ही ससेहोलपट मोठ्या गंमतीनं निसर्ग पाहतो आणि सूर्याला दक्षिणायनात पिटाळतो – पुन्हा मघासारखंच – दिवस अधिकृतपणे लहान व्हायला लागला तरी वैशाखवणव्याच्या झळा एव्हानाच जास्त बसतात. मग येणारी थंडी मात्र पावसाच्या मर्जीने येते..
पावसाचं राज्य सुरु असताना मात्र हे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण अन् भाद्रपद एका वेगळयाच दुनियेला आंदण दिल्यासारखे असतात. चातुर्मास – देवशयनी ते उत्थापिनी! देवही निर्धास्तपणे झोपू शकतो असे चार महिने!!
देव नसतो, तर चार महिने सृष्टी सांभाळतो कोण? – अर्थात पाऊस! पाऊस सरल्यानंतर मग शरदातलं ऊनच काय, चांदणंही लोक जागून काढतात..या उन्हाचा विशेष सांगायचा तर ‘उनपावसाचे’ तडाखे खाऊन परिपक्व बनलेलं ऊन असतं हे..
सरत्या पावसानंतर येणार्या थंडीबरोबर कालक्रमणा चालू लागते ती अंतिम वाटेकडे – २१ डिसेंबर – चक्र पूर्ण होतं – जुनं पाणी वाहून जातं – नवे धुमारे फुटू लागतात..जीवन यापेक्षा वेगळं असतं काय?
पण तरी पावसाळ्याचा प्रश्न भिजत पडलाच की..(गंमत पहा, प्रश्न नेहमी ‘भिजत’ पडतो, तापत किंवा कुडकुडत नाही या भिजण्यात – या सातत्यात बहुदा पावसाचं इंगित सामावलेलं असावं) जरा निराळ्या पद्धतीनं हे मांडून बघू आणि थांबू..
सुख-दु:खांचं, ऊन-थंडीचं चक्र आपल्याला नवं नाही; दु:खानंतर येणारं सुख सगळ्यांनाच हवं असतं, किंबहुना ते भावतं-साजरं केलं जातं – रात्रीनंतर येणारी पहाट सूक्तांना जन्म देते तसे दु:खानंतर येणार्या सुखाचे गोडवे गायले जातात; पण सुखानंतर येणारं दु:ख मात्र सगळेच बघू शकत नाहीत.
ऋतूंचही असंच असावं – थंडीनंतरच्या उन्हाचं सगळेच स्वागत करतात पण उन्हानंतरच्या थंडीचा सामना थेट करावा लागू नये म्हणूनच की काय पावसानं आपली जागा या दोघांच्या मध्ये मुक्रर केली असावी!
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स, संवाद पुरवणी, जुलै २००२)
प्रतिक्रिया
छान मुक्तक! आवडले!पाऊस
छान मुक्तक! आवडले!
पाऊस त्यातही भारतातील मान्सून वातावरण आमुलाग्र बदलतो हे खरेच!
अवांतरः
झैरात म्हणा हवां तर. या निमित्ताने पहिल्या पावसाच्या आठवणी आणि मुक्तक लिहिले होते त्याची आठवण झाली, तेव्हा त्या लेखनाचा दुवा देतो:
छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे: भाग १ | २ | ३
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शुक्रिया ऋषिकेश.
दुव्याबद्द्ल आभार..जरुर वाचेन..
खोदा पहाड और...
नांव वाचून खूप आनंदाने आणि आशेने धागा उघडला, पण त्यात सर्क्याचा दवणू झाल्याचं (पोहर्याचा अण्णू होतो त्याप्रमाणे!) आढळलं!!!
धागाकर्त्यासः तुमच्याबद्दल यत्किंचितही अनादराची भावना नाही. पण त्याचं काय आहे ना की तुमच्या आयडीचा मराठी जालविश्वावर एक निराळाच रेफरन्स आहे. म्हणून वरील प्रतिक्रिया दिली गेली. राग नसावा....
बाकी पावसाळा ह निश्चितच बनवलेला ऋतू आहे, तोही भारतीय उपखंडात; मोसमी वार्यांमुळे. उर्वरीत जगात दोनच ऋतू: उन्हाळा आणि हिवाळा! पाउस दोन्हींमध्ये पडतो!!
यू इज राईट!
उसगावात येऊन हे प्रकर्षानं जाणवलं..
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
याची महती तेव्हा कळली..
पावसाळ्याचं अतोनात कौतुक...
मला वाटतं की पावसाळ्याचं आपण जरा जादाच कौतुक करतो. खरं पाहता त्यासारखा त्रासदायक ऋतु मला तरी दिसत नाही. रस्त्यात चिखल, पाणी साठून रस्ते बंद, वीज जाणे असल्या शहरी आपत्त्या पावसाळ्यातच येतात. त्याबरोबर घामाची चिकचिक. उत्तर हिंदुस्तानात हवेतील उष्मा आणि दमटपणा ह्यांच्या एकत्र परिणामामुळे मनुष्य हैराण होतो असा माझा प्रदीर्घ अनुभव आहे. १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या ध्वजवंदनात उघड्या आकाशाखाली बसलेलं पब्लिक कसं हातातल्या आमंत्रणपत्रिकेनं वारं घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असतं ते आठवा.
ह्याउलट ऑक्टोबरच्यानंतर कोरडी हवा अंगाला लागू लागली की सुट्टीचा सीझन आल्याचा सुखद अनुभव येऊ लागतो. पुढचे चार महिने सर्वात चांगल्या हवेचे.
आपल्याकडे मात्र शास्त्रीय संगीतातून वगैरे 'बादरवा बरसन आये, एरी माई पिया नही आये' असल्या रडगाण्यांनी पावसाळ्याचं उगाचच कौतुक माजवून ठेवलं आहे. का तर म्हणे बादरवा बरोबरच परदेस गये पिया पण आता परतणार ह्यामुळे गाँव की छोरी उल्हसित होते! तिचं ठीक आहे, तिला ऑफिसात जायचं नसतं. कालिदासाच्या यक्षिणीला उंबरठयावर फुले मांडून ती मोजत यक्ष केव्हा परतणार ह्याचा हिशेब ठेवण्यापलीकडे त्रास नसतो. पण त्याच पावसाळ्यामुळं सकाळी ७ ३३ पकडून ऑफिसात पोहोचण्याची काळजी असणार्या आजच्या तरुणीचं जगणं हराम होतं हा विचार आपण कधी करणार?
घामाची चिकचिक पावसाळ्यात?
घामाची चिकचिक पावसाळ्यात? उन्हाळ्यात पाहिजे ना?
दमटपणा म्हणाल तर त्याला इलाज नाही. पण पावसाळ्यात ट्रेकिंगला जायला फार मजा येते, वातावरण खूप मस्त झालेले असते. वीज जाणे इ. प्रकार तर कधीही होतात, पावसाळ्यात काही विशेष नाही. उन्हाळ्यातही वीज जातेच. अर्थात पावसाळ्याचे खरे कौतुक शेतकर्यांना हेही खरेच. नोकरदारांसाठी विशेषतः महानगरांत जरा त्रासाचा ऋतू असतो, पण तितपतच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
घामाची चिकचिक पावसाळ्यात?
जिथे कोरडी हवा असते तिथे उन्हाळ्यात घामाचा त्रास होतोच असं नाही. हवेतलं बाष्पाचं प्रमाण वाढतं तेव्हा तापमान एखाद-दोन अंशांनी जास्त आहे असं वाटतं, शिवाय घाम येतो. थंडीत हे "feels like" तापमान, ढगांमुळे दोन अंशांनी वाढतं तेव्हा सुखद वाटतं. उन्हाळी, कोरड्या हवेत घामाच्या चिकटपणाचा त्रास होत नाही (पण त्वचा पोळून निघाल्यासारखं होतं). गोर्या कातडीच्या लोकांना सनबर्न चटकन होतात. ज्यांच्या शरीरात मेलॅनिन तयार होतं त्यांना याचा त्रास किंचित कमी होतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मान्यच, पण त्यातल्यात्यात घाम
मान्यच, पण त्यातल्यात्यात घाम येणे हे उन्हाळ्यात जास्त असे म्हणायचे आहे. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बिहार-उत्तर प्रदेश
<घामाची चिकचिक पावसाळ्यात? उन्हाळ्यात पाहिजे ना?>
'मंडे टु संडे इलेक्ट्रिसिटी बंद' असली MSEB style वीज मंडळं जिथं आहेत अशा उत्तर प्रदेश वा बिहार सारख्या भागात आणि तिथल्या लहान गावात ऑगस्टमध्ये जा म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. तिथला उन्हाळा तर भाजतोच पण पावसाळा अति वाईट. अंगावरनं घामाच्या धारा वहात असतात म्हणून रात्री झोपतांना पांघरूण नाही. ते नसल्यावर रात्रभर डास चावून चावून हैराण करतात.
सतीसावित्री पतिव्रता स्त्री नवर्याला जेवण वाढून शेजारी त्याला पंख्यानं वारा घालत बसली आहे असा सीन तुम्ही कौटुंबिक चित्रपटामधून पाहिलाच असेल. तो ह्यामुळेच!
हम्म हे रैट्ट आहे.
हम्म हे रैट्ट आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हॅ हॅ हॅ
आहा!!!!!!! पोहे, भजी आणि चहा!! इत्यादी पोस्ट अन् , कवी अन् फातुग्राफार यांनी त्याच्या कलाकृतीमध्ये ट्याग केल्यास प्रतिसाद म्हणून वरील वाक्ये वापरायचा मनोदय आहे.
>>मला वाटतं की पावसाळ्याचं
>>मला वाटतं की पावसाळ्याचं आपण जरा जादाच कौतुक करतो. खरं पाहता त्यासारखा त्रासदायक ऋतु मला तरी दिसत नाही.
तुमचं आमचं जमायचं नाही!! पावसाळ्यासारखा आल्हाददायक ऋतू दुसरा नाही. (हिवाळा आम्हा मुंबईकरांना माहितीच नाही)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
+१
मूळाचा मुंबईकर असूनही.. एकेकाळी भर पावसाळ्यातही ड्राफ्टर आदी आयुधे घेऊन दोन गाड्या बदलून दररोज प्रवास लागत असतानाही, आणि २६ जौलि किंवा तत्सम इतर अनेक प्रसंग भोगून ही, किंवा लेट गाड्यां / बसमध्ये तासनतास अडकूनही मला पावसाळा प्रचंड आवडतो.. का? हे सांगता येईल का माहित नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुळचे दुष्काळग्रस्त
मुळचे दुष्काळग्रस्त प्रदेशातले असुनही आम्हाला पावसाळा आवडत नै
गरज आहे, निसर्ग छान दिसतो, हवेचे प्रदुषण कमी जाणवतं वगैरे मान्य आहे पण...
पावसाळ्याचं कौतुक
मला वाटतं की पावसाळ्याचं आपण जरा जादाच कौतुक करतो. खरं पाहता त्यासारखा त्रासदायक ऋतु मला तरी दिसत नाही.
सहमत.
पहिला पाऊस, गरमागरम भजी, वाफाळलेला चहा, हातात हात घालून फिरायला जाणं, हिरवळ दाटे, धरणीचा पोपटी शेला, डोलणारे तॄणांकुर, सुखावलेला बळीराजा, ग्यानबा तुकाराम...
रिपरिप,चिखल, डास, सर्दट कपडे, मलूल, रोगट हवा, पडशी आणि वाहाणारी नाकं, रस्त्यावरील घाण आणि प्लास्टिकच्या पिशव्यांनी तुंबलेले नाले, पूर आणि प्रदूषित पाणी, मेलेले मासे आणि आजारी पडलेली माणसं...
हे म्हणजे...
हे चॉकलेट तुझ्यासाठी, अय्या क्रीम कलरचा शर्ट किती छान दिसतो तुला, मनालीला जायचंच हं आपण, ए,पण मुलगी हव्वीच हं मला एक अग्दी गोड तुझासारखी, कुरळ्या केसांची, गोबर्या गालाची, उद्या नाहीच का जमणार तुला भेटायला? चल, कस्ले चावट एसेमेस करतोस रे रात्री, मला बाई लाजच वाटते...
पांघरुणाच्या घड्या करायला शीक आधी, किती घोरतेस तू पण, च्यायला तासभर पण झोप नाही नीट, आता मॅचच बघत बसणाराहेस का रात्रभर, काय उपयोग तुझ्या खंडीभर नातेवाईकांचा, साला कामाच्या वेळी एक उपयोगाचा नाही, झालं, शनिवार आला की मित्रांकडे पळा आणि ढोसा, या पोह्यावर काही लिंबू, कोथिंबीर काही घालायचं असतं शिकवलं नाही वाटतं, हो, तुम्हाला कामाची टेन्शन्स आणि आम्ही काय हजामती करतो काय ऑफिसात?
सारखं.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
:)
लाँगफेलोच्या एका कवितेतल्या पुढील ओळी आठवल्या. त्या इथे यिन आणि यँगार्थांनी लागू व्हाव्यात -
Thy fate is the common fate of all,
Into each life some rain must fall,
बढिया!
नंदनशेट..
आंबा न आवडणारी ही माणसं!
>> खरं पाहता त्यासारखा त्रासदायक ऋतु मला तरी दिसत नाही. <<
आंबा न आवडणारी ही माणसं!
सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे
पावसाळ्याचे कौतुक करावे तितके
पावसाळ्याचे कौतुक करावे तितके थोडेच हे बाकी एकदम खरंय. विशेषतः गावाबाहेर फिरायला जाताना ढग दाटून आले की फार मजा यायची. एकटाच सायकल ताबडवत, मिरजेहून मेडिकल कॉलेजकडून तसाच पुढे पंढरपूर रोडवर आसपासचा ओसाड माळ पाहताना, अन परत फिरताना कळंबीच्या अगोदर एका स्पॉटवरून अख्खे मिरज दिसायचे त्यावर ढग जमलेले पाहताना जे भारी वाटायचं त्याची तुलना होणे नाही. पुढे पुण्याला आल्यावर सह्याद्रीच्या जोडीने पावसाचे अजून एक रूप दिसले. कोलकात्यातला दमटपणा मात्र उबगवाणा होता. तेवढे सोडल्यास बंगळुरातला पाऊसही अत्त्युत्तम. पण मिरजेखालोखाल मार्क देईन धारवाडच्या पावसाला. ते शहरही लैच भारी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं