इंडियन मेल्टिंग पॉट
दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे 85 किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे 3 मैल अंतरावर असलेल्या साधारण 65 एकर (500 X 500 m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या 5 छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. 5 उंचवट्याचा हा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेतील पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी,या परिसरात मोठे विस्तृत प्रमाणातील उत्खनन, 1968 ते 1982 या 14 वर्षाच्या कालखंडात केलेले आहे.
इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इतिहासकार भारताच्या गत कालाचे दोन भाग मानतात. यापैकी शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध याच्या कालापासून (इ.स.पूर्व 563 to 486 ) पुढच्या कालखंडाचे, ऐतिहासिक कालखंड असे नामानिधान केले जाते तर या पूर्वीच्या कालखंडाला, पूर्व-ऐतिहासिक कालखंड या नावाने ओळखले जाते. याचे कारण असे आहे की गौतम बुद्धाच्या कालापासूनच्या पुढच्या इतिहासाबद्दल,कोणत्या ना कोणत्या स्वरूपातला,लिखित पुरावा उपलब्द्ध झालेला आहे. मात्र या आधीच्या कालखंडाच्या इतिहासाबद्दल कोणताच लिखित पुरावा उपलब्ध नाही. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा, पूर्व-ऐतिहासिक कालातील सिंधू-सरस्वती संस्कृतीचा कालखंड, या दोन्हीना जोडणार्या कालात (bridging the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे.
इनामगाव येथील उत्खननावरून दिसून येते की या स्थानी, इ.स.पूर्व 1600 ते इ.स.पूर्व 700 या कालखंडात सातत्याने मानवी वस्ती होती. त्यामुळे असे म्हणता येते की इ.स.पूर्व 1600 च्या सुमारास विलयास गेलेली भारताच्या वायव्य भागातील सिंधू-सरस्वती संस्कृती आणि गौतम बुद्धांचा (इ.स.पूर्व 600) काल यामधील कालखंडाचा इनामगाव हा एक दुवा आहे. आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की मूर्तीपूजक सिंधू-सरस्वती संस्कृतीची जागा, अग्नीपूजक वैदिक संस्कृतीने इ.स.पूर्व 1900 ते इ.स.पूर्व 1600 या कालखंडात निदान उत्तर भारतात तरी घेतली होती. त्यामुळे इनामगाव येथील उत्खनन या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील मानवी वस्तीचे तीन कालखंडात विभाजन केलेले आहे. यापैकी पहिल्या कालखंडाला ((1600-1400 इ.स.पूर्व) ‘माळवा संस्कृती‘, 1400-1000 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘पूर्व जोरवे संस्कृती‘ आणि 1000-700 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘उत्तर जोरवे संस्कृती‘ या नावाने ते ओळखतात.
पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता असे मानतात की सिंधू-सरस्वती संस्कृतीतील वस्त्या, तेथे उपलब्ध असलेले जलस्रोत हळूहळू आटत गेल्याने पूर्वेकडे व दक्षिणेकडे सरकू लागल्या व यापैकी काही वस्त्या (Eventually) मध्य प्रदेशातील माळवा भागात स्थिरावल्या होत्या. इनामगाव मध्ये सर्वात प्रथम वस्ती करण्यास आलेले माळवा संस्कृतीतील मानव, हे या माळवा भागाकडून आलेले होते. या वरून असा निष्कर्ष काढणे फारसे चूक ठरणार नाही की मूळ सिंधू-सरस्वती खोर्यातून आलेल्या लोकांच्या वस्त्यांपैकी काही वस्त्या पुढे आणखी दक्षिणेला म्हणजे दख्खनच्या पठारावर सरकल्या व इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी येऊन स्थिरावल्या, किंबहुना इनामगाव मधील माळवा संस्कृतीतील वस्ती ही मूलत: सिंधू-सरस्वती संस्कृतीतील लोकांची होती. इनामगाव येथे उत्खनन झालेल्या माळवा संस्कृती घरांमध्ये सापडलेल्या आणि स्त्रीफलोधारणेचे प्रतीक असलेल्या स्त्री मूर्तींचे याच प्रकारच्या सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील वस्त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तींशी असलेले साधर्म्य लक्षात घेतले तर हा निष्कर्ष योग्य आहे असेच वाटते.
इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे 1400-1000 इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा-गोदावरी खोर्यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की माळवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.
पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात.
अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्या रसायनाला आपले खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू-सरस्वती खोर्यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू-सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील?
गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल?
या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो-रु-लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह ( Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत.
जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो:
“भारतात आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.”
“ Most Indian groups descend from a mixture of two genetically divergent populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), not closely related to any groups outside the subcontinent.”
या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप-एशिया मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे, याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे 4635 भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत.
याचा अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण झालेल्या भारतीय एकवटणार्या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर?
या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो:
” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय-युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.”
“It was a time of profound change, characterised by the de-urbanisation of the Indus civilisation, increasing population density in the Gangetic system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic religion.”
या 2100 वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला.
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व 300 मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या 200 ते 300 वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.)
जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो:
” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.”
“An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage.”
इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये.
शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व-ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया.
इ.स.पूर्व 10000 वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू-सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व 2000 पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान-निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.
सिंधू-सरस्वती खोर्यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार. इनामगाव मध्ये माळवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या, हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. या कालापासून हळूहळू या दोन संस्कृतींमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू होऊन एक नवे जनुकीय भारतीय मिश्रण तयार झाले व हे मिश्रण इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी बौद्ध कालापर्यंत (इ.स.पूर्व 600) अधिक अधिक दाट होत गेले.
या अहवालामुळे प्रकट झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वर्ण व्यवस्थेचे प्राबल्य हे इ.स.पहिल्या शतकानंतर भारतामध्ये रूढ झाले. हा शोध दोन कारणांसाठी विलक्षणच म्हणावा लागेल. प्रथम म्हणजे भारतात किंवा उत्तर-वायव्य भारतात तरी वैदिक संस्कृती, साधारणपणे सिंधू-सरस्वती संस्कृती विलयास गेल्यानंतरच, बहरात आली असली तरीही या अहवालाप्रमाणे त्या पुढची 2000 वर्षे तरी चतुर्वर्ण पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित नव्हती. दुसरे कारण म्हणजे ज्या धर्माचे सर्व लोकांमधील समानता हे महत्त्वाचे सूत्र होते तो बौद्ध धर्म ऐन बहरात असताना,किंवा इ.स.पहिल्या शतकात,ही चतुर्वर्ण पद्धती संपूर्ण समाजात अतिशय कडक रित्या राबवली जाऊ लागली.
मला हा शोध अतिशय रोचक वाटतो आहे कारण अनेक लोकांची अशी समजूत नव्हे खात्रीच असते की 4000 वर्षे पूर्वी जेंव्हा वैदिक संस्कृती भारतात उदयास आली तेंव्हापासून चतुर्वर्ण पद्धत रूढ झालेली आहे. या अहवालाप्रमाणे ही गोष्ट सत्य नसून प्रत्यक्षात समानतेचा उपदेश करणारा बौद्ध धर्म जेंव्हा सर्वमान्य होता त्या वेळेपासून चतुर्वर्ण पद्धत समाजात रूढ झाली. सारांशाने असे म्हणता येईल की चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे.
इनामगाव येथील मानवी वस्ती आणि या सारख्या शेकडो अज्ञात जागा या भारताच्या जनुकीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात कारण या अनेक इनामगावांमध्येच एका 2000 वर्षांच्या कालखंडात, खरीखुरी भारतीय व्यक्ती व खरा भारतीय जनुकीय गट, जनुकीय मिश्रणाने निर्माण झाला होता. यानंतर जातीव्यवस्थेचा किंवा चार्तुवर्ण पद्धतीचा एक मोठाच अडसर या जनुकीय मिश्रणापुढे निर्माण झाला व हे जनुकीय मिश्रण आहे तेथेच गोठून गेले.
4 सप्टेंबर 2013
प्रतिक्रिया
अतिशय रोचक
सत्यासत्यतेविषयी काहीच टिपणी करण्याइतकी माहिती नाही.
मात्र चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे हे जर खरे असेल तर त्याचा प्रसार भारतीय समाजाने जोपासलेल्या अनेक (खुळचट) समजांवर उतारा ठरावा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण लेख.
उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण लेख. ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणेच सत्यासत्यतेबद्दल काहीच भाष्य करण्याइतकी माहिती नाही, म्हणून काही प्रश्न आहेत.
जनुकीय अभ्यास करताना दोन जमातींमधल्या मिश्रणाच्या दराविषयी काही भाष्य करता येतं का? हे विचारण्याचं कारण असं की एवढ्या व्यापक भौगोलिक प्रांतावर, जिथे सांस्कृतिक एकजिनसीकरण झालेलं नाही तिथे मेल्टिंग पॉट काही दशकांत गोठून जाईल हे सकृत्दर्शनी विश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे या २१०० वर्षांचा आकड्यात किती शतकांची अधिक/उणेची माया आहे? याविषयी अभ्यासकांचं काही मत आहे का? मुळात चातुर्वर्ण्य व्यवस्था किती टक्के समाजांत किती खोलवर रुजलेली होती यावर काहीतरी भाष्य वाचायला आवडेल.
अधिक/उणी माया
निबंध वरवर चाळला.
अधिक/उणी माया : वेगवेगळ्या जाती-जमातींमध्ये बघता हा काळ १२०-१५० पिढ्यांच्या दरम्यान झाला. प्रत्येक जाती-जमातीबाबत बघावे, तर अधिक-उणे माया १५-२५ पिढ्या इतकी आहे.
जनुकीय मिश्रणाच्या विश्लेषणात "पिढ्यां"चेच गणित शक्य आहे. प्रत्येक पिढी = सरासरी ३२ वर्षे असे गणित त्यांनी वापरलेले आहे. (सरासरी म्हणजे पहिले मूळ होते, ते वय नव्हे. सर्व मुलांच्या वयात आणि माता-पित्यांच्या वयातील फरकाची सरासरी.)
भारतीय समाजाचे विघटन
या अभ्यासाप्रमाणे भारतीय समाज एकसंध होण्याची प्रक्रिया १९०० वर्षांपूर्वी अचानक थांबली या नंतर या समाजाचे फक्त जाती किंवा वर्णाप्रमाणेच विघटन न होता, भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती, या सर्व गटांनुसार विघटन होण्याची प्रक्रिया सुरु झाली.
@चंद्रशेखर - लेख वरवर चाळला.
@चंद्रशेखर - लेख वरवर चाळला. बर्याच ठिकाणी कन्सेप्चुअल घोळ आहेत. इनामगाव हे मेल्टिंग पॉट तुम्ही म्हणता त्या अर्थाने अजिबातच नाही. पण आत्ता तपशीलात लिहायला वेळ नाही. पुढच्या आठवड्यात लिहेन.
एकच फक्त - जेव्हा जोर्वे संस्कृती किंवा माळवा संस्कृती असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ 'आर्किऑलॉजिकल कल्चर्स' असा होतो - म्हणजे साधर्म्य दाखवणार्या पुरावशेषांचा एक किंवा एकाधिक समुच्चय. हे मटेरिअल कल्चरच्या बेस वर केले जाणारे वर्गीकरण आहे, त्याचा अर्थ ते दोन समाज पूर्ण भिन्न आहेत असा होत नाही. आणि जोर्वे संस्कृती ही दख्खन माळवा संस्कृतीचीच परिणत अवस्था आहे. (दख्खन माळवा आणि मध्यप्रदेशातलं माळवा या दोन वेगवेगळ्या पुरातत्वीय संस्कृती/ आर्किऑलॉजिकल कल्चर्स) आहेत.
इनामगाव किंवा डेक्कन चाल्कोलिथिकमधल्या कुठल्याच सांगाड्यांचं जनुकीय विश्लेषण झालेलं नाही.
जनुकीय विश्लेषण
नीरा
आपल्या समोर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला एक अभ्यास आहे. त्यातील निष्कर्षांप्रमाणे ४२०० वर्षांपर्यंत भारतात पूर्वज उत्तर भारतीय आणि पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यात जनुकीय मिश्रण अजिबात झालेले नव्हते. त्याचप्रमाणे १९०० वर्षांपूर्वी ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया अचानकपणे थांबली. त्यामुळे जे काही जनुकीय मिश्रण झाले ते मधल्या २३०० वर्षात झाले. इनामगाव सारख्या मानवी वसाहती याच कालखंडात होऊन गेल्या. त्यामुळे हे जनुकीय मिश्रण इनामगाव सारख्या वसाहतींमध्येच झाले असले पाहिजे असे मला वाटते. यात कन्सेप्चुअल घोळ कोठे आहे ते मला तरी समजू शकत नाही. इनामगाव मध्येच हे झाले असले पहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही. इनामगाव हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी घेतलेले आहे. तेथे जनुकीय मिश्रण झाले की नाही? का इतर कोठे झाले हे शास्त्रज्ञांनी ठरवायचे आहे.
माझ्या लेखाचा मुख्य हेतू भारतातील जाती किंवा चातुर्वर्ण व्यवस्था ही वेदकालीन असल्याची जी सर्वसाधारण समजूत आहे ती चुकीची असून ही व्यवस्था बर्याच नंतर रूढ झालेली आहे हे या अभ्यासावरून दिसते हे दाखवणे आहे.
त्यातील निष्कर्षांप्रमाणे
नाही, तो पेपर असा दावा करत नाही इफ आयॅम नॉट राँग.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ए एन आय आणि ए एस आय मिश्रण
माझ्या माहितीप्रमाणे मूळ इंग्रजीतील मजकूर असा आहे.
Modern Indians have a mixture of ANI and ASI genes, with the exception of the Andaman Islanders, who are exclusively ASI. Although the genome sequences of two unrelated individuals differ by only about 0.1 per cent, that difference provides clues about origins. Genetic markers that heighten the risk of certain diseases can also be located.
ANI and ASI had distinctive chromosomes. When ANI and ASI populations originally mixed, chromosomal segments from each group would have been long. The recombination of maternal and paternal genes would have broken up these segments per chromosome, per generation. By measuring lengths of chromosomes segments in genomes, the study can infer that ANI-ASI mixtures occurred continuously from about 4,200 years ago to about 1,900 years ago.
या वाक्यावरून ४२०० वर्षांपूर्वी असे मिश्रण होत नव्हते हा निष्कर्ष काढणे योग्य ठरावे.
चातुर्वर्ण्य केव्हा उत्पन्न झाले असावे?
<भारतातील जाती किंवा चातुर्वर्ण व्यवस्था ही वेदकालीन असल्याची जी सर्वसाधारण समजूत आहे ती चुकीची असून ही व्यवस्था बर्याच नंतर रूढ झालेली आहे हे या अभ्यासावरून दिसते हे दाखवणे आहे.>
चातुर्वर्ण्य व्यवस्था वेदकालीन असावी अशी सर्वसाधारण समजूत का असावी हे कळत नाही. कोणी असे विधान केले आणि भारताच्या पूर्वेतिहासाचे अजिबात भान नाही अशा कोणाच्या ते कानावर पडले - आणि असे खेदाने म्हणावे लागते की अशा पूर्वेतिहासाचे भान नसणार्या व्यक्तींची संख्या काही कमी नाही - तर त्याला ते सत्यवचन वाटू शकेल पण प्राचीन वाङ्मयाची तोंडओळख असणार्या व्यक्तीला हे सहज जाणवू शकेल की जातिव्यवस्था ही इ.स. १ च्या पुढेमागेच निर्माण झाली असावी.
असे म्हणण्याची कारणे पुढीलप्रमाणे:
१)प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये जातींचा वा वर्णांचा स्पष्ट उल्लेख केवळ एकाच ठिकाणी मिळतो आणि तो म्हणजे मंडल १०, सूक्त ९०, ऋक् १२ येथे पुरुषसूक्तामध्ये. (ब्राह्मणोस्य मुखमासीद् बाहू राजन्य: कृत:| ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत|| १०.९०.१२) ऋग्वेदकालामध्येहि चातुर्वर्ण्यव्यवस्था दृढमूल असती तर वेदांमध्ये तिचे डझनावारी उल्लेख मिळवयास हवे होते.
२)ऋग्वेदातील सूक्ते प्रदीर्घ काळपर्यंत केवळ मौखिक परंपरेत आणि विस्कळित स्वरूपात होती आणि व्यास नावाच्या वेदवेत्त्याने केव्हातरी - पण पाणिनिपूर्व काळात म्हणजे इ.स.पूर्व चौथ्या शतकाआधी - वेदांना आत्ताचे स्वरूप दिले असे दिसते. त्या रचनेत कसलीच सुसूत्रता दिसत नाही. विशेषेकरून निरनिराळ्या सूक्तांच्या निर्मितीचे पौर्वापर्य कोठेच जाणवत नाही. असे ढोबळ मानाने म्हणावयास प्रत्यवाय दिसत नाही की सूक्त जितके पाणिनीय व्याकरणाला जवळचे तितके ते अलीकडचे आणि ते जितके पाणिनीय व्याकरणापासून दूर तितके ते प्राचीन. पाणिनीय व्याकरणाला जवळच्या आणि म्हणून अलीकडच्या अशा सूक्तांचे अर्थ थोडेफार संस्कृताध्ययन केलेल्यालाहि समजू शकतात पण पाणिनीय व्याकरणापासून दूर अशा अनेक सूक्तांचा अर्थ केवळ वेदांचा सखोल अभ्यास केलेल्यांनाच लागतो. ( काही स्थाने तर इतकी दुर्बोध आहेत की जुन्या काळातील सायणाचार्यांना वा आधुनिक चित्रावशास्त्रींनाहि त्यांचा अर्थ नीट लागत नाही.) ही कसोटी लावली तर पुरुषसूक्त हे बरेच अलीकडचे वाटते कारण शालेय संस्कृतच्या ज्ञानावर त्याचा अर्थ लागतो. मासल्यादाखल वरील ऋक् पहा.
३) चातुर्वण्याचा उच्चरवाने घोष मनुस्मृति आणि तत्सम ग्रंथांमधून ऐकू येऊ लागतो, ज्यांचा काळ इ.स. १ च्या पुढेमागे असावा असे मानले जाते. गीतेमध्येहि चातुर्वण्याचे 'चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:'(४.१३) अथवा 'अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय:। स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:' (१.४१)असे उल्लेख आढळतात. गीता महाभारताचा भाग आहे आणि महाभारतातील भाषा पाणिनीयच आहे.
ह्या सर्वांकडे पाहता असे वाटते की चातुर्वर्ण्यव्यवस्था इ.स.१ च्या पुढेमागे निर्माण झाली असावी
पुरुषसूक्त +१, +/- इ.स १
पुरुषसूक्ताबाबत माहिती बरोबरच आहे. ऋग्वेदाचे हे एक सूत्र सोडल्यास जातिव्यवस्थेचा उल्लेख मिळत नाही. आणि ऋग्वेदाची पहिली आणि दहावी मंडले ही त्यातल्या त्यात अलीकडची आहेत. हे सर्व +१
पाणिनीचे सूत्र "शूद्राणाम् अनिरवासितानाम् । २.४.१०" हे गावाबाहेर निर्वासित न-केलेल्या शूद्र जातींच्या नावांविषयी आहे. त्या अर्थी गावाबाहेर निरवासित शूद्रसुद्धा त्या काळी असलेचे पाहिजेत. तर पाणिनीच्या काळापर्यंत पंजाबात तरी जातिव्यवस्था बरीच प्रस्थापित झाली असली पाहिजे. पाणिनीचा काळ ग्रीक मेनॅन्डरच्या काळापेक्षा कमीतकमी १०० वर्षे आधीचा असला पाहिजे, असे मानतात. तर साधारण इसपूर्व ३०० मध्ये जातिव्यवस्था बरीच प्रस्थापित होती. त्यामुळे या व्यवस्थेची मुळे त्याहूनही आधी रुजली असावीत.
बौद्ध त्रिपिटकांतही जातींचा उल्लेख आहे, पण त्यांचा कालनिर्णयाकरिता उपयोग थोडा गुंतागुंतीचा आहे. जरी गोतम बुद्धाच्या तोंडची वचने त्रिपिटकांत येतात, तरी त्या सर्व गाथांचे संकलन त्याच्या मृत्यूनंतर १००-३०० वर्षांनी केले गेले. तरी असे दिसते, की ईसपूर्व ३००-४०० वर्षांपूर्वी जातिव्यवस्था अस्तित्वात होती.
लेख आवडला. इनामगावबद्दलची
लेख आवडला.
इनामगावबद्दलची माहिती रोचक आहे.
पण थोडं कंफ्युज झालेय. 'भारतातील जाती किंवा चातुर्वर्ण व्यवस्था ही वेदकालीन नव्हतीच' असं म्हणायच आहे?
की
'आधीदेखील वर्ण/जातीव्यवस्था होती पण त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत होते. जे साधारण इ.स. नंतर पुर्णपणे बंद झाले' असे म्हणायचेय
कन्फ्यूजन
कनफ्युजन होण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. लेखात मी म्हटले आहे
"ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व 300 मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या 200 ते 300 वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे"
याचा अर्थ असाच होतो की चतुर्वर्णाला अधिकृत मान्यता या वेळेपासूनच होती. परंतु जनुकीय साखळीचा संबंध फक्त रोटी-बेटी व्यवहाराशी असल्याने चतुर्वर्णाला अधिकृत मान्यता असली तरी रोटी-बेटी व्यवहार कॉमनली होत होते ते पहिल्या शतकात बंद झाले.
चातुर्वर्ण्य, जाति, जनुकीय मिश्रण आणि इनामगाव
तुमच्या लेखात तीन मुद्दे आहेत
१. भारतीय उपखंडातली जातिव्यवस्था, तिचा उगम
२. लोकसंख्येतील जनुकीय मिश्रण
३. इनामगाव नामक एका प्रातिनिधिक साईटचा 'केस स्टडी' जिथे असं जनुकीय मिश्रण झालं
१. सगळ्यात आधी - चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जातिव्यवस्था एक नव्हेत, त्यात फरक आहे. भारतीय उपखंडात जातींची सुरुवात वेदकालीन नाही (वेदात फक्त ढोबळमानाने विश(सर्वसामान्य), राजन आणि ब्राह्मण असे तीन सामाजिक विभाग दिसतात) हे व्यावसायिक इतिहासकारांमधील सर्वमान्य तत्व आहे. याबाबतीत अरविंद कोल्हटकरांच्या प्रतिसादाला अनुमोदन आहे.
अर्थात वेदांच्या संहितीकरणाबद्दल कोल्हटकरांना अनुमोदन नाही. वेदांचं मौखिक संहितीकरण वेगवेगळ्या शाखांमधे झालं. आपण जो ऋग्वेद बघतो तो शाकल शाखेचा आहे. या ऋग्वेदाच्या संहितीकरणाचा काल १५००-१३०० इसपू च्या आसपास धरतात. व पुरुषसूक्त आणखी थोडं उशीराचं असावं असं मानतात. त्यांच्या रचनेत सुसूत्रता आहे. एकूण १० मंडलांत २ ते ८ गोत्रमंडलं आहेत (त्यात्या गोत्रातल्या ऋषिंनी रचलेली सूक्ते), ९वं मंडल पवमान सोम या देवतेशी संबंधित आहे, १लं आणि १०वं ही मंडलं थोडी उशीराची असावीत.. ही सर्व मंडलं आधी अग्निच्या ऋचांनी सुरू होतात मग इंद्राच्या ऋचा, त्यातही जास्त सूक्तसंख्येकडून कमी सूक्तसंख्येकडे वगैरे.. अशी सुसूत्र अंतर्गत रचना आहे. वेदांची भाषा आर्ष म्हणून गणली जाते. तिचं व्याकरण थोडं वेगळं असतं आणि ते वेगळ्याने जाणून घ्यावं लागतं. (जाताजाता - चित्रावशास्त्री अतिशय वंद्य ऋषितुल्य विद्वान होते पण ते वेदांचे अधिकारी भाष्यकार म्हणून गणले जात नाहीत. त्यांच्या मराठी वेदग्रंथांच्या प्रस्तावना या देशी-विदेशी अधिकारी विद्वानांच्या वेदभाष्याचं सार आहे. विशेषत: अथर्ववेदाची प्रस्तावना तर जवळजवळ पूर्णपणे मॉरिस ब्लूमफील्डच्या लेखनाचं भाषांतर आहे)
वर्णव्यवस्था म्हणजे विविध व्यवसायांवर आधारित समाजविभागणी ही सर्वच प्राचीन समाजांमधे होती - नाव आणि समाजरचनेचे बाह्यस्वरूप वेगवेगळे एवढंच. आपल्याकडे मात्र कालांतराने वैदिक समाजाशी होणार्या विविध समाजांच्या इंटरॅक्शनमुळे (हे इंटरॅक्शन भारतीय उपखंडात आधीपासून बर्याच प्रमाणात होतंच) वैदिक समाजामधे भर पडू लागली, त्यांच्या समाजाचं 'प्रोफाईल' बदलू लागलं - कारण हे पूर्वीचे अवैदिक समाज वैदिक आयडिऑलॉजी स्वीकारू लागले. हे सगळं सामावून घ्यायचं तर समाजव्यवस्था - तिची विभागणी 'री-डीफाईन' करायची गरज होती. म्हणून जातिव्यवस्था हळूहळू प्रचारात आली. हे समाजाभिसरण आणि नवी व्यवस्था आकाराला येणं या प्रक्रियेला काही शतकं लागली आणि इ.स. च्या २र्या शतकापर्यंत जातिव्यवस्था इथे 'क्रिस्टलाईज्ड' झालेली दिसते.
२. जनुकीय मिश्रण या विषयात मला शास्त्रीय आकलन नाही, पण अशा कुठल्याही अभ्यासाचे ठाम 'कट अॅन्ड ड्राईड' निष्कर्ष असूच शकत नाहीत कारण समाजात एका विशिष्ट काळानंतर अचानक पूर्णपणे इतर समाजाच्या लोकसंख्येचं मिश्रण थांबलं असं कधीच होऊ शकत नाही. भारतीय इतिहासात तर ठायीठायी पुरावे आहेत. इ.स च्या १ल्या, २र्या शतकात शक, कुशाण आले, या समाजात मिसळले, नंतर हूण आले त्यातलेही काही लोक काश्मीर व आसपासच्या भूभागात वसले, इथलेच झाले, इ.स.च्या ६व्या शतकात पर्शियातून सूर्योपासक मग आले, इथे येऊन मागी/मग ब्राह्मण होऊन भारतीय समाजधारेत मिसळले, व्यापाराच्या निमित्ताने कायमच परदेशीयांची आवकजावक, इथे राहिली आहे, त्यातलेही अनेक गट इथे मिसळले. आता या मिसळणी नंतर त्यांचे फक्त एन्डोगॅमस रिलेशन्स झाले आणि जनुकीय मिश्रण झालं नाही हे मानणं थोडंसं अवघड आहे. कारण पारशी समाज उशीरा येऊनही एन्डोगामि मुळे आत्ताच नामशेष होईल का अशा भीतीत वावरतोय. तसा इतर कुठलाही समाज वावरत नाहीये. मनुस्मृती किंवा स्मृतीग्रंथ हे नॉर्मॅटिव्ह - नियम सांगणारे - ग्रंथ आहेत. मुळात या नियमांविरुद्ध गोष्टी घडतात म्हणूनच नियम सांगायची गरज असते. शिवाय हे नियम बर्यापैकी जरी तथाकथित उच्चवर्णीय पाळत असले तरी सगळाच समाज काटेकोरपणे पाळत होता यालाही पुरावा नाही. भारतातले प्रत्येक राजकुल हे क्षत्रिय किंवा ब्राह्मण नव्हतं, पण एकदा राजा झाल्यावर क्षत्रियत्व प्राप्त होऊन जातिव्यवस्थेत वरती सरकत असे व त्या जातीतील इतरांशी रोटीबेटी व्यवहार होत असे. मध्ययुगात किंवा त्याच्या थोडंसं आधी तर राजपुतांसारख्या काही नव्या जाती अनेक समाजातल्या घटकांमुळे नव्याने 'निर्माण' झाल्या (या वर ब्रजदुलाल चट्टोपाध्याय यांचं काम अतिशय प्रसिद्ध आहे). तेव्हा शास्त्रीय निष्कर्ष जसेच्या तसे स्वीकारण्याआधी ऐतिहासिक पुरावेही पडताळून बघावे लागतात.
अशाच एका जनुकीय अभ्यासाच्या निष्कर्षानुसार भारतीय उपखंडात मानवाचे अस्तित्व फक्त एक लाख वर्षं जुनं आहे. हा निष्कर्ष ग्राह्य ठरला नाही कारण गेले शंभरपेक्षा जास्त वर्षं भारतीय प्रागितिहासावर देशीविदेशी विद्वानांचं काम चालू आहे, आंतरराष्ट्रीय व देशी चमूंनी शास्त्रीय कालमापन करून हे अस्तित्व सुमारे १५ लाख वर्षं मागे नेलं आहे. हे सगळे अभ्यास एका जनुकीय अभ्यासावर रद्दबातल ठरत नाहीत तर मूळ जनुकीय अभ्यासाच्या मेथडालॉजीवर, प्रॉब्लेम-सेटिंगवर प्रश्नचिन्ह उभं करतात.
३. इनामगाव या स्थळाकडे आता आपण येऊयात
भारतीय इतिहासाची कालमापन रेषा तीन ढोबळ भागात विभागली आहे.
१. प्रागैतिहास (प्रीहिस्टरी)
२. इतिहासपूर्व काल (प्रोटोहिस्टरी) - यात नवाश्मयुगीन, ताम्रपाषाणयुगीन व लोहयुगीन समाज व सिंधू संस्कृती येतात. म्हणजे ज्या समाजांना शेतीचा, पशुपालनाचा शोध लागला आहे, व ते बर्याच अंशी स्थायी स्वरूपाचे आहेत परंतु त्यांचा कुठलाही लिखित पुरावा उपलब्ध नाही, असल्यास वाचता येत नाही (सिंधू संस्कृती) असे समाज.
३. इतिहास काल - साधारणपणे ६वं शतक इ.स.पू - जेव्हापासून महाजनपदं उदयाला येतात (कॉम्प्लेक्स सोसायटीज, इमर्जन्ट अॅन्ड एक्स्पान्डिन्ग पोलिटीज), बुद्ध-महावीर यांचा काळ, वैदिकोत्तर व वैदिकेतर ग्रंथरचना अस्तित्वात येतात, नाणी व संलग्न अर्थव्यवस्था उदयाला येतात असा हा काल.
यात प्रागैतिहास व इतिहासपूर्व काल हे भारतीय उपखंडात वेगवेगळ्या प्रदेशांमधे एकमेकांच्या आसपास पण वेगवेगळ्या कालरेषेत उदयाला येतात, लय पावतात्/उन्नत होतात. कधीकधी वेगवेगळ्या प्रांतात एकाच वेळी संस्कृती/समाजाच्य वेगवेगळ्या अवस्था होत्या हेही दिसून येतं. मात्र एखाददुसरा चुकार अपवाद वगळता यातले कुठलेही समाज सिंधूसंस्कृतीच्या प्रभावाने उदयाला आलेले नाहीत तर स्वतंत्रपणे त्यात्या ठिकाणच्या प्रागैतिहासिक समाजांमधून उदयाला आलेले आहेत. (सिंधू संस्कृतीचं नागरीकरण लयाला गेलं तरी तिथल्या लोकांनी लगेच स्थलांतर केल्याचा फारसा पुरावा नाही - तिथे लहानलहान ग्रामीण स्थानिक ताम्रपाषाणयुगीन संस्कृती उदयाला आल्या, ज्या हलूहळू लोहयुगात परिणत झाल्या). राजस्थान-मेवाडमधे आढळणारी आहार-बनास संस्कृती ही नागरी सिंधूच्याही आधीची - किमान इसपू ३००० इतकी जुनी आहे. विंध्य-कैमूर, बेलन खोर्याच्या प्रदेशात व त्यालगतच्या मध्य गंगा खोर्यातले कृषिसमाज किमान इसपू ६००० वर्षं इतके जुने आहेत. या अशा विविध ठि़काणच्या समाजांमुळे हळूहळू आसपासचे समाज 'डोमेस्टिकेशन' शिकले व बदलले.
दख्खनच्या पठारावर काहीसं असंच झालं. दख्खनच्या पठारावरील ताम्रपाषाणयुगीन समाज इसपू २४०० इतके जुने आहेत. तापीच्या खोर्यात प्रथम आढळणार्या या वसाहतींनी शेतकीतंत्र लगतच्याच (आत्ताच्या) गुजरातमधल्या समाजांकडून घेतले असावे. शिवाय गुजरातमधल्या काही उत्तरसिंधूसंस्कृतीचा तात्कालिक प्रभावही या समाजांवर पडलेला दिसतो. मात्र हा प्रभाव बहुतांशी तापीखोर्यापुरताच सीमित राहिला
या तापीखोर्यातल्या वसाहतींचं कालमापन कळण्याआधी पुरातत्त्वीयांचा असा समज होता की माळवा पठारावर उदयाला आलेल्या शेतकी समाजातल्या काही घटकांनी इथे स्थलांतर करून इ.स. १६०० च्या आसपास दख्खनच्या पठारावर शेती करणार्या समाजाची पायाभरणी केली. मात्र ७०-८०च्या दशकांतल्या शोधांनी व विश्लेषणांनी हा समज अग्राह्य ठरवला. म्हणजे माळव्यातून काही सांस्कृतिक घटक इथे आले असतील, कदाचित काही लोकही, हे मान्य आहे. पण ते 'पायोनीअर्स' नव्हते तर इथे आधीच अस्तित्वात असलेल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांमधे मिसळून गेले. ताम्रपाषाणयुगीन कालखंडाच्या त्या टप्प्याला असलेले माळवा हे नामाभिधान तसेच राहिले मात्र त्याचा मूळ संबंध हा माळवा पठारावर मिळणार्या काळ्यारंगाची नक्षी असलेल्या लाल, केशरट खापरांशी आहे. अशी ब्लॅक ऑन रेड पॉटरी ही पश्चिम आणि मध्यप्रदेशातल्या सगळ्याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींमधे आढळते.
या माळवा कालखंडापासून दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन वसाहतींची भरभराट व्हायला सुरू होते. या नंतरच्या जोर्वे कालखंडात ही भरभराट चरम सीमेला पोचते व अचानक इसपू १०००-१२०० च्या आसपास तापी व गोदावरी खोर्यातल्या वसाहती पूर्णपणे उजाड झाल्याचं लक्षात येतं. यानंतरचा सांस्कृतिक र्हास, ढासळणारी कृषिव्यवस्था आणि त्यामुळे स्थायी जीवन सोडून अर्धभटका किंवा भटका जीवनमार्ग पत्करणार्या समाजाचा आलेख उत्तर जोर्वे कालखंडात (१००० - ९००/७०० इसपू) दिसतो. हा कालखंड फक्त भीमेच्या खोर्यात आढळला आहे आणि इनामगाव इथल्या उत्खननाने त्याचा लेखाजोखा प्रकाशात आला.
इनामगाव विषयी
इनामगाव ही साधारण २५ हेक्टर (सुमारे ६२ एकर) एवढी मोठी साईट आहे. सध्याच्या इनामगाव नामक खेड्याच्या उत्तरेला ३ किमी (मैल नव्हे) ही पांढर आहे. इथले विस्तृत उत्खनन व त्याचा तपशीलवार अहवाल (ढवळीकर, सांकलिया, अन्सारी) हा अजूनही भारतीय प्रोटोहिस्टरीतला (किंवा भारतीय पुरातत्वातलाही) सर्वोत्तम उत्खनन अहवाल आहे.
इथे माळवा (इसपू १६००-१४००), जोर्वे (इसपू १४००-१०००) व उत्तर जोर्वे (१०००-९००/७०० इसपू) असे तीन कालखंड आहेत व ते कालानुक्रमे एकामागोमाग एक असेच येतात (माळवा - स्तर १६ ते १२, जोर्वे - स्तर ११ ते ६, उत्तर जोर्वे - स्तर ५ ते १). जर इनामगाव उत्खनन अहवाल पाहिला तर खड्ड्यांमधे एकाच्या डोक्यावर एक असे येणारे सांस्कृतिक स्तर छायाचित्रात, रेखाचित्रात व वर्णनात स्पष्ट दिसतात. जोर्वे कालखंड ही माळवा कालखंडाचीच परिणत अवस्था आहे त्यामुळे या 'दोन संस्कृती एकत्र एकाच वेळी नांदायचा प्रश्नच उद्भवत नाही'. आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे या संस्कृतींचं नामाभिधान हे त्या लोकांच्या 'एथ्निसिटी'शी संबंधित नाही तर पुरावशेषांच्या समुच्चयाशी संबंधित आहे.
माळवा आणि जोर्वे संस्कृतीच्या कालखंडात या समाजांचे जसे गुजरात, राजस्थानशी देवाणघेवाणीचे संबंध होते तसेच कर्नाटकशीही होते. तिथूनही काही सांस्कृतिक परंपरा या समाजांनी उचलल्या असं दिसतं. मुळात या ताम्रपाषाणयुगीन वसाहती उत्तर कर्नाटकात अफजलपूर तालुक्यापर्यंत पसरल्या होत्या. तसेच स्त्रीमृण्मयमूर्ती या अशा सगळ्याच समाजांमधे आढळतात. त्यांचा प्रत्येक वेळा सिंधू संस्कृतीशी संबंध लावता येत नाही.
इनामगाव ही एक कुठल्याही 'बाह्य' सांस्कृतिक प्रभावांविना उदयाला आलेली व इथल्याच पर्यावरणीय कारणांमुळे लयाला गेलेली वसाहत आहे. त्याचा उत्तरेतल्या बौद्ध काळाशी किंवा त्याआधीच्या शतकांतल्या सांस्कृतिक घडामोडींशीही कुठलाच संबंध नाही आणि संपर्कही नाही. इनामगाव सुमारे इसपू ७००-८०० ला उजाड झालं. त्यानंतर सुमारे५००-६०० वर्षं या भूभागात वसाहतीला कुठलाही पुरावा नाही. अशोकाच्या काळात सोपारा उदयाला आलं, व मौर्ययुगानंतर इसच्या आगेमागे दख्खनमधे परत वसाहती वसल्या, सातवाहन राजकुल उदयाला आलं. तापीच्या खोर्याचा काही भाग व विदर्भ सोडता दख्खनच्या पश्चिम पठारावर मधल्या कालखंडातला कुठलाही पुरावा आजवर मिळाला नाहीये. तेव्हा इनामगाव इतिहसपूर्व व ऐतिहासिक कालाला अजिबातच सांधत नाही. या दोन्हीच्या मधल दुवा नाही.
एकुणातच इनामगाव हे अस्सल 'एतद्देशीय' संस्कृतीमधले एक वसाहतस्थळ होते. तिथे जनुकीय मिश्रण/लोकसंस्कृतीचे मेल्टिंग पॉट झाल्याचा पुरातत्वीय अथवा शास्त्रीय कुठ्लाही आणि कसलाही पुरावा उपलब्ध नाही!!
धन्यवाद
लेखाला प्रतिसाद देणार्या सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद
अतिशय विद्वत्तापूर्ण आणि
अतिशय विद्वत्तापूर्ण आणि माहितीपूर्ण प्रतिसाद. बरीच माहिती व तदनुषंगिक दृष्टिकोन बहाल करू पाहणारा.
एक खुस्पटवजा शंका आहे मात्रः
हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल नामक ११ खंडी इतिहासमालेच्या प्रथम खंडातल्या पहिल्या चॅप्टरप्रमाणे, गंगा खोरे मुळात राहण्यालायक झाले तेच गेल्या १० हजार वर्षांपूर्वी. मग इतक्या लगेच शेती कशी?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वर्ण आणि जात
नीरा यांच्या मुद्देसूद आणि ऑथॉरिटेटिव्ह* प्रतिसादानंतर फारसं काही लिहिण्यासारखं उरलेलं नाही.
तरी वर्णव्यवस्थेचा उल्लेख आणि जातिव्यवस्थेच्या अस्तित्वाचा संबंध असू नये असं वाटतं.
वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे प्रतिपादन कुरुंदकरांच्या लेखनात वाचले आहे. आणि जातिव्यवस्था ही वर्णव्यवस्थेची परिणती नसून वर्णव्यवस्था हे केवळ असलेल्या (जाति)व्यवस्थेचे (काल्पनिक- ब्राह्मणांच्या कल्पनेतले) स्पष्टीकरण आहे. तेव्हा वर्णांचा उल्लेख जेव्हापासून दिसतो त्यानंतर जातिव्यवस्था अस्तित्वात आली असे मानण्याची गरज नाही. (विज्ञानाने पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय असे वर्गीकरण केले त्यापूर्वीही या दोन्ही प्रकारचे प्राणी अस्तित्वात होते).
वर्णसंकराने जाती निर्माण होतात अशी सर्वांची समजूत असली तरी तेही अवघडच आहे. अनुलोम विवाहाच्या बाबतीत संतती बापाच्या वर्णात जाते. जर आंतरवर्णीय विवाहांनी जाती निर्माण होत असत्या तर (कोळ्याची मुलगी आणि ब्राह्मण यांचा मुलगा) व्यास हा ब्राह्मण न राहता कुठल्या तरी संकरजातीत जायला हवा होता.
(एक व्यवसाय करणार्यांच्या जाती निर्माण झाल्या हे मला स्वतःला पटत नाही. तर एकाच जातीतल्या सर्वांनी एकच व्यवसाय अंगिकारला असे असावे. महाराष्ट्रातला लोहार आणि तामीळनाडूतला लोहार एका जातीचे नसतात. आणि त्यांच्यात बेटीव्यवहार होत नाहीत. कोकणातला ब्राह्मण आणि देशावरला ब्राह्मण हेही एका जातीचे नसतात. त्यांच्यातही बेटीव्यवहार होत नाहीत.).
*येथे "आधिकारिक" असा शब्द वापरण्याचा मोह होतोय.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अतिअवांतर
लोहारांचं माहिती नाही पण
देशस्थ-कोकणस्थ विवाह अलीकडे होत आहेत-प्रमाणाबद्दल माहिती नाही. आणि या क्याटेगिरीतला पहिला विवाह झाला तो नानासाहेब पेशवे आणि वाखरे सावकार यांची कन्या या दोहोंत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आंतरजातीय
>>देशस्थ-कोकणस्थ विवाह अलीकडे होत आहेत
हो. अलिकडच्या काळात ब्राह्मण ही जात आणि कोकणस्थ-देशस्थ या पोटजाती* अशी (चुकीची) कल्पना प्रसृत झाली आहे. जुन्या लोकांना त्या जाती एका जातीच्या पोटजाती नसून वेगवेगळ्या जाती आहेत असे (अचूक) माहिती होते.
*जातीची कल्पना अशी विस्तारते की नाही याबद्दल इतर काही जातींचा विदा असल्यास माहिती नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत. हे जातीचे विस्तारीकरण
सहमत. हे जातीचे विस्तारीकरण म्हणून नक्कीच सांगता येईल. अशीच केस कुणबी-मराठा यांचीही सांगता यावी असे वाटते. देशस्थ-कोकणस्थ या सीमारेषा किमान ठळक आहेत. कुणबी-मराठा ही सीमारेषाही तितकी ठळक नसावी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जातीची व्याख्या काय? ब्राह्मण
जातीची व्याख्या काय? ब्राह्मण ही जात नाही का? मग त्याचे प्रकार हे उपजात नव्हेत का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इरावती कर्वे
ब्राह्मण ही जात नाही. कोकणस्थ, देशस्थ, अय्यर, अय्यंगार वगैरे या जाती.
जात म्हणजे आपापसात* विवाह करणार्या कुटुंबांचा/कुळांचा समूह.
एका व्यक्तीचा काही कुलांमध्ये विवाह होऊ शकत नाही ती कुले म्हणजे भावकी. ज्या कुलांमध्ये विवाह होऊ शकतो ते सोयरे. भावकी + सोयरे अशा सर्व कुटुंबांचा समुदाय म्हणजे जात. एका व्यक्तीच्या एकूण नातेवाईकांत** वाढ किंवा घट होत नाही***.
*आपापसात विवाह करण्यायोग्य कोण (पक्षी आपल्या जातीत कोण कोण आहेत) ही माहिती बहुधा माणसांच्या मेंदूत अगदी रानटी टोळी अवस्थेपासून साठवली गेलेली असावी.
**नातेवाईकांत म्हणजे नातेवाईक कुळांमध्ये
***जातिव्यवस्था (बेटीव्यवहार न करणे) काटेकोरपणे पाळल्यास.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मग 'ब्राह्मण' काय आहे?
मग 'ब्राह्मण' काय आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
:)
>>मग 'ब्राह्मण' काय आहे?
काहीच नाही. म्हणजे जातिव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काही नाही.
योगायोगाने ब्राह्मण हे वर्णाचे नाव आहे. ब्राह्मण वर्णात कोकणस्थ, अय्यर या जाती असतात असे म्हणता येईल.
माझ्या आजीला अरुणजोशी म्हणजे आपल्या जातीतले का? असं विचारलं तर ती "हो. पण पोटजातीतले की कसे ते सांगता येणार नाही" असे ठाम उत्तर देणार नाही तर "सांगता येत नाही असे उत्तर देईल".
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ब्राह्मण हे एक एन्व्हेलपिंग
ब्राह्मण हे एक एन्व्हेलपिंग लेबल म्हणता येईल. अन्य वर्णांपेक्षा ब्राह्मण वर्णाची जाणीव/अस्मिता जास्त टिकून राहिल्याने आपापल्या 'पोटजाती' पलीकडेही 'ब्राह्मण' म्हणून काहीतरी असते अशी पॅन-ब्राह्मण विचारसरणी वैचारिक पातळीवर का होईना, सर्व ब्राह्मणांत रूढ होती. 'ब्राह्मण म्हंजे काय' हा प्रश्न त्यातूनच आलेला आहे. क्षत्रिय वर्णात तसा कॉन्सेन्शस आहे असे वाटत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जाती
'ब्राह्मण ही जात नाही' असे फार क्वचित/कमी लोकांचे मत असावे. अगदी आपली देशस्थ ही एक जात मानण्याचा (बेटी व्यवहार) नियम मान्य केला तर असे दिसेल कि तीही एक जात नाही. देशस्थ लोकांमधे इतके उपप्रकार आहेत कि त्यांच्यात लग्ने होत नाहीत. अजून असे उपप्रकार आहेत कि त्यात एक साईडचेच लग्न होतात (म्हणजे एका विशिष्ट उपोपजातीचा मुलगाच असू शकतो, इ इ ).
सबब हा प्रकार जात शब्दाचा एक विशिष्ट अर्थ काढून प्रयोग केला गेला आहे. मी 'देशस्थ' ब्राह्मण आहे हे मला (१९७६ पासून) १९९४ पर्यंत माहितच नव्हते. तो शब्दच मी ऐकला नव्हता. पण मला मी स्मार्त ब्राह्मण आहे हे माहित होते.
बॅटमन म्हणतात ब्राह्मणांना जाति/वर्ण-अस्मिता जास्त आहे म्हणून ब्राह्मण हा शब्द टिकला आहे. वास्तविक ब्राह्मणांची अस्मिता ही अगदीच पातळ आहे. त्यामानाने वंजारी समाजाची अस्मिता हजारपट आहे. त्यांच्यातही आपण म्हणता तसे 'एकमेकांत परंपरागतरित्या लग्न न करणारे' काही उपसमूह आहेत. पण ते सगळे आपली जात वंजारीच सांगतात.
आपला मूळ बाप एक ही जातीची मूळ कल्पना आहे, बेटा-बेटी व्यवहार होतो कि नाही ही नाही, असे वाटते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जात/वर्ण/उपजात या संज्ञा अंमळ
जात/वर्ण/उपजात या संज्ञा अंमळ तांत्रिक आहेत खर्या. 'आपापसात' लग्ने करणे अन 'आपले लोक' वगळता अन्य लोकांशी तसे संबंध न ठेवणे हा त्या कल्पनेचा मूलाधार. आता उदा. बेटीव्यवहार होण्याची, विस्तारू शकण्याची "कन्सीव्हेबल अप्पर लिमिट" म्हंजे ब्राह्मण तर अनिर्वाहपक्ष वगळला तर नेहमीचे टार्गेट ग्रूप्स म्हंजे देशस्थ-कोकणस्थ इ. असे बायफर्केशन सांगता येऊ शकेल. याला अपवाद दिसतातच. त्यामुळे "लिटररार्थेण न गृह्यतां वच:" हे ओघाने आलेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जुन्या पिढीतील समज?
अनेक१ (विशेषतः जुन्या पिढीतल्या) कोंकणस्थांच्या लेखी देशस्थ हे ब्राह्मणेतरांत आणि कर्हाडे हे (बहुधा) मनुष्येतरांत२ मोडतात, असे निरीक्षण आहे. (शिवाय, 'ब्राह्मण' ही (केवळ) मराठी माणसांतील एक जात आहे, असाही एक समज (जुन्या पिढीत) अस्तित्वात असण्याबद्दल ऐकिवात आहे. म्हणजे, उत्तरप्रदेशी वगैरे ब्राह्मणांचा उल्लेख केल्यास, "हॅ:! उत्तरप्रदेशात काय ब्राह्मण असतात काय? ब्राह्मण फक्त मराठी माणसांतच!" असेही उत्तर (आजी-जनरेशनकडून) ऐकावयास मिळू शकते, असे खुद्द एका कोंकणस्थ सन्मित्राकडून कळते. चूभूद्याघ्या.)
(सबब, 'जोशी' हे आडनाव कोंकणस्थांप्रमाणेच 'त्यांच्यात'ही प्रचलित असल्याने, उत्तर काहीसे अपेक्षितच आहे, असे म्हणता येईल.)
- (४११०३०च्या कोंकणस्थबहुल इलाख्यात वाढलेला, वडिलोपार्जित जातीने देशस्थ आणि रक्ताने सुमारे ७५% कर्हाडे ब्राह्मण) 'न'वी बाजू.
===========================================================================================================================
१ सर्वच नव्हे.
२ लग्नाकरिता मुलगी पाहणे असल्यास शक्यतो कोंकणस्थच असावी, नसल्यास नाइलाजास्तव देशस्थ 'एकवेळ चालू शकेल', पण कर्हाडे 'काहीही झाले तरी नको'३ असे एक सामान्य धोरण असते. (नॉट द्याट वी माइंड इट, माइंड यू. आय मीन, हू केअर्स? जिस रास्ते से ग़ुज़रना नहीं, उस रास्ते का ज़िक्र क्यों?)
३ 'कर्हाडे जावयास विष घालतात', असाही एक समज प्रचलित आहे.४
४ 'कर्हाड्यांत सॉफिस्टिकेशन नसते, काळाबरोबर राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, त्याऐवजी कोठल्यातरी ऑब्सोलीट, आउटडेटेड पद्धतींचा अवलंब करतात' अशा अर्थाच्या या अपप्रचाराबद्दल तीव्र निषेध!
अनेक (विशेषतः जुन्या
कर्हाडे-कोंकणस्थ तंटा पार पेशवाईपासोन जाहीर आहे. कर्हाड्यांना ब्राह्मणांचा दर्जा द्यावयास कोंकणस्थ तयार नव्हते, मग दोन्ही गटांनी पार काशीपर्यंत गार्हाणी नेली आणि कर्हाड्यांचा तात्पुरता विजय झाला असे वाचलेले आहे. बाकी देशस्थ-कोंकणस्थांबद्दल बोलावयाचे झाले तर द सेंटिमेंट इज म्युच्युअल-विशेषतः जुन्या पिढीत.
पूर्ण सहमत!!!!!
(क्रमांक २ चा अनुभव घेऊन चिकार करमणूक झालेला, 'प्युअर' सह्याद्रीपूर्वेकडचा माध्व देशस्थ) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ही माहितीपूर्ण श्रेणी मी दिली
ही माहितीपूर्ण श्रेणी मी दिली आहे. ही कितीही टोन डाऊन करून वाचली तरी मला ती तरी जबरदस्त शॉकिंग वाटली. मी पुण्यात चार वर्षे राहिलो आहे आणि नेहमी दिवाळीच्या सुट्टीला पुण्याला जातो, पण अशी माहिती ऐकायचा प्रसंग आला नाही. माझे अशा भेदांचे ३-४ अनुभव असावेत, पण मला वाटले कि त्या इरिंग इलिमेट्सच्या कहाण्या आहेत. असो.
इतिहास काही का असेना, आजमितीस ब्राह्मणांतले उपप्रकार हा महत्त्वाचा विषय नाही असे वाटते, कारण काही का असेना. सारस्वत, चित्पावन, कोकणस्थ*, कर्हाडे, देशस्थ, कायस्थ, इ इ इतर जातींकरता संकुचित असले तरी इतक्या स्पेक्ट्रमकरता खूप लिबरल आहेत असा अनुभव राहीला आहे.
* पहिले तीन शब्द आहेत कि एक/दोन शब्द आहेत हे माहित नाही.
** कर्हाडे जावयास मारतात म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जावयाला मारतात असे कि कोकणस्थ इ चा जावई कर्हाडे असेल तर मारतात? का मारतात? जावईच का?
लातूर जिल्ह्यात वैष्णव, शैव, स्मार्त हेच/असले ब्राह्मणांचे प्रकार मानले जातात. माझ्या इतिहास घेऊन आय ए एस ची परिक्षा देणार्या पाहुण्याने मला या प्रकारचे (तत्वज्ञानाधारित) अजून १५-२० प्रकार सांगीतले होते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शंका
नीरा यांच्या प्रतिसादाविषयी काही शंका. पारशांना (जातीतील) एण्डोगामीने नामशेष होण्याचा घोर लागला नसून भावकीत विवाह केल्याने नामशेष होण्याचा घोर लागला आहे असे वाटते.
राजपूत वगैरे नवीन जाती निर्माण झाल्या त्या मिश्र विवाहातून झाल्या नसून नव्याने समाजात मिसळणार्यांना एका जातीच्या रूपात सामावून घेतले गेले असे वाटते. ते समाजात मिसळले पण इतरांचे "शुद्धत्व" तसेच शाबूत(?) राहिले असणार.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
@बॅटमॅन - तुम्ही ज्या
@बॅटमॅन - तुम्ही ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते जुने आहे. दर वर्षी नवं संशोधन होत असतं त्यामुळे इतिहास-पुरातत्वीय ज्ञानात भर पडते, आधीची गृहितके बदलतात, नव्याने इतिहासमांडणी होते. भारतात ही प्रक्रिया इतिहासपूर्व काल आणि प्रागैतिहास या दोन कालखंडांच्या बाबतीत जास्त वेगाने होते. जवळजवळ दर वर्षी कुठलेतरी नवे शोध लागत असतात, नवे निष्कर्ष मांडले जात असतात.
गंगेच्या मध्य खोर्यात गेले १०-१५ वर्षं जे पुरातात्विक व पुरापर्यावरणीय संशोधन चाललं आहे त्यावरून असं लक्षात आलेलं आहे, की आधीच्या पुरापर्यावरणीय अभ्यासामधे बर्याच गॅप्स होत्या. गंगा खोर्यामधे अभेद्य अरण्य वगैरे नसून जंगल आणि मोकळे गवताळ प्रदेश, स्क्रब फॉरेस्ट वगैरेचं मिश्रण पूर्वापार होतं. तसंच लहुरादेव, मल्हार, दादुपूर इत्यादि ठिकाणच्या उत्खननांनी शेती अवगत असणार्या मानवी वसाहतींची कालरेषा सुमारे इसपू ६००० पर्यंत मागे नेली आहे. त्या आधी बेलन खोर्यातल्या कोलदिवा या ठिकाणी इसपू ६००० इतक्या आधीचा तांदळाचा पुरावा सापडला होता, पण आणखी कुठलाच नमुना त्या काळातला नसल्यामुळे तो कितपत ग्राह्य धरायचा याविषयी शंका होत्या. त्या शंका या उत्खननांनी दूर झाल्या.
अर्थातच- ते पुस्तक जुने आहे.
अर्थातच- ते पुस्तक जुने आहे. नवीन संशोधन त्यात नाहीये. पण मग इसपू ६००० पर्यंत शेती जुनी असेल तर मग गंगा खोरे राहण्यायोग्य कधीपासून झाले? यूपी-बिहार इ. भागात बेडरॉक अगदी २ किमीपर्यंत खणले तरी मिळत नाही असे वाचले आहे. मग इतका गाळ साठला म्हणजे पाणथळ भागच अगोदर तिथे असावा नैका? मुळात हा थेसिस बरोबर असावा असे वाटतेय-कालमर्यादा पुढे/मागे सरकली तरीही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वा!
अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण चर्चा चालु आहे
सर्वश्री अरविंद कोल्हटकर, धनंजय, चंद्रशेखर, नितीन थत्ते आणि बॅटमॅन यांचे लेखन माहितीपूर्ण आहेच, नीरा यांचे प्रतिसाद तर धाग्याचा मेरूमणीच!
सर्वांचे अनेक आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गंगा खोर्यात जी गाळाची माती
गंगा खोर्यात जी गाळाची माती आहे ती नदीने आणून टाकलेली आहे. दरवर्षी नद्या भरपूर गाळाची माती काठावर डिपॉझिट करत रहातात. पाणथळ म्हणून नाही तर तिथल्या नद्यांची रचना, कार्य वेगळं म्हणून अशी माती भरली जाते (दख्खनच्या नद्यांपेक्षा वेगळ्या फ्लुविअल प्रोसेसेस तसेच वेगळी भूशास्त्रीय रचना कारणीभूत)
गंगेच्या खोर्यात सापडलेल्या सगळ्यात जुन्या वसाहती मेझोलिथिक (मध्याश्मयुग) कालखंडातल्या आहेत. त्या १०ते१२ हजार वर्षांपूर्वीच्या आहेत हे खरेच आहे. पण अजूनही या विषयावर संशोधन करायला वाव आहे. त्या नव्या संशोधनाने आणखीही नवीच माहिती उजेडात येऊ शकते
चारहजार वर्षांत एखादा समाज शिकार ते शेती हा प्रवास सहज करू शकतो
धन्यवाद! नवीन विचारखाद्य
धन्यवाद! नवीन विचारखाद्य मिळाले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपला मूळ बाप एक ही गोत्राची
आपला मूळ बाप एक ही गोत्राची संकल्पना आहे, जातिची नव्हे. जाति म्हणजे जी जन्मापासून आहे ती..
ब्राह्मण ही एक निश्चित जाती आहे - मुळात वैदीक पुरोहितांची (प्रीस्ट्स). शतकानुशतके अवैदिक समाजातले प्रीस्ट्सही यात सामावले गेले, वेगवेगळ्या प्रांतात, काळात, इ. प्रत्येक ब्राह्मणाला एक वैदिक 'अॅफिलिएशन' असते - ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी.. असे. ते किती मूळ, किती 'लावून घेतलेले'/ सीकिंग लेजिटीमसी अशा प्रकारातले हा पुढचा मुद्दा!
भारतातली जातीव्यवस्था, तिची वाढ व त्यातून आलेले सध्याचे अतिशय कॉम्प्लेक्स स्वरूप हा फार गुंतागुंतीचा विषय आहे - त्यात युनिलिनीअर डेव्हलपमेन्ट्स तुलनेने नाहीतच. आणि कितीही जाती असल्या तरी त्या शेवटी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि पूर्वाश्रमीचे तथाकथित अस्पृश्य याच चौकटीत कुठेतरी मोडतात.
मस्तं.
ही चर्चा वाचून खूप दिवसानी इथं आल्याचं सार्थक झालं असं वाटतंय.
कर्हाडे जावयाचा बळी देतात ही
कर्हाडे जावयाचा बळी देतात ही समजूत महाराष्ट्र सारस्वतातही भाव्यांनी नमूद करून ठेवली आहे