पिअर्सची कमाल
पिअर्स साबण काय काय करतो ? एका आंघोळीत बाईला देखणं करुन नवर्याला तिच्यावर जबराट प्यार करायला लावतो. आँफीस मधुन कितीही दमून आलेला असो. पिअर्सने आंघोळ केलीय ना तिने ? आवळलीच पायजे तिला ! संतुर साबण काय करतो ? कौनसे काँलेजमे पढती हो ? उत्तर यायच्या आत आरोळी ! मम्मीsss... मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नहीं चलता ? सैफ लगेच च्यूतिया बनतो ! आरतिच्याबायलिला काय उमर ? ह्या असल्या फाल्तु वचनेबल जाहिरातीँनी आमच्या काही बायका होत्यात वेड्या. आणि माजतात गोंधळ. गोष्ट तशी साधी. सत्तरी ओलांडलेला आणि गाव तालुक्याबाहेरही कधी न गेलेला एक अडाणी स्वाभिमानी सासरा नामे बळीराम. एका कानाने जरा बहिरा. हा डायबेटीसने भरपूर ग्रासलेला, आंग खाजवायला त्रासलेला.भरपूर उन्हाळे सोसलेला , पिव्वर गरीबीवर पोसलेला. धाकट्या लेकाच्या आग्रहानं पुण्यात आला. ते त्याच्या लोक्वालिफाईड सुनेला फारसं रुचलं नाही. पण जेव्हा जेव्हा त्याच्याप्रति तिचा तिटकारा जागा होई तेव्हा तेव्हा लोक्वालिफाईड नवरीचा हायक्वालिफाईड नवरा म्हातार्याच्या विकलेल्या पाच एकराची आणि लागलेल्या नोकरीची सांगड तिला याद करुन देई आणि तिला थंडे करी. त्यादिवशी एरियात एक म्हातारी गचकली . म्हातारी भरपूर म्हातारी होऊन गचकली असल्याने दुःखाचा म्हणावा तसा लोट परीसरात उठला नाही. म्हातारीच्या चार नाती आणि त्यांची लेकरं सोडली तर रड्यापड्याचा ठार दुष्काळच ! खुद म्हातारीचा लेक येखादं मंगलकार्य येवजल्या सारखा पायाला भिँगरी लावून फिरत होता. झाली तिची मयत. मयतीवरुन लोक आले आणि गप्पा हाणीत बसले. शहरातली मयत पहिल्यांदाच पाहिलेला बळीराम हारकून गेलेला. पाच वर्षापूर्वीच शहरवासी झालेल्या रंगआबाला म्हटला, बायली काय माती करत्यात रं पुण्यात ? ह्या काचाची गाडी, ही जत्रा , मढ्याचा जीव गुदमरंल हितकी फुलं ? आंगावर श्याल , घामघाम आत्तर , हे मेनबत्या , उदबत्या , वंदना , लैच इंतेजाम करत्यात लका. बायली मढं खुषच व्हत आसंल. उगं हासल्यावानी दिसतं काय ? रंगआबा म्हटला तु मेला की आसाच इंतेजाम कराय लावू . खो खो खो हासत बळीराम म्हटला होय गड्या मुलकात फिरावं आन् मराण पुण्यात यावं. रंगआबा म्हटला ह्या आपरीशनात जगू नकू मग. आपल्या साँदीन आस्तं काय आबा ? दोघेही खो खो हसले..हायक्वालिफाईड मुलाने जवळ येऊन बापाला सांगितलं तात्या आंघोळ करा. होय. म्हणुन बळीराम आंघोळीला गेला. आंघोळ करुन पान तंबाखु खायला ओल्ड कंपनीत आला. उद्या त्याला दवाखान्यात जायचं होतं. गावाकडं हर्ण्याचं आँपरेशन की काय सांगितलेलं. अवघड जागा सुजलेला. तरी हा मिडकणं सोसत थिरच राह्यचा. कंपनी म्हणायची खरं सुजलीय का जागा ? ह्यो म्हणायचा दावू काय धोतर फेडून पिकल्याला घड ? ख्या ख्या ख्या खू खू खू व्हायचं. त्यादिवशी निजानिज झाली . म्हातारा सासरा सवयीने पहाटंच उठला आंघोळ केली आणि वारवासाला शाळेकडच्या लिँबाकडं जाऊन बसला. इकडे हाय आणि लो क्याटेगरीतले नवरा बायको नामक राजा राणी उठले. राणीने झकपक आंघोळ केली. घट्ट दुधाच्या चहाला लागली . मयतीमुळे बुडालेले कार्यक्रम आता बघावे असं मनात योजू लागली. न्हाणीतून राजाचा आवाज आला . आगं साबन नाही की . संपला वाटतं. वापरू का तुझा ? नको नको थांबा.मी आणायला पाठवते नवा. ए मनिषा एवढा एक लक्स साबन आण गं. लक्सची वाट बघत नवरदेव टाँवेलवर टिव्ही पाहत थांबले. लक्स आला. आंघोळ झाली. राजा राणी चहा पेले आणि बळीराम म्हतारं दारात धडकलं. मामा पटकन् आंघोळ करुन चहा घ्या. म्या आंगुळ केली. आँ ? तुमचं धोतर नाही तिथे. टाकलं माजं मीच पिळून . आणि साबन तर नव्हता . मग ? व्हता की तिथं निळा टुकडा. आँ ? झर झर झर झर नक्षे बदलले. या म्हातार्याने वापरलेल्या साबनाने मी आंघोळ केली. माझा पिअर्स याने वापरला ? राणी प्रचंड अस्वस्थ झाली. राजाकडे खाऊ का गिळू असं पाहू लागली . राजा शरमून म्हटला तुझ्या पप्पांनी आंघोळ केली असती तर ? राणी म्हटली तोँड बंद ठेवायचं हं. हे इथे नकोयेत मला. गर गर गर गर सुत्रे फिरली राणीने बरोबर चावी मारली ! आंगाला हात लावू देणे नाही. चार दिवस राजा तरमाळला. मदन खवाळला .
राजाने सुट्टी काढली. धोतरजोडी घेऊन आला. अंड्याची चटणी करायला सांगितली. म्हातार्या सोबत आलेल्या फडक्यातच बांधली. लगबग लगबग चालू झाली. बळीराम म्हातारं झी टाँकिज वरचा सांगते ऎका बघण्यात गुंगलेलं. तात्या चला आकराची येश्टी हाये. हितला डाक्टर रजेवर गेलाय. सोलापुरातल्या आश्विनीला दावू. आँ. हितं दुसरा कुठला न्हाई का ? न्हाई चला. सुनबाई म्हटल्या काळजी करु नका . इथून पैसे पाठवून देऊ. म्हतारं म्हटलं पैशे नकु माय तुझे. नीट राह्वा दोगंबी वाद येवाद करु नका.
स्टँण्डवर आल्यावर म्हातार्याने लेकाला विचारलं बंडा कारं घालवायलाच मला ? सुर्याखा भांडलीय काय कशावर्ण ? नाही तात्या. मग का रं कोण हाय आता गावात माझं ? तिघी लिकी लांब दिल्यात. तुझी माय मेलीय. तिथला लेक पेण्यात बुडलाय. काय संबाळायचीय तितली सुन ? राजाच्या डोळ्यात पाणी आलं पण तो भडवा झाल्यानं गापकन् जिरलं. पाचशेच्या चार नोटा म्हातार्याच्या हातात दिल्या. पाया नाही पडला तरी म्हातार्याचा आशिर्वादाचा खरखरीत हात त्याच्या पाठीवर थरथरला. येस्टीत बसला. थांबून राहिलेल्या लेकाला म्हटला. जा तु हालंल की आता झटक्यात. गोपाला फ़ोन कराय लावतो पोचलो की. वाद येवाद करु नकु बग.
बुंग येस्टी गावात ! काय तात्या केला का लेकानं इलाज ? या कौतुकी सवालाला कटाळत, कटाळा येवूस्तोर , आर कट्टाळा यायला करमचना तितं मन आलो गड्या गावात.
हे उत्तर देत बळीराम म्हातारं गावात घरात रुळलं. चार दिवसात त्याची सोय फरशी नसलेल्या समाजमंदीरात केली गेली. पाठीला खडं टोचत चवाळ्यावर पडून मेलेल्या बायकोच्या आठवणी आठवीत पडायचं आणि मर्जीतल्या माणसांना हाळी देऊन पान तंबाखू मागायची आणि खायची. एक नातू जिव लावून जेवाय लावायचा तेवढं जेवायचं आणि पडायचं. असा दिनक्रम ठरला. पंधरा दिवस टिकला. बळीराम म्हातारं पंधराच दिवसात खलास झालं.
काचाची गाडी, लालभडक फुलं, हे मेनबत्या, घामघाम आत्तर आणि माणसाची जत्रा , निळीजरद शाल , बुधवंदना जागच्या जागी जिरली. रोज तंबाखू साठीच हाक ऎकणार्या रामभौला डौट आला आज तात्याची हाक कशी आली नाही बाँ ? ह्यानं जवळ जाऊन बघितलं तर चिमणीवानी तोंड वासून बळीराम म्हातारं खलास झालेलं !
नंतर नीट आरोड पण उठला नसेल. जाग जागी फाटलेल्या चादरीच्या झोळीतच ह्याला उचललं असेल. ह्याच्या पायाला खरचटल्यानं उठलेला रक्ताचा लाल डाग जिर्ण पिवळ्या धोतरावर नीट उठला असेल. याच्या चंचीत चार नोटा घावणार. याच्या मयताला लाल तर सोडा , झेंडूचीच फुलं नीट वक्ताला आमच्या गावात घावत नाहीत. विदाऊट फुले याची मयत होणार. जत्रा कुठली हो ? मातीला सव्वाशे वर संख्या नसते. गाव सुध्दा ग्लोब्लाइज झालेय आता ! पण बळीराम म्हातारं हे विदाऊट तकरार नीट समजून घेणार आणि झक् मारीत कावळा होऊन लगेच पिंड शिवणार बघा ! रिअली ..आय स्वेर !
येडझव्या सारखी पिअर्सने आंघोळ करायची असते काय ?
प्रतिक्रिया
अरेरे...
विशय नेहमीचाच आहे. वेगवेगळ्या वर्गांतील लोकांत तो वेगवेगळ्या कथांतून चित्रपटांतून आलेलाही आहे.
पण तरीही तुम्ही इतकं छान मांडलत; की ठाव घेउन गेलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुम्ही जे लिहिता ते . . . . . .
ते इथे आत पर्यंत पोहोचते
आणि मग तळमळ होत रहाते
_/\_
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
लेख खूप आवडला.
लेख खूप आवडला.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लेख आवडला...सध्या तरी इतकेच
लेख आवडला...सध्या तरी इतकेच म्हणतो.........
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हटलं तर नवं कायच नाय! पण
म्हटलं तर नवं कायच नाय! पण तरी आत खोलवर भिडणारं लेखन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पियर्स
पियर्सला नवी जाहीरात काढायला जोरदार वाव आहे!!
पियर्स अब लिक्वीड जेल फॉर्म मे उपलब्ध. क्यु की हम जानते है वडी शेयर करनेका अंजाम बुरा बी हो सकता है!
विषय जुना असला तरी लेख हटके आहे हे वेगळे सांगणे नकोच
अत्यंत
अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारा लेख झाला आहे. गळ्यात आवंढा दाटला दादानु! सतीशराव, मुजर्याचा स्वीकार व्हावा.
हेच म्हणतो.
हेच म्हणतो.
-अनामिक
भिडणारे लिखाणं! - (कथा
भिडणारे लिखाणं!
- (कथा आवडलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
हा प्रतिसाद इथे उचित आहे का माहित नाही.
या कथेतील भाषेवरुन आणि इथे वापरलेल्या बुद्धपूजा शब्दावरून ही कथा दलित पार्श्वभूमीवरची आहे असे मानण्याचे स्वातंत्र्य दोन मिनिट घेतो. दलित विषयांचे लेखन हे नेहमी विदारक, दु:खदायक, मानवी मूल्यांची निश्चित दिशा न दाखवणारे धक्कादायक अशा स्वरुपाचे का असते हे मला कधी उमगले नाही. म्हणजे मी लहान असताना मी बरीच दलित कुटुंबे पाहिली आहेत. त्यात क्वचित शिक्षित होती, इतर बरीच अशिक्षित होती. पण मला त्या सर्वांचे वर्तन 'विशेष वेगळे' कधी वाटले नाही. गोडवा, समंजसपणा, समाधान, कोणाला कसे बोलायचे याबाबतींत व्यक्तिशः मला तरी सवर्णांपेक्षा दलितच जास्त सरस असल्याचे आढळले आहे. असे निरीक्षण करण्यासाठी बॅकग्राऊंड इफेक्ट निल करण्याची थोडी कला लागते, पण फार अवघड नाही. त्याच/तशाच परिस्थितीत ज्ञान, संपत्ती, माज वापरून सवर्ण जे वागतील त्याचे देखिल कडवट वर्णन होते पण ते दलित विषयांच्या लेखनासारखे 'धक्कादायक' कधी वाटत नाही. एखादा समाज केवळ आपला आहे म्हणून, त्याच्याबद्दल लोक नेहमी एकच आणि तेही भयाण इंप्रेशन देण्याचे स्वातंत्र्य का घेतात असा प्रश्न मला नेहमी पडतो.
आता पुन्हा नक्की काय म्हणायचे आहे ते सांगतो. अशिक्षित, दलित, गरीब, कितीतरी प्रथांनी घेरलेल्या समाजातही कितीतरी अतिशय उदात्त व्यक्तिमत्वं असतात. त्यांच्यावर न्याय करणारं अभिजात साहित्य का वाचायला मिळत नाही? महान शंभर ब्राह्मणांचे चरित्र्य वाचायची पुस्तके असतील पण मी शेकडोनी पाहिलेल्या वडारांमधे जी कितीतरी भावली तशा एकाही प्रातिनिधिक माणसाची कथा चांगल्या अंगाने का सांगीतली जाऊ नये? त्यांच्या केवळ पार्श्वभूमीच्या फरकामुळे त्यांची चरित्रे रोचक ठरावित! त्यात कोणतीही विदारकता ओतायची गरज नाही!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तथ्य पण अस्थानी
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असणं शक्य आहे. "दलित आहे" म्हणून सदैव जीवनाची भयाण बाजूच रंगवली पाहिजे का अशा धर्तीचं काहिसं तुम्ही म्हणताय.
पण ते इथे अस्थानी वाटतं. सदर कथा कुठेही कशीही घडू शकते. एकाच घरातील दोन पिढ्यांत ती होउ शकते. भिन्न भिन्न आर्थिक वर्गातही होउ शकतेच;
जातीपातीचेही ह्या कथेला कंगोरे नाहित.
कथेतील कोणतीच घटना सदर पात्रे अ-दलित पात्रे घेतली तर बदलणार नाही.
(हा प्रॉब्लेम "नटसम्राट" येउन दशकं ओलांडली तरी तसाच आहे.स्वर्ग, घर हो तो ऐसा अशा कमर्शिअल चित्रपटांतूनही तो येउन गेलाय.)
स्वतः लेखकाला जे समोर दिसलं ते त्यानं लिहिलं असं इथे दिसून येतं.
माणूस जिथे वावरेल तेच त्याला दिसेल ना.
स्वतः पु ल ह्यांनीही तेच म्हटलं होतं. गणगोत की कोणतं पुस्तक ते आठवत नाही; त्यात त्यांनी लिहिलं त्याचा हा सारांश :-
"जो जे पाहतो, ते त्यानं लिहिणं स्वाभाविक आहे.
त्याने उगीच दुसर्याचा आव आणण्याचा प्रयत्न करु नये. मी नारायण सुर्व्यांसारखं नाही लिहित. ते लिहितात ते दाहक वास्तव त्यांनी अनुभवलय.
मी त्याबद्दल लिहिलेलं काहिच तित्कं अस्सल मला मांडता येणार नाही. तेच दलित लेखक्-कवींबद्दल.
ते लिहिताहेत, मोकळे होताहेत, होउ दे. आवश्यक आहे."
.
तुम्ही स्पेसिफिक ह्या लेखकाबद्दल म्हणताय की सर्वसाधारणपणे "दलित चळवळितील लिखाण " ज्याला म्हणतात त्याबद्दल म्हणताय हे कळलं तर बरं होइल.
जर एकूणातच चळवळीबद्दल असेल, ह्या एका धाग्याबद्दल किंवा लेखकाबद्दल नसेल तर एकूण त्या चळवळीबद्दल पुरेशी माहिती, वाचन नसल्यानं मी गप्प बसणे पसंत करीन.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुम्ही स्पेसिफिक ह्या
मी " जनरल दलितांवरचे लिखाण" असे म्हणेल. अर्थातच धाग्यावरचे लिखाण माझ्या वरच्या निरीक्षणाला धरून आहे म्हणून इथे प्रतिसाद दिला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग जाउ देत
" जनरल दलितांवरचे लिखाण " ह्याबद्दल पुरेशा अभ्यासा अभावी अधिक बोलण्यास असमर्थ.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दलित विषयांचे लेखन हे नेहमी
याचे कारण ते खरेच तसे असते असे का असु शकत नाही?
सर्वसाधारणपणे दु:खदायका आयुष्य जगणार्या समाजाने वाचकांच्या इच्छेपायी उगाच चान चान गोष्टी लिहून 'सकारात्मक' वगैरे लिहिण्याचा अट्टाहास का करावा?
बाकी श्री वाघमारे यांचे लेखन मात्र तुम्ही म्हणताय तसे वाटत नाही - वाटले नाही. त्यांनी याआधी कित्येकदा अत्यंत वेगळ्या प्रसंगातून हल्लीच्या शहरी व ग्रामिण दलितांचे दैनंदीन आयुष्य प्रभावीपणे मांडले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दैनं'दीन' अनपेक्षितरीत्या
अनपेक्षितरीत्या श्लेष साधला गेलेला दिसतो.
वेल्कम टु द कोटी ऑफ कोटी
वेल्कम टु द कोटी ऑफ कोटी क्लबर्स!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोटी कोटी प्रणाम!
कोटी :- "कोटी ऑफ" = प्रजाती ऑफ
आणि
कोटी :- कोटी क्लबर्स = "कोटी/द्व्यर्थी/श्लेष साधक"
हे दाखवून देणार्यास माझे कोटी कोटी (कोट्यवधी) प्रणाम.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद
"कोटि"डियन जीवनात असे क्षण यायचेच
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सर्वसाधारणपणे दु:खदायका
माझा प्रतिसाद स्वानुभवाचे बोल आहेत. ४-५ खेडी आणि १७-१८ वर्षे. आपला अनुभव विपरित असेल तर आपणही आपल्या जागी योग्य आहात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
<< दलित विषयांचे लेखन हे
<< दलित विषयांचे लेखन हे नेहमी विदारक, दु:खदायक, मानवी मूल्यांची निश्चित दिशा न दाखवणारे धक्कादायक अशा स्वरुपाचे का असते हे मला कधी उमगले नाही. म्हणजे मी लहान असताना मी बरीच दलित कुटुंबे पाहिली आहेत. त्यात क्वचित शिक्षित होती, इतर बरीच अशिक्षित होती. पण मला त्या सर्वांचे वर्तन 'विशेष वेगळे' कधी वाटले नाही. गोडवा, समंजसपणा, समाधान, कोणाला कसे बोलायचे याबाबतींत व्यक्तिशः मला तरी सवर्णांपेक्षा दलितच जास्त सरस असल्याचे आढळले आहे.>>
जोशी तुम्ही लहान असताना जी दलित कुटुंबे पहिलीत . तेवढच दलित विश्व मर्यादित नाही. आणि तुमच्या लहानपण च्या निरीक्षणाला तुम्ही लहान असल्याने फार अर्थ नाही. तुम्हाला विशेष वेगळे न वाटलेले वर्तन अधिक सामंजस्य समाधान (?) यात ते सरस वाटले. यामागची सामाजिक आर्थिक दबाव नीती तुम्ही समजू शकत नाही. करण तुम्ही लहान होतात. असो आता तुम्ही झालात !
<< मी शेकडोनी पाहिलेल्या वडारांमधे जी कितीतरी भावली तशा एकाही प्रातिनिधिक माणसाची कथा चांगल्या अंगाने का सांगीतली जाऊ नये? >>
चांगल्या अंगाने कथा सांगणे हे जरा स्पष्ट करता येईल काय ? म्हणजे आमचा बाप आणि आम्ही मधला पूर्वीचा संघर्ष थेट टाळून मी कुलगुरू झालो अशी सुरुवात असलेली कथा हवी काय ? म्हणजे मी जेवायला बसलोय आणि अमुक अमुकच डिश हवी च्या आग्रहा सारखी ? बाकी तुम्ही काय काय दलित साहित्य वाचलेय ते कळल तर तुमच्या एकूणच दलित साहित्या बाबतच्या (अभ्यासू ) ? चिंतनावर नेमके भाष्य करता येईल .
सतीशजी, हा प्रतिसाद आपल्या या
सतीशजी, हा प्रतिसाद आपल्या या लेखावर नव्हता. मला अन्यत्र हा विचार मांडायला योग्य जागा मिळाली नाही. हे लिखाण वाचून हा विचार सुचला. बाकी मी ७ वी ते १२ वी पर्यंत ७-८ दलित कादंबर्या वाचल्या आहेत. लातूरच्या एका दलित लेखकाचे (लक्ष्मण गायकवाड) उचल्या हे लिखाण गाजले होते तेव्हाचा हा काळ आहे.
बाकी आपल्याबद्दल व्यक्तिशः आदर आहेच आणि माझ्या सारख्या लोकांच्या खास रुचिसाठी म्हणून काही लेखन व्हावे हे अभिप्रेत नाही. माझा जो लहानपणीचा अनुभव आहे तो मी मांडला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मस्त लिहीलंय. आवडलं लिखाण
मस्त लिहीलंय. आवडलं लिखाण
....
आशीर्वादासाठी न वाकताही
आशीर्वादासाठी न वाकताही खरखरीत हात पाठीवरुन फिरला .....
लाजवाब!!!!
वाघमारेजी तुम्ही ललीत च लिहा. ताकद आहे तुमच्या नीरीक्षणात अन मांडणीत.
धन्यवाद सारिका !
धन्यवाद सारिका !
काही जणांकडे संवेदनशील मन
काही जणांकडे संवेदनशील मन असतं पण भाषाप्रभुत्वात मार खातात. तुमच्याकडे "क्लिक्-क्लिक" फोटोग्राफीक लेन्स ही आहे अन ती ट्रान्स्लेट करणारं संवेदनशील मनही त्यातूनच आपण स्वतःला एखाद्या ध्येयाला वाहून घेतलेही असेल कदाचित. बस एवढच सांगते - आगे बढो (कीप इट अप).
भावपूर्ण अशी श्रेणी दिली जात
भावपूर्ण अशी श्रेणी दिली जात आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अप्रतिम
हा ललित वाचूनच ऐसीचे सदस्यत्व घ्यायचे मी ठरवले. आपली शैली विशेष आवडली.
धन्यवाद.
_/\_
__मनस्वी राजन ( Rajendra Zagade )
स्वागत आहे.
उत्तम निर्णय. स्वागत आहे.