और नही बस और नही…
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही. या लेखात त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. रफीसारखा प्रचंड गुणवत्तेचा गायक सर्वसाधारणपणे चार दशकं हिन्दी चित्रपट संगीताच्या सिंहासनावर विराजमान होता हे चटकन सुचणारं कारण असलं आणि त्यात तथ्य असलं तरी तेवढं पुरेसं नाही. कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. या तिघांनीही रफीसमोर आपापली वेगळी साम्राज्यं उभारली आणि त्या साम्राज्यांचे ते शेवटपर्यंत सम्राट राहीले. नावाजलेल्या संगीतकारांनी रफीसमोर, रफी ऐन भरात असताना मन्ना डे, मुकेश व तलत यांना अविस्मरणीय गाणी दिलेली आहेत. खरंतर त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यात रफीलाही प्रवेश नव्हता असं म्हटल्यास वावगं ठरु नये. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात मन्ना डे, दर्दभर्या गीतांत मुकेश आणि गझलमध्ये तलत यांना दुसरा पर्याय नव्हताच. महेंद्र कपुरचं यातिघांप्रमाणे रफीसमोर वेगळं साम्राज्य निर्माण झालं नाही. रफी, किशोर, मुकेश हे अनुक्रमे दिलीप, देव व राज या दिग्गजांसाठी गायिले. हा योग महेंद्र कपुरच्या भाग्यात नव्हता. महेंद्र कपुरची अप्रतिम गाणी ही सुनील दत्त (गुमराह, हमराज), शशी कपुर (वक्त, प्यार किये जा), राजेंद्र कुमार (गीत, संगम), विश्वजीतसाठी (किस्मत), होती. अर्थातच ही यादी आणखि वाढवता येईल पण त्यात ते त्रिकुट नसणार. शेवटी दिलीपकुमार जेव्हा “रामचंद्र कह गये सिया से” हे महेंद्र कपुरच्या आवाजात गाऊ लागला तेव्हा उशीर झाला होता. महेंद्र कपुरवर शिक्का बसलाच असेल तर तो मनोजकुमारचा आवाज म्हणुन. “मेरे देश की धरती” हीट झाल्याने महेंद्र कपुर आणि देशभक्तीपर गाणी हे जणु समिकरणच बनलं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रामप्रहरी महेंद्र कपुरचा आवाज दुमदुमु लागला. “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन घेण्याची पाळी आली. ते ही यश निर्भेळ नव्हतंच. “जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा” हे फार पुर्वी रफी गाऊन गेला होता. शिवाय मनोज कुमारला दिलीप, राज आणि देव आनंदचं ग्लॅमर कधीही लाभलं नाही.
आम्ही महेंद्रकपुरच्या प्रेमात केव्हा पडलो ते नीट लक्षात नाही पण बहुधा “तुम अगर साथ देनेका वादा करो” या गाण्यापासुन. “चलो इकबार फिरसे” मनात रुजायला थोडासा वेळ लागला. “ऐ जाने चमन तेरा गोरा बदन” खुप आवडतं. विशेषतः “ऐ हुस्ने बेखबर” पासुनची सुरुवात खासच. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराची गाणी गावी ती महेंद्र कपुरनेच. “ऐ जाने चमन” आहेच. शिवाय “दिल लगाकर हम ये समझे”, “मेरा प्यार वो है के”, “किसी पत्थरकी मुरत से मुहब्बत का इरादा है”, “यारों कि तमन्ना है”, “तुम्हारा चाहनेवाला, खुदा की दुनिया में”, “जिसके सपने हमे रोज आते रहे”, “इन ह्वाओं मे इन फिजाओं में”, “झुके जो तेरे नैना”, “तेरे प्यार का आसरा चाहता हुं”, “तुम अगर साथ देनेका वादा करो”, “आ भी जा आ भी जा”, “मेरी जान तुमपे सदके एहेसान इतना करदो”, “छोडकर तेरे प्यार का आलम”, “आजकी मुलाकात बस इतनी”, “हमने जो देखे सपने”, “धडकने लगी दिलके तारों की दुनिया”, “आखोंमे कयामत के काजल”, “रफ्ता रफ्ता वो हमारे” पासुन ते अगदी अलिकडल्या “ये पहले प्यार की खुशबु” पर्यंत अशी कितीतरी अप्रतिम गाणी महेंद्र कपुर गाऊन गेला आहे. महेंद्र कपुरच्या आवाजाची जातच मुळी प्रियकराचं आर्जव, आर्तता आणि समर्पणाची भावना घेउन येते असं मला वाटतं. मात्र इतर काही गाण्यांचा वेगळ्याने विचार व्हायला हवा. काही चिंतन करायला लावणारी गाणी महेंद्र कपुरने गायिली आहेत. दोन उदाहरणं मला चटकन आठवतात. “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “संसार की हर शय का” ही अनुक्रमे “हमराज” व “धुंद” मधील गाणी. दोन्ही चित्रपट काहीश्या चाकोरीबाहेच्या “बोल्ड” विषयावरचे. दोन्ही बी. आर. चोप्राचेच. बी. आर. चोप्रा, साहीर लुधियानवी आणि महेंद्र कपुर या टीमने दिलेली गाणी ही मनोजकुमार, महेंद्र कपुर, कल्याणजी आनंदजी पेक्षा मलातरी फार उजवी वाटतात. देशभक्तीची भावना हा काही चांगल्या गाण्याचा निकष होउ शकत नाही. आणि भलत्या बाबतीत भावनावश होण्यात अर्थही नाही. बाकी बी. आर. चोप्राने महेंद्र कपुरला शेवटपर्यंत साथ दिली. मला तर “अथ श्री महाभारत कथा” फार आवडायचं. विशेषतः एपिसोड संपताना “भारत कि ये काहानी सदीयों से है पुरानी” या ओळींनी केलेली सांगता तर छानच होती. त्यानंतर “चलो इकबार फिरसे”, “आप आये तो खयाले दिले नाशाद आया” यासारख्या गाण्यांवर बोलावं लागेल. अगदी नवीन वाटेवरची ही गाणी आहेत प्रेयसी आता दुसर्याची झालेली आहे पण सूडाची भावना नाही. वैफल्याचा तळतळाट नाही. कुठल्याही तर्हेचा उरबडवेपणा तर नाहीच नाही. अतिशय समंजस, प्रौढ, प्रगल्भ भाव या गाण्यांमधुन व्यक्त होतो. “निकाह” च्या “बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी” मध्ये जुना महेंद्र कपुर पुन्हा त्याच तेजाने तळपला होता. महेंद्र कपुरच्या हिर्यामोत्यांचा असा हिशोब दिल्यावर मला “ठंडे ठंडे पानी से” सारख्या गाण्यांचा फारसा विचार करावासा वाटत नाही.
महेंद्र कपुरच्या गायकीला न्याय दिला असेल तर तो दोघांनी. एक संगीतकार रवी आणि दुसरा ओ.पीं. नैयर. बी. आर. चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे. ओ.पी ने दिलेल्या संगीतात “किस्मत” चित्रपटातील गाणी आजदेखिल महेंद्र कपुरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये गणली जातात. “आखों मे कयामत के काजल” सारखं अप्रतिम गाणं ओ.पी ने या चित्रपटात दिलं. मात्र अभिनेता विश्वजीतला या गाण्यांचं चीज नाही करता आलं. दिलीपकुमार सारखे अभिनेते उत्कृष्ट गाण्याला त्याच तोडीचा अभिनय करुन गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत असत. याबाबतीत महेंद्र कपुर दुर्दैवीच म्हणायला हवा. जिज्ञासुंनी “लाखों है यहां दिलवाले” सारखं गाणं जरुर पाहावं. पडद्यावर हे गाणं गाताना विश्वजीतने गिटारचा वापर एखाद्या हत्यारासारखा करत, कंबर, मान आणि तंगड्या नको तिथे हलवुन गाण्याचं पार मातेरं करुन टाकलं आहे. गाणं एकीकडे आणि विश्वजीतसाहेब भलतीकडे असा प्रकार या गाण्याच्या नशीबी आलाय. रफीलाही त्याच्या अनेक उत्कृष्ट गाण्यांसाठी भारतभुषण, प्रदिपकुमारसारख्या अभिनेत्यांसाठी गावं लागलं. हे अभिनेते अभिनयात ग्रेट नसतीलही पण रफीच्या गाण्यांचे त्यांनी असे बारा वाजवले नाहीत. कुठेतरी मला महेंद्र कपुरच्या अपयशात त्याला पडद्यावर त्याच तोडीचे कसलेले अभिनेते मिळाले नाहीत हे देखिल कारण महत्त्वाचं आहे असं वाटतं. येथे महेंद्र कपुरच्या काही मर्यादांही विचार करावा लागेल. यात दुमत होण्याची शक्यता आहे. रफीचा आवाज दिलीप, देव, धर्मेंद्र, शम्मी कपुरला फीट्ट बसला. मुकेश तर राज कपुरचा दुसरा आवाजच बनुन गेला. मन्नाडेचा सुद्धा आवाज राज कपुरला चपखल बसला. राजेश खन्ना आणि किशोर कुमारने एक नवीन युगच चित्रपट सृष्टीत आणलं. महेंद्र कपुरच्या बाबतीत आवाज चपखल बसण्याचं उदाहरण दिसुन येत नाही. मनोजकुमारचा अपवाद देखिल सणसणीत म्हणता येणार नाही. मुकेश (दिवानोंसे ये मत पुछो), रफीने (भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जाये) मनोजकुमारसाठी काही अजरामर गाणी गायिली आहेत. मला महेंद्र कपुरचा आवाज हा नेहेमी शुचिर्भुत, शुद्ध, सुस्नात असाच वाटला. त्यात किशोरकुमारच्या आवाजातलं सळसळतं तारुण्यं, टारगटपणा, रफीची धार येण्याचा संभव कमी त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं. तलत जेव्हा “जाये तो जाये कहां” म्हणु लागतो, किशोर जेव्हा “मै शायर बदनाम” म्हणत अयशस्वी कवीची वेदना बोलुन दाखवतो, रफीच्या तोंडुन जेव्हा “याद ना जाये बीते दिनों की” बाहेर पडतं तेव्हा सारं वातावरणच झाकोळुन गेल्यासारखं वाटतं. ही किमया महेंद्र कपुर कडुन फारशी घडलेली नाही. मुकेश तर या क्षेत्रातला राजाच. त्याच्याबद्दल काय बोलणार? मात्र याला महेंद्र कपुरची तीन गाणी अपवाद आहेत. एक “संबंध” चित्रपटातलं “अंधेरे में जो बैठे है”, दुसरं “संगम” चित्रपटातलं “हर दिल जो प्यार करेगा” आणि तिसरं मनोजकुमारच्या “रोटी कपडा और मकान” मधलं “और नही बस और नही” . या गाण्यातला प्रचारकी थाटाचा भाग सोडल्यास “कोई आग मचल जाये, सारा आलम जल जाये” या ओळी महेंद्र कपुरने अशा तर्हेने म्ह्टल्या आहेत कि जाळुन टाकणार्या थंडगार अॅसिडचा स्पर्श त्या ओळींना झाल्यासारखा वाटतो.
महेंद्र कपुरच्या मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल स्वतंत्र लिहावं लागेल. त्याचे मराठी उच्चार इतके उत्कृष्ट होते कि मुळात एक अमराठी माणुस मराठी गाणं गातोय असं कधी वाटलंच नाही. “सुर तेच छेडीता”, “सांग कधी कळणार तुला”, “हे चिंचेचे झाड दिसे मज”, “रात्रीस खेळ चाले” पासुन ते ” ती येते आणिक जाते” पर्यंत कितीतरी ग्रेट गाणी महेंद्र कपुरच्या नावावर आहेत. मात्र येथे महेंद्र कपुरला गृहीत धरलं गेलं असं मला वाटतं. घरकी मुर्गी दाल बराबर या न्यायाने प्राचीन काळापासुन मराठी गात असलेला महेंद्र कपुर जणु काही विसरलाच गेला आणि “शोधीसी मानवा राऊळी मंदीरी” ने मराठीतही रफी युग आणलं. रफीची मराठी गाणी गुणगुणताना लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागु लागली. पुढे “आश्विनी ये ना” ही आरोळी ठोकुन किशोर कुमारने येथे प्रवेश केला तेव्हा ” माझ्यापासुन दुर नको जाउ गंगुबाय” हे अस्सल गावरान ठेक्यात दादांच्या चित्रपटात अनेक वर्षे गाणारा महेंद्र कपुर आमच्या खिजगणतीतही नव्हता. रफी, किशोरचं अमराठी म्हणुन मराठीत जेवढं उदंड कौतुक झालं तेवढं महेंद्र कपुरचं कधीही झालं नाही असा तर माझा आरोपच आहे. या लेखाचा प्रपंच महेंद्र कपुरच्या गाण्यांची जंत्री देण्यासाठी केलेला नाही. बरीचशी चांगली गाणी राहुन गेल्याचा संभव आहे. या गुणी गायकाच्या कारकिर्दीचा एका विशिष्ठ दॄष्टीकोणातुन मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. महेंद्र कपुर प्रति रफी झाला नाही याचं दु:ख नाही. मात्र या अतिशय गुणी गायकात तलत, मुकेश, मन्ना डे सारखं साम्राज्य निर्माण करण्याची कुवत नक्कीच होती. महेंद्र कपुरचं असं वेगळं साम्राज्य झालं नाही याचंच फार वाईट वाटतं. मर्यादा सर्व गायकांना होत्या. पण त्यांना त्यांच्या आवाजाला सजेशी गाणी दिली गेली. महेंद्र कपुरच्या आवाजाला खुलवणारी गाणी रवी, साहीर, ओ.पी. नेच दिली. ती परंपरा पुढे चालली नाही. “और नही बस और नही, गम के प्याले और नही” हा मला महेंद्र कपुरचा आक्रोशचं वाटतो. केव्हातरी मी आठवणीने “दिल लगाकर हम ये समझे” हे माझं अत्यंत आवडतं गाणं लावतो. कानावर मोरपीस फिरवल्यासारखं होतं. पण मनात आत कुठेतरी “और नही बस और नही” म्हणणार्या महेंद्र कपुरचं दु:ख विसरता येत नाही.
अतुल ठाकुर
प्रतिक्रिया
जिज्ञासुंनी “लाखों है यहां
लेख मस्त आहे.
माझे मत
'महेंद्र कपूर'वर कुणी लिहावे हे दुर्मिळच. त्यामुळे लेखाबद्दल धन्यवाद.
.
माझे वैयक्तिक मत असे, की त्यांच्या आवाजाचा पोतच माझ्या कानाला बरा वाटत नाही; गायकी कितीही चांगली असली तरी.
उदा. 'पूर्तता माझ्या व्यथेची' हे अत्यंत कठीण गाणे त्यांनी उत्तम पेलले आहे पण... पण आवाज बरा वाटत नाही. त्यामुळे ते माझ्या पसंतीस कधीच आले नाहीत.
त्यांची मराठीतली गाणी इथे ऐकायला मिळतील.
हेच
महेंद्र कपूर'वर कुणी लिहावे हे दुर्मिळच. त्यामुळे लेखाबद्दल धन्यवाद.
.
हेच म्हणतो. बाकी लेखात उल्लेख केलेल्या काही गाण्यांबाबत मतभेद आहेत, पण ते जाऊ द्या. 'रात्रीस खेळ चाले' हे बाकी आवडीचे गाणे.
'आदमी' मधले 'कैसी हसीन आज' या गाण्यातला रफीबरोबरचा तलतचा आवाज हिरावून घेतल्याबद्दल महेंद्र कपूरचा निषेध! (त्याचा बिचार्याचा काय दोष? पण तरीही...) नाहीतर ते गाणे असे असते.
आमचा तलत कमनशिबीच. या गाण्यात काय वाईट आहे? पण ते गेले रफीच्या वाट्याला. असो.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आक्षेप!
आमचे-तुमचे या विश्वात कशावरूनही पटणे अशक्य असेलही कदाचित, ते सोडून सोडा. पण तलतवर स्वामित्वहक्क आपणांस नेमका कोणी आणि कधी दिला, म्हणतो मी!
(No subject)
(No subject)
आमचा तलत कमनशिबीच एकदम पटले.
आमचा तलत कमनशिबीच
एकदम पटले.
लेख आवडला. खणखणीत आवाज आहे
लेख आवडला. खणखणीत आवाज आहे महेँद्र कपुरचा.
छान...
लिखाण पुन्हा वाचलं, आवडलं. इथल्या दुव्यांमधील गाणी घरी जाउन ऐकेन.
बाकी अतुलशेट, तुम्ही धागे टाकून असे गायब नका होउ राव.
इथल्या बाकी धाग्यांमध्येही डोकावत चला की.
इतर मंडळी नाहीत का तुमच्या धाग्यात सहभागी होत?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
इथल्या बाकी धाग्यांमध्येही डोकावत चला की.
इतर मंडळी नाहीत का तुमच्या धाग्यात सहभागी होत?
हळुहळु अंदाज घेत आहे. मी या संस्थळावर नवीनच आहे. झेपतील अशा धाग्यांवर प्रतिसाद द्यायला सुरुवात करेनच. जालावर लिहायला लागल्याला वर्ष झालं. तोपर्यंत स्वतःच्या ब्लॉग आणि फेसबुकपुरतंच लिखाण मर्यादित होतं. चर्चा करायला आवडते मात्र अनेक ठीकाणी भडकणार्या वादविवादाचा आत्यंतिक कंटाळा आहे. वादविवाद झाल्यास मी प्रतिसाद देणेच थांबवतो. त्यामुळे या संस्थाळाची प्रकृती कशी आहे याचा अंदाज घेऊनच प्रतिसाद देईन.
अजुन पर्यंत तिन लेख टाकले. एकुण चार लेख टाकण्याचा विचार आहे. जर मला येथील वातावरण जमलं नाही तर मी आनंदाने माझं येथे लिखाण थांबवेन पण फक्त माझं लिखाण टाकुन गायब होणार नाही हे नक्की. माझ्या लेखांवर प्रतिसाद घ्यायचे आणि इतरांच्या लेखांमध्ये सहभागी व्हायचं नाही हा इतरांवर अन्याय आहे हे मला मान्य आहे.
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
ओके
ह्या संस्थळाच्या प्रकृतीविषयीच म्हणाल तर य्म्दाचा दिवाळी अंक ही एक त्याविषयी टेम्प्लेट्/सॅम्पल्/नमुना म्हणता यावा. अंक पाहिल्यावर गंभीर्,
आशयघन किंवा कुणाला चक्क कंटाळवाणं वाटेल असं लिखाण इथे अधिक दिसतं हे जाणवतं.
पण त्याचसोबत http://www.aisiakshare.com/node/2331 ह्यासारख्या धाग्यातून झकास दंगामस्तीही दिसते.
मी काही इथला अधिक्रुत प्रवक्ता नाही, पण ह्या सायटीबद्दल जाणवलं ते लिहिलं.
बाकी, मुद्दा समजला. आभार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
(No subject)
अतिशय परिचित पण ज्याच्यावर
अतिशय परिचित पण ज्याच्यावर लेखन सहसा दिसत नाही अश्या व्यक्तीवर लिहिलंत.अशा 'अनवट' लेखाबद्दल आभार!
महेंद्र कपूर बद्दलचं मत अमुक यांच्या प्रमाणेच आहे.
किंबहुना गायकीतलं फारसं (खरंतर अजिबातच) कळत नाही पण (त्यामुळेच) आवाज माझ्यात 'पोचला' नाही तर मजा येत नाही. इथेही तसंच होतं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अतिशय सुंदर गाण्यांच्या आठवणी
अतिशय सुंदर गाण्यांच्या आठवणी देणारा लेख .
(पण काही म्हणा रफी तो रफीच ..)
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
इतर मंडळी
इतर मंडळी नाहीत का तुमच्या धाग्यात सहभागी होत?
चला आमचे पावशेर
अपरिचित तलत
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
तलत की बातही कुछ और है!
तलत की बातही कुछ और है! मखमली, आर्त आवाज आहे. तलत फार आवडतो.
>>पण या सर्वांसकट तलतचा आवाज खानदानी होता. त्याच्या आवाजात एक सुसंस्कृतपणा होत>>> (स्त्रोत - वर आपण उल्लेखलेला आपला लेख)
अगदी प्रचंड खरय. त्याच्या आवाजातला सुसंकृतपणा खासच. एकदम १००% सहमत!!!!
महंमद रफीबद्दल... (अवांतर)
महंमद रफीची मराठी गाणी हा एक विनोद आहे. (तरी 'शोधिसी मानवा' त्यातल्या त्यात टॉलरेबल, ऑलमोस्ट [बॉर्डरलाइन] श्रवणीय होते.)
तशी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक मातबर बिगरमराठी गायकांनी मराठीत गाणी म्हटली असतील, अगदी 'हा गायक बिगरमराठी आहे' असा पत्ता न लागण्याइतक्या बेमालूमपणे गायली असतील. (आणखी एक उदाहरण द्यायचे झाले, तर हेमंतकुमारचा 'डोलकर' ऐकल्यास केवळ मधल्या त्या 'भोल्या शोकाल आभाल'मुळे 'हा गायक बिगरमराठी असावा' अशी पुसटशी शंका येते; अन्यथा ते गाणे छान जमून गेले आहे.) दुर्दैवाने, महंमद रफीचे नाव त्या यादीत घेववत नाही. (हिंदीत असेलही मातबर, पण मराठीत गाताना तसलेच उडते उच्चार नि आघात टान्सपोज़ करून वाट लावायचा.)
असो.
सहमत आहे
(नाईलाजाने) सहमत आहे. जे हिंदीत कमावले, ते मराठीत गमावले म्हणण्याइतपत.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
छन्द जिवाला लावी पिसे
छन्द जिवाला लावी पिसे....
ह्यातील "छन्द", "जिवाला" ह्या शब्दांची त्यानं अगदि पिसं काढली आहेत.
"छन्द " ह्याचा उच्चार "छन्न" असं करणं डोकं उठवतं.
बाकी गाणी रफीमराठी गानी फारशी ऐकली नाहित, "शोधिसी मानवा " सोडून.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनाब
'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनाब वृक्षापरी' या ओळीतले चारही 'च' हे चड्डीतल्या च प्रमाणे म्हणण्यामुळे रफी लक्षात आहे. (तसं बाकी गाणं 'चां'गल'च' आहे म्हणा.) पण त्याला बिचाऱ्याला का दोष द्या? तो तर अमराठी पडला. मंगेशकर कुटुंबातल्या पोरासोरांनीदेखील 'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला' यातले चॉकलेटचा सोडून बाकीचे च चड्डीतलेच ठेवले आहेत.
चिनाब नव्हे - चिनार. रफी नव्हे - महेंद्र कपूर.
हा घ्या विदा :). वाचा, पाहा, ऐका.
'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनाब
'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनाब वृक्षापरी'
हे माझ्या माहीतीपमाणे महेंद्र कपुरचं आहे.
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
गलती होगई. चुकीच्या आठवणीवर
गलती होगई. चुकीच्या आठवणीवर विसंबून राहून ते विदा न तपासताच लिहिलं.
मंगेशकर कुटुंबीय मराठी
मंगेशकर कुटुंबीय मराठी व्याकरणासाठी प्रसिद्ध आहे का? कि त्यांच्यावर टिका केल्याशिवाय संगीतसिद्धी प्रकट करता येत नाही. ते गाणं मी ही ऐकलं आहे, काही खुपलं नाही ब्वॉ मला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
संगीतसिद्धी हा वेगळा विषय
संगीतसिद्धी हा वेगळा विषय झाला. त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे चुकीच्या ठिकाणी चुकीचा च वापरला असेल तर ते खुपणारच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
या प्रतिसादामुळे यूट्यूबवर
या प्रतिसादामुळे यूट्यूबवर 'डोलकर दर्याचा राजा' उघडलं. खरंतर बघायला नको होतं, पण पाहिलं. "चोली पिवली गो नेसलंय अंजिरी साडी" या ओळीला दिसणारी प्रतिमा पाहून झीट आली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संकीर्ण निरीक्षणे
- 'अंजिरी' ही 'फिफ्टी शेड्ज़ ऑफ जांभळा'पैकी (किंवा 'जांभळा' ही 'फि. शे. ऑ. अंजिरी'पैकी) आहे, याची कल्पना नव्हती. ('अंजिरी'मध्ये जांभळ्याबरोबर थोडा हिरव्याचाही अंश असायला हवा, नै?)
- 'पिवळा' म्हणजे हळदीचा रंग. चित्रातील बयेचा जो ब्लाऊज/चोळी/कंचुकी/जे काही आहे, त्याचा रंग साधारणपणे कुयरीला धक्का लागून त्यातले कुंकू (पिंजर) हळदीच्या बाजूला सांडले नि हळदीत मिसळले, तर ती हळद जशी दिसेल, तशातला आहे. पक्षी, कधी काळी ही 'चोळी' पिवळी असू शकेल, असे मानावयास जागा आहे. (कदाचित, अंजिरीतला हिरवा काढून घेतला, त्याची भरपाई म्हणून इथे पिवळ्याबरोबर बोनस लाल टाकला असावा काय?)
- गो तुज्या केसान् मालीला फुलैला चाफा कुठ्ठाय??? (कदाचित, 'कथा'मधल्या दीप्ती नवलच्या टाळक्यामधल्या जास्वंदीसारखा एका बाजूला मालीला असावा, नि शूटिंगच्या अँगलमुळे त्याला बहुधा ग्रहण लागले असावे.)
- ६:३४पासून पुढे पाहा. मिशेलतै नि बराकभौ हे मूळचे मुंबई किंवा कोंकण किनारपट्टीवरील कोळीवाड्यातले कोळी आहेत, हे नव्याने कळले. (आता पटली खात्री, ते बर्थ सर्टिफिकेट नकली होते म्हणून?)
- थोडे मागे येऊन ६:३१पासून पहा. हा 'इण्डिया असोशिएशन ऑफ ग्रेटर बॉष्टन'चा उपद्व्याप आहे, असे कळते. (मग बरोबरच आहे. अंजिरीऐवजी जांभळा नि पिवळ्याऐवजी हळदीकुंकू-कलर खपवून दिला, तरी इथे कोणाला पत्ता लागणाराय? द्या ठोकून!)
- आणखी किंचित मागे येऊन ६:२८पासून पहा. त्या मधल्या दोन लहान पोरींनी पिवळी साडी नि पिवळाजर्द ब्लाऊज घातलाय. म्हणजे, पिवळ्या कापडाची टंचाई नाहीये खरे तर ग्रेटर बॉष्टनात! (पण डिट्टेल लक्षात कोण घेतो?)
- साधारणतः ६:१९ ते ६:२४. 'नेतो बाजारा भरून म्हवरा ताजा' म्हणून एक कोळीण टोपली घेऊन बसलेली दाखवलीय. तिच्या टोपलीत जे मासे दाखवलेत, त्यांची जातपात मला ठाऊक नाही.१ कोणी पारंपरिक मत्स्याहारीजन त्यांच्या२ जातीचा दाखला देऊन ते नेमके म्हवरेच३ आहेत किंवा कसे, याची खातरजमा करून देतील काय? आगाऊ आभार.
================================================================================================================================================
१ 'कारण शेवटी आम्ही भटेंच! त्याला काय करणार?' - अर्थात पु.ल.! आणखी कोण?
२ 'त्यांच्या' बोले तो त्या टोपलीतल्या माश्यांच्या२अ. ओळखपरेडीत ओळखणार्या मत्स्याहारीजनांच्या नव्हे.
२अ 'माश्यांच्या' बोले तो, त्या टोपलीत मरून पडलेल्या माश्यांच्या; टोपलीभोवती घोंगावणार्या जिवंत माश्यांच्या नव्हे. बोले तो, 'फिश'. 'फ्लाइज़' नव्हे. यानी कि, बिगर-मत्स्याहारींशी बोलताना ज्याला 'फीश' (सामान्यतः, सानुनासिक हेलासह) म्हणायचे असते, नि आपसात ज्याला 'बाजार'२ब म्हणून संबोधले जाते, ते.
२ब यावरून एक गोष्ट सुचली. (थोडीशी, फाटलेली पिशवी शिवल्यापासून सायकलीला अडकवलेल्या पिशवीतले पाव रस्त्यात पडायचे थांबले, म्हणून 'आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे' असे आनंदाने गाणार्या पावविक्याच्या ष्टोरीच्या धर्तीवर आहे.)
एकदा एक मुलगा असतो. त्याला लहानपणापासून आपल्या आईच्या हातचे मासे फार म्हणजे फार प्रिय. मोठा झाल्यावर हॉस्टेलला गेल्याने म्हणा, किंवा परगावी नोकरीला लागल्याने म्हणा, किंवा कदाचित आर्मीत गेल्याने म्हणा, आईपासून खूप खूप दूर जातो. दूर जातो खरा, पण आईच्या हातच्या मासळीची ओढ काही त्याला स्वस्थ बसू देत नाही. इतकी की, बर्याच वर्षांनंतर सुट्टी घेऊन गावी येतो, तो घरी येऊन आईला भेटण्यापूर्वी वाटेतच कोठेतरी आपली आवडती मासळी (जी कोठली असेल ती) विकत घेतो, नि घरी आल्याआल्या आईच्या पुढ्यात ती टाकून आईस म्हणतो कसा, की "आई, आई, कित्तीकित्ती वर्षांपासून तुझ्या हातच्या मासळीला तरसलो गं! ही घे मासळी, नि आत्ताच्या आत्ता बनवून तुझ्या लाडक्या लेकाला ती खाऊ घाल."
आई अर्थातच वैतागते. या मुलाला मी जन्म दिला, याचे पालनपोषण केले, लाड केले, कोठे दुखलेखुपले ते पाहिले, लहानाचे मोठे केले, नि आज इतक्या वर्षांनंतर मला भेटतोय, तर माझी विचारपूस करायची सोडून पहिल्याप्रथम काय करतोय, तर माझ्यासमोर मासळी थोपवितोय. ही सगळी पुरुषजात मेली अश्शीच, आप्पलपोटी! जळ्ळा मेला बायकांचा जन्म!
तर आई आपला त्रागा एखाद्या हिंदी फिल्मी गाण्यातून थोडक्यात कसा व्यक्त करेल?
"औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया..."
३ व्हॉटेवर द्याट मे बी.
2B is amazing!!!
2B is amazing!!!
नवींचे प्रतिसाद बघताना
नवींचे प्रतिसाद बघताना एखाद्या विधेयकाचीच आठवण होते. तिथेही प्रत्येक परिच्छेदाला नंबर असतात.
बाकी २अ व २ब दोन्ही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेख खुपच आवडल्या गेल्या
लेख खुपच आवडल्या गेल्या आहे
.इतरांच्या खाजगी जीवनात भोचकपणे शिरकाव करणारी सिनेपत्रकार मंडळींनी महेंद्र कपूर बाबत कसा काय भोचकपणा केला नाही?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लेख महेंद्र कपूरच्या
लेख महेंद्र कपूरच्या आवाजाप्रमाणेच दमदार झालेला आहे.
त्याचा आवाज ऐकला की त्याचा पंजाबी दणदणीतपणा एखाद्या पदार्थात धण्याचा वास पुढे यावा तसा पुढे यायचा. 'मेरे देशकी धरती' सारख्या गाण्याला त्याच्या बुलंद आवाजाशिवाय दुसऱ्या आवाजाची कल्पनाही करवत नाही. पण आपल्या आवाजात कधी नजाकत, दर्द, ओलावा त्याला आणता आला का हा मला प्रश्न आहे. किशोरकुमार 'इना मिना डिका' सारखी देधमाल गाणी गाऊ शके त्याचबरोबर 'आ चल के तुझे, मै लेके चलू, इक ऐसे गगन के तले' सारखी घनगंभीर गाणीही गाऊ शकत असे. (रफी यशस्वी झाला खरा, आणि त्याच्याकडेही वैविध्य होतं - पण किशोरकुमारची सर त्याला नाही असं माझं मत आहे.)
त्याकाळी गायक म्हणजे एका हिरोच्या तोंडची सर्व गाणी गाऊ शकेल असा - वन साइझ फिट ऑल - स्वरूपाचा असण्याची गरज असे. अशा वेळी ही रेंजची मर्यादा पडल्यामुळे कदाचित तो पुढे आला नसावा अशी शंका येेते.
रफी यशस्वी झाला खरा, आणि
रफी यशस्वी झाला खरा, आणि त्याच्याकडेही वैविध्य होतं - पण किशोरकुमारची सर त्याला नाही असं माझं मत आहे.
तीव्र आक्षेप. यावरून अण्वस्त्रयुद्ध होऊ शकते हो.
यावरून अण्वस्त्रयुद्ध होऊ
माझी तयारी आहे. तुम्ही पहिला स्फोट करता की मी करू?
काहीही
रफीची बरीच गाणी सुश्राव्य आणि मधुर आहे. किशोरकुमारची थोडीशीच. (पर क्यापिटा तत्त्व लावल्यास रफीचा स्कोअर निश्चितच जास्त होईल)
(अवांतर)
'खवचट' ही श्रेणी निगेटिव म्हणून उगाच बदनाम आहे.
कृपया गोड मानून घ्यावी, ही नम्र विनंती.
म्हणूनच
म्हणूनच तुम्हाला खवचट श्रेणी देणयचे योजले आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मजा नाही.
तसेही, मी 'भडकाऊ'पेक्षा कमी काहीही स्वीकारत नसतो.
अस्वीकार
हा अस्वीकार नेमका आपण कसे करता?
म्हणजे, कुणी येउन आपल्याला मुद्दाम आपणास दुखावण्यासाठी आपल्या प्रतिसादाला
"मार्मिक" अशी श्रेणी दिली, तर ती रिव्हर्ट करण्याची काही क्लृप्ती आपणास ज्ञात आहे काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मागे एकदा बुद्धकथा सांगितली होती.
आठवली, तर पहा. नाहीतर पुढेमागे कधीतरी दुवा देईनच.
थ्यांक्स
लहनमोटेह अशा दुवा देतात म्हणूनच ह्या अवघड परिस्थितीतही नेटानं तग धरुन आहे बघा.
द्या द्या, दुवा द्या.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अॅपल अॅन्ड ऑरेंज
महंमद रफी आणि किशोरकुमार - किंवा खरे तर असे कोणतेही कलाकार यांची प्रत्यक्ष तुलना करता येणे अशक्य आहे. (ते अण्वस्त्रयुद्ध वगैरे थट्टेत चालले आहे अशी मला आशा आहे. नाहीतर 'मनोगत' वर 'धाकटी की थोरली' या नावाची एक अत्यंत वातड चर्चा झाली होती, तसे काहीसे होईल!) महंमद रफीच्या जागेवर महंमद रफी. किशोरकुमारच्या जागेवर किशोरकुमार.
अवांतरः सदरहू वाद घेऊन आम्ही दिवंगत संगीतकार चित्रगुप्त यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि ते म्हणाले, "महंमद रफीच्या जागेवर महंमद रफी. किशोरकुमारच्या जागेवर किशोरकुमार." "आम्ही हेच म्हणतो दादा" आम्ही म्हणालो. "पण.." "पण नाही आणि बिण नाही.." चित्रगुप्त म्हणाले. "मी महंमद रफीला पण गाणी दिली आणि किशोरकुमारलाही . आता यात सरस-निरस कसं ठरवायचं सांग बघू?"
"निघतो दादा मी" आम्ही म्हणालो.
"अरे बैस. महंमद रफी ऐकलास, किशोरकुमार ऐकलास, आता एक लताचंही गाणं ऐकून जा की..." दादा म्हणाले.
चित्रगुप्तदादा लताचं कुठलं गाणं ऐकवणार याचा अंदाज आला होताच. आम्ही बसलो. डोळे मिटून घेतले. ते अजरामर गाणं सुरु झालं....
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
"दिल का दिया" गाणं स्वर्गीय
"दिल का दिया" गाणं स्वर्गीय आहे. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या सुरेख लेखाच्या दुव्याबद्दलही.
"दिल का दिया" गाणं स्वर्गीय आहे.
"दिल का दिया" गाणं स्वर्गीय आहे.
चरणस्पर्श करके प्रणाम.
अॅपल ऑरेंज वगैरे ठीकाहे हो,
अॅपल ऑरेंज वगैरे ठीकाहे हो, पण 'कोई होता, जिसको अपना हम अपना कह लेते यारो...' हे गाणं रफीच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाही करवत नाही - विशेषतः त्यातला खर्जातला भाग. त्यामुळे त्यांच्या आपापल्या जागा किती युनिक आहेत याबद्दल शंका घेता येतेच की. रफीचा वापर वन व्हॉइस फिट ऑल या गैरसमजाने सगळ्याच प्रकारच्या गाण्यांसाठी वापरला गेला. एक उदाहरण देतो. 'तय्यबल्ली प्यार का दुश्मन हाये हाये' हे रफीने म्हटलेलं गाणं ऐका. चांगलं आहे. पण तेच गाणं अस्सल कव्वालीचा गळा असलेल्याने गायलेलं ऐका. मग रफीचं 'एक सवयीचा गोड आवाज' यापलिकडे व्यक्तिमत्व जाणवत नाही. रफी बऱ्याच रेंजमध्ये 'बरं' गाऊ शकायचा हे खरं आहे, आणि त्याला त्यामुळे बरीच गाणी मिळाली. पण 'उत्कृष्ट'वाली रेंज किशोर कुमारपेक्षा कमी होती. किशोर कुमारची गाजलेली गाणी ऐकून, साला हे गाणं अमुकतमुकने गायलं असतं तर काय बहार आली असती असं वाटत नाही.
'तय्यबल्ली प्यार का दुश्मन हाये हाये'
'तय्यबल्ली प्यार का दुश्मन हाये हाये'
मूड ऑफ्फ झाला.
सुधारणा
किशोर कुमारची गाजलेली गाणी ऐकून, साला हे गाणं अमुकतमुकने गायलं असतं तर काय बहार आली असती असं वाटत नाही.
हे वाक्य
किशोर कुमारची गाजलेली गाणी ऐकून, साला हे गाणं अमुकतमुकने गायलं असतं तर काय बहार आली असती असं मला वाटत नाही.
असं हवं होतं असं वाटतं. इथे वाद (माझ्या बाजूने ) संपतो.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार
सन्जोपराव, सुंदर गाण्याची आठवण करुन दिलीत. आभार
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?