वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?
राम राम मंडळी,
मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.
परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.
२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..
सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)
आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..!
हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?
छे हो..!
वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..!
'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल!
पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!
सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..!
पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!
साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त!
बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!
ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?
पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..
अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..!
मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..!
पिव्ळं पिवळं गं पातळ सार्यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!
धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,
सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं!
'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!
'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..!
पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,
थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!
असो..
कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!
आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
:)
अवांतर :- तुंबाडचे खोत , जबरा जबरा कादंबरी आहे. पैल्यारातीच्या नवविवाहेतेच्या भावना तर लय मस्त लिवल्यात्त्यात. मज्या आली होती वाचायला. एकदम गावरान आणी वेगवान कादंबरी ....
हेच म्हणतो. मराठीतील
हेच म्हणतो.
मराठीतील सर्वश्रेष्ठ, सर्वस्पर्शी कादंबरी.
बाकी तात्यांचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.
------------------------
घणघणतो घंटानाद
छान विवेचन.
शेवट भयानकच पण. म्हणजे एकेकडे आनंदाची हिरवळ तर त्याचवेळी दुसरीकडे दु:खाची खाई.
गदिमांच्या "एक धागा सुखाचा अन शंभर धागे दुखा:चे, जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे " या ओळी आठवल्या
सुंदर रसग्रहण.
तात्यांच्या इतर २ रसग्रहणासारखंच हे ही सुंदरच.
त्या काळातले अन त्या संदर्भांत आजचे ही अनेक सामाजिक पैलू मात्र यानिमित्ताने डोळ्यासमोर येतात. पेड्डामानिषी अन त्या अनुषंगाने आलेल्या दुसर्या धाग्यात या गाण्याचा संदर्भ येऊन गेला. हे गाणं नक्की कोणतं याचे कुतुहल तेंव्हा पासूनच मनात होते. ते आयती टिचकी मारायला मिळाल्याने ऐकायला मिळालं.
आपल्याकडील १८व्या शतकातली ही रुढी १९व्या शतकात विस्मरणात गेली असावी असं वाटतं. आजकाल अशा विधीचा उल्लेख कानावर आलेला नाही. या गाण्याच्या संदर्भात, त्याच्या पूर्ण चित्रीकरणानंतर रजस्वला होण्याचा उत्सव व त्याबद्दल चिंतन नव्हे तर बालविधवा होऊन मग नंतर उमलणार्या त्याकाळच्या कळ्यांबद्दल कणव दाटून आली. काही रूढी बंद पडतात, काही पाडाव्या लागतात. हे होते, हे समाज जिवंत असल्याचं लक्षण आहे, असे म्हणण्यास हरकत नसावी.
दुसरं म्हणजे साखर वाटणे. बत्तासे वाटणे.
आजकाल पेढे वाटतात. पण हत्तीवरून साखर वाटली इ. उल्लेख एक वेगळी गोष्ट सांगतात. तेंव्हाची साखर आजच्या सारखी शूभ्र दाणेदार नसायची. बहूधा ती खडीसाखरच (तीही 'लंप शुगर' मोठे दाणे वाली आजकाल मिळते तशी नाही) असे. लहाणपणी बर्याचदा आजीकडून खडीसाखरेचा खडा खाऊ म्हणून मिळायचा. चॉकलेट वगैरे दूरची गोष्ट. साखरेचे हार, कंकण, नारळ गुढीपाडव्याला आणून खाल्ले जातात. दिवाळीत लाह्या-बत्ताशांचा नैवेद्य असतो. फक्त साखरेपासून बनविलेले हे पदार्थ मराठी खाद्यसंस्कृतीच्या उत्क्रांतीत कुठे अन कसे बसतात? पूर्वी साखर अन मीठ सारखेच महाग होते बहुतेक. गोड म्हणून गूळ जास्त वापरात असे. याविषयीही अधिक चर्चा आवडेल.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
वा!
वा! राजेश यांच्या एक्सस्लुजिव धागे मोजण्याच्या कामाचा फायदा झाला! हा लेख नजरेतून सुटला होता.
तात्या, एका वेगळ्याच गाण्याची (आणि समारंभाची) ओळख करून दिलीत.
अवांतरः लग्नाच्यावेळी सकाळी (खरं तर भल्या पहाटे) उखळ कांडतानाही एक छान गाणं म्हणतात (निदान माझ्या लग्नात एका आजींनी म्हटलं होतं). आता रे मी रेकॉर्ड करू शकलो नाही. मात्र आता त्या आजींना गाठून लिहुन घेतलं पाहिजे, नाहितर तेही काळाच्या ओघात हरवून जायचं याची आठवण झाली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गाणे आणि ओळख
दोन्ही आवडले!
लेख नेहमीप्रमाणेच यशस्वी.
लेख नेहमीप्रमाणेच यशस्वी. चाफेकरांच्या वडलांच्या विचार करून फार दु:ख झाले.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
असा समारंभ असायचा हेच माहीत
असा समारंभ असायचा हेच माहीत नव्हते. छान लेख.
http://shilpasview.blogspot.com
खरे तर ती सर्वमान्य प्रथाच होती...
मुलगी वयात आल्यावर ज्यांना हौस असे ते लोक समारंभ करत आणि वर म्हटल्याप्रमाणे मुलीला मखरात बसवून गाणी वगैरे चालत. पण ज्यांना असा आनंद समारंभपूर्वक करायचा नसे तेही रुढी पाळत. मुलीचे आई-वडील ठेवणीतले कपडे घालून चांदीच्या वाटीतून पेढा/बत्तासा/खडीसाखर घेऊन जात व आप्तपरिचितांना देत. देताना म्हणत, 'आमच्याकडे मुका नातू झाला हो!' मग ऐकणारेही त्या शब्दामागचा अर्थ समजून जोरदार अभिनंदन करत.
खरे तर हा आनंद/प्रथा ही त्याज्ज ठरवून कालबाह्य होण्याचे काहीच कारण नव्हते. हा एकप्रकारे स्त्रीत्वाच्या फुलण्याचा किंवा स्त्रीबीजाच्या सर्जनशक्तीचाच उत्सव होता. केवळ मानवीच नव्हे तर निसर्गातील स्त्रीतत्त्वाचा गौरव सणांच्या माध्यमातून होई. आजही नवरात्रात काळ्या मातीत अंकुरणार्या कोंबांची पूजा, पावसाळ्यात नदीला पहिला पूर आणि लालसर पाणी आल्यावर ती ऋतुमती झाल्याचे मानून तिला साडी नेसवणे व खणानारळाने ओटी भरणे हे सगळे टिकून आहेच, पण माणसे मात्र स्वतःच्या विश्वात हे छोटे-छोटे आनंदक्षण लुटायला विसरली आहेत.
तात्या, छान लिहिलं आहेस रे.
मला वाटते..
ही प्रथा
येण्याअसण्याच्या काळी मुलीला न्हाण येण्याआधी लग्न होत असे. मग तिला हे जे घडले त्याचं implication सरळ 'नातू' होण्याशी जोडून सांगणे, अन हे असं अचानक 'अॅब्रप्ट'ली सांगताना तिला मानसिक आधारासाठी उत्सवाचा आधार घेणे सहाजिक असावे. जशी बालविवाहाची प्रथा बंद पडत गेली, तशी, आईने शांतपणे, बोभाटा न करता पाळी येण्याची प्रक्रिया लेकीला सांगणे जास्त कालमान्य व लोकमान्य झाले असावे..आजकाल टीव्ही वर व्हिस्परच्या जाहिराती वाचून ८ वर्षे वयाच्या मुला मुलींना हे समजावून सांगण्याची वेळ येते, अन ८-९ व्या वर्षी नहाण पण येते,(प्रिकॉशिअस प्युबर्टी) हे वेगळे विषय आहेत..
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सर्व प्रतिसादींचे मनापासून
सर्व प्रतिसादींचे मनापासून आभार.. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.
तात्या
मस्त लेख