काकस्पर्श ऊर्फ बाजूला बसलेली बाई
बरेच दिवस हा विषय डोक्यात होता. पण निमित्त अदितीच्या प्रतिसादाचं झालं. त्यामुळे या धाग्याचं पापपुण्य अदितीलाच लखलाभ.
***
मासिक पाळीच्या अनुषंगानं येणारं तथाकथित अपावित्र्य, त्या दिवसांबद्दलचे गैरसमज, 'पण बायकांना ३ दिवस विश्रांती मिळते, उगाच नाही जुन्या लोकांनी नियम केले'छापाचे युक्तिवाद... हे सगळं इतिहासजमा झालं असा माझा गोड समज होता. पण एका मैत्रिणीच्या कुटुंबीयांसोबत थोडं पर्यटन करण्याचा योग आला आणि माझा समज रीतसर उद्ध्वस्त झाला.
पर्यटनात काही तीर्थस्थळांचाही समावेश होता. मैत्रिणीची पाळी चालू. मैत्रिणीची आई म्ह्टलं तर आधुनिक आणि म्हटलं तर धार्मिक. आईनं आईपुरत्या गोष्टी पाळायच्या असत्या तर काही प्रश्न नव्हता. पण मुलीनं 'चालू' असताना देवळात येऊन देऊळ 'विटाळू' नये, अशी तिची तीव्र आणि भावनिक इत्यादी इच्छा होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणीनं ती पाळली. मैत्रिणीला आईच्या धर्मभावनेची शपथ आणि मला या सगळ्या विनोदी प्रकाराचा निषेध करण्याची खुजली. परिणामी दिवसभर भटकताना देऊळ आलं रे आलं की मैत्रीण आणि मी हिरण्यकश्यपूच्या उपासक असल्यासारख्या मागे थांबून टाइमपास करत असू.
यात अनेक वाद निघाले. अनेक निरर्थक श्रद्धा-अंधश्रद्धांचा खल झाला.
"या दिवसांत बायकांच्या शरीराचं तपमान वाढलेलं असतं. म्हणून तुळशीला पाणी घालू नये. झाड नक्की करपून जातं."
"बायकांना या दिवसांत विश्रांतीची नितांत गरज असते."
"नि मुद्दामहून विषाची परीक्षा पाहायला जावं कशाला?"
"एकीची चालू झाल्याचं कळलं की लगेच दुसरीची चालू होतेच होते..."
"पपई / खजूर झाल्यानं अंगावरून जास्त जातं..."
"सॅनिटरी नॅपकिन्स वाईट. त्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्याहून मऊ सुती कापडाच्या घड्या वापराव्यात."
...
एक ना दोन. यातल्या बर्याच गोष्टींमधला निरर्थकपणा स्वयंस्पष्ट होता. वाद घालावा, इतकीही त्या गैरसमजांची लायकी नव्हती. पण मुदलात या विषयावर काही बोलायची अनिच्छा / संकोच / भीती, विषयाबद्दलचे गैरसमज आणि भल्याभल्या शिक्षित घरांमधे चालू ठेवली जाणारी निरर्थक परंपरा - हे सगळं अंगावर आलं खरं. तेव्हापासून काही प्रश्न डोक्यात घोळताहेत.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
***
'ऐसी' हे तसं आधुनिक संस्थळ आहे याची मला कल्पना आहे. इथे इतक्या मूलभूत प्रश्नांची गरज कदाचित नसेलही. चिंजंनी म्हटल्याप्रमाणे अनेकांना या विषयावर बोलणं काहीसं किळसवाणंही वाटू शकेल.पण माझ्या मैत्रिणीच्या अनुभवानंतर मी या विषयाबद्दलची लोकांची मतं ऐकायला आणि त्यांच्या घरांतल्या प्रथा जाणून घ्यायला उत्सुक आहे. प्रश्नांची ही सैल चौकट केवळ सुरुवात करण्यापुरतीच आहे. त्यात प्रश्नांची भर घातली, अनुभव सांगितले, निराळ्या दिशेनं चर्चा गेली, तरीही ते स्वागतार्हच आहे. (नसून सांगता कुणाला?! ;-))
राही यांच्या प्रतिसादात
राही यांच्या प्रतिसादात उल्लेख आहे तसं हे पोषणावरही अवलंबून असतं. पाळी सुरू होण्याचं वय आता कमी होतं आहे, काही प्रमाणात जनुकांवर अवलंबून असेल पण पाश्चात्य देशात ९ वर्षांनासुद्धा नॉर्मल मानतात. हे वय कमी होण्याचं कारण शरीराचं व्यवस्थित पोषण होणं, हे आहे.
पुरेसं पोषण होऊनसुद्धा दोन पाळींमधला काळ जास्त असू शकतो. माझ्या नात्यात, घरचं सगळं व्यवस्थित असणाऱ्या, एका स्त्रीची पाळी दर दीड किंवा दोन महिन्यांनी येत असे. २८ दिवस ही सरासरी आहे, दोन-चार दिवस त्यात अधिक-उणे आणि जी वारंवारिता आहे त्यात नियमितता असं साधारणतः दिसतं.
एका मुलीबद्दल वाचनात आलं होतं, ते स्टॉकहोम सिंड्रोम संदर्भातलं होतं. पण त्या मुलीला पळवणाऱ्या इसमाने तिला दूध किंवा कोणत्याही प्रकारचे मेद असणारे पदार्थ खाऊ दिले नाहीत. आणि तिची पाळी बराच काळ लांबली. भटके, आदिवासी यांच्या आहाराबद्दल असंच म्हणता येईल.
मणिपूरच्या इरोम शर्मिला माहित असतील. त्यांची पाळी अडतिसाव्या वर्षीच गेली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे वय कमी होण्याचं कारण
अच्छा, ओक्के. हे लक्षात आलं नव्हतं.
रोचक. हे माहिती नव्हतं.
आत्तापर्यंतच्या प्रतिसादात पाळी लौकर/उशिरा का सुरू होते ते सांगितलं गेलंय, पण इरोम शर्मिला यांची पाळी इतक्या लौकर गेली याचं कारण कै कळालं नै. त्यामागे काय कारण असेल? किंवा इन जण्रल काय कारणे असतात?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मानसिक
जबरदस्त मानसिक धक्क्यामुळे पाळी येणे अचानक थांबल्याची दोन उदाहरणे माहीत आहेत. अशा धक्क्यामुळे पान्हा आटणे तर सर्वसाधारण आहे. किंबहुना आई सतत मानसिक तणावाखाली असताना मुलाला स्तनपान पुरेसे मिळू शकत नाही. याबाबतीत इथले वैद्यकतज्ज्ञ खुलासा करतीलच.
हम्म ओक्के. खुलाशाच्या
हम्म ओक्के. खुलाशाच्या प्रतीक्षेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अभय बंग
गडचिरोलीतल्या अभय बंग यांच्या संस्थेत माडिया-गोंडांच्या आरोग्यतपासणीत एक गोष्ट आढळली की या स्त्रिया मातीचा लेप, पानांची जुडी अशा गोष्टी वापरतात आणि त्यामुळे जंतुसंसर्ग नेहेमीचाच असतो. 'सर्च'ने सॅनिटरी नॅप्किन्स साठी आवाहनही केले होते. आता हळूहळू तिथेही आरोग्यसाक्षरता येते आहे. मला वाटते आता हे पॅड्स बनवण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली आहे आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तो एक कुटिरोद्योग झाला आहे.
राणी बंग
अभय बंगांपेक्षाही राणी बंग यांनी गोंड स्त्रियांच्या आरोग्याविषयी, विशेषतः मासिक पाळीविषयी वरेच अध्ययन-लेखन केले आहे. 'कानोसा' या त्यांच्या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहा.
कापड दुर्मिळ असेल ते
कापड दुर्मिळ असेल ते सामान्यांना. माझी शंका द्रौपदी कशाला एका वस्त्रात राहील? भावाचे बोट बांधायला भरजरी पीतांबर फाडून द्यायची ऐपत तिची
बरे, स्त्रावासाठी जास्तीचे कापड वापरण्याची रीत माहित नव्हती असे समजू. तरीही एक अधोवस्त्र/ साडी वापरणे हे नेहमीच्यापेक्षा वेगळे कसे? रजोकाळात तेवढे एकच वस्त्र आणि एरवी त्याहून जास्त, असे होते का? म्हणजे एरवी वापरण्याची कंचुकी वगैरे वस्त्रे त्यावेळी वापरत नसत? पंण कंचुकी काढून टाकण्याने काहीच विशेष साध्य होत नाही.
एकवस्त्रा, रज:स्वला.
http://en.wikipedia.org/wiki/Jean_M._Auel
या लेखिकेने लिहिलेल्या 'सायफाय' टाईप कथांत (सर्व ६ पुस्तके, अत्यंत रोचक व नॉट-डाऊन-पुटेबल अशी आहेत. ज्यांना हवी असतील त्यांना इबुक्स देण्यात येतील.) एका अश्मयुगीन तरूणीची = 'आयला' तिचे नाव = कथा आहे. यात तिने त्या काळात तिच्या मासिक पाळीतील रक्तस्त्रावाचे काय व कसे केले असावे याचे कन्जेक्चर आहे.
सदर पुस्तक बर्यापैकी संशोधन आदि करून लिहिले गेले आहे, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
*
दौपदीस दरबारात खेचून आणले गेले, तेव्हा ती एकवस्त्रा रज:स्वला असल्याचे वर्णन आहे.
*
पाळी येते म्हणजे काय होते?
एक शेतकरी शेत नांगरतो.
वखरतो.
त्यातला काडी कचरा वेचून फेकतो. जाळतो. टॉपसॉईल नीट तयार करतो, जेणेकरून बी पेरेले, व रुजले, तर त्या फुटलेल्या कोंबाला मूळ धरायला उत्तम परिस्थिती मिळेल.
जर बी पेरलेच गेले नाही, तर काय होईल?
पुढच्या हंगामाच्या वेळी, नवी टॉपसॉईल तयार करावी लागेल. जुनी अर्थातच डिस्कार्ड होईल.
या प्रकरणासारखी क्रिया, स्त्रीशरीरात होते, तिला 'इस्ट्रस सायकल' अर्थात, मेन्स्ट्रुअल सायकल अथवा ' मासिक पाळी' असे म्हणतात. पाळी येणे हा टॉपसॉइल डिस्कार्ड होण्याचा दॄष्य भाग असतो. तो तसाच व तितकाच प्रत्येकवेळी व्हायलाच हवा असे नाही.
गर्भाशयाच्या ज्या भागात बाळ "रुजते" व वाढते, तिथे त्याचे प्लासेंटा नामक मूळ रुजण्यासाठी तयार केलेला/झालेला 'एंडोमेट्रियम'चा भाग, ज्यात मुख्यत्वे नव्या रक्तवाहिन्या असतात, तो, बाळ तयार न झाल्यास, योनीमार्गातून फेकून दिला जातो, व पुढच्या ओव्हमचे फलन होऊन नवे बाळ येईल, या अँटिसिपेशनमधे नवी तयारी सुरू केली जाते.
टॉपसॉईल डिस्कार्ड करण्याची क्रिया ती 'पाळी'
बाहेर फेकला जातो, तो विटाळ. हे रक्त नव्हे.
यात रक्त आहे, पण हे नुसते रक्त नव्हे.
योनिमार्गातून रक्त बाहेर येते की नाही, याला इस्ट्रस सायकलचा अंत म्हणत नाहीत. (सबब, 'उर्ध्वरेता' असल्यासारखी आतल्या आत 'पाळी' जिरवून घेणारे प्राणी लै अॅडव्हान्स्ड इ. कन्सेप्ट असतील, तर त्या 'उर्ध्वरेता' या कन्सेप्ट इतक्याच भाकड व भाबड्या आहेत, असे अवांतर नोंदवितो. ब्रह्मचर्य = जीवन वाल्या बिनडोकांनी भारतातल्या मुलग्यांच्या लैंगीक शिक्षणाची जी वाट लावून ठेवलिये, त्याबद्दलचा माझा जळफळाट असीम आहे.)
सस्तन प्राण्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यात मार्सुपियल्स देखिल आहेत, उडणारे, बुडणारे आहेत, तसेच पाळी येण्याचे, अर्थातच, नव्या जीवासाठी, भ्रूण रुजण्यासाठी गर्भाशयाच्या तयारीचेही अनेक प्रकार आहेत.
सबब,
पाळी येते, असे म्हणतो, व त्यातल्या विटाळाबद्दल आपण बोलतो, तेव्हा आपण मानवाबद्दल बोलताना तरी, योनीमार्गातून बाहेर फेकून दिलेल्या, साधारणतः एका मोठ्या बदामाच्या साईझच्या नव्या रक्तवाहिन्यांच्या थराबद्दल बोलत असतो. स्वप्नदोष होऊन प्रोस्टेट्स त्यांत साठवले गेलेले निरुपयोगी वीर्य, म्हणजेच शुक्राणू व त्यांचे पोषण करणारे स्त्राव बाहेर फेकतात, (जे क्लॉकवर्क टाईम्ड नसले, तरी तितकेच शारिरिक स्वच्छतेचे कार्य असते) तितकेच सरळ साधे हे प्रकरण आहे.
आता यापैकी, दरमहा येणारे, व कपड्यांवर हक्काने दिवसभरात केव्हाही डाग पाडणारे हे प्रकरण झाकून ठेवणे जरा कठिण (स्वप्नदोषातील कपड्यांच्या डागांच्या तुलनेत. तेही लाल रंगाचे) असल्याने, याबद्दल काही रिच्युअल्स तयार झाल्या असल्यास नवल नाही.
***
वरील चर्चेत सेलेब्रेशन ऑफ मेनार्की, अर्थात पहिली पाळी येण्याच्या उत्सवापासून (मातृदेवता पूजणार्या मानवांच्या जमातीत, स्त्री आता जन्मदात्री होऊ शकते, याचा पुरावा दिसणे, ह्या घटनेचा उत्सवच व्हायला हवा), स्त्रीयांना पाळी येते म्हणून त्या नीच दर्जाच्या आहेत (ज्याला कळपातून हाकून दिलेल्या व शरीरसुखापासून वंचित अशा नरांच्या फ्रस्ट्रेशनचा परिपाक, इतकेच महत्व देता येईल,), इथपर्यंतच्या शेड्स ऑफ अंडर्स्टँडिंग पहायला मिळाल्या. त्यात थोडे शरीरशास्त्रीय लिहावे म्ह़णून वरचा प्रतिसाद लिहिला.
***
वरील प्रतिसाद बराचसा विस्कळीत आहे.
पण, इथल्या बहुतेकांना मासिकपाळीची कन्सेप्ट ठाऊक आहे, असे समजून व धाग्यातील इतर प्रतिसादांच्या क्रॉस रेफरन्सेसने लिहिला गेल्यामुळे तसा झाला असावा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
चांगला विषय.
चांगला विषय.
१. 'माझी पाळी चालू आहे' असं स्वच्छ-खुल्या आवाजात न सांगता परवलीचे शब्द वापरून वा दबक्या आवाजात सांगण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
--सुरुवातीला आईकडे असताना थोडं दबक्या आवाजात सांगितलं जायचं पणं ह्यामधलं कुतुहल संपल्यावर बाकी दबक्या आवाजात सांगायची वेळ आली नाही. हां...ते होतं की घश्यात मुसळ कोंबल्यासारखं ओरडुन सांगायची वेळही आली नाही. सासरी पण थोड्याबहुत फरकाने तसचं होतं. आतातर काहीच प्रश्न येत नाही.
२. केमिस्टकडून सॅनिटरी पॅड्स विकत आणण्याचा तुम्हांला संकोच वाटतो का? का?
--अजिबात नाही, पुर्वीही नव्ह्ता पण केमिस्ट कडे बाकी ज्या चपळाईने ते पॅकेट वर्तमानपत्रामध्ये बांधुन द्यायचे त्याला तोड नाही.. असं वाटायचं की एवढी तत्परता इतर वेळेला पण दाखवावी.बहुतेक तेच कारण असावं आजुबाजुच्यांना संकोच वाटु नये म्हणुन असावं.
३. घरात देवपूजा वा त्यासदृश काही होत असल्यास पाळीच्या दिवसांत तिकडे न फिरकण्याची परंपरा तुमच्याकडे पाळली जाते का? का?
-- माहेरी होती, पण तेव्हा घरामध्ये उपलब्ध असलेले मनुष्यबळ ह्याच्याशी घनिष्ट संबंध होता. म्हणजे देवपुजा करणं ही जबाबदारी तशीही आजोबा किंवा बाबा पार पाडायचे, त्यामुळे विशेष फरक पडला नाही. सासरी विशेषतः आता फक्त जिथे मी आणि नवरा एवढचं उपलब्ध मनुष्यबळ असताना, केव्हाचं सोडुन दिलयं. अनेक वेळेला संकष्टिच्या प्रसादाचं जेवण बनवते..व्हॉट टु डु..
४. घरातल्या मुलीची पाळी सर्वप्रथम आल्यानंतर काही समारंभ / गोडधोड / धार्मिक कृत्य करण्याची पद्धत तुमच्या घरात आहे का? का?
-छे कधीच नाही.
५. तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहता, तुमच्या घरात शिक्षणाची परंपरा आहे की नाही, घरातले लोक किती धार्मिक आहेत, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का?
--वर सांगितल्याप्रमाणे मनुष्यबळ रेशो त्रांगडं. आई नोकरी निमित्त घराबाहेर राहायची, घरामध्ये आजी होति तेव्हा म्युचुअल अंडरस्टँडीग मध्ये कामं होउन जायची. घरामध्ये धार्मिकता होती आणि अजुनही आहे.. पण अतिरेकीपणा कधिच नव्हता. नॉट अ बिग डील. उठा आणि आवरा, कोणीही जास्त लाड करणार नाही.
शाळेत असताना मी खो-खो, कबड्डी, आणि शॉर्ट ट्रॅक्(धावायचा पल्ला) अश्या दाणगट खेळ प्रकारांमध्ये होते, त्यामुळेही असेल पण आम्हाला बहिणींना नेहमीचं हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, असचं शिकवलं गेलं होतं
---
मयुरा.
थोडे विषयांतर
सॅनीटरी नॅपकीन वरून सात सक्कं त्रेचाळीस या कादंबरीची आठवण झाली.
कुशंक पुरंदरेच्या दुंगणावर गोळ्या झाडल्यामुळे छर्रे अडकलेले असतात. ते काढल्यावर नॅपकीन बांधले जाते.
सवय नसल्याने चालताना एकेक तुक्ड गळून पडतो असा उल्लेख आहे. (तेव्हा या प्रसंगावर प्रचंड हसलो होतो इतकच आता आठवते आहे.
हे ऐका
प्रतिसाद द्यायचा आहे.
पण वेळेअभावी शक्य होत नाहीये.
तोवर हा कार्यक्रम ऐका.
एका मुलीचे भन्नाट कन्फ्युजन!
मजेदार आहे!
http://www.abc.net.au/radionational/programs/nowhearthis/katherinemclell...
-निनाद
पाळी म्हटल की मला आता तुझी
पाळी म्हटल की मला आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच हे गाण आठवत. तसच पाळी, कावळा शिवला, विटाळ, शिवायच नाही, अस्पर्श, घोंगडी,अंधारी खोली, विंचू. गाय अशा शब्दांच चित्र तयार होणार लहानपण आठवत. आईला शिवायच नसताना ती बाजूला बसायची व बहिणी स्वैपाक करायच्या. का शिवायच नाही? शिवल तर काय होत? हा प्रश्न विचारल की सुरवातीला विंचू घरात निघतो असे सांगितले जाई. नंतर नतर मोठा झाल्यावर समजेल अशी उत्तर मिळायची. चुकून शिवल गेल तर गायीला जाउन हात लावून यायच.आमच्या गायी शेतात असायच्या तिथे जाउन हात लावून येणे वेळखाउ होईल म्हणून मागील दारी असलेल्या डुंबर्यांच्या गायीला हात लाउन येत असे. गायीला हात लावणे हा त्या गोष्टीवरचा उतारा. समजा ते केल नाही तर घरात विंचू निघालाच म्हणुन समजा. घरात विंचु,साप निघु नयेत म्हणून दर रविवारी संध्याकाळी भैरोबाला तेलवात घालायची स्वतंत्र प्रथा होतीच. ती मोडली तरी विंचू/साप निघालाच म्हणुन समजा. एकदा खेळायच्या नादात मी भैरोबाला तेल वात घालायचे विसरून गेलो होतो.नेमका त्या आठवड्यात घरी विंचू निघाला. त्यामुळे मला फार अपराधी वाटल होतो.मनोमन मी भैरोबाची माफी मागितली होती.मागच्या वेळची भरपाई म्हणुन जरा जास्त तेल घेउन गेलो होतो. हळू हळू असे लक्षात आले की एवढ सगळ पाळल तरी विंचू निघणारच नाही याची काही ग्यारंटी दिसत नाही. पण एवढ तेल वात घालूनही कधीतरी विंचू निघतोच तर नाही घातल तर किती विंचू साप निघतील? हा प्रश्न डोकावत असायचाच. हे असोसिएशन कमी व्हायला बरीच वर्षे जावी लागली. असो....
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
१. नाही. २. नाही. कारण
१. नाही.
२. नाही. कारण बहुतेकदा बिग बॉक्स स्टोर मधून घेतो. पण केमिस्ट कडे मागून घेताना संकोच वाटला नाही .
३. होय. माहेरी पूजा केली जात नसे. सासरी मी आणि माझा नवरा दोघेच असतो. मला स्वतःला पूजा न करणे पटत नाही. नवर्यालाही विचित्र वाटते प्रथा. पण तो लक्ष घालत नाही. उलट मजेने म्हणतो, 'चार दिवस देवांना शिक्षा'. सासू सासरे आमच्याकडे (अमेरिकेत) आले कि अगदी शिवाशिव पण पाळली जाते. घरात भांड्यांना, pantry मधल्या धान्याला पण हात लावायचा नाही. म्हणजे एकंदर चार दिवस आयतोबा. मग या दिवसात मी बेडरूम चे दार लावून netflix वर सिनेमे हाण, तास-तास फोन वर गप्पा मार व उरलेल्या वेळात झोप काढ असे उद्योग करते. एकंदर वाद घालण्यापेक्षा थोडासा आराम घेण्याचा चान्स मिळत असेल तर का सोडा !!
४. काहीतरी दिवा ओवाळणे वगरे आईने केले असावे बहुतेक माझ्यासाठी .पण नीटसे आठवत नाही.
५. शहरात राहतो. सर्वजण बहुतेक उच्चशिक्षित. घरातील लोक अतिशय धार्मिक, यांमुळे तुमच्या उत्तरांत फरक पडला आहे का? -होय.
चर्चा आवडली
चर्चेतून अनेक नव्या गोष्टी समजल्या. हे नॅपकिन्स वापरून झाल्यावर डिस्पोज करणे हेही एक मोठे दिव्यच असेल. स्त्रिया हा प्रश्न कसा सोडवतात?
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
बहुतांश स्त्रियांसाठी घर,
बहुतांश स्त्रियांसाठी घर, ऑफिसात कचऱ्याचे डबे असतात. प्रश्न असतो तो कष्टकरी समाजाचा, ज्यांना कचऱ्यात हात घालावा लागतो. नानावटींचा हा एक लेख - सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ल्युसिल क्लिफ्टन हिची "शेवटची पाळी" या विषयावरील कविता
To My Last Period
Lucille Clifton
well, girl, goodbye,
after thirty-eight years.
thirty-eight years and you
never arrived
splendid in your red dress
without trouble for me
somewhere, somehow.
now it is done,
and i feel just like the
grandmothers who,
after the hussy has gone,
sit holding her photograph
and sighing, wasn’t she
beautiful? wasn’t she beautiful?
नुकतीच रजोनिवृत्ती आलेली आहे,
नुकतीच रजोनिवृत्ती आलेली आहे, किंवा सध्या तो बदलाचा काळ सुरू आहे, अशा काही स्त्रियांशी या विषयावर बोलल्यामुळे कविता समजली. पाळी येण्याबद्दल सगळे काळजीपूर्वक सांगतात, पण पुढच्या होणाऱ्या बदलांसाठी तयार करणारी काही यंत्रणा अजून तयार होत असावी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुरुषांना पाळी आली तर ...
गेल्या पिढीतली अमेरिकी स्त्रीवादी ग्लोरिया स्टायनम हिचा संबंधित निबंध वाचला. (ज्यांना मासिक पाळी आणि पुरुषप्रधानता यांवर केलेल्या तरल विनोदाचं वावडं नाही त्यांनी जरूर वाचावा.)
If Men Could Menstruate
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडला!
आवडला!
पाने