आजीआजोबा आणि नातवंडे (भाग १)
पन्नाससाठ वर्षांपूर्वीच्या आणि त्याआधीच्या काळात आपल्याकडे घरोघरी एकत्र कुटुंब पद्धत असायची, एका कुटुंबातली सगळी माणसे पिढ्या न् पिढ्या एकाच ठिकाणी आणि सगळी मिळून रहात असत. कुटुंबातली सारी मंडळी एकाच घरात रहात असल्यामुळे त्या काळातली बहुतेक सगळी नातवंडे जन्मल्यापासून आजीआजोबांच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी होत असत. त्यांच्या दरम्यान एक घट्ट नाते निर्माण होत असे. वयस्क झालेले आजीआजोबा प्रपंचाचा भार पुढल्या पिढीवर सोपवून आपला वेळ हरीहरी करण्यात आणि नातवंडांना खेळवण्यात घालवत असत. नातवंडांना आजीआजोबांचा भरपूर लळा लागत असे आणि आजीआजोबांना नातवंडांशिवाय करमत नसे. घरातल्या मोठ्या लोकांबरोबर आजीआजोबांचे कधी मतभेद झाले, त्यातून तात्पुरते वाद, गैरसमज, थोडा कडवटपणा वगैरे निर्माण झाले तरी नातवंडांशी वागतांना ते मेणाहून मऊ होत असत. त्यांचे आपसातले नाते नेहमी मधुर असेच रहात असे. आजीआजोबांच्या मनात नातवंडांच्याबद्दल अतीव प्रेम, माया, ममता, काळजी अशा भावनाच असत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीला वेग येत गेला, तसेच दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही या क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत गेले. या सर्व घडामोडींमधून नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक नवनव्या संधी उपलब्ध होत गेल्या. त्या मुख्यतः महानगरांमध्ये निर्माण झाल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी खेडी आणि लहान गांवांमधून अनेक युवकांनी शहरांकडे धाव घेतली. तिथे गेलेल्यांना रोजगार मिळाला, पण राहत्या जागांची तीव्र टंचाई असल्यामुळे मिळेल त्या एक दोन खोल्यांच्या खुराड्यांमध्ये त्यांना संसार थाटावे लागले. त्यात रहात असतांना त्यांना आपल्या गावाची आणि कुटुंबातल्या माणसांची सारखी आठवण येत असे. त्यांचे आईवडील आणि इतर बरेच आप्तस्वकीय गावाकडेच रहात असत. त्या लोकांना भेटण्याची ओढ शहरात गेलेल्या लोकांना लागत असे. शक्य तितक्या वेळा गावाकडे जाऊन शक्य तितके दिवस तिथे राहण्याचे प्रयत्न ते करत असत. विभक्त झालेली कुटुंबेसुद्धा त्या काळात शक्य तितकी जवळ येत असत. अजूनही एकत्र असल्यासारखी वागत असत.
नोकरी किंवा व्यवसायासाठी शहरात जाऊन स्थाइक झालेल्या लोकांनी संसारात स्थिरस्थावर होऊन आणि लग्न करून त्यांना मुले होईपर्यंतच्या काळात त्यांच्यातल्या बहुतेकांचे आजीआजोबा काळाच्या पडद्याआड गेले होते, पण गावांकडे रहात असलेले त्यांचे आईवडील आता आजीआजोबा झाले. त्यांची शहरातली नातवंडे त्यांना रोज भेटत नव्हती. पण आपल्या आईवडिलांबरोबर ती अधूनमधून गावाकडे येत असत. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काही आठवडे तिथे रहातही असत. आजीआजोबांचे ग्रामीण भागातले प्रशस्त घर, त्याच्या आजूबाजूची मोकळी जागा, गावाजवळील शेते, नदी, डोंगर, त्यावरची झाडेझुडुपे, पानेफुले, फुलपाखरे, चिमण्या, राघूमैना आदि पक्षी, गोठ्यातल्या गायीम्हशी आणि त्यांची वासरे, गावातल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, तिथली मोकळी स्वच्छ हवा, रात्री आकाशात लुकलुकणा-या लक्षावधी चांदण्या या सगळ्यांचे त्या मुलांना अप्रूप वाटत असे.
आजोबा त्यांना आपल्यासोबत फिरायला किंवा देवळात घेऊन जात, आजी छान छान पदार्थ करून खायला घालत असे, दोघेही मजेदार गोष्टी सांगत. वेगवेगळ्या शहरांमधून आलेली नातवंडे आणि त्या गावातच स्थाइक झालेल्या नातेवाइकांची मुले यांची गट्टी जमत असे. आपापल्या गावांतल्या मजा आणि शाळांमधल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असत, नवनवे खेळ खेळत, पोहणे, सायकल चालवणे वगैरे शिकून घेऊन त्याचा सराव करत. एकंदरीत त्या काळातली ही नातवंडे त्यांच्या आजीआजोबांवर खूष असत. सुटी संपून आपल्या शहराकडे परत जातांना तीही रडवेली होत असत आणि आजीआजोबांनाही गदगदून येत असे. पण त्या काळातल्या गोड आठवणी ते जपून ठेवत आणि एकमेकांना सांगून जाग्या ठेवत असत. नातवंडांनाही पुन्हा पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ वाटत असे, त्या संधीची ती उत्सुकतेने वाट पहात असत आणि तिथे जाऊन पोचताच धावत पुढे जाऊन आजीआजोबांच्या गळ्यात पडत.
आणखी पंचवीसतीस वर्षांचा काळ लोटल्यानंतर आईवडिलांबरोबर शहरांमध्ये राहणारी आणि सुट्यांमध्ये त्यांच्यासोबत गावाकडे जाऊन आजीआजोबांना भेटून येणारी नातवंडे लहानाची मोठी झाली. त्यांच्या आईवडिलांनी काटकसरीने संसार करून आपल्या मुलांना शक्य तितके चांगले शिक्षण दिले होते. शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती होऊन अनेक नवे मार्ग उपलब्ध झाले होते, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप्स आणि कर्ज मिळू लागले होते. या सगळ्यांचा लाभ घेऊन त्या मुलांनी शिक्षणात खूप प्रगती केली. मोठ्या पदव्या संपादन केल्या आणि त्यांच्या आधारावर त्यांना चांगल्या नोकर्या मिळाल्या. काही जणांना तिथेच चांगल्या नोकर्या मिळाल्या आणि त्यांनी त्याच शहरात रहायचे ठरवले, काही जण नोकरीसाठी परप्रांतात तर काही जण साता समुद्रापलीकडे परदेशात गेले. काही मुले उच्च शिक्षणासाठी म्हणून परदेशी गेली आणि तिकडेच राहिली. त्या सर्वांनी आपापल्या ठिकाणी आपापले संसार मांडले.
मध्यंतरीच्या काळात त्यांच्या कुटुंबांमधील इतरांच्या परिस्थितीतही फरक पडत गेला. ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबांमधून नोकरीसाठी मोठ्या शहरात आलेल्या बहुतेक लोकांचे आईवडील स्वर्गवासी झाले. त्यांची जुनी घरे मोडकळीला आली आणि दूर राहून त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करत राहणे शक्य होत नसल्याने ती विकून टाकली गेली. गावातले बरेचसे इतर नातेवाईकसुद्धा आपले गाव सोडून किंवा हे जग सोडून गेले. त्यामुळे शहरात रहायला आलेल्या लोकांना आता गावाकडे जायचे कारण किंवा आकर्षण उरले नाही. त्यांच्यासाठी तो मार्ग जवळजवळ कायमचा बंद झाला. कालांतराने ते लोक नोकरीमधून निवृत्त झाले पण ते आपल्या मूळ गावी परत जाऊ शकत नव्हते. पूर्वी जेंव्हा ते शहरात रहायला आले होते तेंव्हा त्यांचे आईवडील खेडेगाव सोडून शहरात न येता मागेच राहिले होते. आता ते लोक त्यांच्या मुलांकडे परप्रांतात किंवा परदेशात जाऊ शकत नव्हते. त्यांनी ज्या शहरात सारा जन्म घालवला तिथेच ते स्थाईक झाले. ज्यांना शक्य झाले त्या लोकांनी चांगल्या मोठ्या सदनिका घेतल्या आणि एक दोन खोल्यांच्या जुन्या घरातून ते तिथे रहायला गेले. या लोकांचा जन्म जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांचे बालपण माणसांनी गजबजलेल्या घरांमध्ये व्यतीत झाले होते. नोकरीत असतांना दिवसाचा सगळा वेळ कामातच जात होता आणि घरी आल्यावर मुलांची गोड संगत होती. आता वार्धक्यात मात्र जेंव्हा त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळी त्याच्या सोबत कोणीही नाही. लहानपणच्या आठवणी त्यांना व्याकूळ करतात. काही घरी तर आजी किंवा आजोबा यांच्यातला फक्त एकच शिल्लक राहिला आहे. त्यांना तर अगदीच एकाकी रहावे लागत आहे.
काही लोक या बाबतीत सुदैवी आहेत. त्यांची मुले आणि नातवंडे त्यांच्या सोबतीला रहात आहेत. पण त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. पूर्वीच्या म्हणजे या लोकांच्या आजोबांच्या काळात एकत्र कुटुंबात राहणार्या मंडळींचा उदरनिर्वाह मुख्यतः शेती, दुकानदारी किंवा पारंपरिक व्यवसायांमधून होत असे. त्यामधून मिळणारे उत्पन्न त्यांच्या घरात येत असे आणि सगळ्या कुटुंबावर खर्च होत असे. कुटुंबप्रमुख किंवा घरातील वडीलधारी मंडळींच्या सांगण्यानुसार घरातले व्यवहार चालत असत. त्या काळातले जीवन चाकोरीबद्ध असायचे. दिवस उजाडताच उठल्यापासून ते रात्र पडल्यानंतर झोपी जाईपर्यंत सगळ्यांनी कोणकोणत्या क्रमाने काय काय करायचे हे परंपरेने ठरलेले असायचे. स्वयंपाकघरात जे काही शिजवलेले असेल ते अन्न सारेजण जेवणाच्या वेळी एकत्र जमून खात असत. वडीलधारी लोकांसमोर लहानांनी आवाज चढवायचा नाही अशी सर्वांना सक्त ताकीद असे आणि ती पाळली जात असे. त्या काळातल्या आजीआजोबांना कुटुंबात सर्वोच्च अधिकाराचे, मानाचे आणि महत्वाचे स्थान असायचे. आजची परिस्थिती वेगळी आहे. सेवानिवृत्त झालेल्या आजीआजोबांकडे उत्पन्नाचे स्वतःचे फारसे स्त्रोत नसतात. त्यांची मुले आणि सुना यांची कमाई परस्पर त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते आणि त्या पैशांचा विनियोग कसा करायचा हे तेच ठरवतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना विस्तारल्या आहेत. झोपणे, उठणे, खाणे, पिणे, बाहेर जाणे, घरी परत येणे वगैरेंसाठी ठराविक नियम पाळले जात नाहीत. आजीआजोबांची काळजी घेतली जाते, त्यांची विचारपूस केली जाते, पण घर चालवण्यातल्या इतर बाबतीत त्यांना फारसे विचारले जात नाही. त्यांची जागा कुटुंबप्रमुखाची राहिली नाही. तिचे काही प्रमाणात अवमूल्यन झाले आहे.
आजच्या काही आजीआजोबांची मुले आणि नातवंडे त्यांच्याबरोबर एकाच घरात राहतात, काही लोकांची मुले आणि नातवंडे त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावरील वेगळ्या घरांमध्ये किंवा जवळच्या दुसर्या गावात राहतात आणि त्यांना वरचेवर भेटत असतात आणि काहीजणांची मुले फारच दूरच्या गावी किंवा परदेशात रहात असल्यामुळे त्यांना खूप दिवसांनंतर भेटतात. त्या सर्वांच्या बाबतीतले अनुभव अर्थातच थोडे वेगवेगळे असतात. त्यांचे काही नमूने या भागात पाहू.
पहिल्या उदाहरणातले आजी आणि आजोबा त्यांच्या कमावत्या मुलाकडे राहतात. त्यांच्या नातवंडांचे हंसरे चेहरे त्यांना रोज दिवसभर पहायला मिळतात. कदाचित तेवढ्या आनंदासाठीच ते तिथे रहात असावेत असेही काही वेळा वाटते. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही कामावर जातात आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात (आयटीमध्ये) असल्यामुळे त्यांना घरी परत यायला बराच उशीर होतो आणि मग त्यानंतर झोपायला आणि दुसरे दिवशी सकाळी उठायलाही उशीर होतो. त्यामुळे आपल्या नातवंडांना सकाळी वेळेवर उठवणे, त्यांना न्हाऊ माखू घालून आणि गणवेष चढवून तयार करणे, त्यांना शाळेत नेऊन पोचवणे, शाळा सुटल्यावर घरी परत आणणे, त्यांचा नाश्ता, जेवणखाण वगैरे तयार करून त्यांना खायला घालणे वगैरे सगळी रोजची कामे बहुतेक दिवशी आजी आणि आजोबाच करतात. शिवाय त्यांचा अभ्यास, खेळ, मनोरंजन वगैरेकडेही त्यांनाच पहावे लागते. हे करतांना त्यांच्या मनाला खूप आनंद मिळत असला तरी वयोमानानुसार थकलेले शरीर हवी तेवढी साथ देत नाही. कधी मुलांच्या मागे धावतांना त्यांच्या छातीत धाप लागते तर कधी वाकून एकादी वजनदार वस्तू उचलतांना त्यांच्या कंबरेत उसण भरते. पाठदुखी, सांधेदुखी वगैरे अधून मधून हजेरी लावत असतात. काही वेळा काही गोष्टींचे विस्मरण झाल्याने त्यांच्या लक्षात रहात नाहीत. त्या आयत्या वेळी करण्यात धांदल होते. असे सगळे असले तरी ठरलेली रोजची कामे तर त्यांनाच तसेच रखडत खुरडत आटोपावी लागतातच.
दिवसभरातल्या सान्निध्यामुळे नातवंडांना आजीआजोबांचा लळा लागतो, पण ती आपल्यापासून दूर तर राहणार नाहीत अशी एक सुप्त आशंका कदाचित त्यांच्या आईवडिलांच्या मनात उठत असावी. आपल्या मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंतही त्यांच्या मनात कुठेतरी बोचत असते. त्यामुळे त्यांच्या कामामधून त्यांना जेवढा मोकळा वेळ मिळतो त्यात ते लोक या उणीवेची पुरेपूर भरपाई करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी मॅकडोनाल्ड, पिझ्झाहट, भेळपुरीवाला किंवा पावभाजीवाला अशासारख्या मुलांच्या आवडत्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात, त्यांना हवे तेवढे आइस्क्रीम खाऊ घालतात, मॉल्समध्ये नेऊन तिथले गेम्स खेळायला देतात, मुलांनी मागितलेल्या आणि न मागितलेल्या वस्तूंचे आणि विविध खमंग खाद्य पदार्थांचे ढीगच्या ढीग घरी आणतात. शिवाय बुद्धीवर्धक, शक्तीवर्धक, उत्साहवर्धक, उंची वाढवणारी वगैरे अनेक प्रकारची टॉनिके आणून ठेवतात आणि मुलांना ती नियमितपणे द्यायच्या सूचना आजीआजोबांना देतात. म्हणजे मुलांनी काय काय खावे हे त्यांचे आईवडील ठरवणार आणि त्यांना ते खायला घालायचे आजीआजोबांनी असे चालते. मुलांना चटपटीत पदार्थ खाण्याची गोडी लागल्यावर आपल्याला आज आत्ता अमूक तमूकच खायला पहिजे असे त्यांनी हट्ट धरले तर ते पुरवणे आजीआजोबांना बरेच वेळा शक्य नसते किंवा त्यांना ते योग्य वाटत नाही. पण ते नाकारण्याचे परिणाम मात्र शेवटी त्यांनाच भोगावे लागतात.
लहान मुलांच्या आईवडिलांच्या मनातली असुरक्षिततेची भावना (इनसिक्यूरिटी) काही वेळा वेगळ्या स्वरूपात व्यक्त होते. घराबाहेर घडलेल्या एकाद्या घटनेमुळे किंवा इतर काही कारणाने वैतागून किंवा कोणावर तरी चिडून ते घरी आलेले असतात आणि त्यांच्या मनातला त्याबद्दलचा राग त्यांच्या एकाद्या मुलाची फारशी मोठी चूक नसतांनासुद्धा त्याच्या अंगावर ओरडण्यात बाहेर पडतो. पण या वेळी आजीआजोबांनी मध्ये पडून त्यांची समजूत घालण्याची चूक करता कामा नये. नाही तर "तुम्ही मुलांच्या समोर मला चुकीचे कसे काय ठरवता? त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल? यामुळे त्यांच्या मनातून मी उतरणार नाही का?" वगैरे वगैरे मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. याच्या उलट एकाद्या वेळी एकाद्या मुलाच्या हटवादीपणाला कंटाळून आजीआजोबांनी त्याला जरासे दटावले तर त्याचा रिपोर्ट रात्री आईवडिलांकडे जातो आणि "तो तर अजून लहान आहे, मोठ्यांनी त्याला समजून घ्यायला नको का? त्याला हो म्हंटलं असतं तर एवढं मोठं काय बिघडणार होतं? लहान मुलांना उगाच काय रडवायचे?" वगैरे वाक्ये सुनावली जातात. आपल्या नातवंडांवर आपण केंव्हा माया दाखवायची किंवा त्याच्यावर जरासे रागवायचे हे सुद्धा आपल्याला ठरवता येत नसले तर आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? असा प्रश्न अशा वेळी त्यांच्या मनात येतो.
आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी दुसर्या आजीआजोबांनी खूपच आधीपासून सगळी तयारी करून ठेवली होती. ते दोघेही सरकारी नोकरीत होते त्यामुळे दोघांनाही निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. जीवनाच्या मूलभूत गरजा पुरवून झाल्यावर थोडी मौजमजा करून आरामात राहण्यासाठी तेवढे उत्पन्न पुरेसे असते. नोकरीवर असतांनाच्या ज्या काळात त्यांच्या हातात जास्तीचे चार पैसे यायचे तेंव्हाही ते चैन करण्यात उधळून त्यांनी स्वतःला नसत्या महागड्या संवयी लावून घेतल्या नव्हत्या. ते पैसे साठवून ठेऊन उतारवयासाठी तरतूद करून ठेवली होती. "एका म्यानात दोन तलवारी रहाणार नाहीत" या चालीवर "एका छपराखाली दोन मिसेस क्षक्ष नकोत" हे ब्रीदवाक्य ते आधीपासून इतरांना सांगत असत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात ते अंमलात आणले.
उगाच भांड्याला भांडे लागून त्याचा ठणठणाट होऊ नये आणि ती आपल्याआपण एकमेकींना लागली की मुद्दाम एकमेकींवर आदळली यावरून अधिक गोंगाट होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. आपल्या मुलाचे लग्न ठरवायच्या आधीच त्याच्यासाठी सुसज्ज असा वेगळा फ्लॅट घेऊन ठेवला आणि लग्नानंतर नवदांपत्याला तिकडे रहायला पाठवून दिले. त्यांच्या कुटुंबात नातवंडांचे आगमन झाल्यानंतरसुद्धा सुरुवातीचे काही महिने ते एकत्र येऊन राहिले आणि स्वतंत्रपणे राहण्याजोगी परिस्थिती येताच मुलाचे कुटुंब आपल्या फ्लॅटवर रहायला चालले गेले. वेळोवेळी पडणारी गरज आणि त्या वेळी सर्वांची सोय यांचा विचार करून कधी आजी किंवा आजोबा किंवा ते दोघेही त्यांच्या मुलांकडे जाऊन राहतात किंवा नातवंडांना त्यांच्या आजीआजोबांच्या घरी आणून ठेऊन त्या बालकांचे आईवडील दुसरीकडे त्यांच्या इच्छित स्थळी जाऊन येतात. काही काळ तर आजोबा रोज सकाळची कामे आटोपल्यानंतर नातवंडांना सांभाळण्यासाठी मुलाकडे जाऊन बसत आणि संध्याकाळी आपल्या फ्लॅटवर परत येत असत. सणासुदील सगळे एकत्र जमतात. एक प्रकारचे विस्कळित पण एकत्र कुटुंब असे त्यांना म्हणता येईल. यात सर्वांनाच आपापली स्पेस मिळते आणि सगळेच सुखी असावेत असे वर वर पाहता वाटते. पण गरज नेहमीच सांगून पडत नाही आणि त्या वेळी गरज जास्त महत्वाची की सोय असा तिढा पडला तर काय करायचे यासारखे प्रश्न त्यांना पडत असतीलच.
लहान घरात राहणे फारच अडचणीचे होते, तिथे कोणालाच थोडीही प्रायव्हसी मिळत नाही, यामुळे आजीआजोबानी त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्यासह त्यांच्या एक दोन खोल्यांच्या जुन्या घरात राहणे अशक्यच असते. सर्वांनी मिळून एकत्र राहण्याच्या दृष्टीने मोठे घर घेतले तरी त्यात पहिल्या उदाहरणात दिल्याप्रमाणे काही अडचणी येत असतात. वर दिलेल्या दुसर्या उदाहरणातल्या आजीआजोबांनी स्वतःच पुढाकार घेऊन मुलाला वेगळा संसार थाटायला सांगितले असे ते सांगत तरी असतात. पण मुलांना अधिक स्वातंत्र्य हवे असते किंवा त्यांना घरात रोज कुरबुर नको असते म्हणून ते स्वतःहून वेगळे होतात असेच सर्वसाधारणपणे दिसते. आर्थिक दृष्ट्या पाहता त्यांनाच ते शक्य असण्याची जास्त संभावना असते. त्यांच्या पगाराच्या आधारावर त्यांना दीर्घ मुदतीचे गृहनिर्माणकर्ज मिळू शकते. साठी उलटून गेलेल्या आणि नियमित मासिक उत्पन्न नसलेल्या आजीआजोबांना कोणती बँक कर्जपुरवठा करणार आहे? जे आजीआजोबा वेगळ्या घरात पण त्यांच्या मुलांच्या घरापासून जवळच रहात असतात त्यांना नातवंडांशी सतत संपर्क ठेवता येतो, पण ते एकाच शहरात असूनसुद्धा दूरदूरच्या निरनिराळ्या उपनगरांमध्ये रहात असले तर मात्र गर्दीने गच्च भरलेल्या लोकल गाड्या किंवा सिटीबसेस यांच्यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करून नातवंडांना भेटायला जाणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्यांची मुलेच नातवंडांना घेऊन त्यांच्याकडे आली किंवा त्यांना आपल्या सोबत त्यांच्या घरी घेऊन गेली तरच त्यांचे भेटणे शक्य होते. या अडचणींमुळे त्यांच्या भेटीगाठी कमी होत जातात आणि त्या प्रमाणात लळा, जिव्हाळाही थोडा कमी होत असणार.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
प्रतिक्रिया
एक आढावा, ललित लेखन म्हणून
एक आढावा, ललित लेखन म्हणून आवडले.
काही निरिक्षणे अगदी चपखल आहे. या बदलत्या मुल्यव्यवस्थेत व्यावहारीक राहणे, काळाशी जोडलेले राहणे, स्वतःचे छंद आवडी असणे वगैरे आवर्जून करणारे आजी आजोबा अधिक आनंदी असतात असे निरिक्षण आहे.
कोणासाठी तरी सतत त्याग करायची सवय लागलेल्या त्या पिढीला, आता त्याग करायला काही उरले नसताना, फक्त स्वतःसाठी जगायचे कसे? असा (अजब(?)) प्रश्न पडताना मला अनेकदा दिसले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाचतेय.
वाचतेय.
सतत कामात राहण्याची सवय
सतत कामात राहण्याची सवय असलेल्या माझ्या पालकांच्या पिढीला आता काम उरलेले नसताना फक्त मजा करणेही जमत नाही, अपराधी वाटते, असेही एक निरीक्षण. माझ्या आजीआजोबांना हे चांगले जमे. म्हणजे ते आळशासारखे बसून असत असे नाही. पण वाती वळणे, गव्हले करणे, श्रीरामजप लिहिणे ही काही कामे नव्हेत. नुसता बसून स्वैर विचार करण्याच्याच प्रकार म्हणायला हवा. तसेच काहीही न करता - वाचन-लेखन-शिकणे-छंद जोपासणे वगैरे नव्हे, का-ही-ही न करता लोळण्याची कला मला - माझ्या पिढीला चांगली अवगत आहे.
माझ्या मते दिवसातला / आठवड्यातला काही वेळ काहीही न करता बसणे/लोळणे/स्वैर विचार करणे हीसुद्धा एक आवश्यक गोष्ट आहे. ती माझ्या आईवडिलांच्या पिढीने गमावली आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आजीआजोबा आणि नातवंडे
ही लेखमाला आजीआजोबा आणि त्यांची नातवंडे यांच्या परस्परसंबंधांविषयी लिहिली आहे. माणसाला आनंदी राहण्यासाठी अनेक मार्ग आहेत. निरनिराळे छंद जोपासणे, नाटक सिनेमे पाहणे, भटकंती करणे, समाजसेवा, परमार्थाला लागणे किंवा मस्त झोपून राहणे वगैरे वगैरे. पण या लेखात त्यांचा अंतर्भाव मुद्दाम टाळला आहे.
आभार! लेखात याच बरोबर
आभार!
लेखात याच बरोबर नातवंडांच्या आईवडिलांच्या भुमिकांवरही (अनेकदा अपरिहार्य, अन जर तुम्ही म्हणताय ती विषयसीमा अपेक्षित असेल तर कधी उगाच) टिपण्ण्या आहेत त्यामुळे लेखनाचा उद्देश नीटसा पोचला नाही.
असो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेखनाचा उद्देश
आजीआजोबा आणि त्यांची नातवंडे यांच्यातल्या नातेसंबंधांमध्ये दर पिढीमध्ये काही ठळक बदल येत गेले. त्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा एक दुबळा प्रयत्न या लेखमालिकेत केला आहे. हे बदल घडून येण्यामध्ये मधल्या पिढीची (मुलांच्या आई वडिलांची) भूमिका महत्वाची ठरत असेल तर त्याचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे. त्यातला सकारात्मक भाग (न) दाखवण्यात मी कमी पडलो असेन, यामुळे आपल्याला त्या (उगाच)'टिप्पण्या' वाटल्या असणार. आपल्या अभिप्रायाची नोंद घेतली आहे.
मुलांच्या आई वडिलांचे त्यांच्या आईवडिलांशी अत्यंत प्रेमाचे उत्तम संबंध असतातच, पण ते त्यांच्या लहानपणापासून जुळलेले असतात. आजीआजोबा आणि त्यांची नातवंडे यांच्यातल्या नातेसंबंधांवर त्यांचा काही प्रमाणात प्रभाव पडत असतो याचा उल्लेख करणे कदाचित आवश्यक होते.
आजीआजोबा आणि त्यांची नातवंडे यांना जवळ आणणारा हा सकारात्मक भाग कोणी समर्थपणे दाखवून दिला तर फारच छान होईल.
मेघना, खरयं. माझ्या वडिलांना
मेघना, खरयं. माझ्या वडिलांना तर बराच वेळ टीव्ही बघीतला तरी अपराधी वाटत. "उगाचचं फार वेळ गेला." असं म्हणतात सारखं . रिकामा वेळ घालवता येणं ही सुद्धा एक कला आहे. आणि माणसाला ती लहानपणापासूनच अवगत असते. आपल्या आधीची पिढी मात्र जगण्याच्या रेट्यात ही कला गमावून बसलीय.
छान लेख.
छान लेख.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरा आहे.
लेख आवड्ला नाही. निरीक्षणे एकांगी वाटली. ५०-६० वर्षां पूर्वी सगळा आनंदी-आनंद होता असे नाही. मधल्या पीढी चे प्रश्न , त्यांचा द्रुष्टीकोन मांड्लेला नाही. पण या लेखाच्या निमित्ताने चांगली चर्चा वाचायला मिळाली.
विशिष्ट उदाहरणे
५०-६० वर्षांपूर्वी जे लोक खेड्यापाड्यामध्ये एकत्र कुटुंबांमध्ये रहात होते त्या कुटुंबांमधील आजीआजोबा आणि त्यांची नातवंडे यांच्यामधील नातेसंबंध जास्त जिव्हाळ्याचे होते एवढेच मी लिहिले आहे. हे मी अनुभवलेले आहे. त्या काळात सगळा आनंदीआनंद होता असे मी कधीच आणि कुठेच लिहिलेले नाही. त्या काळात जास्तच बिकट समस्या होत्या, आजचे आपले जीवन नक्कीच तुलनात्मक दृष्ट्या अधिक सुखाचे आहे यात शंका नाही.
खेड्यातून शहरांमध्ये आलेल्या म्हणजे माझ्याच पिढीमधील लोकांच्या समस्यांना मी थोडा तरी स्पर्श केला आहे.
यातील उदाहरणे सर्वच ठिकाणी समान असणार नाहीतच. कुठलाही समाज अगदी एकसारखा कधीच नसतो. स्थळकाळानुसार त्यात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. मला जाणवलेली काही विशिष्ट उदाहरणे मी लेखात लिहिली आहेत.
हा एक लहानसा लेख आहे प्रबंध नाही. मुख्य म्हणजे मला त्यातून काहीच प्रतिपादन करायचे नाही. हे फक्त बदलत्या परिस्थितीचे एका कोनातून (अँगलमधून) केलेले निरीक्षण आहे.
आपल्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद.