माहितीवजा पुस्तकांची मराठीमधली बाजारपेठ
"अलिकडे काय वाचलं" ? किंवा "अलिकडे काय पाहिलं ?" यांसारख्या धाग्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद अर्थातच या विषयांच्या लोकप्रियतेची ग्वाही देणारा आहे. आपण सर्व काही ना काही अधून मधून पहात/वाचत असतोच. एकंदर या धाग्याचा एक उपयोग नवनवी पुस्तके आणि विषय यांची माहिती होण्यासाठी आहे त्याच प्रमाणे , "अलिकडे लोक काय वाचतात ?" या प्रश्नाचे - त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्या वाचकवर्गापुरते - उत्तर मिळण्यासाठीही करता येऊ शकेलच.
प्रस्तुत धाग्याचा उद्देश हा असाच काहीसा आहे. आपल्या पर्यावरणामधे मराठी लोक पुस्तके विकत घेऊन/उधारीवर घेऊन वाचत असतील , किंवा जमेल तशी मिळवून , त्यांची बेगमी करून वाचत असतील तर एकंदर अभिरुचीचा कल कुणीकडे आहे , आजूबाजूला पुस्तकांची बाजारपेठ असेल तर कुठली पुस्तकं अधिक विकली जात असावीत याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हणू.
प्रस्तुत धाग्याच्या लेखकाने अलिकडच्या काळात मुंबईपुण्याच्या पुस्तकांच्या दुकानात मारलेल्या चार पाच चकरांमुळे त्याचा अनुभव किंचित ताजा आहे परंतु तो अर्थातच सर्वसमावेशक नाही आणि तसा दावाही नाही. किंबहुना अनेकांचे अनुभव आणि मते मिळूनच काहीसे समग्र चित्र तयार होऊ शकेल.
एकंदर "दिवाळी अंकांचा लेखाजोखा" या धाग्यावर काही मते मी मांडली त्यांचीच पुनरावृत्ती होईल ; पण नॉन फिक्शनची बाजारपेठ आता फिक्शनच्या एकंदर मार्केट आणि त्याला असलेल्या उठावाच्या तुलनेमधे निश्चितच अधिक आहे असं विधान मी माझ्या अनुभवावरून करेन. अच्युत गोडबोले या लाटेवर स्वार आहेत, या प्रकारात सर्वाधिक आघाडीवर आहेत असं चटकन दिसेल. गेल्या चार पाच वर्षांत विज्ञान/तंत्रज्ञान , मॅनेजमेंट , अर्थशास्त्र, भारतीय संगीत अशा अनेक विषयांवरची त्यांची माहितीपूर्ण पुस्तकं बर्यापैकी लोकप्रिय आहेत असं दिसतंय. अलिकडे त्यांनी नॅनो टेक , किंवा स्लेव्हरीची परंपरा इत्यादि विषयांवर लिहून आपली लिहिण्याची (किफायतशीर) परंपरा पुढे चालू ठेवली आहे असं दिसतं आहे. अलिकडच्या काळात त्यानी अतुल कहाते आणि सुलभा पिशवीकर यांच्याबरोबर पुस्तकं लिहिलेली दिसत आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून नवीन विचार असा जरी पुढे ते आणत नसले तरी हाती घेतलेल्या विषयाबद्दलची सांगोपांग माहिती - मुख्य म्हणजे संदर्भग्रंथांच्या यादीसकट - ते देतात. एका अर्थाने गोडबोल्यांसारखे लेखक वाचकाचं कुतुहल शमवण्याचं नि त्याचबरोबर अधिक खोलातलं वाचायला उद्युक्त करण्याचं काम करतात अस
अच्युत गोडबोल्यांच्याच आगेमागे जोमाने नवनवीन पुस्तके लिहिण्याचा सपाटा लावलेली दुसरी लेखिका म्हणजे मीना प्रभू. त्यांची विविध देशांच्या प्रवासवर्णनांची अशी डझनभर पुस्तकं झाली असावीत. त्यांच्या पुस्तकं लिहिण्याचा अॅप्रोच हा वर्षानुवर्ष मुरवलेले अनुभव लिखाणात आणून , देशविदेशींच्या जिवंतपणाला कागदावर उतरवणे असा जरी नसला , तरी त्यांची माहिती निश्चितच रोचक आणि अद्ययावत असते.
मीना प्रभू आणि अच्युत गोडबोले ही दोन प्रातिनिधिक नावं झाली. "माहितीवजा पुस्तकां"ची आता स्वतःची बाजारपेठ मराठीमधे निर्माण झालेली आहे आणि एकंदर ललित लिखाणाच्या खरेदीविक्रीपेक्षा ती निश्चितच मोठी आहे असं विधान मला करावंसं वाटतं.
मराठी वाचकांची बदलती अभिरुची , बाजारपेठेचं बदलत असलेलं स्वरूप हा मोठा विषय आहे, इतरानीही जमेल तशी भर घालावी. मी स्वतः सुचेल तसं लिहीन असं म्हणतो.
उत्तम
चर्चाप्रस्ताव आवडला, याबद्दल अधिक वाचण्यास उत्सुक आहे. गिरीश कुबेर, निळू दामले, फिरोझ रानडे आणि काही प्रमाणात के.रं.शिरवाडकर (आपले विचारविश्व), भानू काळे (बदलता भारत), अरूण टिकेकर (स्थलकाल) आणि माधुरी पुरंदरे (वाचू आनंदे) ही यातली अजून महत्त्वाची नावं म्हणता येतील. 'अर्धी मुंबई'सारखी रिपोर्ताज शैलीतली, संशोधक पुस्तकं प्रसिद्ध करणारी युनिक फीचर्स आणि मराठी अभ्यास परिषद ह्या सामूहिक प्रयत्नांचीही यात भर घालता येईल.
अर्थात, 'माझं चीज कोणी हलवलं' किंवा 'मित्र कसे जोडावेत?' सारख्या पुस्तकांनाही मोठी मागणी आहेच. त्याबद्दल खंत करण्याऐवजी नव्याने वाचू लागलेल्या एका मोठ्या वाचकवर्गाची वाचनातली पहिली निवड (मास्लोवियन श्रेणीप्रमाणे?) म्हणून याकडे पाहता येईल. त्यातूनच कदाचित निरनिराळ्या विषयांवरची पुस्तकं विकत घेऊन वाचायची सवय रूजू शकते.
गिरीश कुबेरांची 'हा तेल
गिरीश कुबेरांची 'हा तेल नावाचा इतिहास आहे' आणि 'एका तेलियाने' आवदली होती. 'अधर्मयुद्ध'ही माफक प्रमाणात आवडलं, पण 'युद्ध जीवांचे' वाचताना कंटाळा आला. हेच का ते कुबेर असा प्रश्न पडावा इतपत न पटणार्या उपमा, अस्थानी तुलना+टीका असं वाटलं.
नंदनच्या प्रतिसादातल्या दुसर्या गटातल्या पुस्तकांमधे ऋजुता दिवेकरांचं पुस्तकंही असेल अशी दाट शंका आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रुजुता दिवेकरांच वजनाविषयीच
रुजुता दिवेकरांच वजनाविषयीच पुस्तक गाजल ते प्रामुख्याने झीरो फिगरचे फँड वगैरे
तिच दुसरही पुस्तक मला वाटत आलय
मध्यतरी मँनेजमेँटवरची पुस्तक जोरात होतं
त्यात तणावनियोजन वर्कमँनेजमेट वगैरे विषय होते
शिव खेरा हे त्या ट्रेन्डचे जनक असावेत
जाता जाता:- एका साहित्यसंमेलनात कुत्रे व त्याची निगा या विषयावरची पुस्तके जास्त खपली अशी मटात बातमी वाचल्याचे आठवत आहे
.
मुळात असल्या माहितीवजा
मुळात असल्या माहितीवजा पुस्तकांना साहित्यीक लिखाण म्हणावे काय? ती पुस्तके साहित्यात, त्या अनुषंगाने होणार्या सांस्कृतीक प्रबोधनात काय भर टाकतात? माझ्या मते ही पुस्तके म्हणजे साहित्य नाही अन सांस्कृतीक प्रबोधनात काहीच भर टाकत नाहीत. एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या विचारांवर या पुस्तकांनी मुलगामी परिणाम होत नाहीत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
थांबतो
माहितीपर पुस्तकांच्या वाचसंख्येत भर पडते आहे हे पटते. वर नंदनने यादी दिली आहेच. आठवेल तशी भर घालीन तुर्तास अनंदनशी सहमत इतकेच म्हनतो आणि इतर प्रतिसादकांच्या विषेशतः रोचना, अदिती, दिलतितली, प्रभाकर नानावटी, सन्जोप राव, सागर आदी मातब्बर वाचक-लेखकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत थांबतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>> मातब्बर वाचक-लेखकांच्या
>>> मातब्बर वाचक-लेखकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत थांबतो
????
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
लवकरच प्रतिसाद देतो
इतर प्रतिसादकांच्या विषेशतः रोचना, अदिती, दिलतितली, प्रभाकर नानावटी, सन्जोप राव, सागर आदी मातब्बर वाचक-लेखकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत थांबतो
ऋ,
मी काही मातब्बर वाचक नाही. पण १-२ दिवसांत सविस्तर प्रतिसात टाकतो.
थोड्या गडबडीत आहे
माहितीवजा पुस्तकांची गुणवत्ता
"मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत ही माहितीवजा पुस्तकं काही महत्त्वाचं काम करतात का ?" अशा स्वरूपाचा प्रश्न या विमर्शात करता येईल. वर एका सभासदाने तो केलेला आहे आणि "तशी ती करत नाहीत" अशा स्वरूपाचं विधानही केलेलं आहे.
एक गोष्ट खरी आहे की ही जी सगळी पुस्तकं आहेत ती इंग्रजीतल्या विविध विषयांवरच्या पुस्तकांवर, नियतकालिकांतील लेखनावर , आणि हो , इंटरनेटवरील उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर उभी असताना आपण पहातो. छोटंसं उदाहरण घेऊ. अच्युत गोडबोले यांनी गुलामगिरीच्या विषयावर (अतुल कहाते यांच्या जोडीने) लिहिलेलं पुस्तक मी वाचायला घेतलं आणि स्वतःशी म्हणालो : "हम्म. एकंदरीत गोडबोल्यांनी हॉवर्ड झिन्न मराठीत आणलेला दिसतो आहे." एक चांगली गोष्ट अशी की, गोडबोल्यांनी पुस्तकाखेरीस संदर्भग्रंथांची यादी दिली आहे त्यत झिन्न यांचा उल्लेख आहे. माझ्यामते, हळुहळू मराठीमधल्या पुस्तकांची गाडी हॉवर्ड झिन्न, किंवा नॅनोटेक या विषयांवर आलेली आहे ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. खुद्द कहाते यांच्या नावावर सुमारे वीसेक पुस्तकं जमा झालेली आहेत. त्यांच्या विषयांमधेही "अमेरिकेतली २००८-२००९ मधली महामंदी" यांसारखे अद्ययावत् विषय आहेत.
वर नंदनने उल्लेख केल्याप्रमाणे यात "सेल्फ हेल्प बुक्स" "वेट लॉस" इत्यादि विषयांवरची पुस्तकं ही देखील आलीच. त्या विषयांबद्दल - आणि त्यांच्या वाचनाबद्दल - काहीसे तुच्छतापूर्वक बघण्याचा दृष्टिकोन थोड्या अधिक खोलवरच्या वाचकवर्गामधे असताना आपण पहातो. त्या संदर्भात हेही लक्षांत घ्यायला हवं की वाचन सुरु करणार्यांच्या वर्गाकरता ही पुस्तकं चांगले खाद्य पुरवतात. इंग्रजीत अशा पुस्तकांचा वर्ग मोठा आहे आणि हे लोण हळुहळू आपल्यासारख्या प्रादेशिक भाषेत पोचतं आहे हे लक्षांत घ्यायला हवं.
"सेल्फ हेल्प" पुस्तकांच्या बरोबर उलटीकडे आहेत कुमार केतकर यांच्यासारख्यांची पुस्तकं. "सेल्फ हेल्प" पुस्तकांची दृष्टी (ढोबळमानाने बोलायचे तर) "व्यक्तिगत विकास" या विषयाकडे असल्यास, केतकर यांच्या सारख्यांचा दृष्टिक्षेप जागतिक बदल, सामाजिक, राजकीय उलथापालथी , देशविदेश आणि विविध समाज यांच्यातल्या घडामोडी , वैचारिक क्षेत्रांमधले उदयास्त यांच्याकडे आहे. बरोब्बर वीस वर्षांपूर्वी दिलिप पु. चित्रे यांनी लिहिलेल्या "शतकांचा संधिकाल" या मालिकेची आठवण यातून येणे अपरिहार्य आहे.
विज्ञानाच्या क्षेत्रांत मराठीमधे लिहीत असलेल्या लोकांमधे मोहन आपटे आणि जयंत नारळीकर यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. आपट्यांच्या पुस्तकमालेमधे आतापावेतो दहा बारा पुस्तकं सामील झाली असतील (चूभूदेघे). विविध विषय आणि विविधरंगी चित्रे - आणि मुख्य म्हणजे विषय उलगडून दाखवण्याची हातोटी - यामुळे आपट्यांची पुस्तकं उत्तम रीतीने उतरलेली आहेत असं मला वाटलं.
प्रस्तुत विवेचन अपुरं आहे , किंबहुना हा विषयच "ओपन एंडेड" आहे याचा पुनरुच्चार मी करतो. इतरांनीही यात लिहावे असं सुचवतो आणि "पुनरागमनाय च" असं म्हणून थांबतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मोहन आपटे
मोहन आपट्यांची चाळीसच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत असे त्यांच्या 'चंद्रलोक' पुस्तकावर वाचले होते. 'मला उत्तर हवंय' मालिकेतच 'पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, तंत्रज्ञान, संगणक आणि इंटरनेट, पर्यावरण, पृथ्विविज्ञान, सापेक्षतावाद' इ. पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय 'सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार, निसर्गाचे गणित, विश्वात आपण एकटेच आहोत काय?, इंटरनेटःएक कल्पवृक्ष', कालगणना, कृष्णविवर' इ. अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. बरीच डिटेल असतात पुस्तके तशी. मस्तच असतात. पण माझे मित्र आणि त्यातील काहीचे पालक सोडले तर इतर कोणी फारशी वाचलेली दिसली नाहीत. (जालावरील मंडळी वगळून).
त्यामानाने नारळीकरांची पुस्तके सुरवातीला आवडली, पण नंतर तोचतोचपणा फार वाटू लागला. ती टायको ब्राहे-केप्लर यांची गोष्ट ३-४ पुस्तकांत बघून कंटाळा आला. आणि ती जास्तच वरवरची वाटली. (पण काही इतरांना ती पुरेशी जड वाटलेली, आणि असे लोक मोहन आपट्यांच्या वाटेला फारसे गेले नव्हते).
आणि पाषाणभेद यांच्या मुद्द्याबाबत, एखाद्या व्यक्तीवर मूलगामी परिणाम कसा होत नाही. मोहन आपट्यांची वगैरे पुस्तके वाचून विषयाची प्राथमिक आवड निर्माण झाली तर ती व्यक्ती त्या विषयाचा खोलात अभ्यास करू शकते की.
मोहन आपटें बाबत सहमत आहे... नाऱळीकरांबद्दल असहमत
मोहन आपटे हे एक हाडाचे शिक्षक असल्यामुळे असेल, पण त्यांची विज्ञानातील अवघड विषय सोपा करुन सांगण्याची हातोटी अगदी विलक्षण आहे.
आपटे सरांचे मला अजून एक पुस्तक माहिती आहे ज्यात त्यांनी अणू सारखा किचकट विषय खूप सोपा करुन सांगितला आहे.
अणूची संरचना, त्याचे कार्य, अणुभट्ट्या, रेडिएशन या सर्व गोष्टी आकृत्यांद्वारे छान सोप्या करुन सांगितल्या आहेत.
ग्रंथालयांतून हे पुस्तक मिळावे.
पुस्तकाचे नाव : अग्नीनृत्य (बाजारात उपलब्ध नाहिये) - कृत्तिका प्रकाशन - २४७ पाने...
नारळीकरांबद्दल म्हणायचे तर पुनरुक्ती ही केवळ त्या विषयांतील किचकटपणा वाचकांच्या लक्षात येण्यासाठी केली जाते. पुनरुक्ती हे लेखनतंत्र सोप्या विषयाला कोणी वापरत नाही. पण विज्ञानासारख्या अवघड विषयाचे सर्वसामान्यांना आकलन करुन देण्यासाठी पुनरुक्ती ही प्रभावी ठरते असे मला वाटते.
नारळीकरांनी अवकाशाशी जडले नाते
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची सहल
गणितातील गमतीजमती
नभात हसरे तारे
ही माहितीपर पुस्तके खूप छान वाटली मला. सोप्या शब्दांत नारळीकरांनी हे विषय उलगडून दाखवले आहेत.
बाकी तू म्हणतोस त्याप्रमाणे सखोल जायचे असेल तर ती व्यक्ती त्या विषयाचा खोलात अभ्यास करू शकते की.
मिहीर आणि सागरशी सहमत आहे.
मिहीर आणि सागरशी सहमत आहे. नारळीकरांची पुस्तकं आपटेंच्या पुस्तकांनंतर वाचल्यामुळे अरोचक वाटली. कदाचित ज्यांना खगोलशास्त्राची फार आवड नसेल किंवा लहान वयोगटातल्या मुलांना ठीक वाटावीत.
हे कदाचित ब्रह्मांड असावं. मी साधारण १२ वर्षांपूर्वी वाचलं असेल. त्यामुळे तपशील फारसे आठवत नाहीतच. सध्या उपलब्ध आहे का याचीही कल्पना नाही.
नारळीकरांची पुस्तकं कदाचित त्यांच्या विज्ञानकथा आधी जास्त प्रसिद्ध असल्यामुळे जास्त खपत असावीत. घरोघरी नारळीकरांचं नाव पोहोचलेलं असण्याचंही कारण तेच असावं. आपटे सर चांगले शिक्षक असले तरीही ते विज्ञानकथा लिहीत नाहीत.
अवांतरः बहुदा सुभाषचंद्रांच्या जन्मशताब्दी वर्षात, उजव्या संघटनांनी चालवलेल्या 'धर्मभास्कर'च्या एका अंकाचे पाहुणे संपादक मोहन आपटे होते. त्यात सुभाषचंद्रांबद्दल बरीच नवीन माहिती, निदान माझ्या तेव्हाच्या वाचनाचा विचार करता, मिळाल्याचं आठवतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खपाचा कल
धागाकर्ते म्हणतात त्यानुसार नॉनफिक्शनची बाजारपेठ सध्या चढत्या भाजणीचीच आहे आणि फिक्शनशिवायही पब्लिशिंग बिझिनेस सुखनैव करता येतो हेही या धंद्यात असलेल्या नवीन पिढीला पूर्णपणे उमजले आहे हे ते ते हाऊस प्रकाशित करीत असलेल्या पुस्तकांच्या यादीवरून सहज दिसून येते. "मौजे" ने ही परंपरा सांभाळलेली नाही पण पॉप्युलर, राजहंस तसेच कॉन्टिनेन्टलने वाचकाला "चार घडी करमणुकीच्या" पलिकडे जाऊनही काही देता आले तर देऊ केले पाहिजे या तत्वाचा स्वीकार केला आहे. यात अनिल मेहता यांचे चिरंजीव सुनिल मेहता यानी फार पुढचा पल्ला गाठलेला दिसतो. नॉन फिक्शन्स तसेच ट्रान्सलेशन या दोन बाबतीत सुनिल मेहता यानी लक्षणीय असे यश मिळविले आहे हे या धंद्यातील प्रतिस्पर्धीही कबूल करतील. वाचकालाही आता 'कादंबरी' आणि 'कथा' या पलिकडे अन्य काहीतरी वाचनभूक आहे याची नोंद दिवाळी अंकांनीही घेतल्याचे अलिकडील काही अंकांच्या जाहिरातींचे अवलोकन केल्यास प्रकर्षाने जाणता येईल. एक काळ असा होता की 'दीपावली' ची दलाल जाहिरात करत : "यंदाच्या अंकात दिग्गजांच्या १२ कथा आणि ६५ कविता तसेच अच्युत बर्वे यांची संपूर्ण कादंबरीदेखील. किंमत रुपये ५०/-". आज ही परिस्थिती राहिलेली नाही. नॉन फिक्शन मटेरियल किती आणि कुणाचे आहे हे सांगितल्यानंतर "तसेच कथा अमुकतमुक यांच्या" असा काहीसा त्रोटक शेरा - कवितांचा तर उल्लेखही केला जात नाही, जरी कुठल्यातरी पानावर त्या फुटकळ अवतरत असल्यातरी. ["चिन्ह", 'मुक्त शब्द' असे दिवाळी अंक 'शिल्लक नाहीत' असे ज्यावेळी विक्रेत्याकडून सांगितल्याचे ऐकले त्यावेळी झालेला आनंद स्मरतो. 'चिन्ह' च्या अंकाचे रुपये पाचशे आगाऊ भरले तरच अंक मिळेल, अशी धमकीवजा सूचना म्हणजे 'नॉनफिक्शन' ला मिळत असलेली हिरवाईच होय. हा बदल २१ व्या शतकाच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे; कारण बहुसंख्य सुशिक्षितांची 'करमणूक' पातळी आता टीव्हीच्या शेकडो चॅनेल्सभोवतीच रुंजी घालत असताना 'मी अमुक एका लेखकाची दीर्घकथा असल्याखेरीज दिवाळी अंक घेणार नाही' असा पवित्रा घेतला जात नसल्याचे दिसते. Changes are inevitable and so they are to stay here.
नॉन-फिक्शनमध्ये खपाच्या बाबतीत बाजी मारणार्या पुस्तकांचा इथे उल्लेख होतो आहेच. कोल्हापुरातील ज्या पुस्तकालयात मी सातत्याने आणि निवांतपणे हजेरी लावीत असतो, तिथे "नॉन-फिक्शन" खपाचा कलही पाहिलेला आहे. त्या दृष्टीने केलेल्या काही नोंदी (दिलेल्या क्रमाने खपाचा आलेख आहे असेही नाही)
१. गर्भसंस्कार ~ डॉ.बालाजी तांबे [मी पाहिलेली अगदी डीलक्स क्वॉलिटीची आवृत्ती पाचवी होती.]
२. वास्तुशास्त्र
३. "शांताराम" (अपर्णा वेलणकर यानी अनुवादित केलेले हे आगळेवेगळे आत्मचरित्र सध्या तर "आऊट ऑफ स्टॉक" आहे, म्हणजे वाचकांची पसंती आहेच)
४. महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे [मला वाटते 'ऐसी अक्षरे' च्या जवळपास सर्व सदस्यांनी हे पुस्तक पाहिले असेल.]
५. माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ.अभय बंग [माझ्याकडे असलेली आवृत्ती १६ वी आहे, जी जानेवारी २००९ मधील आहे. म्हणजे या दोन वर्षात नक्की अधिकच्या आवृत्त्या आल्या असणार]
याशिवाय 'अनिल अवचट' यांच्या नॉन-फिक्शन गटात येणार्या साहित्यकृतीची नित्याने विक्री होत असल्याची मी नोंद केली आहे.
तूर्तास इतकेच.
अशोक पाटील
छान प्रतिसाद.शांताराम सारखे
छान प्रतिसाद.
शांताराम सारखे अतिशय रटाळ पुस्तक बेस्टसेलर मधे बघुन अचंबित झालो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आणखी काही
अशोक पाटील : उत्तम , माहितीपूर्ण प्रतिसाद.
नॉन फिक्शनच्या या विभागात वर अनिल अवचट यांचं नाव आलं आहे त्यांच्या जोडीने इतर नावे सुचतात.
आनंद नाडकर्णी यांचं लिखाण गेली पंचवीस वर्षं नेमाने येताना आपण पहातो आहोत. मानसिक विकार , मानसोपचार , एकंदर मानसिक स्वास्थ्य, REBT सारखी तंत्रे यांवर आता त्यांच्या नावावर आठ-दहा पुस्तकं जमा झालेली दिसत आहेत. मानसिक ताण आणि इतर गोष्टींकडे लक्ष देणार्या अधिकाधिक मराठी वाचकांचे लक्ष याकडे वळताना दिसते.
"युनिक फीचर्स" या संस्थेने "समकालीन प्रकाशन" या नावाखाली जी मराठी पुस्तकं छापली आहेत त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. गेल्या दहा पंधरा वर्षांत महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या सामाजिक चळवळी , सामाजिक सेवा करणारे कार्यकर्ते आणि संस्था यांचं काम जाणून घ्यायचं असेल , विविध प्रश्न आणि त्यांच्या अनुषंगाने चाललेली कामे यांचा वेध घ्यायचा असेल तर "समकालीन" च्या या पुस्तकांखेरीज पर्याय नाही असं म्हणावं लागतं. उत्तम छपाई , प्रत्येक कार्य आणि व्यक्तीची साद्यंत ओळख आणि विषय, प्रदेश यांची विविधता ही या सर्व पुस्तकांची वैशिष्ट्ये म्हणायला हवीत. समाकालीन च्या पुस्तकांच्या यादीचा दुवा : http://uniquefeatures.in/samakaleen/book-browser
समकालीन ने एक प्रकाशन संस्था म्हणून जे काम केलं तेच काम अनिल अवचट यांनी - किमान पाचसात वर्षांपूर्वी पर्यंतच्या - त्यांच्या लिखाणातून केलं असं म्हणू शकतो. "कार्यरत" नावाचं त्यांचं पुस्तक याचं उत्तम उदाहरण. "धागे आडवे उभे", "धार्मिक" , "माणसं !" ही इतर उदाहरणे.
"साधना" प्रकाशनाने गेल्या वर्षांत या क्षेत्रात बर्यापैकी आघाडी उघडली आहे. एकतर "महाराष्ट्र फाऊंडेशन" या मोठ्या संस्थेचा पाठिंबा त्या प्रकाशनाला आहेच. "फाऊंडेशन"ने सामाजिक कार्यांकरता ज्यांना १९९४ पासून पुरस्कार दिलेत त्या सर्वांच्या परिचयांच्या लेखांचा संग्रह "कर्ती माणसं" या नावाखाली साधना ने काढलेला आहे. राम जगताप यांचा उल्लेख या संदर्भात विशेषत्वाने करायला हवा. "साधना" परिवाराशी संलग्न असलेल्या जगतापांनी "कर्ती माणसं" खेरीज , मराठा समाजाच्या प्रश्नांचा धांडोळा घेणारा लेखसंग्रह प्रकाशित केलेला आहे. हे त्यांचं काम नक्कीच स्पृहणीय.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
दृश्यकला आणि मराठी वाचक
'चिन्ह'च्या बाबतीत बोलायचं झालं तर अंकाचा 'नग्नता' हा विषय त्या खपाला कारणीभूत होता असं नमूद करावं लागेल. एरवी 'चिन्ह'ला एवढी मागणी नसावी.
दृश्यकलांवरच्या नॉनफिक्शनमध्ये गेल्या काही वर्षांत 'ज्योत्स्ना प्रकाशन'नं चित्रकलेवरची सुबक पुस्तकं छापून स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. चित्रपटांच्या रसग्रहणाची पुस्तकंसुद्धा अलीकडे मराठीत दिसू लागली आहेत. अनिल झणकर यांचं 'सिनेमाची गोष्ट' हे पुस्तक छापून राजहंसनं हा पायंडा निर्माण केलेला असावा. नंतर इतर अनेकांनी चित्रपटविषयक लिखाणाची पुस्तकं प्रकाशित केली. ही पुस्तकं आजकाल प्रदर्शनांत वगैरे खपत असावीत असा अंदाज आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चित्रपटविषयक
चित्रपटविषयक लिखाणाचा विचार करताना गणेश मतकरींचे नाव घेणे अपरिहार्य. त्यांची नवनवीन पुस्तकं निघताना पहातो. आतापावेतो ३-४ पुस्तके त्यांच्या नावावर जमा झाली असावीत. त्यांचा ब्लॉग वाचणार्यांना पुस्तकांमधे पुनरावृत्ती दिसणे साहजिक आहे. पण अलिकडच्या काळात मराठीमधे चित्रपटविषयक लिखाण करणार्यांत ते आघाडीवर आहेत हे नक्की.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लिहायचे असेल तर
आता लिहायचे असेल तर नॉन फिक्शन! कथा कविता लिहिण्यापेक्षा तेच सध्या चलनी नाणे आहे. लेखन करणे कदाचित सोपे नसेल पण प्रकाशक आणि ग्राहक नक्की मिळतील असे दिसते. त्याशिवाय अनुवाद हा एक प्रमुख विभाग आहे त्याशिवाय.
चर्चा प्रस्ताव आवडला. त्यात फार भर घालण्याची क्षमता माझ्याकडे नाही:)
एका शब्दपेक्षा दोन बरे.
लेखन करणे कदाचित सोपे नसेल पण
निदान दर्जेदार पुस्तकांची आणि जालिय लिखाणाची आकडेवारी पहाता नॉन-फिक्शन जास्त सोपे असावे असे वाटते.
किंवा
चांगल्या ललित लिखाणाचा आस्वाद घेणे शिकवले जात नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या व्यतिरिक्त
या व्यतिरिक्त
१. रॅपिडेक्स वगैरे वर वर शैक्षणिक वाटणारी तरीहि अतिशय खपणारी नॉन-फिक्शनल पुस्तकेही या यादीत समाविष्ट करता यावीत.
२. पंचांग हे कितीही धार्मिक वाटलं तरी अनोक खगोलिय घटनांचा लेखाजोखा अन्यत्र मांडलेला मिळत नाही. त्या दृष्टीने हे पुस्तकही यात यावे
४. 'रुचिरा' या पुस्तकाने नॉन फिक्शनल लेखनात बाजी मारता येते हे खुप पुर्वीच दाखवून दिले होते.
३. यात 'कालनिर्णय' सारखे कॅलेंडर व्यतिरिक्त अनेक माहिती एकत्रित असणारे प्रकाशन धरले तर नॉन फिक्शनल ही किती मोठी इंडस्ट्री आहे हे साळगांवकरांनी केव्हाच ओळखल्याचे जाणवते
५. याशिवाय ज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई विषयक अंक, पुस्तके यांचाही (दुर्दैवाने) अतिशय खपणार्या पुस्तकांत समावेश करता यावा
६. आरोग्य विषयक जसे अॅक्युप्रेशर, पंक्चर, घरचा वैद्य छाप पुस्तके यांचाही ग्राहकवर्ग मोठा आहे
७. चातुर्मास हे वेगवेगळा धार्मिक विधी, श्लोक, माहिती, कहाण्या आदींचे संकलन असलेले पुस्तकही नॉन-फिक्शनलच अन त्याचा ग्राहकवर्ग प्रचंड आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुस्तकाच्या दुकानासमोरून
पुस्तकाच्या दुकानासमोरून गेल्यास दुकानाबाहेर टेबलवर मांडून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पुस्तके माहितीपर किंवा सेल्फ हेल्प टाईपची असतात. यात ज्योतिष, वास्तुशास्त्र, चुंबकचिकित्सा, वजन कमी करणे, मधुमेह/।रुदयरोगावर मात, बालसंगोपन, गर्भसंस्कार वगैरेंचा वाटा ५०% हून अधिक असावा.
एखादे काळानुरुप स्टिव्ह जॉब्जचे चरित्र वगैरे असते. फिक्शन जवळजवळ नसते.
पुस्तक प्रदर्शनात देखील बर्याच मोठ्या प्रमाणावर अशी पुस्तकेच असतात. येथे फिक्शन/ललित साहित्य बर्याच प्रमाणात असते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बाजाराचे गणित
१. @ ऋषिकेश ~
"शांताराम सारखे अतिशय रटाळ पुस्तक बेस्टसेलर मधे बघुन अचंबित झालो"
ऋषिकेश म्हणतात त्यात तथ्यही आहेच आहे, पण झाले आहे असे हे आकडेवारी सांगते. हा अचंबित वाटावा असा चमत्कार असलाच तर मग त्याचे सारे श्रेय सुनिल मेह्तांच्या व्यावसायिक कौशल्याला निर्विवादपणे दिले पाहिजे. त्यानी (आणि एकूणच मेहता पब्लि.हाऊसच्या सर्वच घटकांनी) अनुवादित आवृत्ती बाजारात येण्याअगोदरच ग्रेगरी रॉबर्टसला अगदी आधुनिक रॉबिनहूड करून दाखविले होते. त्यांच्याकडून 'ललित' ची डुप्लिकेट समजली जाईली असे "मेहता ग्रंथ वार्ता' दरमहा प्रकाशित होते जे मला अगदी मोफत मिळते - मलाच नाही तर इथल्या सर्वच पुस्तकप्रेमींना इथले स्थानिक विक्रेते आवर्जून त्याची (आणि "राजहंस प्रकाशन सूची") दरमहिन्याचा पहिली रविवारी मोफत वाचनासाठी देतात. हाही आपल्या प्रकाशनगृहाचा केलेला सुयोग्य प्रचार म्हणावा लागेल. 'मेहता ग्रंथ वार्ता' केवळ पुस्तकांच्या याद्याच देत नाही तर ललित पद्धतीने त्या त्या महिन्यातील साहित्यिक घडामोडीचा आढावाही घेते. शिवाय त्यांच्यातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या ग्रंथावर "साधकबाधक" म्हटली जाणारी तीनचार पानांची चर्चा [हा देखील धंद्याचाच एक भाग]. मग असे हे आयते विनाशुल्क वाचनीय मटेरियल समोर आले की साहजिकच 'ग्रेगरी' ची जाहिरातही मनावर ठसते. "नॉन-फिक्शन" वर तिथे झडणार्या गप्पातही हमखास उल्लेख येत राहतो. त्यातून वा त्यामुळे अशा वर्गातील पुस्तकांच्या खपाची वेल वरची खिडकी पकडत जाताना दिसते.
आणखीन् एक ~ राजहंस आणि त्यापाठोपाठ मेहता - या दोघांनी पुस्तक निर्मितीची पाळलेली उच्च दर्जाची मूल्ये. पॉप्युलर आणि कॉन्टिनेन्टल याना सादरीकरणाचे महत्व (आजही) पटलेले दिसत नाही. मौज चा या बाबीवर असलेला दबदबा वाखाणण्याजोगा होता. पण हमखास खपाऊ पुस्तकांच्या (विशेषतः अनुवादित साहित्य) एकापाठोपाठ एक आवृत्त्या आणताना निर्मितीमूल्यांशी तडजोड न करण्याची आजच्या आघाडीच्या प्रकाशकांची भूमिका अभिनंदनीय मानावी लागेल.
चार पैसे दरमहा पुस्तकांसाठी ठेवू इच्छिणारा आजचा काहीसे स्थैर्य आल्याची भावना बाळगणारा मध्यमवर्गीय तशी मासिक खरेदी करताना जरूर त्याच्या आवडीच्या लेखकाची पुस्तके घेत असेल, पण ती घेताघेता अशी देखणी आणि दिवाणखान्याची शोभा वाढवू शकणारी "नॉन-फिक्शन्स" ही जेव्हा घेत असताना मी पाहतो, त्यावेळी हे नक्कीच समजते की ती घेणार्याने मजकुरासमवेत त्या पुस्तकाची दर्शनीय 'बॉडी' ही पाहिली आहे. हा अभिप्राय एकदा मी 'अक्षर दालन' च्या रविन्द्र जोशी यांच्याकडे नोंदविला तो त्यानी तातडीने राजहंस आणि मेह्ता यांच्याकडे पाठविला होता. याचाही निर्मितीमूल्ये वृद्धिंगत होण्यासाठी केला जातो असा अनुभव आला आहे.
खलिद अहमद, भावना सोमैय्या आदीनी लिहिलेली 'अमिताभ' विषयावरील पुस्तक असो, वा देव आनंदचे "रोमॅन्सिग वुईथ लाईफ' असो, ही इंग्रजीतील पुस्तके आज मराठी पुस्तकांच्या प्रदर्शनामध्ये "सेन्ट्रल स्टॅन्ड" वर का असतात ? याचा मागोवा घेतल्यास (मी घेतला होता) आयोजकांकडून स्पष्ट सांगण्यात आले की, इथला वाचक या व्यक्तिरेखांच्या प्रेमात तर असतोच, पण घेण्यापूर्वी ते पुस्तक हाताळताना त्याला त्यांच्या निर्मितीदर्जाविषयी वाटलेला आदरही प्रतीत होत असल्याचे जाणवत जाते. साहजिकच मग दिवसभरात अशा 'नॉन-फिक्शन' च्या जादाच्या पावत्या फाडल्या जातात. "की नोट", "वुई द नेशन", "आर.के.लक्ष्मण कॉमन मॅन", "विठ्ठल कामत", "गायत्रीदेवी" ही आणि अशी पुस्तके "आमच्याकडे शिल्लक नाहीत" असे ज्यावेळी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात अप्पा बळवंत चौकात आयुष्य काढलेला एखादा मराठी विक्रेता सांगतो त्यावेळी या (अशाच) पुस्तकांना एकदम सुगीचे दिवस का यावेत यावर त्याच मांडवात बसलेल्या एकालाही परिसंवाद घ्यावा असे सुचत नाही
("शांताराम" इथे प्रतिसादात घेण्याचेही कारण म्हणजे ते रुढ अर्थाचे मात्र 'आत्मचरित्र' नसून तुम्ही आम्ही पाहिलेल्या मुंबईला गुरफटून टाकलेल्या कायद्याबाहेरच्या गोष्टीची माहिती एका परकीयांने, इथल्या मातीत राहून, इथली भाषा भाषा शिकून, किती प्रभावीपणे रेखाटली आहे त्याची अनुभती घेण्यासाठीही ते पुस्तक वाचणार्यांची संख्या वाढती आहे. ग्रेगरीने पाहिलेले मुंबईतील जग ही एकप्रकारची आगळी 'माहिती' च असल्याने मूळ धाग्यामध्ये व्यक्त झालेली अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करते.)
२. @ मुक्तसुनीत ~ आनंद नाडकर्णी हे नाव माझ्या मनी होते पण त्यांच्या नावासोबत 'मेडिकल' च्या अनेकविध अंगाशी संबंधित असलेल्या तितक्याच ताकदीच्या (आणि खपाच्या दृष्टीनेही मोठे नाव असलेल्या) अन्य लेखकांचाही पुढील प्रतिसादात उल्लेख करावा असे मी ठरविले होते. पण असो. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत डॉ.बंग दांपत्य, डॉ.हिम्मतराव बावस्कर ("विंचू" फेम), यानीही आपल्या शब्दसामर्थ्याने तो विषय (नॉन-फिक्शन असूनही) सर्वसामान्यांमध्ये कमालीचा लोकप्रिय केला आहे. त्याअगोदर ही जादू साधली होती डॉ.अरुण लिमये यांच्या 'क्लोरोफॉर्म'ला. डॉ.बालाजी तांबे हे नावही कौतुक वाटावे इतके लोकप्रिय आहे हे त्यांच्यावर टीका करणारेही मान्य करतील.
३. @चिंतातुर जंतू ~ "चिन्ह २०११" खपावरील तुमच्या निष्कर्षाबद्दल आदर ठेवूनही असे म्हणतो की गेल्या दहा वर्षात 'चिन्ह' ने दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपले असे एक विशिष्ठ स्थान निर्माण केले आहेच आणि दर अंकागणिक चिन्हचे आर्थिक गणित कसे कोलमडत गेले आहे त्याबद्दलही सतीश नाईक यानी केलेले अभ्यासू असे निवेदन आपल्या वाचनात आले तर निदान यंदाच्या चिन्हच्या खपाने त्या ट्रस्टच्या बॅन्केतील सेव्हिंग्ज अकौंटवर सायझेबल फिगर दिसत असल्यात ते स्वागतार्ह मानले जावे (कोणत्या कारणाने यावर दुमत होऊ शकते, हे मान्य असूनही.)
अशोक पाटील
चिन्ह
'चिन्ह'च्या वेगळ्या स्थानाविषयी सहमत आहेच. पण नेहमीप्रमाणेच दर्जा आणि खप यांचा परस्परसंबंध व्यस्त गुणोत्तराचा आहे की काय असं वाटायला लावणारा 'चिन्ह'चा प्रवास आहे असं वाटतं. दृश्यकलांविषयी आस्था असणार्यांसाठी पहिले काही अंक संग्राह्य होते, पण 'नग्नता' अंकाबाबत म्हणायचं तर प्रसिद्धी जास्त पण वाचनीय मजकूर थोडा असावा असं वाटलं.
टीपः मी अंक अजून वाचलेला नाही, कारण अनुक्रमणिका पाहता वाचायच्या राहिलेल्या इतर अनेक रोचक गोष्टी बाजूला ठेवून आवर्जून वाचावासा वाटला नाही. त्यामुळे थोडा संशयाचा फायदा देईनही कदाचित, पण एकुणात मला त्या अंकाविषयी फार उत्सुकता वाटली नाही हे खरं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शक्य आहे
कदाचित ललित लेखनाचा आस्वाद हा मुद्दा बरोबर असेल पण आता या निमित्त्याने एक मनात आले
साधारणपणे आपण सर्व जालावर किमान गेली ५ वर्षे मराठी वाचतो आहोत. जालावरचे दर्जेदार माहितीवजा/ नॉन फिक्शन लिहिणारे लेखक / लेखिका कोण आहेत? त्यांच्या लेखनातले वैशिष्ट्य काय आहे? या लेखनातले मला फार कळत नाही, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा ते सुद्धा महिती नाही . यावर चर्चा करता येईल का?
एका शब्दपेक्षा दोन बरे.
>>मराठी वाचकांची बदलती
>>मराठी वाचकांची बदलती अभिरुची
स्वारी बॉस.. माझा ऑनलाईन विक्रीचा अनुभव ( पुर्ण एक वर्ष) सांगतो आहे की नाही.
अजून ही नवीन लेखकांची पुस्तके विकली जात नाही आहेत.
नावजलेली, माहिती असलेल्या लेखकांची अथवा फार फार तर कोणी चांगले आहे असे सांगितले म्हणून एखादं नवीन लेखकाचे पुस्तक घेण्याकडे "ऑनलाईन खरेदी" वाल्या वाचकांचा कल असतो हे दिसून आले आहे.
बाकी चर्चा छान चालू आहे. भर घालेन लवकरच.
*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)
चिनी काय वाचतात?
ह्या विषयावरील एका रोचक लेखाचा सारांश येथे वाचता येईल. ज्या वर्गात अजून वाचनसंस्कृती खोलवर रुजलेली नाही, तिथे उपयुक्तता आणि रंजन हा निकष महत्त्वाचा ठरतो ह्या परिचित निष्कर्षाला बळकटी देणारा अजून एक विदाबिंदू
लोकवाङ्मय गृह
"लोकवाङ्मय गृह" या आघाडीच्या प्रकाशन संस्थेने आपलं संस्थळ स्थापन केलेलं आहे असं नुकतंच कळलं, त्यावर अलिकडे प्रसिद्ध झालेल्या काही अंकांच्या प्रतीही आहेत. त्यांच्या संस्थळाची लिंक :
http://lokvangmaygriha.com/index.html
विविध विभागातल्या पुस्तकांच्या यादीतून लोकवाङ्मय गृह करीत असलेल्या दर्जेदार कामाची कल्पना येईल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अच्युत गोडबोले यांचे नवे पुस्तक
आजच वाचलेल्या या लेखातून अच्युत गोडबोले यांनी मानसिक स्वास्थ्य, मनोविकार यांचा मागोवा घेणारं पुस्तक लिहिल्याचं कळलं.
दुवा : http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.