झूरिकमध्ये "काकस्पर्श"
काकस्पर्श या मराठी सिनेमाचा एक खेळ झूरिकच्या राईटबर्ग म्युझिअममध्ये ( तेच सध्या मुखपृष्ठावर असलेले) झाला. यासाठी उपस्थित राहण्याची संधी मला लाभली.या प्रसंगी सिनेमातील प्रमुख अभिनेते सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते.हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी सिलेक्ट झालेला असून पुढल्या आठवड्यात बर्लिनला दाखवला जाणार आहे. चित्रपटानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्यावेळची काही छायाचित्रे....
चित्रपटाला अर्थातच इन्ग्रजी सबटायटल्स होती. सुमारे एकशेवीसाचा प्रेक्षकवर्ग होता ( काही बासेल आणि बर्नहून आलेले होते) आणि त्यात मराठीव्यतिरिक्त बरेच अमराठी भारतीय आणि पाच सात गोरी मंडळी ( बहुतेक स्विस आणि ब्रिटिश ) होती...खेळ चांगला झाला आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरेही रोचक आणि रंजक होती...गोर्या मंड्ळींसाठी " काकस्पर्श म्हणजे काय" हे इंग्रजीत सांगतानाची दिग्दर्शकांची शाब्दिक कसरत," ऑफरिंग राईसबॉल्स टू क्रोज.. व्हेन द क्रो टचेस द राईसबॉल, द सोल इज कन्सिडर्ड लिबरेटेड" वगैरे वगैरे भलतेच मजेदार होते...
मी हा सिनेमा इथे प्रथमच पाहिला. त्यावरची जालावरची परीक्षणे मात्र वाचलेली होती. सिनेमा पाहून आल्यानंतर रमताराम यांचे हे http://www.misalpav.com/node/21713 परीक्षण पुन्हा वाचले. त्यातल्या जवळजवळ सर्व मुद्द्यांशी सहमत आहे.सिनेमातल्या काही गोष्टी अगदी बेतलेल्या वाटल्या तरी मला सिनेमा आवडला. ( मला आवडणार नाही असे वाटले होते आधी) ..
नाट्यलेखनाच्या एका कार्यशाळेमध्ये एका शिक्षकांकडून ऐकले होते की कलाकृतीकडे तिच्या काळाच्या चष्म्यातून पहावे लागते.... ( म्हणजे कथेतला काळ आणि कथा लिहिला गेलेला काळही) .... हा सिनेमा पहायचा म्हणजे हे आधी मान्य करून घ्यावे लागते की असा एक काळ होता की बहुसंख्य लोक असे मानत असत की "स्त्री ही एक वस्तू आहे आणि तिचे कोणीतरी कोणापासूनतरी सतत रक्षण करायचे असते.. मग कोणीतरी कोणालातरी शब्द देते की अमुक स्त्रीला म्हणे तमुक पुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही.... हे मान्यच न करता सिनेमा पाहत येणे शक्य नाही... "अरे भाऊ , तू कोण हे ठरवणारा ? मग तिच्या इच्छेचे काय ? तुला नसेल लग्न करायचे तर नको करूस पण तिचे लग्न लावून दे ना मग " वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित करणे टोटल निरर्थक..... ते असो...
मूळ कथा उषा दातार यांची आहे. छोटीशी अकरा पानी कथा आहे, त्याचा विस्तार आणि पटकथा संवाद गिरीश जोशी यांचे...
गिरीशच्या लेखनाचा मी मोठा पंखा आहे. त्याच्या दोन लेखनकार्यशाळांना मी विद्यार्थी म्हणून उपस्थित राहिलेलो आहे... मी लिहिलेल्या काही दीर्घांकात कसे बदल करावेत वगैरे यासाठी त्याचे सल्ले घेतलेले आहेत वगैरे वगैरे... शेवटच्या दहा मिनिटांपर्यंत मला या सिनेमाची गोष्ट आवडलीच पण. काही प्रश्न जरूर निर्माण झाले... विशेषतः शेवटी शेवटी....
संपूर्ण सिनेमाभर हरीदादाचे पात्र जे उभे केले आहे, (जे सुधारणावादी आहे आणि त्याचा विधवांच्या केशवपनाला तात्विक विरोध आहे असे वाट्त राहते) ते शेवटच्या दहा मिन्टात टोटल उलटेपालटे केले आहे, ते मला अजिबात आवडले नाही, पटले नाही... म्हणजे जो माणूस आम्हाला सिनेमाभर पुरोगामी विचारांचा सुधारणावादी वाटत राहिला, जो सार्या गावाचा रोष पत्करून आपल्या वहिनीचे रक्षण करत राहिला, तो शेवटी मान्य करतो की मी सुधारणावादी नाही आणि फक्त भावाच्या आत्म्याला दिलेला शब्द ( वहिनीला परपुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही) पाळण्याच्या हट्टापायी हे केले.. आणि अर्थात म्हणजे श्योविनिजमने भरलेल्या सर्व पात्रांमध्ये हा एकच वेगळा माणूस ( म्हणूनच तो आपल्या कथेचा हीरो) असे जे आपण मान्य केले आहे ते सारे संपले... याचेही पाय मातीचेच... हा तर त्या वहिनीचा अधिक गुन्हेगार ... म्हणजे हाच कथेचा मुख्य व्हिलनही.. पुढे त्याने ( कितीही विधवांना मदत करून प्रायश्चित्त घेतले तरी ते सारे फिल्मी आणि खोटारडे, अति बेतलेले वाटले).... ही मला प्रेक्षकाची शुद्ध फसवणूक वाटली... ( पण एकूण दिग्दर्शकांनाही " हा टिपिकल हीरो नसून थोडासा हेकेखोर ऍन्टीहीरो आहे, हे मान्य दिसले... अशा स्वरूपाचे शब्द पुढे प्रश्नोत्तरांत त्यांनी वापरले..) मान्य आहे की कथानकात ट्विस्ट वगैरे असतात, पण ते रसपरिपोष वगैरेकरणारे असावेत.. असा रसभंग फार त्रासदायक असतो...
शिवाय शेवटी हरीदादा आपल्या मित्राला सांगतो की माझा शब्द खोटा पडू नये म्हणून ती स्वत: लवकर मेली ... हा म्हणजे आड्यन्सला रडवायचा मेलोड्रामा वाटला... उगीच काहीतरी अति...असो... या शेवटाबद्दल उपस्थित प्रेक्षकवर्गातल्या एका स्त्रीने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि " आयुष्यभर दु:ख भोगलेल्या स्त्रीला तुम्ही शेवटच्या क्षणीही काही सुख लाभू देत नाही आणि तिला मारून टाकता आणि सॅड शेवट करता" असे सुनावले त्यावर दिग्दर्शकांनी प्रश्नोत्तरात हे सांगितले की "त्याचा शब्द खोटा पडू नये म्हणून तिचे मरणे " हेच त्यांना सर्वात जास्त आवडले , म्हणून तर त्यांनी थोडाही बदल न करता गिरीश जोशीची पटकथा जशीच्या तशी वापरली...
सिनेमात एकच गाणे आहे, गाणे ऐकायला छान आहे... ( संगीत : राहुल रानडे) ... पण मला काही ते गाणे बघवेना... मी सिनेमा सोडून एका निराळ्या कारणासाठी अस्वस्थ होत राहिलो...नुकत्याच वयात आलेल्या स्त्रीला मखरात बसवणे आणि हे प्रकरण एकूणच साजरे करणे , हे मला अप्रशस्त आणि एम्बरॆसिंग वाटते ... इतकी वैयक्तिक वाटणारी आणि चर्चा करण्यास असभ्य वाटेल अशी ही गोष्ट...अशा गोष्टीचे समारंभ असत पूर्वी !!! आणि त्यावर गाणी ??? " का सखे तुजला, नाहणे आले?" यावर त्या सखीने काय उत्तर देणे अपेक्षित आहे?... हे म्हणजे प्रजोत्पादनाला लायक झालेल्या एखाद्या मुलग्याला / पुरुषाला फ़ेटाबिटा बांधून घोड्यावर बसवून " का बुवा तुजला , असे कसे झाले?" अशी छान सुरांत गाणी म्हणत मिरवणूक काढण्यासारखे झाले. बरं उत्सवमूर्तीनेही " मला जे झाले ते अत्यंत नैसर्गिक आणि वैयक्तिक असून हे बहुसंख्य जनतेला होतच असते सबब सर्व जनतेने भोवती टिपर्या वाजवत फेर धरून नाचू नये ही विनंती" असे न म्हणता विक्टोरिया क्रॉस मिळवल्याच्या थाटात कौतुक वगैरे करून घ्यायचे ... का ???.. ( असो, काळाचा चष्मा लावून हे ही सहन केले ..)
मला जाम उत्सुकता होती की गोर्या लोकांना हा सिनेमा कसा वाटतोय... आलेली गोरी मंडळी माझ्या ओळखीची नसल्याने त्यांना सिनेमा नक्की कसा वाटला हे समजण्यास मार्ग नाही.. त्यांच्यातला एक जण दिग्दर्शकांना म्हणाला, " It was unlike a typical bollywood movie and I liked it. Especially the songs " .. त्यांना नक्की कितपत कळाला ही शंकाच आहे.... काकस्पर्श ही संकल्पना नुसत्या सबटायटल्समधून कशी कळणार हा एक प्रश्न, बालविवाह व विधवांचे केशवपन ही रूढी त्यांनी कशी समजावून घ्यावी हा पुढचा प्रश्न...
सिनेमाला आलेले एक ज्येष्ठ गृहस्थ इतरांशी चर्चा करताना म्हणत होते, " आधीच गोर्या मंडळींचे भारताविषयी गैरसमज... त्यात हे असले सिनेमे पाहून त्यांचे मत काय होईल, कल्पना करवत नाही..." समजा झैरे किंवा बुरुंडी देशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या ( आता अत्यंत भंपक वाटणार्या) काही रूढींवर आधारित एखादा चांगला बनवलेला आताचा सिनेमा पाहून मी आताच्या झैरे किंवा बुरुंडी देशाविषयी गैरसमज करून घेईन काय ? माझे उत्तर "कदाचित हो" असे आले.... मग बर्लिनमध्ये हा सिनेमा दाखवून आपली बदनामी होतेय की नाही, या प्रश्नाचे उत्तरही "कदाचित हो" असे आले बुवा...
असो...
या सिनेमाच्या निमित्ताने अनेक महिन्यांनी जालावर काही लिहिले आहे. लेखनसंन्यास तुटणे ही एक आनंदाची गोष्ट आहे...
प्रतिक्रिया
काकस्पर्श
लेख आवडला. काकस्पर्शचे प्रदर्शन महिन्याभरापूर्वी सिंगापुरातही झाले. काळाचा चष्मा लावून चित्रपट बघणेबल आहे याच्याशी सहमत. पण असा चष्मा लावावा का? आणि का लावावा? हे प्रश्न उरतातच.
एकूणच चित्रपट पाहून झाल्यावर काहीतरी संदर्भहीन पाहिल्यासारखे वाटले आणि चित्रपटगृहाच्या बाहेर यायच्याआधीच बराचसा चित्रपट विस्मरणात गेला.
सिंगापुरात चित्रपट पाहायला मराठ्येतर मंडळी फिरकली नाहीत आणि ते एकादृष्टीने बरेच झाले.
या सिनेमाच्या निमित्ताने अनेक
याच्याशी सहमत! आता लिहित रहाच!
बाकी चित्रपट पाहिला नसल्याने त्याबद्दल मत इल्ले!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेखनसंन्यासातून बाहेर
लेखनसंन्यासातून बाहेर आल्याबद्दल अभिनंदन. खरेच आनंदाचीच गोष्ट!
सिनेमाबद्दल:
लिहिलेत ते सगळे पटले. अगदी काळाच्या चष्म्यातून वगैरे गोष्टीला न्याय देऊ पाहिला, तरी शेवट मेजर गंडलेला आहे. त्या शेवटामुळे झालेल्या चिडचिडीवर अगदी नेमके बोट ठेवलेत.
बदनामीबद्दलः
मग आपल्या भूतकाळातल्या गोष्टींबद्दल बोलायचेच नाही? प्रत्येक लेखकाचा स्वत:चा असा काळ असतो, मग तो अठराव्या शतकातला असो की एकविसाव्या - त्याला जो आपला वाटेल तोच त्याचा काळ, असे मागे कुठेसे वाचले होते, पटलेही होते. त्याला अनुसरून - जर मला त्याच काळातली गोष्ट सांगायची असेल, तर रूढी - मग त्या चांगल्या असोत वा लाजिरवाण्या - वगळून / लपवून कशी सांगायची गोष्ट? नि का? की गोष्ट सांगावी, पण परदेशात जाऊन सांगू नये, असे तुमचे मत? पण समाज म्हणून एकमेकांच्या चुका-अभिमानास्पद गोष्टी-रिती-परंपरा इत्यादींबद्दल प्रांजळपणे देवाणघेवाण न करता काही लपवायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रयोजनच काय उरले? (अवांतरः एवढा काथ्याकूट करावा इतका 'काकस्पर्श' महत्त्वाचा तरी आहे का?! असो.)
अतिअवांतरः
मी माझ्या दोन मित्रांसोबत हा सिनेमा पाहिला. 'ते' गाणे सुरू झाल्यावर दोघांनीही मला दोन्ही बाजूंनी कोपरे ढोसायला सुरुवात केली.
एकाचा प्रश्न: ती बाथरूममधून ओरडली कशाला? पडली होती का ती आत? नि मग आता गाणे कशाला?
दुसर्याचा प्रश्नः आं? हे काय मधेच? डोहाळजेवण तर असू नाही शकत. हीरो अजून मुंबईत आहे. शिवाय ती लहान आहे यार. हे सगळे एवढे खूश होऊन गातायत कशाला?
पुढचा सिनेमा पाहता यावा म्हणून मी लाजलज्जा सोडून 'नहाण आलं तिला, ओके? आता गप्प बसा'वर वेळ भागवली.
त्यावर अनुक्रमे 'ओह, कूल मॅन. इट्स ओके.' आणि 'मग इतकं खूश काय व्हायचं त्यात? मंद.'
कुतुहल अलाहिदा. पण आम्हांला कुणालाच यात काही भयानक अप्रशस्त आणि एम्बरॅसिंग वाटलं नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आणि 'मग इतकं खूश काय व्हायचं त्यात? मंद.'
आणि 'मग इतकं खूश काय व्हायचं त्यात? मंद.
लै भारी.
म्हणजे उद्या सुगीची गाणी वगैरे, शेत उभं राहिल्यावर कॄषीकर्मींचा जो उत्सव जल्लोष वगैरे असतो तो दिसल्यावर so what? crops mature each year!
असं कुणी म्हट्लं तरी च्यालेंज करता येणार नाही. खरं तर तेही दरवर्षीच होतं. सगळ्याच शेतात पीक येतं. उगीच ते पाहून बागडायची काय गरज.
ह्यावर काहीही उत्तर नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
म्हणजे उद्या सुगीची गाणी
डोहाळजेवण किंवा घरात मूल जन्माला आल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात काय हशील असा प्रश्न नसून जमीन किंवा बियाणं विकत घेतल्यानंतर समारंभ कशाला अशा प्रकारचा हा प्रश्न आहे.
विशेषतः ज्या समाजात मुलगी जन्माला घालायची नाही किंवा जन्माला आलीच तर तिला जन्मत: मारायची, तसं न केल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करायचं, बिनलग्नाची मुलगी किंवा विधवा स्त्री आई बनली तर त्या स्त्रीचं आणि तिच्या बाळाचं जिणं मुश्कील करायचं अशा पद्धती, समजुती असताना दुसर्या बाजूला नहाण येण्याचा सोहोळा करणं फारच विचित्र वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
<<ज्या समाजात मुलगी जन्माला
<<ज्या समाजात मुलगी जन्माला घालायची नाही किंवा जन्माला आलीच तर तिला जन्मत: मारायची, तसं न केल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करायचं, बिनलग्नाची मुलगी किंवा विधवा स्त्री आई बनली तर त्या स्त्रीचं आणि तिच्या बाळाचं जिणं मुश्कील करायचं अशा पद्धती, समजुती असताना दुसर्या बाजूला नहाण येण्याचा सोहोळा करणं फारच विचित्र वाटतं.
अगदी १००% अनुमोदन.
http://shilpasview.blogspot.com
कदाचित अयोग्य
ह्या प्रथा अलिकडच्या काळात कदाचित अयोग्य असतिल हि....
पण ज्या अर्थी त्या पुर्वज्यांनी चालू केल्या त्यला काहितरि अर्थ असेलच (मि असे म्हनत नाहि कि.. ज्या सर्व गोश्टि पुर्वज करत होते ते योग्यच आहेत)
पण समजा "नहाण येणे" हि गोष्ट नैसर्गिक द्रुष्ट्या त्या तरुण मुलिला "विचित्र आणि वाईट" वाटु शकते... त्या वाटू नयेत...म्हणुन तर हा सोहळा नसेल ना ? जेणेकरुन त्या मुलिला कळावे कि हि गोष्ट केवळ चांगलीच नाहि तर ति नैसर्गिक अन सर्व-सामान्य आहे... (असा माझा एक अंदाज,, कारणे निराळि असु शकतात.. पण त्या गोष्टि का सुरु झाल्या असाव्यात ह्या मागिल कारणांचा विचार न-करता केवळ आजच्या काळात आयोग्य म्हनून चुकच ठरवने हे अयोग्य आहे )
शक्य आहे.
मुलगी ही जबाबदारी आहे, परक्याचं धन आहे, लवकरात लवकर उजवून जबाबदारीतून मोकळं व्हावं असे विचार लोक करायचे, "मुलगी (वस्तू दिल्यासारखी) अमक्या गावाला किंवा अमक्या घरात दिली" अशी भाषा सर्रास वापरणारे लोकं मुलींच्या मानसिकतेचा एवढा विचार करत नसतीलच असं नाही, पण फार विचित्र किंवा विस्मयकारक वाटतं. साधारण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची ही पद्धत समाजातून नाहीशी कशी झाली हे पुढचं आश्चर्य. तेवढंच नाही तर अजूनही काही घरांमधे पाळीच्या काळात मुलीला/स्त्रीला (अगदी बहिष्कृत केल्यासारखं) बाजूला बसवतात. हे बाजूला बसवणंही पारंपरिकच आहे असं मानलं तर अशा एका समारंभाचा कितपत (पॉझिटीव्ह) फरक पडत असेल हा एक प्रश्नही आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेमका मुद्दा!
नेमका मुद्दा!
"अजूनही"बद्दल कल्पना नाही, परंतु एके काळी - अगदी आमच्या मातु:श्रींच्या पिढीपर्यंत - ही गोष्ट सर्रास असे.
एकीकडे "नहाण येणे" ही गोष्ट "नैसर्गिक दृष्ट्या" त्या तरुण मुलीला "विचित्र आणि वाईट" वाटू नये, या नावाखाली सोहळा करायचा - सोहळा कराणारास काय, सोहळा करण्याचा बहाना चाहिए; तसा आपला समाज उत्सवप्रियच - आणि मग उर्वरित आयुष्यभर "काकस्पर्श झाला" - पक्षी "कावळा शिवला" - की त्याच मुलीला/स्त्रीला, जणू काही ही "विचित्र आणि वाईट" गोष्ट आहे अशा थाटात बाजूस* बसवायचे, तिने मग कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घ्यावयाचा नाही, की स्वयंपाकाच्या** भांड्यास, सामग्रीस अथवा साहित्यास तिने स्पर्श करावयाचा नाही - आणि अशा प्रकारे उर्वरित आयुष्यभर 'ही काहीतरी "विचित्र आणि वाईट" गोष्ट आहे - तुझ्या पहिल्या काकस्पर्शाचे वेळी आम्ही काय म्हणालो ते नेव्हर माइंड!' हे तिच्या मनावर बिंबवत राहायचे - सगळी गंमतच आहे.
तळटीपा:
* 'न'व्या नव्हे.
** गुर्जी-ष्टाईल नव्हे. तसला "स्वयंपाक" हा त्या परिस्थितीत बहुधा अशक्य नसला तरी कदाचित स्पृहणीय नसावा.
आणखी एक शक्यता
त्या काळी समाजात स्त्रिला असलेलं स्थान बघता या समारंभाचा हेतू तिला शरिरातले बदल सकारात्मकपणे घेण्याकरता असावा असं वाटत नाही. तेव्हा स्त्रीचं जग चूल आणि मूल एवढंच होतं. समाजाची तिच्याकडून अपेक्षाही तेवढीच; स्वयंपाक घर सांभाळ आणि मुलं जन्माला घाल (घराला वारस दे). स्त्रिची प्रजनन क्षमता हाच तिचा प्लस पॉईंट होता. आजही येता-जाता सवाष्णिंची ओटी भरून आपण याच समजूतीला पाळतो. मूलबाळ नसलेल्या स्त्रिला घरून आणि समाजाकडून होणारा त्रास आपण ऐकून-बघून आहोतच.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही मुलीला नहाण आलं म्हणजीच ती मुलं जन्माला घालायला सक्षम आहे आणि ती लवकरच जन्मालाही घालेल हे कळल्यावर हे समारंभ म्हणजे त्या आनंदाचा हा सोहळा असावा असं जास्त वाटतं. नाहीतर मुलीला या बदलांमुळे काय वाटतंय याची कोणाला फार काळजी पडली असेल असं वाटत नाही. आता-आतापर्यंत माझ्या बर्याच मैत्रिणींना त्या दिवसात घरात अस्पृष्यासारखं वागतांना पाहिलंय.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
बदनामीबद्दल
" जर मला त्याच काळातली गोष्ट सांगायची असेल, तर रूढी - मग त्या चांगल्या असोत वा लाजिरवाण्या - वगळून / लपवून कशी सांगायची गोष्ट? "
गोष्ट लपवून सांगणे शक्य नाही, तसे करू नये हे माझे मत... यावर लेखातच अधिक स्पष्टीकरण द्यायला हवे होते... माझा प्रॉब्लेम गोष्ट सांगायला नाही तर एखाद्या लाजिरवाण्या रूढीचे उदात्तीकरण होते आहे, असा संदेश त्यातून जात असेल तर हे आंतरराष्ट्रीय समूहापुढे मला लाजिरवाणे वाटायला लावणारे आहे , असा आहे.... कथेचा नायक हा प्रतिगामी आहे, संपूर्ण कथाभर त्यातल्या स्त्रीवर तो अन्याय करतो ,वर तोंड वर करून शेवटी मित्राला सांगतो की मी सुधारक नाही,, ही त्याची बेगडी सुधारकवृत्ती सर्वांत त्रासदायक होते, हे आधी लिहिलेच आहे... आता या विचित्र गोष्टीला आगळीवेगळी प्रेमकथा म्हणवत नाही...
पण समाज म्हणून एकमेकांच्या चुका-अभिमानास्पद गोष्टी-रिती-परंपरा इत्यादींबद्दल प्रांजळपणे देवाणघेवाण न करता काही लपवायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रयोजनच काय उरले?
देवाणघेवाण करावी पण या सिनेमातून ही प्रांजळ देवाणघेवाण होत नाही असे माझे मत...
. मेलेल्या माणसाला दिलेला तथाकथित शब्द पाळण्याच्या आचरट अट्टाहासापायी एका स्त्रीला आयुष्यभर कोंडून घालणार्या प्रतिगामी माणसाचे उदात्तीकरण्च हे... शेवटी कितीही ऊर बडवत समाजसेवा केली तरी प्रतिगामी तो प्रतिगामीच...
उद्या अफगाणिस्तानातल्या कोणत्यातरी श्योविनिस्ट चालीरीतीबद्दलचा असला सिनेमा मी आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पाहिला, आणि त्यात रूढींचे उदात्तीकरण वाटले तरी मी " यातून अफगाणिस्तानाची बदनामी होते" हेच म्हणेन... प्रत्येकाला आवडेल तो सिनेमा बनवायच हक्क आहे, तो आंतरराष्ट्रीय महोत्सवत दाखवायचा हक्क आहे आणि मलाही "या सिनेमाने माझ्या देशाची बदनामी होते" असे माझे मत व्यक्त करायचा हक्क आहे; इतकेच म्हणतो
लेख आवडला
लेख खूपच आवडला. माझे या चित्रपटावरचे मत तुमच्या या प्रतिसादात आहे. लिहायचे कष्ट वाचविल्याबद्दल धन्यवाद.
अर्थात हक्क आहेच हो. गोष्टीला
अर्थात हक्क आहेच हो.
गोष्टीला विरोध नाही, उदात्तीकरणाला विरोध आहे... असे म्हणताय, मग मान्य आहे.
पण हल्ली लोक कशावरही चिडतात. गरिबी दाखवली म्हणून चिडतात, विधवांचा छळ दाखवला म्हणून चिडतात.... आता आहे / होते ते दाखवले, तर त्यात चिडायचे काय? तसे काहीतरी तुम्ही म्हणत आहात, असा गैरसमज झाला होता, इतकेच.
बाकी, प्रेम भावजयीवर की मेलेल्या भावावर?
ही कसली प्रेमकथा? ही तर राखणकथा.
अवांतरः मास्तर, 'बदाम राणी गुलाम चोर'वर कायतरी लिहा ना. बरे-वाईट कसेही. फायनली मज्जाच येईल.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
काळाचा चष्मा
काळा चष्मा ठाऊक होता, आता हा काळाचा चष्मा शोधणे आले. असले चष्मे घातल्याने मुळातली काकदृष्टी सरळ होते का हे पाहिले पाहिजे, नाहीतर कुणीतरी जिवाजीराव शिंद्यांसारखे 'असतो एकेकाचा दृष्टीदोष!' असे म्हणायचे. पण एकूण लेख वाचून कुणीतरी डोळ्यांत अंजन घालावे तसे झाले. तरीही डोळ्यांवर झापड ओढून बसणे योग्य न वाटल्याने म्हणून डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच लिहिलेला हा प्रतिसाद. पण 'काकस्पर्श' बघून असले विस्फारलेले डोळे आणि आमचे पांढरे झालेले डोळे हे बघूनही डोळे उघडावे अशी नजर आमच्याकडे नाही. पण आपण एकूणच कालबाह्य होत चाललो आहोत हे नव्याने डोळ्यांसमोर आल्याने क्षणभर डोळ्यांसमोर अंधारल्यासारखे झाले. आपल्या डोळ्यांदेखत असले काही बघायला लागण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे, असेही वाटून गेले...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
लक्ष ठेवून आहे...बघावा लागेल...
लक्ष ठेवून आहे...बघावा लागेल...
चित्रपट नाही हो. तुमचा पुढला लेख कधी रिलिज होतोय त्याबद्दल म्हणतोय.
पुन्हा लिहिते झालेले पाहून खूपच बरं वाटलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भारताविषयी गैरसमज
काकस्पर्श मी अजून पाहिलेला नाही त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही पण शेवटच्या परिच्छेदात जो भारताबद्दलच्या गैरसमजाचा मुद्दा आहे तो मला योग्य वाटतो. बहुतेक वेळा परदेशात जेव्हा भूतकाळातल्या प्रथांवर आधारित चित्रपट किंवा पुस्तकं येतात तेव्हा तिकडचे लोक सध्याच्या भारताबद्दल तसंच मत बनबतात.
कदाचित अवांतर होईल, पण माझा एक अनुभव सांगते. इथे पॅरिसमधे माझ्या ऑफिसमधे एक ब्रिटिश बाई आहे. तिला भारताबद्दल थोडीफार माहिती आहे, भारतात फिरूनही आली आहे. एकदा असंच गप्पा मारतांना घटस्पोटाचा विषय निघाला. ही मला म्हणाली की जर तुझा घटस्पोट झाला किंवा कोणत्याही कारणाने तू एकटी राहिलीस तर तुला बनारसला जावं लागेल! हे ऐकून मी इतकी चाट पडले की मला थोडा वेळ काय बोलावं सुचेना. शेवटी तिला एवढंच बोलले की आजही असंच असतं तर बनारस एक शहर न राहता एक मोठं आणि फक्त एकट्या असणार्या (नवर्याने सोडलेल्या आणि विधवा) स्त्रियांचं राज्यच झालं असतं.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
. बहुतेक वेळा परदेशात जेव्हा
. बहुतेक वेळा परदेशात जेव्हा भूतकाळातल्या प्रथांवर आधारित चित्रपट किंवा पुस्तकं येतात तेव्हा तिकडचे लोक सध्याच्या भारताबद्दल तसंच मत बनबतात.
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद....
आणि बर्लिनवासी भारतीयांनो, सावधान काकस्पर्श येत आहे...
हा त्या बाईचा मूर्खपणा आहे.
हा त्या बाईचा मूर्खपणा आहे. असे भारताबद्दल टोकाच्या कल्पना असलेले लोक हिरव्या देशात पण भेटले आहेत. त्याला काय करणार? म्हणून आपण सिनेमे नाही काढायचे ? आणि त्या सिनेमात तत्कालीन प्रथा नाही दाखवायच्या ?
ब्रेव्हहार्ट मध्ये नववधूने पहिली रात्र त्या भागाच्या जमीनदाराबरोबर(किंवा तत्सम कुठले तरी पद) व्यतीत करायची प्रथा दाखवली आहे. म्हणून मी आजही स्कॉटलंडमध्ये तसे होते असे गृहीत धरले तर मेल गिब्सन ची चूक की माझी?
लेख आवडला.
पण या परीक्षणामधून चित्रपटात 'एक विलक्षण प्रेमकहाणी' कुठे आहे ते काही कळले नाही. (पोस्टरवर तसे वाचले होते.)
झ्युरिकमध्ये 'काकस्पर्श' दाखवला गेला याचा अभिमान वाटला. बर्लिनच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे याचाही आनंद वाटला.नव्या मराठी चित्रपटसृष्टीच्या बिनीच्या शिलेदारांचे अभिनंदन...या चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' 'लाँच झाला' आणि 'कॉफी टेबल बूक' चे प्रकाशन झाले त्याची बातमी 'दिव्य मराठी'वर वाचली तेव्हाच हा चित्रपट 'बियाँड अटक फ्लॅग्ज प्लँट' करणार याची खात्री होती.आता 'प्रेसिडेंट अवॉर्ड' कधी मिळेल याची वाट पहात आहे..
'एक विलक्षण प्रेमकहाणी' कुठे
'एक विलक्षण प्रेमकहाणी' कुठे आहे
वरती मेघना म्हणते तशी ही एक राखणकथा आहे, ( असे मलाही वाटले)...गोष्टीतली उमा कदाचित त्याच्या प्रेमात असावी असे समजायला वाव आहे... मात्र हरी तिच्या प्रेमात आहे की नाही हे नक्की समजत नाही...
मी चित्रपट पाहिला तेव्हा प्रश्नोत्तरादरम्यान एका प्रेक्षकाने हाच नेमका प्रश्न विचारला की " कोणत्या क्षणी हरी तिच्या प्रेमात पडला? "
यावर उत्तर असे मिळाले, " तो सुरुवातीपासून अजिबात तिच्या प्रेमात नव्हता. हे काही "पडलेले पुस्तक उचलताना दोघांची नजरानजर झाली आणि प्रेम झाले" अशा पद्धतीचे प्रेम नाही, तर ते सावकाश निर्माण झालेले वेगळे प्रेम आहे" वगैरे.. यावर सारे प्रेक्षक मोठ्याने हसले आणि प्रश्न विचारणारा नामोहरम झाला..... परंतु कदाचित प्रश्न विचारणार्याचा मूळ प्रश्न जो असा असावा, ---- हरी शेवटापर्यन्त उमेच्या प्रेमातच नव्हता का ? आणि शेवटी तो तिच्याशी लग्न करण्यास मान्यता देतो तेही " आता ही मरतेच आहे, तर हिचे प्राणरक्षण करण्याच्या भावनेतून?----- या प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहून गेले....
काकस्पर्श
पुन्हा एकदा काकस्पर्श! एकूणात जालावर या चित्रपटाविषयी काय चर्चा चालली आहे हे मला तरी कळेनासेच झालेय. आता चित्रपट पाहावा लागेल की काय...
हिड्ड्न अज्येन्डा
हाच तो आमचा गुप्त हेतू बरं...
एकच मुद्दा
(जे सुधारणावादी आहे आणि त्याचा विधवांच्या केशवपनाला तात्विक विरोध आहे असे वाट्त राहते)
साफ चुकीचे मत आहे 'असे आमचे मत आहे.' (तुमचे मत वेगळे असेल हे ठाऊक आहेच.) आमच्या मते तो रिलक्टंट सुधारणावादी म्हणजे हेतु नसताना सुधारणावादी समजली जाणारी वर्तणूक असणारा आहे. कसे ते आम्ही आमच्या या चित्रपटावरील लेखात म्हटले आहे. तो लेख इथे. (अव्हेरः सदर दुवा अन्य संस्थळावर जातो. हे धोरण सुसंगत नसल्यास काढून टाकावा).
तो झुरिक चित्रपट महोत्सवात दाखवावा का याबद्दल आम्ही काही मतप्रदर्शन करू इच्छित नाही. एक मात्र नक्की की इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच(!), इराणी, पोर्तुगीज, मंगोलियन, लात्वियन, जर्मन.... इ.इ. अनेक देशातील चित्रपट आम्ही पुण्यातल्या चित्रपट महोत्सवातून पाहतो. त्यातले बरेचसे त्यांच्या संस्कृतीशी निगडित असतातही. संध्याकाळी मॉलमधे पहिली भेट नि रात्री बेडमधे दुसरी अशा अमेरिकन संस्कृतीचे चित्रपटही आम्ही (चवीने) पाहतो. आमचे तरी काही बिघडत नाही. त्या निमित्ताने त्या संस्कृतीबाबत आमच्या मनात चार प्रश्न निर्माण होतात नि ज्याची उत्तरे आम्ही - बहुधा - गुगल बाबाच्या मदतीने शोधू पाहतो. अशा देवाणघेवाणीचा आम्हाला एवढाच फायदा होतो. (आणि असे सांस्कृतिक आदानप्रदान हाच त्या चित्रपट महोत्सवाच्या उद्देश असतो वगैरे बाष्कळ थियर्या आम्ही ऐकल्यात. किती मूर्खपणा नै? ) अर्थात हे आमच्यासारख्या लहानसहान व्यक्तींबाबत म्हणातोय मी. पहिल्या दहा मिनिटात चित्रपट भिकार आहे हे सांगू शकण्याइतके तज्ञ आम्ही नाही तेव्हा उगाच अगोचरपणा कशाला करू. इत्यलम.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
मास्तर, पुन्हा लिहीते झालात
मास्तर, पुन्हा लिहीते झालात हे पाहून आनंद झाला.
हा चित्रपट पाहिलेला नाही. पण अशा प्रकारचे चित्रपट पाहून अनेकांचे भारताबद्दल गैरसमज होतात याचा अनुभव मलाही, अगदी स्मिताला आहे तसा टोकाचा नसला तरी, आहे. पण गैरसमजच करून घ्यायचे असतील तर आपण काय करू शकतो? हॉलिवूडपट पाहून अमेरिका सर्व जगाची तारणहार आहे असा गैरसमज होऊ शकतो; पण म्हणून काय आपण बातम्या पहाणं आणि लोकांच्या देशात जाऊन युद्ध करणार्यांचा विरोध करणारं लेखन वाचणं सोडून देतो का?
लोकं उठसूट गळे काढतात ते पटत नाही तसंच गतकाळच्या रूढींचं निष्कारण उदात्तीकरणही न पटण्यातलंच. अशा प्रकारचा चित्रपट आजच्या काळात काढण्याचं (पैसे मिळवायचे आहेत हे वगळता) कारण काय? एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या, गुवाहाटीच्या प्रसंगानंतर विनयभंग, बलात्कार यांच्या विरोधात समाजात उघड चर्चा होते आहे, तिथे ब्राह्मण घरांतल्या विधवांवर एकेकाळी होणारे अन्याय या विषयाचं महत्त्व काय?
-----
'ऐसी अक्षरे'वर अगदी सुरूवातीला इथे नहाण येण्यावर चर्चा झाली होती. तिथे लिहील्याप्रमाणे:
हा असा सोहळा माझ्या बाबतीत झालेला मला आवडला असता का? नाही. कारण एखाद्या वेगळ्या गोष्टीचा सोहळा होणं ठीक वाटतं. जी गोष्ट जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या बाबतीत होते त्याचा कसला सोहळा करायचा? किंबहुना हे होणं नॉर्मलच आहे असंच काही त्या वयात आईने मला शिकवल्यामुळे हे काही वेगळं होत आहे असं मला कधीच वाटलं नाही; वेगळं म्हणजे ना चांगलं ना वाईट. उत्सव, सोहोळा साजरा करायचा असेल तर मुहूर्ताची वाट बघण्यापेक्षा सुटी-सवडीचा विचार महत्त्वाचा असं मला वाटतं; उदा मंगळागौर कालबाह्य वाटते, पण त्याच गोष्टी शुक्रवार किंवा शनिवारी करायच्या ठरवल्या तर मी त्यात सहभागी होईनही. माझ्या पालकांची आणि माझीही साधारण मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कौटुंबिक पार्श्वभूमी याचा या विचारांत हातभार असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अलभ्य लाभ...
घाईत असल्यामुळे लेख नुसताच चाळला. व्यवस्थित वाचून सावकाश प्रतिसाद देतो.
मास्तर, मास्तर, अगदी मनातलं बोललात. आम्हा वाचकांना भडकमकर मास्तर हे नाव बोर्डावर दिसणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. असेच लिहिते रहा. तुमच्या दीर्घांकांविषयीही लिहा.
----
लेख आणि चर्चा वाचली. मला यात तीन मुद्दे जाणवले. (सिनेमा न पहाता, केवळ चर्चा वाचून ही मतं तयार केलेली आहेत. त्यामुळे ती मूळ कथानकाविषयी नसून त्यावरच्या प्रतिक्रियांविषयी आहे...)
१. काळाचा चष्मा वापरून कलाकृती पहाव्या का? याचं उत्तर ठाम हो आहे. खरं तर प्रत्येकच कलाकृती बघताना स्वतःचा चष्मा किंचित ऍडजस्ट करून घ्यावा लागतो. त्या त्या लेखकाने तयार केलेल्या विश्वाचे नियम समजावून घ्यावे लागतात. हॅरी पॉटरच्या कथा वाचताना 'हॅ, हे असलं जादू बिदू प्रकरण काही नसतंच' असं म्हणत राहिलं तर कथेची गंमत कशी घेता येणार?
२. प्रतिगामी व्यक्तिमत्वाचं उदात्तीकरण करावं का? एखाद्या व्यक्तिमत्वाचं त्याच्या गुणदोषांसकट प्रभावी चित्रण करणं महत्त्वाचं. फक्त आदर्शांचंच चित्रण करायचं तर रामाच्या कथेशिवाय (तीही त्या काळचे चष्मे लावूनच आदर्श म्हणता येते) काही लिहिता येणार नाही. काही वर्षांपूर्वी मी सद्दाम नावाची मालिका टीव्हीवर पाहिली होती. त्याने क्रौर्याचा अत्यंत हिशोबी वापर केलेला दाखवला होता. त्याचा मुलगा यडपटासारखा खूनखराबा करतो तेव्हा तो त्याला सुनावतो 'व्हायोलन्स इज अ टूल. हू डु यु थिंक वी आर? बारबेरिअन्स?' सांगायचा मुद्दा असा की सद्दाम हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे, तेव्हा त्याचं चित्रण परिणामकारक ठरतं. एखाद्या कर्मठ पण वरवर सुधारणावादी दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाला आकर्षक कंगोरे असतात.
३. हे असलं काहीतरी चित्रण करून जगाला दाखवावं का? त्याने भारताची प्रतिमा डागाळते वगैरे वगैरे आक्षेप मला पोरकट वाटतात. पहिल्या मुद्द्यात लिहिल्याप्रमाणे परकीय प्रेक्षकांना असे चष्मे लावता येत नसतील तर तो त्यांचा दृष्टीदोष आहे. आणि मुळात कटू काहीतरी असेल तर ते दाखवूच नये कारण तेच सत्य आहे अशी प्रतिमा होते हा युक्तिवादच कमकुवत आहे.
प्रकाटाआ.
प्रकाटाआ.
नुकत्याच वयात आलेल्या
चावट नाटकाविषयीच्या लैंगिक भेदाभेदाचा मुद्दा प्रस्तुत लेखात अवांतर असला तरी चर्चा करण्यायोग्य स्वतंत्र विषय असल्याने इथे हलवण्यात आला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
योगायोग
योगायोगाने, यातील उत्सवनिमित्त ठरणार्या प्रसंगासही 'काकस्पर्श' अश्शाच अर्थाचा शब्द 'आपल्या' मराठीत प्रचलित आहे.
इन विच केस, या चित्रपटाकरिता 'काकस्पर्श ते काकस्पर्श' (अथवा 'काकस्पर्शापासून काकस्पर्शापर्यंत'... 'क़यामत से क़यामत तक' अथवा 'क्यूएसक्यूटी'च्या धर्तीवर) असे काहीसे नामाभिधान अधिक उचित ठरले असते काय?
अहो मास्तर खर तुम्ही झुरिकमधे
अहो मास्तर खर तुम्ही झुरिकमधे काय करत होता?
सिनेमा आवडला
टीव्हीवर आजच हा सिनेमा पाहिला. (कदाचित साहित्यातलं आणि सिनेमातलं फारसं कळत नसल्यामुळे असेल, पण) सिनेमा आवडला. असं प्रेम असू शकतं असं वाटलं. आता ते मेलोड्रामाटिक असेल, बेगडी असेल. ती काही डॉक्युमेंटरी नाही, की अगदी नाट्य वगैरे वजा करुन चित्रित करावी. सिनेमाच आहे तो. तोही एका कथेवर आधारलेला; सत्यघटनेवर आधारलेला नाहीच आहे. सर्वसाधारण मराठी सिनेमांशी तुलना करता मला बराच उजवा वाटला.
मास्तरांना पडलेले बरेचसे प्रश्न अप्रस्तुत वाटले. हा सिनेमा बघून कुणाची भारताविषयी/ महाराष्ट्राविषयी धारणा खराब होईल असे काही वाटले नाही, आणि झाली तरी त्याला त्या व्यक्तीचा अडाणीपणा जबाबदार असेल. इन एनी केस काय फरक पडतो! वयात आलेल्या मुलीला मखरात बसवणे वगैरे सध्या एम्बरासिंग वाटत असले, तरी आपल्या पूर्वजांना तसे वाटत नसावे, आणि ते जर सिनेमात दाखवले तर काय हरकत आहे. हे असे असे होते बुवा. त्यात काय! मागे एका चर्चेत आंध्रातील (अजूनही होत असलेल्या) "हाफ सारी" सोहळ्याबद्दल माहिती वाचली होतीच. माझ्याच एका (मराठी) मैत्रिणीला वयात येतेवेळी तिच्या मामाने (प्रथेप्रमाणे) साडी नेसवली होती (असे तिनेच मला संगितले होते).
सचिन खेडेकर विशेष आवडला.
+१ मी ही कालच हा सिनेमा
+१ मी ही कालच हा सिनेमा (जाहिरातींचा मारा सहन करत) पाहिला..
बर्यापैकी आवडला.. एकदा पाहण्याजोगा आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!