आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ४

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ४

डॉ. विष्णू जोगळेकर

या भागात आपण आयुर्वेदातील कोणत्याही गोष्टीतले तथ्य कसे तपासले जाते या विषयाचा शेवटचा भाग पाहणार आहोत. पुढील भागापासून वाचकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

गेल्या भागापर्यंत आपण प्रत्यक्ष शब्द आणि अनुमान ही प्रमाणे पाहिली. या भागात तीन गोष्टींचा विचार प्रस्तुत केला आहे.

  • हेत्वाभास
  • उपमान
  • युक्ती

हेत्वाभास

अनुमान प्रमाणात जो सर्वांत महत्त्वाचा घटक आहे आणि ज्याच्यावर अनुमान योग्य की अयोग्य हे ठरते तो म्हणजे हेतू. हा हेतू बरोबर असेल, खरा असेल तरच अनुमान योग्य ठरते. पण हेतू बरेचदा चुकीचा असतो. उदाहरणार्थ, गेल्या परीक्षेत अमुक शर्ट घातला तेव्हा चांगले गुण मिळाले होते; त्यामुळे या परीक्षेत तोच शर्ट घातला तर चांगले गुण मिळतील. यामध्ये 'लकी शर्ट' अनुमानासाठी हेतू म्हणून वापरला आहे.

हा चुकीचा का ठरतो? तर तो ज्या साहचर्यावर अवलंबून आहे ते साहचर्य कमकुवत आहे. त्यात योगायोगाचा भाग असू शकेल ही शक्यता विचारात घेतलेली नाही.

हेतूसारखे भासणारे पण हेतूचे गुणधर्म नसलेले कारण म्हणजे हेत्वाभास किंवा अहेतू. न्यायदर्शनात हेत्वाभास हे प्रकरण सविस्तर आले आहे. चरकसंहितेत विमानस्थानात आठव्या अध्यायात याचा विस्तार आहे. अहेतूचे तीन मुख्य प्रकार चरकसंहितेत आहेत.

प्रकरणसम – म्हणजे जी गोष्ट सिद्ध करायची तेच कारण देणे. उदाहरणार्थ, देव सर्वव्यापी आहे कारण तो देव आहे.
संशयसम – म्हणजे शंका आणि उत्तर एकच असणे. उदाहरणार्थ, देव सर्वव्यापी आहे कारण तो सगळीकडे आहे.
वर्ण्यसम – म्हणजे एका वस्तूचे वर्णन करताना दुसऱ्या गोष्टीचे वर्णन कारण म्हणून सांगणे (वडाची साल पिंपळाला).
उदाहरणार्थ, देव सर्वव्यापी आहे कारण तो हवेसारखा अदृश्य आहे आणि हवा सर्वव्यापी आहे म्हणून देव सर्वव्यापी आहे.

अनुमान प्रमाणाने कोणतीही गोष्ट सिद्ध करताना अनुमानामागचे कारण किंवा तांत्रिक भाषेत हेतू जितका भक्कम तितके अनुमान भक्कम.

उपमान प्रमाण

एखादी गोष्ट सहज समजावी यासाठी तत्सम गोष्टीची उपमा दिली जाते. याला उपमान म्हणतात. आयुर्वेदात अनेक ठिकाणी याचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, काविळीच्या एका प्रकारात मलप्रवृत्ती ही तिलपिष्टनिभ किंवा तिळाच्या पेंडीसारखी असते असे वर्णन आहे. विशेषतः रंग सांगताना उपमान वापरले जाते. पांडुरोगात त्वचेचा वर्ण केतकीधूलिसन्निभ किंवा केवड्याच्या परागांसारखा असतो. औदुंबर कुष्ठ या त्वचाविकारात पिकलेल्या उंबराचा रंग त्वचेवरील डागांना येतो असे वर्णन आहे.

पण उपमानाचा प्रमाण या अर्थाने उपयोग शरीरक्रिया समजावून घेताना आहे. शरीरातील घटकांची हालचाल तीन पद्धतींनी होते. एक शब्दसंतानवत् म्हणजे एकाच वेळी सर्व दिशांना पसरणारी. दुसरी पद्धत म्हणजे जलसंतानवत् म्हणजे वरून खाली. तिसरी पद्धत अर्चि:संतानवत् किंवा ज्योतीप्रमाणे खालून वर जाणारी.

हल्ली संगणकाच्या साहाय्याने मॉडेलिंगमधून औषधांच्या शरीरातल्या कामांविषयी आडाखे बांधले जातात ते या उपमान प्रमाणाचे अत्याधुनिक स्वरूप आहे.

याला प्रमाण म्हणावे का ? हा वादाचा मुद्दा आहे. उपमा किती ताणायची यावर ती ज्ञानप्राप्तीसाठी साधन आहे की मनात गोंधळ उत्पन्न करणारे साधन आहे यावर मतभेद होऊ शकतात. पण मॉडेलिंगमुळे आपण सत्याच्या जवळ जातो यात काही शंका नाही.

युक्तिप्रमाण

जे शेवटचे प्रमाण आपण पाहणार आहोत ते म्हणजे युक्तिप्रमाण. युक्ती हा शब्द जुगाड या अर्थाने वापरलेला नाही. तर संस्कृत भाषेत युक्तीचा अर्थ होतो योजना. आयुर्वेदात युक्ती हा शब्द अनेक अर्थांनी वापरलेला आहे. ग्रंथांचा किंवा तंत्राचा अर्थ निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांनासुद्धा युक्ती हे नाव आहे. शब्दकल्पद्रुम या ग्रंथात युक्ती याचा अर्थ अनुमान असा दिला आहे. त्यामुळे आपण याचा समावेश अनुमानात करू शकतो. पण प्रमाण किंवा पुरावा या अर्थाने जेव्हा युक्ती हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अतिशय नेमका अर्थ असतो. तो म्हणजे अनेक कारणांमुळे जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यातल्या प्रत्येक कारणाचा परिणामाशी संबंध नक्की करणे.

बुद्धिः पश्यति या भावान् बहुकारणयोगजान् ।
युक्तिस्त्रिकाला सा ज्ञेया

चरक संहिता, सूत्रस्थान ११/२५

आजकाल ज्याला आपण Multifactorial analysis म्हणतो ते हेच.

युक्तीचा उपयोग आयुर्वेद व्यक्तिविशिष्ट चिकित्सा Personalized medicine Tailor made medicine करण्यासाठी सर्वांत जास्त करतो. आधुनिक वैद्यक हळूहळू त्या दिशेने वाटचाल करीत आहे. अमेरिकेत पहिली व्यक्तिविशिष्ट कॅन्सर थेरपी १९९०च्या दशकात शासनमान्य झाली. सध्या कॅन्सर चिकित्सेतील हा पर्सनलाईज्ड थेरपीचा वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरातील परिस्थिती आणि औषधयोजना यांच्या अचूकतेसाठी आयुर्वेद दहा अक्ष सांगतो.

दोषभेषजदेशकालबलशरीराहारसात्म्यसत्त्वप्रकृतिवयसामवस्थान्तराणि

चरक संहिता, सूत्रस्थान १५/५

वाग्भट सूत्रस्थानातही यासारखाच श्लोक आहे.

औषध ठरवताना आणि निदान करतानाही

  • दूष्य – बिघाड झालेला शरीराचा भाग
  • देश
  • भूमिदेश (बाह्य परिस्थिती)
  • देहदेश (अंतर्गत परिस्थिती)
  • बल – प्रतिकारशक्ती
  • काल –
    • क्षणादि (दिवस, रात्र वगैरे)
    • व्याधीअवस्था (स्टेज)
  • अनल – अग्नी किंवा पचवण्याची ताकद
  • प्रकृती – शरीराची ठेवण आणि प्रतिसादाची पद्धत
  • वय
  • सत्त्व – मानसिक बळ
  • सात्म्य – काय सोसेल आणि कशाचा त्रास होईल, आजच्या भाषेत ॲलर्जी
  • आहार – नेहमीचा किंवा इलाज चालू असतानाचा

आजार आणि औषध दोन्ही गोष्टी या दहा अक्षांवर एकमेकांसमोर मुकाबला करतात आणि जी गोष्ट प्रबळ असेल ती जिंकते. आजार जिंकला तर विकलता किंवा मृत्यू आणि औषध जिंकले तर तंदुरुस्ती. यात कौशल्य कोणते तर डास मारायला तोफ किंवा हत्ती मारायला टाचणी अशी विजोड अवस्था येऊ न देणे. अत्यंत प्रभावी औषध हे किरकोळ आजारात वापरण्याने कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते’ तर गंभीर आजारात वरवरचे इलाज अपुरे पडतात. ही योजना हा आयुर्वेदाचा गाभा आहे.

मुळात आजारच होऊ नयेत यासाठी दैनंदिन जीवनात काही विशिष्ट जीवनशैलीचा अवलंब केला तर आजार होणारच नाहीत. यासाठी दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्त आयुर्वेद सांगतो; आणि त्यात या दहा अक्षांवर मोजूनमापून नेमक्या मिनिमल इंटरव्हेन्शन या स्वरूपात उपाययोजना सांगितल्या आहेत. पण जर समजा आजार झालाच तर तो थोपविण्यासाठी सहा पायऱ्यांवर हस्तक्षेप करून तो रोखावा अशी व्यवस्था आहे. या पायऱ्यांना क्रियाकाल असे तांत्रिक नाव आहे.

  • चय
  • प्रकोप
  • प्रसर
  • स्थानसंश्रय
  • व्यक्ती
  • भेद

हे ते क्रियाकाल आहेत.

चय – ही अगदी सुरुवातीला येणारी अवस्था आहे. शरीर आणि मनाला न झेपणाऱ्या गोष्टींचे परिणाम साठत राहणे ही पहिली पायरी. यावेळी आपल्याला दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे आजार वाढू शकेल अशा गोष्टींचा द्वेष किंवा ही गोष्ट नको, आता पुरे अशी भावना. पोट भरले आहे किंवा फार गोड खाऊन गोडाची शिसारी येणे वगैरे. दुसरे म्हणजे विरूद्ध गोष्टींची इच्छा. बसूनबसून अंग अवघडले तर पाय मोकळे करायला चालायला जावे ही इच्छा.

या पहिल्या पायरीवर शरीर आणि मन संकेत देत असतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले तर वागणुकीत किरकोळ बदल करून संतुलन साधता येते.

प्रकोप – वेळीच पायबंद घातला नाही तर अनिष्ट गोष्टी साठतात. जिथे साठतील तो अवयव कमकुवत होतो. त्याची कार्यक्षमता कमी होते.

प्रसर – एका ठिकाणी साठलेल्या अनिष्ट गोष्टी इतर अवयवांच्या कामात अडथळे आणू लागतात.

स्थानसंश्रय – आजार मूळ धरतो. रुजायला लागतो.

व्यक्ती – आजार व्यक्त होतो लक्षणे दिसतात रोजच्या आयुष्यात अडथळे येतात.

भेद – आजार पसरतो एकामागून एक अवयव दुर्बळ होतात. इलाजदेखील जालीम करावे लागतात.

युक्तीप्रमाण हे calibrated response किंवा उचित उपाययोजना यासाठी वापरले जाणारे हत्यार आहे.

पुढील भागापासून वाचकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करू.

लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

मुळात आजारच होऊ नयेत यासाठी दैनंदिन जीवनात काही विशिष्ट जीवनशैलीचा अवलंब केला तर आजार होणारच नाहीत. यासाठी दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या आणि सद्वृत्त आयुर्वेद सांगतो; आणि त्यात या दहा अक्षांवर मोजूनमापून नेमक्या मिनिमल इंटरव्हेन्शन या स्वरूपात उपाययोजना सांगितल्या आहेत.

मी आठवड्यातून किमान सहा दिवस व्यायाम करते. व्यवस्थित खाते. वेळेत झोपते-उठते.

---

मला आजवर कोव्हिड झालेला नाही. याचं कारण मी कुणी स्पेशल, थोर आहे असं नसणार. मी प्रिव्हिलेज्ड आहे, हे असणार. मला घरात बसून काम करायची सोय आहे. अशी सोय असणाऱ्यांना पगारही बरेच जास्त असतात. त्यामुळे माणसं टाळून आवश्यक खरेदी करता येणं शक्य आहे. माझं घर बरंच मोठं आहे, त्यामुळे एका वेळेला चिकार वस्तू खरेदी करून साठवणी करायची सोय माझ्याकडे आहे.

हे शुद्ध वैद्यक नाही; आधुनिक वैद्यकाशी संबंधित लोकांनी केलेल्या संशोधनाची अर्थशास्त्राशी घातलेली सांगड आहे.

---

सदर लेख प्रसिद्ध झाला त्या दिवशी मला चिकार ताप आला होता. दर जानेवारीत असं काही होणार, असं मी आता गृहीत धरलं आहे. इथे जानेवारीत ॲश ज्युनिपर नावाच्या झाडांचे परागकण हवेत असतात. उत्तरेकडून किंवा वायव्येकडून वारे आले, आणि त्याबरोबर पाऊस आला नाही तर हे परागकण हवेत पसरतात. आमच्या वायव्येला ही ॲश ज्युनिपरची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि मला त्यांची ॲलर्जी आहे. अमेरिकेत या प्रकाराला 'सीडर फीव्हर' म्हणतात.

मी राहते त्या टेक्सास राज्यात सात प्रकारचे सीडर सापडतात. ऑक्टोबर ते मार्च या काळात पश्चिमेकडून पूर्वेकडे हा सीडर फीव्हर क्रमाने पसरतो. बऱ्याच लोकांना सीडरची ॲलर्जी असते.

या ॲलर्जीचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणूण एकच उपाय. घराबाहेर पडायचंच नाही. घरात बसून सीडरचे किती कण हवेत आहेत याचे आकडे बघायचे. आदल्या दिवशी वारे दक्षिणेकडून आले असतील आणि आज वारा नसेल तरच घरातून बाहेर पडायचं; किंवा पावसानंतर घराबाहेर पडायचं हाच उपाय. ह्या वर्षी 'ला निन्या'मुळे फार पाऊस नाही. ज्या हिवाळ्यांत 'एल निन्यो' प्रभावी असतो, तेव्हा उत्तरेकडून वारे येतात तेव्हा बरेचदा पाऊस होतो; तेव्हा घराबाहेर पडायची सोय जास्त होते.

हे वैद्यक नाही; हा भूगोल आहे.

---

लेख प्रकाशित झाला त्याच्या आदल्या दिवशी मी हे विसरले. विसरले म्हणण्यापेक्षा, आदल्या दिवशी हवा जरा ऊबदार होती. वारे दक्षिणेकडून किंवा वायव्येकडून आले की इथे तापमान वाढतं. (वायव्येला टेकड्या आहेत, उंचावरून हवा खाली आली की गरम होतं.) मी दक्षिणेकडून वारे येत आहेत हे गृहीत धरलं, पण वारे वायव्येकडून वाहत होते. त्यामुळे हवेत खूप परागकण होते, तरीही मास्क न लावता बाहेर पाच मिनीटं होते.

महिनाभर सीडरचा त्रास होतो तेव्हा घरातच राहायची सोय मला आहे, कारण प्रिव्हिलेज.

त्या दिवशी झोपल्यावर ताप आणखी चढला आणि १०२ फॅ.च्या खाली येईना तेव्हा कमी डोसची आयब्युप्रोफेन गिळली. तासाभरात ताप १००फॅ.पर्यंत उतरला. ताप अचानकच आला, थंडी वाजत होती तरी उठून मोठं पांघरूण घेण्याची आणि आजारी आहे म्हणून डॉक्टरशी बोलण्याची शक्तीही अंगात नव्हती; तेव्हा घरात सहज ठेवता येईल, बहुतेकांना परवडेल असं स्वस्तातलं आणि सहज घेता येण्यासारखं औषध उपलब्ध असणं ही मोठी सोय वाटली.

ऑस्टिनातल्या माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी ॲलर्जी टाळण्याचा एक वर्षाचा इंजेक्शनचा कोर्स केला आहे. त्यांतल्या बहुतेकांना सीडरचा त्रास होता, तो बंद झाला आहे. 'ला निन्या'मुळे ऊबदार हिवाळा आहे, तर हे लोक रोज बाहेर पडत आहेत.

आरोग्याशी संबंधित भूगोल आणि अर्थशास्त्र मला समजतं कारण पुन्हा, मी प्रिव्हिलेज्ड आहे. (ते समजतं म्हणून टाळता येतंच असं नाही.) माणसांच्या प्रिव्हिलेजवर अवलंबून असणारी आजार टाळण्याची प्रिस्क्रिप्शनं आयुर्वेद देतं का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माणसांच्या प्रिव्हिलेजवर अवलंबून असणारी आजार टाळण्याची प्रिस्क्रिप्शनं आयुर्वेद देतं का?

आयुर्वेदाची भलावण अथवा प्रशंसा करण्याचा उद्देश नाही, परंतु, प्रस्तुत प्रश्न आणि/किंवा त्यामागील अपेक्षा चुकीची आहे.

असे पाहा, ‘पुलाखाली झोपू नये; अन्यथा कारवाई होईल’ असा कायदा आहे. तत्त्वतः, तो प्रिविलेजवर अवलंबून नाही; गरीब आणि श्रीमंत दोहोंनाही तो सारखाच लागू आहे. गरीब किंवा श्रीमंत, कोणीही जरी पुलाखाली झोपले, तरी त्याच्यावर कारवाई ही होणारच; तेथे भेदभाव नाही. (हं, आता, बेघर असण्याची, आणि निवाऱ्याची अन्य सोय नसल्याकारणाने पुलाखाली झोपावे लागण्याची, शक्यता ही सहसा गरीबाच्याच बाबतीत जास्त वेळा येणार, श्रीमंताच्या नव्हे, हे खरेच; परंतु, तो कायद्याचा प्रश्न नव्हे. कायदा भेदभाव करीत नाही; तो श्रीमंत आणि गरीब दोघांनाही सारखाच लागू पडतो.)

त्याचप्रमाणे, आयुर्वेदाची आजार टाळण्याची प्रिस्क्रिप्शने, सुचविलेल्या जीवनशैली तथा उपाययोजना वगैरे या गरीब आणि श्रीमंत दोहोंनाही सारख्याच लागू (किंवा गैरलागू) आहेत. (आय डेअरसे, मॉडर्न मेडिसीनच्या बाबतीतदेखील याहून फारशी वेगळी परिस्थिती नसावी; चूभूद्याघ्या.) हं, आता, सुचविलेली जीवनशैली गरीबांना (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणालाही) आर्थिकदृष्ट्या (वा अन्यथा) शक्य नसतील, तर तो प्रश्न गरीबांचा (वा संबंधित व्यक्तीचा) आहे; आयुर्वेदाचा (किंवा फॉर्दॅट्मॅटर मॉडर्न मेडिसीनचा) नव्हे. (लॅक-ऑफ-प्रिविलेजजन्य अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना करणे हे अगदीच अशक्यकोटीतील नसावे; परंतु, ती बाब सामाजिक धोरणांच्या कक्षेतील झाली, आयुर्वेदाच्या (किंवा मॉडर्न मेडिसीनच्या) कक्षेतील नव्हे.)

—————

टेक्सासातील परागकणांच्या ॲलर्जीचा ज्यांना त्रास होतो, त्यांच्याकरिता, स्वित्झर्लंडमध्ये जाऊन तेथील आल्प्समधील शुद्ध हवा नाकाद्वारे आत घेतघेत रोज आल्प्स चढणेउतरणे हा उत्तम उपाय आहे. तो गरीब आणि श्रीमंत दोहोंनाही सारखाच लागू आहे. तो परवडत नसेल अथवा तेवढी सुट्टी मिळत नसेल, तर जॉब बदला नि भरपूर पगार नि भरपूर सुट्ट्या असलेला दुसरा जॉब शोधा; अशा जॉबच्या पुरेश्या संधी टेक्सासात सापडत नसतील, तर तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा गळा धरा, वैद्याचा (किंवा डॉक्टराचा) नव्हे.

तेव्हा घरात सहज ठेवता येईल, बहुतेकांना परवडेल असं स्वस्तातलं आणि सहज घेता येण्यासारखं औषध उपलब्ध असणं ही मोठी सोय वाटली.

(‘आजीबाईंचा बटवा’ नि ओटीसी औषधे या दोन्हीं संकल्पना तत्त्वतः फारशा वेगळ्या नसाव्यात, परंतु तो मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू.)

आयब्युप्रोफेन जर बाजारात स्वस्तात मिळत असेल, तर त्याचे श्रेय डॉक्टरला जात नाही. उलटपक्षी, त्याचे ‘आजीबाईंचा बटवा’-ईक्विवॅलंट ऑस्टिनात जर सहज नि स्वस्तात मिळत नसेल, तर तो दोष वैद्याचा नव्हे. (१) ‘पतञ्जलि’ने (अथवा ‘झण्डू’ने, अथवा अन्य कोणी) ऑस्टिनात आपले मार्केटिंग पुरेसे केलेले नाही, आणि/किंवा (२) तुमच्या स्थानिक इंडियन ग्रोसरी स्टोअरवाल्यास ही उत्पादने विकण्यात स्वारस्य नाही, आणि/किंवा (३) (ही उत्पादने ऑस्टिनात सहजासहजी मिळत असल्यास परंतु महाग असल्यास) विक्रेते नफेखोर आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे. यांपैकी कशाचेही खापर वैद्याच्या वा आयुर्वेदाच्या टाळक्यावर फोडता येणार नाही. (टीप: हा ‘पतञ्जलि’चा पुरस्कार नव्हे. धिस पार्ट ऑफ द प्रतिसादा हॅज़ नॉट बीन स्पॉन्सर्ड बाय ‘पतञ्जलि’.)

असो चालायचेच.

====================

तळटीपा:

‘ॲलोपथी’ हा शब्द मुद्दाम टाळला आहे, कारण तो चुकीचा आहे. ‘ॲलोपथी’ ही संज्ञा होमिओपथीच्या आद्य पुरस्कर्त्यांनी ‘ती दुसरी पद्धत’ अशा अर्थाने कुत्सितपणे युरोपातील तत्कालीन प्रचलित वैद्यकप्रणालीस हिणवून संबोधण्यासाठी बनविलेली आहे. ‘ॲलोपथी’ हे युरोपातील तत्कालीन प्रचलित वैद्यकप्रणालीचे नाव नव्हे, आणि ‘मॉडर्न मेडिसीन’चे तर नव्हेच नव्हे.)

ऐकीव माहिती. स्विस आल्प्समधील हवेच्या शुद्धतेची ग्वाही देण्याकरिता मी स्वित्झर्लंड किंवा आल्प्स पर्वताच्या जवळपाससुद्धा आजतागायत फिरकलेलो नाही. (नाही म्हणायला, एकदा भारतात जाताना नि एकदा भारतातून परत येताना झूरिकच्या विमानतळावर काही तास होतो खरा, परंतु, (झूरिकच्या विमानतळावर कॉफी प्रचंड महाग असते, याव्यतिरिक्त) त्यातून काहीही अंदाज लागू शकला नाही. क्षमस्व.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयब्युप्रोफेन जर बाजारात स्वस्तात मिळत असेल, तर त्याचे श्रेय डॉक्टरला जात नाही. उलटपक्षी, त्याचे ‘आजीबाईंचा बटवा’-ईक्विवॅलंट ऑस्टिनात जर सहज नि स्वस्तात मिळत नसेल, तर तो दोष वैद्याचा नव्हे

तापाआधी, तापात आणि तापानंतरही आजीबाईंचा बटवा उघडा आहेच. हळद-मध-आलं-गरमपाणी वगैरे प्रकार सुरूच आहेत. (त्याशिवाय ऑफिसच्या मिटिंगांमध्ये तोंड उघडणंही कठीण होईल.) साध्या सर्दी, खोकल्यासाठी स्वस्तात उपाय आहेत. पण जेव्हा ताप एवढा चढतो तेव्हा सहज, हाताशी असणारं औषध आधुनिक वैद्यकाकडेच (ज्याला लोक ॲलोपाथी म्हणतात) आहे. आयुर्वेद एवढा जुना आणि ताप येणंही फार जुनं - कोव्हिड आणि ॲलर्ज्या असतील नव्या - तर औषधंही सहज उपलब्ध का नाहीत? ती परिणामकारक नाहीत म्हणून का आणखी काही? आता तर रामदेवही बाजारात उतरला आहे! डाबर आणि बैद्यनाथ किती तरी जुने आहेतच.

भारतात असताना, अनेक वर्षांपूर्वी आई-वडलांच्या धारणांमुळे मीही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जात असे. एकदा ॲनिमियाचं निदान झालं; म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर. १९९९-२००० असा काळ असेल. आठवड्याच्या औषधाचे २००-३०० रुपये होत होते. दुकानात मिळणाऱ्या लोहाच्या गोळ्या अत्यंत स्वस्त असतात. अमेरिकेत औषधं फार महाग असतात, तरीही लोहाच्या गोळ्यांच्या महिन्याचा स्टॉक दोनेक डॉलरांत (< २०० रुपये), आता २२-२३ वर्षांनंतरही, एवढा स्वस्त मिळतो.

शिवाय, तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरचा दावा होता की त्या औषधांनी माझे केस गळणं कमी होईल. ते झालं नाहीच. पैसे खर्च झालेच, बुद्रुक चवीचं काय तरी मला खायला लागलं, आणि मला समजलं ते एवढंच, गुणसूत्रांशी पंगा घ्यायला जाऊ नये! सदर वैद्य माझ्या आईला व्यवस्थित ओळखायचे - आधी त्यांची शिक्षिका म्हणून आणि पुढे पेशंट म्हणून. आईचे केस चिकार गळलेले सरळ, स्पष्ट दिसायचे. (ठाण्यातले प्रसिद्ध वैद्य या वैद्यांचे वडील; हे वैद्य स्वतःच काही वर्षांपूर्वी अकाली गेले. त्यांची तिसरी पिढीसुद्धा याच व्यवसायात आहे.)

काही वर्षांपूर्वी इतर काही कारणांसाठी गर्भनिरोधक गोळ्या काही काळ घेतल्या. तेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणाली होती, काही लोकांच्या केसांची प्रत यामुळे सुधारते. केस गळणं कमी होतं, वगैरे. मला तसं काही दिसलं नाही; डॉक्टरनं छातीठोकपणे असा दावाही केला नव्हताच. गोळ्यांच्या पाकिटावरही असा छातीठोक दावा नव्हता.

‘पुलाखाली झोपू नये; अन्यथा कारवाई होईल’ असा कायदा आहे.

अमके नियम पाळा म्हणजे रोग होणारच नाही, असा जो दावा आहे, तो फोल आहे असं म्हणण्याचा उद्देश आहे. मी आयुर्वेदात काय लिहिलं आहे ते वाचलेलं नाही, पण त्यात सार्स-कोव्ह-२ कसा टाळावा याचं वर्णन नसावं याबद्दल माझी खात्री आहे. (तरी बरं, झिका, मर्स वगैरे जगभर फार पसरले नाहीत.) चांगलं खाणं, व्यायाम, झोप वगैरे जेनेरिक नियम पाळून कोव्हिड टळणार नाही. तसा कॅन्सरही टळणार नाही. अनेकविध प्रकारचे मानसिक विकार टळणार नाहीत. गुणसूत्रांमधून जी काही "भेटवस्तू" मिळायची ती मिळणारच. तेव्हा 'अमुक करा आणि निरोगी राहा' असं म्हणण्यापेक्षा 'अमुक करा आणि रोगाची शक्यता कमी करा' म्हणणं योग्य.

माझा आक्षेप आहे तो असे दावे करण्याबद्दल आहे.

---

आणि हा आयुर्वेदिक पोकळ दाव्यांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक अवांतर स्वानुभव.

मला जनुकीय भेट म्हणून एक्झिमाचा त्रास होतो. थंड आणि कोरड्या हवेत जरा जास्तच होतो. कोणे एके काळी एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हाताच्या एक्झिमावर जळू लावली होती. मला अपेक्षा होती, त्यापेक्षा कमी किळस आली. माझ्या अपेक्षेनुसार जळवेचा परिणाम शून्य झाला; पाकिटातले बरेच पैसे गेले. (मला 'खाज' भागवायची होती ते निराळं.) वर जळवा लावायच्या म्हणून दिवसभर हाताला काही क्रीम वगैरे लावलं नव्हतं, त्यामुळे दिवसभर एक्झिमाचा नेहमीपेक्षा जास्त त्रास झाला तो निराळाच.

मग नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या जनरल फिजिशियन डॉक्टरकडे गेले. तिनं मोजक्या पैशांत प्रिस्क्रिप्शन दिलं; (जळवांच्या तुलनेत) कमी पैशांत स्टिरॉईड विकत आणलं. तळहातावरचा तोच एक्झिमा, दोन तासांत किमान जळजळ कमी झाली आणि त्रासासह एक्झिमाचा तो डाग दोन दिवसांत गायब झाला.

तसा एका कानाआडही एक्झिमा आहे. तो बरीच वर्षं आहे, टिकून आहे, पण फार त्रास नाही म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करते. (तोच तो, गुणसूत्रांशी पंगा!) पण कान आणि हात दोन्ही ठिकाणी असणारा त्रास, जर रक्तासंबंधी विकारांमुळे होत असेल तर दोन-चार जळवांचा काय उपयोग होणार हे मला समजत नाही.

मनुष्याच्या शरीरात म्हणे ५ पाच लिटर रक्त असतं. ही मोजमापं समजा गोऱ्या पुरुषांची असतील, तर माझं वजन-उंची कमी या प्रमाणात किमान साडेतीन लिटर रक्ततरी असेल. या संपूर्ण रक्तातच काही तरी नासकं असणार. शिवाय रक्ताच्या ठरावीक पेशी फक्त हातातच जातात, कानाच्या दिशेला किंवा पायाकडे जात नाहीत असं काही होत नसावं.

जळवांचं वजन प्रत्येकी असेल १० ग्रॅम. अशा चार जळवा होत्या समजा (मला नक्की किती ते आता आठवत नाही). त्यांचं वजन असेल ४० ग्रॅम. त्यांनी आपल्या वजनाएवढं रक्त प्यायलं, तरी ४० ग्रॅम, म्हणजे धरू की ३५ मिलीलिटर (पाण्यापेक्षा अधिक घनता, वगैरे) रक्त असेल. म्हणजे माझ्या शरीरातल्या रक्ताच्या एक हजारांश. तर अशा जळवा लावून सगळ्या रक्ताची प्रत सुधारून एक्झिमा बरा व्हायचा असेल तर किती काळ लागेल?

हा प्रश्न आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारला; तिनं कुठलंही समाधानकारक उत्तर दिलं नाही. जळवांजागी सुईनं रक्त काढून घेतलं तर काय फरक पडेल, याचंही उत्तर नाही. उलट तिनं स्टेरॉईडमुळे काही झालंच नाही, जळवांमुळेच फरक पडला असा दावा केला. (ही पहिल्या पिढीतली वैद्य. त्या प्रसिद्ध कुटुंबाशी संबंध अजिबातच नाहीत.)

---

मी त्यानंतर कधीच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पैसे खर्च केले नाहीत. मिशेलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये मी जेवायला जावं, आणि त्यांनी म्हणावं की आमच्याकडे शाकाहारी काही नाहीच! तर मला काय त्या मिशेलीन स्टारचं कौतुक राहणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचा मुद्दा/आक्षेप आयुर्वेदाच्या फोल (आणि/किंवा प्रसंगी तद्दन खोट्या/अतार्किक) दाव्यांबद्दल आहे. (जे योग्यच आहे.)

मात्र, याचा प्रिव्हिलेजच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही, इतकेच म्हणायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. तथ्याधारित विधानं करावीत - सगळ्या काळज्या घेऊनही ॲलर्ज्या, विषाणू वगैरेंचा त्रास होतो. तेव्हा सरसकट विधानं जपून केलेली बरी.

२. प्रिव्हिलेज नसणाऱ्या लोकांसाठीही थोडं लिहायला हरकत नाही. आयुर्वेद फक्त पैसेवाल्या लोकांसाठी आहे, अशा छापाचे समज झाले तर लोक आयुर्वेद टाकतील.

मला व्यक्तिशः त्याचा काही फरक पडत नाही. दुसऱ्या बाजूला आधुनिक वैद्यक विज्ञानाला धरून असतं; आणि लोकाभिमुखही असतं - पोलिओच्या लशी मुलांना फुकटात देऊन भारतातून पोलिओचं उच्चाटन केल्याचा इतिहास तसा ताजाच आहे; कोव्हिडच्या लशी फुकटात देऊन मृत्यु आणि आजाराची तीव्रता खूप कमी करण्याचं उदाहरण अगदीच ताजं आहे.

आरोग्य ही विज्ञानाची बाजू उत्क्रांतीसारखी वा खगोलासारखी नाही की समाजापासून फटकून राहिलं तरी काही फरक पडत नाही. त्यातला आर्थिक कुवतीमधून निघणारा नैतिकतेचा मुद्दा सोडून दिला तरीही लोकांचे गैरसमज, अज्ञान आणि तरीही मतं ठोकून देण्याचा भाग सोडता येत नाही. त्यातून आजकाल लोकांना मतं ठोकून देण्याची फार मोठी सोय समाजमाध्यमांनी दिलेली आहे.

परवा कुणी आयुर्वेदिक बाई फेसबुकवर लिहीत होत्या की जेवणात पातळ भाजी असलीच्च पाहिजे. 'फिटनेस'च्या नावाखाली दिवसाला अमके लिटर पाणी प्या असं म्हणतात, ते तुम्ही ऐकता ... वगैरे.

मला प्रश्न होता की जेवणात समजा पातळ भाजी खाल्ली तरी ती काय २-४ लिटर असणारे का! आत्ता थोडं कमी पाणी पोटात गेलं आणि त्या जागी दहा मिनीटांनी पाणी प्यायलं तर काय फरक पडतो? असे प्रश्न विचारण्याची किती चोरी असते, हे मी निराळं लिहायची गरज नाही.

मग कुणी फेसबुकवरच्या चार-आठ-शंभर स्त्रिया पातळ भाजी कुठली करायची; डब्यात कशी द्यायची यावरून जिवाला त्रास करून घेणार ... वगैरे. प्रिव्हिलेज फक्त जात (वंश), आर्थिक कुवत, शिक्षण यांच्यामुळेच मिळतो असं नाही.

त्यामुळे जेव्हा माणसांच्या आरोग्य-वर्तनाशी संबंधित गोष्टी लिहायच्या असतील तर जबाबदारी घेऊन, आजूबाजूला काय सुरू आहे याची किंचित दखल घेऊन लिहिणं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयब्युप्रोफेन जर बाजारात स्वस्तात मिळत असेल, तर त्याचे श्रेय डॉक्टरला जात नाही.

डॉक्टर म्हणजे आधुनिक वैद्यक नव्हे.

आधुनिक वैद्यकाशी संबंधित अनेक घटक एकत्र येऊन ते उपचार स्वस्तात आणि सहजरीत्या लोकांना उपलब्ध झाले आहेत. ऑस्टिनात आयब्युप्रोफेन असतं, तशा ठाण्यातही गोळ्या होत्याच. त्या कोपऱ्यावरच्या मेडिकलवाल्याकडे सहज मिळायच्या. आयुर्वेदिक औषधं तितक्या सहज आणि स्वस्तात ठाण्यात तेव्हा उपलब्ध नव्हतीच. आताही नसावीत. ठाण्यात कदाचित गर्भनिरोधाच्या गोळ्या सहज मिळत असतील, ऑस्टिनात प्रिस्क्रिप्शन लागतं. आयुर्वेदात असं काही असतं का हे मला माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधुनिक वैद्यकाशी संबंधित अनेक घटक एकत्र येऊन ते उपचार स्वस्तात आणि सहजरीत्या लोकांना उपलब्ध झाले आहेत.

आयुर्वेदिक औषधं तितक्या सहज आणि स्वस्तात ठाण्यात तेव्हा उपलब्ध नव्हतीच. आताही नसावीत.

ओके.

ऑस्टिनात आयब्युप्रोफेन असतं, तशा ठाण्यातही गोळ्या होत्याच. त्या कोपऱ्यावरच्या मेडिकलवाल्याकडे सहज मिळायच्या.

हो. (भारतात ब्रुफेन, काँबिफ्लाम वगैरे नावांनी आयब्युप्रोफेन मिळायचे.)

ठाण्यात कदाचित गर्भनिरोधाच्या गोळ्या सहज मिळत असतील, ऑस्टिनात प्रिस्क्रिप्शन लागतं. आयुर्वेदात असं काही असतं का हे मला माहीत नाही.

याचा संबंध आयुर्वेदाशी किंवा मॉडर्न मेडिसीनशी नसून स्थानिक कायद्यांशी, त्यांमागील लॉजिकशी (किंवा इल्लॉजिकशी) आणि त्यांच्या अंमलबजावणीशी (किंवा अंमलबजावणीच्या अभावाशी) असावा. (चूभूद्याघ्या.)

(पुण्यात व्हॅलियम हे प्रिस्क्रिप्शनशिवाय तत्त्वत: मिळू नये. परंतु, निदान एके काळी तरी सर्रास मिळायचे. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0