दिल्ली आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनाला विहिंपचा विरोध
चित्रकार : शक्ती बर्मन
भारतीय कलाकारांना राजकीय संघटनांच्या विरोधाला सामोरं जाण्याचा एक नवीन प्रकार नुकताच दिल्लीत घडला. 'दिल्ली आर्ट गॅलरी' हे दिल्लीतलं एक अत्यंत प्रतिष्ठित कलादालन आहे. अनेक महत्त्वाची समकालीन कलेची प्रदर्शनं तिथे नियमित भरतात. त्यांचं नवं प्रदर्शन 'द नेकेड अॅन्ड द न्यूड' हे समकालीन भारतीय कलेतल्या नग्नतेचा आढावा घेतं. आलमेलकर, आचरेकर, आबालाल रेहमान, जामिनी राय, रामकिंकर बैज, सूझा, हुसेन, आरा अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या आणि काही नंतरच्या पिढीतल्या कलाकारांच्या अशा अडीचशेहून अधिक कलाकृतींचं हे प्रदर्शन ऐतिहासिक महत्त्वाचं आहे. प्रदर्शनाविषयी अधिक माहिती आणि प्रदर्शनातल्या कलाकृती इथे पाहता येतील. प्रदर्शन १५ मार्चपर्यंत चालू राहील.
सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या महिला विभागानं प्रदर्शन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही स्थितीत प्रदर्शन बंद पाडू देणार नाही ह्यावर कलादालनाचे संचालक ठाम आहेत.अहिंसक आंदोलन करण्याचा लोकांचा हक्क ते मान्य करतात, पण लोकांच्या भावना दुखावतात म्हणून आमचं प्रदर्शन थांबणार नाही असं ते म्हणताहेत. 'हिंदू'मध्ये आलेली ह्याविषयीची बातमी इथे वाचता येईल.
प्रतिक्रिया
कुंभमेळा बंद करा
"नागव्या साधूंच्या दर्शनाने आमच्या भावना दुखावतात. अतएव, सर्व नंग्या साधूंना तुरुंगात घाला अथवा कुंभमेळा बंद करा. " -अशी मागणी काही झुंडबाजांनी केली तर विहिंप त्याला काय उत्तर देईल?
सहमत
सहमत आहे.
...तर विहिंप त्यांना 'काका' म्हणून हाक मारेल!
अशी मागणी जर काही झुंडबाजांनी केली तर ...
नाजूक गळवे
अस्मिता आणि भावनांची नाजूक गळवे असा शब्दप्रयोग मागे कोणीतरी केला होता त्याची आठवण झाली.
बाकी या प्रदर्शनाला कोणी गेले होते / जाण्याचे ठरवले आहे काय? वृत्तान्त वाचायला आवडेल
बाकी, यावर चर्चा व्हायला हवी असे बातमी वाचल्यापासून वाटत होते. ती सुरू केल्याबद्दल जिंजंचे आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निषेध
निषेध.
काश्मीरचा बँड, विश्वरूपम (की जे काही असेल ते) याबाबतही असाच निषेध करायचा आहे का? तेथेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. तोही करून टाकता येईल. नाही, त्याचे धागे दिसले नाहीत म्हणून म्हटलं.
काश्मीरचा बँड, विश्वरूपम (की
काश्मीरचा बँड, विश्वरूपम (की जे काही असेल ते)>> हिरवा चस्मा लावला की ह्या बातम्या दिसत नाहीत म्हणे.
हम्म...
त्याबाबतीत चर्चा वगैरे होते?
It's unethical. It's not illegal
शंका
अहिंसक विरोध आहे तोपर्यंत ठीक.
पण ह्या निमित्ताने एक शंका - कलात्मक नग्नता आणि अश्लीलता ह्यातला फरक ओळखण्याचे ज्ञान किंवा जाण सामान्य लोकांमधे असावी/रुजावी ह्या उद्देशाने ह्या कलेशी संबंधीत लोकांनी काही प्रयत्न केले आहेत काय? (जसे ह्या संकेत-स्थळावर चिंतातूर जंतू ह्यांनी लेखमाला लिहिली आहे). जर प्रदर्शीत कलेची जाण नसल्यामूळे आकलनानुसार अस्मिताच दूखावली जात असल्यास समस्या लोकांची "जाण" ही आहे. अर्थातच कलेला "विरोध"(अहिंसात्मक) ह्या घटकालाच लक्ष्य करून जाण वाढवल्यास विरोध कमी होइल व कलेचा प्रसार अधिक होऊ शकेल. इतर उद्देशांनी(राजकीय वगैरे) प्रेरीत विरोधासाठी असल्यास त्यासाठी कायदेशीर संरक्षण असावे.
असेच काहिसे लेखन वगैरेकला
असेच काहिसे
लेखन वगैरेकला प्रकारांपेक्षाही पूर्वापार चालत आलेली कला असूनही चित्रकला एक 'हुच्चभ्रु कला' म्हणून कशी रूढ झाली / गोठली असा प्रश्न पडत असे. चित्रबोध सारख्या उपक्रमातून त्याचे थोडे उत्तर मिळाले. पेशव्यांनंतरच्या काळात भारतीय दृश्यकलेला लागलेले ग्रहण, राजा रवी वर्मांमुळे एका अर्थाने अडकलेला 'छापिल' बोळा वगैरे ठीक. मात्र त्यानंतर, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही (किंवा अगदी गेल्या २५-३० वर्षातही) एकूणच चित्रकारच नव्हेत तर दृश्यकलाकारांनी अधिक जाण पसरावी म्हणून मोठ्या प्रमाणावर काही का केले नाही हे विचारावेसे वाटते?
जर काहि केले असेल तर ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीपर्यंत खचितच पोहोचलेले नाही. (मोजके अपवाद आहेत पण तेही शहरी भागात)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
राजकीय ध्रुवीकरण आणि रंजनवाद
स्पष्ट सांगायचं झालं तर जेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला होतो तेव्हा हे प्रश्न उपस्थित करणं (आणि जनतेच्या अज्ञानासाठी कलाकारांना जबाबदार धरणं) हे काहीसं 'बलात्कारित स्त्रीनं कमी कपडे का घातले होते?' किंवा 'स्त्रिया बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांचं प्रबोधन का करीत नाहीत?' वगैरे विचारण्यासारखं होतं. तरीही, इथे एक निरीक्षण नोंदवू इच्छितो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप' किंवा अगदी नव्वदच्या दशकापर्यंत हुसेन वगैरेंच्या प्रदर्शनांसाठी पुष्कळ अवकाश उपलब्ध असे आणि आधुनिक कला लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुले असत. नुकतंच पार पडलेलं 'पुणे बिएनाले' किंवा सुधीर पटवर्धनांनी महाराष्ट्रभर फिरवलेलं 'विस्तारणारी क्षितिजे'सारखं प्रदर्शन असे अनेक उपक्रम अजूनही होत असतात. पण नव्वदनंतरच्या आणि आधीच्या वातावरणात काही मोठे फरक आहेत. एक म्हणजे कलेचा घृणास्पद राजकारणासाठी होणारा गैरवापर ह्या काळात बराच वाढला. (जसे हुसेनच्या चित्रांबद्दलचे आक्षेप आणि एकंदर असहिष्णुतेचे असे बरेच प्रकार) हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय ह्याच काळात झाला; रश्दी प्रकरण वगैरेदेखील ह्याच काळातले प्रकार आहेत. ह्यापूर्वीही 'घाशीराम', 'बाइंडर', मर्ढेकरांवर खटले वगैरे होत होते, पण त्याचं इतकं मोठं राजकीय भांडवल केलं जात नसे. विशिष्ट विचारसरणीकडे जनमत झुकवायला ह्या प्रकरणांचा होणारा वापर मर्यादित होता. दुसरा भाग म्हणजे गंभीर कलेचा प्रमुख रसिकवर्ग जो होता, तो मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात रंजनवादी झाला. म्हणजे 'दो बिघा जमीन', 'सुजाता', 'गर्म हवा' किंवा बेनेगलांचे सिनेमे पाहणारा वर्ग 'हम आपके है कौन', 'दिलवाले दुल्हनिया...' किंवा करण जोहरच्या सिनेमांकडे ह्याच काळात वळला. भारतीय कला पाहण्यासाठी आणि तिच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खरं तर मला आज पूर्वीपेक्षा कमी कष्ट घ्यावे लागतात. भारतीय कलेत अधिक पैसा आल्यामुळे तर सामान्य माणसाला प्रदर्शनं वगैरे पुष्कळच आणि फुकटातच पाहायला मिळू शकतात. त्यामुळे राजकीय ध्रुवीकरण आणि रंजनवाद हे मला मुख्य अडथळे वाटतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
थोडं वेगळं
हे मला पूर्ण पटत नाही. हा मूळचा रसिकवर्ग (उतार वयात का होईना) अजूनही तसाच आहे. जो मध्यमवर्ग रंजनवादी झाला असे तुम्ही म्हणता त्याचा जन्मच मुळी रंजनाच्या या युगात झाला आहे. या वर्गाचा उदय नव्वदीनंतरच्या खाऊजाने केला आहे. भारतीय मध्यमवर्ग असं त्याला म्हणता येतं. त्यामुळे यासंदर्भात मध्यमवर्गाची व्याख्या एकदा मांडा.
माझ्या अल्पअनुभवांनुसार आधीच्या काळातील मध्यम वर्गात प्रामुख्याने अल्पस्वल्प संख्येतील बुद्धिजन्य व्यावसायीक (सीए, वकील वगैरे स्वरूपातील), बँकांचे नोकरदार, सरकारी उच्चपदस्थ, प्राध्यापक अशी मंडळी होती. आत्ताच्या मध्यमवर्गात कोण आहे? आत्ताच्या मध्यमवर्गातील माणसे ही आधीच्या मध्यमवर्गाचीच अपत्ये आहेत. आणि ती त्याच वर्गात राहू शकली, याचे कारण खाऊजा हे आहे.
हा अंगुलीनिर्देश आहे, असे म्हणता येते.
स्पष्ट सांगायचं झालं तर
उद्देश जबाबदार धरणं हा नसून वेगळ्या अंगाने होता. मात्र माझ्या लिहिण्याचा रोख तुम्हाला समजला आहे असे पुढिल प्रतिसादातून दिसतं त्यामुळे यावर अधिक लिहित नाही.
बाकी प्रतिसाद आवडला. बराचसा पटलाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मध्यमवर्ग
मी मूळच्या (नव्वदीआधीच्या) मध्यमवर्गाबद्दल एक अपरिवर्तनीय गट म्हणून बोलत नाही आहे; तर काळानुसार बदलत (आणि सरकारी धोरणांच्या आणि खाजगी संधींच्या मदतीनं) संख्येनं आणि लोकसंख्येच्या सापेक्ष प्रमाणातही वाढत गेलेल्या वर्गाविषयीच बोलतो आहे. त्यामुळे तो वर्ग पूर्वीच्या मध्यमवर्गाचं अपत्य असो, किंवा 'ट्रिकल-डाउन'वगैरेमुळे सामाजिक-आर्थिक उतरंडीत वर चढलेला असो; आधीच्या मध्यमवर्गापेक्षा तो अधिक रंजनवादी आहे ह्यावर बहुधा तुमचं आणि माझं एकमत असावं. कलेच्या उपलब्धतेच्या बाबतीत पूर्वीहून अधिक लोकशाहीकरण ह्याच काळात होऊनही नव्वदीच्या दशकापासून बदलत गेलेलं हे वातावरण (अस्मितांचं राजकीय ध्रुवीकरण, त्यामुळे वाढती असहिष्णुता आणि रंजनवाद) कलेच्या निर्भेळ आस्वादाला मारक ठरतं आहे असं माझं निरीक्षण आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रश्न
दुसरी बाजू ऐकूनच घ्यायची नाही. चूक फक्त एकाच व्यक्तीची असणार अशा प्रकारच्या वृत्तीबद्दल काय? तिचं मूळ कुठे? ही मुळातच होती आणि माध्यमांच्या लोकशाहीकरणामुळे दृष्यमान झाली का?
हुसेन असोत किंवा आशिष नंदी या सगळ्या प्रकरणांमधे हेच दिसतंय. नंदींच्या बाबतीत व्यासपीठावर आशुतोष यांनी त्यांना बोलू दिलं नाही. हुसेनची चित्रं किंवा आता कदाचित या प्रदर्शनाबाबतही जालीय जनता जागृत होईल आणि नग्नतेविरोधात बोलू लागेल. प्रथितयश लोकांनी हे काही वेगळं केलेलं आहे आणि जाणकारांना ते आवडलेलं आहे, तर त्यामागे काय कारण आहे हे समजून घेण्याची फार कोणाची इच्छा असेलच असं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हॅ?
आस्वादकालाच कलेच्या अधोगतीसाठी मारक म्हणून जबाबदारी झटकणे सोयीचं आहे, तो जबाबदारीच्या उतरंडीवर एका पायरीवर आहेच, पण कलाकार म्हणून कला निर्माण करण्यापलीकडे आकलन-क्षमता निर्मितीसाठी त्याच राजकीय नेतृत्वावर विसंबून रहाणं गैर आहे.
नव्वदीच्या आधीचा मध्यमवर्गीय कमी रंजकवादी होता म्हणून कलानिर्मिती(दो बिघा जमिन, गर्म हवा वगैरे) झाली का तेंव्हा रंजकतेचे कमी पर्याय उपलब्ध असल्याने कलानिर्मितीचा उदो-उदो अधिक झाला हे तपासायला हवं कारण त्याच काळात "दाग" आणि "बैजु-बावराची" निर्मिती झाली.
निदान मी ह्या पातळीवर प्रश्न उपस्थित केले नव्हते, पण ह्याच पातळीवर हवं असल्यास - हे म्हणजे "आमच्या काळी एकच पेन्सील मिळायची ती जपून वापरावी लागायची आता तुम्हाला आख्खा बॉक्स मिळतो तरी तुम्ही माजल्यासारखं करता" म्हणण्यासारखं आहे, पेन्सिली जास्त असतानाच त्या जपून वापरायला शिस्त किंवा कौशल्य लागतं.
तुम्ही दिलेली उदाहरणे ५०वर्षाच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप (१९४७-१९५६), विस्तारणारी क्षितिजे किंवा पुणे बिअनालेला मिळणारं कव्हरेज ह्या गोष्टी फक्त लोकांची नव्हे तर कलाकारांची लोकांपर्यंत पोहोचण्याची उदासीनता दर्शवते, घाशीराम(१९७६) नंतर उदाहरणादाखल एखाद्या(किती?) तात्कालीन कलाकृतीचा संदर्भ देता येईल?
पॅरीसमधे कलेशी निगडित किती शिक्षणसंस्था आहेत ह्याचा अंदाज घेतल्यावर आपल्याकडील गरिबीचा अंदाज येऊ शकेल काय? ह्याच पार्श्वभूमीवर, छाया डोळस ह्यांचा अनुभवच्या फेब्रुवारीच्या अंकातला 'जेजे स्कूल' वरचा लेख रोचक आहे.
थोडक्यात सांगायचे तर...
नाटकाचं नाव : "भावना दुखावल्या , अस्मिता भंजाळल्या". हे नाटक विविध भाषांमधे आणि विविध धर्मजातींच्या संदर्भात भारतात अधूनमधून चालत असते. त्याच नाटकाचा हा पुढचा प्रयोग दिसतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
वेडेपणा
एकतर या चित्रांत आक्षेपार्ह अस काय आहे हेच कळाल नाही
याहून दुपटीने आक्षेपार्ह चित्रे फोटोज बाँम्बे टाईम्स मधे पाहायला मिळतात
तिथे तर चढाओढ लागत असावी कोण जास्त आक्षेपार्ह फोटो देतय याची
बाकी खजुराहो वगैरे बद्दल विहिँपवाल्याच काय मत आहे
.
रंजकता आणि लोकशाहीकरण
विसंबून राहण्याचा हा मुद्दा नाही; तर राजकीय हिशेबांपोटी कलाकृतीच्या आस्वादासाठी उपलब्ध असलेला अवकाश अधिकाधिक गढुळला जातोय आणि संकुचित होतोय. वर विश्वरूपम किंवा प्रगाशचा उल्लेख आला आहेच; शिवाय ममता वगैरेही आहेत. त्यावरून विविध राजकीय हिशेब काय असतात ते लक्षात यावं.
छे छे. रंजन ही सर्व काळांत आणि समाजाच्या सर्व स्तरांत अस्तित्वात असलेली एक मूलभूत गरज आहे. रंजक कला नेहमीच असणार. तिच्या स्थानाला कुणी कमी लेखू नये अन् ते स्थान मिळवण्याची आसही गंभीर कलाकृती बाळगत नाहीत. रंजक कलेला आश्रयदाते नेहमीच मिळतात; फक्त कोणती कलाकृती रंजक वाटेल हे कालसापेक्ष आणि सामाजिक स्तरसापेक्षही असतं. म्हणजे अमिताभच्या अॅन्ग्री यंग मॅन बरोबरच घरोंदा, छोटीसी बात वगैरे होते अन् ते मध्यमवर्गाचं रंजन करत होते. पण मुद्दा तो नाही. गंभीर कलाकृतीला समाजाच्या सर्व स्तरांतून प्रतिसाद क्वचितच मिळतो. पण तिची भिस्त ही मुख्यतः सुशिक्षित, सुजाण म्हणवल्या जाणार्या वर्गावर असते. त्याच वर्गानं पाठ फिरवली तर तिला वालीच उरत नाही.
माझा मुद्दा असा होता की मला (म्हणजे दृश्यकलांविषयी आस्था असणार्या व्यक्तीला) आता जितके पर्याय उपलब्ध आहेत तितके नव्वदच्या दशकापूर्वी नव्हते. एक संदर्भ शोधायचा तर नाकी नऊ येत. कलाकृती पाहायला मिळणं हे सर्वस्वी मुंबई-दिल्लीतल्या प्रदर्शनांवर आणि म्यूझियम्सवर अवलंबून होतं. कॅटलॉग फार महाग असत आणि उपलब्धच होत नसत. आता इतके संदर्भ उपलब्ध आहेत. आंतरजालावर माहिती मिळते; पुस्तकं परदेशातून मागवणं सोपं झालंय. अनेक लोक परदेशवार्या करतात. जगभरातल्या म्यूझियम्समध्ये भारतीय लोक जथ्यानं दिसतात. जग अनेक अर्थानं जवळ आलं आहे. कलाकार आज कधी नव्हते इतके लोकाभिमुख आहेत. अगदी फेसबुक, ट्विटरपासून ते प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखती आणि प्रदर्शनांसाठीची प्रसिद्धी करण्यापासून अनेक ठिकाणी कलाकार लोकांसमोर येत राहतात. या सर्वामुळे आज पूर्वीपेक्षा अधिक लोकशाहीकरण झालं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अभिव्यक्ती व कलाभान ह्या दोन
अभिव्यक्ती व कलाभान ह्या दोन गोष्टी वेगळ्या हताळू, अभिव्यक्ती असावी हे मुलतत्व मान्य केले तरी आज सर्वत्र त्याची पायमल्ली होताना दिसते, मुद्दा असा की अभिव्यक्तीची गळचेपी (रुढार्थी)समृद्ध/सुसंस्कृत देशांत होताना दिसते. पण विवादास्पद विषय वगळता इतर कलाकृतींबद्दल कलाभान आणण्याचे प्रयत्न कितपत होताना दिसतात? आजतागायत झालेला विरोध विवादास्पद मुद्द्यांवर आहे, ते मुद्दे सोडून इतर कलेच्या अंगांबाबत जनजागृती करताना कोणते कलाकार दिसतात?
आजचा मध्यमवर्गीय जास्त रजंकतावादी दिसतो/आहे, पण मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीमधे सुमारे दोन दशके रंजक कलाकारांनी (बहूतांश हीन)कलाकृती सादर केल्या, त्या करताना, घाशीराम/सखाराम सारख्यांचा अपवाद वगळता किती कला़कॄती निर्माण झाल्या? कोणत्या व किती गंभीर कलाकृती सादर झाल्या पण लोकांना समजल्याच नाहीत?
कलेच्या इतर क्षेत्रात (शिल्पकृती/चित्रकला) बहूतांश कलाकार/विद्यार्थी पारंपारिक (व्यक्तिचित्रण/स्थलचित्रण) चौकटीत अडकून पडल्याचे किंवा पाश्चात्यांची नक्कल/प्रभावात अडकल्याचे ऐकावयास मिळते, पण संगीत क्षेत्रात ह्याला अपवाद सापडतो, तिथे आज अभिजात संगीताबरोबर तात्कालिन संगीताचा आस्वाद घेताना मध्यमवर्गीय रसिक दिसतो.
हे सर्व तुमच्यासारख्या दृश्यकलांविषयी आस्था व जाण असणार्यांसाठी उत्तमच झाले, पण त्याचा फायदा लोकांनी घेतला नाही, किंवा तो कसा घ्यावा ह्याची जाणिव त्यांना कोणी करुन दिली नाही.
तुमचा पुणे-५२ चा लेख वाचून चित्रपट बघणार्यांमधे व न वाचता तो बघणार्यांमधे तुम्हाला फरक जाणवला का? किंवा तो तुम्ही आजमावलात का? की ज्यांना समजतं त्यानी आस्वाद घ्यावा बाकीच्यांशी घेणं नाही, असा उच्चकलावादी पवित्रा घेतला तर तसा फारसा फरक पडतच नाही.
लोकभान आणि कलाभान
खरी गंमत इथेच आहे. आणि मी वर जो राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा मांडला होता तो इथे लक्षात घेण्याची गरज आहे. विवादास्पद विषय हे खाजवून खरूज काढल्यासारखे काढले जातात. विवादास्पदच नव्हे, तर कलेच्या सर्व अंगांबाबत पुष्कळ लिखाण होत असतं. पूर्वीही होत असे; आता तर आणखी अधिक प्रमाणात होतं. त्यापर्यंत पोहोचण्यासाठीही आता फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. 'हिंदू', 'आउटलूक'सारख्या मुख्य धारेतल्या प्रकाशनांत या विषयांवरच्या लेखनाला बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली जाते. मराठीत गेली काही वर्षं 'चिन्ह'च्या अंकानं अशी कामगिरी बजावली आहे. २०१२च्या दिवाळी अंकांत पाहिलं तर हे प्रकर्षानं जाणवेल, की दृश्यकलाविषयक लेखांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणजे हे लिखाण मुख्य धारेत उपलब्ध होतं आहे. पण शेवटी हा प्रश्न उरतोच, की हे सर्व कोण वाचतं? मला असं दिसतं की कुठलाही अभ्यास न करता व्यक्तिगत मतांचा गलबला करण्यात, आणि आपण काहीतरी म्हटलं ह्यातच धन्यता मानण्यात सुखावणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आता आंतरजालामुळे खूप मोठ्या प्रमाणात मिळालं आहे, आणि ती चांगलीच गोष्ट आहे. रीडिफ, टाईम्स किंवा मराठी वृत्तपत्रांच्या जालीय आवृत्त्या वाचकांचा सहभाग वाढावा यासाठी आपल्या बाजूनं प्रोत्साहन देत आहेत. फेसबुक वगैरे संवादस्थळं तर आहेतच. अशा ठिकाणी हा वर्ग भरपूर प्रमाणात मतं व्यक्त करताना दिसतो. पण 'तुझं वाचन किती? तू बोलतोस किती?' हा प्रश्न विचारता येईल अशी अभिव्यक्ती फार मोठ्या प्रमाणात आढळते. रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी 'हू मिल्क्स धिस काऊ?' ह्या लेखात त्यांच्या लिखाणाला ह्या वर्गातून किती आणि कसा प्रतिसाद येतो हे सोदाहरण दाखवलं होतं. ह्यातून असहिष्णुता वाढते हे स्पष्ट आहे. ह्याला कसं सामोरं जायचं हा आज अनेकांना पडणारा प्रश्न आहे. माझ्यापाशी त्याचं उत्तर नाही. ज्याच्यापाशी असेल त्याच्याकडून ते ऐकण्याची माझी तयारी आहे.
दृश्यकलेच्या बाबतीत तीव्र असहमती. मी नेहमी लोकांना सांगतो की भारतीय दृश्यकला (सिनेमा सोडून!) आणि भारतीय संगीत ह्या दोन गोष्टींमध्ये समकालीन कलाविष्कार इतके समृद्ध आहेत, की ते घेऊन जगासमोर जायला मला अजिबात लाज वाटत नाही. आणि मध्यमवर्गाचा सहभाग म्हणाल तर मुंबई किंवा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येऊन पाहा असं सांगेन. गेल्या २०-२५ वर्षांत विविध देशांतले चित्रपट वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसाला उपलब्ध झाले. मुंबई-पुण्याखेरीज आज महाराष्ट्रातल्या अनेक गावांत नियमित फिल्म क्लब आणि महोत्सवांसारखे उपक्रम चालू आहेत. इतकंच नव्हे, तर ह्या सिनेमावर वाढलेले तरूण आता स्वत: सिनेमे बनवूही लागले आहेत.
हाच मी वर म्हणतो तो प्रश्न आहे. कलेविषयी आंतरजालावर मतप्रदर्शन करण्याला सगळे पुढे, पण एका गूगल सर्चवर जे सहज उपलब्ध आहे त्याकडे जाणार नाही. ह्याचं काय करायचं, ते मला कळत नाही.
प्रतिसाद कसे आणि किती आजमावणार? ज्यांनी इथे प्रतिसाद दिले त्यांच्याशी मी संवाद साधला. पण एकदा एखादा लेख आंतरजालावर आला, की तो कुणी शेअर केला आणि त्यावर काय चर्चा झाली, ह्यावर आपला काहीच अधिकार चालत नाही. हेच ह्या माध्यमाचं स्वरूप आहे, आणि ते तसंच असणं चांगलं आहे. पण त्यामुळे प्रतिसादांचा अदमास किती घेत राहणार? आणि त्यावर किती वेळ घालवणार? शेवटी असंच म्हणावं लागतं, की मला वाटतं ते लिहिण्याचं काम मी केलं. कुणीही माझ्याशी संवाद साधू शकतं, कारण इथे ती लोकशाही आहे. तर ह्याला उच्चकलावादी पवित्रा म्हणायचा का? माझा वेळ मी कलाकृतीचा आस्वाद घेण्यात किती घालवावा, त्याबद्दल लिहिण्यात किती घालवावा, आणि लोकांशी संवाद साधण्यात किती घालवावा, हा साधा काळ, काम, वेग आणि माझे प्राधान्यक्रम यांचा हिशेब आहे. मी काही सर्जनशील कलाकार नाही; पण कोणत्याही सर्जनशील कलाकाराला असाच काहीसा विचार करून त्याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
समांतर
समांतरः
याच घटनेचे असे नव्हे पण एकूणच सनसनाटीचे परिस्थितीचे भांडवल करणार्या, प्रसंगी अश्या परिस्थितीला कारणीभूत असणार्या, कधी फूस लावणार्या, तर कधी वाद 'मॅन्युफॅक्चर' करणार्या मिडीयाच्या नैतिक अधःपतनावर एका टिव्ही न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा राजदीप सरदेसाई यांचा ब्लॉग-लेख वाचनीय आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हम्म्म
एकूणच 'नग्नकला' ह्या विषयात चिंजंना अंमळ जास्तीच रस आहे असे आमचे आपले एक निरिक्षण आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
almost
म्हणजे सामाजिक कलाभानतेवर पुरेसे प्रयत्न घेतले जात आहेत अस म्हणायचं आहे काय? चिन्हची बाजारातली उपलब्धता हा मुद्दा होताच, पुरुष स्पंदन बद्दलही तेच, दृश्यकलाविषयक लेखांमध्ये झालेली लक्षणीय वाढ म्हणजे कलाजगताने सामाजिक कलाभानतेबद्दल गेले अनेक वर्षे घेतलेल्या अथक परिश्रमांचे परिणाम आहेत? विद्याचं बोलायचं झालं तर बाजारातील मुख्य धारेतील लिखाणाच्या किती टक्के लिखाण दृश्यकलाविषयक असतं व त्यात किती वाढ दर वर्षी होते?
तुम्ही ह्या वर्गाला वैतागून हा भाग लिहिला आहे किंवा तुम्ही मला त्या वर्गातलाच एक मानून हा भाग लिहिला आहे, कसेही असले तरी ह्या वर्गाच्या मतांकडे तुम्ही नोंदवलेल्या ठिकाणी किंवा इथे तुम्हीसुद्धा दूर्लक्ष करता असं म्हणता येईल.
तुम्हीच म्हणता त्याप्रमाणे वाढत्या आंतरजालीय लोकशाहीमुळे लेखाकानं लेखाची परिणामकारकता कशी ठरवायची हे गणित नक्की केलं पाहिजे, गुहांचा लेख हे फक्त अनुभव-कथन होतं, त्याकडे तसचं पाहिलं पाहिजे, त्यावरुन(सकारात्मक प्रतिसादांबद्दल गुहांनी निदान त्या लेखात काहीच चर्चा केलेली नाही) आंतरजालीय वाचक कसा असहिष्णू आहे हा निष्कर्ष पुरेसा व्यापक नाही असं वाटतं.
याचाच अर्थ इथे कलाभान व लोकभान समप्रमाणात आहे, त्याचे कारण तुमच्या वरील परिच्छेदात स्पष्ट होतं.
मतप्रदर्शन करणं सोपं आहे, पण काय बघायचं हे कुठे कळतय? बिल गोम्पेर्ट(?)चं "what are you looking at" किंवा हॅल फॉस्टरचं "Art Since 1900" वाचावं तर मॉडर्न आर्ट म्हणजे काय ते कळेल असं मार्गदर्शन मिळालं, ह्या धर्तीवर एकूणचं दोन्ही बाजूने प्रयत्न व्हावेत.
+१.
कशाचा उपयोग होईल?
किती प्रयत्न केला म्हणजे तो पुरेसा होईल ते मी सांगू शकत नाही; पण प्रयत्न आणि उपलब्धता वाढत आहेत हे नक्की दिसतं आहे. सुरुवातीला 'चिन्ह'चे अंक मुंबईबाहेर मिळणं दुरापास्त होतं. आता त्यांनी सोशल मीडिआचा वापर करून, अनेक ठिकाणी जाहिरात करून लोकांना पोस्टानं अंक मागवायला प्रोत्साहन दिलं आणि तो प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला. अथक परिश्रम वगैरेचं माहीत नाही, पण प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडिआ ह्या दोहोंच्या माध्यमातून कलाकार नक्कीच पूर्वीहून अधिक लोकाभिमुख झालेले दिसतात. विदा माझ्यापाशी नाही, पण २०१२चे प्रमुख दिवाळी अंक पाहिलेत तर माझा मुद्दा लक्षात येईल.
कळलं नाही.
मला वाटत नाही. कारण वर माझी असहमती ही ह्या गोष्टींसाठी होती -
चित्रपटाच्या बाबतीत हा आक्षेप मला मान्य आहे (माझाच ऐसीच्या दिवाळी अंकातला लेख पाहा), पण इतर दृश्यकलांच्या बाबतीत नाही. ह्या मुद्द्याचा लोकांच्या कलाभानाशी संबंध नाही; तर आपली कला आंतरराष्ट्रीय पातळीवर उठून दिसावी इतक्या दर्जाची आहे, असा तो मुद्दा आहे.
मध्यमवर्गीय रसिक अभिजात आणि समकालीन चित्रपटांचादेखील आस्वाद घेताना दिसतो एवढाच माझा मुद्दा होता. त्यातून त्यांची समज कितपत वाढली आहे ते पाहिलं तर (निदान जालावर मला दिसणारं चित्र) फारसं आश्वासक वाटत नाही.
दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवेत हे ठीक, पण माझा स्वत:चा पिंडच पाहत पाहत शिकण्याचा आहे. ही पुस्तकं मी चाळली आहेत; तरीही अशा पुस्तकांतून शिकण्याचा माझा पिंड नसल्यामुळे त्यांचा उपयोग होतो किंवा नाही हे सांगण्याला मी नालायक आहे. त्यापेक्षा चांगली-वाईट चित्रं पाहत जावी आणि नजर हळूहळू तयार करावी हे मी पसंत करतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शिक्षण
ह्या वर्गाच्या मताला नक्की कुठे किंमत दिली जाते? वृत्तपत्र-वाचकांच्या पत्रव्यवहारातून,आंतरजालावरील मासिकातील लेखांच्या कमेंट्सवरुन किंवा फेसबूकच्या लाईकवरुन/पोस्टवरून एकूण वाचकांच्या समजेबाबत निष्कर्ष काढणं किंवा ह्या वर्गाचं काय करायचं असा विचार करणं फारसं गरजेचं नाही.
ह्या परिच्छेदातील ठळक ठशातील भागाने माझा तसा समज झाला
आणि मध्यमवर्गाचा सहभाग म्हणाल तर मुंबई किंवा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येऊन पाहा असं सांगेन. गेल्या २०-२५ वर्षांत विविध देशांतले चित्रपट वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसाला उपलब्ध झाले. मुंबई-पुण्याखेरीज आज महाराष्ट्रातल्या अनेक गावांत नियमित फिल्म क्लब आणि महोत्सवांसारखे उपक्रम चालू आहेत
पण
जालावरून चित्र मांडणं थोडं अवघड आहे, पण चित्रपटांना लावलेली हजेरी ह्याशिवाय कोणतं दुसरं परिमाण लावणार समज जोखायला. दो बिघाच्या वेळचा आस्वादक आणि आजचा आस्वादक ह्यांच्यात नेमका कोणता फरक सांगू शकतो? एकतर तेव्हाची झाकली मूठ आता खूली झालीये किंवा माध्यमांच्या लोकशाहीकरणामूळे नक्की परिणामकारकता शोधणं अवघड होऊन बसलय.
माझा मुद्दा असा होता, की कलाकारच जर पाश्चात्यांच्या प्रभावाखाली असतील तर लोकांचे कलाभान उंचावण्यासाठी प्रयत्न कसे करु शकतील, किंवा कलाशिक्षणासाठी विद्यालयांमधे काय प्रयत्न होतात की रेडी-फॉर-मार्केट शिक्षण तिथं मिळतं? अर्थात त्याला छाया डोळस ह्यांच्या लेखाची पार्श्वभूमी होती, त्याव्यतिरिक्त माहिती माझ्याकडे नाही.
सहमत, मी ह्या बाबतीत माझा अनुभव सांगतो, मला स्वतःला व्हॅन गॉगचं "स्टारी नाईट" हे चित्र आवडलं, ते जेवढ्या वेळा पाहिलं तेवढं जास्त आवडलं, त्यात काय पहा हे सांगणं कदाचित मला जमणार नाही, पण ह्या चित्राबरोबरच व्हॅन गॉगची मनस्थिती, ११ तार्यांची गोष्ट, सिप्रस झाडाची गोष्ट, शोकाची उपमा ह्या गोष्टी समजावून घेतल्यावर चित्र वेगळ्या पद्धतिने पहावं काय असा विचार मी करु लागलो, कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी ते मला गरजेचं वाटू लागलं.
ताजा व्रुतांत काय म्हणे?
अजुन वि.हि.प. ची निदर्शने शांततामय मार्गाने चालू आहेत?
प्रदर्शन बघायला येणार्यांची संख्या वाढली ? कमी झाली?
बंदोबस्त कसा आहे? प्रदर्शन बघीतलेल्यांचे काय मत?
समृद्ध लोकशाहीत अशी मतमतांतरे होणे, शांततामय मार्गाने लोक अभिव्यक्त होणे, कला प्रचार प्रसार इ. माध्यमातुन आर्टीस्ट व लिबरल्स मंडळींना आपापली भुमीका (कोण म्हणतेय फुटेज ?) मांडायला मिळणे. सगळेच कसे (प्लॅन केल्यासारखे) आखीव रेखीव विन-विन-विन (कन्झर्व्हेटीव्हस- मेडीया- लिबरल्स तिघांकरता)??
का ही बातमी जुनी झाली आहे व नव्या दंग्या धोप्यात विदा म्हणून ठीक अन्यथा असे धागे दोन दिवसाच्यावर परत उकरणे हे डाउनमार्केट/ घाटी प्रकरण आहे? नाही म्हणजे १५ मार्च पर्यंत अजुन हे प्रदर्शन आहे तोवर एकदा विचारावे म्हणले?
तपती गुहा-ठाकुर्ता यांचं
तपती गुहा-ठाकुर्ता यांचं "मॉन्युमेंट्स, ऑब्जेक्ट्स, हिस्टरीजः इन्स्टिट्यूशन्स ऑफ आर्ट इन कोलोनियल अँड पोस्टकोलोनियल इंडिया" (दुव्यावर पूर्ण पुस्तक पीडीएफ मध्ये उपलब्ध) हे पुस्तक सध्या वाचतेय.
वाचताना या धाग्याची आठवण झाली.
आधुनिक काळात साम्राज्यवादी आणि बंगाल मध्ये राष्ट्रवादी चौकटीतून विविध भारतीय कला, रसशास्त्र, इतिहास, स्थापथ्यशास्त्र वर झालेल्या चर्चा, त्यांच्या संकल्पनांमध्ये घडून आलेले मूलभूत बदल, आणि पुरातत्त्वविभाग, संग्रहालय, वगैरेंसारखे नवीन संस्थात्मक पद्धतींचा या सगळ्यावर परिणाम, अशा अनेक विषयांवर सखोल संशोधन आणि विचारप्रवर्तक मांडणी आहे.
पुरातत्त्व विभागाच्या इतिहासाचा आढावा बाबरी मशिदीच्या प्रकरणात या संस्थेने घेतलेल्या भागापर्यंत येतो. "नग्नता" च्या विषयाचा राष्ट्रीय अस्मिता आणि भावनांच्या संदर्भात बदलत्या विचारांचा ही आढावा आहे - "दीदारगंज यक्षी" या शिल्पाच्या इतिहासाद्वारे, आणि हुसेन यांच्या चित्रांना झालेल्या विरोधाद्वारे.
धन्यवाद
दुव्यासाठी धन्यवाद.
दुव्याबद्दल धन्यवाद. या
दुव्याबद्दल धन्यवाद. या पुस्तकात मांडलेल्या विचारांवर स्वतंत्र लेख अथवा लेखमाला लिहावी ही विनंती.
न्यूड कलाचित्रे ही मुख्यतः स्त्रियांचीच का असतात?
दोन वेगवेगळे मुद्दे :
१. मी आविष्कार स्वातंत्र्याचा समर्थक असूनही असे विचारावेसे वाटते , की न्यूड कलाचित्रे ही मुख्यतः स्त्रियांचीच का असतात? पुरुषी फॉर्म मध्ये मोहकता असू शकत नाही काय? (निदान स्त्रियांसाठी?)
२. आमच्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये एक महागडे काष्ठ-शिल्प आहे, ते सरळ-सरळ स्त्री-जननेंद्रियाचे सूचक आहे. आसपास श्रीमंती फर्निचर, गालिचे आहेत . तुंम्ही यशस्वी झालात म्हणजे तुम्हाला अनेक स्त्री-जननेंद्रिये उपलब्ध होतील असा सबलिमिनल संदेश उघडपणे दिसतो . याला एक स्त्रीवादी (व पुरुष-सत्ता-विरोधी !) म्हणून माझा आक्षेप असणे चूक आहे का?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
पुरुषी नग्नता
एकारलेले कट्टरवादी मात्र लिंगनिरपेक्ष असावेत असं वाटण्याचं कारण -
Artist assaulted for exhibiting gay works
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एकारलेले मंजे काय?
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.