मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मराठी विश्वकोशातील माझे पणजोबा कै विठठल सीताराम गुर्जर यांच्या वरील कै. स गं मालशे यांनी लिहीलेली नोंद नुकतीच वाचली. मला ही नोंद धेडगुजरीपणे, अर्धवट माहितीवर, एकंदर "उरकून" टाकायचे अशा थाटात लिहीलेली वाटली. या एका नोंदीवरून विश्वकोशातील इतर नोंदींच्या दर्जाचा अंदाज बांधला तर मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने तयार केला गेलेला विश्वकोश कितपत विश्वासार्ह मानायचा असा प्रश्न पडतो.
-------------विश्वकोशातील नोंद----------------------------------------
गुर्जर, विठ्ठल सीताराम : (१८ मे १८८५ – १९ सप्टेंबर १९६२). मराठी कथाकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशोळी ह्या गावी. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात ते दाखल झाले; बी. ए. मात्र झाले नाहीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे हे शिष्य होत. मासिक मनोरंजनाचे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र हे त्यांचे स्नेही होते. त्यांच्या उत्तेजनाने; तसेच वंग कथाकार प्रभात कुमार मुखर्जी ह्यांच्या कथा मुळातून वाचता याव्यात ह्या इच्छेने गुर्जरांनी बंगाली भाषेचा व्यासंग केला. काही वर्षे मासिक मनोरंजनाच्या संपादनकार्यात ते सहभागी होते.
द्राक्षांचे घोंस (१९३६) हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध झालेला असला, तरी त्यांनी लिहिलेल्या कथांची संख्या सु. ७०० आहे. मासिक मनोरंजन, विविधवृत्त इ. नियतकालिकांतून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बऱ्याचशा कथा अनुवादित-रूपांतरित आहेत. त्यांत पाल्हाळही आढळतो. तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे.
बंगालीवरून त्यांनी काही कादंबऱ्या मराठीत आणल्या. शब्दशः भाषांतरे करण्याऐवजी रोचक रूपांतरे करण्याकडे त्यांचा कल होता. मूळ बंगाली कथा-कादंबरीकार आणि गुर्जरांनी त्यांच्या साहित्यकृतींची केलेली रूपांतरे ह्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :रमेशचंद्र दत्त -जीवनसंध्या (१९०९); प्रभातकुमार मुखर्जी - संसार असार (१९१४), पौर्णिमेचा चंद्र (१९२०), स्वप्नभंग (१९३७), नागमोड (१९४६); शरत्चंद्र चतर्जी -देवदास (१९३७), चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९), शेवटचा परिचय (१९४९); रवींद्रनाथ टागोर - संगम (१९३५).
गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला ह्या नाटकासाठी त्यांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली. कशोळी येथेच ते निवर्तले.
--------------------------------------------------------
या नोंदीबद्दल माझे ठळक आक्षेप असे:
० गुर्जर कशोळीचे नसून कशेळीचे रहिवासी होते
० ही नोंद तयार करण्यासाठी कोणती माहिती आधार म्हणुन वापरली याचा उल्लेख (इंटरेनेट आवृत्तीमध्ये तरी) नाही.
० "बी. ए. मात्र झाले नाहीत." - मला घरातून कळलेल्या माहितीनुसार कै. गुर्जर आजारपणामुळे बीए पूर्ण करू शकले नाहीत. कै गुर्जर ज्या काळात बीए करत होते त्याकाळात शिक्षणात अनंत अडचणी होत्या. आर्थिक अडचणी, घरच्या जबाबदार्यांपासून ते पटकी, विषमज्वरासारखे तेव्हा जीवघेणे ठरणारे आजार शिक्षण अर्धवट ठेवण्यास पुरेसे असायचे. मात्र बीए न होऊ शकलेल्या गुर्जरांचा "द्राक्षांचे घोंस" हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाने एमए साठी नेमला होता, ही माहिती देण्याचे मालशे यांनी टाळले आहे. मला हा खोडसाळपणा वाटतो.
० कोणतीही चरित्रात्मक नोंद ही संतुलित असावी अशी माफक अपेक्षा ठेवणे गैर ठरणार नाही. संतुलीत म्हणजे चरित्रनायकाची बलस्थाने योग्य त्या पद्धतीने नोंदली जायला हवीत. कै. स. गं. मालशे गुर्जरांच्या बलस्थानांकडे साफ कानाडॊळा करतात. वयाच्या ५१ व्या वर्षापर्यंत गुर्जरांनी तीसहजार पृष्ठांचे लिखाण केले असे त्यांच्या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या "धृव" मासिकातील मुलाखतीमध्ये संपादकांनी म्हटले आहे. ही मुलाखत कै. म. ना. अदवंतांनी लिहिलेल्या आणि साहित्य अकादमी तर्फे प्रसिद्ध झालेल्या गुर्जरांच्या चरित्रात यथामूल समाविष्ट केलेली आहे. गुर्जरांनी लिहीलेल्या तीसहजार पृष्ठांचा उल्लेख अक्षरी आहे (म्हणजे एक शून्य चुकून जास्त पडले असंही म्हणायला जागा नाही). आज कुणालाही तीसहजार या आकडयावर विश्वास ठेवणे किती कठीण जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे.
० वरील नोंदीत मालशे म्हणतात की गुर्जरांनी लिहीलेल्या गोष्टींची संख्या ७०० आहे. मराठीतील नामवंत कादंबरीकार कै. दत्त रघुनाथ कवठेकर यांनी मला शाळेत असताना "तुझ्या पणजोबांनी एक हजार गोष्टी लिहील्या" असे माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितले होते. तेव्हा १००० हा आकडा ऐकूनच मला किती अभिमान वाटला होता ते मी शब्दात सांगू शकणार नाही. कै. म. ना. अदवंतांनी लिहीलेल्या चरित्रात गुर्जरांनी स्वत: मांडलेल्या हिशेबात ८००हून अधिक गोष्टी लिहील्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी लिहीलेल्या कांदंबर्या, नाटके, प्रहसने हे वेगळेच.
चरितार्थासाठी एव्ह्ढा मोठा लेखनप्रपंच एखादी व्यक्ती करते तेव्हा ती व्यक्ती लेखनाला मागणी असल्याशिवाय नक्कीच करणार नाही. स्वत: गुर्जरांनी प्रकाशकांचा कधीही अनुनय केला नाही. आणि त्यांच्या हिशेबी स्वभावाचे जे किस्से मी घरात ऐकले आहेत त्यावरून त्यांनी मोबदल्याशिवाय लिखाण केले नसणार हे नक्की. तेव्हा गुर्जरांच्या गोष्टींची संख्या कमी करून कै. मालशे यांनी काय साधले असेल? याला कर्तृत्वावरून बोळा फिरविण्याचा नतद्रष्ट्पणा एव्हढेच म्हणावे लागेल.
० " त्यांत पाल्हाळही आढळतो." - हे पाल्हाळ मूळकथेतून आले की गुर्जरांनी घुसडले याबद्दल मालशे "ब्र"ही काढत नाहीत.
० "गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही." - गुर्जरांचे संगीत नंदकुमार हे नाटक त्यातल्या संगीतासाठी गाजले. गंधर्व नाटक मंडळीने या नाटकांचे प्रयोग केले. नुकत्याच गाजलेल्या "बालगंधर्व" या चित्रपटात याचा ओझरता उल्लेख आहे. हे नाटक आकाशवाणीच्या पुणे केंद्राने जतन केले आहे आणि माझ्या विनंतीवरून दोन वेळा प्रसारित पण केले होते.
प्रतिक्रिया
आक्षेप पोचले. मात्र...
आक्षेप पोचले. मात्र ज्या व्यक्तीने परिचय-लेखन केले आहे ती उत्तरे द्यायला उपलब्ध नसल्याने आता इतक्या वर्षांनी त्यांच्या उद्देशाची शहानिशा करणे अशक्य ठरावे असे वाटते. आणि त्यामुळेच खोडसाळपणाचा आरोप काहिसा आततायी वाटतो. फारतर शहानिशा न करता विधाने केली आहेत इतपत आरोप ग्राह्य समजता यावा असे वाटते
यापैकी ज्या गोष्टींचा आधार तुमच्याकडे आहे त्या विषयी प्रकाशकांना लिहून कळवलेत तर काही दुरुस्ती शक्य होईल असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यात मला खोडसाळपणा असेल असं
यात मला खोडसाळपणा असेल असं काही वाटत नाही. मालशेंना ७५० कथा असण्याचा पुरावा मिळाला असेल तर त्यांनी तो आकडा वापरला असेल. यात खोडसाळपणापेक्षा माहिती मिळण्यातला अभाव हे त्रुटींमागचं मूळ कारण असावं असं दिसतं.
कोणताही विश्वकोष हा कधीच परिपूर्ण असतो असं वाटत नाही. नवी माहिती, नवं ज्ञान सतत मिळत असतं. त्याबद्दल तक्रार करण्यासारखं काही दिसत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
यात खोडसाळपणापेक्षा माहिती
मला ही तेच वाटते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
यग्झॅक्टली!
यग्झॅक्टली!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एखाद्या कर्तृत्वावरून बोळा
एखाद्याच्या कर्तृत्वावरून बोळा फिरवण्याचा उदयोग सर्वत्र चालतो (उदा झाशीची राणी). साहित्य आणि कला क्षेत्रात हे विशेष अहमहमिकेने चालते. हे फार जवळुन बघितल्याने आणि अनुभवल्याने मी सौम्य भाषा वापरू शकत नाही.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
नवं ज्ञान सतत मिळत असतं.
माहिती अपडेट होणार नसेल तर विश्वकोश हा विश्वकोश राहिल का?
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
विश्वही बदलतं आहे.
विश्वाबद्दल आपले असणारे समज सातत्याने बदलत रहातात. तोच न्याय विश्वकोषाला लावायचा, तर माहिती बदलती रहाणार. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय कोषांमधे तेवढं सातत्य दाखवणं अशक्य आहे. छपाई तंत्रज्ञान हे तर काही शतकं जुनं आहे.
(आणि विश्वाबद्दलची जाण काय, विश्वही स्थिर नाही, बदलतं आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मान्य, पण...
गुर्जरांनी लिहीलेल्या तीसहजार पृष्ठांचा उल्लेख अक्षरी आहे (म्हणजे एक शून्य चुकून जास्त पडले असंही म्हणायला जागा नाही). आज कुणालाही तीसहजार या आकडयावर विश्वास ठेवणे किती कठीण जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे.
कठीण, पण अशक्य नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एका ग्रंथालयात वोलटेअरच्या समग्र वाङ्मयाचे खंड पाहिलेले आठवतात. त्यांची संख्या शंभरावर होती, अाणि त्यांतला प्रत्येक साताठशे पानी तरी होता.
विश्वकोशातल्या या नोंदीवर तुम्ही घेतलेल्या आक्षेपांत काही प्रमाणात तथ्य आहे, पण एक लक्षात ठेवायला हवं की सहसा विश्वकोश वाचणारा माणूस समोर आलेला मजकूर तसाच्या तसा गिळत नाही. (निदान मी तरी तसं करत नाही.) उदाहरणार्थ,
अशी दोन वाक्यं वाचल्यानंतर पहिल्या वाक्यावर मी सहसा विश्वास ठेवेन, कारण ते सरसकट खोटं असण्याची शक्यता मला कमी वाटते. पण दुसऱ्या कुणाला जो पाल्हाळ वाटतो तो मला वाटेलच असं नाही, हे मला कॉमन सेन्स म्हणून ठाऊक असतं. त्यामुळे गुर्जरांबद्दल मला दुसऱ्या कुठल्याही स्रोतातून काहीही माहिती नसली तरीदेखील दुसरं वाक्य मी तसंच्या तसं कधीच स्वीकारणार नाही. 'एकही यशस्वी झाले नाही' इत्यादिबद्दल तसंच म्हणता येईल. तेव्हा नोंदीत त्रुटी कमीतकमी असाव्यात हे मान्यच, पण काही त्रुटी अशा असतात की त्यांचा दुष्परिणाम वाटतो त्यापेक्षा कमी होतो.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
वि.सी.गुर्जरांची तीन पुस्तके
धागाकर्त्यास ठाऊक असल्यास प्रश्नच नाही पण वि.सी.गुर्जरांची तीन पुस्तके - पौर्णिमेचा चन्द्र, संसार असार आणि हीरक वलय - DLI मध्ये उपलब्ध आहेत. Author Field मध्ये Gurjar असे घातल्यास सापडतील.
श्री. अरविंद कोल्हटकर
श्री. अरविंद कोल्हटकर यांस,
माहितीबद्दल आभार. "हीरक वलय" बद्दल मला ठाऊक नव्हते. ते या निमित्ताने कळले. धन्यवाद.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
मी स. गं. मालशे यांचा मुलगा.
मी स. गं. मालशे यांचा मुलगा. गुर्जरांवरील त्यांच्या नोंदीवर आक्षेप घेणारा राजीव उपाध्याय (राहणार पुणे) १९९०च्या सुमाराला आय.आय.टी.मध्ये एम.टेक. करीत होता. संगीताच्या संदर्भात तो माझ्या संपर्कात आलेला होता. त्याने मला हा मजकूर काही दिवसांपूर्वी पाठविला होता. मी नोंद काढून पाहिली होती. मला त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. परंतु या गृहस्थाला कोणतेही उत्तर द्यायच्या भानगडीत मी पडलो नाही, कारण त्याने काही वर्षांपूर्वी माझ्यावरही विचित्र आरोप केलेले होते (मी त्याच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतो; मला विज्ञानाची चाड नाही, इ.). त्याची विचार करण्याची पद्धत फार विचित्र वाटते. उदाहरणार्थ, एका नोंदीवरून तो एकदम विश्वकोशावरच घसरू शकतो. शिवाय, आजूबाजूच्या व्यक्तींवर व्यक्तिगत आरोप केल्याशिवाय त्याच्या मनाला स्वास्थ्य लाभत नाही, असे माझ्या ध्यानात आल्यानंतर मी त्याच्याशी संपर्क साधण्याचे सोडून दिले. Rajeev Upadhye's official website पाहिल्यावर तर माझी मते अधिकच पक्की झाली. कशोळी ही चूक दुरुस्त करून कशेळी असे गावाचे नाव द्यावे, या पलीकडे मला नोंदीत काही बदल आवश्यक वाटत नाही. मूळ नोंद ही समतोलपणे लिहिलेली आहे, तिच्यात माहिती आणि थोडे मूल्यमापन अशा दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. खोडसाळपणा अजिबातच नाही. या पलीकडे आता याविषयावर मी कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया न देण्याचे ठरविले आहे. इतरांच्या प्रतिक्रिया पुरेशा स्पष्ट आणि बोलक्या आहेत.
मिलिंद मालशे
वरील प्रतिसादाच्या शैलीचा आणि
वरील प्रतिसादाच्या शैलीचा आणि इतर गोष्टींचा सूक्ष्म विचार करता हा प्रतिसादाचा उपद्व्याप कुणी मुखवटाधारी करीत असावा, असा मला दाट संशय आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
संशयाशी असहमत
संशयाशी असहमत
तसं असेल तर खालच्या
तसं असेल तर खालच्या प्रतिसादातला पितृप्रेमाचा उल्लेख अस्थानी ठरतो. एक काय ते ठरवा बुवा, एक तो चतुर बोलो नहीं तो घोडा बोलो।
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राजीव उपाध्ये
राजीव उपाध्याय ऐवजी राजीव उपाध्ये असे वाचावे.
प्रा. मिलिंद मालशे यांस,मी
प्रा. मिलिंद मालशे यांस,
मी आपणावर "(मी त्याच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतो; मला विज्ञानाची चाड नाही, इ.)." इ. आरोप कधी केले याचा साधार खुलासा करू शकलात तर बरं होईल.
एरव्ही मी पितृप्रेमाने स्फुरलेलं एक कवित्व म्हणून वरील प्रतिसादाकडे दूर्लक्ष करेन.
दि. १९ एप्रिल २०१३
ता. क.
मी जे केले नाही त्याचे श्रेय घेणे मला आवडत नाही. मी आयायटीत एम टेक केले नसून एमेस्सी केले होते. मी हा खुलासा "ठराविक" बेळी करायचा योजला होता. पण माझा विवेक स्वस्थ बसू देईना म्हणून आता करत आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
दि. १९ एप्रिल २०१३ ता. क. मी
दि. १९ एप्रिल २०१३
ता. क.
मी जे केले नाही त्याचे श्रेय घेणे मला आवडत नाही. मी आयायटीत एम टेक केले नसून एमेस्सी केले होते. मी हा खुलासा "ठराविक" बेळी करायचा योजला होता. पण माझा विवेक स्वस्थ बसू देईना म्हणून आता करत आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
नोंदींतील त्रुटी सांगण्याचा
नोंदींतील त्रुटी सांगण्याचा प्रयत्न ठीक आहे, पण खोडसाळपणाचा आरोप योग्य वाटत नाही. लेखात मांडलेल्या त्रुटींचा हिशोब खालीलप्रमाणे
- कशेळीऐवजी कशोळी, ही अत्यंत क्षुद्र चूक आहे. त्याने विश्वासार्हतेत कमीपणा येतो असं बिलकुल वाटत नाही.
- संदर्भ नाहीत, याबाबत इतर नोंदींमध्येही संदर्भ नाहीत असा युक्तिवाद विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करायला अधिक पुष्टीदायक ठरला असता.
- बीए झाले नाहीत, यात विषमज्वराचं कारण 'मुद्दाम, जाणूनबुजून' दिलेलं नाही असा आरोप कशाच्या आधारावर करत आहात हे सांगता येईल का? जे उच्च निकष ज्ञानकोषाला लावले आहेत, तेच निकष तुम्ही पाळले असते तर बरं वाटलं असतं.
- ३०००० पृष्ठं, मुद्दा कळला नाही.
- ७०० कथा ८०० कथा, यातही 'कर्तृत्वावर बोळा फिरवणे' यासारखे टोकाचे शब्द वापरण्याचं कारण दिसत नाही. विपुल कथालेखन केलं, हे स्पष्ट केलेलं आहे.
- पाल्हाळ आढळतो, इतपत गुणात्मक वर्णन करण्याचा हक्क विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्याला असावा.
- अयशस्वी नाटकं, यशाचे निकष काहीसे वेगळे असू शकतात. विश्वकोशात यशस्वी नाटककार कोणाला म्हटलं आहे याचा तपास तुम्ही घेतलेला आहे का? जर गुर्जरांइतकंच यश मिळालेल्याला विश्वकोशात यशस्वी म्हणून मान्यता दिली असेल तर तुमचा मुद्दा लागू होतो.
एकंदरीत तुम्ही काढलेल्या त्रुटींमध्ये इतक्या त्रुटी आहेत, की तुमच्याच लेखनाला तुमच्याच निकषांनी खोडसाळपणा हे विशेषण लागू व्हावं.
राजेश घासकडवी, तुमच्या
राजेश घासकडवी,
तुमच्या प्रतिसादाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर "हास्यास्पद" एव्हढा एकच शब्द मनात येतो. सविस्तर उत्तर उद्या सकाळी देईन. गुरुवार असल्याने विजेच्या उपलब्धतेनुसार माझ्याकडून विलंब होऊ शकतो.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
राजेश घासकडवी,तुमच्या
राजेश घासकडवी,
तुमच्या प्रतिसादाला उत्तर मनात तयार होत असताना एक जाणीव प्रकर्षाने होत राहिली. ती म्हणजे माझ्या ज्या शब्दप्रयोगांना तुम्ही आक्षेप घेतले आहेत ते माझे शब्द्प्रयोग फारच सौम्य होते असे आता वाटत आहे.
मी गुर्जरांवरील नोंदीतील त्रुटींबद्दल लिहायला बसलो त्याला एक निमित्त झाले होते. विश्वकोशाचे एक संपादक रा ग जाधव यांच्या मुलाखतीचा वृत्तांत वृत्तपत्रात आला होता. त्यात जाधवांनी "विश्वकोश हवा कशाला" अशा स्वरूपाचे उदगार काढल्याचे स्मरते. जाधवांच्या अगोदर संपादक असलेल्या मे. पुं. रेग्यानी पण असाच प्रश्न एकदा उपस्थित केला होता. विश्वकोशाशी संबंधित अनेक जण खासगीत हेच बोलून दाखवतात.
विश्वकोश संतुलित/अद्ययावत माहिती देत नसेल (किंवा कालबाह्य माहिती देणार असेल) तर हवाच कशाला, हा प्रश्न गुर्जरांच्या नोंदीतील त्रुटींमुळे मला पण सतावत होता. ही झाली माझ्या लेखाची नैमित्तिक पार्श्वभूमी.
आता पुढचा मुद्दा आपण घेउ...
एखाद्या प्रतिभावंताच्या प्रतिभेचा आविष्कार मला तेव्हाच अचंबित करतो जेव्हा त्या कलाकृतीच्या आशयाबरोबर ती कलाकृती ज्या वातावरणात जन्माला येते ते वातावरण तितकेच खडतर असते तेव्हा. सर्व सुखसोयी उपलब्ध असताना कुणी प्रतिभा दाखविली तर कौतुक वाटते पण अचंबित व्हायला होत नाही. या खडतर वातावरणाला विशिष्ट सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक किंवा राजकीय पदर असतात, तेव्हा हे पदर कलाकृतीच्या आशयाला उठाव आणायचे काम करतात, अशी माझी धारणा आहे. माझ्या या भूमिकेबद्दल मला सध्या चूक की बरोबर ही चर्चा करायची इच्छा नाही.
आता काही उदाहरणे घेऊन मी वर जे काही म्हटले आहे ते स्पष्ट करतो -
मला पाणिनीची प्रतिभा अचंबित का करते तर त्याने व्याकरणविषयक जे नियम त्यांचा आवाका बघता त्यांचे संकलन ज्या ’शिस्तित’ आणि ज्या पद्धतीने केले त्याची कल्पना करणे पण कठीण आहे म्हणून.
रामानुजनची प्रतिभा मला अचंबित का करते, तर ज्या वातावरणात त्याने त्याचे सिद्धांत मांडले ते वातावरण कुठल्याही तर्हेने पोषक नसताना केले म्हणून.
कालिदासाची मेघदूतातील प्रतिभा मला अचंबित का करते, तर त्याने मेघाला जो मार्ग सांगितला तो त्याला कुठुन कसा कळला हा प्रश्न सतावतो म्हणून.
टिळकांची प्रतिभा मला अचंबित करते, कारण टिळकांनी एकाच वेळेला राजकारण (देशव्यापी दौरे, खटले, तुरुंगवास), समाजकारण आणि संशोधन कसं काय जमवलं हा प्रश्न मला अचंबित करतो
सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद मला फारसा रुचला नसला तरी त्यांची प्रतिभा अंदमानातल्या हालअपेष्टांमध्ये धगधगत राहिली म्हणून मला अचंबित करते. कर्वे, आंबेडकरांच्या कर्तृत्वाबद्दल असेच सांगता येईल...
निसर्गाने ही संवेदनशीलता मला दिली हे मी माझे भाग्य समजतो.
गुर्जरांचे कर्तृत्व मला अचंबित करते, त्याची कारणे पण अशीच आहेत. ज्या कशेळी नामक खेड्यात राहून गुर्जरांनी साहित्यसेवा केली त्या गावात आज एसी कारमधून जाणे पण जिकीरीचे आहे. कमीत कमी १० तास लागतात. सध्या रस्ते उत्तम असले तरी वाटेत एकंदर १३-१४ लहानमोठे घाट आहेत. तेव्हा तर बोटीशिवाय पर्याय नव्हता (एस्टी कशेळीत अगदी अलिकडे पोचली). आता तुम्ही कल्पना करा की अशा गावात राहून एका अर्थाने परकीय संस्कृतीशी (गुर्जर कधी बंगालात गेले असणे शक्य नाही) साहित्यसेतू बांधायचा, तो देखिल भाषा शिकायची कोणतीही आधुनिक सोय, आधुनिक वाचनालय नसताना. अशा वातावरणात एखादी व्यक्ती निर्व्यसनी राहून ८००+ कथा, २ डझन कादंबर्या,९ नाटकं इत्यादी निर्माण करत असेल तर त्या कर्तृत्वाने तत्कालीन मराठी समाजाची भूक भागवायचे जे महत्कार्य केले आहे, त्याला दाद द्यायलाच हवी. ही दाद विश्वकोशातील नोंदीत मला अपेक्षित होती.
घासकडवी तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात. तुम्ही नियतकालिकातून क्रमश: येणार्या कथा, कांदबर्यांची उत्कंठा जर तुम्ही अनुभवली असेल तर ज्या काळात किर्तन, नाटक, बोलपट या शिवाय मनोरंजनाचे मार्ग उपलब्ध नसताना गुर्जरांच्या "संपूर्ण गोष्टी"ची लोकांना किती ओढ होती याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.
तुमच्या इतर मुद्द्यांचा विचार मग करतो. तुमच्या आणि इतरांच्यात मला यापुढे संवेदनशीलतेचा अभाव दिसला तर मी पण वरील मालशे यांच्या प्रतिसादाप्रमाणेच एकतर्फी भूमिका घेईन याची नोंद घ्यावी.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
खात्रीखातर मोल्सवर्थ शब्दकोषातून काही शब्दार्थ
सौम्य (p. 868) [ saumya ] a (. S.) Mild, gentle, clement, soft;--as a person or a disposition: mild or gentle; not acrid, acrimonious, harsh, rough, violent &c.;--as a medicine, an operation, a measure, an act. 2 Quiet, still, calm, composed. 3 Belonging or relating to सोम or the moon, lunar.
खोडसाळ (p. 216) [ khōḍasāḷa ] a Properly खोटसाळ.
खोटसाळ (p. 212) [ khōṭasāḷa ] a (खोट & साळ from शाला) Alloyed--a metal. 2 False, dishonest, of a bad school. 3 Counterfeit. 4 Wilful, mischievous, vitious, wicked.
वरचा प्रतिसाद वाचून मला शंका आली की मलाच सौम्य आणि खोडसाळ या शब्दांचे अर्थ चुकीचे वाटत होते का काय! म्हणून पाहिलं, तर खोटसाळ असा मूळ शब्द आहे हे नवीन समजलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अधिक सामग्रीचे परिशीलन हवे
विश्वकोशाच्या विश्वासार्हतेबाबत मत बनवण्याकरिता (माझ्याकरिता) अधिक उतार्यांचे परिशीलन झाले, तर हवे आहे.
विसाव्या शतकातील मध्यम-प्रसिद्ध साहित्यिकांबाबतच्या तथ्यांबाबत मी खुद्द शहानिशा करू शकत नाही - माझ्यापाशी मूळ साहित्यसामग्री तपासण्याचे स्रोत नाहीत.
समीक्षणाची शैली मात्र मी तपासू शकतो. हे काहीसे सैलपणे मी केले.
अ-कुं अक्षरांतील "मराठी भाषा साहित्यिक" असे वर्गीकरण असलेले साहित्यिक, त्यांच्याबाबत उतारे मी तपासले. त्यातल्या त्यात लांब उतारे (उदाहरणार्थ "विंदा करंदीकर") मी बाजूला ठेवले. साधारण १-४ परिच्छेद अस्लेले उतारे, माझ्या संगणकाच्या पटलावरती अर्धा किंवा कमी भाग व्यापणारे असे निवडले. ८-१० उतारे बघितले असतील.
एक जाणवले की समीक्षणात्मक वाक्य एखादे असल्यास बहुतेक वेळी प्रशंनीय गुणांचे वर्णन होते. (एक निंदात्मक वाक्य आणि काही अर्धप्रशंसात्मक उद्धरणे खाली दिली आहेत.) कृती लोकप्रिय नसल्याचा थेट उल्लेख सापडला नाही. बहुधा अनुल्लेखाने अ-लोकप्रिय कृतींची सोय केली असावी, असा माझा कयास आहे.
एका उतार्यात जितकी निंदा तितकीच स्तुती ठळकपणे/समतोलपणे केलेली दिसली :
उतारा : आजागावकर, जगन्नाथ रघुनाथ ; लेखक : जाधव, रा. ग. ; उद्धरण "संतचरित्रांतील अद्भुत चमत्कारांचा आग्रहाने पुरस्कार करून भाविकतेने व ढोबळ रसिकतेने लिहिलेली ही कविचरित्रे प्राय: संकलनात्मक आहेत. ऐतिहासिक दृष्टिकोन, शास्त्रीय संशोधन व पाठचिकित्सा यांचा त्यांत अभाव आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या प्राचीन मराठी संतकवी (भाग १, १९५७), या ग्रंथात अद्ययावत संशोधनाच्या आधारे पंचेचाळीस संतकवींच्या चरित्रांचे त्यांनी पुनर्लेखन केले. या ग्रंथाची प्रस्तावनाही चिकित्सक आहे."
प्रशंसा कमी, निंदा अधिक अशी वाक्ये :
उतारा : कीर्तिकर, कान्होबा रणछोडदास ; लेखक : जोग, रा. श्री. ; उद्धरण "आंगल कवी टेनिसन ह्याच्या प्रिन्सेस नामक काव्यावरून त्यांनी इंदिरा हे अनुवादात्मक कथाकाव्य लिहिले (१८८२). त्यात प्रतिभेपेक्षा परिश्रमच अधिक जाणवतात."
काहीसे आडून निंदाव्यंजक उल्लेख, अर्ध्या प्रशंसेसह :
उतारा : कुंटे, महादेव मोरेश्वर ; लेखक : जोग, रा. श्री. ; उद्धरण "कवित्वापेक्षा त्यांचे विद्वत्व श्रेष्ठ दर्जाचे होते, ह्याची साक्ष ह्या ग्रंथावरून पटते."
उतारा : कानिटकर, काशिबाई ; लेखक : जगताप, बापुराव. ; उद्धरण "तत्कालीन कादंबरी लेखनाचे पाल्हाळादी दोष त्यांच्या कादंबरी लेखनातही आढळत असले, तरी त्यांतील सफाईदार भाषाशैली, वेधक स्वभावचित्रण आणि तत्कालीन स्त्रीजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण लक्षणीय आहे."
नाहीतर प्रातिनिधिक गुणवर्णने अशी :
उतारा : कीर्तने, विनायक जनार्दन ; लेखक : कुलकर्णी, अ. र. ; उद्धरण "साधी व सुटसुटीत भाषा हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य होते."
उतारा : कर्वे, चिंतामण गणेश ; लेखक : धुरी, वि. म. ; उद्धरण "माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा व संक्षेप, सूक्ष्म संशोधन बुद्धी आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत."
उतारा : आपटे, वासूदेव गोविंद ; लेखक : कुलकर्णी, अ. र. ; उद्धरण "त्यांची लेखनशैली सुवोध आणि रेखीव आहे."
उतारा : आपटे, नारायण हरि ; लेखक : इनामदार, श्री. दे. ; उद्धरण "त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे."
वगैरे.
- - -
अधिक काळजीपूर्वक सर्वेक्षण हवे, रकाने ठरवून "शैली" डेटाबेस नीट बनवणे हवे आहे. पण तसे करण्याकरिता माझ्याकडे सध्या सवड नाही.
सारांश : वरील सैल चाचणीतले उतारे वाचून असे भासते, की "गुर्जर" उतार्यातले "पाल्हाळ" असे निंदाव्यंजक समीक्षण या चाचणी-सँपलच्या अगदी टोकाशी नाही. शिवाय "गुर्जर" उतार्यात "तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे" हे प्रशंसात्मक वाक्य लगेच पुढे आले आहे. त्यामुळे मी या उतार्यातील समीक्षणाचे वर्गीकरण "अर्धी प्रशंसा वा समतोल निंदा/प्रशंसा" वर्गात केले असते. कृती लोकप्रिय नसल्याचा थेट उल्लेख (अनुल्लेख नव्हे) हे मात्र "गुर्जर" उतार्यात आढळते, तसे माझ्या चाचणी उतार्यात सापडले नाही.
---
१९११च्या एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये "फिलिप जेम्स बेली" उतार्यातील ही वाक्ये बघा :
http://www.1911encyclopedia.org/Philip_James_Bailey
कवी बेलीच्या गोत्रापत्यांपैकी कोणी सहृदय शिष्यसुद्धा असला तर या उतार्याची धड गत नव्हती.
हे सर्वश्री घासकडवी, धनंजय आणि इतर यांना एकत्रित उत्तर मानावे.
हे सर्वश्री घासकडवी, धनंजय आणि इतर यांना एकत्रित उत्तर मानावे.
वर धनंजय यांनी शैलीचिकित्सेचा जो प्रयत्न केला आहे तो कितपत योग्य आहे याबद्दल मी सांशक आहे (पण त्यानी त्यांची चाचणी सैल आहे हे मान्य केले आहे, ही समाधानाची बाब आहे). याची कारणे पुढील प्रमाणे -
० विश्वकोशासारखा दुसरा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पण रेंगाळलेला प्रकल्प म्हणजे डेक्कन कॉलेजचा Historical Dictionary हा प्रकल्प. १९८८ मध्ये या प्रकल्पाचे काम जाणून घेण्यास मी तिथे गेलो होतो. तेव्हा प्रा. जोशी त्याचे प्रमुख संपादक होते. त्या प्रकल्पाची तेव्हाची माहिती देताना प्रा. जोशी म्हणाले की एखाद्या शब्दाच्या अर्थाच्या निश्चिती करताना तो शब्द ज्या ज्या ज्ञानशाखांशी निगडीत आहे त्या सर्व शाखांचे विद्वान एकत्र बसून अर्थाची निश्चिती करतात आणि मग त्या शब्दाची dictionary entry तयार होते (हे मी स्वत: डॊळ्याने बघून आलो आहे). माझ्या माहितीप्रमाणे विश्वकोशाचे काम वेगळ्या पद्धतीने चालते. नोंदींचे काम विषयतज्ञाकडे सोपवले जाते. या नोंदी तयार करण्यासाठी डेक्कन कॉलेजचा Historical Dictionary च्या प्रकल्पा सारखी कोणतीही rigorous पद्धत प्रा. मे. पुं. रेग्यांबरोबर झालेल्या असंख्य भेटींमध्ये मला आढळून आली नाही. नोंदलेखकाच्या ’विद्वत्ते’वर श्रद्धा एव्ह्ढेच विश्वकोशाच्या नोंदीचे qualification. सबब, धनंजय यांनी दिलेले उतारे आणि उदाहरणे ही त्या त्या नोंद लेखकाची वैयक्तिक मते ठरतात. त्या साहित्याचा आस्वाद घेतलेल्या समाजाची ही मते कितपत मानता येतील, हा प्रश्न उरतोच. या शिवाय नोंदींच्या ’नायकां’नी त्यांच्या आयुष्यात केलेले एकूण काम आणि नोंदींमध्ये घेतलेली कामाची दखल हा मुद्दा उरतोच. शैलीदर्शक वाक्ये तपासताना नोंदनायकांची कालानुक्रमे यादी तयार केली तर "पाल्हाळ" ही शैली त्या काळाचे वैशिष्ट्य होती का लेखकाचा दोष होता यावर प्रकाश पडेल. आणि गुर्जरांनी रुपांतरे केली असल्याने हे "पाल्हाळ" मूळ साहित्यकृतीतून आले की गुर्जरांनी घसडले या मुद्द्याचा मी पुन्हा उच्चार करतो.
० "कृती लोकप्रिय नसल्याचा थेट उल्लेख (अनुल्लेख नव्हे) हे मात्र "गुर्जर" उतार्यात आढळते" - धनंजय
मी माझ्या मुलीला ती साधारण पाचवीत असताना "एकच प्याला" हे नाटक दाखवायला गेलो होतो. तेव्हा बालगंधर्व मध्ये जेमतेम दोन रांगा भरल्या होत्या. यावरून "एकच प्याला"वर नवी नोंद लिहीताना "एकच प्याला" नाटक लोकप्रिय ठरले नाही असे लिहायचे का? किंवा ते लोकप्रिय कसे ठरले अशी शंका उपस्थित करायची का? किंवा नव्या संचातील संगीत सौभद्रला गर्दी जास्त होत असेल तर ते "एकच प्याला" पेक्षा जास्त यशस्वी नाटक मानायचे का?
गुर्जरांची कृती जर लोकप्रिय नव्हती तर त्यांच्या लेखनाला शेवट पर्यंत मागणी का राहिली? गंधर्वनाटक मंडळीने त्यांची नाटके का केली? आकाशवाणीने संगीत नंदकुमार जतन का केले? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. ही नाटके मागे पडली याची कारणे नाटकांचा आशय की नाटक मंडळीचे आर्थिक आणि तत्कालीन राजकीय/सामाजिक अस्थैर्य? हे ही प्रश्न अनुत्तरीत राहतात.
धनंजय यांनी मूल्यमापनात्मक शैलीचे काही निकष सांगितले आहेत. मी आता साहित्यिकाचा मोठेपणा ठरविण्यासाठी आणखी एक निकष सांगतो. विश्वकोशात नोंदलेल्या किती साहित्यिकांवर मृत्युनंतर वृत्तपत्रात अग्रलेख आले आहेत? गुर्जरांच्या मृत्युनंतर अत्र्यांनी "मराठा" मध्ये लिहीलेला दीर्घ अग्रलेख माझ्या पणजीने (गुर्जरांच्या पत्नीने) मला वाचायला दिला होता. सांगायचा मुद्दा एव्हढाच की गुर्जरांनी self-promotion कधिच केले नाही. हे अत्र्यांच्या अग्रलेखात अगदी स्पष्ट आहे. कशेळीत राहून ते त्यांना ते किती जमले असते हा प्रश्न उरतोच. तरी पण गुर्जरांची जन्मशताब्दी शासकीय पातळीवर साजरी झाली (हे तुम्हाका ठाऊक नसेल). माझ्या दृष्टीने हेच खूप आहे.
कलाकार/साहित्यिक लोकप्रिय होण्यात नुसती कलाकृती कारण ठरत नाही, तर इतर अनेक दुय्यम घटक कारणीभूत ठरतात. (मी पूर्वी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख इथे करणे योग्य ठरेल पहा - http://aisiakshare.com/node/952) उदा. कलाकाराचा स्वभाव, त्यांच्याविषयीचे वाद/प्रवाद, कलाकार/लेखकाला लाभलेले देवपिते (godfathers) इ. हे समजायची कुवत तुमच्यात असेल अशी अपेक्षा ठेवतो. एक उदा सांगितल्याशिवाय राहवत नाही. शाळेतून बाहेर पड्ल्यानंतर ब्रिटिशांच्या तेजाने चमकणार्या एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञाच्या "कर्तृत्वा"ने भारून गेलो होतो. पुढे अनेक वर्षे ही व्यक्ती स्वत:चे प्रमोशन कसे पद्धतशीरपणे करत होती याचा उलगडा झाला. TIFR च्या संचालाकांकडे एकदा अत्यंत खासगी week-end पार्टीचे दूर्मिळ निमंत्रण मला मिळाले होते. त्या पार्टीत या परप्रकाशी तार्याच्या(?) तेजाचे रहस्य उलगडले आणि माझ्या समजुतींना पुष्टी मिळाली.
- "एक जाणवले की समीक्षणात्मक वाक्य एखादे असल्यास बहुतेक वेळी प्रशंनीय गुणांचे वर्णन होते. " -धनंजय
- "बीए झाले नाहीत, यात विषमज्वराचं कारण 'मुद्दाम, जाणूनबुजून' दिलेलं नाही असा आरोप कशाच्या आधारावर करत आहात हे सांगता येईल का?" - घासकडवी
स गं मालशे पण मूळचे कोकणातून आलेले मुंबईतील विद्यापीठीय विद्वान! त्यांना कोकणातल्या गुर्जरांचा "द्राक्षांचे घोस" हा कथासंग्रह साहित्याच्या अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठाने नेमलेला माहित नाही, यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. मी या अगोदर केलेल्या खुलाशातील गुर्जर कालखंडाचे सामाजिक संदर्भ मालशांना ठाऊक नसतील तर ती माझ्या दृष्टीने शरमेची गोष्ट तर आहेच, पण मी वापरलेल्या खोडसाळपणाच्या जागी आता "हलकट्पणा" हा शब्द वापरावा का, असा प्रश्न मला सतावत आहे. बीए होऊ न शकलेल्या व्यक्तीचे साहित्य विद्यापीठ स्तरावर अभ्यासले गेले याचा उल्लेख नोंदीत झाला असता तर ती नोंद संतुलित झाली असती. "विषमज्वराचं कारण 'मुद्दाम, जाणूनबुजून' दिलेलं नाही" असा आरोप मी करत नसून "द्राक्षांचे घोस" या कथासंग्रहाच्या अभ्यासक्रमात केलेल्या अंतर्भावाच्या अनुल्लेखाबद्दल मी बोलत आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
माझे वैयक्तिक मत
हे आपले वैयक्तिक मत नाही, तर वास्तव आहे असे कुणी मानावे असे वाटत असेल, तर त्यासाठी याहून अधिक माहिती आवश्यक आहे. 'मी रेग्यांना भेटलो आणि मला तसं वाटलं' हे पुरेसे नाही.
विश्वकोशात त्या त्या क्षेत्रातल्या विद्वानाकडून आलेली माहिती वाचायला मिळायला हवी, की समाजाचे मत? आजच्या मराठी वाचकाला कदाचित गुर्जरांपेक्षा मेघना पेठे आणि कमलेश वालावलकर जास्त महत्त्वाचे वाटत असले, आणि त्यामुळे अद्ययावत विश्वकोशात गुर्जरांची माहिती आलीच नाही, पण या दोघांची आली, तर तुम्हाला ते अधिक आवडेल काय?
लोकप्रियतेसाठी तुम्ही नक्की काय संख्यात्मक निकष लावताहात? ज्या लेखकांना विश्वकोशात लोकप्रिय म्हटले आहे ते कोणते? त्यांच्या तुलनेत तुमच्या पणजोबांच्या लिखाणाची लोकप्रियता कशी ताडून पाहाता येईल?
तुम्हाला जर विश्वकोशाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करायचे असतील, तर खुशाल करा; पण मग त्यासाठी स्वत:च्या पणजोबांऐवजी इतर काही माहितीचा आधार घेतलात, तर वाचकांची ही खात्री पटेल की विश्वकोशाला अविश्वासार्ह ठरवण्यामागे तुमचा काही कौटुंबिक स्वार्थ किंवा व्यक्तिगत आकस नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
"आजच्या मराठी वाचकाला कदाचित
मराठी साहित्याचा इतिहास गुर्जरांची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही हे वास्तव आहे त्यामुळे अद्ययावत विश्वकोशात गुर्जरांची अपडेटेड माहिती हवी आणि त्याबरोबर तुम्ही म्हणता ती मंडळी पण हवीत.
ज्यांच्या मृत्युनंतर वर्तमानपत्रात अग्रलेख आले आहेत ते लोकप्रिय असा सुट्सुटित निकष दिवंगत साहित्यिकांसाठी वापरता येतील.
समाजाच्या मताची दखल घेणारे विद्वान, साधार माहिती देणारे विद्वान हे महत्त्वाचे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
आज सकाळी क्रॉसवर्ड्मध्ये
आज सकाळी क्रॉसवर्ड्मध्ये चक्क्र मारली तेव्हा नुकत्याच प्रकाशित झालेल्या मराठी वाङ्मय-कोश नामक द्विखंडात्मक पुस्तकात गुर्जरांच्या कार्याची भरपूर (म्हणजे दोन पृष्ठे व फोटो) जागा देऊन योग्य ती दखल घेतली गेली असल्याचे दिसले आणि पाहून समाधान वाटले.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
श्री. तर्कतीर्थ यांचे विवेचन हास्यास्पद
मालशे यांनी गुर्जरांवर लिहिलेल्या टिपणात मला फारसे आक्षेपार्ह काही दिसून आले नाही. हे एक निरुपद्रवी टिपण आहे. श्री. तर्कतीर्थ यांच्या या लेखात आणि प्रतिसादात मात्र मला अनेक हास्यास्पद गोष्टी दिसून आल्या.
मृत्यूनंतर वृत्तपत्रात लेख छापून येणे, हा लोकप्रियतेचा निकष असावा, असे विधान तर्कतीर्थ यांनी केले आहे. ते अत्यंत हास्यास्पद आहे. महात्मा फुले यांच्या मृत्यूची साधी बातमीही पुण्यातील त्या काळच्या मान्यवर दैनिकांनी दिली नव्हती, अग्रलेख तर दूरच. टिळकांचा केसरीही त्यात आहे. तर्कतीर्थांचा निकष लावायचा ठरले, तर महात्मा फुले हे अजिबात लोकप्रिय नव्हते, असे म्हणावे लागेल. वस्तूस्थिती मात्र उलट आहे. समग्र फुले हा ग्रंथ प्रचंड खपतो. त्याच्या आवृत्त्या सातत्याने आऊट ऑफ प्रिंट होतात. तसेच फुल्यांवर शेकड्याने ग्रंथ लिहिले गेले आहेत. गुर्जरांनी लिहिलेल्या ३० हजार पानांपैकी किती पाने आज वाचली जातात?
गुर्जरांच्या कथा नेमक्या किती? स्वत: तर्कतीर्थच याबाबत खात्रीशीर माहिती देत नाहीत. त्यांच्या विवेचनात ७००, ८०० हून जास्त आणि १००० असे तीन आकडे आले आहेत. ८०० हून जास्त म्हणजे ८०१ही असू शकेल किंवा २ हजारही असू शकेल. या आकड्याबात स्वत: गुर्जरांचा पणतूच ठाम नसेल, तर मालशांना दोष का द्यावा?
१००० कथांचा आकडा दत्त रघुनाथ कवठेकर यांनी गुर्जरांच्या पणतूला सांगितला आहे, असे या विवेचनावरून जाणवते. म्हणजे हा आकडा या दोघांतील खाजगी संभाषणाचा भाग आहे. हे खाजगी संभाषण मालशांना माहिती असण्याचे काहीच कारण नाही. बरे अशा खाजगी संभाषणावर (खरे म्हणजे दाव्यावर) इतरांनी का विश्वास ठेवावा? माझे आजोबा इंग्लिश खाडी पोहून गेले होते, पण त्याची कोणी दखलच घेतली नाही, असा दावा समजा मी येथे केला, तर तो किती विश्वासार्ह ठरेल.
लेखकाच्या मोठेपणाचे तर्कतीर्थांचे निकष फारच गमतीशीर आहेत. तर्कतीर्थांच्या दृष्टीने गुर्जरांचे मोठेपण पुढील गोष्टींवर अवलंबून आहे -
१. गुर्जर हे कशेळीसारख्या दूरवर्ती गावात राहून लिहित होते.
२. कशेळीत आजही एसी कारने जाता येत नाही. कशेळीला पोहोचण्यासाठी १० तास प्रवास करावा लागतो आणि रस्त्यात १३-१४ घाट लागतात.
३. गुर्जर लिहित होते, तेव्हा कशेळीत जायला बोटीचाच वापर करावा लागायचा.
४. गुर्जर बंगालात गेले नव्हते, तरी त्यांनी बंगाली साहित्याचा मराठीत अनुवाद केला.
५. गुर्जर यांनी निर्व्यसनी राहून लेखन केले.
मोठेपणाची हे निकष हास्यास्पद आणि साहित्यबाह्य आहे. लेखक निर्व्यसनी आहे, म्हणून मोठा होत नाही. त्याच्या लेखनाने मोठा होतो. मी अनेक निर्व्यसनी माणसांना ओळखतो, पण त्यांना कोणीही लेखक म्हणत नाहीत. इंग्रजीतील अनेक महान म्हणवले जाणारे लेखक नुसतेच व्यसनी नव्हे तर दुर्वर्तनीही होते. पण, म्हणून त्यांचे लेखक म्हणुन असलेले मोठेपण इंग्रजी समाजाने नाकारले नाही. निर्व्यसनी असण्याचे कौतुक फार तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना असू शकते.
तर्कतीर्थ हे गुर्जरांचे पणतू आहेत, त्यामुळे तर्कतीर्थ यांना गुर्जरांविषयी विषयी अधिक आदरभाव असणे साहजिकच आहे. पण स. ग. मालशे हे काही गुर्जरांचे पणतू नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात तर्कतीर्थांसारखा जास्तीचा आदरभाव असण्याचे कारण नाही, तो अपेक्षितही नाही. त्यांनी लिहिले ते थोडेसे सैल असले तरी आक्षेपार्ह मात्र नाही.
निकष
नेहरूंच्या मोठेपणाबद्दल तर्कतीर्थांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
Image: Nehru lights a cigarette for the then British high commissioner's wife
Photographs: Homai Vyarawalla/Alkazi Collection of Photography
अवघड आहे. धागावर
अवघड आहे. धागावर काढण्यापेक्षा विठ्ठल गुर्जरांची माहिती देणारा आंतरजालावर नवा लेख लिहिला असता तर काळाच्या पडद्या आड गेलेल्या माणसाची नवीन पिढीला काही तरी माहिती मिळाली असती. अमुकतमूक पुस्तकाने दखल घेतली. हे तिर्हाईतानेही सांगितल्यास इतरांनी दखल घेण्यास उपयूक्त असू शकत. पण आप्तस्वकीयांचे हितसंबंध जपणार्या व्यक्तीने तेही अशा पद्धतीने सांगितल्यास लोक बोलणार नाहीत, पण संबंधीत पुस्तकास किमान नवागत लोक हातही लावायचे टाळतील. आंतरजालापुढे छापील पुस्तकांचा वाचकवर्ग असा तो किती ? स्वतःच्या आप्तस्वकीयांची भलावण करून हवे असणेही समजता येते, पण कौतुक असे जबरदस्तीने करवून घेता येते ? एखादी व्यक्ती जी स्वकतृत्वाने पुरेशी मोठी आहे, तीला मोठीच म्हणा हि सक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा मोठी करते का ? आपल्या अशा वागण्याने इतरांच्या मनातील प्रतिमा उंचावण्या एवजी तडा तर जाणार नाही याचा चाहत्यांनी विचार करण्यास वाव आहे असे वाटते.
दोन लेखकांच्या पुढच्या पिढ्यांनी एकमेकांवर अनुत्पादक व्यक्तीगत टिका करून काय साधले असा प्रश्न पडला ? खासकरून राजीव उपाध्ये यांनी या धाग्यावरील बहुसंख्य प्रतिसाद देणारी मंडळी आपल्याशी सहमत नाहीत हे लक्षात घेऊन, आपल्या समर्थनाचा पुन्हा एकदा अट्टाहास मांडण्यापुर्वी, आपल्या शिवाय इतरांच्या प्रतिसादांना revisit करण्याएवढी आणि टिका मोकळेपणाने स्विकारण्याची खेळाडू वृत्ती दाखवावी असे वाटते. अर्थात ज्याची त्याची मर्जी.
ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.
वात्रटपणा.
एकदा ३ मुलं टाईमपास करत असतात
मुलगा १: तुम्हाला माहितीये? माझे बाबा खूप मोठ्ठे लेखक आहेत. त्यांनी १०० पानं लिहिलियेत.
मुलगा २: हे तर काहीच नाही. ? माझे बाबा त्याहून मोठ्ठे लेखक आहेत. त्यांनी १००० पानं लिहिलियेत.
मुलगा ३: बरं मग?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आणखी एक समाधानाची गोष्ट
आणखी एक समाधानाची गोष्ट लिहायची राहुन गेली...
सदर कोशात वि. सी. गुर्जरांच्या वडिलांच्या (सीताराम बाबाजी गुर्जर) साहित्यसेवेची दखल पण घेण्यात आली आहे. विश्वकोशात सीताराम बाबाजी गुर्जरांचा नंबर लागला आहे की नाही ते तपासले नाही अजुन...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
म.ना. अदवंतांचे समीक्षण
महाराष्ट्रराज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विश्वकोशात विठ्ठल गुर्जरांचा उल्लेख मराठी साहित्याचा आढावा घेतानाही येतो. त्यातील १८९० पासून १९८० पर्यंतच्या नव्वद वर्षांच्या मराठी कथेचे स्वरूप म.ना. अदवंत यांनी व्यक्त केले आहे. विठ्ठल सी. गुर्जरांनी १९१० ते १९६२ या कालखंडात लेखन केले असलेतरी त्यातील १९१० ते १९२०चा कालखंड महत्वाचा असल्याचे, "या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते." असे अदवंत म्हणतात.
"गुर्जरांनी मराठी कथेची दृष्टी बदलली. मराठी कथा आतापर्यंत बोधप्रधान होती; ती त्यांनी रंजनप्रधान केली," ह्याचे महत्व विदीत करताना अदवंत म्हणतात "शेवटी कथानकाला अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकांना विस्मयाचा धक्का द्यावयाचा, या तंत्राचा गुर्जरांनी आपल्या गोष्टींतून अवलंब केला होता. त्याच्या जोडीला त्यांनी कथांतून चुरचुरित संवाद आणले; नर्म विनोद आणला; खेळकर भाषाशेलीही आणली. त्यामुळे त्यांच्या कथांना तत्कालीन वाचकवर्गांच्या मनाची चांगलीच पकड घेतली." अदवंत पुढे म्हणतात "गुर्जरांनी रंगविलेली प्रणयाची सृष्टी मोहक होती. त्यातील रंग भडक नव्हते; पण त्याबरोबरच ती जीवनात खोलवर गेलीही नव्हती." त्यांच्या रचनातंत्राची वैशिष्ट्ये आणि बलस्थाने सागंतानाच अदवंत पुढे "त्यांनी प्रभातकुमार मुखर्जीच्या पुष्कळशा कथांचा मराठीत अनुवाद पण केला आहे. त्यांच्या कथांची या रचनातंत्रामुळे जशी लोकप्रियता वाढली, तसेच त्यांच्या कथांना त्यामुळे मऱ्यादाही पडल्या. त्यांच्या संपूर्ण गोष्टींमधील जीवनदर्शन त्यामुळे उथळ झाले." अशी टिकाही करतात.
विश्वकोशात अदवंत पुढे म्हणतात "योगायोग व रहस्य यांचाच आश्रय त्यांना सतत घ्यावा लागल्याने व्यक्तीपेक्षा घटनांनाच त्यांच्या कथातून महत्व मिळू लागले ; पण चतुर निवेदनशैलीमुळे व रचनेच्या त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमुळे त्यांची कथा कल्पनारम्य असूनही (किंबहुना त्यामुळेच) विशेष लोकप्रिय झाली. १९१०-२५ पर्यंतच्या कालखंडावर गुर्जरांचे अधिराज्य चालले म्हणून हा कालखंड गुर्जरांचा कालखंड किंवा ‘संपूर्ण गोष्टी ’ चा कालखंड म्हणून ओळखला जातो."
संदर्भः मराठी साहित्य (मराठी विश्वकोश) - म.ना. अदवंत
ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.
वि.सी.गुर्जर चरित्र
म.ना.अदवंतलिखित आणि साहित्य अकादमीप्रकाशित वि.सी.गुर्जर चरित्र उतरवून घेण्यास येथे उपलब्ध आहे - २.५८ एमबी.
सर्वश्री अरविंद कोल्हट्कर आणि
सर्वश्री अरविंद कोल्हट्कर आणि माहितगार
आपण दिलेल्या बहुमूल्य माहिती आणि वि.को.तील इतर नोंदीच्या बद्द्ल मी आपला आभारी आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या