राहुल देव बर्मन
संगीतकार राहुल देव बर्मन ह्यांचा आज ७५वा जन्मदिवस आहे. आजही त्यांच्या संगीताची लोकप्रियता टिकून आहे. पाश्चात्य संगीतातले अनेक प्रकार हिंदी सिनेमात आणण्यापासून ते गुलज़ारांच्या मुक्तछंदातल्या म्हणता येतील अशा कवितांना चाली लावण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ही लोकप्रियता आहे. आपले पिता दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांच्याच क्षेत्रात काम करूनही त्यांच्या छायेत न राहता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत येणं हेदेखील त्यांचं कर्तृत्व म्हणता येईल. कित्येक चित्रपटांसाठी आपल्या पित्याला साहाय्य केल्यानंतर १९६१ साली 'छोटे नवाब'द्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांच्या मृत्यूपश्चात प्रदर्शित झालेला '१९४२ : अ लव्ह स्टोरी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट. शम्मी कपूर, राजेश खन्ना ते अनिल कपूरपर्यंत अनेकांचे सिनेमे हिट करण्यात त्यांच्या संगीताचा वाटा होता. एकुलत्या विविधभारतीपासून अनेक एफ.एम. वाहिन्यांचा जमाना आला तरीही आर.डी.चं गाणं रेडिओवर लागत नाही असा एकही दिवस अजून जात नाही. आर.डी.ंच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त ऐसीकरांना काही प्रश्न :
१. तुम्हाला राहुल देव बर्मन महान संगीतकार वाटतात का? असतील तर का? नसतील तर का नाही?
२. तुमच्या मते त्यांची कोणती गाणी महान आहेत?
३. तुमच्या मते त्यांच्या संगीतातले तुम्हाला विशेष प्रिय गुण कोणते?
त्या निमित्तानं आर.डींविषयी आपली इतर मतंही व्यक्त करा.
प्रतिक्रिया
त्यांची कित्येक गाणी आवडतात.
त्यांची कित्येक गाणी आवडतात. महानता सापेक्ष. त्यांना आदरांजली!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋ सारखेच म्हणेन. त्यांची गाणी
ऋ सारखेच म्हणेन. त्यांची गाणी आवडतात. इतरांपेक्षा वेगळी वाटतात. आता नेटसाक्षरतेमुळे त्यांनीही कुठूनतरी आयत्या चाली वापरल्या असे दिसते तरीही ती गाणी आवडणं कमी झालं नाहीय.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
बरीच गाणी खूप आवडतात. काही
बरीच गाणी खूप आवडतात. काही गाणी नाही. महान आहेत/नाहीत, इतरांना वाटतात/नाही वाटत याच्याशी घेणं-देणं नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
राहुल देव बर्मन
राहुल देव बर्मन एक लोकप्रिय संगीतकार होते, आजही त्यांच्या बर्याच रचना लोकप्रिय आहेत.
मला आवडणारी गाणी - 'क्या यही प्यार है', 'फिर वही रात है, रात है ख्वाबोंकी', 'तेरे बिना जिंदगीसे', 'चुरा लिया है तुमने जो दिलको', 'नाम गुम जायेगा', 'इस मोड से जाते है', 'खाली हात शाम आयी है', 'बचना ऐ हसिनो', 'प्यार हुआ चुपकेसे' वगैरे.
रॉकचे हिंदी गाण्याबरोबरचे फ्युजन त्यांना मस्त जमले होते, पण त्याचबरोबर तुलनेने कमी पण त्यांची काही समधुर(मेलडी) गाणीही फार आवडतात.
राहूल बर्मन ह्यांचा काळ हा किशोर कुमार आणि आशा भोसले अशा पाश्चिमात्य संगीताच्या बाजूला तुलनेने अधिक झुकलेल्या दिग्गज गायकांचा होता, हे तिघेही मला थोडे बंडखोर स्वभावाची, नविन वाटा शोधणारे, प्रयोग करणारे वाटतात, तरीही राहुल बर्मन किशोर आणि आशाच्या एवढे प्रतिभाशाली निदान मलातरी वाटत नाहीत, त्यामधे थोडाफार बायस त्यांच्या संगीतातल्या उचलेगिरीमुळे निर्माण झाला असावा. पण एक मुड मस्त करणारा संगीतकार म्हणूनच मी राहूलदेव बर्मन ह्यांची आठवण काढतो.
आँधी ची गाणी अतिशय आवडतात.
आँधी ची गाणी अतिशय आवडतात. एस. डी बर्मन यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालविला असे म्हणेन. अर्थात एस. डी बर्मन यांच्या गाण्यांना (सुन मेरे बंधू रे, मेरे साजन है उस पार, वहां कौन है तेरा) तोडच नाही अन एस. डी बर्मन यांची गाणी ऐकताना हृदयात एक वेगळीच कालवाकालव होते. या उलट आर डींची स्टाइल वेगळी वाटते. जास्त जॉली अन लाईट अशी वाटाते.
राहुल देव बर्मन
राहुल देव बर्मन आवडतात.
त्यांनी गाणी चोरली (असतील तर) म्हणूनच त्या ट्यून्स आम्हाला ऐकायला मिळाल्या.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझ्या माहीतीत पंचमदांचे हे
माझ्या माहीतीत पंचमदांचे हे पहिले गाणं आहे -
लई मंजे लई आवडतं आपल्याला.
उचलल्यास तू ट्यून मूठभर...
आर.डींनी चाली उचलल्या ह्याचा उल्लेख पुन्हापुन्हा येतोय म्हणून - हे आपल्या सिनेसंगीतात सर्रासच होत होतं. शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, सलील चौधरी वगैरे अनेकांनी पाश्चात्य किंवा इतर संगीतातून चाली घेतल्या. संगीतकारांनी वेगळं काय केलं हे माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं. उदाहरणार्थ, वर म्हटल्याप्रमाणे आर.डींंनी इतक्या सहज फ्यूजन केलं की ती गाणी आता परकी वाटतच नाहीत. 'चुरा लिया है'ची सुरुवात ऐकलीत तर असं एक उदाहरण त्यात सापडेल. शंकर जयकिशनसारख्यांनी लोकप्रिय केलेला खोलीभर वाद्यवृंद त्यात येतो, पण त्याआधी जे काय येतं त्यातून त्या वाद्यवृंदाकडे आणि गाण्याच्या मुखड्याकडे जो प्रवास काही क्षणांत होतो तो खास आर.डींचा स्वतःचा आहे. किंवा 'मेहबूबा मेहबूबा'मध्ये सुरुवातीला नुसता एक ठेका येतो. त्यातूनच अलगद (बरोबर हेलन दिसते तेव्हा) दिलखेचक ठेका सुरू होतो. त्यातही एक काही तरी गंभीर किंवा भयंकर आता होणार आहे ह्याची पूर्वसूचना देणारा एक सूर येतो. आणि मग त्या उडत्या ठेक्यासोबतचं बाकी सगळं थांबवून थोडा काळ चक्क बासरीसुद्धा येते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वा! मेहेबूबा गाण्याची आठवण
वा! मेहेबूबा गाण्याची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. अजून एक लई आवडलेले गाणं म्हणजे प्यार हमें किस मोड पे ले आया...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अगदी परफेक्ट
त्यातही एक काही तरी गंभीर किंवा भयंकर आता होणार आहे ह्याची पूर्वसूचना देणारा एक सूर येतो. >>> एकदम सहमत. ठाकूर वीरू व जय ला "ये हीरा गब्बर को हथियार बेचता है, शायद गब्बर से तुम्हारी अगली मुलाकात...." वगैरे सांगायला लागतो तेव्हाच हा ठेका चालू होतो, हे चित्रपटात एकदम जबरी वाटते.
चाली उचलण्याबद्दल - मधे त्याबद्दल येथे किंवा इतर स्थळांवर एक लिस्ट बघितली होती. त्यातील "मूळच्या" चाली ऐकल्या तेव्हा "फार फार तर भास होतो" एवढेच वाटले होते. एकही चाल, एकही संगीताचा तुकडा दुसरीकडे ऐकून तसाच्या तसा आर्डीने किंवा इतर दिग्गजांनी वापरला नसेल असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण एखाद्या गाण्यातील एखाद्या तुकड्यातून काही भाग घेऊन, त्यावर संस्कार करून मग एक वेगळेच गाणे निर्माण करायचे - ते असे की दोन्ही एकापाठोपाठ ऐकली तर काहीतरी साम्य आढळते, पण दोन गाणी एकसारखी वाटत नाहीत - हे माझ्या मते बहुधा जगातील सर्व संगीतकार करत असतील. ज्या चाली "मूळच्या" म्हणून समजल्या जातात त्यातरी अशाच कुठूनतरी आल्या नसतील कशावरून?
आणखी - . . . . . ----
आणखी -
.
.
.
.
.
----
वा!
रोज रोज डाली डाली..काय आठवण करून दिलीत! समेवर पडणारा चष्मा विसरलेच होते मी!
नरम गरमवरून आठवलं, हे गाणं ऐकताना 'अगर तुम न होते' आणि 'सागर किनारे' या दोन्ही गाण्यांची आठवण होते.
अनेक आवडत्या गाण्यांचा धाग्यात उल्लेख आहे. मला भीनी भीनी भोर ही आवडत.
आरडींची बहुतेक गाणी
आरडींची बहुतेक गाणी आवडतात.
http://youtu.be/kq_vWD4lTcw
तूर्तास
सविस्तर लिहायला वेळ नाही आहे त्यामुळे फक्त एकदोन वैशिष्ट्ये -
१. चित्रपटसंगीतात वेगळी वाद्ये, त्यांचे वेगवेगळे प्रयोग करून निराळा 'साउन्ड' आणला.
उदा. अ. 'सत्ते पे सत्ता' मधला 'व्हिलन' अमिताभ जेंव्हा जेंव्हा येतो तेंव्हा पार्श्वसंगीत म्हणून वापरलेला आवाज [गुळणी करताना पाणी घश्यात ठेवून तार स्वरात गायले तर तसा आवाज येईल].
ब. 'क़िताब' चित्रपटातले 'धन्नो की आँखों में रात का सुरमा' मधले घोंघावणारे वाद्य.
(ते सगळे आवाज अंगवळणी पडल्यानंतर ९० च्या दशकात ए. आर. रेहमानने तेच काम केले - नवीन 'साउन्ड' आणण्याचे)
२. ठेकाप्रधान संगीत.
ओपी वगैरेंसारख्याच्या ठेक्यांहून पूर्ण वेगळ्या पद्धतीने ठेका वापरला. तो मूळ गाण्यात इतका अंतर्भूत होतो की तो वेगळा काढल्यास गाणे निष्प्रभ होते.
याचे सर्वोत्तम उदाहरण जे सुचते ते 'तेरे बिना जिया जाये ना' हे 'घर'मधले गाणे. निव्वळ वेगवेगळ्या 'पिच'चे तबले वापरून गायिकेच्या लयीला साथ देण्याची कल्पना फारच सुंदर. लयीचे विखंडीकरण !
इतर काही उदा.
'सत्ते पे सत्ता' मधले 'प्यार हमें किस मोड पे ले आया', 'धा-मा, धा-मा' वाले 'राहों पे रहते हैं, यादों पे बसर करते हैं' हे 'नमक़ीन' मधले गाणे (यात एके ठिकाणी कापूस पिंजणार्या तारेच्या आवाजाचाही वापर आहे), 'बाहों में चले आओ' मधला ठेका व शू:शू: चा वापर, 'मुसाफिर हूँ यारों' मधला ठेका इथपासून ते 'एक लडकी हो देखा तो ऐसा लगा' मधला नुसता तबला, 'डुबुक' आवाज़ आणि सिन्थेसाइज़रच्या सतारीचे दोन दोन बोल असलेला ठेका.
---
आर.डी.वरचा एक लघुपट (१ ता. ५० मि.)
धाग्याचे सार्थक.
धाग्याचे सार्थक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ठेकाप्रधान संगीत
आर.डी.नं गीतांना दिलेल्या संगीताशिवाय ठेक्याचा एक वेगळा वापर पार्श्वसंगीतातही आढळतो. उदाहरणार्थ, 'शोले'मध्ये बसंतीला पकडायला आलेल्या दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी ती टांग्यातून पळू पाहाते आणि ते तिचा पाठलाग करतात तो प्रसंग. ह्यात सुरुवातीला चक्क प्रसिद्ध तबलावादक पं. सामता प्रसादांचा तबला सोलो वापरला आहे. घोड्यांच्या टापा आणि तबला ह्यांच्यात एक गमतीशीर मेळ जाणवतो. अॅक्शन सीनला क्लासिकल तबल्याचा असा वापर हिंदी चित्रपटांत अनोखा होता आणि मोठ्या पडद्यावर स्टीरिओफोनिक साउंडमध्ये तो प्रचंड परिणामकारकही होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
का कोण जाणे पण अभिजात भारतीय
अतिअवांतरः का कोण जाणे पण अभिजात भारतीय संगीताचा चित्रपटातील असांगितीक प्रसंगी चपखल वापर म्हटलं की डोळ्यासमोर 'डेड मॅन वॉकिंग' येतो! बहुदा नुसरत फतेह अली खान (चुभुद्याघ्या) यांचा आलाप शेवटाच्या प्रसंगात वाजतो. त्यामुळे जो काटा अंगावर उभा रहातो त्याला तोड नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आणखी एक वैशिष्ट्य
मुखपृष्ठावर दिलेलं गाणं ('क्या जानू सजन') किंवा 'छोटी सी कहानी से' (इजाज़त) सारख्या गाण्यात दिसणारा आणखी एक आर.डी. टच किंवा संगीतप्रयोग -
त्याच गायिकेचा आवाज तिच्याच गाण्यावर सुपरइंपोज करून एक वेगळा परिणाम साधणं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
क़तरा क़तरा
अगदी हेच लिहिणार होतो. 'रिश्ते बनते हैं बडे धीरे से' यातही हाच प्रयोग आहे. या प्रयोगाचा मला सर्वात आवडलेला आविष्कार म्हणजे 'क़तरा क़तरा मिलती हैं, क़तरा क़तरा जीने दो'. निव्वळ थोर !
आणखी एक प्रयोग
मला सुरांचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने कदाचित पुढील संज्ञा चुकलेल्या असू शकतील पण जे वाटते ते लिहितो.
आरडीचा एक प्रयोग मला आवडतो तो म्हणजे नेहमीच्या सुरावटींच्या किंचित विसंवादी (डिसोनन्ट्) सुरांना पकडून वरच्या-खालच्या पट्टीत गाणे फिरवून आणणे.
उदा. १.
'दैय्या मैं यह कहाँ आ फँसी' या गायला अत्यंत कठीण गाण्यात पहिल्या ओळींनंतर प्रत्येक वेळी विसंवादी 'हाँऽऽ' तान सुरू होते तेथपासून वरची पट्टी पकडून आधीच्याच ओळी पुनरावृत्त केल्या आहेत. कडवे अत्यंत तार स्वरात गाऊन 'तुरुत्तु तुरूत्तु' ने शेवट करून मग धृवपद पुन्हा खालच्या पट्टीत जुळवले आहे ते केवळ 'हे..हे..' अश्या दोन खालच्या पट्टीतल्या स्वरांतून !
उदा. २.
अधिक उत्तम उदाहरण म्हणजे 'जानेजाँ ढूँढता फिर रहा' हे अफलातून गाणे.
किशोरकुमार गात असताना आशा भोसले 'हाँऽ' जी तान सुरू करतात ती किशोरच्या सुरांशी किंचित विसंवादी करून खालच्या पट्टीत साथ देते. तसेच कडव्यात 'ओ मेरे हमसफर, प्यार की राह पर' किशोर गात असताना आशा 'आऽ' असे म्हणत जातात तेही थोडे विसंवादी करून. त्या दोन सुरांच्या मिश्रणातून एक वेगळाच परिणाम प्रत्येक वेळी साधला जातो.
दुसरी गंमत म्हणजे किशोर 'जानेजाँ ढूँढता फिर रहा - हूँ तुम्हें रात दिन - मैं यहाँ से वहाँ' या तीन ओळी गायल्यावर 'मुझको आवाज़ दो- छुप गये हो सनम- तुम कहाँ' या तीन ओळी (आधीच्या ३ ओळींसापेक्ष) वरच्या पट्टीत म्हणतो आणि त्यानंतर येणारी 'मैं यहाँ' ही ओळ आशा एकदम खालच्या पट्टीत गातात. परंतु जेंव्हा आशा किशोरचे हेच कडवे गातात त्यावेळी अगदी वरच्या पट्टीत पहिल्या तीन ओळी, मग पुढच्या ओळी 'मुझको आवाज़ दो- छुप गये हो सनम- तुम कहाँ' अधिकाधिक खालच्या पट्टीत जातात पण किशोरचे 'मैं यहाँ' उत्तर एकदम वरच्या पट्टीत गायले जाते.
थोडक्यात, पुरुष आवाजाने गायच्या ओळी वर चढत जातात तर बरोब्बर उलट गायकी स्त्री आवाजाला दिली आहे. मात्र शेवट 'मैं यहाँ' उत्तराच्या वेळी त्यांच्या गायकींची अदलाबदल होते.
होय.
मलाही ही वरच्या आणि खालच्या सुरांची सरमिसळ मजेदार वाटते.
उत्तरे - आर डी
१. तुम्हाला राहुल देव बर्मन महान संगीतकार वाटतात का? - होय. असतील तर का? त्यांच्या बर्याच गाण्यांत मनाच्या खोल भावनांना हात घालण्याची शक्ती आहे.
२. तुमच्या मते त्यांची कोणती गाणी महान आहेत? - बिती ना बिताई रैना
३. तुमच्या मते त्यांच्या संगीतातले तुम्हाला विशेष प्रिय गुण कोणते? - सुश्राव्यता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.