स्वातंत्र्याचा अर्थ
शनिवारची थोडी रिकामी संध्याकाळ. वेळ घालवण्यासाठी टीव्हीशिवाय दुसरं काही साधन नाही (नेट बंद आणि पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो हल्ली). अश्या वेळी असले भंगार कार्यक्रम लागतात की रिमोट घेऊन या चॅनेल वरून त्या चॅनेलवर उड्या मारणं हाच कार्यक्रम चालु रहातो. अश्या उड्या मारताना DD-Bharati ला थांबले. कोकणातील हिरवीजर्द झाडी, त्यातून वाट काढत , वाचत परिक्षेला निघालेली तीन मुले . फारशी माहीत नसली तरी नीट लक्ष दिल्यावर कळणारी कोंकणी भाषा. जरा रोचक ( हा शब्द मी ’ऐसी ’ मुळे वापरायला लागले) वाटलं म्हणून थांबले. आणि पुढचे दोन तास एक सुंदर अनुभव देउन गेले.
'दिगंत' नावाचा कोंकणी सिनेमा होता तो. त्या तीन मुलांपैकी बुजरा आणि मागे रहाणारा "राया". धनगराचं हुषार पोरगं. बापाला मुळात हा शिकतोय हेच पसंत नाही. " माझ्या शेळ्यामेंढ्यांच्या मुळावर येईल हे शिक्षण" हा त्याचा त्रागा. पण गुरुजी समजावतात ’सरकारची स्कॉलर्शीप मिळालीय त्याला तर जाऊ दे शहरात आणि पुढचं शिकु दे’. राया शहरात शिकायला लागतो. बापाला आपलं स्वप्न कळवतो. "मी आर्किटेक्ट होणार. आर्किटेक्ट म्हणजे घरं कशी बांधायची हे ठरवणारा". हया कल्पनेने धनगर बापाला पहिला हादरा बसतो. ‘आपण धनगर. ही अख्खी धरती आपलीच आणि हा दिवटा घर बांधून देणारा होणार .’ तो पिसाटल्यासारखा माळावर जातो . " एकच घर कशाला . तीन बान्धू. ही हवा अडवू भिंत बांधून . मग हवा येण्यासाठी खिडक्या लावू. " तो बायकोजवळ त्रागा व्यक्त करतो.
पण राया शिकतो. शहरातल्याच एका मुलीबरोबर लग्न करून संसार मांडतो. मुलाचा संसार बघायला वडील गावाहुन येतात. शहरात एका ईमारतीवर फडकणारा झेंडा बघून त्यांना आठवतं; "अरे हा झेंडा मी लहान असताना पाहिलेला". त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना वेळ्प्रसंगी आसरा, अन्न दिलेलं असतं.
"गोवा स्वतंत्र झाला असं म्हणत त्यांनी माझ्या हातात हाच झेंडा दिलेला. मी तो घेऊन खुप नाचलो. पण काय झालं हे मला काही कळलं नव्ह्तं. अजुनही कळलेलं नाही. आता तु एवढं शिकलायस तू सांग. गोवा, आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय ? "
"म्हणजे गोव्यावर पोर्तुगीज राज्य करत होते . त्यांना आपण त्यांच्या देशात पाठवलं"
"मग त्या आधी कोण राज्य करत होतं?"
"होते इकडचेच कोणी राजे. त्यांना पोर्तुगीजांनी हरवलं"
"कसं हरवलं? "
"चांगली फौज हो्ती त्यांच्याकडे. हत्यारं होती."
"म्हणजे ते इकडच्या राजांहून बलवान होते मग बरोबरच केलं त्यांनी"
"पण ते दुसर्या देशातले होते."
"म्हणजे रे पुता?"
"म्हणजे वेगळे होते आपल्याहून . त्यांची चामडी कशी , आपली कशी?"
" ???"
"बरं ते मुळचे इथले नव्हे. फार लांबून आलेले"
"मग आपण तरी मुळचे इथले कुठे? आपले पुर्वज पार कुठे होते. अख्खी धरित्री फिरत इथे आलो आपण. "
या धनगर माणसाला शहरातलं बांधलेपण अस्वस्थ करायला लागतं. उघड्यावरचा उनपाउस झेलायची सवय असणार्याला चार भिंतीतली हवा अस्वस्थ करायला लागते. चोर्या, लहान पोरिवरला बलात्कार या बातम्या त्याला अस्वस्थ करतात.
"हे कसलं स्वातंत्र्य तुमच्या शहरात? जनावरं पण असं करत नाहीत "
एके दिवशी तो नाहीसा होतो. राया चिंतेत. आपल्या वडिलांना इकड्ची काहीच माहीती नाही. कुठे जातील ? काय करतील? तरी तो गावी जातो.
तिथे डोंगरासमोर तेवढ्याच नेहमीसारखाच शेळ्यामेंढ्यांच्या कळ्पात बाप उभा.
तो बापाच्या पायाशी कोसळतो. "का? का असं न सांगता आलास? कुठे वाट चुकला असतास म्हणजे?"
"या पायांना वाटांची सवय आहे. उघड्यावरचीच पावलं ही दिशा कळतात त्यांना. पोरा, वाट चुकायची भीती असते ती तुझ्यासारख्या चार भिंतीत रहाणार्यांना.
हा चित्रपटाचा शेवट नव्हे.
राया परततो. त्याच्या घरी रुक्मीची- त्याच्या बायकोची - एक चिठ्ठी त्याची वाट बघत असते. "नळातुन हवं तेव्हा येणारं पाणी, हवी ती वस्तु हाताशी अश्या सगळ्या सुखसोय़ींच्या जगाची मला सवय आहे पण या सगळ्याचं रक्ताशी नातं आहे असं मला कधी जाणवलं नाही. पण असं नातं तुझ्या वडीलांचं त्यांच्या मोकळ्या रानाशी आहे. हे काय आहे ? काय,कशी आणि कश्याची असते ही ओढ ? हे समजून घेता येतय का हे बघण्यासाठी मी तुझ्या घरी जातेय. परत येइनच. असं समज की ही पिकनिकंच असेल माझ्यासाठी. "
**************************
मला आवडणारे चित्रपट हे साधारण दोन प्रकारातले असतात. एकात विचाराला वाव नसतो. पण सादरीकरण, वेग, अभिनय या सर्वांची एवढी सुरेख गुंफण असते की "हे असं असतं का कधी?" हा विचारही मनात येत नाही. मालामाल विकली,हेराफेरी,अंगुर वगैरे. हा चित्रपट पुर्णंपणे कलाकारांचाच असतो. दुसरा प्रकार म्हणजे ज्यात विचार हाच सिनेमाचा मुख्य नायक. "दिगंत" दुसर्या प्रकारातला.
आपण काही शब्द फार स्वस्त करुन ठेवलेत. स्वातंत्र्य हा तसाच एक शब्द. हे मुलभुत मुल्यांपैकी एक आहे असं आपण म्हणतो . पण स्वातंत्र्याच्या या शुभ्र रंगात, किती रंगांच्या छ्टा दडल्या आहेत हा विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो.
कागदाच्या तुकड्यानुसार एखाद्या जागेचे मालक तुम्ही नसालही. पण ह्या जागेचा आसमंत, निसर्ग हा तुमचा आणि तुम्ही त्याचे असता. जागेवर मालकी असण्यानसण्याची तुम्हाला फिकीरही नसते . तुमची थेट ओळख असलेला निसर्ग हा पार दिशांच्या शेवटापर्यंत-दिगंतापर्यंत- आहे. त्याची रुपे वेगवेगळी एवढंच. एकदा ही भावना तुमच्यात रुजली की दिगंतापर्यंतची पृथ्वी ही तुमचीच. जागेला सीमांनी बांधण्याचा उठवळपणा तुम्ही करत नाही. त्यामुळे भोवताल तुम्हाला घाबरवत नाही. तुमचे स्वातंत्र्याला मालकी, चार भिंतींची मर्यादा यांची बंधनंही उरत नाहीत.
पण हेच तुम्ही मॉडर्न होता तेव्हा या निसगाचं नखही दिसणार नाही असा कडेकोट बंदोबस्त असणार्या घरांमध्ये रहाता. तुमच्या दिशा मोठमोठ्या इमारतींनी सिमीत केलेल्या असतात. इथला आसमंत तुमच्याशी संवाद करत नाही तर तुम्हाला घाबरवतो. मग तुम्ही-स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक- तुमच्या स्वातंत्र्याला नगर,लेन,सोसायटी,ब्लॉक आणि त्यात तुमची खोली अश्या तटबंदीआड एंजॉय करता.
खरं स्वातंत्र्य कोणतं?
(भाषा आणि सबटायल्स चा मेळ घालत बघितल्यामुळे चिठीत काय लिहीलय हे तंतोतंत कळलं नाही. तेवढ्या एका भागासाठी तरी हा सिनेमा परत बघायचाय.)
प्रतिक्रिया
वा! मजा आली.
वा! मजा आली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
झकास....
झकास....
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
मस्त
मस्त लेख. आवडला.
बर्याच दिवसांनी "आम्ही
बर्याच दिवसांनी "आम्ही स्वतंत्र, आम्ही स्वतंत्र; ते बंधक बंधक" असे म्हणूड ओरडणारांस "होल्ड अ मिनिट" म्हणणारे ललित वाचायला मिळाले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आवडलं
छान लिहिलय. आवडलं
यावर गब्बरसिंगांच मत जाणून घ्यायला आवडेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला अजिबात आवडणार नाही.
मला अजिबात आवडणार नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकदा ही भावना तुमच्यात रुजली
एकदा ही भावना तुमच्यात रुजली की दिगंतापर्यंतची पृथ्वी ही तुमचीच. जागेला सीमांनी बांधण्याचा उठवळपणा तुम्ही करत नाही. त्यामुळे भोवताल तुम्हाला घाबरवत नाही. तुमचे स्वातंत्र्याला मालकी, चार भिंतींची मर्यादा यांची बंधनंही उरत नाहीत.
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
वा _/\_
वा _/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भांडवलवादाची टोपी काढली का
भांडवलवादाची टोपी काढली का गब्बरनी आज?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तो
तो कधीकधी माणसात असतो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गब्बर सिंगांनी बरंच काही
गब्बर सिंगांनी बरंच काही अधोरेखिक केलं आहे. पण त्यांची नक्की प्रतिक्रिया काय आहे त्याचा संबंध माझ्या अल्पमतीला लागत नाहीये.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कानडा वो विठ्ठलु / पांडुरंग कांती
कानडा वो विठ्ठलु / पांडुरंग कांती - या गाण्यावर कै. राम शेवाळकरांनी केलेले प्रवचन ऐका. इथे (शेवटचा ट्रॅक ऐका) ... (त्याला निरुपण असा शब्द वापरण्यात आलेला आहे पण निरुपण म्हंजे काय ते मला माहीती नाही म्हणून प्रवचन हा शब्द वापरतोय.). ते प्रवचन "कानडा वो विठ्ठलु" या क्यासेट मधे आहे. ते प्रवचन ऐकलेत की समजेल ... मला काय म्हणायचंय ते.
ह्या गाण्याबद्दल "(कदाचित) ज्ञानेश्वरांची सर्वोत्कृठ रचना" असे उद्गार रामभाऊंनी काढलेले होते त्या प्रवचनात.
मर्यादा या शब्दाचे जे विविध अर्थ आपल्या संस्कृतीतील साहित्यात लावले जातात त्याबद्दल हे गाणं आहे. "पाया पडू गेले तव ... पाऊलची न दिसे" या ओळींबद्दल रामभाऊ जे म्हणतात ते ऐका...
-------
अर्थशास्त्रात "Firm boundaries" हा उपविषय आहे.
दुव्याबद्दल धन्यवाद. अतिशय
दुव्याबद्दल धन्यवाद. अतिशय उत्तम दुवा.
मस्तच.
मस्तच.
लेख अतिशय आवडला!
लेख अतिशय आवडला!
सुरेख लिहीलय!
सुरेख लिहीलय!
क्या बात है! अतिशय आवडले
क्या बात है! अतिशय आवडले लेखन
असेच कसदार येत राहु दे!
पुलेशु
(फक्त चित्रपटाची कथा उघड करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर दिलात तर ज्यांना चित्रपट पहायचाय आणि आधीच रसभंग नकोय त्यांना सोयीचे पडते)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुंदर! बाकी मलाही डिडि-भारती
सुंदर!
बाकी मलाही डिडि-भारती चा असाच अनुभव आलेला, काहितरी रटाळ निरर्थक कार्यक्रम इतर चॅनेल वर चालू असताना एकदा डिडि-भारती पर्यंत पोहचलो आणि तेव्हा 'चेलवू' हा सोनाली कुलकर्णी चा सुंदर सिनेमा पहायला मिळाला (त्या बद्दल बरंच ऐकलं होतं आधी) आणि तेव्हा पासून मी डिडि-भारतीला 'फेव्हरेट' लिस्ट मधे टाकलयं, आवर्जून ते चॅनल तपासत असतो आणि बहुतांश वेळी हाती अशी एखादी सुरेख कलाकृती लागते.
डी डी भा र ती
डी डी भारती हा एकच नंबर च्यानल आहे. जुने जुने सिनेमे आणि शास्त्रीय संगीताचे भारतभर होणारे कार्यक्रम ऐकायचे असतील तर भारतीला पर्याय नाही. विशेष म्हणजे तिथे मध्यंतरी भोपाळ की कुठेतरी झालेल्या ध्रुपद संमेलनाचं प्रक्षेपण चालू होतं. लाजवाब ध्रुपदं आणि नवे नवे कलाकार ऐकायला मिळाले. मजा आली.
डीडी भारतीची
डीडी भारतीची साईट
http://www.bharati.ddgov.in/
कार्यक्रमांची यादी
http://www.bharati.ddgov.in/fpc-schedules.html
डीडी भारतीचं ऑनलाईन स्ट्रीमिंग / ऑन डिमांड होतं का कुठे?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मस्त
चित्रपटाअच्या निमित्तानं लिहिलेलं आवडलं.
.
.
.
भारत ही संकल्पना...."त्यांच्या"पासून स्वातंत्र्य ह्याबद्दल माझ्या डोक्यातला गलबला http://www.aisiakshare.com/node/1104 (देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....)
इथे मांडला आहे.
.
.
.
"स्वातंत्र्य" ह्या संकल्पने छोटेसेच एक -दोन परिच्छेद जीव असणारे माझे दोन धागे :-
स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा) http://www.aisiakshare.com/node/1129
आणि
सुटका (एक लघुकथा) http://www.aisiakshare.com/node/1131
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबा स्वत:च्या लेखांची लैच
मनोबा स्वत:च्या लेखांची लैच झैरात करू रायले हल्ली!
कृपया ह घेणे!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
अगदी अगदी
अगदी अगदी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यप्स
१.माझे लेख लोकांनी वाचावेत असं वाटतं बॉ मला.
२.सुसंगत वाटतील अशाच ठिकाणी स्वतःच्या लेखाचा दुवा द्यायचा माझा प्रयत्न असतो.
(उत्साहाच्या भरात ते तसे होत नसेलही; पण उद्देश सुसंगत ठिकाणी देणे हाच असतो.)
३.काही लेख हे मी केवळ दरवेळी चर्चांमध्ये तेच लिहिण्यापेक्षा एकदाच काय ते लिहून ठेवावं ह्याच उद्देशानं लिहिलेले आहेत.
(काही मुद्दे वारंवार चर्चेत येउ शकतात, आलेले जाण्वले. "विविध ठिकाणचे माझे प्रतिसाद एकत्र करुन मी लेख बनवला " असं खूपदा झालय.)
थोडक्यात, सॉफ्टवेअरवाले म्हणतात तसं templates, किंवा off the shelf components माझ्याकडे तयार आहेत.
तेच reuse करणं सोपं वाटतं.पुनर्टंकन कशाला करायचं उगाच, नवीन मुद्दे नसतील तर ?
पण आमच्यावर मंडळी इतकं लक्ष ठेवून आहेत,(आम्ही दखलपात्र आहोत) हे पाहून छान वाटलं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पुनर्टंकन कशाला करायचं उगाच,
त्या त्या व्यक्तीसाठी ते ते मुद्दे नवीनच असतात. त्या त्या व्यक्तीच्या आकलनात स्वप्रयत्नाने भर पडते आहे तर पडू द्यावी, ती अशा स्पूनफीडिंगने थोपवायला पाहू नये. थोपवणे हा हेतू नसला तरी शेवटी त्याचा परिणाम तोच होतो - "सगळं आहेच तर मी का लिहू" इ.इ. विचारांनी मग लिहीतच नाहीत लोकं आणि संस्थळाची बेशिक पर्पजच डिफीट होते असं मला वाटतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी
"मी" इथे प्रतिसाद लिहिणं हे पुनर्टंकन ठरेल असं वाटतं.
इथे प्रतिसाद लिहिला काय किंवा प्रतिसाद एकत्रित करुन त्या लेखाची लिंक दिली काय हौ डझ द्याट म्याटर?
हा समोरचा धागाकर्ता पुनर्टंकन करतोय असं मला म्हणायचं नाहिये रे बाबा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हा समोरचा धागाकर्ता पुनर्टंकन
तसं अंशतः ध्वनित होऊ शकतं असं वाटल्याने तसा प्रतिसाद दिला, इतकेच. तसं म्हणायचं नसेल तर पास. प्रतिसाद मागे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण आमच्यावर मंडळी इतकं लक्ष
दखलपात्र? अहो, विधायक मोडतोड करण्याची पात्रता आहे तुमची!;)
जास्त शिरयस होऊ नका हो, आम्ही उगाच खेचतो आहोत!!!:D:D
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
कैच्याकै
मला तर वाटलं आज आपण अधिक वैश्विक झालो आहोत, ह्या चार भिंतींमधूनच जगाच्या कोपर्या-कोपर्यातील लोकं एकमेकांशी संवाद साधत आहेत, अनुभव, विचार सगळचं शेअर करत आहेत, सगळं जग हिंडण्याची सोय आणि सुख आज आपल्याकडे आहे, हे असले सिनेमे आपल्या प्रगतीची आपल्यालाच टोचणी लागेल ह्याभावनेपलिकडे काय देतात?
नाही म्हणजे ह्यात काही रुपकात्मक असेल तर ते समजलं नाही, पण एरवी प्रपोगान्डा म्हणून पसरवायला हे बरं आहे की गावकर्यांनो गावातच रहा,शिक्षण वगैरे तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतं.
अपिल टू नेचर आहे, आणि आपण शहरी लोकं विकासाच्या गिल्टमुळे हे असलं पाहिलं की भारावून जातो का?
हे असले सिनेमे आपल्या
फारच संकुचित विचार वाटला बुवा. एरवी बाल की खाल काढत वेगवेगवेगवेगळ्या कोनांतून प्रश्न विचारणार्या 'म'ला काय झालं एकदम?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
रोजनिशी
दिनांक - १२ सप्टेंबर २०१४ -
"अरे गरिबा असा प्रतिमेवर जाऊ नकोस, हा तर मुखवटा आहे, आपल्याकडे तसही मुखवट्यांचं जग आहे, पण वास्तव त्याच्यामागे दडलेलं आहे, शब्दांच्या पलिकडे आणि प्रतिमेच्या आड लपलेलं वास्तव स्वत:च्या परिप्रेक्ष्यातून शोधायचा प्रयत्न कर जरा...", हे असं बोलल्यावर तीला नेहमी सिगारेट प्यायची हुक्की येते, म्हणजे ती एखादाच कश मारते पण उगाच ती सिगारेट बोटावर खेळवत मधेच एखादा कश मारला की अशी पायखाली विझवून टाकायला तीला आवडतं.
हलकेच घ्या वगैरे...
अं?
अं?
***
आता कळलं! हॅहॅहॅ!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हे असले सिनेमे आपल्या
आणि
ते फक्त दोन चित्र समोर उभे करतात. टोचणी लावण्याचा उद्देशानी करत असावेत अस वाटत नाही. टोचणी लागणं न लागणं प्रत्येकावर अवलंबून असतं.
गावातून शहरातल्या स्थलांतरावर आधारीत दिशा नावाचा चित्रपट आठवला. बहुदा सई परांजपे यांचा. नाना पाटेकर आणि रघुवीर यादव प्रमुख भुमिका.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बरोबर, पण मग चित्रपटात आवडलं
बरोबर, पण मग चित्रपटात आवडलं काय नक्की?
ए गपे
गपे.
अशी स्थित्यंतरं होतात तेव्हाही खूप काही हाताला लागतं. survival इतकाच विचार केला तर आपण खूप काही मिळवलेलं असतं.
पण त्याचप्रमाणं दोन बर्याच वेगळ्या जीवनशैलीमध्ये गुणात्मक फरक असतो ना!
आता धनगराचं पोट भरत असेल, पण मन भरतं का ?
अर्थात हे फक्त त्या सिनियर पिढीबद्दल खरय. जशा पिढ्या जातील तसा तो त्रास कमी होतो.
मला त्या कथेतल्या धनगरापुरती गोष्ट पाहिली तर तथ्यपूर्ण असण्याची शक्यता वाटली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संस्कृत हं?
मग स्वातंत्र्याचा अर्थ लागेल, धनगर त्याचं स्वातंत्र्य जपू पहातोय, पण तो किंवा चित्रपट मुलाच्या शहरी जीवनशैलीवर भाष्य करत नाही, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्याने त्याने जपावं असं.
ओके
ओके
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
@मी हे सुद्धा खरं आहेच.
@मी हे सुद्धा खरं आहेच. पण प्रत्येकाला जे जवळ नाहीय ते सुंदर असं वाटतंच. त्यामुळे शहरी माणूस गावाची ओढ आणि गावातला शहरात यायचं स्वप्न बाळगून असतातच. पण जे एकेकाळी आपल्याजवळ होतं ते गमावल्याची भावना ही नवीन मिळवण्याच्या भावनेपेक्षा जास्त खिन्न करते . मागे जाण्याच्या वाटा आपल्या आपण बंद केल्या आहेत आणि पुढे जायची वाट शोधायची आहे या दोन्ही भावनेत जो फरक असेल तोच यात आहे
बाकी प्रतिक्रियांबद्द्ल मनापासून धन्यवाद.
लेख फार आवडला.
लेख फार आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.
किंवा मला यातून काय मिळेल?
स्थलांतरित होणारे फक्त गावकरीच असतात असं नाही. भारतातल्या भारतात इतर शहरांमध्ये फिरणारे लोक आहेत, तसेच भारतातून परदेशात राहणारे लोक आहेत. या सगळ्यांना प्रगतीची टोचणी लागलेली असते अशातलाही भाग नाही. बहुतेकांना ती नकोच असते. तरीही आपली मुळं जिथली असतात ती जागा सोडून दुसरीकडे रुजता येईल का? कदाचित रायाच्या वयात क्षितीजं विस्तारली की रुजता येईल, वडलांना जमणार नाही. रायाच्या पत्नीची मुळं कदाचित कुठेच रुजली नसतील, त्यामुळे तिला हे अनुभव इतरांच्या मार्फत का होईना समजून घ्यायचे असतील.
लेखातला मजकूर वाचता, चित्रपट प्रॉपगंडा नसून माणूस स्थलांतरीत होण्याबद्दल तीन प्रकारातली माणसं, विचारधारा दाखवणं एवढंच करणारा असेल असं वाटतं. स्थलांतरीत होऊ शकणारे राया, स्थलांतरीत होऊ न शकणारे रायाचे वडील का मुळांचा शोध घेणारी रायाची पत्नी हे आपलं आपण ठरवावं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"The Life of the Nomad" by
"The Life of the Nomad" by The Amir ‘Abd al-Qadir (1807-1883) - एक सुंदर कविता आहे. अतिशय आवडती आहे.
http://www.studiesincomparativereligion.com/public/articles/The_Life_of_...
शुक्रवारी बिहारमधून दिल्लीत
शुक्रवारी बिहारमधून दिल्लीत आलेल्या एका टॅक्सी ड्रायवरसोबत तासभर बोलत होतो. त्याच्या बोलण्याचं सार होतं -"दिल्लीतल्या प्रत्येक माणसाचं हृदय आगीने धडधडत आहे, काहीही पाहावं यांच्या तोंडून कूद्गार बाहेर पडतात. यांना कोणाला कोणत्याही नात्याची पर्वा नाही, बाप कुठे जाळला ते विसरलेले असतात. काय म्हणायचं असतं ते कधीच म्हणत नाहीत, काय वरकरणी योग्य दिसेल ते म्हणतात. यांचं मन फक्त आणि फक्त पैशाचा विचार करत असतं. कोणत्या नरकात आलो असे वाटत आहे."
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काय म्हणायचं असतं ते कधीच
काय म्हणायचं असतं ते कधीच म्हणत नाहीत, काय वरकरणी योग्य दिसेल ते म्हणतात. यांचं मन फक्त आणि फक्त पैशाचा विचार करत असतं. कोणत्या नरकात आलो असे वाटत आहे.
काय म्हणायचं असतं ते म्हणणे हा स्पष्टवक्तेपणा झाला. पण समस्या ह्या आहेत की - अ) स्पष्टवक्तेपणा हा मूर्खपणा झालेला आहे कारण प्रेमळपणे व स्पष्ट्पणे (सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात) असलं तरी कोण तुम्हाला बाजूला बोलवून चार शब्द "सुनावेल" ते सांगता येत नाही (अनुभवावरून सांगतोय $$$), ब) पोलीटिकली करेक्ट बोलणं हे च डिझायरेबल व स्वतःचे हितसंबंध राखणारं झालेलं आहे, क) "स्पष्टवक्तेपणा मंजे दुसर्याला दुखावणे, जिव्हारी लागेल असे बोलणे नव्हे" - असे लेक्चर ऐकायला लागते.
------
$$$ याला - "A is equal to B but A is not equal to B" syndrome असे म्हणतात. (मंजे मीच म्हणतो). व्यक्ती मान्य करते की तुमची बाजू बरोबर आहे. पण ती "क्लायंट ला सांगू नकोस" अशी अपेक्षा असते. नेहमीच्याच घिश्यापिट्या सबबी दिल्या जातात - उदा. What you are talking is all theory., किंवा - ते आपले काम नाही, किंवा Truth-telling चा जमाना कधीच संपला.
आणि ज्याचे हितसंबंध राखण्यासाठी आपण स्पष्ट बोलत असतो तो पराकोटीचा "सब्स्टन्स सोडून शब्दांवर लक्ष केंद्रित करणारा" असतो.
पोलीटिकली करेक्ट बोलणं हे च
अगदी खरं. हे जो जितक्या उशिरा शिकला, त्याचा तिथपर्यंतचा कार्यभाग बुडाला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
स्पष्टवक्तेपणा हा मूर्खपणा
स्पष्टवक्तेपणा हा मूर्खपणा झालेला आहे.
पोलीटिकली करेक्ट बोलणं हे च डिझायरेबल व स्वतःचे हितसंबंध राखणारं झालेलं आहे
हे जो जितक्या उशिरा शिकला, त्याचा तिथपर्यंतचा कार्यभाग बुडाला.
बरोबर. तुम्ही "खरें" ना स्पष्ट बोलता येत नाही असं समजून 'खोट्यां"ना काही सुनावलतं तर स्वत:च्या स्वार्थासाठी खरे, खोट्याशी हातमिळवणी करतात. मधल्यामधे तुम्ही मुर्ख.
You are not so important to
You are not so important to be so truthful - असा ही डायलॉग ऐकलेला आहे.
म्हणजेच फडतूस न?
म्हणजेच फडतूस न?
अन असं असूनही, स्पष्टवक्तेपणा
अन असं असूनही, स्पष्टवक्तेपणा "अॅप्रिशिएट" करणारे लोक असतात की. तोंडावर मान्य करतही नसतील कारण इगो आड येत असेल पण त्यांच्या मनात एक चांगली व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा उंचावत असेलच की. तेव्हा स्पष्टवक्तेपणा हा सद्गुणांमध्येच त्रिवार मोडतो.