सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
१. अभिरमन्यु उवाच:
सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव तिने ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली.
… माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी. मी तिच्याशी लग्न लावण्याची, आणि मग त्या आधारे सर्व अभीरांची यादवांच्या दास्यातून सुटका करण्याची स्वप्ने बघत होतो.… अर्थात सुभद्रेला याची काहीच कल्पना नव्हती, पण यादवांच्या कृष्णाला याचा सुगावा लागला, आणि त्याने लगोलग अर्जुनाला कानमंत्र दिला. त्याप्रमाणे मग तो नराधम सुभद्रेला रथात घालून पळवून घेऊन गेला. मी तेंव्हाच प्रतिज्ञा केली, की आता माझ्या जगण्याचे प्रयोजन एकच. कृष्ण आणि अर्जुनाचा सूड, आणि यादवांचा सर्वनाश.
२. अर्जुन उवाच…
संध्याकाळच्या भोजनानंतर प्रासादाच्या बागेत जरा फ़ेरफ़टका मारणे, हा माझा हल्लीचा रोजचाच दिनक्रम. आता वय बरेच झाले, पूर्वीसारखे दूर दूर मृगयेला जाणे आता काही जमत नाही खरे. . फिरताना जुन्या आठवणी मनात गर्दी करतात … … हिमालयातले बालपण, गुरुवर्य द्रोणांकडे धनुर्विद्या शिकणे… द्रौपदीला स्वयंवरात जिंकणे, उलूपी, चित्रांगदा, युधिष्ठिराच्या द्यूत-वेडापायी द्रौपदीची भर सभेत झालेली विटंबना, कीचक-सैरंध्री प्रसंग… …….
अर्जुनाचा मत्स्यभेद आणि द्रौपदी वस्त्रहरण
कीचक आणि सैरंध्री, अर्जुन-उलूपी
महाभारत युध्द, घटोत्कच वध:
… शेवटी युद्धात कौरवांचा पाडाव करून आम्हाला हस्तिनापुराचे राज्य मिळाले, त्यालाही आता पस्तीसेक वर्षे झाली असतील. एवढे मोठे युद्ध झाले, अठरा अक्षौहिणी सेना रणात पडली, आणि शेवटी युधिष्ठिर सम्राट बनला…
पाच पांडव आणि द्रौपदी
सम्राट !!! … हजारो-लाखो विधवांचा सम्राट. संपूर्णपणे मोडकळीला आलेल्या साम्राज्याचा सम्राट. रित्या अर्थ- कोषाचा, रित्या धान्य-भांडारांचा, उजाड- उदास- शापित नगरींचा सम्राट. गिधाडा- कोल्ह्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या लाखो कलेवरांच्या भुतावळीचा सम्राट …
... आत्तासुद्द्धा सम्राट द्यूतशालेत द्यूताचा डाव मांडून बसलेले आहेत. शेजार-पाजारची लहान-सहान राज्ये द्यूतात जिंकून घेण्याच्या प्रयत्नात दंग आहेत…. नकुल-सहदेव बिचारे अश्वशाळेत उत्तम अश्वांची पैदास वाढवण्याचा कसून प्रयत्न करत आहेत… भीम आमची जवळ जवळ सगळी सेना बरोबर घेऊन अनार्यांच्या विविध टोळ्यांना लांबवर थोपवून धरण्यासाठी तिकडे दूर पूर्वेकडे गेलेला आहे… आणि द्रौपदी ?? ती तर महिना-महिना तिच्या कक्षातून बाहेर पडत नाही. गेल्या तीन महिन्यात मला ती दिसली सुद्धा नाही … तिचे पाची पुत्र, भाऊ धृष्टद्युम्न आणि पिता द्रुपद युद्धात पडले, त्या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नाही … तिच्या रित्या आयुष्याची पोकळी भरून काढेल, असे आता काहीही आता शिल्लक नाही ….
आणि मी ? सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन. गांडीवधारी महान अस्त्र-शस्त्रवेत्ता पार्थ. आता केवळ एका शापित, उदास नगरीचा व्यवस्थापक. शस्त्रागारात मी माझे गांडीव केंव्हा नेऊन ठेवले, हेही आता लक्षात नाही माझ्या.…
अरे, हे कोण येत आहे इतक्या घाईने इकडे ? ही तर सुभद्रा… आणि तिच्याबरोबर ते दोन उंच पुरुष कोण ?
"सुभद्रे, काय झाले ? घाबरलीशी दिसतेस ?? "
"अर्जुना घात झाला रे, भयंकर संकट ओढवले आहे तिकडे द्वारकेत… सगळे यादव सुरापान करून एकमेकांचा संहार करत आहेत… कुणीच कुणाचे ऐकेनासे झाले आहे. बलरामदादा आणि कृष्णपण हतबुद्ध झाले आहेत, आणि त्यांनी तुला तातडीने मदतीसाठी बोलावले असल्याचा संदेश घेऊन हे दोघे द्वारकेहून आलेले आहेत …
हे ऐकून मी हतबुद्धच झालो. मग लगेच आम्ही युधिष्ठिराकडे जाऊन त्याला सर्व परिस्थिती सांगितली, आणि उद्याच द्वारकेला जायला निघतो, असे मी म्हणालो.
" असा उतावळा होऊ नकोस अर्जुना, 'पृथ्वीपाल: सदा विवेकेन निर्णयं कुर्यात' असे शास्त्रवचन आहे. आता असे बघ, हे दोघे द्वारकेहून निघाले, त्याला दहा-बारा दिवस लोटले असणार. एव्हाना नक्कीच कृष्णाने यादवांची समजूत घातली असेल. आणि मद्याचा अम्मल राहून राहून किती वेळ राहणार? तो उतरल्यावर यादव शांत झालेच असतील ना ? काळजी करण्यासारखे काहीच नसेल आता तिकडे. बरे, समजा तू अगदी जायचे जरी ठरवलेस, तरी तू एकटा जाऊन तिथे असे काय करणार ? सेना कुठे आहे आपल्याकडे? भीम नेमका कुठे आहे, हेही आपल्याला ठाऊक नाही. इथे असलेली सेना घेऊन गेलास, तर इथल्या सुरक्षेचे काय? चारी बाजूंनी दबा धरून बसलेल्या अनार्यांना आयतीच संधी मिळेल. 'प्रजानाम हितं एव नृपस्य आद्य कर्तव्यं’ असेही शास्त्रवचन आहेच. तस्मात सध्या आपण स्वस्थ राहू. या दोघा संदेशवाहकांनी पुनश्च द्वारकेस जाऊन तेथील सद्यस्थिती काय आहे, ते पुन्हा इकडे येऊन सांगावे, मग त्याप्रमाणे आपण पुढील बेत ठरवावा, हेच इष्ट… "
...मलाही युधिष्ठिराचे म्हणणे पटले. त्याची विद्वत्ता, शास्त्राभ्यास, धर्माचरण, यांना तोड नाही. उगाच नाही धर्मराज म्हणवला जात तो…
पण हे सर्व ऐकून सुभद्रा मात्र भयंकर खवळली.
पस्तीस वर्षांमागे आमचा लाडका अभिमन्यु युद्धात मारला गेला, त्याचे दु:ख आणि युधिष्ठिराबद्दल तिरस्कार अजूनही तिच्या मनात आहे.
… "षंढांनो, तुम्ही बसा बांगड्या भरून इथेच. पूर्वी द्रौपदीताईला भर सभेत ओढून आणताना बसले होताच की. तसेच बसा आताही … माझे माहेर, माझे यादवकुळ संकटात असता तुम्हाला स्वस्थ बसवले तरी कसे जाते? आता मी एक क्षणही इथे थांबणार नाही…. या दोघांबरोबर आत्ताच मी द्वारकेला प्रयाण करते.…
तिचे हे उद्गार युधिष्ठिराच्या अगदी वर्मी लागले. "अप्रबुद्ध स्त्रिये, तोंड सांभाळून बोल, सम्राटाशी बोलते आहेस … आणि तुला ज्या यादवांचा एवढा पुळका, ते युद्धात दुर्योधनाकडून लढले होते हे तू विसरली असशील, पण मी कधीच विसरणार नाही. चालती हो इथून".
अपमान, दु:ख, वंचना, काळजी, संताप यांनी वेडीपिशी झालेली सुभद्रा धावतच अंत:पुरात शिरली.…
… सम्राट सावकाशीने पुन्हा द्यूतागाराकडे वळले…
… मी गोंधळल्यासारखा तिथेच स्तब्ध उभा होतो…
" महाराज, श्रीकृष्ण महाराजांनी तुम्हाला अगदी तातडीने बोलावलेले असताना आम्ही जर तुम्हाला न घेताच द्वारकेला गेलो, तर आमची काय दशा होईल? बलभद्र तर क्षणात आमची चामडीच लोळवतील… दया करा महाराज, कसेही करून आमच्याबरोबर चला".
मी संभ्रमात पडलो. आता करावे तरी काय ? पूर्वी मी असाच संभ्रमात पडलो होतो, तेंव्हा कृष्णाने मला युक्तीच्या चार गोष्टी सांगून युद्ध करायला लावले खरे, पण त्याचा परिणाम काय झाला? सर्वनाशाच ना? मग आता मी काय करावे ???
तेवढ्यात सुभद्रा बाहेर आली. आता ती सावरलेली होती. "अर्जुना, मी जाते आहे, पण लक्षात ठेव, आता मी इथे कधीच परतणार नाही… चला बंधुंनो"…
" सुभद्रे थांब, असा अविचार करू नकोस, अश्या रात्रीच्या वेळी तू फक्त दोघांसोबत नगरीबाहेर पडणे योग्य नाही. तू फक्त रात्रभर धीर धर. उद्या पहाटेच मी द्वारकेला प्रयाण करेन. सैनिकांना तयार व्हायला, मला माझे गांडीव घासून पुसून सज्ज करायला, बाणांचा साठा रथात भरायला एवढा वेळ हवाच. प्रिये, तुझा हा वीर अर्जुन द्वारकेचा प्रश्न चुटकीसारशी सोडवील, आणि लवकरच शुभवर्तमान घेऊन परतेल, याची खात्री बाळग".
…. मग मी भल्या पहाटे दहा घोडेस्वार बरोबर घेऊन रथातून निघालो. बाणांचा मोजकाच साठा बरोबर घेता आला. निरोप देण्यापुरती द्रौपदी बाहेर आली होती. किती जर्जर, क्षीण, मलूल दिसत होती ती... या द्रौपदीसाठी एवढा नरसंहार झाला? की राज्यासाठी? की दुर्योधनाच्या हट्टापायी? … की युधिष्ठिराच्या द्यूतापायी?
थोड्या दिवसांच्या प्रवासानंतर दूरवर द्वारकेची तटबंदी, गोपुरे दिसू लागली, तेंव्हा मला वाटले की सर्व काही कुशल आहे. मात्र वेशीतून प्रवेश केल्यावर काही वेगळेच वाटू लागले. अगदी निर्मनुष्य रस्ते, घरा-घरातून ऐकू येणारे अस्पष्ट हुंदके, रस्त्यांवर इतस्तत: पडलेल्या मानवी अस्थि चघळणारी कुत्री, आसमंतात दाटलेली असह्य दुर्गंधी आणि वर आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे… काहीतरी भयंकर, अमंगल घडले असल्याची ग्वाही माझे मन देऊ लागले.
मी तातडीने श्रीकृष्णाचा महाल गाठला. तिथे ना द्वारपाल, ना प्रहरी, ना उद्यानपाल, ना रक्षक. कोणीही पुरुष तिथे दिसत नव्हता. काही दीनवाण्या स्त्रिया घोळक्या-घोळक्याने इतस्तत: वावरत होत्या. मी धावतच प्रासादाच्या पायर्या चढून श्रीकृष्णाच्या कक्षात शिरलो. त्याचा मधुर पावा वा निर्मळ हास्य कानावर येईल, त्याचे साजरे-गोजरे रूप नजरेस पडेल, ही आशा व्यर्थ ठरली. महालात कुणीही नव्हते. .
माझ्यासोबत आलेले दोन संदेशवाहक म्हणाले, की ते द्वारकेहून निघाले,तेंव्हा समुद्रतीरी तंटा चालला होता. मग आम्ही लगेचच समुद्रतीरी पहुचलो.
तिथले दृष्य भयचकित करणारे होते. सर्वत्र यादवांची क्षतविक्षत कलेवरे पडलेली होती. मोडकी शस्त्रे, लाकडी दंड, फुटकी सुरापात्रे, जिकडे तिकडे पसरलेली होती.… विनाश. संपूर्ण विनाश…
यादवांचा सर्वनाश झाल्याचे स्पष्टच दिसून येत होते....
क्रमशः ....
प्रतिक्रिया
रोचक. चित्रांची रुंदी वाढवावी
रोचक. चित्रांची रुंदी वाढवावी लागेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा भाग १ आहे
ही कथा क्रमशः असून हा भाग १ आहे, असे लिहिण्याचे राहून गेले.
(संपादकः शीर्षकात (भाग १) असे जोडता येइल का?
सुभद्राहरण
पहिल्या चित्रात सुभद्रा हाकत असलेल्या रथात तिसरी व्यक्ती कोण आहे ?
चित्र पाहून सुभद्रा आणि निळी व्यक्ती (अर्जुन) मिळून रथातील तिसर्या माणसाचे (अप)हरण करीत आहेत असे वाटले.
सारथी असावा
रथातील तिसरा माणूस सारथी असावा. सुभद्रा रथ का हाकारते आहे वगैरे मूळ कथेतून वाचले पाहिजे (कुणाला ठऊक असल्यास सांगावे)
पुण्यातेल 'चित्रशाळा प्रेस', मुंबईतील 'अनंत शिवाजी देसाई' 'एम ए जोशी आणि कंपनी' 'मॉडर्न लिथो प्रेस' मळवलीतील 'रविवर्मा प्रेस' आणि बंगालमधील काही कंपन्यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळात अनेक प्रकारची चित्रे (मुख्यतः देवि-देवातांची) लिथोग्राफी पद्धतीने छापून वितरित केली होती. आता या छापील चित्रांना एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. या चित्रकारांपैकी रविवर्मा सारखे काही नामवंत होते, तर काही अगदी अप्रसिद्ध. ही चित्रे स्वस्तात घरोघरी तसबिरी लावता याव्यात, अश्या रीतिने केलेली असत, त्यामुळे त्यातून उच्च दर्जाची कला फारशी दिसून येत नाही.
आपल्यापैकी अनेकांनी अशी चित्रे लहानपणी घरात लावलेली बघितली असतील. आता मात्र ती फारशी दिसून येत नाहीत. उच्च दर्जाचा आग्रह न धरता बघितल्यास ही चित्रे मोठी गंमतीशीर वाटतात. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' मधे अश्या चित्रांवरून अभिनेत्यांना 'पोज' घेताना दाखवले आहे.
खरेतर या चित्रांवर अभ्यास करून एक चांगला लेख लिहिता येईल.
सुभद्रा रथ का चालविते ?
मला आठवते त्याप्रमाणे, बलरामाने सुभद्रेचे स्थळ आधी दुर्योधनासाठी सुचविलेले असते. ते दोघे भेटण्यादरम्यान सुभद्रा-अर्जुनाचे सूत जुळते. मग यावर तोडगा काढण्यासाठी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. श्रीकृष्ण सल्ला देतो की अर्जुनाने सुभद्राहरण करावे परंतु चारचौघांसमोर रथ सुभद्रेने चालवावा. पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुभद्राहरण होते. हा प्रकार कळल्यावर भडकलेल्या बलरामाची समजूत घालताना श्रीकृष्ण म्हणतो, की सुभद्रेने अर्जुनास वरले होते व त्या दोघांनी एकत्र पलायन केले याला अनेक जण साक्षी आहेत. त्यामुळे दुर्योधनाशी सुभद्रेचा बळेंच विवाह योग्य नाही. हे म्हणणे बलरामास पटते (अन्यथा पटले नसते) व संभाव्य रागवारागवी व परिणाम टळतात. अशी एकूण कथा आठवते. तपशील बरेच वेगळे असू शकतील.
वरणभात-भेंडीची भाजी
हे वरणभात-भेंडीची भाजी महाभारत झालं ना? आता थोडं शेवंडंवालं महाभारत वाचू या.
चित्रगुप्त, ही गोष्ट पूर्ण करून (किंवा एकीकडे) हे ही लिहाच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला आठवते त्याप्रमाणे,
दुर्योधन साठी नाही, तर त्याचा पुत्र (बहूतेक) लक्ष्मण याच्याबरोबर सुभद्रेचा विवाह होणार असतो.. अशी कथा वाचल्याचे आठवते आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
सुभद्राहरणाचे वरील चित्र
सुभद्राहरणाचे वरील चित्र संगीत सौभद्र नाटकावरून बेतलेले आहे काय?
मूळ महाभारतात सुभद्रा रथ चालवते किंवा रथात अजून अर्जुन-सुभद्रेव्यतिरिक्त अजूनही एक तिसरी व्यक्ती होती असा कसलाही उल्लेख नाही. किंबहुना सुभद्राहरणप्रसंगी कसलीच लढाई झाली नाही.
------------------------
घणघणतो घंटानाद
अजूनही चित्रे दिसत नाहीत.
अजूनही चित्रे दिसत नाहीत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रोचक
गोष्ट रोचक आहे. यादवी ऐकून माहित असली तरीही आगापिछा माहित नव्हता. अशा प्रकारे, सगळ्या पात्रांना थोडा काळा, थोडा पांढरा रंग दिलेला आवडला.
---
चित्रगुप्तः तुम्हाला स्वतःलाही धागा संपादित करता येईल.
अरुणजोशी: आता चित्रं दिसत आहेत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
आता सर्व चित्रे दिसत आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
छानच!
छानच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान. अर्जुन उलुपी आणि महाभारत
छान. अर्जुन उलुपी आणि महाभारत युद्ध (पहिलं चित्र) आवडली.
सुचनावजा विनंती
अजून एक सुचनावजा विनंती, लेखनात वापरलेली चित्रे उत्तम आहेतच पण ती देताना चित्रकाराचे नाव (ज्ञात असल्यास) किंवा ज्या ग्रंथात ही चित्रे आहेत त्या ग्रंथाचे नाव दिले तर मूळ कलाकाराचे श्रेय अव्हेरले जाणार नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चित्रकारंची नावे
अर्जुन उलुपी चित्र:
चित्रकारः Warwick Goble,
पुस्तकः 1913 edition of Indian Myth and Legend by Donald MacKenzie.
दुवा:
http://mydelineatedlife.blogspot.fr/2010/06/indian-myth-legend.html
अन्य चित्रांविषयी खात्रीलायक माहिती नाही.
पिक्टोरिअल् आर्टस्
तुम्ही दिलेला दुवा भन्नाट आहे. एकाहून एक भारी शैलीतली चित्रे आहेत ! त्याचा हा मूळ दुवा तर प्रचंड मोठा खजिना आहे. डोळ्याचे पारणे फिटले. त्यासाठी आणि वॉर्विक गोबलची ओळख करून दिल्याबद्दल सहस्र धन्यवाद.
Indian Myth and Legend