रामभाऊ बाबासाहेब विसरले !
ज्येष्ठ नेते रामभाऊ बाबासाहेब विसरले यांच्या “कायपण करा पण मंत्री करा” या काव्यसंग्रहाला मराठी साहित्यातील प्रथेप्रमाणे “उत्स्फूर्त यमकदीप” हा प्रकाशनपूर्व पुरस्कार मिळाला. त्या संदर्भाने विख्यात हातवारेफेम अंकर अखिल सगळे यांनी त्यांची मुलाखत घेतली-
अखिल सगळेः- ( दोन्ही हात समांतर दिशेने वर नेत) तुम्हाला पुस्तक प्रकाशन होण्याआधीच हा पुरस्कार मिळाला. कसं वाटतय तुम्हाला ?
रामभाऊ विसरलेः- ( मान व्हर्टिकल एकरेषीय हलवत )
“मला पुरस्कार मिळाल्याने वाटतं आहे छान
कारण त्यामुळे माझ्या कवितेचा वाढला आहे मान !”
अखिल सगळेः- ( दाद देत ) वा वा
पण मला सांगा, तुमच्या् या कवितासंग्रहाची नेमकी थीम काय आहे ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी माझ्या कवितासंग्रहाची थीम दोन ओळीत मी पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहणार आहे
मी होणार आहे केंद्रात कॅबिनेट मंत्री
मग कितीका महाग असेना नागपूरची संत्री !
अखिल सगळेः ( विसरलेंच्या उत्स्फूर्त कवितेमुळं प्रभावित होऊन ) किती नेमकं सांगितलंत तुम्ही;पण मला सांगा नागपूरच्या संत्र्याचा भाव वधारल्यामुळ्ं तुम्हाला जागावाटपात पडती भूमिका घ्यावी लागली का ?
रामभाऊ विसरलेः-
त्या ठिकाणी मी घेत नाही पडती भूमिका
बिनधास्त करतो कुणावरही टीका
माझा विचार आहे पक्का
इतरांना द्यायचा धक्का !
(अखिल सगळेंना विसरलेंची कविता मानवली नसल्याची त्यांच्या चेह-यावरुन दिसले. त्यांनी घाम पुसला. पाणी पिलं आणि पुन्हा सावरुन विसरलेंची कविता क्षणभर विसरुन मोठ्या आवेशानं ते पुन्हा विचारु लागले )
अखिल सगळेः- तुम्ही शीघ्रकवी आहात. ऑन द स्पॉट तुम्ही कविता करता. तुम्ही अर्जंट कवी आहात हे कसं शक्य झालं तुम्हाला ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी त्याचं असं आहे म्हणजे त्याचं सिक्रेट असं आहे की( थोडं थांबत गाल्यातल्या गालात हसत ) कधीही कुणाला इमर्जन्सीला कविता लागली तर आपल्याकडे असावी म्हणून मोठा स्टॉक मी जमा करुन ठेवतो. ( असं म्हणून विसरलेंनी सगळेंना डोळा मारला तेव्हा सगळे अगदी घाबरुन गेले )
अखिल सगळेः- तुमच्या कवितेकडून मला तुमच्या पक्षातल्या राजकारणाकडं याययचं. मला सांगा तुम्ही तुमच्या पक्षात सखी रावत यांना प्रवेश दिला त्यामागचं कारण काय ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी सखी रावत यांनी माझ्या कविता ऐकल्या. त्यांनी त्या प्रभावित झाल्या. ( पुन्हा एकदा व्हर्टिकल सरळ मान हलवत ) आपल्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. आपल्यासाठी म्हणजे आपल्या समाजासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्या आमच्या पक्षात आल्या आणि तरुणांची ओढा पक्षाकडे वाढला.
अखिल सगळेः- उमेदवारीसाठी की स्वयंवरासाठी ?
रामभाऊ विसरलेः- ( गोंधळून गेलेले )
त्या ठिकाणी दोन्ही गोष्टीसाठी तरुणांचा ओढा आहे.
अखिल सगळेः- पण तरुणींचा ओढा वाढण्यासाठी काही केलं पाहिजे असं वाटतं नाही का ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी माझ्या कवितांवर खुष होऊन मोठ्या प्रमाणावर तरुणी येत असतात. प्रौढ स्त्रिया, ताई माई अक्का वहिनी पक्षात याव्यात म्हणून स्वदेश कांदेकर यांना पक्षात घ्यावं अशी थिंक टॅन्कची सूचना आहे.
मी कॅबिनेट मिनिस्टर, स्वदेश होम मिनिस्टर
अब की बार स्वदेश कांदेकर !
अखिल सगळेः- ( पुन्हा एकदा सावरुन बसून ) बरं मला सांगा … ( सगळे अडखळतात )
रामभाऊ विसरलेः- रामभाऊ विसरले
अखिल सगळेः- हां रामभाऊ विसरले,मातोश्रींना भेटण्याकरता तुम्ही बारामतीवरुन मुंबईला आलात. ते कशामुळं ?
रामभाऊ विसरलेः- ते आम्हांला विसरले.
अखिल सगळेः- अहो पण मातोश्रींनी तुम्हाला घातलेल्या शिव्या तुम्ही कसे विसरले ? पाठीत घातलेले दणके तुम्ही कसे विसरले?
‘विसरले विसरले’ अशी हेडलाइन येईल उद्या.
“रामभाऊ बाबासाहेब विसरले” अशी बातमी होईल उद्या.
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी मातोश्रींच्या शिव्या हे आईचं प्रेम आहे.
अखिल सगळेः विद्यापीठाचं नामांतर करता येतं रामभाऊ मातोश्रींचं नाही;पण मला सांगा,
घड्याळ बंद पडेल अशी भीती वाटली का तुम्हाला ?
की तुमच्या हृदयात बाण लागला ?
रामभाऊ विसरलेः- (अत्यंत इंटेलेक्चुअल हसत आणि मानेचा व्यायाम करत )
घड्याळ आता बंद पडेल
पंजाविना काय घडेल
अखिल सगळेः म्हणजे तुम्हाला घड्याळ बंद पडेल अशी भिती वाटत होती तर..पण आता तर
बाण आता सुटला आहे
नेम कमळावर बसला आहे !
( आपल्याकडून विसरले-प्रणित कविता झाल्याचे सगळेंच्या लक्षात आले तरीही तोल सावरत ते म्हणाले )
अशा वेळी तुम्ही कोणासोबत राहणार ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी मंत्रिपद तेही कॅबिनेट राहू म्हणजे समाजासाठी काम करण्यासाठी आम्ही मंत्रिपद देईल त्यांच्यासोबत राहू. मंत्रिपद तेही कॅबिनेट असल्याशिवाय समाजाची सेवा होऊच शकत नाही !
मी मागत नाही कोणालाही सत्तेचा मेवा
पण मंत्रिपदाशिवाय कशी घडेल समाजाची सेवा ?
अखिल सगळेः- तुम्ही् महाराष्ट्र न्यू क्रियेटिव पार्टी सोबत तर जाणार नाही ना ?
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी एसटी बसगाड्या, वडाप असताना रेल्वेची आम्हाला गरज नाही. नुसतं इंजिन घेऊन दिल्लीपर्यंत कसं पोहोचणार ?
अखिल सगळेः- तुम्ही केवळ मंत्रिपदासाठी स्वार्थासाठी तडजोडी करता असा विरोधकांचा आरोप आहे. तुमचे विरोधक महेंद्र वावडे परवा म्हणाले
त्यांना रामदास आठवले पण ते बाबासाहेब विसरले
म्हणूनच त्यांचे स्थान जनतेच्या हृदयातून घसरले !
रामभाऊ विसरलेः- त्या ठिकाणी,
विरोधक करतच असतात आमच्यावर टीका
पण ती पचवायची कशी हे माझ्याकडून शिका
अखिल सगळेः- ही लाडीगोडीच तुम्ही केवळ स्वतःसाठी करता. तुमच्या पक्षाच्या संस्थापकांच्या विचारांसोबतची प्रतारणा आहे. गद्दारी आहे त्यांच्या विचारांसोबतची. ( सगळे अधिक गंभीर झाले ) स्वातंत्र्य समता बंधुता या सा-या मूल्यांचं नि तुमचं काही घेणं देण नाही. ज्या महापुरुषाने मानवतेची वाट दाखवली ती सोडून तुम्ही धर्मांध शक्तींसोबत हातमिळवणी करत आहात..
रामभाऊ विसरलेः- अहो सगळे, त्या ठिकाणी
धर्मही नसतो अंध आणि लोकांचे डोळेही नसतात बंद
ज्याने त्याने करावा आपापल्या राजकारणाचा छंद !
रामभाऊ बाबासाहेब विसरलेंच्या या आधुनिक राजकीय दोह्याने अखिल सगळे अत्यंत वैतागले त्यांचे हात रागारागाने नुसतेच हलू लागले….
आणि रामभाऊ बाबासाहेब विसरले सत्ताकारणाचे नवे यमक जुळवत बसल्याने कॅमे-याला मात्र त्यांचा चेहरा नीट टिपता आला नाही !
-श्रीरंजन आवटे.
मो.९७६२४२९०२४ shriranjan91@gmail.com
प्रतिक्रिया
हे मनात वाचण्यापेक्षा कोणीतरी
हे मनात वाचण्यापेक्षा कोणीतरी ठसक्यात वाचून दाखवलं तर आणखी मजा येईल. विसरलेंनी कविता करणं थांबवलं तर आम्ही त्यांच्यासाठी लाखभर मतं गोळा करू, अशी विनंतीही अलिकडेच फेसबुकावर वाचली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो
त्याच आवाजात नक्कल करतच वाचले मी
बघा! ऑडियो स्वरुपात ऐकता असते
बघा! ऑडियो स्वरुपात ऐकता असते तर अजून मजा आली असती.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
हाण्ण
हाण्ण तेज्यायला.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
हा हा
रमताराम
साष्टांग नमस्कार !
सहीचं. काव्य संग्रहाचं आणि
सहीचं. काव्य संग्रहाचं आणि पुरस्काराचं नावही . आणि त्यांच्या रंगीबिरंगी कपड्यांना 'विसरले' काय तुम्ही?
हो लक्षात होते पण
हो लक्षात होते पण लिहिताना विसरलो !
दोघांच्या भांडणात सदा
दोघांच्या भांडणात
सदा तिसऱ्याचा लाभ
मुख्यमंत्री होणार
यंदा रामभाऊ विसरले
_/\_
_/\_
जबरा
मस्तच!!