निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.
मुरारबाजी, बाजीप्रभूसारखे मोहरे गमवावं लागणं, त्यामुळे मिळालेल्या पराकाष्ठेच्या विजयांनंतर लगेच दुसऱ्या संघर्षाची सुरुवात, करावे लागलेले तह असा महाराजांचा धकाधकीचा जीवनक्रम इथे समोर येतो. मिर्झा राजेंसमोर आपण टिकू शकणार नाही ह्या जाणीवेतून आलेला पुरंदरचा तह आणि नंतर आगऱ्याला जाणं ह्याला राजवाड्यांसारख्या इतिहासकारानं जो चातुर्याचा मुलामा दिला आहे तो सत्याचा अपलाप आहे असं कुरुंदकर मांडतात. आगऱ्याहून सुटका झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आलेल्या शिवाजीपाशी आधीच्या विजयांमधलं फारसं काही शिल्लक नव्हतं हे कुरुंदकर सांगतात आणि त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांत राज्याभिषेकापर्यंत त्याची झेप गेली हे ते नमूद करतात. शिवाजीचे पराभव केवळ शक्ती कमी पडली म्हणून झालेले आहेत असं कुरुंदकर म्हणतात. म्हणजे गाफीलपणा, अव्यवहारी बेसावधपणा, चुकीचं नियोजन, किंवा खचलेली हिंमत अशा कारणांमुळे झालेले ते पराभव नाहीत; हे एक प्रकारचं शिवाजीचं मोठेपण आहे, अशी मांडणी ते करतात. ती अर्थात रोचक आहे. शिवाजीचा उदोउदो करण्याच्या पार्श्वभूमीवर ती वेगळी वाटेल. पण तत्कालीन किंवा आधीच्या इतिहासकारांनी अशी मांडणी केली होती का, हे पाहायला हवं. १९७७ साली हा लेख छापून आला होता. तेव्हा त्यातल्या विचारांचं नावीन्य इतिहासकारांत कितपत होतं आणि त्याचं स्वागत कशा प्रकारे झालं हे कुणाला माहीत असलं तर ते समजून घ्यायला आवडेल.
ह्यानंतरचा लेख लोकहितवादींवर आहे. त्यात लोकहितवादींच्या मर्यादा म्हणून अनेक गोष्टींचा उल्लेख आहे : इंग्रजांच्या सेवेत विविध पदं भूषवून त्यांनी सधन मध्यमवर्गीय राहणीमानात आयुष्य घालवलं; ते धर्मश्रद्ध होते; त्यांचा सुधारणावाद 'चार लेख लिहून गप्प बसण्याच्या मर्यादेतला' होता; त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी कधी झीज सोसली नाही; कर्त्या सुधारकाच्या पाठीशी राहिल्यामुळे येणारा वादही त्यांनी टाळला; त्यांच्या टीकेचा भर ब्राह्मणांवर राहिला; ती टीका रास्त असली, तरी 'मुळातच हिंदू समाजात असलेली विषमता आणि अन्याय्य समाजव्यवस्था यांची लोकहितवादींना फारशी जाणीव झालेली दिसत नाही', अशी मांडणी कुरुंदकर करतात. (ह्या सर्व विवेचनासाठी गोवर्धन पारीख ह्यांच्या पृथक्करणाचा त्यांनी आधार घेतला आहे हे ते मान्य करतात.)
'इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं देशाची लूट करत आहेत ह्यातली गुंतागुंत लोकहितवादींना शेवटपर्यंत कळलेली दिसत नाही', असं कुरुंदकर म्हणतात. पण, 'इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीची लोकहितवादींना कल्पना होती; इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे', असा उल्लेख विश्वकोशात आहे. मग ह्यातलं काय खरं मानायचं?
इंग्रजांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन लोकांनी शिकावं आणि आपल्या क्षमतेनुसार हुद्दा मिळवावा असंच लोकहितवादींना वाटे आणि त्यांनी तसंच आचरण केलं असं म्हणता येईल. पण ही आचार-विचारांतली सुसंगती होती असं कुरुंदकर म्हणत नाहीत. सुधारणावादी असूनही त्यांचं सश्रद्ध असणं मात्र कुरुंदकरांना खुपतं. इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल.
'जातिभेद' नावाचं एक पुस्तक लोकहितवादींच्या नावावर आहे. 'शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे जातिव्यवस्था नाहीशी होईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र, जोपर्यंत जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांच्यांत द्वेषमत्सर तरी असू नये, असे त्यांना वाटत होते', असा विश्वकोशात उल्लेख आहे. ''माहारासदेखील नमस्कार करावा. त्यांत आहे काय ?’ अशी त्यांची विचारसरणी होती' असाही उल्लेख आहे. धर्मसुधारणेसाठी त्यांनी सांगितलेल्या सोळा कलमांत 'आपल्या जीवासारखा दुसऱ्याचा जीव मानावा; भजनपूजन संस्कार स्वभाषेत करावे; संस्कृत भाषेचा आग्रह नको; आचारापेक्षा नीती प्रमुख असावी; एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नये; जातीचा अभिमान नसावा; कोणीही कोणताही रोजगार करावा' असं म्हटल्याचाही विश्वकोशात उल्लेख आहे. ते बालविवाह, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात होते. पेशवाईच्या अस्तानंतर अवघ्या पाच वर्षांनी जन्मलेल्या लोकहितवादींनी त्या काळाच्या पुढे जाऊन विचार केला हे तर कुरुंदकरांनादेखील मान्य आहे. त्यामुळे मग कुरुंदकरांची टीका काहीशी अस्थानी आहे की काय, असं वाटत राहतं.
संदर्भ - विश्वकोश
(क्रमश:)
भाग ३
प्रतिक्रिया
'जागर'मधे पहिल्या लेखात
'जागर'मधे पहिल्या लेखात त्यांनी सुधारणावादी रॅडीकल वैचारिक भूमिका न मांडल्याबद्दल किंवा त्याचा आग्रह न धरल्याबद्दल त्यांनी लोकहितवादी किंवा रानड्यांवर टीका केली आहे, रानड्यांनी व लोकहितवादींनी काळाच्या पुढे जाऊन नुसते विचारच नाही तर कृती देखील केलेली आहे त्यामुळे कुरुंदकरांची टीका अस्थानी वाटण्याशी सहमत.
परिचय मधेच थांबला
ह्म्म्म ... 'मी' यांच्या टिपणीशी सहमत!
बाकी परिचय मध्येच थांबला असे वाटले. समारोपाचा परिच्छेद राहुन गेल्यासारखे वाटले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निवडक वस्तुनिष्ठ?
कुरुंदकरांच्या अल्पवाजवी विवेचनाबद्दल ही प्रतिक्रिया नुकतीच वाचनात आली. कुरुंदकरांचा मूळ लेख न वाचल्याने प्रतिक्रियेतील टिका कितपत सुस्थानी आहे हे माहीत नाही.
कुरुंदकरांचा मूळ लेख
कुरुंदकरांचा मूळ लेख - दलितांनी कोषातून बाहेर पडावे
(इथे माझा कल कुरुंदकरांकडे जातो.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत.
तो टीकात्मक लेख बहुतांशी अपुर्या आणि सेल्फ-राइचस वाटावे अशा परिप्रेक्ष्यातून लिहिला गेलाय हे सरळसरळ जाणवते. त्यामुळे त्याला तितपतच महत्त्व दिल्या गेले पाहिजे असे माझे मत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद
लेख वाचून प्रतिक्रियेतील टिका बरीचशी अस्थानी असल्याचे ध्यानी येते. एकूणातच प्रतिक्रियेत जाणवणारा आक्रस्ताळेपणा मान्य करून काही मुद्दे रास्त असल्याचेही लक्षात येते. उदा. पुणे करारासंदर्भात आंबेडकरांच्या भुमिकेचे योग्य विश्लेषण केले जावे असे कुरुंदकरांना वाटते. त्याचवेळी आंबेडकरांच्या या भुमिकेमागे काही व्यापक किंवा सर्वसमावेशक उद्देश असावा हा उल्लेख करत नाहीत. चळवळीचे कठोर मूल्यमापन केले जावे या व्यापक मुद्द्याविषयी भाष्य करतांना पुणे कराराविषयीचा प्रश्न इतर प्रश्नांबरोबर आला असावा. परंतु कोषातून बाहेर पडण्याचा सल्ला देत असतांना पुणे करारासारख्या थोड्याफार समन्वयक कृतीचा उल्लेख बराचसा अप्रस्तुत वाटतो.
सर्वसामान्यपणे इतर अभ्यासकांविषयी (शेजवलकर, राजवाडे इ) लिहीतांना कुरुंदकर हिरीरीने आत्मपरीक्षणाच्या अभावावर बोट ठेवतात. इतरत्र स्वतः कुरुंदकरांमध्येही तसाच अभाव जाणवतो.
समन्वयक कृतीचा उल्लेख अप्रस्तुत
मला वाटतं की आंबेडकरांनी मनाविरुद्ध समन्वयक निर्णय घेतला असं कुरुंदकर अप्रत्यक्ष म्हणत असावेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बरोबर पण
निर्णय मनाविरुद्ध असला तरी कोषबाह्य संवेदना दर्शविणारा होता. 'कोषात गुरफटून पडलेली चळवळ' ही लेखाची मध्यवर्ती कल्पना असतांना लेखात पुणे कराराचे उदाहरण विसंगत वाटते.
मला वाटतं पुणे कराराविषयीचे
मला वाटतं पुणे कराराविषयीचे प्रश्न हे 'आंबेडकरांविषयी वस्तुनिष्ठ लेखन झालेलं नाही' या मुद्द्याच्या उदाहरणार्थ आलेलं आहे. आणि हा मुद्दाही 'शेवटी दलितांना दलित म्हणूनच उरावयाचे आहे, की आपले दलितपण संपवायचे आहे?' या प्रश्नाला पूरक म्हणून आहे. मला तरी लेखाचा मूळ मुद्दा पुढीलप्रमाणे वाटला 'अहो, किती दिवस नुसतं इतिहासाच्या अन्यायाचे कढ काढणार? जे स्वातंत्र्य नाकारलं होतं ते आता मिळालं आहे. आता पुढचं काहीतरी बोला की. या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन समोर असलेले प्रश्न कसे सोडवणार, याविषयी काहीतरी मंथन करा.' हिंदू धर्म काय, बौद्ध धर्म काय, इथून तिथे जाऊन तसा फरक काहीच पडणार नाही. ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची प्रतीकात्मक वर्तणुक होती - काहीशी मनुस्मृती जाळण्यासारखी. पण या कुठच्याच धर्माचा आसरा घेऊन फायदा होणार नाही. कारण शेवटी ते दोन्ही प्रस्थापित सरंजामशाहीला हलवू शकत नाहीत. तेव्हा आत्ता तुमच्यासमोर दारिद्रय अद्न्यान आणि कुपोषण आहे त्यावर मात कशी करायची ते पहा.
टीकात्मक लेखनात नुसताच अभिनिवेश आणि कुरुंदकरांच्या लेखनात नसलेला अर्थ लादून त्यावर हल्ला केलेला आहे त्यामुळे तो फार विचार करण्यालायक झालेला नाही.
सुलभीकरण
आंबेडकरांविषयी वस्तुनिष्ठ लेखन झालेले नाही ही व्यथा व्यक्त करणे योग्यच आहे. असे वस्तुनिष्ठ लेखन न होणे हे दलित चळवळीच्या कोषाबाहेर न पडण्याचे लक्षण आहे की भारतीय समाजाच्या 'तुमचा कोष तुम्ही सांभाळा' या मानसिकतेचे? कुरुंदकरांनी स्वतःच असे लेखन करावे ही अपेक्षा चूक आहे काय? तसे न करण्यामागचे कारण दलितांना तसे लेखन पचनी न पडणे व त्यामुळे काही रोषाला सामोरे जाणे टाळणे असे काहीसे असावे काय? समजा दलित विचारवंतांनाही वस्तुनिष्ठ विचार करून स्वतःवर संताप ओढवून घेऊ नये असे वाटत असल्यास त्यात काही गैर आहे काय?
एकूणात दलित चळवळीने कोषाबाहेर पडावे, दलितांना भेडसावणारा विषमतेचा प्रश्न बराचसा सुटलेला असून त्यांनी आता 'दारिद्रय, अज्ञान आणि कुपोषण' या प्रश्नांच्या बाजूने व्यापक लढ्यात सहभागी व्हावे ही अपेक्षा 'दलितांना सद्य समाजात त्यांचे काहीच प्रश्न नसावेत' या भुमिकेतून आलेली वाटते. माझ्या मते ही भुमिका भारतातील सामाजिक व्यवहारांचे सुलभीकरण करणारी आहे.
दलितांना भेडसावणारा विषमतेचा
तुम्हाला वाटते तितकेही सुलभीकरण नसावे. विषमतेचा प्रश्न सुटला नाही म्हणून कायम डिफेन्सिव्ह मोडवरच जावे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सुलभीकरणचे प्रमाण
सुलभीकरणाचे प्रमाण हे कुठल्या प्रश्नाचे विश्लेषण सुरू आहे त्यावर ठरवले जावे. कुरुंदकरांच्या लेखात दलित चळवळ कोषातून बाहेर न पडण्याबद्दल (सविस्तर?) व्यथा नोंदवलेली आहे. दलितांच्या काही समस्या (दारिद्र्य, कुपोषण इ) या इतर दुर्बल सामाजिक घटकांच्या समस्यांपेक्षा निराळ्या नाहीत आणि अस्पृश्यता ही काय एक विशेष समस्या* होती ती तर सुटलेलीच आहे तेव्हा दलित चळवळीने व्यापक लढ्यात सामिल व्हावे असा लेखातला युक्तिवाद लक्षात येतो. 'कोषाबाहेर न पडणे' हे निरीक्षण समजा योग्य आहे तरी कोषाबाहेर न पडण्याच्या कारणांसंदर्भात काही एक विश्लेषण आवश्यक आहे. दलितांचे नेतृत्त्व आखुडतेत समाधानी आहे असा काहीसा सूर आहे पण दलितांचे स्वतंत्र प्रश्न असू शकतील या शक्यतेलाही न पुसटणे हे घाईचे लक्षण आहे.
*राज्यघटनेत एखाद्या गोष्टीला त्याज्य ठरवणे आणि राजकिय पक्षांनीही त्या त्याज्यतेला अनुमोदन देणे या गोष्टींचा दाखला एखादी सामाजिक समस्या सूटलेली असण्याबद्दल निष्कर्ष काढण्याबाबत पुरेशी असल्यास भारतीय समाजासमोर असलेले अनेक प्रश्न सहजच निकालात निघतील.
हाही भाग
हाही भाग आवडला...विशेषतः
"इंग्रजांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन लोकांनी शिकावं आणि आपल्या क्षमतेनुसार हुद्दा मिळवावा असंच लोकहितवादींना वाटे आणि त्यांनी तसंच आचरण केलं असं म्हणता येईल. पण ही आचार-विचारांतली सुसंगती होती असं कुरुंदकर म्हणत नाहीत. सुधारणावादी असूनही त्यांचं सश्रद्ध असणं मात्र कुरुंदकरांना खुपतं. इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल. "
अवांतरः 'शिवकल्याणराजा' नावाच्या अल्बम मध्ये 'जाणता राजा' असं एक गाणं आहे. त्याच धर्तीवर आज लोकशाहीत 'जाणती प्रजा' असं एक गाणं कुणी रचावं असं वाटतं.
>>इथे पुन्हा कुरुंदकरांचं
>>इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल. <<
इतरांकडून झाली तर ती तत्वच्युती आपल्याकडून झाली तर मात्र ती तडजोड ही भूमिका अजूनही पुरोगामी चळवळींमधील लोकांमधे दिसते
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/