समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १ : प्रस्तावना आणि भूमिका
(सदर लेखाची प्रेरणा ज्या व्याख्यानामुळे मिळाली ते व्याख्यान 'श्रावण मोडक' यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. श्रावण ऐसीअक्षरेचा सदस्य होता नि इथल्या अनेकांचा मित्रही. समाजवादी विचारांची प्राथमिक ओळख त्याच्यामुळेच झाली. तेव्हा ही लेखमालिका त्याच्यासाठी.)
भूमिका:
भारतातील समाजवादी राजकारणाची सुरुवात प्रथम स्वातंत्र्यपूर्वकालात राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत 'सोशालिस्ट फ्रंट'च्या माध्यमातून झाली. हे राजकारण काँग्रेसला पर्याय म्हणून उभे राहताना अनेक स्थित्यंतरातून गेले. आजच्या घडीला या लोकशाही समाजवाद्यांची राजकीय शक्ती अतिशय क्षीण झालेली दिसते. ती आज अतिशय मर्यादित प्रभावक्षेत्र असलेल्या समाजवादी म्हणवणार्या अनेक प्रादेशिक पक्षांपर्यंत येऊन पोहोचली आहे. संपूर्ण देशाच्या पातळीवर एक दखलपात्र राजकीय पर्याय म्हणून आज समाजवाद अस्तित्वात नाही हे कटू सत्य आहे.
इथे 'समाजवादी' म्हणताना माझ्या डोळ्यासमोर प्रामुख्याने लोकशाही समाजवादी (Democratic Socialism) विचारसरणीच आहे. कम्युनिस्टांना मी यात जमेस धरलेले नाही. आपल्या मर्यादित प्रभावक्षेत्रात का होईना कम्युनिस्ट हे अजूनही दखलपात्र राजकारणी गट म्हणून अस्तित्व राखून आहेत नि त्या पक्षांनी अजून तत्त्वशून्य म्हणाव्यात अशा तडजोडी केलेल्या नाहीत. तेव्हा त्यांचा राजकीय अस्त झाला आहे असे म्हणणे अवघड आहे. याउलट लोकशाही समाजवादावर निष्ठा असणार्या पक्षांचा सातत्याने र्हास होताना दिसतो. २०१४ च्या निवडणुकांच्या संदर्भात समाजवाद्यांच्या तात्कालिक तसेच एकुणच भारतीय राजकारणातील पराभवाचा धांडोळा घ्यावा हा या लेखाचा उद्देश आहे. या शिवाय आजच्या संदर्भात समाजवादी राजकारण्यांबरोबरच समाजवादी कार्यकर्त्यांची भूमिका देखील तपासून पहावी असा दूसरा उद्देश आहे.
या लेखात मुख्यत: नुकत्याच पार पाडलेल्या निवडणुकांच्या संदर्भात समाजवादी कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी निवडलेला राजकीय पर्याय या संदर्भात काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. समाजवादी राजकारणाच्या दीर्घ वाटचालीचा साराच आलेख इथे मांडलेला नाही, लेखाचा तो हेतू नाही. समाजवादाचे, राजकारणाचे अभ्यासक याहून कितीतरी पटीने अधिक सखोल मांडणी करू शकतील याची मला जाणीव आहे. पण तशी त्यांनी करावी हा हेतू ठेवूनच ही सुरुवात केलेली आहे. निव्वळ विश्लेषणापलीकडे जाऊन समाजवादी विचारसरणीच्या राजकारणाच्या संघटनासारख्या अनुषंगाचा, त्याच्या गुणावगुणांचा, त्याच्या वाटचालीचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक सामाजिक हिताची भूमिका घेणारी विचारसरणी आज राजकीयदृष्ट्या अस्तित्वहीन होऊ पाहते आहे हे वेदनादायी वास्तव ज्याला खुपते आहे आशा एका सामान्य माणसाने 'हे असं हा घडलं किंवा घडतं आहे नि अजूनही ही परिस्थिती बदलावी म्हणून काही निश्चित प्रयत्न होतात का, नसल्यास का नाही?' असे प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा आपल्यापरीने केलेला हा एक प्रयत्न आहे. पण असे असताना उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे निव्वळ दोषारोप केलेले नाहीत, मूल्यमापनाचा हेतूच मुळी 'हे कसं बदलता येईल?' या प्रश्नाची आपल्या परीने उत्तरे शोधण्याचा आहे. कारण ही परिस्थिती बदलावी अशी प्रामाणिक इच्छा मनात धरूनच हा सारा घाट घातला आहे. माझ्या परीने मी केलेले हे विवेचन, समाजवादी गटांच्या पीछेहाटीची मी शोधलेली कारणे, त्यावरचे सुचवलेले संभाव्य उपाय हे काही सर्वस्वी निर्दोष, सर्वस्वी अचूक आहेत असा माझा दावा नाही. पण अलीकडेच आलेल्या एका अनुभवामुळे हे आता आपण मांडून दाखवले पाहिजे, या विचारमंथनाला विस्कळीत का होईना पण एक सुरुवात करून द्यावी अशी ऊर्मी निर्माण झाली नि हे समाजवादी अभ्यासकांसमोर ठेवण्याचे धाडस केले आहे.
१. समाजवादी राजकारणाची वाटचाल आणि सद्यस्थिती:
स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसअंतर्गत आघाडी म्हणून अस्तित्वात असलेला 'सोशालिस्ट फ्रंट' स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून 'समाजवादी पक्ष' या नावाने काँग्रेसचा राजकीय विरोधक म्हणून उभा राहिला. या पक्षाने वेळोवेळी स्वतंत्रपणे वाटचाल केली, अधेमधे सरंजामदारांच्या 'स्वतंत्र पक्षा'बरोबर, कृपलानींच्या 'किसान मजदूर प्रजा पार्टी'बरोबर, क्वचित कम्युनिस्टांबरोबर वाटचाल केली. कधी ही वाटचाल युतीच्या स्वरूपात तर कधी एकत्रीकरणातून निर्माण केलेल्या प्रजा समाजवादी पक्षाच्या स्वरूपात तर कधी थेट सामाजिक राजकीयदृष्ट्या दुसर्या टोकाच्या जनसंघाला बरोबर घेऊनही केली. वेळोवेळी काँग्रेसमधून फुटून निघालेल्या वा त्या पक्षाच्या फुटीतून निर्माण झालेल्या संघटना काँग्रेस, काँग्रेस (जे), समाजवादी काँग्रेस किंवा काँग्रेस(अर्स), चरणसिंग यांचा भारतीय क्रांती दल, भारतीय लोक दल यांच्याशीही सहकार्य करत राजकारण केले. नेत्यांच्या अहंकारामुळे, धोरणात्मक मतभेदांमुळे वेळोवेळी फूट पाडत, पुन्हा जवळ येत समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष (याच्या धोरणात 'समाजवाद' असा स्पष्ट उल्लेख न करता 'सामाजिक बदल' असा ढोबळ नि संदिग्ध उल्लेख करण्यात आला होता.) अशी वाटचाल करत १९७७ मधे काँग्रेसविरोधाखेरीज अन्य कोणतीही निश्चित विचारसरणी अथवा ध्येयधोरणे नसलेला 'जनता पक्ष' स्थापन होताच हे सारे लहानमोठे समाजवादी गट त्या एका छत्राखाली एकत्र आले नि इथे समाजवादी राजकारणाचा पहिला टप्पा संपला.
१९७७ ते १९७९ अशी दोनच वर्षे भांडत-तंडत एका पक्षात काढल्यावर अखेरीस दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर प्रथम जनसंघ जनता पक्षातून फुटून 'भारतीय जनता पक्ष' या नव्या अवतारात उभा राहिल्यानंतर पूर्वाश्रमीचे समाजवादी 'जनता दल' या नव्या अवतारात उभे राहिले आणि समाजवादी राजकारणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. योगायोगाने हे दोनही टप्पे साधारण तीस वर्षांचे आहेत. (दोन टप्प्यांतील राजकीय, सामाजिक विकासाचा व्यापक अभ्यास करणे रोचक ठरू शकेल.) हा टप्पाही पूर्वीप्रमाणेच अहंकारी नेते, व्यापक हितापेक्षा वैयक्तिक राजकारणाला महत्त्व देणे यांच्याच प्रभावाखाली होता. परंतु पहिल्या टप्प्यात नि यात नेत्यांच्या वैचारिक नि बौद्धिक कुवतीमधे फरक असावा असे म्हणावे लागते. पूर्वी तात्त्विक मतभेदांवर झालेल्या फाटाफुटी इथे सरळ सरळ जातीय समीकरणांवर, वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळे, विभागीय अथवा प्रादेशिक महत्त्वाकांक्षेमुळे झालेल्या दिसतात. या दरम्यान पहिल्या टप्प्यावर असलेल्या विचारवंतांचा प्रभाव पूर्णपणे लुप्त झालेला दिसून येतो.
'जनता दला'ने काँग्रेसच्या बरोबरीने अनेक पक्षांचा मातृपक्ष बनण्याचा मान मिळवला आहे. या एकाच पक्षाने यात चंद्रशेखर आणि देवीलाल(???) यांचा समाजवादी जनता पक्ष(१९९०), मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष (१९९२), जॉर्ज फर्नांडिस यांचा समता पक्ष (१९९४, जनता दलाच्या जातीयवादी धोरणांचा विरोध करत), अजित सिंग यांचा 'राष्ट्रीय लोकदल' (१९९६), लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (१९९७, जनता दल अध्यक्ष शरद यादव यांनी चारा घोटाळा प्रकरणात निलंबित केल्यानंतर), नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल(१९९७, जनता दलाने भाजपशी निवडणूक समझौता न केल्याने), लोकशक्ती पक्ष(१९९७, रामकृष्ण हेगडे यांना जनता दलातून निलंबित केल्यानंतर), देवेगौडा यांचा जनता दल (सेक्युलर) (१९९९, जे एच मेहतांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील जनता दलाने भाजपाप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्या विरोधात), देवीलाल यांचा भारतीय राष्ट्रीय लोक दल(????), रामविलास पास्वान यांचा 'लोकजनशक्ती पार्टी' (२०००) आणि अखेर लोकशक्ती पार्टी, समता पार्टी आणि शरद यादव यांचा उरलेला मूळ जनता दल यांनी एकत्र येत स्थापन केलेला जनता दल(सं.) (२००३) इतकी अपत्ये जन्माला घातलेली आहेत.
समाजवादी म्हणवणारे पक्ष हे आज केवळ प्रादेशिक पातळीवर शिल्लक राहिले आहेत. या सार्यांचे मिळून एकत्रित असे राष्ट्रीय पातळीवरचे कोणतेही राजकारण दिसत नाही. तसे केल्यास आपल्या प्रादेशिक अस्तित्वाला धोका पोहोचेल या भीतीने दोन शेजारी राज्यातील पक्षही सहकार्य करताना दिसत नाहीत. राजद, सप आणि लोजप यांना चौथ्या फ्रंटचा प्रयोग करतानाही एकमेकांच्या राज्यात निवडणुका शक्यतो लढवायच्या नाहीत या मुद्द्यावरच एकत्र येणे शक्य झाले होते. इतका परस्पर अविश्वास घेऊन उभे असलेले नेत व्यापक विचार करतील हा निव्वळ भ्रम आहे. अशा खुरट्या नेत्यांकडून समाजवादी राजकारणाला उर्जितावस्था आणण्याचे काही प्रयत्न होऊ शकतील ही आशाच करता येत नाही. यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवर समाजवादावर आधारलेले कोणतेही विधायक राजकारण केले जाईल ही शक्यता आज तरी शून्यच म्हणावी लागेल.
या सार्या वाटचाली दरम्यान समाजवाद्यांनी काय कमावलं, काय गमावलं, त्यांची कारणे काय होती हा एखाद्या राजकीय विश्लेषकाच्या अभ्यासाचा विषय आहे. तो अभ्यास या लेखाचा पूर्ववृत्तांत म्हणून खरंतर इथे द्यायला हवा. पण कुवतीच्या, अभ्यासाच्या मर्यादेमुळे आणि विस्तारभयास्तव इथे तो वगळतो आहे आणि फक्त अर्वाचीन संदर्भातच समाजवाद्यांच्या राजकारणाचे विश्लेषण करणार आहे. (जिज्ञासूंनी 'साधना'ने हीरक-महोत्सवी वर्षात प्रकाशित केलेल्या 'निवडक साधना' चा 'लोकशाही समाजवाद' या विषयावरील खंड ३ पहावा. यातील प्रा. रा. म. बापट यांचा 'समाजवादी पक्षापुढील प्रश्नचिन्ह' हा १९७२ साली लिहिलेला लेख आजच्या परिस्थितीसंदर्भातही ताजा भासतो.) परंतु त्याच वेळी हे ही नोंदवून ठेवतो की जरी राजकीय यशापयशाचे विश्लेषण केवळ अर्वाचीन संदर्भात केले असले तरी लेखाच्या अखेरच्या दोन भागातील मूल्यमापन नि संभाव्य पर्याय हे मात्र काही प्रमाणात या पूर्वीच्या वाटचालीच्या आधारे मांडले आहेत.
आज राजकीय पर्याय म्हणून लोकशाही समाजवादी क्षीण झाले असले तरी त्यांचे वैचारिक विरोधक करतात तशी ताबडतोब 'पराभूत तत्त्वज्ञान' म्हणून समाजवादाची हेटाळणी करणे तर चूक आहेच पण त्याचबरोबर वर्षानुवर्षे घसरत चाललेला प्रगतीचा आलेख पाहूनही समाजवादी विचारसरणीचे पाईक त्यातून काही शिकत नसतील तर ते ही दुर्दैव म्हणावे लागेल. भारतीय राजकारणात समाजवादी गटांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण होते. एक राजकीय ताकद, त्याच्या जोडीला प्रत्यक्ष सामाजिक कार्य करणार्या कार्यकर्त्यांचे संघटन आणि या दोन्हीला भक्कम आधार देणारे वैचारिक पाठबळ अशा तीन पातळ्यांवर वर समाजवादी उभे होते. नेहरूंच्या नेतृत्वाखाली खुद्द काँग्रेसनेच समाजवादी विचारसरणीचा अंगीकार केल्याचे - निदान वरकरणी - जाहीर केल्याने या समाजवादी राजकीय पक्षांच्या वाढीला मर्यादा पडल्या हे तर खरेच पण त्याचबरोबर याच पक्षांनी नव्वदच्या दशकापर्यंत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडली हे नाकारता येणार नाही. आज संसदेचा जवळ जवळ संबंध कार्यकाल सतत कामकाज बंद पाडत आपली विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार्या पक्षाच्या उदयानंतर किंवा संसदेऐवजी रस्त्यावर बसून सारे प्रश्न सोडवण्याच्या तथाकथित 'जनताभिमुख' पण वास्तवात एक प्रकारे संसदीय प्रणालीला नाकारणारे संकुचित राजकारण सुरु झाल्यानंतर शासकीय धोरणाला वैचारिक नि अभ्यासू भूमिकेतून विरोध करणारे, आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत विधायक मार्गाने पोचवणारे नि अनेकदा ते मान्य करण्यास भाग पाडणारे - आज अस्तंगत होऊ घातलेले - समाजवादी राजकारण अधिकच सुसंस्कृत भासते.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
खूप छान ओळख. पुढच्या भागाची
खूप छान ओळख. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
एक शंका: समाजवादी विचारसरणी आणि कम्युनिस्ट विचारसरणी यात काय फरक आहे? आणि हा फरक फक्त भारताच्या परिप्रेक्ष्यातच आहे का जगभर socialism आणि communism मध्ये फरक आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कम्युनिजम
कम्युनिजम हा समाजवादाचाच एक प्रकार, एक व्हर्शन आहे. फरक बरेच दाखवता येतात (तशीच साम्येही). मुख्य फरक असा की कम्युनिजम हा 'डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलटरिएट' (जी अखेरीस अपरिहार्यपणे मूठभरांची हुकूमशाही होऊन बसते.) ही व्यवस्था आणू पाहतो. लोकशाही व्यवस्थेवर बहुधा त्यांचा विश्वास नसतो. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे देखील त्यांच्या दृष्टीने पुरेसे बळ मिळवण्यापुरते वापरलेले हत्यारच असते. कोणतीही व्यवस्था ही अखेरीस शोषकच असते असा त्यांचा ठाम विश्वास असतो. अगदी लग्नसंस्थेला देखील स्त्रीच्या शोषणाचे हत्यार मानतात ते. अर्थात उक्ती नि कृतीमधे नेहेमीच फरक असल्याने सारेच अनुसरले जात नाहीच.
या उलट ज्यांना मी इथे समाजवादी म्हणतो आहे ते प्रामुख्याने लोकशाही समाजवादी विचारधारेत लोकशाहीवरचा विश्वास अनुस्यूत असतो. समाजवादाचे हे प्रवाह विचार-मूल्यमापनाच्या मार्गाने पुरोगामित्वाची कास धरत असले तरी समाजात एकाच वेळी अन्य व्यवस्था अस्तित्त्वात असतात त्या मोडून काढून एकच व्यवस्था उभारायला हवी असा आग्रह यात असत नाही. त्यामुळे धर्मसंस्था, लग्नसंस्था, सामाजिक गट यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही समाजवादी विचारधारा स्वीकारणे शक्य होते. या विविध व्यवस्थांमधील सुट्या सुट्या भागांबद्दल समाजवादाचा आक्षेप असेल, त्यात बदल व्हावा/रद्द व्हावा अशी अपेक्षा असेल, आग्रह असेल पण सारी व्यवस्थाच मोडीत काढावी असा टोकाचा आग्रह बहुधा धरला जात नाही.
थोडक्यात सांगायचे तर लोकशाही समाजवादी अन्य व्यवस्थांचे सहअस्तित्व मान्य करू शकतात, कम्युनिस्टांना फक्त त्यांची एकच व्यवस्था हवी असते.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
माझ्यासारख्या राजकारणात
माझ्यासारख्या राजकारणात निरक्षर असणार्या, नुसते कल आणि ऐकीव-वाचीव माहिती असणार्या वाचकासाठी फारच उपयुक्त विवेचन आहे. पुढच्या भागाची वाट तर पाहावी लागेलच. पण विशेष उत्सुकता शेवटच्या दोन भागांबद्दल आहे, हेही कबूल केलं पाहिजे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
लालू, मुलायम, शरद यादव यांच्यापलिकडे समाजवादाबद्दल माहिती वाचण्यासाठी उत्सुक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चोप्य पस्ते
कुरुंदकरांनी त्यांच्या एका पुस्तकात समाजवाद्यांच्या स्थितीची मीमांसा केली होती. त्यात त्यांनी "समाजवाद्यांना सत्तेत येण्याची प्रचंड घाई झालेली आहे. त्यामुळे नाही नाही त्या तडजोडी हा पअ करताना दिसतो". असे म्हटले आहे.
समाजवाद्यांची शोकांतिका होण्याचे मला वाटणारे एक कारण जेव्हा दोन वेळा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा त्यांनी पूर्वीच्या कट्टर कॊंग्रेसी नेत्यांना नेतृत्व दिले. [मोरारजी देसाई आणि व्ही पी सिंग यांची समाजवादावर मुळीच निष्ठा नव्हती]. महाराष्ट्रात शरद पवारांना जवळ केले.
दुसरे कारण म्हणजे त्यांच्यातल्या चारित्र्यवानांनी सत्ता हाती घेतली नाही. त्यामुळे ती मुलायम-लालूंसारख्या गणंगांच्या हाती गेली. भाजपने (केंद्रात एकदा आणि अनेक राज्यात वेळोवेळी)
सत्ता मिळाल्यावर काही चांगले घडवण्याची शक्यता दाखवली म्हणून २००४ च्या पराभवानंतरसुद्धा भाजप स्पर्धेत टिकून राहिला. तशी शक्यता समाजवाद्यांनी दाखवली नाही. १९८९ मध्ये दुसर्यांदा सत्ता देऊन झाल्यावर पुन्हा संधी देण्याचा विचार जनता का करील?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत
बहुतेक मुद्द्यांशी सहमत. किंबहुना मोदी का जिंकले हे तपासताना मोदींची बलस्थाने कोणती हा प्रश्न आजही समाजवादी विचारत नाहीत हीच माझी खंत आहे. हा भाग तपशीलाने पुढे येईलच.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
समाजवादीच विचार करत नाहीत असे
समाजवादीच विचार करत नाहीत असे नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर ९५ सालच्या युतीच्या सरकारनंतर पुन्हा सत्ता मिळाली नाही याचे कारण सत्ता मिळाल्यावर काही चांगले घडवण्याची शक्यता त्या सरकारमध्ये जनतेला दिसली नाही.
मुंबईतले उड्डाणपूल हा एकमेव सांगण्यासारखा कार्यक्रम त्या काळात घडला. पण त्यापाठोपाठ आलेले 'टोल'धाडीचे भूतसुद्धा जनतेस दिसलेच.
जनता आपल्याला मते का देत नाही याचा विचार सेना-भाजपने सुद्धा केला नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एका उत्तम लेखमालेची भरभक्कम
एका उत्तम लेखमालेची भरभक्कम सुरूवात. पुढच्या लेखांची आवर्जून वाट बघतो आहे.
राजकारणाविषयी येणाऱ्या विश्लेषणात नेहमीच हा पक्ष विरुद्ध तो पक्ष, या नेत्याच्या चुका, त्या नेत्याची पॉवर वगैरे टॉप डाउन स्वरूपात मांडणी असते. जिच्या बळावर पक्ष आणि नेते उभे असतात ती जनता म्हणजे मुकी बिचारी कुणी हाका या स्वरूपाची असते. फार तर ती जातीत विभागली गेलेली असते, आणि मग या नेत्याने/पक्षाने या जातीचं डेमोग्राफिक कसं मिळवलं, कसं गमावलं वगैरे ढोबळ विश्लेषण होताना दिसतं.
मला या लेखमालेतून काही ग्राउंड अप सत्यं शोधलेली आवडतील. म्हणजे, समाजवादाची इमारत कोसळली याचं कारण कदाचित तिला आधार देणारी जमीनच खचली असा असू शकेल. एके काळी असलेली समाजवादी मनोवृत्तीच बदलली का? समाजवादाने दाखवलेली स्वप्नं जुनाट झाली का? नव्या समाजाच्या मनोवृत्तीप्रमाणे ती बदलली का? अशा प्रश्नांची काहीशी लोकाभिमुखी उत्तरं आलेली आवडतील.
थॅंक्स
राजेश तुझ्या अपेक्षांबदल आभार. पण त्या पुर्या होण्याची शक्यता निदान या लेखमालिकेत तरी कमीच आहे. काही मुद्दे स्पर्श केलेले आहेत, पण एक लेख म्हणून आधी विचार केलेला असल्याने फार खोलात शिरलेलो नाही. विश्लेषण कमी, परिणामांची नोंदणी मुख्य नि त्याबाबत उपलब्ध असलेले पर्याय अधिक विस्ताराने मांडणे (हा शेवटचा मुख्य हेतू होता, अर्थात बदलत्या परिस्थितीत हे वेटेज बदलायला हरकत नाही. बघू या.) अशी मांडणी आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
चांगला विषय
या लेखमालेकडे लक्ष ठेवून आहे. बरीच नवी आणि चांगली माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
छान लेख. पुढील भागाच्या
छान लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
"आमच्या नेत्यांनी पुढच्या पिढ्या घडवल्या नाहीत" असं जवळच्या नात्यातले एक वृद्ध समाजवादी कार्यकर्ते म्हणत असत. त्यांचा नातू आज शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
या विषयात गति अज्याबातच नाही.
या विषयात गति अज्याबातच नाही. पण प्रतिक्रियांवरुन, काहीतरी धमासान चांगलं आहे एवढं कळतय
सुंदर लेख . माझा प्रतिसाद
सुंदर लेख . माझा प्रतिसाद या धाग्यावर relevant आहे कि नाही याची खात्री नाही तरी पण टंकत आहे ( लेखकाची माफी मागून ). मुळात या खंडप्राय देशाला सरसकट असा एक 'ism ' लागू पडू शकतो का ? मग तो समाजवाद असो , हिंदुत्व वाद असो , साम्यवाद असो का भांडवल वाद असो . मुळात कुठला तरी एक 'ism ' अंगीकारून धोरण आखण या खंडप्राय आणि वैविध्य असणार्या देशाला परवडणार आहे का ? या कारणामुळेच 'घोंगडी ' (सर्व प्रकारच्या 'ism ' चे समर्थक ज्या पक्षात आहेत असा पक्ष ) असणारा कॉंग्रेस पक्ष इतकी वर्ष या देशात टिकला का ? वाजपेयी सरकार ने पण कुठलाही एक 'ism ' न अंगीकारता हाच कॉंग्रेस pattern अंगिकारला होता .
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
वाजवी
तुमचा प्रश्न १००% वाजवी आहे. मी स्वतःला 'व्यामिश्रतावादी' म्हणवतो (जरी मोदीभक्तांना मला समाजवादी म्हणून हिणवायला आवडत असलं तरी ) एकच इजम हा कालातीत तसंच सामाजिक वा भौगोलिक दृष्ट्या सर्वव्यापी असू शकत नाही असे माझे ठाम मत आहे. विशिष्ट समाजात, विशिष्ट वेळी, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निवडलेला एक इजम वा एकाहुन अधिक इजम्सची यथायोग्य जोड ही उपयुक्त वा परिणामकारक ठरली तरी काही काळानंतर नवी निवड करावी लागते कारण परिस्थिती बदलत असते. त्यामुळे 'माझं मत एकदा बनलं की बनलं, त्यात काडीचाही बदल संभवत नाही' म्हणणार्यांबद्दल मला खरंच सहानुभूती वाटते.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
उत्तम विषय, ह्या निमित्ताने
उत्तम विषय, ह्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष, नेते/कार्यकर्ते उदा. एस.एम.जोशी, श्रीपाद डांगे वगैरे आणि त्यांच्या भुमिकांवर उदा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरेच्या अनुषंगाने तुमचे मत वाचायला आवडेल.
'नवे संदर्भ'
लेखनाचा विषय 'नवे संदर्भ' हा असल्याने भूतकाळाचे विवेचन याच्या व्याप्तीमधे येणार नाही. त्याचे लेखन स्वतंत्रपणे करेन.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
+
+१
भूतकाळाच्या विचेचनातून समाजवादी म्हणवणार्यांची वेळोवेळची भूमिका आणि (समाजवादाशी संबंध नसलेल्या) सोयीच्या चळवळींना आपलेसे करण्याचा इतिहास पुढे येऊ शकेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
छान सुरूवात
पुढे वाचायला आवडेल. समाजवादाचे अमेरिकन टीकाकारांच्या भाषेत जे सोपे रूप समोर येते - श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे, सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना ई- हे त्याचा अविभाज्य भाग आहे असा माझा समज आहे. ते खरे आहे का?
दुसरे म्हणजे समाजवादातील काही तत्त्वे - श्रीमंत लोकांकडून गरीबांकडे संपत्तीचे वितरण- हे माणसाच्या नैसर्गिक उर्मीच्या विरूद्ध वाटते (जर जास्त पैसा कमावल्यावर तो इतरांना दिला जाणार असेल तर लोकांचे पैसा कमवायचे मोटिवेशन कमी होईल व त्यामुळे देशाच्या एकूण प्रगतीवर परिणाम होईल, या अर्थाने. ते "ग्रीड इज गुड" ई.). यावरून अनेक वर्षे समाजवाद राबवलेले देश किती प्रगत आहेत याची माहिती कोठे मिळाली तर ते ही आवडेल वाचायला. त्यावर तुमचे विश्लेषणही.
समाजवादाचे अमेरिकन
समाजवादाचे अमेरिकन टीकाकारांच्या भाषेत जे सोपे रूप समोर येते - श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे, सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना ई- हे त्याचा अविभाज्य भाग आहे असा माझा समज आहे. ते खरे आहे का?
नॉट ऑलवेज.
श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेणे, व गरीब लोकांच्या स्कीम्स करता तो वापरणे - याला वेल्थ रीडिस्ट्रिब्युशन म्हणतात. किंवा कल्याणकारी योजना म्हणतात. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द स्कीम. श्रीमंत व्यक्ती स्वतः अशा स्कीम्स ला पैसे देत असेल तर त्यास खरोखर समाजवाद म्हणता येईल का ? त्यास चॅरिटी म्हणता येऊ शकते.
सर्वसामान्य लोकांकरता सरकारने सरकारच्या (म्हणजे करदात्यांच्या) पैशातून राबवलेल्या योजना - यात पब्लिक गुड्स / सर्व्हिसेस प्रोव्हिजन सुद्धा येते. न्यायव्यवस्था ही सरकारने करदात्यांच्या पैशातूनच राबवलेली असते. मग तिला बरं समाजवाद म्हणत नाही आपण ??? समाजवादाचे टीकाकार तिला समाजवाद म्हणतात असे मलातरी आढळलेले नैय्ये.
दुसर्या बाजूला - "सामाजिक सुरक्षा" (सोशल सिक्युरिटी) हे मात्र सोशॅलिझमचे स्वरूप आहे असे किमान एक अर्थशास्त्री (तो सुद्द्धा दिग्गज) म्हणतो. पण ती ही जनतेवर कर लावूनच राबवली जाते. तुम्ही योजना हा शब्द वर वापरलेला आहेच. पण योजना तर कॉर्पोरेशन्स सुद्धा बनवतात. तुमच्या कंपनीत प्रोजेक्ट प्लॅन बनवतात की नाही !!! तो सुद्धा शेअरहोल्डर्स नी दिलेल्या पैश्यातूनच व त्यापैश्याच्या विनिमयासाठीच बनवलेला असतो ना !!! मग त्याला सोशॅलिझम का म्हणू नये ??
सोशॅलिझम या इंग्रजी शब्दाचा अर्थ समाजवाद आहे असे गृहित धरून वर मी ते दोन शब्द इंटरचेंजेबली वापरलेले आहेत.
समाजवादाच्या समस्यांचे वर्णन करताना फ्रेडरिक हायेक ने Fatal Conceit असा शब्द प्रयोग केला होता. हायेक ने समाजवादावर टीका करणार्या त्याच्या १९४५ च्या आसपास प्रकाशित झालेल्या (व अधिक सुप्रसिद्ध) पुस्तकाचे नावच मुळी रोड टू सर्फडम असे ठेवले होते. समाजवादाचा हायेक पेक्षा जास्त दणकट प्रतिवाद इतर कोणीही केलेला नैय्ये असे माझे मत आहे. याची कारणे अनेक आहेत. त्याने वेगळ्या लेन्स मधून सोशॅलिझम चे परिक्षण केले. वेगळे म्हंजे प्रत्येकवेळी सुयोग्यच असे कोणीच म्हणणार नाही. पण त्याने एपिस्टेमिक्स चा आधार घेतला. दुसरे कारण म्हंजे सोशॅलिझम ला असलेला पर्याय शब्दबद्ध केला. व तो पर्याय भांडवलवादाशी कसा मिळताजुळता आहे हे तर सांगितलेच पण त्याच बरोबर व्यक्तीस्वातंत्र्याच्या भक्कम पायावर उभा नसेल तर तो गुलामगिरी (Serfdom) कडे नेणारा कसा आहे ते सांगितले. फक्त या गुलामगिरीचे स्वरूप वेगळे असेल की ज्यात गुलामांचे मालक हे ब्युरोक्रॅट्स व राजकीय नेते असतील. मग ते नेते प्रजातांत्रिक मार्गाने निवडून १ आलेले का असेनात. सर्वात शेवटी, हायेक ने सत्तेचे विकेंद्रीकरण (जे प्रजातंत्राचे बलस्थान आहे) ही संकल्पना का व कशी सुयोग्य आहे ते ही अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.
फारएण्ड, तुमचा मूळ प्रश्न समाजवाद म्हंजे नेमके काय - असा आहे असे मला वाटते. व म्हणून इथे उत्तर द्यायचा यत्न करतो.
हायेक ने फेटल कन्सीट मधे वापरलेली - सोशॅलिझम ची - अतिसंक्षिप्त व्याख्या ही आहे - deliberate arrangement of human interaction by central authority based on collective command over available resources.
सवंग व्याख्या व अतिसोप्या शब्दात - A and B deciding what C should do for D.
समाजवादाचे मूर्त रूप - नियोजन आयोग (प्लॅनिंग कमीशन).
---
सोशॅलिझम ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ समाजवाद असा आहे हे गब्बर ने गृहित धरलेले आहेच. व (Gabbar admits that) ते गृहितक चुकीचे असू शकतेच. व म्हणून असे म्हणायला जागा आहे की आणखी ही अशीच चुकीची गृहितके असू शकतात व मिस-इंटरप्रिटेशन असू शकते. तेव्हा खरा प्रश्न इंटरप्रिटेशन चा आहे - असा प्रतिवाद करायचा मोह अनेकांना होईलच.
१ - समाजवादावर टीका करणार्यांचा/भांडवलशहांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास नस्तो असाही फोल प्रतिवाद केला जाईल.
धन्यवाद
धन्यवाद डीटेल उत्तराबद्दल. मी 'योजना' जे म्हंटले ते खूप व्यापक अर्थाने होऊ शकते हे आता लक्षात आले. मला योजना म्हणजे स्वस्त दरात धान्य, कमी दराने कर्ज, कर्जमाफी ई गोष्टी म्हणायच्या होत्या. ज्या सर्वांसाठी नसतात. तसा अर्थ धरला तर तुम्ही त्याबद्दल लिहीलेले काही बदलेल का?
नियोजन आयोग - माझी कल्पना आहे की नियोजन हा सरकारच्या सर्व योजनांबद्दल प्लॅनिंग करतो, फक्त त्यातील 'समाजवादी' ठरतील अशाच नव्हे. म्हणजे रेशनिंग वर किती खर्च करावा हा त्यातील समाजवादी भाग झाला, तर इन्फ्रास्ट्रक्चर वर किती, हा सर्वसमावेशक गोष्टीवर. अर्थात मला तेवढी अचूक माहिती नाही.
deliberate arrangement of human interaction by central authority based on collective command over available resources. >> ही जर व्याख्या धरली तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही थोड्याफार प्रमाणात समाजवाद असतोच असे दिसते.
+
>>अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातही थोड्याफार प्रमाणात समाजवाद असतोच असे दिसते
+१.
आपण "सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे" असे म्हणतो तेव्हा जरी सरकारने रस्ते बांधावे असे म्हणालो नाही तरी धोरणे/इन्सेन्टिव्ह* अशी ठेवावीत की त्यात फायदा दिसून त्या उद्योगात भांडवल आकर्षित होईल.
इथे सुद्धा देशातले उपलब्ध भांडवल 'केंद्रित नियंत्रकांच्या इच्छेनुसार' पाहिजे त्या ठिकाणी वळवले जात असते.
*इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की ती सबसिडी नाही असे घोषित करता येते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की
इन्सेन्टिव्ह शब्द वापरला की ती सबसिडी नाही असे घोषित करता येते. >> पर्फेक्ट. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी इतर जगाकडून उचललेल्या अनेक गोष्टींची नावे बदलून ती आपलीच असल्याची चलाखी केल्याची उदाहरणे अनेक देता येतील. विषयांतर नको म्हणून सध्या चूप बसतो.
अमेरिकेतच नव्हे तर भांडवलशाहीच्या पोटातच समाजवाद आहे असे आमचे लाडके मत आहे. पण त्याबाबत पुन्हा केव्हातरी.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
>>अमेरिकेतच नव्हे तर
>>अमेरिकेतच नव्हे तर भांडवलशाहीच्या पोटातच समाजवाद आहे असे आमचे लाडके मत आहे.
+१
आज अस्तित्वात असलेली भांडवलशाही ही क्लासिकल भांडवलशाही नाही. म्हणजे गब्बरसिंग हे सदस्य जशी विधाने करतात तशी विधाने ती करत नाही. परंतु तशी विधाने केली नाहीत तरी भांडवलशाहीचा परिणाम व्हायचा तोच (क्लासिकल भांडवलशाहीसारखा) होतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लीझ
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी इतर जगाकडून उचललेल्या अनेक गोष्टींची नावे बदलून ती आपलीच असल्याची चलाखी केल्याची उदाहरणे अनेक देता येतील. विषयांतर नको म्हणून सध्या चूप बसतो.
विषयांतर होत असले तर होउ द्यात. ही इतर उदाहरणे जाणून घेण्यास उत्सुक आहे. प्लीझ लिहाच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अमेरिकेतच नव्हे तर
हा काय प्रकार आहे नक्की? याबद्दल वाचायला आवडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक महत्त्वाचा खुलासा
अनेक प्रतिसादांतून लेखांतून काय येऊ शकेल याबाबत अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. त्यांची नोंद घेतली आहे. परंतु पुन्हा एकदा लेखाच्या शीर्षकाकडे लक्ष वेधतो. त्यात लेखाची व्याप्ती निश्चित होते असं मला वाटतं. "नवे संदर्भ आणि आव्हाने" हे अधोरेखित करून ठेवतो. माझा रोख राजकारणावर, समाजवादी गटांच्या वा कार्यकर्त्यांच्या 'राजकीय' वाटचालीवर आहे, त्या इजमच्या मूल्यमापनावर नाही हे कृपया ध्यानात घ्यावे. अन्यथा अपेक्षित मुद्दे आले नाहीत तर 'हे तर वरवरचे आहे' असा समज होण्याची शक्यता आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
उत्तम! इथे(ही) ही लेखमाला
उत्तम! इथे(ही) ही लेखमाला येतेय हे प्रतिसाद द्यायला सोयीचं आहे - आभार!
रिपब्लिकन चळवळ, जनता दल उदय आणि र्हास, महाराष्ट्रापुरते बोलायचे तर शिवसेनेसारख्या उजव्यांची मदत घेऊन मध्याच्या डाव्याने राजकारण करणार्या काँग्रेसने डाव्यांची - विशेषतः जनता दलाची - उखडलेली मुळे, महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळींची शकले त्याच वेळी उत्तर प्रदेशात मात्र उभी राहिलेली दलित शक्ती, उत्तरेकडील समाजवादी नेते, बंगाल, त्रिपुरा व केरळातील कम्युनिझम व त्यांच्या छटा, बंगाल मधील कम्युनिझमचा डाव्यांच्या डावीकडे जाऊन करण्यात आलेला र्हास, समाजवादावर विश्वास आहे असे सांगत काही अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेतल्याने समाजवादाची व त्याच्या इमेजची झालेली हानी, ख्रिश्चन मिशनरी/आरेसेस इत्यादींचा समाजवाद (होय होय बरोबर वाचताय ) अर्थात धार्मिक समाजवाद, रिडालोस चा प्रयत्न आणि शेवटी आआप. अशी वाटचाल नी आगामी शीर्षके डोळ्यापुढे तरळून गेली.
शुभेच्छा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हम्म
इथे(ही) ही लेखमाला येतेय हे प्रतिसाद द्यायला सोयीचं आहे - आभार!>> का बरं. अन्यत्र प्रतिसाद द्यायला मनाई केली होती की काय कोणी?
कंसातला ही सहज आलाय की टोमणा म्हणून?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
टोमणा नक्की नाही अन्यत्र जिथे
टोमणा नक्की नाही
अन्यत्र जिथे लिहिलंय तिथे हाफिसातून कनेक्शन नाही. त्यामुळे मनाई नसूनही प्रतिसाद देणे कठीण होते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
अन्यत्र जिथे लिहिलंय तिथे हाफिसातून कनेक्शन नाही. त्यामुळे मनाई नसूनही प्रतिसाद देणे कठीण होते.
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाचते आहे.
वाचते आहे.