बखर - साक्षात पोपट जाहला
कांदोजीची बखर
.
बखर राघोभरारीची
.
बखर-आम्रबरफीचा क्रूर सूड
.
इकडे राघोचे चलाख दूत, हेर ऐय्यरही कमी नसत. राघोस ते त्वरित वृत्तांत पोहोचवित. "उडदामाजी काहीतरी काळेबेरे घटिले: राणीची सखी आम्रबरफी राणीचे कानी विष भरोनिया ततोपरान्त काहीएक कुजबुजली". राघोही नसे दुधखुळा त्यासी यापूर्वीही आम्रबरफीचे अंगीचे नाना कळांचे वर्तमान कोणी एक ऐयाराने कथिले असे. राघोचे लालसर नेत्री येकायेकी एकच क्रोध उसळीतसे आणि राघो त्याचे अतिविश्वासू, परमस्नेही सिंहासि, ऐयाराचे मुखी सत्वर निरोप धाडोनी देई की अविवेकी आम्रबरफीने पुनः वार करण्याचे योजिले. आता तिचा काटा काढणे व्यतिरिक्त गत्यंतर नसे. तेव्हा असाल तसे सत्वरी प्रस्थान करावे काही गुप्त खलबते-मसलती करणेचा मानस आहे. इतुके करोनि राघो विकट हास्य करून वदतसे - राघो-सिंह युतीस कोण मात देतो ते पाहातोची मी. नाना आय डी सहन करूनही बरफी हा खेळ मांडतसे, आता मात्र तिची खैर नसे.
.
थोडे सिंह या पात्राविषयी बोलणे उचित समजोनि बखरकर्ता श्रोतयापासी विनवी आता सावरोनी बैसा नि ऐका कसा असे हा सिंह पुरुष. जयाची दिगंत कीर्ती, त्रिभुवनासी धाक जयाचा ,मुत्सद्दी , पराक्रमी , पाताळयंत्री, राजकारणकुशल ,अति खल, अति महत्त्वाकांक्षी , फडतुसांचा कर्दनकाळ आणि अतिदक्षिणमार्गी (राईटीस्ट). ना दया ना माया ना करुणा याचे हृदयी परंतु राघोसी त्वरित वश का कारण राघो त्याचा परममित्र हे येक कारण असे परंतु अन्य कारण हेही की विडिंबा बाई विषयी त्यासी थोडेही ममत्व नसे . विडिंबा आणि सिंह वादविवादात एकमेकांसी हार ना जात. तुल्यबलची दोघे आपुला मुद्दा कोणीचा न सोडतसे. प्रतिसादावरती लघु प्रतिसाद , अति लघु होत जावोनि, अंती जन म्हणती
"पुरे करा. आवरा. अन्यथा लिखाणक्षेत्र (साईट) मोडोनी पडेल."
राघोचे आणि सिंहाचे अन्य दूरवरील यवन राज्याविषयी (पॅलेस्टाइन - ईझ्रायल) काहीएक मतभेद जरूर असत परंतु दोघे परममित्र होते हे नाकारता येत नसे.
.
इकडे सिंह त्याचे स्वतः:चे अतिभव्य अश्मदुर्गी, निद्रासुख अनुभवितसे. त्यासी ऐयार येवोनी निद्रीमध्ये विघ्न घालोनि निरोप वदे - "असाल तसे निघोनि या, बरफीने विडिंबाबाईंच्या करणी गरळ ओतोनि काही येक अशुभ करण्याचे घाटिले. बरफीच्या पापाचा घडा भरिलासे." सिंहाचे मनी लघुसर्पिण चुकचुकतसे. त्वरित तो मार्गाक्रमण करीतसे. राघोकडे पोहोचताच राघो सिंहाची गळाभेट घेवोनि त्यासी कुशलमंगल पुसोनि स्वागत करीतसे. मग एकांती सिंह राघोसी पुसतसे "एकाएकी असे काय जाहले की पराक्रमी राघोस या सिंहासी शांत निद्रेतूनी जागृत करावयास भाग पाडिले? जे कोणी या घटनेच्या मागे आहे आम्ही त्याचा त्वरित बंदोबस्त करू हे आमुचे वचन परममित्र राघोसी. राघो सर्व कथा कथन करे आणि पृच्छा करीतसे "कसे करावे मग? विडिंबेस कसे पटवावे की बरफीस तुझया हिताची पर्वा नसे. पर्वा असे फक्त एकच - राघोचा सूड -प्रतिशोध." यावरी सिंह म्हणतसे - नाही असे थेट जाहीर करण्याने, विडिंबा ऐकणार नाही. स्त्रीची ती . हलके कर्ण, संशय हा गुणधर्माची असे स्त्रीजातीचा. त्यात विडिंबा सखीचे विरोधी ऐकोनि घेण्यास तयार होईलसे वाटतं नाही
कारण एकचि विडिंबा कोणाचेच काहीही ऐकत नाही.
चतुर श्रोतेहो ध्यानी आले असेलच की सिंहासी स्त्रीजातीविषयी तसूभरही ममत्व नाही. मग कसे करावे? सिंह म्हणत असे जाहले तर की आपण विडिंबा आणि आम्रबरफीतच कलह लाविला तर. पण हे व्हावे कसे? यावरी सिंह म्हणे त्या दोघीत असा काय मुद्दा असावा ज्यावर दोघींची मतभिन्नता तर असावीच परंतु दोघीसी आपुल्या आपुल्या स्थानी उत्कटतेनं प्रतिवाद करिता यावा, ज्यायोगे कलहांसी निमंत्रण जावे? यावरी राघो काहीएक विचार करोनि म्हणतसे, "अपर्णा रामतीर्थंकर" या विदुषीचे कथन बरफीस विपुल आवडे परंतु याची कथनाने विडिंबेचे रक्त उकळे. जरी आपण हा विषय नेटाने धरोनि लाविला तर दोघीत कलहाचे कारण निर्मिती होण्याची शक्यता विपुल असे. आणि आपुल्याच कल्पनेवरती ते खल, अतीखल, कारस्थानी सरदार खूष होवोनि एकमेकां टाळी देत. स्वतःचे विनोदावरती स्वतः हसणे पुरुषांसि शिकवावे लागते काय?
"राघो "अपर्णा रामतीर्थांकर" धागा त्वरीत ऊर्ध्व उपसे. यावरी पुनः: एकवार चर्चा झडोनी, बरफी आणि विडिंबा दोघी अत्यंत विरुद्ध प्रतिवाद करोनि, मैत्री धुळीत बुडवीत जैसे की एखादे अमूल्य रत्न धुळीत मिळावे. हे देखोनि कुटिलाशिरोमणी सिंह व कृष्णहृदयी राघो विकट हासोनि , होय मनोमनच परंतु विकटची हांसोनि तमाशा देखतसे. एकदा मानसिक-तेढ निर्मिती जाहली की मैत्रीमधील माधुर्य पुरते नष्ट होते. तद्वतच विडिंबा आणि बरफीचे जाहले. दोघींस राघो-सिंहाने शत्रू बनवोनि टाकिले. राघो-विडिंबा युद्ध टळले. परत एकवार कुटील पुरुषजात हेचि सिद्ध करे की दोन पुरुषात जैसी मैत्री होते आणि सदासर्वकाळ राहाते तैसी मैत्री दोन स्त्रियांत होणे दुर्लभ जैसे तक्रम शंकरस्य दुर्लभम ...."
असे दु:स्वप्न , दिवास्वप्न राघो देखोनि क्षणभंगुर तुष्टता पावतसे. मनी ऐसे मांडे रचितसे असे जे की देखोनि विश्वकर्म्याने लज्जित व्हावे.
.
परंतु ते स्वप्न स्वप्नाची राहिले आणि हे कारस्थान राघो-सिंहावरीच उलटले हे तर अखिल चराचरासि ठावे. ते परत परत कथन करण्यामध्ये बखरकर्त्यास काहीही मुद्दा दिसत नसे. तर अशी राघो-सिंह फजिती आणि त्यांचे मनसुब्याचा फज्जा.
यातुनीच हे वचन ख्यात पावितसे की "राघु होणे. (पोपट होणे).
राघो आणि सिंह यांचा साक्षात पोपट होतसे.
- श्रोतयांच्या सहनशीलतेचा अंत देखणे उचित नाही. म्हणोनि येथेचि बखर समाप्ति-
प्रतिक्रिया
बखरकार बरफीदेवी यांचे काय
बखरकार बरफीदेवी यांचे काय कारस्थान चालो आहे हे नकळे. एक हस्ते आपल्या बखरी, रुमाल लिहून काढणे चालो आहे, तर दुसरे हस्ते (अर्थातच भलत्याचि नावाने) लेखनक्षेत्रातले इतर जुने धागेदोरे वर काढोन त्या रुमालांवर असे पसरोनि दिले आहे की जणो तुकारामगाथियेवर इंद्रायणीजल. एकाच वेळी कोंबडे उजाडणे आणि सूर्य टोपलियात झाकणे चालू आहे. याचा अर्थ काय लावावा? काहीतरी काळबेर होय, हे निश्चित. राघो अर्थातच कुशंक होऊन त्यांच्या भाळी आठियांचे जाळे झाले. दुर्लक्ष करोन या रुमालांना त्या धाग्यांखाली झाकले ठेवावे, तर तोच बरफीयेचा मकसद असावा अशी शंका. जवाब देवोनि वर काढावे तर आपुलाचि पोपट होणे सर्व जगतास जाहीर होण्याचे भय. नकोच ते.... किंवा कदाचित राघोंनी नकोच ते म्हणणे हेच बरफीयेला अपेक्षित असावे व तिचा कुटिल कट यशस्वी होई! काय करावे?
राघोंनी निर्णय घेण्यासाठी अशा प्रसंगी वापरण्यात येणारी सर्वात नामी युक्ती योजली. त्यांनी एक सुवर्णमुद्रिका अवकाशात भिरकावली व स्वतःस म्हटले डोके आल्यास काही न करणे, पुच्छ आल्यास धाग्यावर जबाब देणे.
जमिनीवर पडलेल्या मुद्रिकेवरचे पुच्छ पाहात नाक मुरडून राघोंनी जवाब द्यायला सुरुवात केली....
तर आपुलाचि पोपट होणे सर्व
हाहाहा हे भय पत्करुन पूजापती बल्लवाचार्य राघो यांनी ते कशालाही भीत नसण्याचे सिद्ध केलेले आहे
चियामारी... नवीन प्रांती
चियामारी... नवीन प्रांती पोहोचलेयावरी तेथील कुशलमंगल कोणते, खलअमंगल कोणते काही उमज पडो नये... तैसे जाहले.राघो कळाले- सिंह,विडिंबा, बरफी ही सोंगे तपासावी तरी कोणत्या छन्नमार्गे?
मुग्धाताई विडिंबा कोण हे
मुग्धाताई विडिंबा कोण हे जाणण्यासाठी कांदोजीची बखर वाचणेचे करावे.
.
वा! मजा आली
हा हा हा
बर्फी भलतीच चटपटीत निघत्ये. ह्या भाषेत वाचायला थोडे कष्ट करावे लागत आहेत, पण मजा येत्ये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेखनातील साटल्य नाहीसे
लेखनातील साटल्य नाहीसे झाल्याने तितकेसे बरे वाटले नाही .
असो,
आम्रबर्फीच्या वर्तनात कधीतरी सुधारणा घडो ही देवापाशी प्रार्थना .
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
थोडे विषयांतर. "पोपट होणे" हा
थोडे विषयांतर.
"पोपट होणे" हा वाक्प्रचार मराठीतील "कुतरओढ" किंवा तत्सम अत्यंत अश्लील व्युत्पत्ती असूनही शिष्टसंमत झालेल्या पैकी आहे.
दादर शिवाजीपार्क परिसरात तो निर्माण आणि प्रसृत होण्याच्या काळात मी राहत होतो. अतिशय ग्राफिक असल्याने वर्षभरात तो सर्वत्र accept झाला.