Skip to main content

श्री कोरोनाविजय कथामृत (४) - एप्रिल २०२१

(मार्च महिन्याचे निरुपण इथे)

प्रलयकाळ !!

महिन्याची सुरुवात झाली रोज नवीन एक्यांऐशी हजार केसेसनी आणि शेवट झाला रोज नवीन चार लाखांहून जास्त केसेसनी.

पाचपट वाढ... एका महिन्यात...

रोज नवा जागतिक उच्चांक!!!
 
बायडेनमामानी याच काळात केसेस आणल्या सत्त्याहत्तर हजारावरून साठ हजाराच्या आत!!

बोरीसकुमारांनी अखेर लॉकडाऊन उठवला, पण तेव्हापर्यंत देशातला रोजचा आकडा दोन-तीन हजाराच्या आत आणला.

आणि हो, देशातल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकांना लसीचा किमान एक डोस एवढं जमवलं.

अपेक्षेप्रमाणे आमच्याकडे लसटंचाई सुरू झाली. लसधोरणच असं आखलं की हे होणारच होतं (वाचा : लघुदृष्टी आणि दूरदृष्टी)

निवडणुकीच्या लाखालाखाच्या सभा चालू होत्या वीस तारखेपर्यंत.

कुंभमेळाही जोरात चालला.

नक्की काय चाललंय इथे हे वेगळं लिहिणार नाही.

सगळ्यांनी बघितलं आहे. कुठे ना कुठे. पेपर, टीव्ही, सोमी.

एका राज्याच्या मुख्यमंत्र्यानी आयडिया चांगली काढली यावर -

कसल्याही टंचाईची, बेड्स असोत, ऑक्सिजन असो, औषधे असोत, त्याची बातमी द्यायची नाही कुणी.

दिली तर गुन्हा दाखल केला जाईल असा ढोस!!

कोरोनाकंट्रोलपेक्षा कोरोना आकडे आणि बातम्या यांवरच कंट्रोल असा प्रकार एकंदरीत.

एकंदरीत कोरोनाने सध्यातरी आमच्यावर विजय मिळविला आहे असे चित्र आहे!!!

कसे काय विचारता?

खालचा ग्राफ बघा, येईल लक्षात सगळं.

तेव्हा महाराजा सध्यातरी म्हणा -

रामराम रामराम सीताराम सीताराम,
पुंडलिकवरदे हारी विठठल!!!
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय!!!

April New Patients Daily

(मे महिन्याचे निरुपण इथे)

राजेश घासकडवी Sat, 08/05/2021 - 17:20

२०२० साली जी 'लाट' आली होती तिच्या कितीतरीपट वेगाने ही वाढ होतेय. तेव्हा फेब्रुवारी ते सप्टेंबर काळात - सात महिन्यांत रोजच्या नवीन रोग्यांची संख्या लाखापर्यंत गेली होती. आजच्या काळात ही दीड महिन्यांत दिवसाला चार लाखांपर्यंत गेली आहे. कठीण आहे.

भाऊ Mon, 10/05/2021 - 20:04

चारही भाग वाचले. यातील आलेख कुठे मिळाले आहेत, किंवा आपण काढलेत काय?

नेमका उद्देश मालिकेचा समजला नाही. मौजमजा तर वाटत नाही!
अजून सहा महिन्यांनी कदाचित त्रयस्थपणे समीक्षा केली तर उचित ठरेल, जेव्हा पुरेशी लस+उपचार+ ते देणारे उपलब्ध होतील.

>> आणि हो, देशातल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकांना लसीचा किमान एक डोस एवढं जमवलं.

बोरिसकाका आणि आपल्या देशाची तुलना काय करायची...त्यांनी सहा वगैरे कोटीच्या ५०% म्हणजे जितक्या लोकांना पहिली लस दिली म्हणता त्याहून अधिक आपण दुसरी दिली नाही काय?
सध्या तरी अंतिम निष्कर्ष काढणे म्हणजे घाई होईल हे मा वै म..

अबापट Mon, 10/05/2021 - 22:42

In reply to by भाऊ

१. आलेख मी काढले. सरकारी डेटा वरून
२. मालिकेचा उद्देश जे घडले आहे ते दिसले आहे ते लिहिणे असा होता.
३.बोरिसकुमार (आणि बायडेन काका) यांच्याशी तुलना नाही, पण संदर्भ देण्याचे कारण म्हणजे वर्ष जेव्हा सुरू झाले तेव्हा या दोन्ही देशातील महासाथीची परिस्थिती भयंकर बिकट होती. अमेरिकेने सर्वोच्च आकडे नोंदवले होते, तीन लाखाच्या वर ,एका दिवसात.
यातून बाहेर पडण्याचे दोघांनीही वेगळे मार्ग निवडले आणि आज त्यांची तौलनिक परिस्थिती काय आहे हे ढोबळ मानाने दर्शविण्यासाठी.
४. सहा कोटी की साडे सहा हा मुद्दा तो नाहीये.
मुद्दा असा आहे की त्यांनी तो मार्ग पकडून अत्यंत वेगवान पद्धतीने अमलात आणला आणि त्याची चांगली फळे ते चाखत आहेत. त्यांच्या देशाच्या पन्नास टक्के (किंवा साठ टक्के )हा महत्वाचा मुद्दा आहे.( संसर्ग वाढणे/साथ वाढणे या दृष्टीने)
इथे आपल्या देशाची तुलना होऊ शकत नाही.
५. अंतिम निष्कर्ष काढले नाहीयेत, फक्त निरीक्षणे नोंदवली आहेत 2021 मधील महिन्यांची. मे संपला की त्याबद्दलही लिहू.
जून संपला की त्याहीबद्दल.

वनराज Tue, 11/05/2021 - 08:01

आपली लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत प्रचंड आहे हे राज्यकर्त्यांना ठाऊक नव्हते का? एरव्ही सव्वासों करोड जनतेच्या नावाने नागरे वाजवले जातात. एवढ्या प्रचंड प्रमाणावर लशी द्यायच्या तर, अमेरिका, युरोपच्या तुलनेत आपण तर खूप आधीपासून आणि मोठ्या प्रमाणावर लशींचं नियोजन करायला हवं होतं. तहान लागल्यावर लगेच इतकी मोठी विहीर खणता येणार नाही हे कळलं नाही? दोनशे कोटींपेक्षा जास्त लशींची गरज आहे आणि आज ह्या घडीपर्यंत सुद्धा फक्त सव्वीस कोटी लशींची ऑर्डर दिलेली आहे. मुळात किती काळात देशाचं लशीकरण पूर्ण करायचं (सहा महिने? वर्ष?), त्यासाठी दरमहा किती लशींची निर्मिती आणि वितरण ह्याची व्यवस्था करायची ह्याचं कुठलंही गणित सरकारने मांडलं नाही. त्याची कुठलीही व्यवस्था केली नाही.
उत्पादनाची व्यवस्था केली सीरमने, स्वतः business risk घेऊन. सरकारने त्यांच्याशी बनियेगिरी करून फक्त भाव केला. त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सरकारने काही केलं नाही. आजही भारताची लसनिर्मिती क्षमता दरमहा आठ कोटी लशी इतकीच आहे. ह्या वेगाने संपूर्ण देशाचं लशीकरण करायला दोन वर्षं जातील. एका वर्ष्यात पहिल्या लसीचा प्रभाव ओसरून अर्धी जनता पुन्हा उघड्यावर!
आता इतकी आग पेटल्यावर सुद्धा आमचं काही चुकलंच नाही, आम्ही कित्ती उत्तम काम केलं आहे , मीडिया , इतर पक्षांची आणि देशांची सरकारं कित्ती वाईट्ट आहेत हेच सांगणं चाललंय.

तिरशिंगराव Tue, 11/05/2021 - 13:01

लशीसाठी नंबर न लागू शकणाऱ्यांसाठी सरकारने कोरोनाचाच पर्याय ठेवला आहे. शेवटी बहुसंख्य जनता लशीअभावी कोरोना होऊन पण वाचेल आणि लस घेतलेल्यां इतक्याच अँटीबॉडीज अंगात तयार करेल.

Rajesh188 Thu, 13/05/2021 - 01:11

पृथ्वी वरील सर्वात जास्त लसीकरण झालेला देश आहे पण तिथे परत corona च्या केसेस वाढत आहेत .संशोधक चिंतेत आहेत.