पुरेसा कंपोझ ’मेक अप’ झाला म्हणजे त्याचे पहिले प्रूफ काढले जाई. पणजोबांचे जुने गुटेनबर्ग टाइपचे मशीन आमच्याकडे होते. त्यावर प्रूफ काढले जाई. ह्यासाठी प्रथम फ्रेम मशीनवर ठेवायची, तिच्यावरून काळ्या रंगाचा रूळ हलकेच फिरवायचा, त्यावर कोरा कागद किंचित ओलसर करून ठेवायचा, बाजूचे चाक फिरवून फ्रेम पाट्याखाली आणायची आणि लिव्हर ओढून पाट्याचा दाब कागदावर टाकायचा, फ्रेम बाहेर आणायची आणि कागद उचलून घ्यायचा की प्रूफ तयार. पणजोबा ह्या संपूर्ण हाताच्या प्रोसेसने तासाला शंभरसवाशे प्रती काढत असणार. त्यांच्याकडे एवढे एकच छपाईचे मशीन होते.
त्यानंतर पहिले प्रूफ-करेक्शन. हे काम वडील अथवा आजोबा करीत असत. बराच रनिंग मजकूर असला तर आम्ही पोरे त्यांच्या समोर बसून एकेक ओळ वाचून दाखवत असू आणि प्रूफ-करेक्शन ते करत असत. लहानसहान बिले, हॅंडबिले, लग्नपत्रिका असले प्रूफरीडिंग मीहि करीत असे. प्रूफरीडिंगची सांकेतिक चिह्ने त्यासाठी मी शिकलो होतो.
दुरुस्त केलेले प्रूफ समोर धरून कंपॉझिटर चुकीचे टाइप चिमट्याने बाहेर काढून तेथे नवे टाइप बसवत असे. त्यावरून दुसरे प्रूफ तयार होई. तेहि दुरुस्त करून झाले म्हणजे शेवटचे फायनल प्रूफ गिर्हाइकाकडे जाई. त्याने ते अखेरचे तपासून सही करून पाठविले की त्या दुरुस्त्या करून मजकूर छपाईयन्त्राकडे जायला मोकळा होई.
गिर्हाइकाकडे प्रूफ पोहोचविणे हे काम मी सातारा सोडण्याच्या पूर्वीच्या शेवटच्या ३-४ वर्षात बहुधा माझ्याकडे असे. अशी प्रुफे पोहचविण्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. सातार्याच्या छत्रपति शिवाजी कॉलेजचे काही काम आमच्याकडे केले जात होते तेव्हा प्रुफे घेऊन मी सायकलने कॉलेजचे प्रिन्सिपॉल बॅ. पी.जी.पाटील ह्यांच्याकडे गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि हवेत बराच उकाडा होता. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील हे बाहेरच्या व्हरांड्यामध्ये घोंगडी घालून पडले होते असे आठवते. प्रुफे घेऊन मी सायकलने जवळच्या कोरेगाव, रहिमतपूर अशा गावीहि जात असे. फर्ग्युसन कॉलेजातील एक निवृत्त प्राध्यापक डॉ जी.वी.परांजपे ह्यांनी रहिमतपूरमध्ये रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ नावाची शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. (आता ती संस्था चांगलीच नावारूपाला आली असून अनेक शाळा/कॉलेजे चालवते.) त्या संस्थेचे बरेचसे काम आमच्याकडे येत असे. त्यांची प्रुफे घेऊन मी चारपाच वेळा रहिमतपूरला गेलो होतो. (पुलंच्या ’पूर्वरंग’मधील चिनी भाषेचे तज्ज्ञ वसंतराव परांजपे हे जीवींचे चिरंजीव हे मला माहीत आहे.) अशाच प्रूफ न्यायच्या एका वेळी मी मोठीच मजा केली त्याची आठवण अजून माझ्या मनात ताजी आहे.
त्याचे असे झाले: शिवाजी कॉलेज सातार्यात १९५६ च्या सुमारास सुरू झाले तेव्हा रयत शिक्षण संस्थेकडे पुरेसे उच्चशिक्षित मनुष्यबळ नसावे म्हणून की काय, कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल डॉ. ए.वी.मॅथ्यू नावाचे केरळी ख्रिश्चन होते. हे फार धार्मिक असावेत कारण त्यांच्या सातारा मुक्कामात त्यांचे स्वत:चेच Jesus Christ - Leader and Lord नावाचे एक पुस्तक त्यांनी आमच्याकडे छापण्यास दिले होते आणि त्या संदर्भात ते आमच्या घरीहि अनेकदा येत असत. वडील-आजोबा आणि त्यांचे संभाषण इंग्लिशमध्ये होई आणि आम्ही तेथे श्रवणभक्ति करीत असू. आपला नातू फार हुशार आहे अशी आजोबांची खात्री असल्याने माझ्याशी मॅथ्यूसाहेबांनी इंग्रजीत बोलत जावे असे आजोबांनी त्यांना सुचविले. तदनंतर एका पावसाळ्याच्या दिवशी प्रुफे घेऊन त्यांच्या हजेरीमाळापलीकडच्या जुन्या प्रकारच्या बंगल्यात जाण्याची माझ्यावर वेळ आली. बंगल्याला मोठे आवार होते आणि त्यापलीकडे व्हरांड्यामध्ये मॅथ्यूसाहेब खुर्चीवर बसलेले होते. मला लांबूनच पाहून त्यांनी विचारले, 'How are you?' मला हा प्रश्न ऐकू आला, ’Who are you?' मी लांबूनच आजोबांनी शिकविलेल्या तर्खडकरी इंग्रजीमध्ये दणकून उत्तर दिले, ’I am a boy'. ते ऐकून मॅथ्यूसाहेबांची बोलतीच बंद झाली. आपलेच इंग्रजी खराब होईल अशी साधार भीति त्यांना वाटली असावी! नंतर तेथेच व्हरांड्यात बसून सौ.मॅथ्यूंनी दिलेला फराळ खाऊन आणि चहा पिऊन मी घरी परतलो.
आमच्या घराजवळील आयुर्वेदीय अर्कशाळेचे सर्व काम, सातार्यातीलच युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे काही काम, आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूलचे काही काम अशी आमची नेहमीची गिर्हाइके होतीच पण सर्व प्रेसवाल्यांवर गंगा वळत असे इलेक्शनच्या वेळी. इलेक्शनसाठी प्रत्येक गावाच्या मतदारांच्या याद्या छापायचे टेंडर कलेक्टर ऑफिसकडून निघत असे. प्रत्येक गावासाठी print order १००-१२५ पर्यंतचीच असावी पण अशा शेकडो गावांचे मिळून कंपोझिंगचे प्रचंड काम असे. असे काम आले की महिना-दोन महिने रात्रपाळीने प्रेस चालत असे. हे कंपोझिंगचे प्रचंड खेचकाम आमच्या तीनचार कंपॉझिटरांच्या ताकदीबाहेरचे असे. कोल्हापूरचे काही लोक हे काम आमच्याकडून कन्त्राटावर घेत. त्यांची चारपाच जणांची टीम येई आणि १५-२० दिवस रात्रंदिवस कंपोझिंगचे काम करून त्याचा ते फडशा पाडत. शेवटच्या दिवशी त्यांना त्यांचे पैसे चुकते करायचे आणि त्यांना आमच्या घरीच एक जेवण द्यायचे असा रिवाज होता.
कंपोझिटर्सचे काम कंटाळवाणे होतेच पण त्याहूनहि अधिक कंटाळवाणे काम म्हणजे छपाई पूर्ण झाली की तोच मजकूर पुन: सोडवून सर्व टाइप आपापल्या जागी पुन: टाकणे आणि कंपोझिटर्सनाच ते करायला लागायचे.
आमच्याकडे जे तीनचार कंपोझिटर्स होते त्यामध्ये एक, भगवानराव जोशी, आमच्याकडेच हे काम शिकले आणि नंतर चाळीसएक वर्षे आमच्याकडेच कामाला राहिले. आम्हाला ते घरच्यासारखेच वाटत. दुसरे देशमुखहि २५-३० वर्षे होते.
१९४८च्या जळितामध्ये आमचे घर आणि छापखाना जाळण्यासाठी काही गुंड आमच्यावर चालून आले होते. त्या दिवसाचे वर्णन मी अन्यत्र 'उपक्रम'वर लिहिले होते. त्यावेळी सुदैवाने गुंड लवकरच पळून गेल्यामुळे हानि मर्यादित झाली पण तरीहि त्यांनी जवळजवळ सर्व टाइप जमिनीवर ओतून टाकला आणि असे नुकसान केले. ही पै सोडवत बसणे शक्य नव्हते म्हणून सर्व मेटल गोळा करून पुण्याला फाउंड्रीकडे पाठवावे लागले आणि नवा टाइप भरावा लागला. हे होईपर्यंत एखादा महिना गेला आणि त्या काळात छापखाना बंदच असल्यातच जमा होता.
चला. कंपोझिंगचा हा भाग बराच लांबला. आता येथे जनगणमन म्हणून हा भाग संपवितो. पुढच्या भागात छपाई, बाइंडिंग अशा कामांकडे वळेन.