फसवा फसवी
आपल्यासारख्यांचा जीवनाचा प्रवास हा नेहमीच भरपूर खाच – खळगे - खड्डे असलेल्या रस्त्यावरून होत असतो. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्यातील प्रत्येक टप्प्याला शेवट असतो व आपण हुश्श्श.... म्हणून तो संपवतो. टप्पा पार केल्याचा (क्षणिक) आनंद घेत असतो. त्यामुळे त्या टप्प्यापुरता केलेल्या प्रवासाचे ओझे वाटत नाही. आपले शिक्षण, आपल्याला मिळालेली नोकरी वा पत्करलेला व्यवसाय, घर-दार, प्रेम – लग्न यातील रुसवे – फुगवे, कधीतरी संपणार व सारे कसे शांत शांत होईल या आशेवर आपण जगत असतो व एकंदर जीवन आपल्याला निराश करत नाही असा सामान्यपणे सर्वांचा अनुभव असतो. फक्त प्रत्येक टप्पा पूर्ण करत असताना शेवटच्या क्षणी काही अचानक अडथळे उभे राहू नयेत म्हणून भरपूर प्रयत्नही केले जात असतात. अगदीच प्रकरण हाताबाहेर जात असल्यास जाऊ दे गेलं खड्डयात... असे म्हणत कुणाबरोबर तरी चार पेग घेत, किंवा दूरच्या ठिकाणी एकांतात वा कुठल्या तरी बुवा-बाबाच्या सांनिध्यात किंवा आपल्याच पार्टनरला हाँजी हाँजी करत प्रसंगाचा सुखांत करण्याच्या प्रयत्नात असतो.
परंतु जेव्हा माणसं अथक प्रयत्नांनी जीवनातील एकेक टप्पे पूर्ण करून आपली चांगली बाजू जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे आपली काळी बाजूसुद्धा उघड करतात, असे मानसतज्ञांचा दावा आहे. जेव्हा टप्पा पूर्ण होण्याचा शेवटचा क्षण येतो तेव्हा आपल्या फायद्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांची असते. साम, दाम, दंड, भेद यातले काहीही त्यांना चालते. एवढेच नव्हे तर त्यासाठी फसवणूक करण्याइतपत त्यांची मजल जाऊ शकते. सामान्यपणे हातातली संधी वाया जाऊ नये यासाठी ही धडपड असते. व्यवस्थेला फसविल्यामुळे काही बिघडत नाही, हाही आत्मविश्वास त्यात असतो.
यासंबंधात मानसतज्ञानी एक मजेशीर प्रयोग करून बघितला. नाणे उडवून छाप की काटा या प्रयोगासाठी आवाहन केले व त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हा एक ऑन लाइन प्रयोग होता. त्यात प्रत्येकाने घर बसल्या नाणे उडवायचे व ते खाली यायच्या आत छाप की काटा याची नोंद ठेवत ताबडतोब इंटरनेटद्वारे मानसतज्ञाला कळवायचे होते. बरोबर आलेल्या उत्तरासाठी एक लहानसे बक्षीसही देण्यात येणार होते.
ठराविक दिवशी, ठराविक वेळी सर्व स्पर्धक आपापल्या संगणकासमोर उभे राहून खिशातील नाणे बाहेर काढून, उडवून, छाप की काटा याची नोंद मानसतज्ञाला कळवू लागले. या नोंदी खरे आहेत की खोटे याची वैयक्तिक तपासणी शक्य नसले तरी संख्याशास्त्रीय नियमाप्रमाणे 50:50 (फार तर 5-10 टक्के इकडे तिकडे) उत्तर यायला हवे. परंतु हाच आकडा 70:30 वा 80:20 झाल्यास, काही तरी त्यात काळेबेरे आहे असे संख्याशास्त्रीय निकष आहे.
या प्रयोगाचे निष्कर्ष अगदी आश्चर्यकारक होते. प्रयोगात निश्चित केलेल्या 10 फेऱ्यांपैकी पहिल्या 4-5 फेऱ्यांची उत्तरं संख्याशास्त्रीय नियमाला अनुसरून 50:50 च्या जवळपास होत्या. म्हणजे स्पर्धेत भाग घेतलेले सामान्यपणे छाप काट्यांची नोंद योग्य प्रकारे ठेवत होते. परंतु जसजसे 10वी फेरी जवळ येऊ लागली तसतसे नोंदीमध्ये फार मोठी तफावत दिसू लागली. याचाच अर्थ काही जण मुद्दामहून चुकीची नोंद कळवत होते. प्रत्येक फेरीत किती वेळा नाणे उडवले व त्यात किती बरोबर आले यात काही योगायोगाचा संबंध नव्हता. परंतु यानंतर अजून किती वेळा नाणे उडवायचे आहे याबद्दल उत्सुकता होती; किती फेऱ्या राहिल्या याबद्दल कुतूहल होते.
समजा, अजून 3 वेळा नाणे उडवायचे राहिल्यास या तिन्ही वेळा फसविण्याची संधी स्पर्धकांना उपलब्ध होती. किंवा 8व्या, 9व्या वा 10व्या फेऱ्याच्या वेळी खोटी नोंद कळवून जास्तीत जास्त बक्षीस मिळवणे त्यांना शक्य होते. यावरून एखाद्या टप्प्याच्या शेवटी शेवटी काही तरी करून तो टप्पा पूर्ण करायला हवा व त्यासाठी फसवले तरी चालेल ही मानसिकता त्यात होती.
मानसतज्ञांना या प्रयोगाचे निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे आहेत असे वाटले तरी प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीतसुद्धा माणसं (स्वतःला) व इतरांना फसवत असतील का याचाही अंदाज घ्यायचा होता. या दुसऱ्या प्रयोगासाठी आवाहन करून चार - पाचशे वाचकांची यादी निश्चित केली आणि त्यांना 10 लेख वाचून श्रेणी देण्यास सांगितले. लेख वाचण्यासाठी लागलेल्या वेळेप्रमाणे त्यांना बिदागी दिली जाईल असे ठरले. जेव्हा भाग घेणारे वाचक लेख वाचत होते तेव्हा त्यांच्या अपरोक्ष वेळेची नोंद ठेवली जाणार होती.
पहिल्या 4-5 लेखासाठी वाचकांनी सांगितलेली वेळ व घड्याळात नोंदवलेली वेळ सामान्यपणे जुळत होते. परंतु जसजसा शेवटचा लेख जवळ येऊ लागला तसतसा वेळेतील फरक ठळकपणे जाणवू लागला. 6व्या – 7व्या लेखाच्या वेळेत 25 टक्के तर 9व्या 10व्या लेखाच्या वेळी ही टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढले.
अशा प्रयोगाचे निष्कर्ष केवळ प्रयोगापुरतेच सीमित नसून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी धोक्याची सूचना देणारे ठरतील. कारण आपण निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींची, विद्यार्थ्यांची, नोकरी करणाऱ्यांची वा गोल्फ – फुटबॉल –व्हालीबॉल यासारख्या क्रीडा प्रकारांची कालावधी निश्चित असते व कालावधी संपायच्या आत काहीही घडू शकते, याची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल.
आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असतो तेव्हा आपल्या मानसिकतेत फार मोठी स्थित्यंतरं होतात. आपण अधीर होतो, उतावळे होतो, खिन्नतेला कवटाळून बसतो. आनंदाची अनुभूती देणारे मेंदूतील Dopomine हे संप्रेरक या टप्प्यात कदाचित पुरेशा प्रमाणात उत्पन्न होत नसेल. म्हणूनच टूथ पेस्टच्या ट्यूबमधील पेस्ट संपलेले आहे हे दिसत असूनसुद्धा जास्तीत जास्त पिळून पेस्ट बाहेर काढण्याचा वृथा प्रयत्न या फसवाफसवीत दिसत असतो.
संदर्भः Scientific American, Aug 2015
प्रतिक्रिया
(No subject)
फार रोचक प्रयोग आणि
फार रोचक प्रयोग आणि निरीक्षण..
प्रयोग मोठाच रोचक आहे.
प्रयोग मोठाच रोचक आहे. पण
हे काय पटलं नाय. पेस्टची ट्यूब कापल्यावर दिसतं आत किती माल अजूनही आहे ते. नुस्तं बघून कळत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कापण्यापूर्वी आधी एकदा
कापण्यापूर्वी आधी एकदा बत्त्याने ठोकून झाले का ?
नाय्बा, बत्त्यापर्यंत वेळच
नाय्बा, बत्त्यापर्यंत वेळच आली नाय कधी. अमेरिकन लठ्ठ माणसागत दिसणारी ट्यूब आफ्रिकन कुपोषित बालकाप्रमाणे दिसू लागल्यावर मगच कापाकापी केलेली आहे.
अवांतरः हा उपाय दै. पुढारीमध्ये टिप्स या सदराखाली मागच्या सहस्रकात कधीतरी वाचनात आला होता.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा साणशीने दाबायची हो
हाहाहा साणशीने दाबायची हो खरच.
नायतर सरळ खालपासून वरपर्यंत
नायतर सरळ खालपासून वरपर्यंत लाटणं फिरवायचं.
सुंदर.
सुंदर.
लाटणे जरा जास्तच
लाटणे जरा जास्तच मॅक्रोस्कोपिक आहे. त्याला माय्क्रोलाटणे पायजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्लॅस्टीकची ट्यूब असेल तर २-३
प्लॅस्टीकची ट्यूब असेल तर २-३ वेळा लाटणे फिरवले की पुरते. मेटलची असेल तर एकदाच फिरवावी लागते. कारण मेटलला सुरकुत्या पडून त्या लाटण्यामुळे पर्मनंट होतात. मग कितीही लाटणं फिरवलं तरी काही उपयोग होत नाही.
हम्म ह्या बाकी खरा.
हम्म ह्या बाकी खरा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण या सर्व अत्याचारांमधे मूळ
पण या सर्व अत्याचारांमधे मूळ ट्यूबमुखाखेरीज अन्य कुठे छिद्र उत्पन्न होऊन त्यातून पिळिकपिळीक पेस्ट उद्भवू लागली तर भलता अप्रिय चिपचिपाट होतो.
लाटण्याचिही गरज नाही.
लाटण्याचिही गरज नाही. ब्रशच्या दांडीनेही ते काम उत्तम होते.
परंतु जेव्हा माणसं अथक
होय जंगच्या भाषेत "शॅडो पर्सनॅलिटी" .... आवडता विषय आहे हा स्पेशली "मिडलाइफ क्रायसिस" मध्ये जी काळी बाजू दिसून येते त्याविषयक कोणीतरी मूर वाटतं या लेखकाचे पुस्तक वाचलेले आहे.
.
गेलेली संधी हासील करण्याचा शेवटचा टप्पा - मध्यमवय. माणूस कसोशीने अक्षरक्षः जीव तोडून हवे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यातून एखादी हाऊसवाइफ पी एच डी करुन टाकते तर कोणी अफेअर करतात. अर्थात आयुष्यभर ज्याची वानवा असते ती पूर्ण करायच्या मागे मनुष्य लागतो. कारण अभी नही तो कभी नही - हे कळून चुकलेले असते.
बरीच वैचारिक उचकपाचक /उचकवणे
बरीच वैचारिक उचकपाचक /उचकवणे अपेक्षित असावे.विस्तृत प्रतिसाद आणि टुथपेस्ट विनोद नंतर लिहितो.
मस्त लेख
मनोरंजक प्रयोग आहे.
नोकरीत भ्रष्टाचार करणारे लोक
नोकरीत भ्रष्टाचार करणारे लोक साठीच्या जवळ आल्यावर अधिक भ्रष्टाचार करतात का, किंवा साधारणच साठीच्या जवळ आलेले लोक अधिक भ्रष्टाचार करतात का याचा विदा कदाचित 'सहज' जमा करता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
करत नसावेत
रिटायरमेंटच्या जवळ आल्यावर कनिष्ठ सरकारी नोकर कमी भ्रष्टाचार करत असावेत. निवृत्तीनंतरच्या पेन्शनची हमी, (पकडलो गेल्यास त्यावर येणारी गदा) आणि म्हातारपण जवळ आल्यावर जसं देवदेव करतात तशी प्रामाणिकपणाची खुमखुमी अनेकांना येते. (लिमिटेड सँपल साईजवर आधारित निरीक्षण)
सहमत. इतकंच नाही आता इतक्या
सहमत.
इतकंच नाही आता इतक्या जवळ रिटार्मेंट आलीय तर इतके वर्ष (शिताफीने) केलेल्यावर पाणी नको पडायला म्हणून वृत्तीवर आवर घातल जातो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अधिक विचार करता माझा सँपलसेट
अधिक विचार करता माझा सँपलसेट चुकला हे लक्षात आलं. निवृत्तीनंतरही निवृत्तीवेतन आणि सामाजिक लागेबांधे या गोष्टी टिकून राहतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.