इतिहास

‘धेनुकाकट्’चे गौड्बंगाल- भाग 1

भारताच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित असलेल्या सह्याद्री पर्वतराजींमध्ये नाणेघाट या नावाने सुप्रसिद्ध असलेला एक प्राचीन घाट आहे. पायवाट म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरेल असा हा घाट रस्ता घाटमाथ्यावरील एका नाळीपासून सुरू होतो व खाली उतरत उतरत रायगड जिल्ह्यामध्ये तळकोकणात उतरतो. या घाटमाथ्यावरील नाळीजवळ एक प्राचीन गुंफा आहे. काही वर्षांपूर्वी मी या गुंफेला भेट देऊन तेथे असलेले सातवाहन कालीन शिलालेख व पाषाणात कोरलेल्या मूर्तीच्या पावलांचे जे काय थोडेसे अवशेष उरलेले आहेत ते बघितले होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

अभिजात संगीत आणि स्वरलेखन

अभिजात संगीताचा उगम प्राचीन भारतात कधी व कोठे झाला? याची माहिती कोठेच मिळत नसल्याने ते कोणालाही सांगता येणे हे अशक्यप्राय आहे. परंतु ज्याला सध्या स्वरलेखन किंवा नोटेशन या नावाने आपण संबोधतो तशा प्रकारचे संगीताचे काही नियम किंवा साचा फार पूर्वीपासून भारतात अस्तित्वात होता याच्या काही पाऊलखुणा मात्र दिसून येतात. इ,स पूर्व 2000 हा काळ साधारणपणे वैदिक संस्कृतीचा उदय काल म्हणून मानला जातो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

भोजनकुतूहल - १

शीर्षकात दाखविलेले स्वयंपाक ह्या विषयावरचे ’भोजनकुतूहल’ हे पुस्तक मला DLIच्या संस्थळावर दिसले. असले विषय संस्कृत लिखाणात क्वचितच दृष्टीस येतात म्हणून कुतूहलाने ’भोजनकुतूहल’ उतरवून घेतले आणि चाळले.  त्यातून वेचलेले काही वेधक उल्लेख येथे दाखवीत आहे.

पुस्तक ’रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिले असावे.  त्याची मजसमोरील आवृत्ति १९५६ साली (तत्कालीन) त्रावणकोर विद्यापीठाच्या विद्यमाने मुद्रित झाली आहे.  पुस्तकाचा लेखनकाल, त्याचा लेखक रघुनाथ आणि त्याच्या अन्य कृति ह्याविषयी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे ह्यांनी केलेल्या संशोधनाचा सारांश ह्या लेखाच्या अखेरीस लिहिला आहे.

वेगवेगळे खाण्याचे पदार्थ कसे कसे करावे, त्यांच्यामध्ये कायकाय घालावे असे जे मार्गदर्शन सध्याच्या पाककृति ह्या विषयांवरच्या पुस्तकांमध्ये असते तसे ह्या पुस्तकात फार थोडे आहे.  काही ठळकठळक प्रकार कसे बनवायचे असे मार्गदर्शन देऊन त्या प्रत्येक गोष्टीचे शरीरावर काय परिणाम होतात त्याचे आयुर्वेदाच्या अंगाने विवेचन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.  दिलेले प्रकारहि आजच्या पेक्षा काही फार वेगळे आहेत असे नाही.  तरीपण पुस्तक मनोरंजक वाटते ते अशासाठी की १७व्या शतकात लोक काय खात होते आणि काय खात नव्हते, कोणते अन्नघटक उपलब्ध होते आणि कोणते नव्हते ह्याचे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात उपयुक्त असे दर्शन ह्यातून होते.  काही काही कृति वापरातून अजिबात गेल्या आहेत, काही काही वेगळ्या नावांनी पुढे येतात तर काही काहींचे दर्शक शब्द आता विस्मरणात गेले आहेत असे लक्षात येते.

पुस्तकाची काही प्रमुख प्रकरणे अशी आहेत:

१) शूकधान्यप्रकरण. ह्यामध्ये शूकधान्ये - शालि (तांदूळ), गोधूम (गहू), यव (जव) आणि यावनाल (ज्वारी) - ह्यांचे प्रकार.  ’शूक’ म्हणजे कणीस.  ही धान्ये कणसांमधून मिळतात.  ( पुस्तकातील वर्गीकरण हे पारंपारिक आयुर्वेदिक असून लिनेअसच्या वनस्पतिवर्गीकरणाशी काही संबंध ठेवत नाही हे ध्यानात ठेवायला हवे.). ह्या प्रत्येक धान्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय गुणदोष आहेत त्यांचे वर्णन सुश्रुत, भावप्रकाश, राजनिघण्टु, वाग्भट अशा ग्रंथांमधील अवतरणांच्या आधारे दिलेले आहे.  ह्यापुढे वर्णिलेल्या अन्य गोष्टींबाबतहि असेच केले आहे.

शूकधान्यांपैकी शालि आणि यावनाल ह्यांच्या अनेक पोटजाती दर्शवून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात ह्याचेहि एकेका शब्दात दिग्दर्शन आहे.  ( लेखक रघुनाथ हा मराठीभाषिक होता.  ह्याच्याविषयी पुढे अधिक माहिती येईलच.) शालिविषयात वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली असे प्रकार पुढीलप्रमाणे -  राजशालि (महाराष्ट्रात रायभोग, आन्ध्रात राजान्न), कृष्णशालि (गोदातीर), रक्तशालि (तामसाळ?), स्थूलशालि अथवा महाशालि (कोळम, कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीमध्ये विख्यात), सूक्ष्मशालि, गन्धशालि किंवा प्रमोदक (कमोद), षाष्टिका (साठ दिवसात होणारी, मालव प्रान्तातील) आणि असेच आणखी काही.

यावनाल म्हणजे ज्वारी हिच्या उपप्रकारांमध्ये पांढरी (लटोरा, मोल्सवर्थने ह्याचा अर्थ अरगडी असा दिला आहे), तांबडी, शारद म्हणजे हिवाळ्यात होणारी (शाळू) आणि मका (मक्का, हा बालप्रिय असल्याचा उल्लेख आहे म्हणजे मक्याची कणसे भाजून खायचा उद्योग असणार) इतके प्रकार दर्शविले आहेत.  मका ज्वारीखाली टाकला आहे ह्याबाबत काही लिखाण नंतर येईल.  अखेरीस बाजरीचाहि अस्फुट उल्लेख ज्वारीखालीच केला आहे.  रघुनाथाने त्याला त्रोटकपणे ’सजगुरे’ असे म्हटले आहे आणि मोल्सवर्थप्रमाणे ह्याचा अर्थ ’बाजरी’ असा आहे.

२) शिम्बीधान्यप्रकरण - शेंगांमधून मिळणारी धान्ये.  ह्यामध्ये मुद्ग (मूग), मसूर, माष (उडीद), चणक (हरभरे), लंका (लाख) - एक गुलाबी डाळ, ही खाल्ल्याने लकवा होतो अशी समजूत आहे.  उत्तर भारतात हिचा वापर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधे अधिक होतो - तुवरी (तूर), कुलित्थ (कुळीथ), मकुष्ठ (मोठ म्हणजे मटकी), तिल (तीळ), सर्षप (मोहरी), निष्पाव (वाल?), अतसी (जवस), कलाय (मटार) इत्यादींचा समावेश आहे.  ’शेंग’ हा शब्द ’शिम्बी’चाच अपभ्रंश दिसतो. शेंबी असाहि शब्द मी ऐकला आहे आणि मोल्सवर्थ इ. कोशांमधून त्याचा अर्थ ’टोपण’ अशा अंगाने दिला आहे.  तोहि येथून निघाला असावा.

३) तृणधान्यप्रकरण - ह्यामध्ये प्रियंगु (राळे), कोद्रव (हरीक), वरक (वरई), श्यामाक (सावे) अशी काही गवताच्या बियांसारखी असणारी धान्ये दिली आहेत.

४) चौथ्या प्रकरणात धान्यांपासून काही प्रक्रियेने होणार्‍या वस्तु, म्हणजे भाजून केलेल्या लाजा (लाह्या), कुटून केलेले पृथुक (पोहे), अर्धपक्व धान्ये गवतावर भाजून होलक (हुरडा), धान्य भिजवून केलेले कुल्माष (घुगर्‍या), यन्त्रपिष्ट (जात्यामध्ये धान्य भरडून केलेले) सक्तु (सत्त्व), भाजलेले चणे (फुटाणे), मिठाचे पाणी शिंपडून भाजलेले (मिठाणे), तेच तेलात तळलेले (उसळे) अशा गोष्टी आहेत.

अशा ह्या सर्व प्रकारच्या धान्यांचे उल्लेख भारतीय प्राचीन वाङ्मयात अनेकदा मिळतात.  यजुर्वेदान्तर्गत अशा प्रसिद्ध रुद्रसूक्तात सूक्तकार रुद्रांकडून ज्या ज्या अनेक गोष्टींची प्रार्थना करतो त्यांमध्ये ’व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे’ अशाहि मागण्या आहेत.

५) ग्रन्थकर्ता ह्यापुढे शिजवलेल्या अन्नाकडे वळतो.  येथे नाना प्रकारचे भात, खिरी, पोळ्या, सूप म्हणजे आमटी, क्वथिका म्हणजे कढी, वटक (वडे), शिखरिणी, जिलबी, शंखपाल (शंकरपाळे), मांसाचे प्रकार, मद्य इत्यादींची वर्णने आहेत.  ह्या मनोरंजक विषयांकडे आणि उर्वरित ग्रंथाकडे पुढील भागामध्ये पाहू.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.  ग्रंथातील सर्वात अधिक तिखट गोष्ट म्हणजे मरीच किंवा मिरी.  तिचे उल्लेख मुबलक आहेत.  आर्द्रक म्हणजे आलेहि ह्या संदर्भात अनेकदा दिसते पण मिरची कोठेच नाही.  ह्याचे कारण असे की स्पॅनिश विजेत्यांना ह्या दक्षिण अमेरिकेतील मूळच्या गोष्टी तेथे माहीत होऊन त्या युरोपात पोहोचायला १५व्या शतकाची अखेर आली आणि तेथून त्या पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतकारांबरोबर आफ्रिका-आशियात पसरल्या.  रघुनाथाने प्रस्तुत ग्रंथ लिहीपर्यंत त्या दक्षिण भारतात पुरेशा प्रसार पावलेल्या नसाव्यात.  अपवाद दोन गोष्टींचा - मक्याचा उल्लेख यावनाल (ज्वारी) प्रकारात आला आहे हे वर उल्लेखिलेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.  काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते.  नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय?  असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही.  परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक.

कोल्हापूरचे छत्रपति राजाराम

अनेक वर्षांपूर्वी असे माझ्या वाचनात आले होते की कोल्हापूरचे छत्रपति राजाराम (राज्याचा काल १८६६-१८७०) हे इंग्लंडच्या दौर्‍यावरून हिंदुस्तानाकडे परतत असतांना वाटेमध्ये इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात वयाच्या २०व्या वर्षी अचानक दिवंगत झाले.  अलीकडेच मी स्वत: फ्लॉरेन्सला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर ही आठवण पुन: जागी झाली आणि असे का आणि कसे घडले ह्याचा शोध मी जालावर घेतला.  त्यातून असे निष्पन्न झाले की राजाराम ह्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे एक स्मारक त्यांच्या दहनस्थली उभारण्यात आले आणि अजूनहि ते तेथे उभे आहे.  हे कळताच फ्लॉरेन्सच्या मुक्कामात वेळ काढून त्या स्मारकाला भेट द्यायचे मी ठरविले.  त्या भेटीविषयी आणि त्या संदर्भात जे माझ्या वाचनात आले त्यातून हे लिखाण करीत आहे.

छत्रपति शहाजी (तिसरे) (बुवा साहेब) ह्यांचा १८३८ मध्ये मृत्यु झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवाजी (तिसरे) हे गादीवर आले.  १८६६ मध्ये आपल्या मृत्युसमयी त्यांना मुलगा नव्हता म्हणून त्यांनी आपला भाचा -  बहीण आऊबाई पाटणकर ह्यांचा मुलगा - नागोजीराव पाटणकर (जन्म एप्रिल १३, १८५०) ह्यांना ऑगस्ट १, १८६६ ह्यांना दत्तक घेतले.  दत्तक वडिलांच्या ऑगस्ट ४. १८६६ ह्या दिवशी मृत्यूनंतर ते छत्रपति राजाराम ह्या नावाने गादीवर बसले.

छत्रपति राजाराम अल्पवयीन असल्याने कोल्हापुरातील तकालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी. एस. ए. ऍंडरसन ह्यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट ह्यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक होऊन छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.  ह्याच कामासाठी मुंबईहून जमशेटजी नौरोजी उनवाला ह्या पदवीधर पारसी गृहस्थांनाहि नेमण्यात आले.

गादीवर येण्यापूर्वीच छत्रपतींचे इंग्रजी भाषेचे काही शिक्षण झालेले होते.  नवीन ज्ञान मिळवण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे दोन मार्गदर्शकांच्या साहाय्याने त्यांनी चांगली प्रगति केली.  वाचनाच्या आवडीबरोबरच बिलिअर्डज्, क्रिकेट, शिकार अशा खेळांमध्ये त्यांना रस होता.  आपली इंग्रजीमध्ये दैनंदिनी लिहिण्याची रीत त्यांनी सुरू केली होती.  त्यांच्या राज्यकालामध्ये १८६९ सालात कोल्हापुरात हायस्कूलची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा पुढाकार होता आणि १८७० मध्ये त्यांचा मृत्यु झाल्यानंतर त्या हायस्कूलला त्यांचे नाव देण्यात आले.  ह्या हायस्कूलचेच १८८० मध्ये प्रसिद्ध राजाराम कॉलेजमध्ये रूपान्तर झाले.  (ह्याचे पहिले प्रिन्सिपॉल चार्ल्स हॅरिसन कॅंडी, १८५१ - १९२५ कोल्हापूर, हे मेजर ई.टी.कॅंडी, मोल्सवर्थ ह्यांचे कोशनिर्मितीमधील सहकारी आणि पूना कॉलेजचे प्रमुख, ह्यांचे तिसरे चिरंजीव.)

१८७०मध्ये छत्रपतींनी इंग्लंडचा दौरा करण्याचे ठरविले.  त्याला गवर्नरकडून संमति मिळाल्यावर छत्रपति स्वत:, कॅ. वेस्ट, पारसी शिक्षक आणि अन्य ११ जण असे इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले.  १४ जूनला ते लंडनला पोहोचले आणि १ नोवेंबरला इंग्लंड सोडेपर्यंत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडमधील अनेक गावे आणि प्रेक्षणीय स्थळांना तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ, क्यू गार्डन्स, वूलिच ऍकॅडमी, क्रिस्टल पॅलेस अशा शैक्षणिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.  दोनतीन वेळा पार्लमेंटमध्ये कामकाज पाहिले.  स्वत: विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅडस्टन, डिजरेली अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला. त्याचबरोबर हिंदुस्तानशी संबंध असलेल्या बार्टल फ्रियरसारख्या अनेक व्यक्ति त्यांना भेटल्या. दादाभाई नौरोजी, मॅक्स मुल्लर, बुल्हर, डी लेसेप्स, महाराजा दुलीप सिंग ह्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाखती झाल्या.  अशा सर्व व्यक्तींची मैत्रीपूर्ण वागणूक आणि वागण्याबोलण्यातला साधेपणा, तसेच पौर्वात्य पद्धतीच्या डामडौलाचा अभाव ह्यामुळे छत्रपति बरेच प्रभावित झालेले दिसतात.  राजघराण्यातील स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक करण्याची सोयहि आपल्या मुक्कामात त्यांनी केली असे कॅ.वेस्ट नोंदवतात. छत्रपतींनी स्वत: बॉलरूम डान्सिंगचे धडे घेतल्याचा उल्लेख मिळतो. स्टुडिओमध्ये जाऊन छायाचित्र काढून घेतल्याचाहि उल्लेख मिळतो.  हिंदुस्थानातील राजेरजवाडयांनी इंग्लंड-युरोपचे दौरे करण्याची प्रथा नंतर चांगलीच रूढ झाली पण गादीवर असतांना असा दौरा करणारे पहिले सत्ताधीश म्हणजे छत्रपति राजाराम असा उल्लेख कॅ.वेस्ट ह्यांनी केला आहे.  छत्रपतींची दैनंदिनी वाचून असे जाणवते पुष्कळ काही करण्याची क्षमता आणि इच्छा असलेला हा राजा दुर्दैवाने अल्पायुषी ठरला आणि त्यातून कोल्हापूरच्या जनतेचे मोठे नुकसान झाले.

असा हा शैक्षणिक आणि स्थलदर्शनाचा प्रवास संपवून १ नोवेंबरला सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.  पुढचा मुक्कम ब्रुसेल्स-वॉटर्लू असा झाला.  वॉटर्लू पाहून आपल्याला अतिशय आनंद झाला असे छत्रपति नोंदवतात.  बेल्जियमच्या राजेसाहेबांशीहि भेट झाली.  तेथून कलोन-फ्रॅंकफुर्ट-म्यूनिक असे मुक्काम घेत घेत प्रवासी १३ नोवेंबरला इन्सब्रुकला पोहोचले आणि येथून छत्रपतींच्या तब्येतीस काहीतरी झाले आणि त्यांना उभे राहता वा चालता येईनासे झाले.

आजाराचे निश्चित निदान अखेरपर्यंत झाले नाही.  र्‍हुमॅटिझमचा हा त्रास आहे अशी समजूत होती आणि छत्रपतींनी बरोबर नेलेला मुस्लिम हकीम त्यांच्यवर काही उपाय करीत होता आणि त्याला काही यश येत आहे असे वाटत होते.  स्थानिक युरोपीय डॉक्टरांना दाखविण्यास छत्रपति तयार नव्हते.

अशाच परिस्थितीत प्रवासी वेनिसला पोहोचले आणि छत्रपतींनी सेडान खुर्चीतूनच तेथे डोजचा राजवाडा, सान मार्कोचा चौक अशा प्रेक्षणीय जागा पाहिल्या.  पुढचा मुक्काम फ्लॉरेन्स येथे झाला. इटलीच्या एकत्रीकरणाच्या प्रारम्भाच्या दिवसात १८६५-७१ ह्या काळात येथेच नवीन इटली देशाची राजधानी होती.

डॉ.फ्रेजर नावाच्या एका इंग्लिश डॉक्टरकडून आणि त्याच्या दोन इटालियन सहकार्‍य़ांकडून छत्रपतींची येथे तपासणी झाली आणि त्यांच्या औषधांचा सुपरिणाम दिसत आहे असे वाटत असतांनाच ३० नोवेंबर १८७० ह्या दिवशी सकाळी छत्रपतींचे अचानक निधन झाले.  ’Congestion of the abdominal viscera, togethe with collapse of nervous power' असे मृत्यूचे कारण नोंदविण्यात आले.

ह्या निधनामुळे मागे उरलेल्या सहप्रवाशांपुढे नवेच संकट उभे राहिले.  ते म्हणजे मृतदेहाचे हिंदु पद्धतीने दहन कसे करायचे.  कर्मठ ख्रिश्चन देशाच्या अधिकार्‍यांना हिंदूंची अग्नि देण्याची पद्धति रानटी वाटत होती आणि तसे करायला संमति द्यायला ते तयार नव्हते.  फ्लॉरेन्समधील इंग्रज वकिलाच्या दिवसभराच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय होऊन गावापासून ७-८ किलोमीटर दूर असलेल्या कश्शीना(Cascine, तबेला अथवा फार्महाउस, फ्लोरेन्समधील प्रख्यात मध्ययुगीन मेदिची घराण्याचे गुरांचे गोठे येथे होते) ह्या मैदानात, आर्नो नदीच्या काठी, जेथे तिला मुन्योने नावाची छोटी नदी येऊन मिळते, दहन करण्याची परवानगी मिळाली आणि १ डिसेंबरला पहाटे असे दहन झाले.  नंतर अस्थि गोळा करून कलशात घालून त्या हिंदुस्तानात आणल्या गेल्या आणि गंगा नदीत त्यांचे विधिवत् विसर्जन करण्यात आले.

ह्या अकाली निधनानंतर छत्रपतींचे फ्लॉरेन्समध्ये स्मारक उभारण्यासाठी एक कोष निर्माण करण्यात आला आणि त्यामध्ये जमलेल्या पैशातून दहनाच्या जागी स्मारक उभारण्यात आले.  त्याचा आराखडा मे. चार्ल्स मॅंट ह्या आर्किटेक्टने तयार केला.  (कोल्हापुरातील राजाराम कॉलेज, बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाडा, अजमेरचे मेयो कॉलेज ह्या त्यांच्या कृति.) इंडो-सारासीनिक शैलीच्या छत्रीखाली अर्धपुतळा असे हे स्मारक आहे.  अर्धपुतळा चार्ल्स फ्रान्सिस फुलर ह्या फ्लॉरेन्सवासी ब्रिटिश शिल्पकाराने बनविला आहे.  तो छत्रपतींच्या इंग्लंडात काढलेल्या छायाचित्रावरूनच बनविलेला दिसतो.

प्क्लॉरेन्सच्या भेटीसाठी माझ्यापाशी दोनच दिवस होते.  पैकी पहिला दिवस पहिल्या दिवशी गावातील उफ्फिजी गॅलरी, पलाझ्झो वेक्किओ आणि अकादमी (येथेच मिकेलऍंजेलोचा प्रख्यात ’डेविड’ उभा आहे) ह्यांना भेटी देऊन दुसर्‍या दिवशी पिसा गावाचा कार्यक्रम ठरला होता.  तरीहि वेळात वेळ काढून दुसर्‍या दिवशी सकाळी मी एक कॅब ठरवून स्मारकाकडे गेलो.  चालकाबरोबर इटालियनमध्ये बोलण्याची अडचण असल्याने हॉटेलच्या कॉन्सिअर्जमार्फत आधीच चालकाला कोठे जायचे आहे त्याची चांगली कल्पना दिली होती आणि काही कळीची वाक्ये गूगलच्या मदतीने भाषान्तरित करून इटालियनमध्ये लिहूनहि बरोबर ठेवली होती.  राजाराम छत्रपतींची इटालियनांना महिती नसली तरी सुदैवाने स्मारकाची जागा त्यांना चांगली ठाऊक आहे कारण स्मारकामागचाच आर्नो नदीवरील पूल Ponte dell'indiano (इंडियन ब्रिज) ह्या नावानेच ओळखला जातो.  (पुलाचेहि स्वत:चे असे वैशिष्टय आहे.  पुलाची अधिक माहिती येथे पहा.) )  गाडीचा चालकहि भला माणूस होता.  कसलीहि अडचण न येता त्याने आम्हाला १५-२० मिनिटात  स्मारकासमोर पोहोचविले अणि अर्धा तास तेथे काढून त्याच गाडीने आम्ही माझ्या हॉटेलकडे परतलो.

सुमारे ५-६ फूट उंचीचा चौथरा आणि त्यावर ब्रॉंझची छत्री, छत्रीखाली संगमरवरी अर्धपुतळा, चौथर्‍याच्या सभोवती बिडाचे कुंपण असे स्मारकाचे स्वरूप आहे.  स्मारक उत्तम स्थितीत आहे. अर्धपुतळ्याखाली चार बाजूंना इटालियन, इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये चार लेख आहेत.  पैकी इंग्रजी लेखच दूरच्या अंतरावरून मला वाचता आला आणि तो असा आहे:
Erected to the memory of His Highness Rajaram Chuttraputti Maharajah of Kolhapur who died at Florence on the 30th November 1870 in his 21st year while returning to India from England.

(येथील Chuttraputti ह्या स्पेलिंगचा परिणाम असा झाला आहे की जालावर जेथे जेथे ह्या अर्धपुतळ्याविषयी काही वाचावयास मिळते तेथे व्यक्तीचे नाव Rajaram Chuttraputti असेच दर्शविले आहे!)

मी तेथे काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवीत आहे.  गूगल अर्थमध्ये ४३अं. ४७.२मि. ४१से. (उ), ११अं. ११.५२मि. ३३से. (पू) येथे पुरेसा क्लोजअप घेतल्यास स्मारक दिसते आणि काही अन्य छायाचित्रेहि दिसतात.

स्मारक
एका बाजूवरील इंग्रजीतील लेख
लेख जवळून
आर्नो-मुन्योने संगम.  मागे Ponte dell'indiano
छत्रपतींचे मार्गदर्शक कॅ.वेस्ट ह्यांनी छत्रपतींची दैनंदिनी काही अन्य माहितीसह संपादित करून लंडनमध्ये छापली.  गूगलकृपेने ती येथे उपलब्ध आहे.  तिच्यावर हा लेख पुष्कळसा आधारित आहे. 
धाग्याचा प्रकार निवडा: : 

मुंबईतील बलून

आजच्या दिनविशेषात पुढील माहिती दिली आहे:

<१८६७ : प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलूनचे यशस्वी उड्डाण केले.>

हे मुंबईतील किंवा हिंदुस्तानातील पहिले उड्डाण असावे असे येथे स्पष्ट म्हटलेले नाही पण ते तसेच म्हणायचे असावे, अन्यथा दिनविशेषात त्याची नोंद झाली नसती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3 (भाग १. भाग २)

३२) फोरास रोड (आर एस निमकर मार्ग) - हे नाव कोठल्याहि साहेबाचे नसून मुंबई बेटे पोर्तुगीज अमलाखाली असण्याच्या दिवसांत ह्या शब्दाचा उगम आहे.  तेव्हा ही बेटे वसईकर पोर्तुगीज अमलाचा भाग होती. बेटावरील जमीन ज्या धारकांकडे होती त्यांचे जमिनीवरचे हक्क कशा प्रकारचे होते ह्या विषयाशी ह्या नावाचा संदर्भ आहे आणि त्याचे दोन परस्परविरोधी अर्थ लागू शकतात असे दिसते.  अशा जमिनीस पोर्तुगीज शासक ’फोरा’ जमीन असे म्हणत असत.  हा पोर्तुगीज ’फोरा’ शब्द कसा निर्माण झाला ह्याविषयी दा कुन्हा ह्यांनी विस्तृत वर्णन केले आहे परंतु त्यांच्या पुस्तकाचे जालावरील उपलब्ध पान संपूर्णपणे अवाचनीय आहे. मायकेल वेस्ट्रॉप ह्या न्यायाधीशांच्या निर्णयात ह्याच शब्दाचा वेगळा अर्थ लावला आहे.  त्या सर्व वादात अधिक न शिरता असे म्हणता येईल की १८४० नंतर वाढत्या मुंबईत किल्ल्याच्या उत्तरेस सार्वजनिक सोयी - रस्ते, नाले इ. - निर्माण करण्यासाठी सरकारला ह्या जमिनीचा काही भाग हवा होता आणि तो सरकारने कसा घ्यावा ह्याविषयी सरकार आणि जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई पेस्तनजी अशा जमीनधारकांमध्ये विवाद होता.

किल्ल्याच्या उत्तरेकडील सर्वच जमीन ’फोरा जमीन’ ह्या वर्णनाखाली येते आणि त्या भागात जाणार्‍या रस्त्यांना ’फोरास रस्ते’ असे सार्वत्रिक नाव होते.  कालक्रमाने हे रस्ते जेव्हा पक्के बांधून वापरात आले तेव्हा त्यांना स्वत:ची अलगअलग नावे मिळाली आणि केवळ एकाच रस्त्याचे म्हणून हे नाव शिल्लक उरले. बेलासिस रोड (जहांगिर बोमन बेहराम मार्ग) आणि ग्रॅंट रोड ह्यांना जोडणार्‍या रस्त्यालाच काय ते हे नाव उरले आहे.  १९०९ सालच्या इंपीरिअल गॅझेटमधील नकाशात ह्याचा उल्लेख ’कामाठीपुरा रोड’ असा केला आहे. त्या नकाशाचाहि तुकडा खाली जोडला आहे.

३३) फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) - फ्लोरा फाउंटन हे मूळचे फ्रियर फाउंटन आणि सर बार्टल फ्रियर ह्यांच्या नावे ते विक्टोरिया गार्डनमध्ये उभे राहायचे होते.  अग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी नावाची संस्था ह्या प्रस्तावामागे होती पण तिच्याजवळचे पैसे संपल्यामुळे त्यावेळचे क्रॉफर्ड ह्यांनी पुढाकार घेऊन त्याला सध्याच्या जागी आणले.  कर्सेटजी फर्दूनजी ह्यांची मोठी देणगीहि ह्या कामी लागली.  मूळच्या चर्चगेटच्या जागीच ते आता उभे आहे.  फाउंटनवरील फ्लोरा देवतेवरून हे नाव पडले आहे.  खालील चार स्त्रिया हिंदुस्तानात उत्पन्न होणार्‍या चार शेतमालांची प्रतीके असून डॉल्फिन्स, सिंह अशा प्राण्याच्या शिल्पांनी त्याला शोभा आणली आहे.  त्याची सध्याची दोन चित्रे आणि १८७१ मध्ये ’सायंटिफिक अमेरिकन’ नियतकालिकाच्या अंकात दिसणारे एक चित्र पुढे दाखवीत आहे. (श्रेय )

३४) जेकब सर्कल - सातरस्ता (गाडगेमहाराज चौक) -  मे.ज. सर जॉर्ज जेकब (१८०५-६१) ह्यांचे नाव मुंबई प्रांतात प्रामुख्याने सावंतवाडी, कोल्हापूर आणि काठेवाड संस्थानांमध्ये मुंबईकरांचे प्रतिनिधि म्हणून माहीत आहे.  कोल्हापुरात १८५७ च्या काळात संस्थान शांत ठेवण्याच्या कार्यात त्यांनी विशेष कर्तबगारी दर्शविली.  त्यांचे नाव मुंबईतील ह्या प्रमुख चौकास देण्यात आले होते.  चौकात सात मोठे रस्ते एकत्र मिळत असल्याने स्थानिक रहिवासी चौकास सातरस्ता ह्या प्रसिद्ध नावानेहि ओळखतात.  चौकातील कारंजे जेकब ह्यांच्या मानलेल्या मुलीने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे.  जेकब हे मराठी आणि संस्कृत भाषांचे अभ्यासकहि होते.  गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचे त्यांनी वाचन केले होते.

सर जॉर्ज जेकब (श्रेय) 


३५) कामाठीपुरा - बेलासिस रोड (जहांगीर बोमन बेहराम मार्ग), सुखलाजी स्ट्रीट, ग्रॅंट रोड (मौलाना शौकत अली मार्ग) आणि डंकन रोड (मौलाना आझाद मार्ग) ह्या मर्यादा असलेल्या भागास कामाठीपुरा असे नाव तेथे वसतीला आलेल्या कामाठी-कोमटी लोकांवरून पडले आहे.  निजामाच्या प्रदेशातील हे मूळचे लोक १८व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसात कामधंद्यासाठी मुंबईत आले आणि ह्या भागात स्थायिक झाले. प्रथमपासून हा भाग निम्नस्तरातील जनतेच्या वस्तीचा आणि तेथे चालणारा वेश्याव्यवसायहि असाच त्या दिवसांपासूनचा आहे.  (१८व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये मुंबईत रामा कोमटी नावाचा सधन हिंदु राहात असे.  कान्होजी आंग्रे ह्यांच्याशी गुप्त संधान बांधल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी १७२०मध्ये त्याच्यावर खोटा ’कांगारू’ खटला चालवून त्याला आयुष्यातून उठविले.  त्याच्याशी कामाठीपुर्‍याचा संबंध लावल्याचे मी वाचले आहे पण त्यात मलातरी काही अर्थ दिसत नाही.  ह्या खटल्याचा वृत्तान्त मुंबई उच्च न्यायालयाच्या  ह्या संस्थळावर  वाचायला मिळतो.  ह्या अनुसार हा खटला १७२० साली झाला आणि रामा कोमटी हा कोमटी नसून राम कामत नावाचा शेणवी जातीचा गृहस्थ होता.  तसेच १७८४ मध्ये महालक्ष्मीजवळ समुद्राला हॉर्नबी वेलार्ड हा बांध घालण्यापूर्वी सध्याचा कामाठीफुरा हा पाण्याखालीच होता.  ह्या दोन कारणांसाठी रामा कोमटीचे नाव कामाठीपुर्‍याशी जोडता येत नाही.)

३६-३९) केनेडी ब्रिज, मॅथ्यू रोड, फ्रेंच ब्रिज आणि गवालिया टॅंक - ही चारहि स्थाने खाली जोडलेल्या इंपीरिअल गॅझेट १९०९ मधील नकाशाच्या तुकडयात दिसत आहेत.  तसेच केनेडी, मॅथ्यू, फ्रेंच ह्या तिघांचे पुतळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात एकत्र ठेवलेले आहेत त्याचे चित्रहि दिसत आहे.

कर्नल जे.पी.केनेडी कन्सल्टिंग एंजिनीअर म्हणून, कर्नल पी.टी.फ्रेंच हे रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून आणि फ्रान्सिस मॅथ्यू हे चीफ एंजिनीअर आणि नंतर एजंट (मुख्य अधिकारी) म्हणून असे तिघेहि १८६० ते १८८० च्या दशकांमध्ये BB&CI रेल्वेच्या कामाशी संबंधित असे उच्च अधिकारी होते.  फ्रेंच ह्यांच्याविषयी आणखी मनोरंजक माहिती म्हणजे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची समज आणि गोडी असावी असे जालावरील उल्लेखांवरून वाटते.  बहुतेक इंग्रजांना पाश्चात्य संगीताची सवय असल्याने हिंदुस्तानी संगीत समजत नसे आणि कंटाळवाणे वाटे.  त्याचे कारण म्हणजे बहुतेकांची ह्या संगीताशी ओळख संस्थानिकांच्या दरबारात होणार्‍या नाचगाण्यांमधून होते आणि खर्‍या गवयांचे गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असेहि एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे.  पी.टी.फ्रेंच हे ह्या बाबतीत थोडे निराळे असावेत कारण त्यांनी मेहनतीने गोळा केलेल्या भारतीय वाद्यांच्या संग्रहाचे - जो संग्रह त्यांनी नंतर रॉयल आयरिश ऍकॅडेमीकडे सुपूर्द केला - कर्नल मेडोज टेलर  ह्यांनी केलेले परीक्षण जालावर येथे  पाहता येते.

१८५०-६० पर्यंत गवालिया टॅंक हा भाग जवळजवळ मोकळाच आणि ग्रामीण भागासारखा होता.  गवळी आणि गुराखी आपली गुरे चरण्यासाठी आणि धुण्यासाठी येथे आणत असत. हे गायीम्हशी धुण्याचे काम ज्या तलावावर चालत असे गवळी तलाव असे नाव पडले.  चालू ’गवालिया’ हे नाव मूळ नावाचे बदललेले रूप दिसते कारण १९०९ च्या नकाशात त्याचे नाव Gowli Tank गवळी तलाव असेच दर्शविले आहे.  १९०९ नंतर लवकरच हा तलाव बुजविण्यात आला कारण शेपर्ड ह्यांनी तसा उल्लेख केला आहे.  सध्याच्या नाना चौकातून केम्प्स कॉर्नरमार्गे भुलाभाई देसाई मार्ग (Warden Road) आणि एल. जगमोहनदास मार्ग (Nepean Sea Road) ह्यांच्याकडे जाणार्‍या रस्त्याला प्रथम गवालिया टॅंक रोड असे नाव होते आणि ते तसेच चालू राहिले. बुजवलेल्या तलावाच्या जागी मोकळे मैदान निर्माण झाले.  ऑगस्ट ८, १९४२ ह्या दिवशी महात्मा गांधींनी ह्या मैदानामध्ये छोडो भारत - Quit India - ही घोषणा करून स्वातन्त्र्यलढयाचे शेवटचे पान उलटले.  त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलीकडच्या काळात रस्त्याचे नाव ऑगस्ट क्रान्ति मार्ग आणि मैदानाचे नाव ऑगस्ट क्रान्ति मैदान असे बदलण्यात आले.  गूगल मॅप्समधील मैदानाचे चालू चित्र आणि त्यामध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे चित्र खाली दर्शवीत आहे.  (श्रेय.)

४०-४३) ग्रीन स्ट्रीट, एल्फिन्स्टन सर्कल (हॉर्निमन सर्कल), हमाम स्ट्रीट (अंबालाल दोशी मार्ग). -  मुंबईतील प्रसिद्ध टाउन हॉलसमोरील जागेस ब्रिटिश दिवसांमध्ये एल्फिन्स्टन सर्कल असे नाव होते.  त्या मोकळ्या जागेचा उपयोग निर्यातीसाठी मुंबईत आणलेल्या कापसाच्या साठवणीसाठीहि केला जात असे आणि त्या कारणाने त्या मोकळ्या जागेस कॉटन ग्रीन असे म्हणत असत.  ही साठवणीची जागा कुलाब्यात नेईपर्यंत ’कॉटन ग्रीन’ एल्फिन्स्टन सर्कल मध्येच होते.  कॉटन ग्रीन तेथून हलले तरी त्याची आठवण अद्यापि  ’ग्रीन स्ट्रीट’ ह्या रस्त्याच्या नावात टिकून आहे.  स्वातन्त्र्यानंतर एल्फिन्स्टन सर्कलचे नाव बदलून ’हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले आहे.  खालील चित्रामध्ये हमाम स्ट्रीट आणि एल्फिन्स्टन सर्कल दिसत आहे.  ग्रीन स्ट्रीट ह्या नकाशाच्या तुकडयात दिसत नाही पण हमाम स्ट्रीटपासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता म्हणजे ग्रीन स्ट्रीट.  गूगल मॅप्समध्ये हा नावासकट दिसतो.

बी.जी.हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश वृत्तपत्रकार पत्रकारितेच्या व्यवसायासाठी हिंदुस्तानात आले आणि ब्रिटिश राजवटीचे विरोधक आणि स्वातन्त्र्य चळवळीचे पाठिराखे बनले.  मुंबईतील बॉंबे क्रॉनिकलचे संपादक असतांना जालियनवाला बागेसंबंधीच्या त्यांच्या लिखाणामुळे त्यांना हिंदुस्तान सोडावा लागला पण परत येऊन त्यांनी पुन: ते पत्र हाती घेतले.  १९२९ नंतर त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले.

खाली ’बॉंबे क्रॉनिकल’चा मार्च १,१९१९ चा अंक दाखवीत आहे. (श्रेय.) अंकामध्ये मध्यभागी 'The Satyagraha Vow' अशा शीर्षकाखाली रौलट बिलाविरुद्ध महात्मा गांधींची सत्याग्रहाची घोषणा दाखविली आहे.  त्याखाली 'Mr. Gandhi's Manifesto' दिसतो.  त्याच्या शेजारी दोन कॉलम्समध्ये 'Signatories to the Pledge' अशी नावे आहेत.  डाव्या बाजूचे पहिले नाव 'Mohanadas Karamchand Gandhi, Satyagraha Ashram, SabaramatI'  आणि त्याखालचे नाव ’Vallabhbhai J. Patel, Bar-at-Law, Ahmedabad'  अशी आहेत.  उजव्या बाजूचे पहिले नाव B.G.Horniman, Editor, "The Bombay Chronicle," Bombay असे आहे.  पुढे डी.डी.साठे (गिरगावातील डी.डी.साठे मार्ग), अवंतिकाबाई गोखले (अवंतिकाबाई गोखले मार्ग), सरोजिनी नायडू अशीहि नावे दिसतात.

ग्रीन स्ट्रीटजवळच ’हमाम स्ट्रीट’ आहे.  येथे कधीकाळी असलेल्या सार्वजनिक स्नानगृहावरून ते नाव पडले.

४४) किंग्ज सर्कल स्टेशन - २०व्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबईच्या वाढत्या वस्तीला राहण्यासाठी जागा आणि पाणीपुरवठा-मलनि:सारणासारख्या बाबी पुरविण्यासाठी विचार करावयास हवा अशी जाणीव मुंबई सरकार आणि महानगरपालिकेस होऊ लागली होती आणि त्यातूनच १९०९च्या सुमारास Bombay Development Committee, Bombay Improvement Trust अशांची निर्मिती झाली होती.  त्यांच्या शिफारशीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दादर-माटुंगा ह्यांच्या पूर्वेकडील भाग वस्तीयोग्य करणे असा होता आणि त्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटपासून शीवपर्यंत १५० फूट रुंदीचा रस्ता बांधणे हा विचार समाविष्ट होता.  प्रत्यक्षात इतका मोठा रस्ता झाला नाही पण नायगाव-दादर-माटुंगा भागात विन्सेंट रोड (सध्याचा बाबासाहेब आंबेडकर मार्ग) नावाचा रुंद रस्ता बांधला गेला. विन्सेंट हे मुंबईचे पोलिस कमिशनर होते.  ह्या रस्त्याच्या शीवकडील बाजूचा शेवट एका वर्तुळाकृति बागेमध्ये झाला आणि त्या बागेस ’किंग्ज सर्कल’ असे नाव दिले गेले.  हल्ली ह्याच बागेस माहेश्वरी उद्यान असे नाव आहे पण जुने किंग्ज सर्कल एका उपनगरी स्थानकाच्या रूपाने अजून जिवंत आहे.  अंधेरी ह्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकाकडे जाणार्‍या मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडया हार्बर लाईनने येऊन शीव आणि माटुंगा ह्या मध्य रेल्वेच्या स्टेशनांदरम्यान पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे येऊन अंधेरीकडे जातात.  येथे असलेल्या स्टेशनास किंग्ज सर्कल असे नाव आहे.(किंग्ज सर्कलसंबंधित पुढील चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.)

४५-५०) खोताची वाडी, कांदेवाडी, करेलवाडी, गायवाडी, मुगभाट, झावबाची वाडी अशा गिरगावातील छोटया गल्ल्या - खोती हे वतन कोकण प्रान्तातील पारंपारिक वतन आहे.  गावातील सरकारी उत्पन्न सरकारकडे भरण्याचा पत्कर खोत घेतो आणि त्या बदल्यात जमीन कुळाकडे कमीअधिक काळासाठी कसायला देऊन त्यांच्याकडून उत्पन्न गोळा करतो.  दादोबा वामन खोत ह्या पाठारे प्रभु व्यक्तीने ह्या भागातील खोती इनाम सरकारातून मिळविले.  त्याच्यावरून ह्या भागास खोताची वाडी हे नाव मिळाले.

कांदेवाडीमध्ये कांदे साठवण्याची वखार - godown - होती आणि शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत ती तेथे असावी असे दिसते.

करेलवाडी - हे नाव मूळचे करळवाडी असे असावे कारण तेथे मिळणार्‍या ’Karel’ जातीच्या दगडावरून हे नाव पडले आहे असे शेपर्ड लिहितात.  मोल्सवर्थच्या १८३१ च्या कोशात ’करळ’ असा शब्द असून त्याचा अर्थ ’a soft sandy stone’ असा दिला आहे.

गायवाडी - गायी ठेवण्याची जागा असा ह्याचा स्पष्ट अर्थ शेपर्ड देतात.  मुंबईत अजूनहि दोनतीन गायवाडया आहेत असे ते नोंदवतात. उदा. लेडी जमशेटजी रोडपासून माहीम बझारकडे जाणारा रस्ता.  आज हा रस्ता कोणता असावा असा तर्कच करावा लागेल.

मुगभाट - दा कुन्हा ह्यांच्या मताने ’मुंगा’ नावाचा कोळी जमातीमधील कोणी एक पुढारी व्यक्ति होऊन गेला. त्याचे ’भाट’ (शेत) ते मुगभाट.  रा.ब.जोशींच्या मते ’मुगाचे शेत’ अशा अर्थाने हे नाव पडले आहे. (मुंबादेवीच्या नावाशीहि मुंगा कोळ्याचा संबंध कोठेकोठे लावला आहे.  ’मुंगादेवी’चे ’मुंबादेवी’ असे रूपान्तर झाले असे म्हणतात.)

झावबाची वाडी हे नाव विश्वनाथ विठोजी झावबा ह्यांच्या नावावरून पडले आहे कारण १८व्या शतकात त्यांनी ही वाडी - जिचे तत्पूर्वीचे नाव रणबिल वाडी असे शेपर्ड नोंदवतात - विकत घेतली आणि ती त्यांच्या वंशजांकडे वारसाहक्काने जात राहिली.  विश्वनाथ ह्यांचे नातू विठोबा झावबा ह्यांनी तेथील ’झावबा राम मंदिर’ ह्या नावाने ओळखले जाणारे देऊळ १८८२ मध्ये बांधले.  विश्वनाथ ह्यांचे एक पणतू नारायण मोरोजी हे तेथे शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत राहात होते.

५१) लालबाग - जहाजबांधणी व्यवसायातील प्रख्यात वाडिया कुटुंबातील लवजी वाडिया ह्या मूळ व्यक्तीचे पणतू दादाभाई पेस्तनजी हे सध्याच्या लालबाग-परळ भागातील जमिनीचे मालक होते आणि तेथील त्यांच्या बंगल्याला ’लालबाग’ असे नाव होते. ओरिएंटल बॅंक १८७५ मध्ये बुडाली त्यात पेस्तनजींची बहुतेक मालमत्ता नष्ट झाली.  ही माहिती जेम्स डग्लस ह्यांच्या 'Glimpses of Old Bombay' ह्या १८७५ मध्ये छापलेल्या पुस्तकात मिळते (पान १११).  ह्यावरून मी असा तर्क करतो की त्या भागात नंतर निर्माण झालेल्या वस्तीला लालबाग बंगल्यावरून ’लालबाग’ हे नाव मिळाले असावे.

५२) लेडी जमशेटजी रोड - दादर-माहीम भागातील ह्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधणीची कथा आर.पी.करकारिया ह्यांनी २२ सप्टेंबर १९१०च्या 'The Advocate of India' मध्ये सांगितली आणि ती शेपर्ड ह्यांनी नोंदवली आहे.  वान्द्रे आणि त्यापलीकडील भाग हा मुंबईपासून माहीम खाडीने अलग ठेवलेला होता आणि इकडून तिकडे येण्याजाण्यासाठी नावांचा वापर केला जात असे.  १८२०-३० पासून हे दोन भाग जोडून सलग करण्याचे प्रयत्न मुंबईतील सधन व्यापार्‍यांकडून चालू होते पण त्यासाठी पुरेसे पैसे उभे करता आलेले नव्हते.  खाडीमध्ये नंतर एकदा वीस नावा बुडून सर्व प्रवासी मृत्यु पावले तेव्हा सर जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी सर्व खर्च स्वत: करून हे काम अंगावर घेण्याचे ठरविले.  एकूण २ लाखाहून अधिक खर्च करून हा भराव आणि रस्ता १८५४ च्या सुमारास बांधला गेला आणि जमशेटजींची पत्नी लेडी जमशेटजी ह्यांचे नाव त्या रस्त्याला देण्यात आले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - २

धाग्याचा प्रकार निवडा: : 

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग २.

शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग २.

’२’ ह्या संख्येचे वर्गमूळ.

प्रमाणं तृतीयेन वर्धयेत्तच्च चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन। सविशेष:।
बौधायन २.१२. इतर शुल्बकारांनीहि जवळजवळ ह्याच शब्दांमध्ये हे मूल्य दाखविले आहे.

सरळ अर्थ - प्रमाण बाजूमध्ये तिचा तिसरा भाग, त्याचा चौथा भाग वाढवावा. त्याचा चौतिसावा भाग कमी करावा.  त्यात अजून काही थोडे मिळविले (की इष्ट उत्तर मिळते.)

टिप्पणी - दिलेल्या चौरसाच्या दुप्पट आकाराचा चौरस निर्माण करण्याची पद्धति येथे संक्षिप्तपणाने दर्शविली आहे.  अशा दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू = मूळच्या चौरसाचा कर्ण हे उघड आहे. मूळ चौरसाच्या बाजूचे प्रमाण = १ असे मानल्यास त्या चौरसाचा कर्ण = वर्गमूळ २.   ’२’ चे वर्गमूळ म्हणजे किती हे येथे दर्शविले आहे.  ’१ + १/३ + १/३*४ - १/३*४*३४ + थोडेसे वर (सविशेष)’ असे हे ’२’ चे वर्गमूळ दाखविले आहे.  आकडेमोड केल्यास १+१/३+१/३*४-१/३*४*३४ = १.४१४२१५६... आणि वर्गमूळ २ = १.४१४२१३... हे पाहिल्यावर असे जाणवते की शुल्बकारांना माहीत असलेले उत्तर खर्‍या उत्तराच्या खूपच जवळचे आहे.  हे उत्तर त्यांनी कसे शोधून काढले असावे?

हा विचार करण्यासाठी शुल्बकारांना उपलब्ध असलेले संख्याज्ञान कशा प्रकारचे होते आणि त्यांचे अंकगणितातील क्रियांचे ज्ञान कशा प्रकारचे होते हे पाहायला लागेल.  १, २, ३ अशा नैसर्गिक पूर्ण संख्या, हातापायाच्या १० बोटांवरून १०, १००, १००० अशा संख्या आणि ह्यांच्या संकलनाने (बेरीज) आणि व्यवकलनाने (वजाबाकी) निर्माण होऊ शकणार्‍या उर्वरित नैसर्गिक पूर्ण संख्या मनुष्यजातीने सहज निरीक्षणामधून निर्माण करून त्या भिन्नभिन्न दर्शविण्यासाठी आवश्यक ती चिह्नेहि निर्माण केली असणे स्वाभाविकच मानता येईल.  रोमन संस्कृतीने निर्माण केलेली अशी चिह्ने अजूनहि मर्यादित वापरात आहेत. शुल्बकालीन भारतीयांची अशी चिह्ने काय होती ह्याचा काहीच पुरावा उरलेला नाही, यद्यपि अशी चिह्ने असणार हे निश्चित.  तशाच नैसर्गिक विचाराने मोठया समुच्चयाचे एकाच आकाराच्या लहान समुच्चयांमध्ये विभाजन करणे - जसे की १० चे ५ आणि ५ असे दोन बिभाग, १८ चे ६,६,६ असे तीन विभाग - हेहि माहीत असणार. (परंतु १० चे ३ भाग कसे होऊ शकतील हा विचार त्यांच्या झेपेपलीकडील होता.)  दोन संख्यांचे संकलन (बेरीज) अथवा त्यांपैकी एकातून दुसरी घालविणे असे व्यवकलन (वजाबाकी) ह्या कृतीहि नैसर्गिकत: सुचणार्‍या आहेत.  मात्र ’शून्य’ ह्या संकल्पनेची निर्मिति आणि तिचा वापर करून संख्येच्या स्थानावरून तिचे मूल्य १० च्या पटीत बदलणे हे ज्ञान अजून काही शतके दूरच होते आणि त्याशिवाय गुणाकार आणि भागाकार हेहि शक्य नव्हते.  (रोमन आकडे वापरून गुणाकार करता येत नाही ह्यावरून हे स्पष्ट होईल.)  शेती आणि पशुपालन हे मुख्य व्यवसाय असलेल्या आणि संपूर्णत: यन्त्रविरहित असलेल्या समाजाला आपले दैनंदिन जीवन चालविण्यासाठी ह्याहून अधिक गणितज्ञानाची आवश्यकताहि नव्हती.

अशा स्थितीत एका संख्येपासून ज्याला आपण ’वर्ग’ म्हणतो अशी दुसरी संख्या कशी काढायची?  उत्तर सरळ आहे.  ५ चा वर्ग काढायचा म्हणजे धान्याचे दाणे ५ च्या ओळींमध्ये एकाखाली एक अशा ५ वेळा ठेवायचे आणि एकूण दाणे मोजायचे.

दिलेल्या चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळाचा वर्ग कसा काढायचा?  दिलेला चौरस शेजारीशेजारी दोन वेळा मांडायचा आणि त्यातील दाणे खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे मांडून नवा चौरस मिळतो का हे पाहायचे.  आकृतीत ५ इतकी बाजू असलेले दोन चौरस शेजारीशेजारी काढून तेच धान्याचे दाणे वेगळ्या मार्गाने  मांडून नवा चौरस मिळतो काय हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.  असे दिसते की ७ बाजू असलेला नवा चौरस ह्यातून निघतो पण १ दाणा शिल्लक राहतो.  हा प्रयोग कोठल्याहि संख्येवर केला तरी सगळे दाणे वापरून नवा चौरस निर्माण करता येत नाही हे लवकरच ध्यानात येते.  प्रत्येक वेळी काही दाणे उरतात तरी किंवा कमी पडतात.  म्हणजेच केवळ पूर्णांक आणि पूर्ण विभाजन देणारे भागच केवळ वापरून दुप्पट आकाराचा चौरस निर्माण करता येत नाही हे लक्षात येते.

हे नाही तर नाही पण ’सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:’ असा विचार करून सर्वसाधारणत: अदमासाने दुप्पट म्हणता येईल असा चौरस तरी सापडेल काय असा विचार सुरू होतो.  त्यासाठी प्रथम एक संख्या घ्यायची, तिच्या चौरसाचे मान काढायचे, त्याची दुप्पट करायची आणि त्या दुपटीच्या जवळ येईल अशी वर्गसंख्या कोठल्या संख्येची आहे असा शोध घ्यायचा.  (हे सर्व कार्य वर दिलेल्या अंकगणिताच्या मर्यादेत राहून करणे शक्य आहे.)  असे केले म्हणजे (५,७), (१७.२४), (२९,४१), (३४.४८) अशा अनेक जोडया नजरेस येतात पण त्या सर्वांमध्ये एक दोष आहे आणि तो असा की पहिल्या संख्येच्या वर्गाची दुप्पट आणि दुसया संख्येचा वर्ग ह्यांमध्ये बर्‍यापैकी अंतर आहे आणि ही ढोबळ चूक जितकी पट करू तितक्या प्रमाणात वाढत जाईल.  समाधानकारकरीत्या लहान अशी चूक मिळण्यासाठी बरेच पुढे जावे लागेल पण तसे केले की (४०८,५७७) ही जोडी मिळेल जेथे ह्या संख्यांच्या आकारच्या मानाने चूक अगदीच क्षुल्लक आहे.  ४०८ चा वर्ग = १,६६,४६४, त्याची दुप्पट ३,३२,९२८ आणि ५७७ चा वर्ग = ३,३२,९२९.  म्हणजेच ४०८ प्रमाणक इतकी बाजू असलेला चौरस घेतला तर त्याच्या दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू ५७७ पेक्षा अगदी क्षुल्लक फरकाने लहान आहे. हाच ’सविशेष’.

आता प्रश्न येतो की ४०८ प्रमाणक लांबीने प्रारंभ करून आणि वर उल्लेखिलेल्या अंकगणिती मर्यादेत राहून ५७७ प्रमाणक इतकी लांबी कशी मिळवायची.  ४०८ चा अर्धा भाग त्याच्या पुढे ठेवला तर आपण ६१२ ला पोहोचतो, जी संख्या ५७७ च्या बरीच पुढे आहे.  ४०८ चा तिसरा भाग १३६ त्यापुढे मांडला तर आपण ५४४ ला पोहोचतो.  त्या तिसर्‍या भागाचा चौथा भाग त्यापुढे ठेवला तर आपण ४०८+१३६+३४ = ५७८ ला पोहोचतो.  आता आपली उडी ५७७ च्या पुढे १ प्रमाणक इतकी पडली आहे.  तो १ (= ४०८ च्या तिसर्‍या भागाच्या चौथ्या भागाचा चौतिसावा भाग) कमी केला म्हणजे आपण ५७७ ला पोहोचतो.  ह्यात ’सविशेष’ मिळवला म्हणजे इष्ट त्या दुप्पट आकाराच्या चौरसाची बाजू मिळेल.  वेगळ्या शब्दात लिहायचे तर मूळ चौरसाची बाजू १ प्रमाणक मानली तर इष्ट चौरसाची बाजू =

१+१/३+१/३*४-१/३*४*३४+सविशेष
किंवा चालू भाषेत
१.४१४२१५६... 

शुल्बसूत्रांमध्ये वापरलेले लांबीचे कोष्टक ३४ यवाचे दाणे = १ अंगुलि, १२ अंगुलि = १ प्रदेश असे असते. कोष्टकांसाठी साधारणत: निवडले जाणारे २,४,८.१६ असे सोपे आकडे सोडून शुल्बकारांची नजर ३४ वर का पडली असावी ह्याचाहि उलगडा येथे होतो.  दिलेल्या चौरसाची बाजू = १ प्रदेश असे मानल्यास इष्ट चौरसाची बाजू आता १ प्रदेश + ५ अंगुलि + १ यव असे मांडता येते.  तसे मांडता यावे म्हणून ३२ वा ३६ हे ’सोयीस्कर’ आकडे वगळून तेथे शुल्बकारांनी ३४ यव = १ अंगुलि असे ठरविले असले पाहिजे.

(पहिल्या भागात उल्लेखिलेले थिबो ह्यांचे पुस्तक थोडी वेगळी उपपत्ति देते. तिच्याहून मी येथे दिलेली उपपत्ति अधिक सुकर आहे असे वाटते.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

१९) क्लब रोड - जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), आनंदराव नायर मार्ग (लॅमिंग्टन रोड), मोहम्मद शहीद मार्ग (मोरलॅंड रोड) आणि मराठा मंदिर मार्ग (क्लब रोड) अशा चौकोनामध्ये सध्या मराठा मंदिर सिनेमा, रिजर्व बॅंक कॉलनी, एसटी आणि बेस्टचे बसडेपो आहेत तो चौकोन १९४७ सालापर्यंत भायखळा क्लबाने व्यापलेला होता.  १८३३ साली सुरू झालेला आणि केवळ युरोपीयनांसाठीचा हा क्लब मुंबईतील तशा सर्व अन्य क्लबांमध्ये सर्वांत exclusive मानला जाई आणि त्याचे सदस्यत्व मिळवणे सर्वसामान्य युरोपीयनांनाहि अवघड होते.  त्याच्या नावावरून क्लब रोड हे नाव पडलेले आहे.  हे apertheid स्वातन्त्र्यानंतर टिकवणे अवघड जाईल ह्या विचाराने १९४७ साली तो विसर्जित करण्यात येऊन त्याची मालमत्ता विकण्यात आली.  १८८३ मध्ये टर्फ क्लब ची स्थापना होईपर्यंत घोडयांच्या शर्यती भायखळा क्लबच्या विस्तीर्ण मैदानावर होत असत.  ’भायखळा क्लब कप’ मुळे टर्फ क्लबमध्ये ह्याची आठवण अजून जागी आहे.  क्लब रोड आणि भायखळा क्लबची खालील चित्रे पहा:

२०) चिरा बझार - एके काळी गिरगाव रस्त्याचा हा भाग दगडी चिरे वापरून झाकलेला असल्याने हे नाव त्याला मिळाले.

२१) चर्नी रोड - शेपर्ड ह्यांनी ह्या रस्त्याच्या नावाचे स्पेलिंग Charni Road असे दाखविले आहे.  त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की हे कोणा साहेबाचे नाव नसून ह्याचा उगम देशीच दिसतो.  ह्या उगमाबाबत सार्वत्रिक समजूत अशी दिसते की गुरेचारणीची जागा म्हणून हे नाव जागेला पडले. हे सहज शक्य वाटले तरी ह्यास आधार कोठेच दिसत नाही.  मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब.पु.बा.जोशी हे म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले.  चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

२२) कुलाबा, Old Woman's Island, कुलाबा कॉजवे, अफगाण चर्च - खाली दाखविलेल्या मुंबईखालील मूळच्या सात बेटांच्या नकाशात अगदी खाली कुलाबा आणि Old Woman's Island अशी दोन बेटे आहेत.  पैकी Old Woman's Island हे छोटे बेट आता उरलेलेच नाही कारण कुलाब्याला मुख्य मुंबईशी जोडणार्‍या कुलाबा कॉजवेने त्याला गिळून टाकलेले आहे.

Old Woman's Island ह्या नावाचा उगम कोठेच सापडत नाही पण कुलाबा ह्याचा उगम ’कोळ-भाट’ (कोळी लोकांची जागा) असा असावा असा तर्क गर्सन दा कुन्हा आणि एडवर्ड्स् ह्यांनी केला आहे.  मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये ह्या शब्दाचे मूळ अरबी असल्याचे दर्शवून त्याचा अरबी अर्थ ’समुद्रात शिरलेला जमिनीचा लांब तुकडा’ असा दाखविला आहे.  (कोकण किनार्‍यावरील कुलाबा गाव आणि मुंबईतील बेट ह्या दोहोंचा हा अर्थ मोल्सवर्थमध्ये दाखविला आहे.) एडवर्ड्स ह्यांच्या मते Old Woman's Island हे नावहि Island of Al-Omanis - Island of Deep-sea Fishermen अशा अर्थाच्या अरबी शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश आहे.

१७९६ सालामध्ये कुलाब्याचे बेट हा कॅंटोन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आला.  (अजूनहि कुलाब्याचा मोठा भाग सैन्यदलाच्या ताब्यात आहे त्याचा हा उगम.) मात्र तेथे जायला होडीचा वापर करावा लागत असे.  १८३८ मध्ये मधल्या Old Woman's Island चा पायरीसारखा उपयोग करून कॉजवेच्या मार्गाने कुलाबा मुख्य मुंबईशी जोडले गेले.

कुलाब्यात असलेले आणि १८४६ साली बांधलेले the Church of St John the Evangelist' हे ’अफगाण चर्च’ ह्या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. चर्चमधील एका स्मृतिलेखाप्रमाणे हे चर्च १८३८ च्या पहिल्या अफगाण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृतीला वाहिलेले आहे.

(संगमरवरी लेख)

२३) कॉटन ग्रीन - १९व्या शतकाच्या प्रारंभापासून पूर्वेला चीनकडे आणि पश्चिमेला इंग्लंड आणि युरोपकडे कपाशीची निर्यात हा मुंबईतील एक प्रमुख व्यवसाय झाला होता.  दक्षिण हिंदुस्तानात उत्पादन झालेली कपात निर्यातीसाठी मुंबईत जमा होई आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत तिला टाउन हॉलसमोरच्या मोकळ्या जागेत साठवत असत. हे पहिले ’कॉटन ग्रीन’. कॉजवेमुळे कुलाबा मुंबईस जोडला गेल्यानंतर आणि १८६७ साली बीबीसीआय रेल्वेने कुलाबा स्टेशन बांधल्यावर मुंबईत येणारी कपास साठवणीची नवे ’कॉटन ग्रीन’ ह्या स्टेशनाजवळ आणण्यात आले.  तेथे ते १९३० सालाच्या पुढेमागेपर्यंत होते.  रेल्वेने कुलाबा स्टेशन १९३० सालात बंद केले.  तदनंतर कापसाचा व्यापार तेथून हलून उत्तरेस हार्बर लाईनवरील ’कॉटन ग्रीन’ नावाच्या नव्या स्टेशनाच्या परिसरात आणि ’कॉटन ए़क्स्चेंज’ ह्या नव्या इमारतीजवळ गेला.  आता काळ अजून पुढे सरकला आहे आणि ह्या अलीकडच्या ’कॉटन ग्रीन’मध्ये आयातनिर्यात मुख्यत्वेकरून लोखंड आणि पोलादाची होत असते.  कुलाब्याचे कॉटन ग्रीन असे दिसत असे:

२४) कूपरेज - ’कूपर’ हे एका व्यवसायाचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.  कूपर हा व्यावसायिक लाकडापासून वस्तु आणि द्रव ठेवण्याची भांडी - बॅरल, बादली इत्यादि तयार करतो.  सैन्यासाठी लागणारे मासे, मांस ह्यासारखे खाद्यपदार्थ, बीअरसारखी पेये टिकून राहण्य़ासाठी ते मिठात खारवणे, वाळवणे आणि नंतर योग्य प्रकारच्या लाकडाच्या भांडयात साठवणे ही कामे कूपर्स करीत आणि ह्यासाठीची जागा किल्ल्याच्या आत होती.  कालान्तराने नाना प्रकारचे वास आणि दुर्गन्धि निर्माण करणारे हे काम किल्ल्याबाहेर करण्यासाठी बेटाच्या दक्षिण बाजूस अपोलो बंदराजवळ एक शेड बांधून कूपर व्यावसायिकांची तिकडे रवानगी झाली.  १७८१ साली बांधलेली ही शेड १८८६ पर्यंत त्या कामासाठी वापरात होती.  त्या शेडच्या मोकळ्या जागेला कूपरेज हे नाव लागले आहे.  शेजारच्या रस्त्यासहि तेच नाव मिळाले आहे.

२५) सी.पी.टँक रोड - फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग), अर्स्किन रोड (ब्रि.उस्मान मार्ग) आणि किका स्ट्रीट हे जेथे मिळतात तेथून सुरू होणार्‍या ह्या रस्त्याला कावसजी पटेल ह्यांनी बांधलेल्या तलावावरून हे नाव पडले आहे.  पारशी समजुतीनुसार मुंबईत येणारी पहिली पारशी व्यक्ति इंग्रजांपूर्वी पोर्तुगीज काळातच १६४० साली आली होती.  त्या व्यक्तीचे नाव दोराबजी नानाभाई.  पोर्तुगीज अधिकारी आणि स्थानिक कोळी वस्ती ह्यांच्यामधील दुवा असे काम ते करीत असत आणि मुंबई इंग्रज अमलाखाली गेल्यावरहि त्यांची ती जागा चालू राहिली.  दोराबजीचा मुलगा रुस्तुम ह्याने १६९२ मध्ये सिद्दीचे मुंबईवरील आक्रमण स्थानिक कोळी लोकांची सेना उभारून परतवून लावले आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईचे पाटिलकीचे वतन वंशपरंपरा देण्यात आले.  रुस्तुमचा मुलगा कावसजी पटेल ह्याने धर्मार्थ हेतूने जो तलाव १७८० साली बांधला त्यावरून कावसजी पटेल टॅंक रोड तेव्हापासून ओळखला जातो.  विहार आणि तुळशी तलावांचे पाणी मुंबईत पोहोचल्यावर आरोग्याच्या कारणासाठी मुंबईतील इतर बहुतेक तलावांप्रमाणे हाहि बुजवला गेला.  बुजवण्याचे निश्चित वर्ष उपलब्ध नाही.  खाली दर्शविलेल्या जुन्या नकाशात कावसजी पटेल टॅंक रस्ता आणि त्याच्या पश्चिम टोकाला त्याच नावाचा तलाव दिसत आहे.

२६) क्रॉस आणि एस्प्लनेड मैदाने - मुंबईची बेटे कंपनीच्या ताब्यात १६६८ साली आली तेव्हा सध्याची दक्षिण मुंबई स्थानिक लोकांच्या शेतांनी आणि नारळाच्या वाडयांनी भरलेली होती.  हे लोक बहुसंख्येने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले होते.  सध्याचे मरीन लाइन्स, मेट्रो सिनेमा, एल्फिन्स्टन कॉलेजसारखे भाग ’कवेल’ नावाच्या वस्तीने व्यापलेले होते.  (कवेल हा शब्द कोळीवाडा ह्याचे पोर्तुगीज रूप आहे.)  कंपनीच्या ताब्यात ही बेटे आल्यावर परकी आक्रमणापासून त्यांचा बचाव करण्यासाठी इंग्रजांनी तेथे समुद्राकडे तोंड करून असलेला किल्ला बांधला आणि त्याच्या पश्चिम बाजूस मजबूत भिंत, बुरूज, तोफा ठेवण्याच्या जागा इत्यादि बांधून ती बाजू बळकट केली.  ह्यातूनच १७६० च्या सुमारास इंग्रज वरिष्ठांना असे वाटले पश्चिमेकडील कवेल, त्यातील घरे आणि वाडया, त्यातील मजबूत दगडविटांच्या बांधणीचे चर्च (Nossa Senhora da Esperança, Our Lady of Hope) आणि त्याला संलग्न दफनभूमि ह्यांपासून किल्ल्याला धोका संभवू शकतो कारण कोणी शत्रूने त्या बाजूने बेटावर सैन्य उतरविले तर ते सैन्य ह्या सर्व वाडया आणि बांधकामांच्या आडोशाने किल्ल्यावर हल्ला करू शकेल.  परिणामत: कवेल गाव उठवून चर्च जमीनदोस्त करण्यात आले.  (ह्याच कारणासाठी तेथेच जवळ असलेले मुंबादेवीचे देऊळ उठवून त्याच्या सध्याच्या जागी बदलण्यात आले. चर्चला भुलेश्वरकडे नवीन जागा देण्यात आली.) अशा रीतीने किल्ल्याच्या पश्चिमेस एक मोठे मैदान निर्माण झाले.  नदी, समुद्र, तलाव अशांना लागून असलेल्या जागेस ’एस्प्लनेड’ म्हणतात म्हणून हे मैदान त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.  कालान्तराने एस्प्लनेड मैदानामधून उत्तर-दक्षिण असा रस्ता निघून त्याला ’एस्प्लनेड रोड’ असे नाव मिळाले.  पुढील काळात हा भाग श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा संध्याकाळी फेरफटका मारण्याचा भाग झाला, तसेच त्याच्या उत्तर बाजूकडे सैन्याच्या कवायतींची जागा होती.  ह्या सर्वाचे  सुंदर वर्णन दिनशा वाच्छा ह्यांनी केले आहे.  त्यांच्याच सांगण्यानुसार १८५७ मध्ये मुंबईत नेटिव सैन्यात धनत्रयोदशीच्या रात्री काही बंडाची हालचाल आहे असे कानावर येताच पोलिस कमिशनर फोर्जेट ह्यांनी तातडीने तपास करून कारस्थानाच्या दोन पुढार्‍यांना  ताब्यात घेतले आणि झटपट कोर्ट मार्शल भरवून त्यांना मृत्युदंड सुनावला.  नोवेंबरच्या एका दुपारी दोघा पुढार्‍यांना सैन्याच्या आणि रहिवाशांच्या उपस्थितीत तोफांच्या तोंडी बांधून उडवून देण्यात आले.  वाच्छा तेव्हा जवळच्याच एल्फिन्स्टन स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी शाळेतून घरी परतत असतांना हा प्रसंग पाहिला.

१७६०च्या आगेमागे निर्माण झालेले हे मैदान अजूनहि गजबजलेल्या दक्षिण मुंबईत आपले मोकळेपण टिकवून धरण्यात पुष्कळ प्रमाणात यशस्वी झाले आहे.  त्याच्या मध्यातून जाणार्‍या दक्षिणोत्तर अशा एस्प्लनेड रोडमुळे ह्या मैदानाचे दोन भाग झाले आहेत.  पैकी पूर्वेकडील भागास आझाद मैदान असे नाव अलीकडे मिळाले आहे.  पश्चिमेकडील भागास ’क्रॉस मैदान’ म्हणतात कारण जुन्या पोर्तुगीज चर्च आणि दफनभूमीचा अवशेष असा एक क्रॉस तेथे टिकून होता. दिनशा वाच्छा आणि दा कुन्हा ह्या दोघांनीहि हा मूळचा क्रॉस पाहिल्याची नोंद ते करतात.  १९४०-४५ पर्यंत तो तेथे असावा कारण दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी मुंबईत उतरून युद्धाकडे रवाना होणार्‍या इंग्लिश-अमेरिकन सैनिकांना मुंबईची तोंडओळख करून देण्यासाठी छापलेल्या एका पुस्तिकेत त्याचा उल्लेख मला आढळला.  सध्याहि ह्या मैदानात एक क्रॉस दिसतो पण तो अलीकडेच बांधण्यात आला आहे.

एस्प्लनेड रोडचे नाव नंतर बदलून ’महात्मा गांधी रोड’ असे झाले.  हे नामान्तर स्वातन्त्र्यापूर्वीच केव्हातरी झालेले दिसते कारण वर उल्लेखिलेल्या पुस्तकात त्याचा तसा उल्लेख आहे आणि त्यातील नकाशातहि हे नाव दाखविले आहे.  ब्रिटिशांनी देश सोडण्यापूर्वीच हा बदल कसा घडून येऊ शकला आणि तोहि ’महात्मा’ ह्या उपाधिसकट हे मला एक गूढ वाटत आहे!  हा नकाशा खाली दर्शवीत आहे.

२७) करी रोड स्टेशन - हे उपनगरी गाडयांच्या स्टेशनचे नाव म्हणून अजून टिकून आहे पण ज्या रस्त्यावरून हे नाव पडले त्या करी रोडला आता महादेव पालव मार्ग असे नाव मिळाले आहे.  सध्याच्या वेस्टर्न रेल्वेचा पूर्वावतार बॉंबे बरोडा ऍंड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) रेल्वे हिचे १८६५ पासून १८७५ पर्यंतचे एजंट सी.करी ह्यांचे नाव स्टेशन आणि रस्त्यास दिले होते.  जीआयपी, बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्यांची लंडनमध्ये उभारलेल्या होत्या आणि त्यांची प्रमुख कार्यालये तेथेच होती.  हिंदुस्तानात कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख करणार्‍या प्रमुख अधिकार्‍यास ’एजंट’ अशी उपाधि असे.  ह्या दोन रेल्वे कंपन्यांची बोधचिह्ने मला wiki.fibis.org ह्या संस्थळावर सापडली ती खाली दर्शवीत आहे.

२८) चौपाटी - जुन्या किल्ल्याच्या पश्चिमेस भराव घालून रेक्लमेशनची नवी जमीन तयार करण्यापूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी जवळजवळ सध्याच्या चर्चगेट स्टेशनपर्यंत पोहोचत असे आणि ह्या पाण्याचे चार वेगवेगळे भाग (channels) दिसत.  त्यावरून त्या भागाला चौपाटी हे नाव पडले.  ठाणे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असेच सातपाटी नावाचे मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे त्याची येथे आठवण होते.

२९) चर्चगेट आणि चर्चगेट स्ट्रीट - मुंबईच्या फोर्ट जॉर्ज किल्ल्याला उत्तरेकडे बझार गेट, दक्षिणेकडे अपोलो गेट आणि पश्चिमेस चर्च गेट असे तीन दरवाजे होते.  पैकी चर्चगेट हे साधारणपणे सध्याच्या हुतात्मा स्मारकापाशी (फ्लोरा फाउंटन) होते आणि जवळच्याच सेंट थॉमस कॅथीड्रलवरून त्याला हे नाव पडले होते.  चर्चगेटमधून येणार्‍याजाणार्‍या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे नाव होते.  गेट १८६० च्या सुमारास आवश्यकता न उरल्यामुळे पाडून टकण्यात आले.  रस्त्याला सध्या वीर नरिमन मार्ग असे नाव आहे.  चर्चगेटचे नाव आता उपनगरी गाडयांच्या स्टेशनच्या रूपाने उरले.  चर्चगेट स्ट्रीट आणि जुने चर्चगेट स्टेशन खाली दाखवत आहे. आहे.

३०) दादर, दादर बीबी आणि टीटी - ’दादर’ ह्या नावाचा उद्भव कसा झाला ह्याबाबत निश्चित अशी माहिती कोणाजवळच उपलब्ध नाही. अशी एक समजूत बरीच रूढ असल्याचे मी ऐकले आहे की दादरमधून जाणार्‍या  रेल्वे रुळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी आणि पादचारी लोकांच्यासाठी तेथे एक पूल आणि जिना - दादर - बांधण्यात आला आणि त्यावरून ह्या उपनगराचे नाव ’दादर’ असे पडले.  ही उपपत्ति स्वीकारार्ह वाटत नाही कारण मुंबईशी संबंधित म्हणून ’दादर’ हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मराठी-इंग्लिश शब्दकोषात सापडतो.  तेथे दिलेल्या त्याच्या चार अर्थांपैकी दोन असे आहेत: '3. A bridge.  4. A Bombay word.  A ladder-like and moveable stair-case.'

दादरमधून जुनी बीबीसीआय रेल्वे (पश्चिम रेल्वे) आणि जुनी जीआयपी रेल्वे ह्या दोघींचे मार्ग जातात.  त्यापैकी पश्चिम रेल्वेच्या पलीकडील भागाचे दादर बीबीसीआय ऊर्फ दादर बीबी हे नाव अजून लोकांच्या तोंडात टिकून आहे.  मुंबईमध्ये ट्रॅम होती तेव्हा दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ते म्यूजिअम (परळ-भायखळा-वीटीमार्गे) हा ट्रॅमचा प्रवास दीड आण्यामध्ये होत असे.  ३१ मार्च १९६४ ह्या दिवशी ह्याच मार्गाने मुंबईची शेवटची ट्रॅम धावली.  दादर टीटी म्हणजे सध्याचे खोदादाद सर्कल.

शेपर्ड ह्यांच्या मतानुसार ’मुंबईकडे जाणार्‍या रस्त्याची एक पायरी’ अशा अर्थी हे नाव रूढ झाले असावे.  ठाणे जिल्ह्यातील केळवे गावाच्या बाहेर असलेल्या कोळी वस्तीसहि ’दादर’ असेच कोळी बोलीमधे नाव आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे.

३१) धोबी तलाव - मुंबईची बेटे पोर्तुगीजांकडे असण्याच्या दिवसांत एका धोबी व्यक्तीने तेव्हाच्या ’कवेल’ नावाच्या कोळी वस्तीमध्ये आपल्या जमातीच्या लोकांसाठी एक तलाव खोदला होता आणि बांधणार्‍याच्या नावावरून त्याला धोबी तलाव असे नाव पडले होते. धोबी त्या तलावावर आपले कपडे धुण्याचे काम करीत असत.  १८३९ सालापर्यंत तलाव जुना होऊन गाळाने भरला होता आणि त्यावर्षीच्या पाण्याच्या दुष्काळामुळे तो जवळजवळ आटला होता  फ्रामजी कावसजी नावाच्या दानशूर पारसी व्यक्तीने रु ४०,००० खर्च करून तलाव स्वच्छ करून पुन: बांधून घेतला आणि सार्वजनिक उपयोगासाठी तो सरकारच्या हवाली केला. कालान्तराने विहारचे पाणी दक्षिण मुंबईत पोहोचू लागल्यावर अन्य तलावांप्रमाणे ह्याचीहि तितकीशी आवश्यकता उरली नाही आणि नंतर केव्हातरीच्या वर्षात तो बुजविण्यात आला. १८६२ साली ह्या तलावाच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍यावर फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूट उभारण्यात आली.  तिची इमारत ह्या तलावाचा काही भाग वापरून बांधली गेली आहे.  तलावाची आठवण आता पुढील मजकुराच्या संगमरवरी लेखातून उरली आहे.  हा लेख फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूटच्या रस्त्यावरील भिंतीवर पाहायला मिळतो:

Framji Cowasji Tank
That tank was so called by the order of Government to commemorate the late Framji Cowasji's liberality
in expending a large sum of money on its reconstruction in the year 1839.

पूर्वीच्या तलावाची जागा आता वासुदेव बळवंत चौकाने व्यापली आहे पण धोबी तलाव हे ह्या भागाचे जुने नावहि वापरात आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - इतिहास